Sunday, December 30, 2012

डोंबिवलीची विद्या पाटिल आठवत सुद्धा नाही ना?

डोंबिवलीची विद्या पाटिल आठवत सुद्धा नाही ना?

खुप जुनी? होय म्हटले तर खुप जुनीच गोष्ट आहे. कारण हल्ली संपादक पत्रकारांसह राजकारणी व अभ्यासकांनाही आठवड्यापुर्वीच्या गोष्टी आठवत नाहीत मग सतरा वर्षापुर्वीच्या घटनेला जुनीच म्हणायला नको का? जेव्हा ही दिल्लीची निर्भया किंवा दामिनी बहुधा सहा वर्षाची फ़्रॉक घालणारी बाहुलीशी खेळणारी बालिका असेल तेव्हाची गोष्ट आहे. आज जी मुले मुली रस्त्यावर उतरलीत, त्यांचे नुकतेच जन्म झाले असतील किंवा पाळण्य़ात हसत रडत असतील तेव्हाची. १९९५ सालातली. मी ‘आपला वार्ताहर’ दैनिकाचा संपादक होतो आणि तेव्हा अशाच नरकवासातून डोंबिवलीची विद्या नावाची मुलगी गेली होती आणि तेव्हाही मी असाच आक्रोश केला होता. ती अनेक जाणत्यांनाही भावनाविवश प्रतिक्रिया वाटली होती. आज सतरा वर्षानंतर तोच आक्रोश सर्व महानगरात, रस्त्यावर, देशभर आणि समाजाच्या सर्व थरात होताना दिसल्यावर माझा दावा खरा असल्याचा आनंद मानावा की किती उशीर केलात, म्हणून सर्वांना शिव्याशाप द्यावेत, तेच कळेनासे झाले आहे. ‘लोकसत्ता’ दैनिकात (३१/१२/२०१२) आज ‘पोरी, तुझं चुकलंच..!’ या शिर्षकाचा अग्रलेख छापून आलाय. म्हणून त्या जुन्या आठवणी चाळवल्या. डोंबीवलीच्या विद्या पाटिलची रडवी मुद्रा माझ्यासमोर उभी राहिली आणि तो खुप खुप जुना अंक शोधून काढला. त्या जुन्या अग्रलेखाचे कात्रण इथे छायाचित्र रुपाने देतो आहे. वाचायला थोडे त्रासदायकच आहे. पण आपल्याला तेवढेही कष्ट करायचे नसतील तर..................







Sunday, December 23, 2012

(‘तू वेडा कुंभार’चे विडंबन)



धमक्या धाकावरती चाले 
सत्तेचे सरकार
जनता लोकशाही बेजार

गुन्ह्यागुन्ह्याचे रुप आगळे
शिक्षेचेही नियम वेगळे
पोलिस वकीलांनाही नकळे
न्याय मागता मिळते लाठी, गुंडाला अधिकार
जनता लोकशाही बेजार

तपास खटले चौकशी अटका
जुना कायदा तुटका फ़ुटका
जामीन मिळता होई सुटका
अन्यायाच्या अत्याचारा, नसे अंत ना पार
जनता लोकशाही बेजार

म्हणे कायदा धट्टाकट्टा
त्याच्या नावावरती बट्टा
कुत्रा ज्याच्या गळ्य़ात पट्टा
शेपूट त्याची त्याला ओढी, तो नुसता भुंकणार
जनता लोकशाही बेजार

Wednesday, December 19, 2012

उपाय आणि उपचारातला फ़रक


   नुकत्याच बांगला देश युद्धाच्या संदर्भातील आठवणींना उजाळा देणारा एक लेख वाचनात आला. त्यात पाकिस्तानी सैनिकांनी बांगला देशात त्यावेळी अत्याचार केले; त्यात काही लाख महिलांवर बलात्कार केल्याचा उल्लेख आहे. त्यांचा हेतू आणि दिल्लीतल्या या श्वापदांचा हेतू वेगळा असतो काय? तुम्ही तुमच्या महिलांना संरक्षण द्यायला नामर्द आहात; असे सत्ताधारी व राज्यकर्त्या प्रशासनाला त्यातून प्रत्येक बलात्कारी सांगत असतो. तो संदेश सरकारपर्यंत पोहोचला असे मला तरी, मंगळवारच्या चर्चेतून दिसले नाही. कारण एकूणच चर्चा व वक्तव्ये औपचारिक होती. आणखी एक गुन्हा झालेला आहे, आणखी एक बलात्कार घडला आहे, असेच चर्चा व वादविवादाचे स्वरूप होते. म्हणूनच मूळ बलात्कारी घटनेपेक्षा ती औपचारिकता अधिक भयकारी वाटते. त्या चर्चा वादविवादाचा सूर रोजची एक घटना किंवा बातमी असाच होता. त्यामध्ये कुठे त्या मुलीची वा अन्य बलात्कार पिडीत महिलेची व्याकुळता दिसली नाही. अशा गुन्ह्यातून उपजणारी वेदना व यातनांचा लवलेश त्या चर्चेत नव्हता किंवा बातम्यांमध्ये नव्हता. बलात्कार म्हणजे नेमके काय, त्याचे अज्ञानच त्याला कारणीभूत आहे असे वाटते. लैंगिक शोषण वा गैरफ़ायदा घेणे, असे बलात्काराचे स्वरूप नाही. तर त्या मुली-महिलेची इच्छा व इज्जत क्रुरपणे पायदळी तुडवणे असते. आणि म्हणूनच ती घटना एक नको असलेली यातनामय आठवण होऊन तिच्या मनाला चिकटून बसत असते. कितीही झटकली वा पुसली; म्हणून जिच्यापासून मुक्त होता येत नाही, अशी ती उद्विग्नता असते. कोणा न्यायाधीशाने एका प्रकारणात त्याचे नेमक्या शब्दात वर्णन केल्याचे स्मरते. शरीरावर बलात्कार एकदाच होतो. पण त्याचा तपास खटले व उल्लेख जितक्या वेळा होतो, तितक्या प्रसंगी त्या बलात्कारितेला त्याच असह्य यातनांतून जावे लागत असते. या गुन्ह्याची इतकी भयंकर व्याप्ती त्यावरच्या चर्चा, बातम्यातून कोणी लक्षात तरी घेतो का? नसेल तर अशा चर्चा हव्या कशाला व त्यातून साधले काय जाणार? घराबाहेर पडणार्‍या महिलेच्या मनातल्या भितीची सुतराम कल्पना चर्चेत दिसली का?

   इतक्या वेगाने असे गुन्हे होत आहेत आणि वाढतच आहेत, तर त्यावरचे उपाय का बदलले जात नाहीत? ज्या कायद्याने वा शिक्षेने धाक निर्माण होतो, त्याच मार्गाने अशा घटनांना पायबंद घालता येईल. पण दुर्दैव असे आहे, की नेहमी त्याच त्याच चर्चा चालतात, पण उपाय बदलण्याचा विचारही होत नाही. कालबाह्य झालेले कायदे आणि त्यांचाही अंमल नसणे; हे अशा सामाजिक दुखण्याचे खरे कारण आहे. आता इतका गदारोळ झाल्यावर त्यातल्या आरोपींची झपाट्याने धरपकड झालेली आहे. तेवढेच नाही तर विनाविलंब त्यांना पकडल्याबद्दल गृहखात्याने स्वत:ची पाठही थोपटून घेतली आहे. मग थोरामोठ्यांनी आपल्या अभ्यासपुर्ण प्रतिक्रिया देताना फ़ाशीच्या शिक्षेपासून कठोर शिक्षेच्या मागण्याही केलेल्या आहेत. पण असे प्रकार होऊच नयेत; यासाठी कोणाला उपाय सुचवावा असे वाटत नाही, याला पराभूत मनोवृत्ती म्हणतात. कठोर शिक्षा व तातडीने धरपकड केल्याचे जर समाधान असेल, तर त्यातून गुन्ह्याला एकप्रकारे मान्यता दिली जात असते, त्याचे काय? आम्ही शिक्षा देऊ, तुम्ही गुन्हा करा, गुन्हा होईपर्यंत शांत बसू; असाच सिग्नल त्या गुन्हेगारांना दिला जात नाही काय? गुन्हा रोखण्यासाठी कायदा व कायद्याचे राज्य असते, ह्याचे आपल्याला विस्मरण झाले आहे काय? आरोपीला कुठलीही शिक्षा देऊन झालेले गुन्ह्यामुळे नुकसान भरून येत नाही. म्हणूनच शिक्षा व खटले हे उपचार असतात, उपाय नसतात. उपाय म्हणजे आजारमुक्त गुन्हेगारीमुक्त निरोगी जीवन होय. म्हणूनच गुन्हेगारीमुक्त समाज निर्मितीच्या दिशेने कायद्याने वाटचाल करायला हवी. तेवढा कायद्याचा धाक असायला हवा. तशी कोणाची इच्छा दिसत नाही की प्रयत्नही दिसत नाही. मग मंगळवारी झाला तो नुसता तमाशाच नाही काय?

मित्रांनो शिक्षा कधीच महत्वाची नसते. त्यापेक्षा भयंकर असते ती शिक्षेची भिती. मी शाळेत असताना बहुतेक मास्तरांकडून बेदम मार खाल्लेला आहे. शेवटी तेच मारून दमले, पण मला कोणी धाक घालू शकला नव्हता. आणि त्यापैकी अनेकांनी तसे प्रामाणिकपणे बोलूनही दाखवले. एकच शिक्षक असे होते, की त्यांनी कधी अंगाला हात लावला नाही, की दमसुद्धा दिला नाही. मी त्यांना भयंकर घाबरत असे. आज इतक्या वर्षांनी विचार केल्यावर लक्षात येते, की कधीच शिक्षा न देणार्‍या त्या शिक्षकाने संयम संपून दिलीच शिक्षा; तर ती किती भयंकर असेल यालाच मी घाबरत असावा. शिक्षेचे स्वरूप वा माहिती असण्यापेक्षा तिच्याविषयीची अनाकलनिय अनिश्चितता अधिक भयभीत करणारी व म्हणून परिणामकारक असू शकते, असे माझे मत आहे. मग तो अपराधी माझ्यासारखा व्रात्य खोडकर विद्यार्थी असो, की नामचिन गुन्हेगार असो.
facebook

Monday, December 10, 2012

जय हो?

 जय हो?

पासष्ट वर्षापुर्वी 
आमच्यातल्याच काही गुलामांनी 
आम्हाला विकत घेतले 
आणि राजीखुशीने, अक्कलहुशारीने,
नशापाणी न करता
आमच्या अस्तित्वाचे गहाणपत्र
आम्ही त्यांना लिहून दिले
दर पाच वर्षांनी

Friday, December 7, 2012

बुडवा महाराष्ट्र माझा




व्हय व्हय महाराष्ट्र माझा, बुडवा महाराष्ट्र माझा
खर्चा महाराष्ट्र माझा, तुडवा महाराष्ट्र माझा

भिती न आम्हा तुझी मुळीही गडगडत्या माध्यमा
मंत्रीपदाच्या सुलतानीला नाही कुणाची तमा
बारामतीचा टग्या गर्जतो अजाणता राजा
भूखंडातून नाद गुंजला महाराष्ट्र माझा    

ठेवा खर्चा कृष्णखोर्‍याचा पैसा लवासावरी
जलसंपदा झाली आपदा म्हणे सुनील तटकरी
भीमथडीला पडली कोरड, बिसलेरी पाणी पाजा
बांधबंधारे रडती म्हणती महाराष्ट्र माझा

काळ्या मातीतूनी कोरली बंधार्‍याची लेणी
पाण्य़ाचा तर पत्ता नाही परी तुंबली देणी
पृथ्वीला तो पुरून उरला
राजीच्या नाम्यातही शिरला
काकावरती तो गुरगुरला, तो गुरगुरला
एकच वादा म्हणतो दादा महाराष्ट्र माझा


दादा जरा श्वेतपत्रिका आण



कोरं कोरं पान वहीसारखं छान
दादा जरा श्वेतपत्रिका आण

पत्रिकेला आणायाला लालदिव्याची गाडी
लालदिव्याच्या गाडीला शपथेची जोडी
शपथेचा विधी तुडवी सिंचनाचं रान
दादा जरा श्वेतपत्रिका आण

पत्रिकेची सुट्टी होता पाठीवर थापा
पाठीवर थापा नको टाकूस धापा
बाहूलीच्या तालावर आबा हलवी मान
दादा जरा श्वेतपत्रिका आण

कोर्‍या श्वेतपत्रिकेला टेंडराची साडी
टेंडराच्या साडीला दरवाढीची घडी
बंधार्‍याच्या पदराला घोटाळ्याची घाण
दादा जरा श्वेतपत्रिका आण

