Tuesday, August 6, 2013

ही ‘नमो’नियाचीच लक्षणे

   अकस्मात उत्तर प्रदेशच्या राजकारणाला अशी उकळी कशाला फ़ुटली असावी? म्हणजे तिथे जे काही मुलायम यांच्या पुत्र मुख्यमंत्र्याने दिवे लावले; त्यावर बोलायला भाजपा उपलब्ध असताना कॉग्रेस व युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लेखी पत्र लिहून हस्तक्षेप करण्याचे तसे काही राजकीय कारण नव्हते. कारण त्यांच्याच लाडक्या अन्नसुरक्षा विधेयकाला संसदेत संमत करून घेण्यासाठी त्यांना मुलायमच्या समाजवादी पक्षाच्या पाठींबाची गरज आहे. अलिकडेच त्यासाठी पंतप्रधानांनी मुलायमना अगत्याने बोलावून तशी बोलणी करून ठेवली होती. पण सोनियांच्या पत्राने ही बोलणी विसटून टाकल्यासारखी भासतात. कारण आता मुलायम त्याच अन्नसुरक्षा विधेयकासाठी विविध अटी घालू लागले असून उघड विरोधी भाषा बोलू लागले आहेत. ते विधेयक संमत करून घेतल्यावरही सोनिया दुर्गा प्रकरणी हस्तक्षेप करू शकल्या असत्या. पण तसे त्यांनी केलेले नाही. आणि वाळू माफ़ीयांना वाचवण्यासाठी अखिलेश व मुलायम दुर्गाशक्तीला अन्य पदावर पाठवून विषय संपवू शकत होते. त्यांनी थेट मशीदीची भिंत पाडल्याचा खोटा आरोप ठेवून तिला निलंबित करण्याची गरज नव्हती. पण दोन्ही घटना घडल्या आहेत आणि दोन्ही पक्षांना अडचणीत आणणार्‍या वाटत आहेत. तर त्याचे कारण उघड आहे. उत्तर प्रदेशात मोठ्या संख्येने मुस्लिम मतदार असून त्यांची गठ्ठा मते आपल्याच पारड्यात सगळीच्या सगळी यावीत; यासाठी दोन्ही पक्ष धडपडू लागले आहेत. भाजपाने नरेंद्र मोदी यांना उमेदवार केल्याप्रमाणे पुढे आणल्यापासून उत्तर भारतामध्ये जी हिंदू मतांची जुळवाजुळव सुरू झाली आहे; त्यातून मुस्लिम मतांवरच विसंबून राजकारण करणार्‍यांचे धाबे दणाणल्याचे ते लक्षण आहे. म्हणून मुलायम यांनी वाळू माफ़ियांसाठी दुर्गाला हटवले असले तरी त्यासाठी मशीदीची भिंत पाडल्याचे खोटे कारण पुढे केले आहे. त्यातून आपणच मुस्लिमांचे कडवे पक्षपाती आहोत, असे त्यांना दाखवायचे आहे.

