Wednesday, October 8, 2014

निर्णायक १२६ जागांचे समिकरण

२००९ च्या विधानसभा निवडणूकीत मनसे हा मोठा निर्णायक घटक ठरला होता. शिवसेनेतील एक मोठा मतदार घटक बाजूला झाला, तर त्याचा फ़टका शिवसेनेला बसणे स्वाभाविक होते. पण तो फ़टका एकट्या शिवसेनेला बसला नव्हता. तर सेनेच्या सोबत असलेल्या भाजपालाही बसला होता. मुंबई, पुणे, नाशिक, नगर व कोकण परिसरात सेनेचे प्रभावक्षेत्र आहे. तिथे सेनेसोबतच भाजपाला मनसेने खाल्लेल्या मतांचा दणका सोसावा लागला. म्हणजेच युती म्हणून जो मतदार आहे, तो भाजपाचा वा मोदींच्या बाजूचा शंभर टक्के आहे, असे मानता येत नाही. म्हणून तर लोकसभेचे मतदान होण्यापुर्वी भाजपाचे नेते राज ठाकरे यांच्या पायर्‍या झिजवून मतविभागणी टाळण्याचा आटापिटा करीत होते. पण कुठल्याही प्रकारे मनसेशी हातमिळवणी होता कामा नये, असा अट्टाहास सेनेकडून उद्धव ठाकरे यांनी धरला होता. त्यावेळी कुणा भाजपा नेत्याचा मोदींच्या लोकप्रियतेवर विश्वास नव्हता, की भाजपाच्या वाढलेल्या शक्तीवरच त्यांचा विश्वास नव्हता? त्या वादात पडायचे कारण नाही. युतीची मते एकट्या भाजपाची नसतात आणि त्यावर शिवसेनेचा निदान मुंबई क्षेत्रात तरी प्रभाव असतो, याचा हा पुरावा आहे. एप्रिल-मे महिन्यात आपला निष्ठावान मतदार यावेळी मनसेकडे जाणार नाही, याची उद्धव ठाकरे यांना जितकी खात्री होती. तितकी भाजपाला नव्हती, याचाही तोच पुरावा आहे. मग आज त्याच डळमळीत भाजपा नेत्यांनी कुठल्या बळावर आपल्या वाढलेल्या शक्तीचे दावे करावे, हा गंभीर प्रश्न होतो. त्यांनी निकालानंतरच्या आकड्यांकडे बोट दाखवून इतके मोठे दावे करायचे असतील, तर मग निकालापुर्वीच मनसेची मनधरणी नको इतके आत्मविश्वासाने बोलणार्‍या उद्धव ठाकरे यांच्या शब्दाला अधिक वजन द्यावेच लागते. कारण वारंवार भाजपा नेते राज ठाकरे यांच्याकडे जात असताना किंवा मनसेच्या भयाने पछाडले असताना, एकट्या उद्धवनी आत्मविश्वास दाखवला होता. जुगार खेळायला त्याचीच जास्त गरज असते. असा नेता जेव्हा युती मोडायची वेळ आल्यावरही ठामपणे उभा रहातो, त्याला मोदीनिती उमगली असाच अर्थ होऊ शकतो. कारण बिहारचे राजकीय समिकरण बिघडत असताना नरेंद्र मोदींनी तोच आत्मविश्वास दाखवला होता.

२००९ च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मनसेने मतविभागणी केल्याचा लाभ कॉग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला मिळाला. हे लक्षात आलेल्या मतदाराने तीच चुक गेल्या एप्रिल महिन्यात केली नाही आणि मनसेकडे पाठ फ़िरवली होती. इतका मतदार बारकाईने विचार करतो, असा त्याचा धडा आहे. लोकसभेत लोकांनी सेना भाजपा युतीला सत्तेवर आणायचा संकेत दिला होता. अशावेळी भाजपाने जो आडमुठेपणा जागावाटपात केला, त्यातून आजची मतविभागणीची स्थिती निर्माण झाली आहे. पाच निवडणूका जो वाद झाला नव्हता, तो अशावेळी उकरून काढण्याचे डावपेच मतदाराला किती पचनी पडतील? लोकसभेच्या प्रचारात मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भाषा आठवते? यांना (अर्थात सेना-उद्धवना) औकात दाखवून देतो, असे राज बोलले होते. मतदाराने कृतीतून औकात कोणाला दाखवून दिली? लोकांचा अपेक्षाभंग करण्याला मतदार प्रतिसाद देत नाही. राजने जी चुक पाच महिन्यांपुर्वी केली, तीच आजच्या परिस्थितीत भाजपाने केलेली आहे. मात्र त्यासाठी लागणारे संघटनात्मक बळ त्या पक्षाकडे नाही. त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात अन्य पक्षांकडून उमेदवार आयात केलेले आहेत. तीच मोठी चुक झालेली आहे. मुंबईच्या भोवताली पुणे नाशिक व कोकणाचा परिसर घेतला, तर तिथे सव्वाशे जागा आहेत. तिथे ज्याला ६०-७० जागा ओलांडता येतील, त्याला बहूमताचे दार ठोठावणे शक्य आहे. प्रामुख्याने चौरंगी लढतीमध्ये २० टक्केहून अधिक बाधील निष्ठावान मते असलेल्या पक्षाला निर्णायक चाल खेळता येते. आजवर तरी भाजपाला तितकी शक्ती स्वबळावर दाखवता आलेली नाही. इथे मग मोदी यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे हे चलनी नाणे होऊ शकते. म्हणूनच विविध चाचण्यांमध्ये भाजपाला सर्वाधिक जागा दिसतात, पण मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आघाडीवर दिसतात. त्यांच्या नंतर पृथ्वीराज यांना पसंती दिसते. त्याचेही कारण समजून घेतले पाहिजे. भाजपाकडे अनेक चेहरे आहेत, पण एकमेव चेहरा नाही. कॉग्रेसकडे विद्यमान मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज आहेत. सहाजिकच लोकांसमोर दोनच प्रमुख चेहरे आहेत. त्यातून निवड करताना त्यांचेच क्रमांक आघाडीवर दिसतात. याचा प्रभाव अखेरच्या क्षणी मतदानावर पडू शकत असतो.