Wednesday, November 28, 2012

पत्रकारितेतील बुवाबाजी



   १९७८ सालची गोष्ट आहे. तेव्हा मुंबईतून प्रकाशित होणार्‍या ब्लिट्झ नावाच्या साप्ताहिकात मी वर्ष भर काम केले. ते मुळातच इंग्रजी साप्ताहिक होते. त्याच्या हिंदी, उर्दू व मराठी अशा अन्य भाषेतील आवृत्त्या निघत असत. मी मराठी आवृत्तीमध्ये काम करत होतो. त्या साप्ताहिकाचे संपादक मालक रुसी करंजिया हे पारसी गृहस्थ थेट इंदिरा गांधी वगैरे मोठ्या नेत्यांना जाऊन भेटायचे, त्यांच्या मुलाखती घ्यायचे म्हणून त्यांच्या ना्वाचा तेव्हा राजकीय वर्तुळात मोठाच दबदबा होता. ते करंजिया सत्य साईबाबाचे मोठे भक्त होते. तसे ते कम्युनिस्ट विचारसरणीचे म्हणूनही मानले जायचे. पण त्यांची ही साईभक्ती अजब कोडे होते. त्या साप्ताहिकाच्या कार्यालयात निरंजन माथूर नावाचा एक जादूगार यायचा व तिथल्या सर्वांशी तो चांगला परिचित होता. आमच्याही विभागात येऊन गप्पा मारायचा. त्याने करंजिया यांचे साईभक्तीपासून मन वळवण्याचा खुप प्रयत्न केला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सत्यसाईबाबा कुठलीही वस्तू रिकाम्या हातातून काढून भक्तांना विस्मयचकित करीत असत आणि ती वस्तू भक्ताला प्रसाद म्हणून देत असत. त्यांच्या प्रमाणेच आपणही चमत्कार करून दाखवतो, असे या जादूगाराने करंजियांना आव्हान दिले. एकदा ते त्याला घेऊन सत्यसाईबाबांकडे गेले. बाबांनी जी वस्तू काढली ती त्याने तिथल्या तिथे काढून दाखवली. तरीही करंजियांची साईभक्ती कमी झाली नाही. तो किस्सा तो सर्वांना सांगायचा. पण तो महत्वाचा नाही. त्या अनुभवातून तो माथुर काय शिकला ते त्याचे निरुपण महत्वाचे होते. मी ते कधीच विसरणार नाही. त्याचे म्हणणे काय होते?

ज्या दिवशी तो सत्यसाईंकडे करंजियांच्या सोबत गेला होता, तेव्हा त्याने आपल्या सोबत अशा सर्व वस्तू नेलेल्या होत्या, ज्या सत्यसाई अकस्मात काढून भक्तांना चकित करतात. त्यात अंगारा, सफ़रचंद अशा वस्तूंचा समावेश होता. हातचलाखीने त्याने त्या सर्व काढून दाखवल्या होत्या. पण जर त्यादिवशी सत्यसाईंनी नेहमीपेक्षा भलतीच म्हणजे जिलबी किंवा अंडे वगैरेसारखी वस्तू काढून दाखवली असती तर या निरंजनची फ़टफ़जिती झाली असती. कारण सत्यसाई ज्या वस्तू काढून दाखवतात, त्या त्याला ऐकून माहिती होत्या, तेवढ्य़ाच त्याने आपल्या शरीरावर कुठ्तरी दडवून ठेवल्या होत्या. बाकी काम होते हातचलाखीचे. त्याबद्दल त्याला आत्मविश्वास होता. पण अकस्मात कुठली वस्तू निर्माण करता येत नाही, अशीही त्याची वैज्ञानिक श्रद्धा होती. पण तो त्यात यशस्वी ठरला. मात्र त्याचे दु:ख होते वेगळेच. इतके सिद्ध करूनही त्याला करंजियासारख्या सत्यसाई भक्ताला अंधश्रद्धेपासून दुर करता आलेले नव्हते. मग तो म्हणायचा, की मी सगळी जादू करून लोकांना थक्क करतो, पण ती चलाखी आहे म्हणून सांगतो. ते न सांगता मी भगवी वस्त्रे परिधान करून बुवा महाराज झालो असतो; तर लाखो रुपये कमावले असते. कारण जादू किंवा चलाखी हाती आहे म्हणून तुम्ही बुवाबाजी करू शकत नाही. तुमची खरी दैवीशक्ती समोरच्या भक्ताच्या मनात वसत असते. एकदा त्याची भक्ती संपादन करा, मग त्याला चलाखी कळली तरी बिघडत नाही. कारण श्रद्धेने मनाचा कब्जा घेतला, मग खोटेही खरे ठरवता येत असते. कारण सामान्य माणसाला किंवा कुठल्याही बुद्धीमान माणसाला त्याच्या मनाच्याच ताब्यात रहावे लागते. त्याच्या विवेकबुद्धीला मनावर निर्णायक ताबा मिळवता येत नाही. तिथूनच माणसाच्या बुद्धीचा पराभव होत असतो आणि बुवाबाजीचे साम्राज्य सुरू होत असते.

   मी आजवर अनेक बुद्धीमंत, विचारवंत ऐकले वाचले आहेत. पण त्या जादूगार निरंजन माथुरने जी बुवाबा्जीची सोपी सरळ व्याख्या केली तितके सोपे विवेचन कोणाकडून मला कधीच ऐकायला मिळालेले नाही. किंबहूना त्याच्याच त्या विवेचनामुळे धार्मिक वा अन्य कुठल्याही क्षेत्रातील बुवाबाजी व अंधश्रद्धेवर मी टिकेचे आसूड ओढू शकलो, असेच मी मानतो. आणि आज जेव्हा अंधश्रद्धेच्या विरोधातला नवा कायदा येऊ घातला आहे; तेव्हा तर मानवी जीवनातील अन्य क्षेत्रातही बुवाबाजी भयंकर बोकाळली आहे. त्याकडे डोळसपणे बघायची मला अधिक गरज वाटते. मी आयुष्य खर्ची घातले त्या माध्यम व पत्रकारितेच्या क्षेत्राचा समावेशही अशा बिघडत चाललेल्या बुवाबाजीच्या क्षेत्रात होतो. मागल्या दोन दशकात कधी नव्हे इतका संचार व प्रसार साधनांचा आणि तंत्रज्ञानाचा विकास झाला आहे. त्यातून माध्यमांनी व पत्रकारितेने अधिक मोठ्या जनमानसावर आपला प्रभाव निर्माण केला आहे. सहाजिकच त्यातला पेशा व उदात्त उद्दीष्ट मागे पडून, त्या क्षेत्राला व्यापाराचे हिडीस स्वरूप आले आहे. म्हणजे जसा कोणी बुवा किंवा महाराज त्याग व संन्यस्त वृत्तीचे दुकान थाटून ऐषारामी जीवन जगतो आणि वरती समाज उद्धाराच्या मोठ्या उदात्त वल्गना करत असतो, त्यापेक्षा आजची पत्रकारिता वेगळी राहिलेली नाही.

   बुवाबाजी म्हणजे तरी नेमके काय असते? जे लोक आपल्या नित्यजीवनातील समस्या अडचणींनी गांजलेले असतात आणि त्यांना त्यावर कुठले व्यवहारी उपाय सापडत नसतात, त्यांना आपल्यापाशी काही अलौकिक दैवी चमत्कारी शक्ती असल्याचे भासवून त्यांची फ़सवणूक करण्यालाच बुवाबाजी म्हणतात ना? मग आजची माध्यमे किंवा पत्रकारिता त्यापेक्षा कोणता वेगळा धंदा करीत आहेत? वृत्तपत्र हे वाचण्यासाठी असते, प्रसार माध्यमे ही लोकशिक्षण व प्रबोधनाचे साधन आहे, त्यांची आजची सगळी मदार माल खपवायच्या जाहीरतीवर अवलंबून असेल आणि त्यासाठी प्रबोधन, लोकशिक्षणाची त्यात गळचेपी चालू असेल; तर त्या व्यवसायात गुंतलेल्यांना आपण काही महान लोक उद्धाराचे कार्य करीत आहोत असा दावा करता येईल काय? कोणी डॉक्टर स्त्रीभृणहत्येचे वा गर्भलिंग चिकित्सेचे काम करून समाजविघातक धंदा करत असेल आणि कोणी आक्षेप घेतल्यावर त्याने आपले वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवून सेवाभावाचा मुखवटा चढवणे, ही बुवाबाजी नाही काय? ज्याने जीव वाचवायचा असतो त्यानेच जन्मापुर्वी गर्भाच्या हत्येला सहकार्य करणे किंवा त्यातून कमाई करणे गुन्हा असतोच. पण त्यानंतर पुन्हा तोंड वर करून आपण जनसेवा करतो, असे सांगणे बदमाशीच नाही काय? त्यालाच पाखंड किंवा बुवाबाजी म्हणतात. आज पत्रकारिता व माध्यमे तेवढेच करीत नाहीत काय? अधिक पाने व कमी किंमत असे आमिष दाखवून लोकांच्या ज्ञानात भर घालण्याऐवजी लोकांची दिशाभूल ही सुद्धा तशीच बुवाबाजी असते ना?

   लोकांना अधिक पाने व रंगीत पाने देण्याचा भुलभुलैया तयार करून अधिक खप मिळवणे व त्यातून अधिक जाहीरातीचे उत्पन्न मिळवण्यासाठी वाटेल त्या मार्गांचा अवलंब करणे ही पत्रकारिता आहे काय? ज्याच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली असताना, जवळपास मोफ़त वर्तमानपत्रे वितरित केली जात आहेत, त्यात फ़क्त अधिक खप मिळवणे एवढाच हेतू आहे. मग त्यासाठी बहुतेक वृत्तपत्रांच्या संपादकांना विक्री व जाहीरात विभागाच्या तालावर नाचावे लागत असते. तसे नाचणार्‍यांनी अविष्कार स्वातंत्र्याच्या गप्पा ठोकणे ही बुवाबाजी नाही तर काय आहे? कधी आपल्या राजकीय हेतूने कुठल्या पक्षाची वा नेत्यांची कुरापत काढायची आणि त्यांनी खुलासा दिल्यास प्रसिद्ध करायचा नाही, याला बदनामी म्हणतात. अशा बदनामीच्या सुपार्‍या घेतल्या जातात. ती कुठली पत्रकारीता आहे? अविष्कार स्वातंत्र्याच्या नावावर हे जे सुपारीबाजीचे उद्योग चालतात, ते उघडे पडले आणि कोणी अंगावर आले, मग लगेच पत्रकारितेचा मुखवटा लावायचा; अशीच आजच्या पत्रकारितेची अवस्था झालेली नाही काय?

   सहा महिन्यांपुर्वी मुंबईसह अनेक महापालिकांच्या निवडणूका ऐन रंगात आल्या होत्या. विविध पक्षांचे उमेदवार किंवा आमदार, खासदार फ़ोडण्याचे उद्योग चालू होते. त्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधूकर पिचड यांनी शिवसेनेचा कोणी खासदार आपल्या पक्षात येणार असल्याची वावडी उडवली. मग प्रत्येक वृत्तपत्राने आपापले अंदाज सुत्रांच्या हवाल्याने थापा ठोकाव्यात तसे प्रसिद्ध केले. त्यात एकेकाळचे मान्यवर दैनिक महाराष्ट्र टाईम्सचाही समावेश होता. त्यांनी तर बेधडक शिवसेनेचे खासादार आनंदराव अडसूळ यांचा नावानिशी उल्लेख करून बातमी दिली. मग त्यांच्या संतापलेल्या पाठीराख्यांनी टाईम्सच्या कार्यालयात घुसून धिंगाणा केला. मग सर्वत्र एकच कल्लोळ माजला. काय केले होते त्या अडसुळवाद्यांनी? टाईम्सच्या कार्यालयातील पाच दहा संगणक व काही टेबले खुर्च्या मोडून फ़ोडून टाकल्या. तेवढ्याने संपुर्ण देशातील आविष्कार स्वातंत्र्यावर गदा आली म्हणुन काहूर माजवण्यात आले. काही वाहिन्यांनी त्यावर तास अर्ध्या तासाच्या चर्चा घड्वून आणल्या. प्रत्यक्षात महाराष्ट्र टाईम्सने जे छापले होते ती शुद्ध थाप होती. म्हणजेच अफ़वा पसरवण्याचे काम त्यांनी केले होते. पण ते पत्रकार म्हणुन केले तर त्याला उदात कार्य म्हणावे, असा त्यांचा आणि तमाम अविष्कार स्वातंत्र्यवाद्यांचा दावा होता. एकवेळ तो दावा वादासाठी मान्य करू. पत्रकार किंवा त्यांच्याशी संबंधीत कामावर हल्ला झाल्यास त्यालाच अविष्कार स्वातंत्र्यावरचा हल्ला म्हणायचे असेल, तर परवा ११ ऑगस्टला आझाद मैदानावर घडले ती काय अविष्कार स्वातंत्र्याची महापूजा होती का? तिथे पोलिसांसह माध्यमांचे प्रतिनिधी व त्यांच्या थेट प्रक्षेपणाच्या गाड्यांवर रझा अकादमीच्य गुंडांनी जीवघेणा हल्ला चढवला. त्याला काय म्हणायचे? त्याबद्दल कुठल्याच वृत्तपत्राने, वाहिन्यांनी वा पत्रकारांच्या संघटनेने साधा निषेधाचा शब्द का उच्चारला नाही? की शिवसैनिकांनी वा संभाजी ब्रिगेड, बजरंग दल अशापैकी कोणी मारहाण, मोडतोड केली तरच अविष्कार स्वातंत्र्यावर हल्ला होतो? आणि रझा अकादमी वा अन्य कुठल्या मुस्लिम संघटनेने जीवघेणा हल्ला केला तरी ती सत्यनारायणाची पूजा असते का?

   अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाच्या संबंधाने लोकसत्तेचे संपादक असताना कुमार केतकर यांनी उपहासात्मक लेख लिहिला होता. तेव्हा ठाण्यातील त्यांच्या घराला शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डांबर फ़ासले. तर त्यालाही मोठाच हल्ला मानले गेले होते व आक्रोश करण्यात आला होता. मग रझा अकादमीच्या हल्ल्याबद्दल मौन कशाला? याला पक्षपात म्हणत नाहीत, याला भंपकपणा व थोतांड म्हणतात. यालाच बुवाबाजी म्हणतात. बुवा जसे काही मोजक्या भक्तांना व्यक्तीगत दर्शन देतात, त्यांच्यावर खास अनुग्रह करतात आणि बाकीच्या भक्तांना गर्दी म्हणुन तुच्छ वागणुक दिली जात असते. आजची माध्यमे व पत्रकारिता तशीच झालेली नाही काय? काही पक्ष किंवा नेते यांना प्रसिद्धी मुद्दाम द्यायची आणि इतरांना मुद्दाम अपायकारक प्रसिद्धी द्यायची, असे चालत नाही काय? जो लाखो करोडो रुपये दानदक्षीणा देईल, त्याच्यावर विशेष कृपा आणि ज्यांच्याकडे तेवढी दक्षीणा देण्याची कुवत नाही त्यांच्यावर अवकृपा, असा प्रकार सर्रास चालत नाही काय? अगदी सामान्य माणसाच्या व वाचकाच्या नजरेत येण्याइतपत आता ही पत्रकारितेची बुवाबाजी उघडी पडू लागली आहे. आणि ती उघडी पडत असली तरी हे भंपक लोक तेवढ्याच बेशरमपणे आपापले मठ चालवितच आहेत.

  लोकमत नावाच्या दैनिकाने मागल्या विधानसभा निवडणूकीत अशोकपर्व, विकासपर्व अशा पुरवण्य़ा छापल्या आणि त्याचे पैसे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडुन घेतले असा एक खटला चालू आहे. जाहिरातीच बातम्या किंवा लेख म्हणुन छापून मतदार वाचकांची दिशाभूल केली जाते. त्याकडे निवड्णूक आयोगाचे लक्ष वेधण्यात आल्यावर कारवाई सुरू झालेली आहे. पण त्याबद्दलचे अवाक्षर आयबीएन लोकमत वाहिनीवर कधी आले काय? दुसर्‍या कोणी पॅन्ट घातली आहे तर त्या पॅन्टच्या आत कुठले अंतर्वस्त्र आहे, त्याला किती भोके किंवा चुण्या पडल्या आहेत, ते भिंग घेऊन आपण तपासतो असा आव आणणार्‍या त्या वाहिनीच्या संपादक निखिल वागळे यांनी कधी त्या पेडन्युज प्रकरणी चर्चा का केलेली नाही? ‘उत्तर द्या’ म्हणून इतरांच्या अंगावर भुंकणार्‍यांनी कधीतरी आपल्या मालकांच्या पायाला निदान दात तरी लावावेत ना? मालकाचे पाय चाटायचे आणि इतरांवर भूंकायचे याला इमान दारी बांधलेली पत्रकारिता म्हणतात. आणि त्यातूनच पत्रकारितेची बुवाबाजी सुरू होत असते. मंत्रालयात राजेंद्र दर्डा यांच्या स्वीय सहाय्यकाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्यावर त्याची बातमी वागळे देत नाहीत, पण सुनिल तटकरे किंवा छगन भुजबळ यांच्या संडासात काय पडते, त्याचा वास हुंगून घ्यायला खास वार्ताहर पाठवतात, त्याला बुवाबाजी नाही तर काय म्हणायचे? त्याच वाहिनीवर येणारे प्रकाश बाळ, हेमंत देसाई असे जाणकार नेहमी नरेंद्र मोदींचे वाभाडे काढत असतात. पण वाहिनीचे मालक विजयभाई दर्डा अहमदाबादला जाऊन एकाच व्यासपीठावरून त्याच मोदींना राष्ट्रसंत ठरवतात. मात्र माघारी आल्यावर तेच विजयभाई तोच मोदी हा सैतान असल्याचेही सांगून पळवाट काढतात. मग मुद्दा इतकाच की अशा दुतोंडी माणसाला ठाममत वाहिनीसमोर आणायची हिंमत वा्गळे यांच्यात आहे काय? बाकी संघटना पक्षांच्या नेत्यांवर भुंकण्यात पुरूषार्थ व धन्यता मानणार्‍या या जातिवंत पत्रकाराने एकदा तरी आपण ‘चावू’ शकतो हेसुद्धा दाखवावे. पण बुवाबाजी करणार्‍यांना लाजलज्जा नसते.

   इतक्या तक्रारी व पर्दाफ़ाश झाले म्हणून निर्मल बाबांनी आपले दुकान बंद केले आहे काय? लोक काय म्हणतात त्याची बुवाबाजी करणार्‍यांना कधीच फ़िकीर नसते. चार संगणक अडसूळच्या पाठिराख्यांनी फ़ोडले म्हणुन ‘तोडफ़ोड संस्कृतीचे पाईक’ असा पांडित्यपुर्ण अग्रलेख लिहिणार्‍या महाराष्ट्र टाईम्सच्या संपादकांना रझा अकादमीच्या हिंसाचारानंतरही त्यातली विधायक विकासाची संस्कृती अभिमानास्पद वाटली आहे. म्हणुनच त्यांनी आझाद मैदानच्या धिंगाण्याबद्दल बोलायचे टाळले आहे. हा दुटप्पीपणा नाही काय? सर्वत्र हेच चाललेले दिसेल. आजची पत्रकारिता अशाच बुवाबाजी करणार्‍यांनी ओलिस ठेवली आहे. वृत्तपत्रे व माध्यमे ही जाहीरातीसाठीचे प्लॅटफ़ॉर्म बनले आहेत. फ़रक इतकाच आहे, की तिथे निदान रस्ते, वाहन किंवा रेल्वे अशाही अन्य सुविधा उपलब्ध आहेत. जाहिरातीचे फ़लक झळकवायचे म्हणुन प्लॅटफ़ॉर्म उभे केलेले नाहीत. वृत्तपत्रे व माध्यमे मात्र आता जाहीरातीसाठीच चालविली जातात, हे लपून राहिलेले नाही. त्यातला अविष्कार स्वातंत्र्याचा आवेश व लढा किंवा लोकप्रबोधनाचा आव; निव्वळ ढोंगबाजी झालेली आहे. मालकाने डोळे वटारताच लोळण घेणारी बुद्धीमत्ता ही आजची संपादकीय पात्रता झालेली आहे. पण मुळात बुवाबाजीप्रमाणे अलौकिक शक्ती अंगी असल्याचा दावा करून लोकांची फ़सगत करणे; हा पत्रकारितेचा मुख्य धंदा बनला आहे. कारण आता त्या पेशामध्ये ध्येयवाद संपला आहे व सच्चाई लयास गेली आहे. व्यवसायनिष्ठा दोष बनला आहे. त्यामुळे मग पत्राकारीतेवर हल्लेही होऊ लागले आहेत. उदात व नैतिक शक्ती हेच पत्रकारितेचे खरे बळ असते. ते गमावले मग उरते ती शुद्ध बुवाबाजी. तिला कायदा संरक्षण देऊ शकतो; पण लोकांच्या प्रक्षोभातून तिची सुटका होत नसते. त्यामुळे पत्रकारीता ही आता नुसतीच बुवाबाजीसुद्धा राहिलेली नाही ती सुपारीबाजही झाली आहे. हा माझाच व्यक्तीगत आरोप नाही. लढवय्याचा मुखवटा लावून रोज मिरवणार्‍या इमान दारी बांधलेल्या झुंजार संपादक निखिल वागळे यांच्या ‘मालकाचा’ तो अनुभवी दावा आहे. गुजरातमध्ये जाऊन मोदी स्तुतीस्तवन म्हणुन परतल्यावर, लोकमत समुहाचे अध्यक्ष विजयभाई दर्डा यांना झालेला तो महान साक्षात्कार आहे. त्यांनीच त्याचे निरुपण १० ऑगस्ट २०१२ च्या ‘लोकमत’ अंकात एक खास लेख लिहून केलेले आहे. अजून निखिलने ते वाचलेलेही नसावे बहुतेक. "मोदी, माध्यमे आणि मी.." शिर्षकाच्या त्या लेखात विजय दर्डा लिहितात,

   ‘गेली अनेक वर्षे मी सक्रिय राजकारणात व प्रभावी वृत्तकारणात आघाडीवर राहिलेला कार्यकर्ता आहे. संसदेच्या कामकाजाची १४ तर वृत्तपत्रीय नेतृत्वाची ४0 वर्षे माझ्या उपलब्धीत जमा आहेत. यातल्या प्रत्येकच क्षेत्रातील अनवधानाने घडलेल्या लहानशाही चुकीसाठी, मग ती प्रामाणिक का असेना, फारशी दयामाया कोणी दाखवीत नाही आणि तिचा जेवढा म्हणून राजकीय वापर करता येईल तेवढा केल्यावाचून कोणी थांबत नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. आपल्या भक्ष्यावर क्रूरपणे तुटून पडणे हा राजकारण आणि वृत्तकारण या दोहोंचाही आताचा व्यवसायधर्म आहे.’

   भक्ष्यावर तुटून पडणे कोण करतो? ही कोणाची प्रवृत्ती असते? एकीकडे श्वापदांची व गिधाडांची किंवा दुसरीकडे भोंदूभगत वा भामट्यांचीच ना? मग मी करतो ते आरोप आहेत, की एका त्यात व्यवसाय करणार्‍याचे ते अनुभवी बोल आहेत? फ़रक थोडाच आहे. मी अशा प्रकारे कधीच पत्रकारिता केली नाही. तो एक पेशा आहे समजून त्यात मिळणार्‍या कमाईची कधीच पर्वा केली नाही, पण समाधान व वाचकांची विश्वासार्हता मिळवण्यात धन्यता मानली. विजयभाई यांनी जे आजवर केले त्याचे चटके त्यांनाच बसेपर्यंत त्यांना त्यातले दु:ख ठाऊक नव्हते. कारण त्यांनीही त्यालाच व्यवसाय धर्म समजून तेच केले व आपल्या संस्थेतून चालविले. माझे तसे नाही. मी पत्रकरितेला लोकशिक्षणाचे व्रत समजून चार दशकाहून अधिक काळ कार्यरत आहे. त्यातून पोटापुरते मिळाले तरी खुश राहिलो. पण कुठली बुवाबाजी करण्याचा मोह मला झाला नाही. कदाचित मी ज्याला पत्रकारिता समजून जगलो व तीचा पाठपुरावा आजपर्यंत हट्टाने करतो आहे, ती पत्रकारिता आज कालबाह्य झाली आहे. त्यातली उदात्तता, व्रत व पेशा संपला आहे. तो पैसे फ़ेकणार्‍या समोर नाचण्याचा धंदा झाला आहे. पण त्यातही सोवळेपणाचा मुखवटा सोडायचा नाही, म्हणुन आजचे पत्रकार त्याची बुवाबाजी बनवत असतील. खर्‍या बुवाबाजीपेक्षा ही साळसुद बौद्धिक बुवाबाजी समाजाला अधिक घातक आहे. कारण सामान्य बुवाबाजीत एखादा भक्त वा त्यांचा गटच फ़सत असतो. पत्रकारितेच्या बुवाबाजीत अवघा समाजच भरकटत जाऊन अखेर रसातळाला जाण्याचा धोका असतो

पूर्वप्रसिद्धी   ‘रोखठोक’  दिवाळी अंक २०१२

Monday, November 26, 2012

एक साधासरळ माणूस: बाळासाहेब

माझी पत्नी स्वाती हिच्या पुस्तकाचे प्रकाशन बाळासाहेबांच्या हस्ते मातोश्रीवरच २००६ मध्ये झाले होते. ‘इस्लामिक दहशतवाद: जागतिक आणि भारतीय’ हे पुस्तक तिने त्यांनाच अर्पण केले आहे. 





