Friday, October 19, 2018

छछोर परिवर्तनवादी

Image result for sabrimala temple case

केरळातील साबरीमला मंदिरात महिलांना मुक्तपणे प्रवेश मिळावा म्हणून झालेल्या निर्णयाला छछोर परिवर्तनवादी मुठभरांनी मातीमोल करून टाकले आहे. जे लोक महात्मा फ़ुले वा महात्मा गांधींचे नाव घेत असतात, त्यांना अशा थोरामोठ्यांनी आपले आयुष्य कशासाठी खर्ची घातले, त्याचा बहुधा अंदाजही नसावा. अन्यथा त्यांनी परिवर्तन वा चळवळ इतकी हास्यास्पद करून टाकली नसती. मागले दिनतीन आठवडे वादग्रस्त झालेल्या त्या सुप्रिम कोर्टाच्या निकालाच्या अंमलाचा प्रसंग आला आणि त्याचा पुरता विचका होऊन गेला. केवळ त्या निर्णयाची अवहेलना झालेली नाही, तर महिला न्यायाची चळवळ व त्यासाठी असलेली सहानुभूतीही मागे ढकलली गेली आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक आत्मघातकी असतो. कालपर्यंत जे लोक छाती फ़ुगवून कोर्टाच्या निकालाचे व कायद्याच्या राज्याचे महत्व सांगत होते, त्यांच डाव्यांना दोन पावले मागे यावे लागले आहे. पोलिसांनी महिला भक्तांना संरक्षण दिले पाहिजे व कोर्टाच्या निकालाचा सन्मान राखला गेला पाहिजे म्हणणारेच, शुक्रवारी संध्याकाळी पोलिसांच्या माथी सर्व खापर फ़ोडायला पुढे सरसावले होते. ज्या दोन महिलांचे कौतुक त्या शुक्रवारी सकाळी मंदिरात निघाल्या म्हणून चालले होते, त्यांचाच निषेध करायची वेळ संध्याकाळी यावी, यातच छछोरपणाची साक्ष मिळते. कारण दिडदोनशे पोलिसांची फ़ौज घेऊन वरीष्ठ पोलिस अधिकार्‍याने दोघींना मंदिराच्या दारापर्यंत आणलेले होते. पण मुख्य पुजार्‍याने मंदिराची दारे पुन्हा दिर्घकाळ बंद करण्याचा इशारा दिला आणि पोलिसांनाही माघार घ्यावी लागलेली आहे. कारण काय? इतक्या दिवसाच्या बौद्धिक तमाशानंतर सरकार व अनेकांना शोध लागला, की साबरीमला मंदिर हा चळवळीचा आखाडा नसून श्रद्धास्थान आहे. तिथे चळवळ्यांचे काहीही काम नाही. हे समजायला इतका दिर्घकाळ जातो, त्यांना आपल्या देशात बुद्धिजिवी वर्ग मानले जाते, हे दुर्दैव झाले आहे.

यापैकी एक रेहाना नावाची महिला असून नावातच ती मुस्लिम असल्याचे लक्षात येते. इस्लाम कुठल्याही मुर्तीपूजेचा कट्टर विरोधक आहे. मग रेहाना नावाच्या स्त्रीचे साबरीमलाच्या गाभार्‍यात काय काम असू शकते? मुळातच तिने तिकडे फ़िरकणे तिच्या धार्मिक श्रद्धांची पायमल्ली आहे. पण तसे करताना हीच महिला अय्यप्पाच्या भाविकांच्याही श्रद्धा पायदळी तुडवायला सरसावलेली असते. अशा कृतीतून धार्मिक व सामाजिक सौहार्दाला चुड लावली जाते आणि विसंवाद निर्माण होऊन हिंसाचाराची शक्यता निर्माण होऊ शकते. हे वेगळे सांगण्याची गरज आहे काय? हे इतके स्पष्ट असताना पोलिसांचा फ़ौजफ़ाटा घेऊन त्या चिथावणीखोरीलाच पोलिस संरक्षण देणे, म्हणजे कायदा तुडवायला सरकारी प्रशासनानेच प्रोत्साहन देणे होते. अखेरीस ते काम करणार्‍या पोलिस अधिकार्‍याला खुद्द राज्यपालांनी कानपिचक्या दिल्या आणि त्या महिलांनी काढता पाय घेतला. नंतर त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याने नाटक रंगवणे आलेच. पण लाखो लोकांच्या श्रद्धांना पायदळी तुडवण्यातून जीवाला धोका निर्माण होतो, हे समजायला मोठी प्रचंड बुद्धी आवश्यक नसते. मशिदी जवळून जाताना गुलाल उडवणे वा वाद्ये वाजवण्यातून सामाजिक सौहार्द बिघडते. किंवा मंदिराच्या आसपास बकरे कोंबड्या कापण्यातून भावना दुखावतात, हे सामान्य लोकांनाही विचार केल्याशिवाय कळते. मग देशातल्या महान बुद्धीवादी वर्गाला त्याच गोष्टी समजण्यासाठी इतका तमाशा कशाला रंगवावा लागतो? तर त्यामागचा हेतू साफ़ आहे. आपला नास्तिकतेचा अजेंडा श्रद्धांच्याच शिड्या वापरून समाजाच्या माथी मारण्याचा हा कुटील डाव असतो. त्याला न्याय, महिलांचा अधिकार वा आणखी वाटेल ते मुखवटे चढवले जात असतात. सुप्त हेतू राजकीय असतो आणि तोच इथे पुरता उघडानागडा होऊन गेला आहे. पण त्यातून खरीखुरी परिवर्तनाची चळवळ खुप मागे ढकलली गेली आहे ना?

