Thursday, March 20, 2014

वेलडन केजरीवाल, पण...


  वाराणशीमधून मोदींची उमेदवारी जाहिर होताच केजरीवाल यांनी दूर दक्षिणेतून त्यांच्या विरोधात उभे ठाकण्याची गर्जना केली. मात्र चोविस तास उलटण्यापुर्वीच त्यांनी शेपूट घातल्याप्रमाणे आधी स्थानिक जनतेचा कौल घेण्य़ाची सारवासारव केली. ही शुद्ध बनवेगिरी झाली. अशा जनमत कौलाला काहीही अर्थ नसतो. समोर बसलेले लोक जर तुमचेच जमवलेले असले; तर तुम्हाला हवा तोच कौल देणार. म्हणजे तुम्हाला लढायचे असेल, तर तुम्हीच त्या गर्दीत बसवलेले हस्तक होकारार्थी ओरडा करणार आणि तुम्हाला लढायचे नसेल, तर तुमचेच हस्तक नकाराची घंटा वाजवणार. मुळात मतदान हाच जनतेचा कौल असतो. तुम्ही उभे रहा आणि लोक आपले मत ठरल्या दिवशी व्यक्त करतीलच. लोकांच्या इच्छेला महत्व येतेच कुठे? तुम्ही मोदींना हरवायला मैदानात उतरणार असाल, तर अशा लोकमताचा सवालच कुठे येतो? तुम्ही नुसते उभे रहा. लोकांना मोदींना पराभूत करायचे असेल, तर लोक पाडतीलच. शीला दिक्षीतना पाडायचे होते म्हणून केजरीवाल निवडून आले. १९७७ सालात असेच राजनारायण रायबरेलीत उभे राहिले आणि लोकांनी त्यांना निवडून दिले. पण प्रत्यक्षात परिणाम म्हणून राजनारायण जिंकले होते. वास्तवात लोकांनी इण्दिराजींना पराभूत केले होते. मुद्दा इतकाच, की उमेदवारीसाठी लोकमत अजमावण्याची काहीही गरज नाही. पण केजरीवाल यांना प्रत्येक गोष्टीचाच तमाशा व बातमी करायची असते. म्हणूनच मोदींच्या विरोधात उभे रहाण्यातून त्यांना पराभूत करण्यापेक्षा अधिकाधिक प्रसिद्धी पदरात पाडून घेण्य़ाचे नाटक केजरीवाल रंगवित आहेत. अर्थात ते नाटक संपुर्णपणे निरूपयोगी आहे असे मानता येणार नाही. प्रत्येक गोष्टीला काहीतरी महत्व असतेच. तसेच केजरीवालाच्या मर्कटलिलांचेही महत्व आहेच.

   समजा केजरीवाल यांनी असली नौटंकी केलीच नसती, तर बाकीच्या पक्षांनी वाराणशीमध्ये इतका रस घेतला असता काय? मोदीची लाट आहे तर वाराणशीच कशाला असे टोमणे मारण्यापलिकडे अन्य पक्षांची मजल गेली नसती. कोणा पक्षाने वाराणशीत मोठा प्रतिष्ठेचा उमेदवार मोदींना आव्हान द्यायला उभा केला नसता. पण केजरीवालांच्या वल्गनांमुळे इतर पक्षांना वाराणशीकडे डोळेझाक करणे अशक्य झाले आहे. सर्वच पक्षात मॅचफ़िक्सिंग चालते, असा आरोप केजरीवाल करतात, तो खोटा पाडण्यासाठी का होईना; प्रत्येक पक्षाला आपणही मोदींना पाठीशी घालत नाही, असे दाखवण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळेच मग प्रत्येक पक्ष कोणीतरी नावाजलेला नेता तिथे उभा करायच्या विचाराला लागला आहे. कॉग्रेसने दिग्विजय सिंग तर बसपाने सतीशचंद्र मिश्रा अशा नेत्यांचा विचार सुरू केला आहे. परिणामी मोदींच्या विरोधात आपणही आहोत असे दाखवण्याची शर्यतच सुरू झाली आहे. पण त्यामुळे मोदींचे काम सोपे होत चालले आहे. जितके अधिक उमेदवार तितकी अधिक मतविभागणी मोदींना लाभदायक ठरणार आहे. म्हणजेच सर्वच पक्षांना मोठ्या नेत्यांच्या लढती सोप्या होऊ नयेत, असे वागायला केजरीवाल यांनी भाग पाडले म्हणायला हरकत नाही. पण म्हणूनच निदान मोदींचे काम त्यांनी सोपे केले. सेक्युलर भाषा बोलणारे सर्वच पक्ष त्यासाठी कुठला त्याग वा समजुतदारपणा दाखवायला तयार नाहीत, हे पितळही उघडे पडले आहे. परिणामी केजरीवाल यांचे मोदीना पराभूत करण्याचे स्वप्न बारगळणार यात शंका नाही. पण केजरीवाल यांना तरी कुठे मोदींना पराभूत करायचे होते? त्यांना निव्वळ त्यातून देशव्यापी प्रसिद्धी मिळवायची आहे आणि वाराणशीत त्यापेक्षाही मोठा डाव केजरीवाल खेळत आहेत.

