Sunday, March 23, 2014

पवारांची हाणामारी



   आगामी लोकसभा निवडणूकीचा प्रचार आता रंगात येऊ लागला आहे. महाराष्ट्रातल्या मतदानाला फ़ारसे दिवस उरलेले नाहीत. अशावेळी उमेदवार शोधले, पळवले जात असतानाच त्यांना जिंकण्यासाठी मतांची बेगमीही पक्षांना करावी लागणे स्वाभाविक आहे. मग वेगवेगळी आमिषे दाखवली जात असतात. म्हणून तेवढ्याने निवडणूक जिंकता येतेच असे नाही. म्हणूनच वेगवेगळ्या पक्षांना आपली फ़ौज बाळगावी लागते. ती फ़ौज कामाला लावून मतदानात हस्तक्षेप करावा लागत असतो. कधी आपला विरोधात हमखास जाणार्‍या मतदाराला मत देण्य़ापासून वंचित करावे लागते, तर कधी त्यांची मतेच चोरून वापरावी मागत असतात. एवढ्याने भागत नसेल, तर खोटे मतदार नोंदवून खोटे मतदानही घडवून आणावे लागते. भ्रष्टाचाराच्या विरोधात नित्यनेमाने आवाज उठवणार्‍यांना त्यातले कष्ट कधीच समजत नाहीत. दिर्घकाळ राजकारणात वावरलेल्यांना त्याचे पुर्ण ज्ञान असते. अन्यथा राजकारणात तुम्ही मुरब्बी ठरू शकत नाही. शरद पवार मुरब्बी कशाला मानले जातात, त्याचे असे विस्तृत वर्णन आहे. आजकाल राजकारणातील गुन्हेगारीचा वारंवार उच्चार होत असतो. पण त्याचा उदगाता कोण, त्याचा फ़ारसा उल्लेख होत नाही. १९९० सालात शिवसेना भाजपाचे आव्हान उभे ठाकल्यानंतर पवारांनी प्रथम गुन्हेगारीला राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठीत करण्याची पावले उचलली होती. त्याच कारणास्तव त्यांनी विरार व उल्हासनगर येथे जिंकून येऊ शकणार्‍यांना उमेदवारी देऊन ‘निवडणूक जिंकायच्या’ प्रयोगाला सुरूवात केली. ‘जिंकण्याची क्षमता’ हा पवारांनी सर्वप्रथम उच्चारलेला शब्द होता. आता तोच सार्वत्रिक झाला आहे. अशाच पवार साहेबांनी आता एकाच मतदाराची ‘उपयुक्तता’ वाढवण्याचा प्रयोग आरंभलेला आहे.

   येत्या लोकसभा निवडणूकीत सातारा भागात आधी मतदान आहे आणि मुंबई परिसराचे मतदान आठवडाभर नंतर व्हायचे आहे. त्याच संदर्भात पवारांनी एका सभेत बहूमोल मार्गदर्शन आपल्या कार्यकर्त्यांना केले, सातार्‍यात आधीच्या फ़ेरीत गावच्या मतदानाला जायचे आणि पुन्हा मुंबईच्या मतदानाला हजर व्हायचे. मात्र पकडले जाऊ नये म्हणून हाताच्या पोटाला लागलेली शाई आठवणीने पुसून टाकायची. अशी दक्षताही घ्यायची शिकवण पवारांनी दिली. असा सल्ला देण्यासाठी अनुभव आणि मुरब्बीपणा आवश्यक असतो. नाही तर अनेकदा नुसतेच खोटे मतदान करताना लोक पकडले जातात. गुन्हा करून पकडले जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी. गुन्हा पुराव्याशिवाय सिद्ध होत नसतो. तुम्ही राजरोस गुन्हे करा. त्यासाठी घाबरण्याचे कारण नाही. घाबरायचे त्याने, ज्याच्या विरोधातले पुरावे किंवा साक्षीदार असतील. त्यापैकी काहीच नसेल, तर कोणाच्या आरोपांना घाबरण्याचे कारणच काय? पवारांवर आजपर्यंत किती आरोप झालेले आहेत. पण साहेब कधी डगमगले आहेत काय? कधीकाळी मुंबई महापालिकेचे उपायुक्त खैरनार यांनी पवार विरोधात आरोपांचा सपाटाच लावला होता. पण त्यांच्याकडे पवारांनी कधी ढुंकूनही बघितले नाही. कशाला बघतील? आपण कुठला पुरावा मागे सोडलेला नाही, याची पक्की खात्री असेल तर घाबरण्याचे कारणच नसते. म्हणून पवारांनी खैरनारांना किंमत दिली नाही. उलट खैरनार यांच्याच मागे पुरावे मागणार्‍यांची फ़ौज सोडून पवार परस्पर बाजूला झाले. बिचारे खैरनार अजून आपल्या जखमा चोळत बसले आहेत. कोणाला पवारांचा बाल बाका करता आला नाही, की त्यांच्या अंगावर डाग दाखवता आला नाही. याला म्हणतात धुर्त राजकारण.

   बोटावरची शाई पुसली की दुसर्‍यांदा मत द्यायला मोकळे, असा सल्ला पवार उगाच देत नाहीत. असा सल्ला पवार आपल्याच अनुयायांना देतात आणि इतर पक्षाचे नेते तसा सल्ला कशाला देऊ शकलेले नाहीत? तेही समजून घ्यावे लागेल. पुर्वीच्या काळात नुसती नावाची नोंद असायची. फ़ार तर वयाची नोंद होती. त्यामुळे कुठल्याही चेहर्‍याचा माणूस बोगस मतदान करू शकत होता. आता मतदार यादीतच मतदाराचे छायाचित्रही छापलेले असते. मतदान अधिकारी चेहरा ताडून बघू शकतात. म्हणूनच हाताच्या बोटावर शाई नसली, म्हणून बिनधास्त खोटे मतदान करता येणार नाही. मग पवार उगाच गंमत म्हणून असे बोलले असतील काय? सातार्‍यातली मतदानाची शाई पुसली म्हणून मुंबईत बोगस मतदान करता येऊ शकेल काय? मुंबईच्या मतदार यादीत ज्याची नोंद आहे, त्याही व्यक्तीचा चेहरा तंतोतंत जुळणारा असायला हवा ना? म्हणजे ज्याला दोन्हीकडे मतदान करायचे आहे, त्याने दोन्हीकडे अधिकृतपणे आपले नाव आणि चेहरा यादीत नोंदलेला असायला हवा आहे. तशी सोय नसेल तर पवारांचा कुठलाही निष्ठावंत दुसर्‍यांना मुंबईत येऊन मतदान करू शकणार नाही. हे ठाऊक असताना पवार असा सल्ला देतात, त्याचा अर्थ गहन आहे. ज्यांना अशी ‘पक्षसेवा’ करायची आहे, त्यांनी तशी नोंद आधीपासूनच केलेली असणार. तेवढ्यांसाठीच पवार साहेबांचा हा सल्ला आहे. राष्ट्रवादी पक्षातर्फ़े ज्यांनी अशी आपली दोन तीन मतदारसंघात नोंद केलेली आहे, त्यांनी काय करावे, त्याचा सल्ला पवारांनी दिला आहे. तो सार्वत्रिक नाही. त्यासाठीची तयारी किती जुनी व आधीपासूनची आहे, त्याचाच हा पुरावा आहे. नुसतीच बोटावरची शाई पुसून दुसरे मतदान करण्यापुरता हा मामला नाही. त्यातला मतांसाठी हाणामारी हा शब्द अधिक मोलाचा आहे. 

No comments:

Post a Comment