सामाजिक परिवर्तन कायदे लादून होत नाही आणि कुठलाही समाज रुढी व परंपरांच्या जोखडातून सहजगत्या मुक्त होत नाही. त्या श्रद्धा व समजूतींना धक्के द्यावेच लागत असतात. पण ते अतिशय गंभीर स्वरूपाचे काम असून, त्यात अनेक सुधारकांचे आयुष्य खर्ची पडलेले आहे. तृप्ती देसाई वा तिच्यासारख्या छछोर थिल्लर लोकांकडून कुठलेही सामाजिक परिवर्तन होऊ शकलेले नाही. सावित्रीबाई फ़ुले किंवा महात्मा फ़ुले यांचे नाव अगत्याने घेतले जाते. पण त्यांनी कधी कोर्टात जाऊन वा पोलिसांचे सुरक्षा कवच घेऊन चिलखती चळाळी चालविल्या नव्हत्या. जैसेथेवादी वा समाजाला ओलिस ठेवणार्‍या प्रस्थापित वर्गाला आव्हान देताना, सामान्य जनतेला विश्वासात घेण्याचे कष्ट उपसले होते. प्रसिद्धी मिळवण्यासाठी असले तमाशे केलेले नव्हते. ज्यांची कुठल्याही देवावर किंवा अय्यप्पावर श्रद्धाच नाही, त्यांचे पोरखेळ चालवण्याने परिवर्तनाचे एकही पाऊल पुढे पडत नसते. जी काही महिला मुक्तीची चळवळ अनेक पिढ्या चालली आहे, त्याला असले तमाशे बाधा आणत असतात. या नास्तिक व चळवळ्यांनी साबरीमला प्रकरणात पुराणमतवादी बाजू भक्कम व्हायला मात्र हातभार लावला आहे. त्यांच्या छछोर वागण्यातून जे कोणी अंधश्रद्ध असतील, त्यांच्या समजुती जास्त घट्ट झाल्या. ज्यांना सुधारणा हव्या असतात, त्यांच्याही मनात शंका निर्माण केल्या. चळवळी व परिवर्तनाच्या हेतूविषयी संशय उभा केला. आपल्या कालबाह्य परंपरा वा रुढी किती योग्य आहेत व अभेद्य आहेत, असा विश्वास त्या सामान्य भक्तांमध्ये निर्माण व्हायला आजच्या इतकी चालना यापुर्वी कधी मिळाली नसेल. समाज सुधारणा वा परिवर्तनाची चळवळ ही थिल्लर करून टाकली आहे अशा दिवाळखोरांनी. कारण या प्रवेशाला विरोध करण्यासाठी आय्यप्पाच्या खर्‍याखुर्‍या महिला भक्तांनी पुढाकार घेतला आहे आणि परिवर्तन तर त्याच महिलांसाठी घडवून आणायचे होते ना?