लोकसभा निवडणूकीत कॉग्रेसने चेहरा पुढे करायचे नाकारले होते. तिथे मोदींना घोषित उमेदवारीचा लाभ मिळाला. मग लोकांना निवड करायला दुसरा चेहराच नव्हता. सहाजिकच मोदी हवेत म्हणून लोकांचा कौल वाढत गेला. इथे पृथ्वीराज नको असतील तर कोणाकडे बघायचे? भाजपाने पुन्हा मोदींचा चेहरा पुढे केला आहे. पण मोदी मुख्यमंत्री म्हणून येऊ शकत नाहीत. पृथ्वीराज तर नकोत, कारण ते पुन्हा राष्ट्रवादी व कॉग्रेसला सोबत घेऊन येतील. मग लोकांनी निवड कशातून करायची? आजचे सत्ताधीश नकोत आणि त्यांना पर्याय हवा असेल, तर लोकांसमोर असलेला एकमेव चेहरा शिल्लक उरतो तो म्हणजे उद्धव ठाकरे एवढाच. तिथे शिवसेनेचे पारडे जड होते. तिथेच भाजपाने चुक केली, ती नितीशकुमार यांच्यासारखी नकारात्मक भूमिका घेऊन. सेनेचा मुख्यमंत्री नको आणि सेनेने त्या पदासाठी आग्रह धरू नये एवढ्यासाठी युती मोडल्याचे खडसे व फ़डणविस यांनी खुलेपणाने आता सांगितले आहे. पण कुठलाही दुसरा चेहरा त्यांना पर्याय म्हणून पुढे आणता आलेला नाही. त्याचाच फ़ायदा शिवसेनेला मिळू शकतो. ज्या मुंबई भोवतालच्या सव्वाशे जागांचा हिशोब इथे वारंवार मांडलेला आहे, तिथे चौरंगी लढतीमध्ये सेना आपली सर्व शक्ती पणाला लावून सत्तर जागा जिंकू शकली, तर तिला बहूमताचे दार ठोठावणे शक्य होणार आहे. याचे पहिले कारण या भागात सेनेचे कायम वर्चस्व राहिले आहे आणि जागा भाजपाला सोडल्या तरी सेनेने तिथे आपली संघटना कायम प्रभावशाली राखलेली आहे. अर्थात सेनेला स्वत:चे बहूमत मिळवण्याचीही गरज नाही. शंभरापेक्षा अधिक जागी विजय मिळवला, तरी तोच सर्वात मोठा पक्ष बनतो आणि त्याला बाजूला ठेवून कुठलेच समिकरण तयार होऊ शकत नाही. कॉग्रेस व सेना यांची बेरीज दिडशेच्या पुढे गेली, तर त्यांना वगळून कोणी सरकार स्थापन करू शकणार नाही. म्हणजेच निकालानंतर सेनेकडे भाजपाला जावेच लागेल. पण मग सन्मानाने वा अधिकाराने सत्तेतला वाटा मागायला जागा शिल्लक उरलेली नसेल.