   १९८६ सालची गोष्ट आहे. मी तेव्हा ‘मार्मिक’ साप्ताहिकाचा कार्यकारी संपादक होतो आणि तेच शिवसेनेचे मुखपत्र होते. तेव्हा ‘सामना’ सुरू झाला नव्हता. त्या वर्षाच्या उत्तरार्धामध्ये माझ्या धाकट्या भावाचे लग्न होते. शिवसेनाभवनातच ‘मार्मिक’चे कार्यालय होते. आठवड्यात दोन दिवस तिथे प्रमोद नवलकर यायचे. त्या दिवशी संध्याकाळी मी त्यांना भावाच्या लग्नाची पत्रिका दिली. त्यांनी लगेच विचारले, ‘साहेबांबा दिली का?’ मी नकारार्थी मान हलवली. तर नवलकरांनी मातोश्रीवर पत्रिका गेलीच पाहिजे म्हणून आग्रह केला. मग काम आटोपल्यावर रात्री आठच्या सुमारास बाळासाहेबांना मी पत्रिका द्यायला गेलो. त्यांनी पत्रिका घेतली आणि विचारले शिरीला दिली का? शिरी म्हणजे राज ठाकरेंचे पिता श्रीकांत ठाकरे. बाळासाहेबांचे धाकटे बंधू आणि ‘मार्मिकचे भागिदार व प्रकाशक. झाले, माझी पंचाईत झाली. खरे तर मी नवलकरांच्या आग्रहाखातर उपचार म्हणुन साहेबांना पत्रिका द्यायला गेलो होतो. ते कशाला येतील लग्नाला, अशी आझी समजूत होती. पण त्यांनी नुसता शिरीला पत्रिका देण्याचाच विषय काढला नाही तर लग्नाला नक्की येतो; असे सांगून मला धक्का दिला. मग काय मला वांद्रा येथून उलट दादरला यावे लागले. तिथे जुन्या जागेत श्रीकांत ठाकरेंचे वास्तव्य होते. नऊ वाजून गेले होते, त्यामुळे मला बघून ते वैतागले. इतक्या रात्री काय, हा प्रश्न त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होता. तर ऑफ़िस उरकून आलो अशी त्यांना थाप मारत त्यांना पत्रिका दिली. दुसर्‍या दिवशी मी संपुर्ण दिवस लग्नात हजर होतो. माझ्या घरच्या वा अन्य कुठल्याही विवाहाला मी कधीच इतका वेळ खर्ची घातला नाही. साहेब येणार म्हणून मला थांबावेच लागले होते.

   मला असले सोहळे अजिबात आवडत नाहीत. म्हणूनच कितीही जवळचे लग्न असेल, तरी मी चेहरा दाखवण्यापुरती हजेरी लावतो. हा एकमेव अपवाद होता. दिवस मावळला आणि समारंभ आवरत असताना स्वारी हजर झाली. मीनाताई, श्रीकांतजी व कुंदाताई असे एकत्र आले आणि हॉलमध्ये गडबड उडाली. भावाचे अनेक मित्र केवळ त्यासाठीच थांबुन होते. त्यांनी वधूवरांना आशीर्वाद दिलाच; पण मी आईची ओळख करून दिल्यावर मीनाताईंसह त्यांनीच माझ्या वृद्ध आईसमोर वाकून अशीर्वाद घेतला. हे सर्वच विचित्र होते. व्हिडीओ टेप चालू होती. मग त्यांनी बाजूला घेऊन माझ्याशी कानगोष्ट केली. ती ऐकून कोणालाही हसू आल्याशिवाय रहाणार नाही. मी नेहमी भावंडांच्या लग्नपत्रिका विचित्र पद्धतीने बनवल्या होत्या. या धाकट्या भावाची आमंत्रण पत्रिका आंतरदेशीय निळ्या पत्रावर मालवणी भाषेत छापून पोस्टाने पाठवून दिली होती. पत्रिका सहसा वाचल्या जात नाहीत म्हणून मी असा काहीतरी उद्योग करायचो. त्या लग्न समारंभात बाजूला घेऊन साहेबांनी माझ्याकडे तीच पत्रिका मागितली होती. कारण त्यांना दिलेली पत्रिका नेहमीसारखी इंग्रजी पद्धतीची होती. पण अशीही पत्रिका असल्याचे कोणीतरी त्यांच्या कानावर घातले होते. आणि त्याविषयीची उत्सुकता त्यांनी अजिबात लपवली नाही. तिथे समारंभातच त्यांनी मला उद्या ती मालवणी पत्रिका मातोश्रीवर आणून दे; म्हणून फ़र्मावले. ते गेल्यावर प्रत्येकजण मला खाजगीत काय बोलले, त्याबद्दल विचारत होता.

   असा हा माणुस होता. ज्याला अर्धशतकभर लोक हुकूमशहा, ठोकशहा किंवा एकाधिकारशाही राबवणारा किंवा कायदा वगैरे झुगारणारा; म्हणून आरोप करीत होते. मी ‘मार्मिक’चा कार्यकारी संपादक होण्यापुर्वी माझेही असेच काहीसे मत होते. जेव्हा ती जबाबदारी घेण्याची बोलणी झाली; तेव्हा थेट भेटीत मी त्यांना म्हणालो, ‘मी शिवसैनिक नाही आणि तुमच्या राजकीय भूमिका मला मान्य नाहीत. तेव्हा साप्ताहिकाचा अंक काढण्याची जबाबदारी घेतो, पण तुमच्या राजकीय भूमिका मांडण्याचे काय?’ फ़ोटोत हसताना दिसतात, तसेच हसून ते उत्तरले, ‘हरकत नाही. शिवसेनेच्या भूमिकेच राहूदे. तुझी जी काही भूमिका आहे तीच मांडत जा. शिवसेनेला तुझी भूमिका मान्य आहे.’ मी त्यांच्याकडे बघतच राहिलो. तर पुन्हा मिश्कील हसत म्हणाले, ‘आता मला जरा तुझी काय भूमिका आहे ते सांगशील का? जिथे अन्याय दिसेल तिथे ठोकायचे, ही भूमिका तर तुला मान्य आहे ना? तुला कार्यकारी संपादक करतोय; तेव्हा संपादकाचे काम तू करायचे. त्यात कोणाची ढवळाढवळ सहन करू नको; अगदी माझीसुद्धा.’

   १९८५ सालात शिवसेनेने मुंबई महापालिकेत बहूमताने आपली सत्ता पहिल्यांदाच प्रस्थापित केली आणि त्या वर्षीचा ‘मार्मिक’चा वाढदिवस अंक काढून त्याचे प्रकाशन थांबवण्यात आले होते. नव्या स्वरूपात त्याचे प्रकाशन सुरू करायचे चालले होते. त्यात पंढरीनाथ सावंत याने माझी व नवलकारांची भेट घडवून आणली. त्यांनीच बाळासाहेबांकडे नेले. त्यानंतर तिसर्‍या भेटीत आम्ही बोलत असतानाचा वरील संवाद आहे. ज्या माणसाला पुरेसा ओळखत नाही, किंवा ज्याचे काही मोजके लेख वाचले आहेत आणि ज्याने शिवसेनेच्या राजकारणावर बोचरी टिका केली आहे, त्याच्यावरच पक्षाच्या मुखपत्राच्या संपादनाची जबाबदारी टाकताना हा माणूस इतका विश्वास कसा दाखवू शकतो; याचे रहस्य मला तेव्हा उलगडले नव्हते. पण जसजसा कामाच्या निमित्ताने संपर्क वाढत गेला व सहवास वाढला; तेव्हा त्याचा उलगडा होत गेला. आम्ही नव्या स्वरुपातल्या ‘मार्मिक’चे दोन अंक काढल्यानंतरची गोष्ट आहे. आढावा घ्यायला त्यांच्यासोबत बैठक झाली होती. तेव्हा मी त्यांच्या व्यंगचित्राचा विषय काढला. त्यांनी ठामपणे व्यंगचित्र होणार नाही, असे सांगून टाकले. आपण सवड नसल्याने व्यंगचित्र काढायचे बंद केले आहे, तेव्हा त्याचा आग्रह नको; असे म्हणत त्यांनी पडदा टाकायचा प्रयत्न केला. पण मी हटून बसलो. संपादक मी असेन तर मला उपलब्ध असलेला जगातला एक यशस्वी व्यंगचित्रकार मी हातचा कशाला सोडू; असा सवाल मी त्यांना केला आणि थक्क झाल्यासारखे बाळासाहेब माझ्याकडे बघत राहिले. क्षणभर मला निरखून माझ्याकडे पाहिल्यावर ते म्हणाले, ‘कोणाशी बोलतोयस? मी शिवसेनाप्रमुख आहे.’ मीही म्हणालो,‘इथे शिवसेनेची बैठक नाही, ‘मार्मिक’च्या मालक, संपादक मंडळाची बैठक आहे’.

   हा माणुस जागेवरून उठला आणि आम्ही सगळेच उठलो. पण ते बैठक संपवायला उठले नव्हते. माझ्याजवळ आले आणि पाठ थोपटून म्हणाले, ‘शाब्बास, मला असाच संपादक हवा होता. आता कळले शिवसेना किंवा शिवसैनिकाची भूमिका कशी असते?’ मग त्यांनी माझ्या मागणीचा विचार करून तोडगा काढला. श्रीकांत ठाकरे स्वत: उत्तम व्यंगचित्रकार होतेच. साहेबांनी त्यांच्याशी लगेच फ़ोनवरून बोलणे केले आणि तिसर्‍या अंकापासून नवा ‘मामिक’ व्यंगचित्राच्या मुखपृष्ठासह प्रसिद्ध होऊ लागला. त्यात बाळासाहेबांची कल्पना ते कच्ची रेखाटून द्यायचे, त्याचे चित्रण व रंगकाम श्रीकांतजी पार पाडायचे. मग पुढे तर मी त्यांच्याकडून कव्हरस्टोरी नुसार मुखपृष्ठाच्या व्यंगचित्राचा हट्ट पुर्ण करून घेतला. त्याच वर्षीच्या ३१ आक्टोबरला इंदिराजींच्या हत्याकांडाला एक पहिले वर्ष पुर्ण व्हायचे होते. त्या अंकात ‘इंदिराजी, तुम्हालाही न्याय नाही’ अशा शिर्षकाचा लेख मी लिहिला होता आणि साहेबांनी अगतिक इंदिराही तराजू घेतलेल्या न्यायदेवतेसमोर बसलेल्या; असे व्यंगचित्र काढून दिलेले अजून डोळ्यासमोर आहे. पुढे काही महिन्यांनी शरद जोशी त्यांना भेटून गेले आणि नंतर त्यांनी सेनेवर टिकास्त्र सोडले. डॉ. दत्ता सामंत यांच्याशी जोशींच्या शेतकरी संघटनेने हातमिळवणी केली. त्यावर मला टिका करायची होती. पण सेनेने जोशींबद्दल मौन पाळण्याचे धोरण स्विकारले होते. मला ते पटले नाही. मी साहेबांशी बोललो, तर त्यांनी माझ्याशी सहमत नसतानाही लिहायचे स्वातंत्र्य दिले. पण लेख प्रसिद्ध झाला, तेव्हा दिलखुलास अभिनंदन सुद्धा केले. त्याच दिवशी शिवाजी पार्कवर सामंत जोशींची सभा होती. तिथे शेतकर्‍यांचे स्वागत करायला महापौर म्हणून भुजबळ पोहोचले, तर उपस्थितांनी त्यांची हुर्यो उडवली होती. तोच तो दिवस होता. पण सेनानेत्यांची नाराजी पत्करून बाळासाहेब माझ्यामागे ठामपणे उभे राहिले होते.

   अगदी अलिकडे त्यांची गाठ पडली होती, ती माझ्या पत्नीच्या, स्वातीच्या पुस्तकाचे मातोश्रीमध्येच प्रकाशन झाले तेव्हा. ‘इस्लामिक दहशतवाद; जागतिक आणि भारतीय’ असे त्या पुस्तकाचे नाव. तेव्हा आम्ही सगळे कुटुंबिय तिथे हजर होतो. पहिल्यांदाच माझ्या घरचे त्यांना जवळून भेटत होते व व्यक्तीगत बोलत होते. पण कित्येक वर्षापासूनची ओळख असल्याप्रमाणे सहज गप्पा मारणारा हा माणूस घरच्यांना थक्क करून गेला होता. राज शिवसेना सोडुन गेल्यानंतरची ही गोष्ट आहे. पहिल्यांदाच मला त्यांच्या आवाजातली जरब व आकांक्षा हरवली असे वाटले. जे सभोवती घडते आहे, त्यापासून त्यांनी स्वत:ला अलिप्त करून घेतले असावे; असेच मला त्या पावणेदोन तासाच्या गप्पातून वाटले. पुढे तर त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली. मग भेट होऊच शकली नाही. पण आयुष्याला व अनुभवाला श्रीमंत करून गेलेला माणूस, इतकेच माझ्या गाठीशी राहिलेले बाळासाहेब आहेत.