साबरीमला प्रकरणाची दुसरी बाजू अशी, की यात पुढाकार घेणार्‍यांनी सत्याग्रह आंदोलन वा चळवळ या शब्दांची महत्ताच संपवून टाकली आहे. महात्मा गांधी आपल्या कुठल्याही आंदोलनाचे पावित्र्य खुप जपत होते. त्यात कोणी हिंसा केली वा तसा प्रयत्न केला, तरी आंदोलनच मागे घ्यायचे. त्यातला सत्याचा आग्रह आज नामशेष होऊन गेला आहे. चळवळ हा हौसेचा व प्रसिद्धीच्या हव्यासाचा विषय बनला आहे. सोपा मार्ग होऊन गेला आहे. आंदोलन म्हणजे भणंग व मस्तीखोरांना मोकाट दंगल माजवण्याची पर्वणी होऊन गेली आहे. कुठल्याही परिवर्तनवादी समाज सुधारकांनी जनतेत जाऊन, तिला विश्वासात घेऊन परिवर्तनाला दिशा व गती दिलेली होती. हल्ली कोर्ट व सरकारी बळाचा वापर करून परिवर्तनाची दिशा शोधली जाते. कायद्यातल्या पळवाटा शोधून रुढी टिकवल्या जातात, किंवा समाजाला ओलिस ठेवले जात असते. त्यांना उध्वस्त करण्यासाठी जनतेला सोबत घेऊन वाटचाल करावी लागते. त्याला परिवर्तनाची चळवळ म्हणतात. जनतेला दुखावून किंवा डिव़चून परिवर्तन होत नसते. उलट ती लोकसंख्या अधिकच पुराणमतवादाच्या कह्यात जाते. साबरीमला प्रकरणात नेमके तेच झाले आहे. यात कुठल्याही खर्‍याखुर्‍या अय्यप्पा भक्त महिलेला गाभार्‍यात जायचे नसून, श्रद्धा नसलेल्या नास्तिक महिलांचा हा श्रद्धेला पायदळी तुडवण्याचा खेळ असल्याचा समज अधिक दृढ होऊन गेला आहे. त्याच्या विरोधात अय्यप्पाच्या कट्टर महिला भक्तच उभ्या ठाकल्या आहेत. रुढीवरील त्यांची भक्ती अधिकच भक्कम होण्यास हातभार लागला आहे. सहाजिकच कालपर्यंत निकालाचे काटेकोर पालन करायची भाषा बोलणार्‍या डाव्या सरकारच्या मंत्र्यालाही देवस्थान हा चळवळीचा आखाडा नसल्याचा निर्वाळा देत माघार घ्यावी लागली आहे. महिलांच्या स्वातंत्र्य व समानतेची चळवळ म्हणूनच या छछोर परिवर्तनवादी तमासगीरांनी कित्येक वर्षे मागे रेटली आहे.

24 comments:

  1. भाउ बर झाल तुम्हीयावर लिहिलत तुमचा निष्कर्ष पण एकदन सटीक आहे आणि यात मिडीयापन जास्त कारनीभुत आहे २४ तास हा विषय english वाहिन्या दाखवतायत म्हनुन लोक संतापतात चिथावनीच आहेपण अयप्पा भक्त जास्त संवेदनशील झाले

    ReplyDelete
  2. रेहानाची पण कमालच आहे बुवा !!! मशिदीत प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन करना बाई !!! गेला बाजार काश्मीर मधे नमाज पडल्यानंतर सैनिकावर दगड मारण्याचा विधी पार पाडला जातो ; यावर तिने नमाजिचे ह्दय परिवर्तन करावे...प्रार्थना केल्यावरही चित्त शांत होत नसेल तर हि कसली ईश्वर प्रार्थना ; उलट नमाजी नमाजानंतर जरा जास्तच चेकाळतात.; म्हणजे मशिदीत काय पढवलं जातं हे पण रेहाणाने पहावं म्हणजे समतोल साधला जाईल.

    ReplyDelete
  3. समाजाच्या सर्व स्तरात शिरलेेेेले साम्यवादी फुरोगामी चळवळीचा आव आणून समाजाच्या श्रद्धास्थानांविषयी शंका निर्माण करण्याचे कुटील डाव कधीपासूनच खेळत आहेत.
    यांना कुठलाही विषय समाजात अराजक माजवायला कसा वापरायचा हेच ठाऊक आहे.
    पण आता समाज बदलतोय , राष्ट्रप्रेेम व श्रद्धा यांचा योग्य समन्वय समाजात होईल व ही मंडळी आपसूकच बाहेर फेकली जातील.