म्हणूनच भाजपाने खेळलेला जुगार मोठीच राजकीय चुक वाटते आहे. त्यात यशस्वी व्हायचे, तर भाजपाला कुठल्याही मार्गाने बहूमत मिळवणे किंवा निदान विधानसभेत सर्वात मोठा पक्ष होण्याची गरज आहे. पण तशी कुठलीही शक्यता दिसत नाही. स्वबळावर आणि मोदींची लोकप्रियता पणाला लावून भाजपा साठीचा पल्ला गाठू शकेल किंवा नाही याची शंका आहे. मित्र पक्षांची भर घालूनही ७० ओलांडली नाही, तर १४४ हे लक्ष्य पुर्ण कसे करायचे? खुप मागे जाऊन भाजपाने पारंपारिक बालेकिल्ले जरी हिशोबात घेतले तर २० पेक्षा अधिक जागा होत नाहीत. त्याच्या तिप्पट जागा मोदींमुळे मिळतील, हे मान्य केले तरी पुन्हा घोडे ६० पर्यंत येऊन अडते. त्यात पुन्हा इतर पक्षातून आणलेले १५ विजयी उमेदवार घातले, तरी संख्या पाऊणशेला जाऊन अडकते. याच्या उलट शिवसेनेला लाभदायक परिस्थिती आहे. मुंबई भोवतालचा भाग घेतल्यास भाजपाने आजवर घेतलेल्या ५० हून अधिक जागा सेनेसाठी प्रभावक्षेत्रातल्या म्हणून सोप्या आहेत. विपरित वेळी २००९ सालात जिंकलेल्या ४० मध्ये अशा जागांची भर पडली तरी थेट ८० चा आकडा पार होतो. पण आज जितक्या उमेदीने व तडफ़ेने सेना मैदानात उतरली आहे, त्यातून त्यांचा मनसुबा शंभरी ओलांडून जायचा दिसतो. तसे होऊ शकले, तर कायमचा थोरला भाऊ होऊन बसण्याचा अधिकार सेनेला व उद्धव ठाकरेंना मिळू शकतो आणि तो भाजपानेच बहाल केलेला असेल. जी संधी पंचवीस वर्ष महाजन मुंडेनी सेनेला नाकारलेली होती.

4 comments:

  1. भाऊ, तुमचे ब्लॉग्स मी बर्यापैकी नियमित वाचत असतो आणि तुमच्या सडेतोड आणि मुद्देसूद लिखाणाचा मी चाहता आहे!
    आजच्या ब्लॉगमधील एक मुद्दा मात्र गैरलागू वाटत आहे. तो म्हणजे मुख्यमंत्रीपदासाठी मा. उद्धव ठाकरे यांचे नाव घोषित केल्याने शिवसेनेला फायदा होईल हा…
    सध्याची उद्धव ठाकर्यांची भाषणे पाहिली किंवा वाचली तर त्यात कुठेही राज्याच्या विकासाबाबत किंवा आगामी योजनांबाबत भाष्य नसते. अथवा असले, तरी ते थोडक्यात उरकून त्यांच्या मुख्य मुद्द्याकडे - म्हणजे 'भाजप' वरील टीका - येण्याची त्यांना घाई झालेली असते. आणि ही टीका दिवसेंदिवस सभ्यतेची पातळी सोडून अधिकाधिक घसरू लागलेली आहे.
    इतके दिवस भाजपच्या राज्यस्तरावरील नेत्यांवर टीका होत होती, पण आता खुद्द मोदींवर, ज्यांच्यासाठी चारच महिन्यांपूर्वी मते मागितली होती, टीका करताना इतिहासातले चुकीचे दाखले दिले जात आहेत. भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांसाहित मोदींचे मंत्रिमंडळ जर अफजलखानची फौज असतील तर श्री. गीते काय तिथे यांच्या दाढी कुरवाळायच्या कामावर आहेत का? आणि अफजलखान विजापूर नव्हे तर दिल्लीतून आला होता हे ऐकून तर करमणूकच झाली!
    बाकीच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून सुध्दा भाजपवर होणारी टीका किमान सभ्यतेची मर्यादा ओलांडून घसरली आहे. बहुतेक वृत्तपत्रांमध्ये (अर्थातच सामना सोडून!) मा. उद्धव ठाकरे यांच्या सभेचा वृत्तांत वाचला तर बहुतांशी वेळा 'सेनेच्या विक्रमी सभांच्या तुलनेत गर्दी कमी होती' याचा उल्लेख येतो आहे…
    हे सगळे पाहिल्यावर असे वाटते भाऊ की, जनता यांच्या मागे खरोखरच आहे का?

    ReplyDelete
  2. थोरला भाऊ सोडा, चुलत छोटे भैय्या शी जमवता येईना, ५०चा आकडा पार केला तर शिवाजी पार्क वर महाराजांचा पुतळा बसवल्याचे पुण्य मिळेल...

    ReplyDelete
  3. ब्रम्हे आणि ओक साहेब, शिवसेनेकडून मवाळ भाषेची अपेक्षा ठेवणे म्हणजे वाघाकडून मँव मँव करण्याची अपेक्षा ठेवण्यासारखे आहे. शिवसेनेने कधी कोणाला सोडले आहे ते सांगा? राज ठाकरेंनाही गद्दार, पाठीत खंजीर खुपसणारा म्हंटलेच होते. भाजपने फसवले हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे.. परंतू मोदीभक्त म्हणून ते आपल्या म्हणजे मी धरून लक्षात येत नाही.

    ReplyDelete