Tuesday, October 27, 2015

आजही शिजते बिरबलाची खिचडी

badshah and birbal साठी प्रतिमा परिणाम

गेले दोन आठवडे दिल्ली नजिकच्या नॉयडात झालेल्या अखलाक महंमदच्या हत्याकांडाने अवघ्या बुद्धीवादी जगताला हैराण करून सोडले आहे. तमाम बुद्धीवादी रडकुंडीला आलेत. एका मुस्लिमाला जमावाने जिवंत जाळले मारले म्हणताच, अवध्या बुद्धीवादाचा पुरोगामी धर्म बुडायची वेळ आलेली आहे. अर्थात प्रत्येक साहित्यिक शहाण्याचा दावा असा आहे, की ते कुणा मुस्लिमासाठी मातम करत नसून माणुसकीसाठी आक्रोश करीत आहेत. म्हणजे जणू अखलाकच्या जागी अभिषेकवर अशी पाळी आली असती, तरी त्यांनी इतकाच आक्रोश मांडला असता, असेच कुणाला वाटावे. गोमांस खाण्याच्या नुसत्या संशयापोटी अशी हत्या, म्हणजे किती घोर पाप झाले ना? पण तसेच काही उलट्या बाजूने हिंदूच्या बाबतीत झाले असते तर, यातल्या कोणाला जागही आली नसती ही वस्तुस्थिती आहे. कारण आजकालचे तमाम पुरोगामी बुद्धीवादी बिरबलच्या जमान्यात जगतात. त्यांना आजचा भारत वा एकविसाव्या शतकाचा जमाना ठाऊकच नाही. तसे असते तर त्यांना पुसद यवतमाळच्या घटनेने वा कर्नाटकातल्या मुडबिद्री येथील घटनांनीही रडू आले असते. पण त्यासाठी तशी काही घटना घडण्याची गरज आहे वा असते, असेच कोणी म्हणेल. पण बुद्धीवादी लोकांचा वास्तवातील जगाशी संबंध नसतो. त्यांना कोणीतरी कथाकथन करावे लागते. गोष्ट सांगावी लागते. ती खरी असण्याचा संबंध नाही. म्हणजे असे की काय घडले असे वाहिन्या किंवा वर्तमानपत्रात झळकावे लागते. ते घडले म्हटल्यावर या कुंभकर्णांना जाग येते आणि मग त्यांच्या संवेदना कार्यरत होतात. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे मुस्लिमाने एका पोलिस शिपायाला भोसकून मारल्याने ते विचलीत कशाला होतील? तसे घडले असले तरी त्याची बातमी ब्रेकिंग न्युज झाली नाही. किंवा त्या संबंधाने वाहिन्यांनी अशा बुद्धीमंतांना चर्चेसाठी आमंत्रित केले नाही. मग रडणार कसे?