  ‘मार्मिक’च्या निमित्ताने त्यांना जवळून बघता आले व त्यांच्याशी वादविवाद सुद्धा झाले. त्यामुळेच मला वाटते हा माणूस सामान्य जनतेला जेवढा सहजपणे कळू शकला; तेवढा विचारपुर्वक त्याच्याकडे बघणार्‍यांना कधीच कळला नाही. दुरून डोंगर साजरे म्हणतात, त्याच्या नेमकी उलट परिस्थिती इथे होती. त्यांचा आणखी एक किस्सा डॉ. य. दि. फ़डके यांनी सांगितलेला आठवतो. युती सरकारच्या काळात प्रबोधनकारांच्या समग्र साहित्याने संकलन प्रकाशन करायची योजना राबवली गेली. त्यात फ़डके यांचा पुढाकार होता. त्याच्या प्रकाशनाच्या वेळीच फ़डक्यांच्या मातोश्रींचे निधन झाले होते. त्यामुळे त्यांनी समारंभाला हजर राहू; पण फ़ुले हार वगिरे घेणार नाही, असे नवलकरांना आधीच सागितले होते. प्रत्यक्ष समारंभात प्रबोधनकारांच्या प्रतिमेला हार घालण्यापलिकडे कोणालाच फ़ुले हार देण्यात आले नाहीत, म्हणून मग फ़डक्यांनी चौकशी केली. तर तशी बाळसाहेबांची आज्ञा होती, असे नवलकरांनी त्यांना सांगितले. हा किस्सा सांगुन फ़डके मला म्हणाले, ‘यापेक्षा माणसाच्या सभ्यतेचा कुठला पुरावा द्यायला हवा?’ पण हा बाळासाहेब ठाकरे माध्यमांनी लोकांसमोर कधीच आणला नाही. शक्यतो त्यांची उर्मट, उद्धट, अतिरेकी, अरेरावीची प्रतिमा रंगवण्यात माध्यमांनी धन्यता मानली. त्यामुळेच खरा त्यांचा चेहरा लोकांच्या मनात ठसला होता, त्याचे दर्शन देशभरच्या माध्यमांना गेल्या रविवारच्या गर्दींमुळे झाले आणि सर्वांना थक्क व्हायची पाळी आली. जर हा माणूस हिटलर, हुकूमशहा होता आणि हिंसेचा व द्वेषाचा पुरस्कार करणारा होता, तर त्याच्यासाठी इतकी गर्दी लोटली कशाला, हे म्हणूनच अनेकांना कोडे वाटले. पण ज्यांनी कुठलाही चष्मा न लावता व पुर्वग्रह न ठेवता त्या माणसाला बघितले, अनुभवले, ऐकले वा समजून घेतले; त्यांना त्याचा साधेपणा जसा भावला तसाच त्याची महत्ताही उमगली होती. आपल्या एका आदेशाने मुंबई कधीही बंद करू शकणारा हा माणूस इहलोक सोडून गेला, तर त्याचा आदेश नसतानाही शेकडो पटीने अधिक लोक त्याला निरोप द्यायला जमले, लोटले. सामान्य माणसातून असमान्य होताना आपले सामान्यपण न सोडणार्‍या माणसाला त्याच्या अलौकिक असण्याची सामान्य जनतेने दिलेली ती पावती होती. ज्या कायदा व प्रशासनाला त्याच्या जिवंतपणी अपवाद करावे लागले; त्याच्या निधनानंतरही अंत्यविधीसाठी अपवाद करावाच लागला.

   कित्येक वर्षे व कित्येक पिढ्या ज्याच्या आख्यायिका व दंतकथा सांगितल्या जातील; असा एक अजब माणूस होता, ज्याचे नाव बाळासाहेब ठाकरे. कारण त्यांना व्यक्तीगत भेटलेले व त्यांच्या सहवासाची संधी मिळालेले जेवढ्या भल्याबुर्‍या गोष्टी त्यांच्याबद्दल सांगतील, तेवढ्यच नव्हेतर त्यापेक्षा अधिक गोष्टी त्यांना न भेटलेले लोक त्यांच्याबद्दल सांगतील व सांगत रहातील. कारण ही कधीही न संपणारी गोष्ट आहे. एक सहजपणे जीवन जगलेला व सहजपणे कुठल्याही परिस्थितीला सामोरा जाणारा, साधासरळ माणूस होता बाळासाहेब. आणि राजकीय अभ्यासक वा विश्लेषक म्हणुन विचाराल; तर ज्याला आपली अफ़ाट राजकीय तकद कळली सुद्धा नाही म्हणुन ज्याने तिचा पुरेपुर वापर केला नाही असा एक अनैच्छिक राजकारणी; असे मी या मनस्वी माणसाचे वर्णन करीन. ज्याने करोडो लोकांच्या मनात स्वत:विषयी चांगुलपणा जोपासण्यात आयुष्य वेचले व राजकारण शोधले, असा अलौकीक मानव.

Saturday, November 24, 2012

भगत सिंग आपल्यातलाच एक होता



आपल्या समाजात इतका भक्कम पाया प्रस्थापित करणार्‍या तालिबान व अन्य अतिरेकी संघटनांशी दोन हात कसे करायचे, यावर आपल्या देशात (पकिस्तानात) खुपच चर्चा व विचार चालू आहे. अर्थात ते योग्य व समर्थनियच आहे. तालिबानांनी आणलेली दहशत आणि माजवलेला थरार यांनी आपला देश कदाचीत कायमचा बदलून गेला आहे, प्रामुख्याने फ़ाटा प्रदेशातील लोकांचे जीवन तर ओळखण्यापलिकडे बदलले आहे. कधी संधी मिळालीच तर तिथले लोक सत्य बोलण्याची हिंमत करतात व सांगतात, कित्येक वर्षे त्यांना अविश्वसनीय इतक्या क्रौर्याचा अनुभव घ्यावा लागला आहे. त्यातून सुटका व्हावी अशी त्यांनी मागणी राहिली आहे, पण कोणी त्यांच्याकडे लक्षच दिलेले नाही.

खरे सांगायचे तर आपल्याला असलेले धोके व दहशत तालिबानांच्या पलिकडचे आहेत. आणि ही बाब अशी आहे, की आपल्याला त्याकडेच अधिक लक्ष देण्याची करज आहे. लोकांच्या मनाचा कब्जा ज्या अतिरेकाने घेतला आहे तो कदाचित खुद्द दहशतवाद्यांपेक्षा अधिक भयंकर धोका आहे. आणि अशी मानसिकता सर्वत्र आढळून येते आहे. चारही प्रांतांच्या मोठ्या महानगरात, आणि छोट्या शहरात व गावागावात ते जाणवते. प्लेगच्या साथीप्रमाणे तो धोका सर्वत्र वेगाने पसरतो आहे.

ती समस्या नुकतीच लाहोरमधल्या शदमान फ़वारा चौकाच्या नामांतर वादातून पुन्हा समोर आली आहे. मार्क्सवादी बुद्धीमंत, क्रांतीकारक व अत्यंत धाडसी स्वातंत्र्यवीर शहिद भगतसिंग यांचे नाव त्या चौकाला देण्यातून हा वाद उफ़ाळून आलेला आहे. तो शहिद कोण? ज्याला ब्रिटीश सत्तेच्या काळात १९३१ साली याच शदमान चौकात वयाच्या तेविसाव्या वर्षी फ़ाशी दिलेली होती.

याच वर्षीच्या १४ नोव्हेंबर रोजी दिलकश लाहोर समितीने भगत सिंगाच्या स्वातंत्र्यलढ्यातील कार्याचा बहूमान करण्यासाठी या शदमान चौकाला त्याचे नाव देऊन नामांतराला मान्यता दिली होती. या समितीमध्ये प्रशासक, लेखक, आर्किटेक्ट, कलावंतांचा समावेश आहे. लाहोर या ऐतिहासिक महानगराचे सुशोभीकरण व तिथे रस्त्यांसह जागांचे नामांतर करण्यासाठी या समितीची नेमणूक झाली आहे.

ही मान्यता मिळाल्याच्या दुसर्‍याच दिवशी लाहोर हायकोर्टाचे न्यायाधीश नासिर सईद शेख यांनी स्थानिक जिल्हा व शहर प्रशासनाला अशा नामांतराचा आदेश जारी करण्यापासून परावॄत्त करणारा आदेश लागू केला. एका अर्जाची सुनावणी करताना न्यायाधीशांनी प्रशासनाकडे काही उत्तरे मागितली आहेत. तहरिके हुरमत ए रसूल संघटनेचे सदस्य व शदमान व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, झहिद बट यांच्या अर्जावर हा आदेश देण्यात आला आहे. चौधरी रहमत अली यांनीच पाकिस्तान हे नाव देशाला दिलेले होते. त्यांच्या स्मरणार्थ त्या चौकाला त्यांचे नाव देण्याचा प्रशासनाचा मनोदय होता. पण शहिद भगतसिंग फ़ाऊंडेशन व काही तथाकथित मानवाधिकार संघटनांच्या पुढाकाराने प्रशासनावर दबाव आणण्यात आला, म्हणूनच हे नाव बदलण्याचा निर्णय झाला, असे बट यांच्या अर्जात म्हटले आहे. भारताचे हित बघणारा गट यामागे असल्याचा हवाला देतांनाच अर्जामध्ये पवित्र कुराण व सुन्नहचे संदर्भ देण्यात आलेले आहेत. पण याच समितीने आधीच रहमत अली यांचे नाव लाहोरमधील एका भुयारी मार्गाला देण्याची शिफ़ारस केलेली आहे.

लाहोरमध्ये भडक ओबडधोबड व गलिच्छ वा वाटावा असाच हा चौक आहे, इतक्या विचित्र पद्धतीने त्याच्या आसपासच्या इमारती व रस्ते रंगलेले आहेत. त्यामुळेच भगतसिंग सारख्या क्रांतीवीराच्या स्मारकासाठी हा विद्रूप चौक हे दुर्दैवच म्हणायला हवे. संपुर्ण उपखंडाच्या स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा झालेल्या या माणसाच्या स्मारकासाठी यापेक्षा अधिक चांगली जागाच हवी. पण वस्तुस्थिती अशी, की त्याच चौकात ब्रिटीशांनी ८० वर्षापुर्वी त्या क्रांतीवीराला फ़ासावर चढवले होते. आणि म्हणूनच तो चौक हीच त्याच्या स्मारकासाठी ऐतिहसिक हक्काची जागा आहे, असा दावा लाहोरच्या नागरिकांचा एक गट गेली अनेक वर्षे करतो आहे. आपण त्या स्वातंत्र्यवीराचे खुप जुने देणे लागतो असे त्या गटाचे म्हणणे आहे. कारण आपला देश (पाकिस्तान) त्याच स्वातंत्र्यलढ्यातून उदयास आला, ज्यात लक्षावधी मुस्लिम, हिंदू, शिखांनी सारखाच भाग घेतला होता.

काही दशकांपासून आपल्या देशाच्या इतिहासाचे इतक्या बेशरमपणे विकृतीकरण करण्यात आले आहे, की फ़ारच थोड्या लोकांना आज वास्तव माहित असेल. १९४७ सालापुर्वी लाहोर शहर व जिल्ह्यात ४० टक्क्याहून अधिक बिगर मुस्लिम म्हणजे प्रामुख्याने हिंदू व शिख वास्तव्य करीत होते. (पाकिस्तानी) पंजाबच्या अन्य जिल्ह्यातही जवळपास तसेच लोकसंख्येचे प्रमाण होते. जोवर सीमेच्या दोन्ही बाजूंना धार्मिक अत्याचार सुरू झाले नव्हते; तोवर ही परिस्थिती होती. ज्या फ़ाळणीमुळे मानवी इतिहासात सर्वात मोठे लोकसंख्येचे स्थलांतर झाले, ज्यामुळे मानवी हत्याकांड व आंधळ्या द्वेषाचा जन्म झाला, त्यापुर्वीची ही गोष्ट आहे.

