Friday, August 23, 2013

पोलिसांसाठी रोजगार हमी?

   आता नेहमीप्रमाणे आपले गृहमंत्री आर आर आबा पाटिल नागरिकांना गुन्हेगार पकडले जाण्याची हमी देतील. गुन्हेगारांनी बिनधास्त गुन्हे करावेत आणि पोलिसांना तपासकामाला लावावे, की बहूधा महाराष्ट्रात आता एक रोजगार हमी योजना झालेली असावी. अन्यथा इतक्या नित्यनेमाने इतके गंभीर गुन्हे कशाला घडले असते? मंगळवारी सकाळी पुण्यासारख्या महत्वाच्या महानगरात मध्यवर्ति भागात भरवस्तीमध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली. आता त्याला तीन चार दिवसांचा कालावधी निघून गेला आहे. पण त्याचे धागेदोरेही सापडल्याचे पोलिस सांगू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. त्याचा जाब राज्यकर्त्यांना विचारत व त्यावर चर्चा पत्रकारात व माध्यमात चालू असतानाच मुंबईत तितक्याच मध्यवर्ति भागात गुरूवारचा सूर्य मावळत असताना एका पत्रकार मुलीवरच सामुहिक बलात्कार झाला. त्यानंतर तब्बल दोन तासांनी पोलिसांना त्याची खबर लागली आणि नेहमीप्रमाने सांत्वन करायला व सुरक्षेची हमी द्यायला गृहमंत्री इस्पितळात पोहोचले. खरे तर ती पिडीत मुलगी किंवा दाभोळकर यांच्याप्रमाणे आज कायद्याचीही तशीच अवस्था झालेली आहे. रुग्णाईत वा मरणसन्न स्थितीत जणू कायदा पडलेला आहे आणि गिधाडांप्रमाणे गुन्हेगार त्याचे लचके तोडत आहेत. कुठल्या तरी वाहिनीवर सहकारी वा पिल्लाला लांडगे शिकार करून फ़ाडून खाताना दिसतात, तसे हतबल हरणे झेब्रा होऊन बघत रहाण्यापलिकडे सामान्य माणसाच्या हाती काहीच उरलेले नाही. आता आबांनी वा तेव्हा दिल्लीत सुशिलकुमार शिंदे यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गुन्हेगार पकडले जाणार आहेत. पण मुद्दा गुन्हेगार पकडण्याचा वा त्याला शिक्षा ठोठावण्याचा आहे, की सामान्य माणसे व महिलांना सुरक्षा देण्याचा आहे?

   कुठल्याही समाजात दक्षता वा सुरक्षा हा विषय गुन्हेगारीपासून लोकांना सुरक्षेची हमी देण्याशी संबंधित असतो. आपल्या देशात गुन्हे रोखण्याचा विचारच होत नाही. जणू गुन्हेगारांना मोकाट रान दिलेले आहे आणि त्यांनी गुन्हा केल्यावर त्यांना ताब्यात घेऊन खटल्याचे नाटक रंगवण्याची जबाबदारी कायद्याने आपल्याकडे घेतलेली आहे. असाच एकूण कारभार चालू असतो. त्यामुळे एकप्रकारे गुन्हेगारांना आपले पापकर्म बिनबोभाट पार पाडण्यालाच संरक्षण मिळालेले आहे. जोवर आपले पापकर्म उरकले जात नाही, तोपर्यंत आपल्याला कायदा व्यवस्था व्यत्यय आणणार नाही; अशी हमीच आपल्या देशातल्या गुन्हेगारीला सरकारने दिलेली आहे. अन्यथा मुंबईत इतक्या सहज मार्गाने हा सामुहिक बलात्कार होऊच शकला नसता. एका बंद पडलेल्या ओसाड गिरणीच्या आवारात छायाचित्रे घ्यायला गेलेल्या या तरूणी व तिच्या सहकारी पत्रकाराला एका शंकास्पद टोळीने हटकले आणि पोलिसच असल्याचा आव आणून त्या दोघांना जणू ताब्यात घेतले. पुढे त्यांना जे करायचे ते त्या गुंडांनी केले. त्याचे तपशीलवार वर्णन इथे करण्याची गरज नाही. पण ज्या सहजगत्या व बिनधास्तपणे त्यांनी आपला कार्यभाग उरकला; त्यातून गुन्हेगारांना इथे मुंबईत वा अन्य देशभर किती सुरक्षित वाटते, त्याचीच साक्ष मिळते. त्या मुलीवर बलात्कार करून त्यांनी काढता पाय घेतला आणि तिलाच आपल्या सहकार्‍याच्या मदतीने जसलोक इस्पितळात जाऊन उपचारासाठी दाखल व्हावे लागले. पत्रकार असून त्यांनी जवळच्या पोलिस ठाण्यात जाण्यापेक्षा आधी उपचारासाठी इस्पितळात धाव घेतली; यातच कायदा व पोलिसांवर त्यांचा अविश्वास स्पष्ट होतो. ही स्थिती कशामुळे आलेली आहे? त्याचा विचार तरी होणार आहे काय?

   आज चुकून पत्रकार मुलगी त्या गुंडांच्या हाती लागली म्हणून त्याचा बभ्रा झालेला आहे. पण ज्या सहजतेने हा गुन्हा घडला, तो घटनाक्रम बघता, त्याच ओसाड जागेत असे प्रकार नेहमी करायला ही टोळी सरावलेली असणार. अशाच प्रकारे आसपासच्या गरीब वस्ती वाट चुकलेल्या मुलींना तिथे आणून त्यांच्यावर असेच सामुहिक बलात्कार किती झाले असतील त्याची गणती नसेल. त्या दोघांना हटकले त्यांनी कोणाला तरी फ़ोन करून बोलावून घेतले आणि पुढला प्रकार घडला. म्हणजे तीच त्या टोळीची कार्यप्रणाली किंवा मोडस ऑपरेंडी आहे. तो गुन्हा त्यांच्या अंगवळणी पडलेला असावा. त्यामध्ये त्यांची एक चुक झालेली असावी. पत्रकार वा माध्यमातली मुलगी असली तर गदारोळ होईल; याचा त्यांना अंदाज नसावा. कारण आजवर त्यांनी अशा कितीतरी मुली, तरूणी सापळ्यात ओढून अत्याचार केलेले असणार. पण गरीबा घरच्या वा सामान्य घरातल्या मुली असल्याने त्याची दखल घेतली गेली नसेल. इथे या मुलीनेही पोलिसात जाण्याआधी इस्पितळात धाव घेतली असेल; तर सामान्य घरातील मुली पोलिसात जायचे धाडस करतील काय? नसेल तर त्या ओसाड जागेत असे किती सामुहिक बलात्कार होऊन गेले असतील त्याची कल्पनाच केलेली बरी. थोडक्यात ही पत्रकार मुलगी त्यात फ़सली नसती तर बलात्कार करायची ही सुरक्षित जागा आणखी दिर्घकाल ‘सुरक्षित’ राहिली असती. बाकी त्या गुन्हेगारांना पकडून काही फ़ायदा नाही. दिल्लीच्या प्रकरणानंतर कायद्यात शिक्षा वाढवण्य़ात आली; म्हणून हे व्हायचे थांबले नाही. आताही हे आरोपी सापडले म्हणून पुढल्या घटना थांबणार अनहीत. कारण गुन्हेगारांना कायद्याचे भय उरलेले नाही. त्यांना फ़क्त संधी हवी असते. बाकी गुन्हा करणे खुप सुरक्षित झाले आहे

No comments:

Post a Comment