Monday, August 5, 2013

नियमानुसार सर्वकाही

  युपीएच्या व कॉग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून उत्तर प्रदेशच्या तरूण सनदी अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांच्यावर अन्याय होता कामा नये असे सांगितले होते. त्यामुळे या तरूणीला सोनिया न्याय देऊ इच्छितात; याचा खुप गाजावाजा झाला. खरे तर तिथेच हे प्रकरण संपायला हवे होते. कारण सोनियांच्या पत्राचा व ते माध्यमांना लगेच प्रसिद्धीसाठी पाठवण्यामागचा तितकाच हेतू होता. सहाजिकच त्यानुसार कामही झालेले आहे. पंतप्रधानांनी नियमावर बोट ठेवून उत्तर प्रदेश सरकारकडून त्यासंबंधीचा अहवाल मागवला आहे. आता तो अहवाल पोहोचला; मग दिर्घकाळ त्यावर विचार करण्याचे दळण सुरू होईल. दरम्यान इतका हस्तक्षेपही मुलायम सिंग यांच्या समाजवादी पक्षाला खपलेला नाही. त्यांनी सोनियांसह कॉग्रेस पक्षाला जाब विचारण्यापर्यंत मजल मारून अन्नपाणी तोडण्यापर्यंत म्हणजे अन्न सुरक्षा विधेयकाला विरोध करण्याची धमकी देण्यापर्यंत मजल मारली आहे. त्यात फ़ारसा दम नाही. आतापर्यंत प्रत्येकवेळी मुलायम यांनी असली खुप नाटके केली आहेत. विरोधात तावातावाने बोलायचे आणि मतदानाची वेळ आली; मग सरकार अडचणीत येऊ नये अशी खेळी करायची, हे मुलायमचे राजकारण आहे. त्यामुळेच दुर्गाप्रकरणात दोघेही मस्तपैकी आपापल्या भूमिका पार पाडत आहेत. त्या अभिनयाला कोणी गंभीर ‘भूमिका’ म्हणून घेण्याची गरज नाही. नियमानुसार काम व कारभार हा स्वातंत्र्योत्तर काळातला कॉग्रेसी कार्यपद्धतीचा मूळमंत्र नेहमीच राहिला आहे. नियमाबाहेर कॉग्रेस कधीच जात नाही. त्यामुळे जे काम करायचे असते ते नियमात बसवून उरकले जाते आणि ज्या कामात खोडा घालायचा असतो, ते असे सगळे नियम गुंडाळून ठेवले जात असतात. नियम कधी मोडला जात नाही.

   आताच बघा, दुर्गा प्रकरणी सोनियांनी पत्र लिहून पंतप्रधानांना त्या मुलीवर अन्याय होऊ नये याची आठवण करून दिली. पण तसेच अशोक खेमका प्रकरणी झाले; तेव्हा सोनियांनी पत्र लिहायचे कष्ट घेतले नाहीत. कशा घेतील? खेमका हा हरयाणा सरकारचा अधिकारी होता आणि राज्यसरकारच्या कारभारात केंद्राने हस्तक्षेप करणे नियमबाह्य होते ना? पण तेव्हा हरयाणाचे मुख्यमंत्रीच दिल्लीत दाखल झाले व त्यांनीच सोनियांची भेट घेऊन नियमांचा त्यांच्यासमोर पाढा वाचला. पंतप्रधान त्यात अवाक्षर तरी बोलले होते काय? सर्व कसे नियमानुसार पार पडले. खेमका यांना नियमानुसार नव्या पदावर रवाना करण्यात आले आणि नियमानुसार आलेल्या नव्या अधिकार्‍याने जुन्या अहवालात फ़ेरबदल करून सोनियांच्या जावयाला नियमांच्या पालखीत बसवून सुखरूप बाहेर काढले. कुठे म्हणून तक्रारीला वा अन्यायाला जागा शिल्लक राहिली काय? म्हणून संसद अधिवेशन सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान पत्रकारांना म्हणाले नियमानुसार जे काही करता येईल, ते सर्वच दुर्गा प्रकरणात केले जाणार आहे. जेव्हा नियमात बसणार नसेल; तेव्हा नियमात बसणारे नियम शोधून ते वापरणारा योग्य जागी आणून बसवला जातो. इशरत चकमक प्रकरणात दोनदा प्रतिज्ञापत्र असेच नियमानुसार म्हणूनच तर बदलता आले ना? आधीच्या अधिकार्‍याला चकमक खोटी ठरवणारे प्रतिज्ञापत्र नियमानुसार बनवता येत नव्हते. म्हणून त्याच्या जागी योग्यवेळी योग्य अधिकारी आणून बसवला आणि त्याने इशरतची चकमक खोटी असल्याचे प्रतिज्ञापत्र नियमात बसवून दाखवले. कुठे म्हणून नियमाचे उल्लंघन झाले काय? कुठे नियम मोडला गेला काय? सर्वकाही कसे नियमात नेमके फ़िट्ट बसले ना?

   तुम्ही काहीही करा वा करू नका, पण सुरक्षित रहायचे व जगायचे असेल, तर सतत नियमात बसायची काळजी घ्या, मग तुम्हाला कसला धोका नसतो. नियमात बसून तुम्ही अगदी कुठलाही गुन्हा करू शकता. अगदी मुडदाही पाडू शकता. पण तुम्ही पाडलेला मुडदा म्हणजे केलेला खुन वा दरोडा नियमानुसार कायदेशीर कृत्य असल्याचे तुम्हाला सिद्ध करता आले पाहिजे. म्हणून तर आपल्या देशात स्वातंत्र्योत्तर कालखंडात शेकडो दंगली झाल्या व हजारो निष्पाप निरपराध माणसे त्यात मारली गेली. पण कधी आपण कुठल्या मुख्यमंत्र्याला त्यात गुन्हेगार मानले काय? बहुतेक दंगली कॉग्रेसच्या राज्यात झाल्या आणि त्यांनी कधीही नियमांचे उल्लंघन केले नाही. सर्व दंगली, त्यातला हिंसाचार वा त्यातले गुन्हे नियमात बसण्याची मस्तपैकी काळजी घेतली होती. नरेंद्र मोदी यांचा गुन्हा असा, की त्यांना आपल्या कारकिर्दीतील दंगल नियमात बसवता आलेली नाही. आता हे नियमात बसवणे म्हणजे काय असते? तर त्याचा गवगवा होऊ न देणे. राजीव गांधींच्या काळात दोनतीन दिवसात टिपून पाच हजार शिखांची दिल्लीत कत्तल झाली. पण त्यात आघाडीवर राहुन खुनाखुनीला प्रोत्साहन देणारे भगत, टायटलर वा सज्जनकुमार यांच्यावर एकतरी आरोप दाखल होऊ शकला काय? सर्वकाही नियमानुसार झाले. यातला पहिला निर्णायक नियम असतो तो, सेक्युलर मुखवटा चढवण्याचा. एकदा तो मुखवटा चढवला, मग आपोआपच बाकीचे नियम लुळेपांगळे व निकम्मे होऊन जातात. तुमच्या सर्वच गुन्हे व अपराधांना नियमात बसवायला भरपूर मोकळी जागा तयार होते. वाटेल ती मनमानी करण्यासाठी नियम शिथील होऊन जातात. नियमानुसार सर्वकाही होते व होणारच आणि सेक्युलर मुखवटा ही नियमातली एकमेव पळवाट आहे.

No comments:

Post a Comment