भगत सिंगाच्या बाबतीत भारतीय गटबाजीचा विषय निघता कामा नये. भगत सिंगाचा जन्म तेव्हाच्या लायलपूर व आजच्या फ़ैसलाबाद जिल्ह्यातील झारनवाला गावात झाला. त्याचे शिक्षण लाहोरमध्ये झाले व त्याने पंजाबच्या अनेक जिल्ह्यात दौरे करून तरुणांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायची प्रेरणा दिली होती. समाजवादाने भारावलेल्या भगतसिंगाने देशाच्या अनेक शहरात जाऊन तरूणांना आपल्या अल्पायुष्यात प्रेरित केले होते. वस्तुस्थिती अशी आहे, की या (पाकिस्तानी) पंजाबच्या सुपुत्राची भारताने चांगली आठवण ठेवली आहे. त्याच्यावर चित्रपट, नाटके निघाली, पुस्तके छापली गेली, ही आपल्यासाठी लज्जास्पद बाब आहे. त्यामुळेच भगतसिंगाच्या स्मारकासाठी कोणी खास प्रयत्न वा लॉबींग करण्याची गरज नव्हती. त्याच्या कर्तृत्वानेच त्याला महान बनवले आहे. पण शोकांतिका अशी आहे, की पाकिस्तानच्या शालेय इतिहासाच्या अभ्यासक्रमातून आम्हीच त्याला पुसून टाकले आहे. जाणिवपुर्वक त्याला विस्मरणाच्या गर्तेत ढकलून दिले आहे.

म्हणूनच आपल्याला ज्याप्रमाणे दहशतवादाशी लढायची गरज आहे; तसेच आपल्याला अज्ञान व धर्मांधतेशी लढावे लागणार आहे. कारण त्यामुळे जो द्वेष व भ्रम निर्माण केला जातो, त्यातूनच अतिरेक व माथेफ़िरूपणा जन्माला येत असतो. शिक्षण क्षेत्रात याची सुरूवात खुपच पुर्वी झाली होती. पण जनरल झिया उल हक यांच्या लष्करी क्रांतीनंतर तिला अधिक वेग आला. आज आपल्याला ती प्रक्रिया उलट्या दिशेने माघारी फ़िरवण्याची गरज आहे. पण त्यासाठी योग्य निर्णय घेतले जात नाहीत. शालेय पाठ्यपुस्तकात अजून तोच चुकीचा विकृत पाढा वाचला जात आहे. वास्तवा पलिकडचे ठरलेले नायक व हिरो मुलांसमोर मांडले जात आहेत. आपला देश यापासून वाचवायचा असेल तर ताबडतोबीने दुरुस्त्या करण्याची गरज आहे. एका महान देशभक्त क्रांतीवीर व्यक्तीच्या नामकरणा सारख्या साध्या विषयात विरोध करून वाद निर्माण करण्याची जी मुभा मिळत आहे, त्यातून आपण कोणत्या धोक्याच्या सावटखाली जगत आहोत त्याची साक्ष मिळते. आणि अशी अनेक उदाहरणे आहेत.

लोकांची मानसिकता बदलणे अत्यंत गुंतागुंतीचे अवघड काम असते. अगदी बंदूकधारी दहशतवाद्यांच्या मागे जाण्यापेक्षाही लोकांची मनोवृत्ती बदलणे अवघड काम आहे. ह्या दोन्ही गोष्टी परस्परांशी जोडलेल्या आहेत, हे आपण विसरता कामा नयेत. कारण त्या दोन्हीचा उपाय वेगवेगळ्या मार्गाने होऊ शकत नाही. त्याकडे आपण एकच मोठी समस्या म्हणून बघावे लागेल. दहशतवादाने आपल्या आयुष्यात केवळ हिंसाच आणलेली नाही, तर त्याने आपल्या मेंदूची फ़ेररचनाही केली आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. ज्या मेंदूने आपल्याला अशा विचारांमध्ये गुंतवले आहे, की भूतकाळतून बाहेर पडण्यापासून ते विचार आपल्याला परावृत्त व भयभीत करतात.

अशा विचारातून एक संदेश सर्वत्र पोहोचवला जात असतो, जो मलाला युसूफ़जाईच्या विरोधात बदनामीच्या मोहिमा चालवतो. मलाला ऐवजी डॉ. अफ़िया सिद्दिकीच्या नावाने दिवस साजरा करायचा प्रचार होतो. तोच विचार तुम्हाला सतत भारताकडे शत्रू म्हणून बघायला प्रवृत्त करत असतो आणि दुसरीकडे पाकिस्तानातले अल्पसंख्यांक व महिलांच्या सशक्तीकरणाकडे डोळेझाक करायला भाग पाडत असतो. कुठल्यातरी मार्गाने हे चित्र बदलले पाहिजे, ज्यामुळे लोक आपल्या भूतकाळाविषयी सत्य जाणतील, शिकतील आणि त्यायोगे आपल्याला वर्तमान काळात काय करणे अगत्याचे आहे, याचा (पाकिस्तान्यांना) त्यांना बोध होऊ शकेल

कोमिला हयात ( लेखिका पाकिस्तानातील एक ज्येष्ठ पत्रकार व एका प्रनुख दैनिकाच्या माजी संपादिका आहेत. त्या ‘द न्यूज’ दैनिकात व अन्यत्र नेहमी वैचारिक लिखाण करीत असतात. हे त्यांच्या मूळ लेखाचे स्वैर रुपांतर आहे. शक्य असेल त्यांनी मूल इंग्रजी लेख मुद्दाम वाचावा.)
=====================.
http://www.thenews.com.pk/Todays-News-9-144392-Bhagat-Singh-was-one-of-us

Tuesday, October 9, 2012

ब्राह्मणवाद किंवा ब्राह्मणी तर्कशास्त्र


(आजकाल सेक्युलॅरिझम वा पुरोगामी म्हणून मिरवणारे आधुनिक ब्राह्मण झालेत. म्हणूनच ही कथा जन्माधिष्ठीत ब्राह्मणांविषयीची वाटत असली तरी ती आजच्या संदर्भात घ्यावी. आजकाल गळ्यात सेक्युलर जानवे घातले की तुम्ही पुरोगामी ब्राह्मण म्हणून हेच तर्कशास्त्र राबवायला मोकळे असता)

   तशी ही गोष्ट नवी नाही. मी कधीतरी पुर्वी ऐकलेली आहे. आणि अनेकदा माझ्या लिखाणातून सांगितलेली सुद्धा आहे. एका गावामध्ये मुले मोकळ्या माळावर खेळत होती. त्यातली मस्तवाल होती त्यांचा आडदांडपणा चालू होता तर बिचारी शांत मुले आपल्या कुवतीप्रमाणे साधेच काही खेळत होती. इतक्यात कुठून तरी एक बारकेसे मांजर तिकडे पोरांच्या घोळक्यात आले. पोरांच्या धावपळीत फ़सले आणि त्याला निसटावे कसे तेच कळेना. तेव्हा गोंधळलेल्या मुलांप्रमाणेच मांजराचीही तारांबळ उडाली. मग त्यातल्या एका मस्तीखोर मुलाला कुरापत सुचली. त्याने आपल्यासारख्याच इतर आडदांड मुलांना एक कल्पना सांगितली. गोल फ़ेर धरून उभे रहा आणि नेम धरून त्या मांजरावर दगड मारायचा. बघू कोणाचा नेम सरस आहे ते. सर्वांनाच त्यात मौज वाटली आणि सगळे फ़ेर धरून मांजरावर दगडधोंड्यांचा वर्षाव करू लागले. बिचारे ते इवले मांजर त्या मुलांच्या तावडीतून सुटायला सैरावैरा पळू लागले. पण पळणार तरी किती आणि कुठे? ज्या दिशेने पळायचे, त्या बाजूच्या पोराने जवळून मारलेला दगड त्याला अधिक जोरात दुखापत करत होता. जेवढी त्या मांजराची तारांबळ उडत होती, तेवढा या पोरांना जोश चढत होता. शेवटी अशी वेळ आली, की धावण्याचे पळण्याचे त्राण अंगी उरले नाही आणि मांजर एकाच जागी थबकून केविलवाणे इकडेतिकडे बघू लागले. इतक्यात त्याच्या दिशेने आलेला दगड त्याच्या असा वर्मी बसला, की तिथेच कोसळून ते मांजर गतप्राण झाले. मग अकस्मात दगडफ़ेक थांबली. आणि भोवताली जमलेल्या घोळक्यात एकदम शांतता पसरली.

   मांजर सैरावैरा पळत असताना त्याच्यावर दगड मारणार्‍यांप्रमाणेच बाकीची मुलेही जल्लोश करतच होती. पण मांजर मेल्यावर सर्वांची पाचावर धारण बसली. काहीतरी गडबड झाली आहे, याची जाणिव एकूणच त्या वानरसेनेला झाली होती. त्यामुळेच एकामेकाकडे शंकास्पद नजरेने बघत प्रत्येकाने पाय काढता घेतला. पोरे आपापल्या घरी पळाली. आपापल्या घरात जाऊन गुपचुप बसली. हू नाही की चू नाही. अशा सुट्टीच्या दिवशी आणि सूर्य अजून मावळला नसताना मुले घरोघरी परतली आणि निमुट बसली म्हटल्यावर पालकांनाही शंका आली. घरोघर मुलांकडे विचारणा झाली, तेव्हा खेळाच्या नादात मांजर मारले गेल्याचे उघडकीस आले. दुपार उलटून संध्याकाळ होत असताना, ती बातमी गावभर पसरली आणि गावकरी एकमेकांशी पोरांच्या मस्तीबद्दल बोलत हसू लागले होते. पण कुठून तरी मांजराला मारणे पाप असल्याची वदंता गावकर्‍यात पसरली आणि विनोदाची जागा चिंतेने घेतली. पण मांजर मारले म्हणजे कुठले पाप झाले व त्याव्रचा उपाय कोणता; याची कोणालाच अक्कल नव्हती. तेव्हा दिवेलागणीच्या वेळी तमाम गावकर्‍यांच्या जमाव शास्त्रीबोवांच्या अंगणात येऊन धडकला. कारण धर्मशास्त्र व पापपुण्याचे गावातले जाणकार व ठेकेदार शास्त्रीबोवाच होते ना?

   अंगणातली कुजबुज शास्त्रींच्या कानावर आली आणि अंधारलेल्या अंगणात लोकांचा जमाव दिसल्यावर शेंडीला गाठ मारून, बंडी सारखी करीत ते पडवीत आले. समोरचा चिंताक्रांत घोळका काही विपरित घडल्याचे सुचवत होता. मात्र काय घडले असावे याचा अंदाज येत नव्हता. अखेर शास्त्रींनीच काय काम काढलेत अशी विचारणा केली; तेव्हा त्या सुतकी चेहर्‍याच्या जमावा्तील वडीलधार्‍या व पिकल्या केसाच्या गावकर्‍याने घटना सांगितली आणि बुवांचा चेहराही आक्रसला. शेंडीची गाठ सोडून बुवा म्हणाले, घोर पापकर्म झाले आहे आणि त्याची विषारी फ़ळे संपु्र्ण गावालाच भोगावी लागणार आहेत. अहो शेवटी मांजर म्हणजे व्याध्रवंशीय. मांजराला वाघाची मावशी म्हणतात ना? आणि वाघ हे तर साक्षात देवी भवानीचे वाहन. त्याचीच हत्या झाल्यावर देवीचा गावावर कोप होणार नाही तर काय? त्यातून आता सुटका नाही. अंधारल्या अंगणात एकदम स्मशानशांतता पसरली. जमावातल्या सर्वच गावकर्‍यांचे चहरे काळवंडले होते. प्रत्येकाच्या चेहर्‍यावरून अपराधी भावना ओसंडून वहात होती. आणि आपण धर्मशास्त्राचा गहन अर्थ उलगडून दाखवल्याचा सार्थ अभिमान शास्त्रीबोवांच्या विजयी मुद्रेतून त्या अंधारातही स्पष्टच दिसत होता. काही मिनिटे अशीच शांततेत गेली आणि मग एका म्हातारीने तोंड उघडले. ती म्हणाली ‘शास्त्रीबुवा, अहो तुम्हीच गावातले काय ते एकमेव जाणकार. तेव्हा आता या संकटातून बाहेर पडण्याचा मार्गही तुम्हालाच माहीत असणार ना? मग आम्हाला कोड्यात कशाला टाकता? झटपट काय प्रायश्चित्त घ्यायचे ते सांगून टाका. आम्ही काय तुमच्या शब्दाबाहेर आहोत?’

