Wednesday, April 30, 2014

पाकला मिरच्या झोंबल्या

  लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, यांनी अनेक माध्यमांना मुलाखती दिल्या. गेल्या चारपाच वर्षात मोदी यांनी सरसकट माध्यमांवर बहिष्कारच घातला होता. त्याचे कारणही स्पष्ट होते. वाहिन्यांवर झळकणार्‍या ज्या पत्रकारांना मुलाखती घ्यायच्या असतात, त्यांना प्रत्यक्षात त्या व्यक्तीचे अंतर्मन जगापुढे उलगडण्यापेक्षा सार्वजनिकरित्या त्या प्रतिष्ठीत व्यक्तीला अपमानित करण्याची संधी साधायची असते. हेच वारंवार होऊ लागल्यामुळे मोदींनी माध्यमांच्या नादाला लागायचे सोडून दिले होते. कितीही कसलेही आरोप झाले, तरी त्याचा खुलासा द्यायला मोदी समोर यायचे बंद झाले. त्यांनी आपली प्रतिक्रिया वा प्रतिसाद सोशल मीडियातून द्यायला आरंभ केला. तिथे त्यांच्या अनुयायांपर्यंत आपली भूमिका यशस्वीपणे मांडण्यात यश संपादन केल्यावर मोदींना मुख्यप्रवाहातील माध्यमांची गरजच उरली नाही. उलट मोदींविषयी काहीही समोर आणण्यासाठी माध्यमांनाच मोदींच्या पर्यायी सोशल मीडियाचा पाठलाग करणे भाग पडू लागले. तशाही स्थितीत गेल्या महिन्याभरात मोदींनी काही निवडक वाहिन्या व पत्रकारांना सविस्तर मुलाखती दिल्या. पण कटाक्षाने त्यांनी नावाजलेल्या पत्रकारांकडे साफ़ पाठ फ़िरवली. त्यामुळे अशा चमकदार पत्रकारांचा मुखभंग व्हावा, यात नवल नाही. मग त्यांनी विश्वासातल्याच पत्रकारांना मुलाखती देऊन सारवासारव केल्याचे आरोप मोदींवर केले. पण आता असल्या शेलक्या आरोपांची मोदींना पर्वा राहिलेली नाही.

   पण अशा मुलाखतीतून मोदींना जे काही सांगायचे असते, ते योग्य जागी मात्र पोहोचत असते. त्याचे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे मोदी यांच्या एका अशाच मुलाखतीत आलेला एक मुद्दा. पाकिस्तानात लपून बसलेल्या फ़रारी गुन्हेगार दाऊद इब्राहीमला भारतात आणायचे काय? या प्रश्नाला उत्तर देताना मोदी जे बोलले, त्याची महत्ता इथल्या चमकदार पत्रकारांना उमगली नाही. कारण मोदी म्हणजे २००२ सालची दंगल, याच्यापुढे इथला कोणी नामवंत पत्रकार जाऊच शकलेला नाही. म्हणून दाऊदविषयी मोदींनी दिलेल्या उत्तरावर कुठली चर्चा झाली नाही. कारण मोदींच्या उत्तरातले गांभीर्य थोर पत्रकारांच्या लक्षातही आले नाही. ‘अमूकतमूकाने साधला निशाणा’ असली बाष्कळ भाषा नित्यनेमाने वापरणार्‍यांना निशाणा म्हणजे काय तेही ठाऊक नसते, याचाच हा पुरावा मानता येईल. दाऊदविषयक प्रश्नाला उत्तर देताना मोदी म्हणाले होते, ‘अशा गोष्टी जाहिरपणे बोलायच्या नसतात. अमेरिकेने ओसामावरच्या कारवाईची वाच्यता पत्रकार परिषद घेऊन केलेली नव्हती. ह्या धोरणात्मक बाबी असतात आणि त्याबद्दल जाहिर बोलणार्‍यांपाशी कितीसे शहाणपण आहे असा प्रश्न पडतो.’ थोडक्यात दाऊदचा निकाल लावायच्या चर्चा करायच्या नसतात, थेट कारवाई करायची असते; असेच मोदींनी सुचवले होते. म्हणजेच शक्य असेल तर दाऊदला भारतात परत आणण्यापेक्षा त्याची तिथेच विल्हेवाट लावायला हवी, असे मोदींनी अपरोक्ष भाषेत सांगितले.

   भारतातल्या नामवंत पत्रकारांना त्याच्या अर्थ उमगला नाही, की त्यातले लक्ष्यही समजले नाही. पण पाकिस्तानी सत्तेला मात्र मिरच्या झोंबल्या आहेत. पाकच्या गृहमंत्र्याने तात्काळ त्या विधानाची दखल घेऊन मोदींचे असले विधान म्हणजे पाकिस्तानच्या अंतर्गत व्यवहारात ढवळाढवळ असल्याचे ताशेरे झाडले आहेत. इथे कुठला हस्तक्षेप मोदींनी केला आहे? त्यांनी असे विषय जाहिरपणे बोलायला नकोत व अमेरिकेप्रमाणे कारवाई करायला हवी, असे सुचवले आहे. त्याचा अर्थ इतकाच, की ओसामा पाकिस्तानात नाही असे सांगणार्‍या पाकनेच त्याला लपवून ठेवले होते, तर त्याच्याशी हुज्जत न घालता अमेरिकेने त्याची तिथेच मारेकरी पाठवून विल्हेवाट लावली. तसेच दाऊदच्या बाबतीत करावे लागेल. त्याची चर्चा करून गप्पांचे फ़ड रंगवण्यात अर्थ नाही. सत्ता हाती आली,; तर कुठल्याही चर्चेचे गुर्‍हाळ न लावता आपण त्याचा निकाल लावू असेच मोदींनी सुचित केले. त्यामुळेच पाकिस्तानच्या पोटात गोळा उठलेला आहे. भारतीय माध्यमांनी मोदींचा जो बागुलबुवा निर्माण करून ठेवला आहे, त्याच्याच दहशतीने ग्रस्त झालेल्या पाकला म्हणूनच मुलाखतीमधल्या त्या साध्या उत्तराने घाम फ़ुटला आहे. मोदी नावाचा माणूस असेही करू शकतो, या भयाने पाकला पछाडलेले दिसते. अन्यथा असली  प्रतिक्रिया त्या देशातून आलीच नसती. मुद्दा इतकाच, की ज्यांना सांगितलेले कळतही नाही, त्यांना मुलाखती देऊन तरी काय उपयोग? म्हणूनच असल्या वाहिन्या वा पत्रकारांना मोदींनी टाळले हे योग्यच झाले म्हणायचे.

2 comments:

  1. bhau.. kiti mast lihita ho tumhi :)

    ReplyDelete
  2. भाऊ मोदी पंतप्रधान होत आहेत हे जेव्हा निकालातून सिद्ध झाले तेव्हा अशी बातमी आली की दाऊदने कराची हुन पळ काढला आहे आणि तो आता कुठेतरी बलूचिस्तान की अफगानिस्तान च्या सिमेच्या प्रांतात लपला आहे. हा आहे मोदी इफेक्ट ! मोदी निवडून आल्यावर एक जोक मोबाइल वर आला ' पाकिस्तान म्हणतेय कश्मीर हमें नहीं चाहिए और हम कराची नहीं देंगे।

    ReplyDelete