हा बुद्धीवाद किती दुरगामी आहे ते समजून घ्यायचे असेल तर आधी बिरबल बादशहाच्या बौद्धिक पातळीवर जावे लागते. नेहमी बादशहा काहीतरी सवाल करणार आणि बिरबल त्याचे बिनतोड उत्तर देणार, अशा पातळीवर आपल्या समाजाचा बुद्धीवाद आला आहे. सहाजिकच त्यांचे वर्तनही त्यापैकी एका पात्रानुसार घडले तर नवल कुठले? एकदा बादशहा कडाक्याच्या थंडीने कुडकुडतो आणि इतक्या थंडीत रात्रभर कोणी यमुनेच्या पाण्यात उभा राहिला, तर बक्षिस देण्याची घोषणा करतो. एकजण बिचारा बक्षिसाच्या लोभाने ते दिव्य पार पाडतो आणि दरबारात बक्षिस घ्यायला हजर होतो. पण बक्षिस त्याच्या हाती पडण्यापुर्वीच एक पुरोगामी विज्ञानवादी सरदार आक्षेप घेतो. बादशहाच्या किल्ल्यातल्या दिव्याचा प्रकाश पाण्यात उभ्या राहिलेल्या माणसापर्यंत जातो, तर त्याची उष्णताही मिळते. म्हणूनच प्रत्यक्षात त्या इसमाने थंडी अनुभवली नाही, असा युक्तीवाद केला जातो. याला दूरगामी विचारसरणी म्हणतात. बादशहाही गडबडतो. शेवटी त्यावर उपाय म्हणून बिरबल खिचडीचे नाटक करतो. उंचावर बांधलेली हंडी आणि सहासात फ़ुट खाली असलेला जाळ, यावर खिचडी शिजवायचा उद्योग मांडतो. त्यातून मग बादशहाला पुरोगामी दरबार्‍याची अक्कल उमजते आणि त्या इसमाल बक्षिस दिले जाते. मुद्दा इतकाच, की तेव्हा सुदैवाने त्यात कोणी हस्तक्षेप केला नाही. आजच्या जमान्यात बिरबलाची खिचडी शंभर दिडशे फ़ुट उंचावर बांधलेल्या हंडीत असेल तरी शिजवणारे पुरोगामी विद्वान भारतात पैदा झाले आहेत. त्याचा पुरावा म्हणजेच दादरीची घटना होय. या विद्वानांना दादरीच्या हत्याकांडाची झळ पोहोचते. बारा पंधराशे किलोमिटर्सवरच्या जळितकांडाची धग जाणवते. पण यवतमाळ पुसदच्या घटनेचा सुगावाही त्यांना लागत नाही. याला बिरबलाची खिचडी नाही तर काय म्हणायचे?

याच देशात महाराष्ट्रातल्या पुसद गावात एका मुस्लिम तरूणाने २५ सप्टेंबर रोजी एका पोलिस शिपायाला भोसकले. कारण तो ज्या सरकारची नोकरी करतोय, त्याच सरकारने गोमांस खाण्यावर बंदी घातलेली आहे. एवढ्यासाठी त्या सरकारच्या सेवेत असलेल्याला भोसकणे माणूसकी असते, असे आपल्या बुद्धीजिवींना वाटते. तसे नसेल तर एव्हाना त्यापैकी एकाने तरी पुसदविषयी आक्रोश केला असता. पण बिचारे करणार काय? आपल्या पुरोगामी माध्यमांनी पुसदची बातमी ठळकपणे छापली नाही. कशी छापणार? त्यात एक मुस्लिमाने हिंदू असलेल्या पोलिस शिपायाला भोसकले आहे. आता हिंदूंना कोणीही कुठेही कसेही भोसकून जाळून मारावे, हा इतरांचा पुरोगामी अधिकार आहे ना? मग त्यासाठी कुठला पुरोगामी कशाला गदारोळ करील? कुठले पुरोगामी माध्यम त्याची बातमी ठळकपणे छापणार? मुळात हिंदू असेल त्याच्यावर अन्याय होतच नाही, अशी ठाम समजूत असल्यावर. तशी बातमीच कशी होऊ शकते? म्हणूनच तशी बातमी येत नाही, की त्यावरून गदारोळ व्हायचे कारण नाही. ही आपल्या देशातील पुरोगामीत्वाची अवस्था आहे. तीच कहाणी शेजारच्या कर्नाटकातील आहे. तिथे मुडबिद्री गावात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला मुस्लिम जमावाने भोसकून ठार मारले. त्याचा कुठे गाजावाजा झाला? कशाला होईल? अशा पुरोगामी कार्याचा निषेध तरी कसा होणार? बातमी मुस्लिमाला मारले म्हणून होत असते. हिंदूंना मारणे, घरातून हाकलून लावणे ही घटनात्मक कृती असते इथल्या पुरोगामी बुद्धीवादानुसार. सहाजिकच अगदी शेजारी तशी आग लागलेली असेल, तरी त्याची कुठली धग वा झळ पुरोगामी शहाण्यांपर्यंत पोहोचत नाही. पण १५०० किलोमिटर्स दूर दादरीत अखलाकला हिंदू जमावाने मारले, की देशाच्या कानाकोपर्‍यातील कुठल्याही बुद्धीवाद्याची होरपळ सुरू होते. ह्याला बिरबलची खिचडी म्हणतात.