   आता शास्त्रीबोवांच्या चेहर्‍यावरले स्मित मावळले आणि ती जागा गांभिर्याने घेतली. कपाळाच्या उजव्या बाजूला थोडे हलकेसे खाजवत बुवा म्हणाले, घडले आहे मोठे विपरीतच. पण त्याचे उत्तर किंवा प्रायश्चित्त असे झटपट सांगता येणार नाही. असे आधी कधीच गावात घडलेले नाही. अघटित घडले आहे. त्यामुळेच त्याचा शास्त्रार्थ शोधावा लागणार आहे. मगच त्यावरचा उपाय व प्रायश्चित्त सांगता येईल. आता तुम्ही आपापल्या घरी जा आणि मनोमन देवीची करूणा भाका. प्रार्थना करा. मी आज रात्री पोथ्या व ग्रंथांचे अवलोकन करून घडल्या गोष्टीचा शास्त्रार्थ लावतो. उद्या सकाळी पुढले बघू. लोक आपापल्या घरी गेले. कोणाचे जेवणात लक्ष नव्हते, की रात्रभर अनेकांचा डोळ्याला डोळा लागला नाही. शास्त्रीबोवा इथे समई पेटवून पोथ्या व ग्रंथांचे अवलोकन करीत मध्यरात्रीपर्यंत जागत होते. पहाटे केव्हातरी त्यांनी गाशा गुंडाळला आणि झोपी गेले. त्यामुळेच सकाळी त्यांना जाग यायलाच उशीर झाला. प्रातर्विधी उरकायालही उशीरच झाला. पण तांबडे फ़ुटण्याआधीपासून एक एक गावकरी येऊन शास्त्रीबोवांच्या अंगणात बसला होता. बुवा आपले दैनंदिन सोपस्कार उरकून बाहेर येईपर्यंत अवघा गाव त्यांच्या अंगणात हजर झाला होता. चेहरे सर्वांचे कालच्या सारखेच सुतकी होते. गावात शांतता होती. पोरेही कुठे खेळायला हुंडडायला घराबाहेर पडली नव्हती. गावावर जणू त्या मांजराच्या हत्येने मोठीच अवकळा आलेली होती. आणि त्यावरचा उपाय आता शास्त्रीबोवा देणार म्हणुन अवघा गाव, जीव कानात आणुन त्यांच्या अंगणात प्रतिक्षा करत उभा होता. ऊन चढू लागण्यापुर्वी बुवा पडवीत आले आणि अत्यंत चिंतातूर नजरेचा कटाक्ष त्यांनी गावकर्‍यांच्या समुदायावरून फ़िरवला. पुन्हा कालच्या त्या म्हातारीनेच विषयाला तोंड फ़ोडले. ‘काय करायचे शास्त्रीबुवा?’ त्यावर काही क्षण शांत राहून आणि शेंडीशी खेळत बुवांनी कथन सुरू केले.

   ‘मोठाच घोर अपराध घडला आहे. देवीच्या कोपातून सुटका मोठी अवघड गोष्ट आहे. मोठीच किंमत मोजावी लागणार आहे. शांती करावी लागेल, होमहवन करावे लागेल. दोन दिवसांच्या हवनानंतर सोन्याचे मांजर ब्राह्मणाला दान करावे लागेल.’ सगळीकडे एकच शांतता पसरली. पण प्रायश्चित्ताचा उपाय असल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला होता. आता सवाल होता, तो या प्रायश्चिताच्या मोठ्या खर्चाचा. तेव्हा त्याच म्हातारीने शास्त्रींना विचारले, बुवा उपाय शोधून काढलात हे आम्हा गावकर्‍यांवर आपले खुप मोठे उपकार झाले. आता एकच राहिले, तेवढे सांगा मग आपण सगळे कामाला मोकळे झालो. इतका वेळ विजयी मुद्रेने जमावाकडे बघणार्‍या बुवांच्या भुवया ताणल्या गेल्या. काहीशा क्रोधातच त्यांनी म्हातारीला विचारले, ‘आणखी काय राहिले?’ म्हातारी उत्तरली, ‘बुवा हे तुम्ही म्हणता ते प्रायश्चित्त करायचे कोणी?’ मग बुवांचा चेहरा खुलला, तुच्छतेने त्या म्हातारीकडे बघत बुवा म्हणाले, ‘एवढेही कळत नाही तुम्हा मुर्खांना? अरे ज्याच्या हातून मांजर मारले गेले, त्या पोराने नाही तर त्याच्या कुटुंबाने प्रायश्चित्त घ्यायला हवे ना?’

   या उत्तराने जमावातून इतका मोठा सुस्कारा निघाला, की शास्त्रीबोवांनाही चकित व्हायची पाळी आली. इतका वेळ सुतकी चेहर्‍याने तिथे उभ्या असलेल्या तमाम गावक‍र्‍यांच्या चेहर्‍यावर आता सुटकेचा भाव स्पष्ट दिसत होता. त्यामुळे बुवा अधिकच गोंधळले. कारण चिंतेने गप्प आलेल्या त्या घोळक्यात आता कुजबुज सुरू झाली होती. त्याकडे बुवा प्रश्नार्थक मुद्रेने बघत होते. तेवढ्यात गावचा म्होरक्या म्हातारा उत्तरला, ‘मग तर चिंताच मि्टली गावाची शास्त्रीबुवा’. आता बुवांना अधिकच बुचकळ्यात पडायची पाळी आली. कारण इतका गंभीर व खर्चिक उपाय असूनही लोक निर्धास्त का व्हावे? मात्र त्याचे उत्तर गावकर्‍यांकडुनच घ्यायला हवे होते. म्हणुन बुवांनी त्या म्हातार्‍याला विचारले, ‘चिंता संपली म्हणजे काय?’ आणि म्हातारा उत्तरला, ‘बुवा आता गावाची चिंता संपली कारण ही आता तुमचीच चिंता आहे. ते मांजर गावातल्या पोराच्या हातुन मारले गेले, त्या पोराचे नाव चिंताच आहे. तो दुसरातिसरा कोणी नसून तुमचा चिंत्याच आहे. तुमचा चिंतामणी’. काही क्षण बुवाही गडबडून गेले. आणि गावकर्‍यातही खसखस माजली होती. पण लगेच स्वत:ला सावरत बुवा समोरच्या जमावावर गरजले,

    ‘मुर्खांनो हे कधी सांगणार? माझा वेळ आणि दिवस खराब केलात. अरे माझ्याच मुलाकडून मांजर मारले गेले होते तर कालच संध्याकाळी सांगायचे नाही का? इतकी रात्र बघून उपाय व प्रायश्चित्त शोधायला लावलेत मला. मुर्खांनो. माझ्याच मुलाकडून त्या मांजराचा मृत्य़ु झाला असेल तर प्रायश्चित्त वगैरे काहीही करायला नको. पळा आपापल्या कामाला, मुर्ख लेकाचे.’

   एकदम गावकर्‍यांचा जमाव शांत झाला. सगळेच शास्त्रीबोवांकडे आश्चर्यचकित होऊन बघत होते. गावकर्‍यापैकी कोणाकडुन मांजर मारले गेले तर घोर पाप असते आणि प्रायश्चित्त घ्यायला हवे. पण बुवांच्या मुलाकडून मांजर मारले गेले तर पापसुद्धा होत नाही? हा काय मामला आहे? ‘निघा’ असा फ़तवा बुवांनी काढला तरी जमाव तसाच स्तब्ध उभा होता. आणि त्या शंकेचाशी शास्त्रार्थ त्याच म्हातारीने बुवांना विचारला. ‘हे कसे काय हो बुवा?’

‘म्हातारे, अगोबाई माझा मुलगा चिंतामणी हा ब्राह्मणाचा पुत्र म्हणजे ब्राह्मणच ना? मग त्याच्या हातून मांजर मेले तर त्याला थेट मोक्षच मिळाला ना? मांजराला मोक्ष देणे हे पाप कसे होईल? उलट आमच्या चिंत्याने केले ते पुण्य़कर्मच आहे. त्याचे कसले आले आहे प्रायश्चित्त? हे पुण्य कालच संध्याकाळी सांगितले असते तर तुमच्या झोपा खरा्ब झाल्या नसत्या आणि माझा वेळ वाया गेला नसता.’

Saturday, September 22, 2012

झुंडीची मनोवृत्ती


या दुष्ट चौकोनातून कसे सुटावे?

by Navnath Pawar on Wednesday, September 14, 2011 at 11:51am ·
मित्रांनो, मला सारखे असे वाटत राहते की आपण एका दुष्ट चौकोनात फसत चाललो आहोत.
१. टोकाचे गोड्सेवादी
२. टोकाचे बहुजनवादी
३. टोकाचे आंबेडकरवादी
४. टोकाचे इस्लामवादी
यातले पहिले तीन भारतीय समाजातूनच उगवले आहेत. तर चौथा भारताबाहेरचा असून स्थानिक समाजाला बळजबरीने त्याच्या दावणीला बांधण्यासाठी नंबर एकचा गट जीवाचे रान करतो आहे. नंबर एकला प्रत्युत्तर म्हणून नंबर दोन रिमिक्स इतिहास आणि तत्वज्ञान सांगून देशाच्या एकतेला सुरुंग लावत आहे. कोणी नुसता आ वासला तरी तो फक्त भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेण्यासाठीच वासावा हा तिसऱ्या गटाचा आग्रह असतो. भारतीय मुस्लीम प्रत्यक्षात इतके वादात पडू इच्छित नाहीत. मात्र पहिल्या तीन गटांनी त्यांचा द्वेष करावा यासाठी पाकिस्तानी अतिरेकी सर्व ताकदीनिशी प्रयत्न करत आहे... मला यातल्या सर्वच कट्टरवादी गटांची घृणा आहे... अर्थवादी विचार मंथन सुरु केले की हे त्यात जातीयवाद घुसवून मूळ पोस्टचा धुव्वा उडवतात. मात्र कुठल्या जयंतीचे निमित्त साधून हे पहिले तीन हे एकमताने आणि हक्काने माझी गाडी अडवतात. चौथा प्रत्यक्ष माझ्या मार्गात येत नसला तरी तो सगळ्यात जास्त देशद्रोही आहे, असे पहिल्या तिघांचे एक्मताचे (कोणी उघड कोणी छुपा) दडपण माझ्या खिशातून वर्गणी अक्षरश: काढून घेते.. यातही अनेक बहुभूज उपआकृत्या पुन्हा आहेतच.... त्यामुळे साधी गणपतीची वर्गणीही किमान दहा ठिकाणी द्यावीच लागते....  इच्छा असो की नसो शिवाजी महाराजांना वर्षातून दोनदा जन्माला घालावेच लागते.  प्रत्येक गल्लीत एक महारुद्र हनुमान किंवा गणपती मंदिर असलेच पाहिजे, आणि त्यात अर्थात माझे योगदान असलेच पाहिजे. .... लावण्यांच्या तालावरील प्रबोधनगीते आणि डीजेच्या तालावर धुंद नाच ठीकठाक व्हावा यासाठी  किमान पाच ठिकाणी पावती घेतलीच पाहिजे, नसता बाबासाहेबांचा अनादर करण्याची किंमत द्यायची वेळ कधीतरी येतेच....!चौथा गट मला कधी वर्गणी मागत नसला तरी त्याच्या पावत्या पाकिस्तानची असहाय्य जनता आपल्या विकासाचा बळी देऊन मुकाट्याने    फाड्तच आहे. मुक्त अर्थव्यवस्था आणि अंधश्रद्धा निर्मुलन असे शब्द नुसते उच्चारले तरी देव, धर्म, देश द्रोही खणून अंगावर येणारे हे गट वर्गणी साठी मात्र मी खिसा मुक्त ठेवावा असं प्रेमळ आग्रह प्रसंगी गुदगुल्या करून करता, हे विशेष. आता या फायद्याच्या धंद्यात अनेक नवीन अस्मिता मोठ्या फौज फाटयासहित उतरण्याच्या तयारीत असलेल्या पाहून मी धास्तावलो आहे. या चौकोनाचा लवकरच पंचकोन, षटकोन, अष्टकोन होत वर्तुळ होणार हे दिसतच आहे....    .  मी खूप अस्वस्थ आहे, पण या दुष्ट चौकोनातून बाहेर पडायचा मार्ग सापडत नाहीये, आपण काही मार्गदर्शन कराल का?

========================


झुंडीची मनोवृत्ती 

   पहिली गोष्ट म्हणजे विचार किंवा प्रेमाने माणसे जोडणे हा दुरचा व कष्टप्रद मार्ग असतो. त्यापेक्षा भय किंवा द्वेषाने माणसे लौकर जोडता वा संघटित करता येतात. कारण विचार व विवेक ही वैयक्तीक मनस्थिती असते तर भयगंड ही झुंडीची मानसिकता असते. त्यामुळेच झुंड गोळा करायची तर विचार व तत्वज्ञानापेक्षा समजूती व तिरस्कार सोपे साधन असते. कोणी तरी समान शत्रू दाखवावा लागतो. तो खरा असण्याची सुद्धा गरज नसते, काल्पनिक सुद्धा चालतो. पण त्याचे भय समुहाच्या कल्पनाविश्वात ठसवता आले पाहिजे. ज्याच्या डोक्यावर सर्वप्रकारचे खापर फ़ोडणे, मग सोपे होऊन जाते. आपण ज्या चार टोकाच्या चौकोनाची गोष्ट सांगत आहात; त्या प्रत्येक कोनाचे पाय कुठला ना कुठला तिरस्कार घेऊनच बनलेले दिसतील. आपल्या अडचणी किंवा अपयशाचे खापर अशी मंडळी दुसर्‍या कोणाच्या तरी डोक्यावर फ़ोडताना दिसतील. स्वत:चे अपयश किंवा नाकर्तेपणा लपवण्यासाठी तिरस्कार व द्वेष हा सर्वात सुरक्षित व सोपा आडोसा असतो. तेवढेच नाही तर अशा पराभूत मनोवृत्तीचा जमाव गोळा करायला, त्याचा भरपुर उपयोग होतो. म्हणूनच ज्यांच्याकडे आपण भयभित होऊन बघत आहात ती म्डळी स्वत:च भयगंडाने पछाडलेली आहेत हे आधी ओळखा. 