    ReplyDelete
  4. प्रचंड राग येतो. सरकारे मंदिरे पूर्ण ताब्यात घेऊन स्वपक्षिय कार्यकर्ते जगवण्याचा प्रयत्न करते. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश महोदयांना वाटते की ते सर्वज्ञ आहेत. हजारो वर्षांच्या निरूपद्रवी परंपरा एका सहीने रद्द करण्याचा मूर्खपणा केला जातो.हा पुरोगामी रोग जूना आहे. आपल्याकडे सानेगुरुजी मंदीरप्रवेश आंदोलन करत होते. हिंदू दलितांसाठी आंदोलन योग्यच होते पण इतर धर्मियांना ( मुस्लिम व ख्रिश्चन ) लोकांना घेऊन त्यांनी मंदीरप्रवेश केला. व पुरोगामी पुरुषार्थ सिद्ध केला. परत किती ख्रिस्ती व मुस्लिम दर्शनासाठी येतात ? याचा कुणी हिशोब केला नाही. मी रोज नियमाने देवळात जातो पण मला तरी गेल्या काही वर्षांत कुणी दिसले नाही. असो , हे असेच चालू राहिले तर सुशीलकुमार शिंदेंच्या राजस्थानला केलेल्या वक्तव्यातील हिंदू नक्कीच तयार होतील.

    ReplyDelete
  5. ज्या महिलांना आत जायचय कोणीही भक्त तिथे जात नाही यावरुनच काय तमाशा करतायत ते कळत पु्रवी अस खुप झालय पन लेोक आताहा पुरोगामी दहशदवाद खपुन घेइनात.मध्यतंरी हार्दिक उपोषनाला बसला होता सध्या तो पुरोगामी टोळीत असल्याने मेधा पाटकर भेटायला गेल्या पण त्याच्या सहकारी लोकांनी भेटु दिल नाही कारण पाटकरांमुळे पटेल शेतकरी लेोकांना किती नुकसान झाल नर्मदेच पाण मिळाल नाही शेतकर्याचा कळवळा दाखववायला गेलेले हार्दिक पाटकर असे खोटे पडतात

    ReplyDelete
  6. या प्रकारांमुळे अजून एक घटना घडली आहे. केरळमध्ये १९२१ च्या खिलाफत आंदोलनातील हिंदूंविरोधी उद्रेकानंतरही उफाळला नव्हता एवढा हिंदूंचा समूदाय रस्त्यावर उतरलाय. याचे परिणाम काय होतील हे काळच ठरवेल. पण मला तरी केरळमधल्या कम्युनिस्ट राजवटीच्या अंताची सुरुवात वाटतेय.

    ReplyDelete
  7. सुंदरच

    ReplyDelete
  8. भाऊ
    धन्यवाद .अतिशय अभ्यास पूर्ण लेख.

    ReplyDelete
  9. हे आंदोलन म्हणजे टपोरी मुलांनी "girls hostel मध्ये प्रवेश मिळावा" असं म्हणण्यासारखं आहे.
    प्रत्येकाला त्याला हवा तो देव निवडण्याचा अधिकार हिंदू धर्मात आहे. पण म्हणून त्या देवतेच्या गाभाऱ्यात प्रवेश देण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार हि देवस्थानांना आहे. ज्यांना अय्यप्पाची आराधना करायची आहे ते घरी मूर्ती स्थापनाही ती करू शकतात. त्यासाठी बळजबरीने गाभाऱ्यात प्रवेश करायची गरज नाही.
    हिंदू देवता हि कायद्याने "Minor" असून त्या देवस्थानाचे विश्वस्त त्या देवतेचे "Legal Guardian " समजले जातात. देऊळ म्हणजे देवालय हे त्या देवतेचे घर असून त्या घरात कोणाला प्रवेश द्यायचा अथवा नाकारायचा हा त्या देवस्थानाच्या विश्वस्तांचा हक्क आहे.

    ReplyDelete
  10. श्रध्दा,भावना डिवचल्यावर हिंदु रागावतो,निकाल आला तोही हिंदु जनतेने सौम्यपणे स्वीकारला.परंतु हिंदुंच्या श्रध्देची ऐसी की तैसी करण्याचा प्रयत्न रेहाना नांवाची मुस्लीम स्त्री करते आहे हे पाहून हिंदुंचा राग साहजीकपणे अनावर झाला.

    ReplyDelete
  11. भाऊ लेख अप्रतिम आहे परंतु आपल्याला पुन्हा एकदा विनंती की आपण ज्योतिबा फुले यांचे सगळे वाघमारे पुन्हा एकदा वाचावे आणि त्यांना खरोखरीच आत्मा म्हणजे काय ते कळले होते का तेही तपासून पहावे कारण ज्याला आत्मा म्हणजे काय तेच कळले नसेल त्याला आपण महात्मा म्हणणे म्हणजे आपल्या या लेखनाची इतिहासामध्ये ऐतिहासिक चूक म्हणून नोंद होऊ शकते

    ReplyDelete
    Replies
    1. हे मात्र खरं आहे आणि तसेही ते अप्रत्यक्ष रित्या ब्रिटिश राजवटीला पाठिंबा देणार्यापैकी एक व्यक्ती होते

      Delete
  12. Nehmi pramane apratim lekh ahe Bhau. Pudchya nivanukit hya communist government la motha phatka Basnar ahe.
    2019 chi nivadnuk Hindu v/s all ashich hu shakte.