एकदा बुद्धीवाद किंवा पुरोगामीत्वाची अशी व्याख्या झाली, मग सामान्य बुद्धीच्या लोकांचीही त्याच्या नेमकी उलटी व्याख्या होत असते. जर बुद्धीवाद्यांना धर्मानुसार संवेदना जाणवत असतील, तर सामान्य लोकांनाही त्याचीच बाधा होणार ना? सहाजिकच लोकांना दादरी वा तत्सम घटनांची धग जाणवत नाही, पण आपल्या धर्माच्या वा जातीपातीच्या जाणिवांनुसारच संवेदना कार्यरत होतात. देशात अशा घटना घडत असताना लोकांमध्ये इतकी बधीरता कशाला आहे, असा सवाल लेखातून व चर्चेतून विचारला जातो. त्याचे उत्तर मुडबिद्री वा पुसदच्या बाबतीत इतकी बौद्धिक बधीरता कशाला, अशा प्रश्नाने मिळते. पुरोगामी वा बुद्धीमंत माध्यमे पुसद वा मुडबिद्रीच्या घटनांविषयी बधिर रहाणार असतील, तर सामान्य लोकही दादरीविषयी बधिर होऊन जातात. यमुनेच्या पाण्यात कडाक्याच्या थंडीत उभे राहणार्‍याला राजवाड्यातल्या दिव्यापासून उब मिळत असेल, तर पंधरा फ़ुट उंचीवरच्या हंडीतली खिचडीही शिजणारच ना? तुमची खिचडी शिजत असेल, तर सामान्यांची कशाला नाही शिजणार? विज्ञानाचा नियम सर्वांना सारखाच लागू होतो. तसाच अंधश्रद्धेचा निकषही सर्वांना सारखाच लागू होतो. किंबहूना त्याचेच प्रतिबिंब आता सोशल मीडियातून पडू लागले आहे आणि मुख्यप्रवाहातील माध्यमांची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे. बुद्धीवादाची व साहित्यिक जाणत्यांची प्रतिष्ठा लयाला चालली आहे. बौद्धिक प्रांतातली मक्तेदारी आता संपली आहे, हे जितके अशा शहाण्यांच्या लक्षात येईल, तितकी लौकर त्यांना शुद्ध येईल. तुम्हीच शिजवलेली पुरोगामीत्वाची खिचडी तुम्हालाच खायला लोक भाग पाडत आहेत. तेव्हा ती शिजलेली नाही, अर्धकच्ची आहे, असल्या तक्रारी करण्यात अर्थ नाही. बादशहाही आपला मुर्खपणा कबुल करून सत्य स्विकारतो, तिथे पुरस्कारावर जगणार्‍या शहाण्यांची काय मजाल?

4 comments:

  1. राजदीप सरदेसाईंच्या मते दादरी आणि मुडबिद्री यांची तुलना होऊ शकत नाही कारण दादरीमध्ये ज्याला जमावाने चेचून मारले तो एक सामान्य नागरिक होता तर मुडबिद्रीमधील प्रशांत हा बजरंग दलाचा कार्यकर्ता होता

    ReplyDelete
  2. हिंदुंवर कधीही अन्याय होत नाही...............आणि त्यातही ब्राह्मण समाजावर तर कधीच नाही .........१९४८ साली झालेल्या ब्राह्मणांच्या हत्या या सामाजिक न्याय आणि पुरोगामित्वासाठीच होत्या

    ReplyDelete
  3. भाऊ तुम्ही आहात म्हणून असे वचनास मिळते.मस्त लेख.खरच तुमचा जगता पहारा आहे आणि आम्ही त्याचे शिपाई आहोत

    ReplyDelete
  4. हे अरण्यरुदन ठरणार नाही , आता नक्कीच फरक पडतोय. काल झी टीव्हीवर बांगलादेशी हिंदूंच्या अत्याचारावर कार्यक्रम चालू होता.

    ReplyDelete