Sunday, March 30, 2014

फ़ोटो घोषणांची रणधुमाळी



  आगामी निवडणूकीत पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी आपली वेगळी चुल मांडलेली आहे. अर्थात त्यांनी कधी महायुतीमध्ये येण्याची उत्सुकता दाखवली नाही की त्यांना सोबत घेण्य़ाविषयी उद्धव ठाकरे यांनी आस्था दाखवली नाही. त्यात काही चुकीचेही म्हणता येणार नाही. कारण तो राजकारणाचा विषय नसून भाऊबंदकीचा विषय अधिक आहे. लोकसभावनेपेक्षा एकमेकांना खच्ची करण्यावर दोन्ही भावांचे डावपेच आखलेले असतात. मग एकमेकांना संभाळून घेत राजकारण साधणे कसे शक्य आहे? त्यामुळेच मागल्या लोकसभा निवडणूकीत सेनाभाजपा युतीला मोठा फ़टका सोसावा लागला होता. आज त्याचीच पुनरावृत्ती होईल काय, अशी भिती अनेक युतीनेत्यांना वाटणे स्वाभाविक आहे. तितकीच आशा कॉग्रेस राष्ट्रवादीला असेल, तर नवल नाही. मात्र राजकारण खुप बदलले आहे आणि त्याची जाणिव बाकी कोणाला नसेल, तरी खुद्द राज ठाकरे यांना नक्की असावी. मागल्या खेपेस खेळ नवा होता आणि कॉग्रेसच्या विरुद्ध लोकमत इतके प्रक्षुब्ध नव्हते. म्हणूनच सेनेतून रागावलेल्यांची मते मनसेच्या इंजिनाला मिळालेली होती. यावेळी तशी स्थिती नाही. म्हणूनच कॉग्रेसला पाडायला उत्सुक असलेला मतदार विभाजनाला हातभार लागेल, असे मतदान करण्याची शक्यता कमी आहे. ते ओळखूनच आपला मतदार टिकवण्यासाठी राज यांनी आपणही लोकसभेत मोदींच्याच बाजूने उभे रहाणार, असे आधीच घोषित करून टाकले आहे. पण त्यामुळे त्यांचा मतदार त्यांच्या उमेदवाराला मत देण्यापेक्षा अधिकृत मोदींच्या पक्ष वा सहकारी पक्ष उमेदवारालाच मत देऊ शकतो. यातून निसटण्य़ासाठी काही मनसे उमेदवारांनी आपल्या प्रचार फ़लकावर थेट मोदींची छायाचित्रे लावण्याची मजल मारली आहे. त्यातूनच भविष्याची चाहुल लागू शकते.

   या संदर्भात एक घटना नोंद करण्यासारखी आहे. अलिकडेच मुंबईनजिक मीरा-भाईंदर महापालिकेची निवडणूक झाली. त्यात भाजपाच्या उमेदवारांनी मोदींचे मोठमोठे फ़लक लावून आपला प्रचार केला, तर त्यांना चांगले यश मिळाले होते. तोच डाव मनसेचे उमेदवार खेळत असावेत. पण यातून महाराष्ट्रात कोणते वारे वहात आहेत, त्याचा अंदाज येऊ शकतो. निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार जिंकण्यासाठी वाटेल ते करत असतात. मोदींची छायाचित्रे वापरणे त्यातलाच भाग आहे. अर्थात एकट्य़ा मनसेनेच हा प्रकार केलेला नाही. राजकारणातला भ्रष्टाचार व घाण साफ़ करायलाच त्यात उतरलेल्या, आम आदमी पक्षाच्या लोकांनीही असले उद्योग आरंभले आहेत. ज्यांची म्हणून जनमानसात उजळ प्रतिमा आहे, त्यांचा आपल्यालाच पाठींबा आहे आणि म्हणूनच आपला पक्षच सर्वात स्वच्छ असल्याचे भासवण्याचा या नव्या पक्षाचा प्रयत्न असतो. त्यातूनच मग या पक्षाच्या उतावळ्यांनी आमिर खान या लोकप्रिय अभिनेत्याची छायाचित्रे आपल्या प्रचारात बिनदिक्कत वापरली. त्याची चाहुल लागताच आमिरने थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. आपल्या नावाचा किंवा छायाचित्राचा प्रचारासाठी गैरवापर होऊ नये; असे त्याला उघडपणे सांगायची वेळ यावी, ही बाब स्वच्छ चारित्र्याच्या पक्षाला शोभादायक नक्कीच नाही. इतरांवर आरोप करून खुलासे मागणार्‍या केजरीवाल यांनी त्याबद्दल तितक्याच तत्परतेने स्पष्टीकरण देण्याची गरज होती. पण तसे होऊ शकलेले नाही.

   मते मिळवण्यासाठी लोकभावनेचा जितका लाभ उठवण्याचा प्रयास होत असतो, तितकाच मग त्याचा लाभ दुसर्‍या कोणी घेऊ नये, यासाठीही धडपड चालूच असते. वाराणशीमध्ये मोदींची उमेदवारी त्यांच्या पक्षाने अलिकडे जाहिर केली. त्याच्या खुप आधी दोन महिन्यांपुर्वीच मोदींची वाराणशीमध्ये प्रचंड जाहिरसभा झालेली होती. लाखोच्या त्या विराट सभेमध्ये एक घोषणा खुप आवेशात उच्चारली गेली होती. ‘हर हर मोदी, घर घर मोदी" अशी ती घोषणा होती. त्यावेळी त्याबद्दल कोणी तक्रार केलेली नव्हती. पण पुढे ही घोषणा मोदींच्या मोठमोठ्या सभा जिथे कुठे व्हायच्या, तिथेही गर्जू लागली. तरीही त्यावर कोणी भाष्य करीत नव्हता. पण गुजरातबाहेर उत्तरप्रदेशात मोदींनी निवडणूक लढवावी, त्यातून त्यांच्या लोकप्रियतेची लाट उत्तरप्रदेश व बिहारपर्यंत संपुर्ण हिंदी प्रदेशात पसरेल आणि त्याचा भाजपाला अधिक जागा जिंकायला लाभ मिळेल; असा विचार पुढे आला. त्यातूनच वाराणशी हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जाणारा मतदारसंघ मोदींसाठी निश्चित करण्यात आला. त्याच रात्री वाराणशीतल्या भाजपा कार्यकर्त्यांनी फ़टाके वाजवून, नाचून आनंदोत्सव केला. त्यात पुन्हा एकदा ‘हर हर मोदी’चा गजर सुरू झाला. तिथून मग त्याचेच प्रतिध्वनी उमटू लागले आणि घोषणेच्या लोकप्रियतेने इतर पक्षांना जाग आली. मग त्यात धर्माच्या भावना, धर्माचा ,देवाचा अपमान इत्यादी आक्षेप पुढे आले. आता खुद्द मोदींनीच आपल्या समर्थकांना अशा घोषणा नकोत, असे आवाहन केलेले आहे. नुसत्या अशा घोषणांनी कुणाला मते मिळू शकली असती, तर धर्माचार्य किंवा लोकप्रिय अभिनेत्यांनीच आपल्या देशात सत्ता बळकावली नसती का? पण निवडणूक जिंकण्यासाठी संवेदनाशील व हळवे झालेल्या राजकीय पक्षांना व नेत्यांना हे सत्य समजवायचे कोणी?

No comments:

Post a Comment