    ReplyDelete
  13. भाऊ खुप छान लेख.नेहमी प्रमाणे सर्वांग सुंदर विवेचन !
    आयुष्यात एकदा भेटण्याची इच्छा आहे. ..बघू कधी योग येतो.....

    ReplyDelete
  14. भाऊ हे असे लोकंचं भारतीय जनता पक्षाची सरकारं आणायला मदत करत आहेत (आणि पर्यायानी स्वता:च कुऱ्हाडीवर पाय ठेवत आहेत.

    ReplyDelete
  15. सबरीमलाच्या निमित्ताने केरळचा हिंदू प्रथमच रस्त्यावर उतरला आहे अमित शहा या घटनेचा निवडणुकीत फायदा घेतल्या शिवाय राहणार नाहीत हे मात्र नक्की, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत स्मशान आणि कब्रस्तान हा विषय भाजपला 300 जागांपालिकडे घेऊन गेला,सबरीमला हा विषय केरळमध्ये लोकसभेचे गणित उलटे पालटे करू शकतो,अमित शहा स्थानिक लोकांच्या मनात काय खदखद आहे याची अचूक माहिती घेतात आणि मोदी त्याचा वापर प्रचारात खुबीने करतात घेतात विरोधक मोदी आणि शहा यांचे इथेच आकलन करण्यात कमी पडतात केरळमध्ये कम्युनिस्टांची जागा भाजप व्यापून टाकू शकतो 2019 ची लोकसभा ही कदाचित कम्युनिस्ट मुक्त लोकसभा असू शकते

    ReplyDelete
  16. #metoo साठी झगडणारी मीडिया या बाबतीत शांत का आहे . शबरीमाला चा निर्णय योग्य का अयोग्य यावर ना बोलता आणि वर्षांनी वर्षांची प्रथा का होती यावर कोणीही बोलायला तयार नाहीत . मीडिया बिकाऊ असल्याचं ये उत्तम उठहार आहे . जनम या एकमात्र चॅनेल ने जनतेवर होत असलेले हले दाखवले . शांततेने या निर्णयाचा पुनर्विचार करा हेच त्यांचं म्हणणं आहे .

    ReplyDelete
  17. https://www.youtube.com/watch?v=Jh-DhB02V-0

    ReplyDelete
  18. सामाजिक परिवर्तन कायदे लादून होत नाही....लाख बोललात भाऊ तुमच्या या वाक्यासरशी टिळक आठवले....आगरकर,फुले यांनी समाज परिवर्तनासाठी कळकळीचे प्रयत्न‌ केले तसे या नाच्यांच्या बाबतीत काही वाटतही नाही आणि तसे काही दिसतही नाही...इतिहासाची पुनर्उजळणी झाली पाहिजे भाऊ....

    ReplyDelete
  19. सर्वोच्या न्यायालयाच्या नायाधीशांना कधी कधी आपण ह्या देशाचे राजे आहोत अशी भावना होते आणि त्यातून एका रात्रीत हजारो वर्षाची निरुपद्रवी श्रद्धा लोकांनी बासनात गुंढाळून ठेवावी आणि फुरोगामी व्हावे असे त्यांना वाटते... अमेरिकन किंवा युरोपिअन पद्धतीपणे हा १३० करोड लोकांचा देश(जिथे शेकडो संस्कृती आहे, भाषा आहे) चालावा असे न्यायालयाला वाटते...
    राम मंदिराचा मुद्दा आला कि न्यायालय शेपूट घालून गप्पं बसते...किती वर्ष लावणार...त्यावेळी वाचा बंद का होते

    ReplyDelete
  20. Awesome writing Bhau. If a Muslim girl wants to enter d temple, it clearly means that she is trying to crush d emotions of poor Hindu devotees. Same way d lower casts people shouldn't b allowed in d temple too. There leader Dr. Ambedkar openly said that he doesn't believe in 33 crore Devi devta. If any low caste person wants to enter d temple v must remember that he is also trying to crush d feelings of Hindu devotees. Good job bhau. Ur article is truly eye opener for d Hindus who must protect there beliefs and tradions from non Hindu people. Pure loyalty from well known journalist like u must b pretty useful to Modi

    ReplyDelete