   प्रत्यक्ष अर्ज भरायची मुदत संपण्यापर्यंत किती पक्षांचे मजबूत उमेदवार मोदींच्या विरोधात वाराणशीच्या आखाड्यात उतरतील, ते दिसेलच. पण त्यातून आपण एकटेच मोदींच्या विरोधातले ठाम पक्के लढवय्ये आहोत; अशी समजूत निर्माण करण्यात केजरीवाल यशस्वी होत आहेत. प्रत्यक्ष तिथे केजरीवाल यांना किती मते मिळतील, ह्यालाही अजिबात महत्व नाही. वाराणशीच्या मतांना फ़ारसा अर्थ नाही. इतरत्रच्या मुस्लिम मतदारांसमोर आपण एकटेच मोदींचे कडवे विरोधक असल्याचे चित्र रंगवण्य़ात केजरीवाल यशस्वी ठरत आहेत. सहाजिकच ज्या मुस्लिम मतपेढीसाठी सर्वच पक्षात कायम सेक्युलर दिसण्याची शर्यत चालते; त्यात अखेरच्या क्षणी उडी घेऊन केजरीवाल मोठा डल्ला मारतील. देशभरात मुस्लिम मतांचा गठ्ठा सहजासहजी आपल्याकडे वळवण्यात त्यांना यश मिळणे म्हणजेच दुहेरी लाभ आहे. अल्पकाळात व अल्प श्रमातून लक्षणिय मतांची टक्केवारी केजरीवाल आपल्या पारड्यात ओढतील. दुसरीकडे मोदींच्या नावाने शंख करताना प्रत्यक्षात मोदींना यश मिळवून देत मोदी विरोधी सेक्युलर पक्षांची मतेही पळवतील. आव्हान मोदींना आणि दुबळे करायचे मोदींचे सेक्युलर विरोधक; काय धुर्त खेळी आहे ना? मोठमोठ्या मुरब्बी राजकारण्यांना आजवर जमले नाही, तितका मोठा डाव केजरीवाल आपल्या कोवळ्या वयात यशस्वीरितीने खेळताना दिसतात. हाच त्यांचा डाव असेल, तर या निवडणूकीनंतर देशात तिसरा राष्ट्रीय पक्ष उदयास येऊ शकेल. जो क्रमाक्रमाने भावी राजकारणात प्रादेशिक व सेक्युलर पक्षांची जागा व्यापत जाईल. तितकाच कॉग्रेसच्या गमावलेल्या प्रभावक्षेत्रात आपला जम बसवत जाईल. अर्थात आजवरच्या माकडचेष्टा सोडून केजरीवाल पुढल्या काळात गंभीरपणे राजकारण व संघटनात्मक कामावर भर देऊ शकले तर.

No comments:

Post a Comment