   दुसरीकडे सोनियांनी त्यात हस्तक्षेपाला विलंब केला असता, तर त्याला अर्थच उरला नसता आणि निष्कीय सरकार म्हणून मोदी आरोप करतात, त्यालाच जास्त बळकटी आली असती, त्याला शह देण्यासाठी सोनियांनी हे पत्र लिहिले. पण त्यातून समाजवादी पक्षाला शह देतानाच मुस्लिमांबद्दल आपण पक्षपाती नाही, असे दाखवले गेले आहे. त्याचा अर्थच मुस्लिम मते गमावण्याचा धोका पत्करला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी मग आता पुन्हा जुनीच आयडीया कॉग्रेसने बाहेर काढली आहे. मुस्लिम आरक्षणाचा विषय दिड वर्षापुर्वी सलमान खुर्शीद यांनी ऐन विधानसभा निवडणूकीत उकरून काढला होता, त्यातून मोठे वादळ उठले होते. आता दुर्गा प्रकरणी पत्र लिहिल्याने मुस्लिम अस्वस्थ होतील; म्हणून पुन्हा तोच मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उकरून काढला आहे. अल्पसंख्य विभागाचे मंत्री रहमान खान यांनी पंतप्रधान व राहुल गांधी यांना पत्र लिहून आरक्षणाकडे लक्ष वेधले आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणूकीत सपाटून मार खाल्ल्यावर कॉग्रेस मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा साफ़ विसरून गेली होती, आता त्याच शिळ्या कढीला ऊत आणायचा उद्योग कशासाठी? बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारपासून उत्तरप्रदेशातील मुस्लिम पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्‍या समाजवादी पक्षापर्यंत प्रत्येकाला साध्या ‘नमो’निया नामक आजाराने पछाडले असण्याची ही लक्षणे आहेत. मोदी यांनी एकही शब्द उच्चारला नाही, तरी त्यांच्या उमेदवारीने पुन्हा हिंदूत्वाची लाट येण्याच्या भयाने या सर्वांना पछाडलेले दिसते आहे आणि त्याला शह देण्याच्या नादात ही मंडळी अधिकाधिक चुका करू लागली आहेत. नितीशनी सकस आहाराच्या खाण्यात सापडलेले विषारी द्रव्य गुजरातमधून आल्याचा आरोप उगाच केला असेल काय?

   नरेंद्र मोदींचे नाव अजून भाजपाने पंतप्रधान पदासाठी जाहिर केलेले नाही आणि कदाचित आणखी काही महिने तशी घोषणाही होणार नाही. पण ज्या प्रकारे राजकारण पुढे सरकते आहे, त्याकडे बघता ते नाव खरेच आधी जाहिर केल्यास स्वत:ला सेक्युलर म्हणवणार्‍यांना पळता भूई थोडी व्हावी. किंबहूना भाजपा ते नाव जाहिर करायला बिचकते, यावरच अशा सेक्युलर लोकांची अधिक मदार दिसते. दोन चाचण्यात उत्तर प्रदेश व बिहारमध्ये मोदींमुळे भाजपाची मते वाढलेली दाखवली, म्हणून दुर्गा व विषारी द्रव्यासंबंधी तर्कहीन वक्तव्ये होत असतील; तर मोदी खरेच या दोन्ही राज्यात प्रचाराच्या मोहिमेवर येतील, तेव्हा यांची अवस्था काय होईल? मुद्दा आजवरच्या मुस्लिम व्होटबॅन्केचा आहे. मुस्लिम एकगठ्ठा मतदान करून निवडणूकीचे पारडे झुकवतात, या समजूतीला गुजरातेत मोदी यांनी शह देऊन दाखवला आहे. आज त्यांची जी प्रतिमा निर्माण झाली आहे व लोकांमध्ये त्यांच्याविषयीचे आकर्षण आहे, त्याच्या परिणामी मुस्लिम व्होटबॅन्केला निकामी करू शकणारी मोदी समर्थक व्होटबॅन्क उभी राहिल्याच्या भयाने सेक्युलरांना अस्वस्थ केले आहे काय? आणि मग त्यासाठीच सगळी मुस्लिम मते आपल्याच पारड्यात आणण्यासाठी या अतिरेकी डावपेचाच्या आहारी मुलायम, सोनिया व नितीशकुमार जाताना दिसत आहेत. अन्यथा दुर्गाशक्तीवर मशिदीची भिंत पाडल्याचा आरोप किंवा त्याच्याही पुढे जाऊन नोकरशाहीत मुस्लिम विरोधी अधिकारी असल्याचा पोरकट आरोप कशाला झाला असता? प्रचाराला अजून सुरूवात नाही, त्या आखाड्यात मोदी उतरतील तेव्हा यांचे काय व्हायचे?

No comments:

Post a Comment