   हिटलर किंवा त्याची ज्य़ु जमातीच्या द्वेषावर उभी राहिलेली नाझी चळवळ त्याचे उत्तम उदाहरण आहे. ज्यू जमात संपवणे हे त्याचे उद्दीष्ट अजिबात नव्हते. एकदा हिटलरला त्याबद्दल विचारण्यात आले, की ज्य़ु जमातीचा संपुर्ण नि:पात करण्यात यावा असेच तुझे मत आहे का? त्यावर त्याने दिलेले मत डोळ्यात अंजन घालणारे आहे. तो म्हणाला, ‘ छे छे, ज्य़ु नावाचा कुणी अस्तित्वात नसेल तर तो अस्तित्वात आहे असे दाखवावे लागेल. खरा ज्य़ु नसेल तर काल्पनिक ज्य़ु तरी हवाच. चळवळ उभी करायची तर ज्याचा द्वेष करावासा वाटेल, ज्याच्या नावाने द्वेषाची चिथावणी देता येईल, असा कोणीतरी हाडामासाचा, खराखुरा शत्रू आवश्यक असतो. असा शत्रू नसेल तर लोकंना चिथावता येत नाही. केवळ अमुर्त कल्पना पुढे करून ही गोष्ट साध्य होत नाही.’ हिटलरचे हे बोल आजच्या आपल्या देशातील चार वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या वर्तनाशी तपासून बघा. मग तुमच्या लक्षात येईल, की त्यांच्यापाशी कुठलाही विधायक कार्यक्रम नाही की विवेकबुद्धीला स्थान नाही. 


   आपण ज्यांच्याकडे बोट दाखवले आहे त्या चारही प्रवृत्ती द्वेषाच्या पायावर उभ्या आहेत. त्यांना काही निर्माण करायचे नसून, दुसरे काहीतरी नष्ट करायची त्यांची भूमिका आहे. मग सवाल येतो, की विध्वंसातून त्यांना काय साधायचे आहे? सूड घेण्यातून कसली भरपाई होत असते? आपला नाकर्तेपणा लपवता येतो ना? मग कोणी पुरातन बौद्ध मुर्तीचा विध्वंस तोफ़ा डागून करतो तर कोणी बाबरी पाडण्यात पुरूषार्थ शोधू पहातो तर कोणी जुन्या काळातल्या कुत्र्याच्या पुतळ्याला हटवण्यात मर्दानगी अनुभवतो. मजेची गोष्ट अशी दिसेल, की तुम्ही त्यांच्या अशा कसरतीकडे दुर्लक्ष केलेत, तर त्यांची आक्रमकता व क्षोभ अधिकच वाढलेला दिसेल. अशा तिरस्कार व द्वेषाने प्रेरित झालेल्या झुंडी दिसतात माणसांच्या, पण वागतात पशूसारख्या. माणुस शेवटी प्राणीच आहे आणि त्याच्यात पाशवी वृत्ती उपजतच असते. अनैसर्गिक अशा नागरी जीवनातले अपयश पचवण्याची कुवत नसलेल्या माणसात पाशवी वृत्ती लौकर उफ़ाळून बाहेर येते. मग अशी माणसे झुंड शोधू लागतात आणि चलाख लोक त्यांना आवश्यक असलेले द्वेष, तिरस्कार करण्यास योग्य वाटणारे काही प्रतिक देतात. 


   वयात येणारी मुलगी किंवा मुलगा जसा प्रेमात पडायला उतावळा असतो, तशी ही पराभूत मनोवृत्तीची विवेकशून्य माणसे अशा तिरस्कारणिय प्रतिक वा निमित्ताच्या शोधात असतातच. त्यामुळेच जो कोणी चलाख माणूस ती मानसिकता ओळखून चतुर व्यापार्‍याप्रमाणे त्यांना असे प्रतिक पुरवतो, त्याला झूंडीचे आपोआपच नेतृत्व मिळत असते. तिरस्कार करायला प्रतिक मिळाले, मग प्रतिक्रिया म्हणून ते पुरवणार्‍याबद्दल आदर व भक्तीभाव निर्माण होत असतो. आणि अशा निरर्थक श्रद्धा व भक्तीच्या आहारी जाऊन आपले जीवन सर्वस्व त्यावर उधळून टाकण्यामध्ये झुंडीत सहभागी झालेले लोक पुरूषार्थ समजू लागतात. अनेक देशात मानवी बॉम्ब म्हणून मरणाला हसतहसत कवटाळणारे, किंवा आंदोलनात सहभागी होऊन पोलिसांच्या तावडीत सापडणारे, त्याच झूंडीतले असतात. जेव्हा अशा झुंड तयार होतात, तेव्हा त्यात अल्पबुद्धीचे लोक सहभागी होऊन द्वेषाला तिरस्काराला खतपाणी घालायचे मुद्दे पुरवू लागतात, बदल्यात त्यांच्या अल्पबुद्धीला अभ्यासक वा तत्ववेत्ता अशी मान्यता झुंडीकडून मिळत असते. आणि हे आजकालचे नाही. हजारो वर्षाच्या मानवी इतिहासात त्याचीच सतत पुनरावृत्ती होताना दिसेल. तेव्हा तीही नैसर्गिक अपरिहार्यता आहे समजून जगणे विवेकी माणसाच्या हाती असते.


   मग यावर उपाय कोणता? उपाय एकूण मानव जमात आपोआप शोधून काढत असते. जोवर एकूण समाजाची सोशिकता टिकून असते, तोवर अशा झुंडींची मस्ती चालते. पण त्या सोशिकतेचा कडेलोट होतो तेव्हा संयम सोडून अवघा समाजच त्या झुंडींपेक्षा अधिक हिंसक होऊन त्या झुंडींचे निर्दालन करायला अधिक पाशवी रूप धारण करतो. तेव्हाच त्या झुंडींचे निवारण होत असते. या झुंडी समाज जीवनाला तापदायक असल्या तरी वारंवार अवतार घेतच असतात आणि समाजजीवन विस्कटून टाकत असतात. आपल्या पाशवी वृत्तीने त्या झुंडी सामान्य शांततामय जीवन जगायला धडपडणार्‍या मोठ्या लोकसंख्येला शेवटी पाशवी पातळीवर आणुनच स्वत:चे निर्दालन करून घेतात. आजवरचा मानवी इतिहास त्याचाच साक्षिदार आहे. 


Wednesday, September 19, 2012

(पुण्यनगरीची ब्रेकिंग न्यूज) २/९/१२


नरेंद्र मोदींच्या भितीने
मध्यावधी निवडणूका?

(पुण्यनगरीची ब्रेकिंग न्यूज) २/९/१२

   नवी दिल्ली: शुक्रवारी अचानक कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी राष्ट्रपती भवनात गेल्या आणि त्यांनी प्रथमच नव्या राष्ट्रपतींची ब भेट घेतली. त्याची कारणे कोणीही माध्यमांना कळू दिलेली नाहीत. पण त्यामागे मध्यावधी लोकसभा निवडणूकीची दाट शक्यता आहे. किंबहूना त्याच कारणासाठी सोनिया प्रणबदांना भेट्ल्या आहेत. त्या भेटीमागे त्यांच्यासह कॉग्रेसला भेडसावणार्‍या भितीचे नाव नरेंद्र मोदी असल्याचे एका जुन्या जाणकाराचे मत आहे. मोदी येत्या वर्ष अखेर होणार्‍या गुजरातच्या विधानसभा निवाणूका जिंकले तर त्यांना दिल्लीत येण्यापासून रोखता येणार नाही आणि मोदींना आणखी एक वर्ष दिल्लीच्या निवडणूकांची तयारी करण्यास सवड दिली; तर त्यांना पंतप्रधान होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही, अशा भितीने आता कॉग्रेस पक्षाला पछाडलेले आहे. त्याच बाबतीत प्रणबदांचे मत घ्यायला सोनियाजी राष्ट्रपती भवनात गेल्या होत्या, असा निष्कर्ष निघतो.

   मागल्या काही दिवसात लागोपाठ मतचाचण्यांचे निष्कर्ष येत आहेत आणि त्यात नरेंद्र मोदी यांना लोकांची मिळणारी पसंती कॉग्रेसची झोप उडवणारी ठरली आहे. दिल्लीतील एका ज्येष्ठ पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या वाहिन्यांनी घेतलेल्या या चाचण्या मुळातच कॉग्रेस पुरस्कृत असून त्यातून मध्यावधी निवडणुकीसाठीची ती चाचपणी आहे. पण त्या प्रत्येक चाचणीत मोदी यांनाच लोकांचा वाढता पाठींबा मिळत असल्याने कॉग्रेसची बेचैनी वाढली आहे. सर्व बाजूनी मतांची चाचपणी व्हावी, म्हणुन प्रत्येक चाचणीत विभिन्न विषयांचा आढावा घेण्यात आला आहे. अण्णा, रामदेव किंवा राहुल, अडवाणी, नितीशकुमार यांच्यासह तिसर्‍या आघाडीच्या पंतप्रधानाची कल्पना मांडूनही मोदींकडेच लोकमत झुकल्याचे प्रत्येक चाचणीने दाखवले आहे. त्यामुळेच मोदींनी दिल्लीकडे मोर्चा वळवण्यापुर्वी लोकसभा निवडणूका उरकणे कॉग्रेसला सुरक्षित वाटू लागले आहे. त्यामागे मोदींना गुजरातमध्येच रोखण्याचा डावही आहे.

   भारतीय गुप्तचर खात्यामध्ये दिर्घकाळ काम केलेले निवृत्त अधिकारी बी. रामन यांनी आपल्या ताज्या निबंधातून तशी शक्यता व्यक्त केली आहे. तेहरानला अलिप्त राष्ट्राच्या परिषदेल गेलेल्या पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वर्तन आणि त्यांनी खूंटीस टांगून ठेवलेले पाकिस्तान भेटीचे आमंत्रण या दोन गोष्टींचा आधार घेऊन त्यांनी मध्यावधी निवड्णुकीही शक्यता शुक्रवारी लिहून टाकली. त्याच संध्याकाळी सोनिया प्रणबदांना भेटायला गेल्या. सत्ताधारी पक्षाच्या वतीने पंतप्रधान राष्ट्रपतींची भेट घेतो, पक्षाध्यक्ष नाही. पण इथे सोनिया राष्ट्रपती भवनात गेल्या. याचा अर्थच त्या घट्नात्मक कामासाठी नव्हेतर राजकीय सल्लामसलत करायला गेल्या असणार. म्हणुनच त्यांच्या भेटीचे कारण गुलदस्त्यामध्ये ठेवण्य़ात आले आहे. कारण राष्ट्रपती म्हणून प्रणबदा राजकीय पक्षाचे हित बघू शकत नाहीत. पण गेल्या आठ वर्षात त्यांनीच प्रत्येकवेळी कॉग्रेस व युपीएला राजकीय संकटातून बाहेर काढण्याचे सर्व डाव खेळले होते. म्हणूनच मध्यावधी निवडणूकीबद्दल त्यांचा सल्ला घ्यायला सोनियाजी तिकडे गेल्या असणार. पण मोदींना गुजरातमध्ये अडकवून कॉग्रेसचा कोणता राजकीय लाभ होऊ शकतो?

   आज देशाच्या कुठल्याही भागात न जाता आणि स्वत:ला केवळ गुजरातमध्येच गुंतवून ठेवणार्‍या मोदींची लोकप्रियता सर्वाधिक आहे. त्यांना लोकसभा निवडणूकीत सर्वत्र फ़िरण्याच संधी मिळाली तर त्यात आणखीनच भर पडू शकते. पण गुजरातबाहेर त्यांना पडता आले नाही तर लोकप्रियतेचा पुरेपुर लाभही मोदी घेऊ शकणार नाहीत. आणि गुजरातच्या विधानसभा निवडणूका वार्‍यावर सोडून मोदी देशभर दौरे करणार नाहीत. म्हणूनच गुजरात विधानसभा निवडणुकी सोबतच लोकसभेच्या मध्यावधी निवडणूका घेतल्या; तर मोदी गुजरात बाहेर प्रचाराला जाऊ शकणार नाहीत. याचाच अर्थ त्यांची लोकप्रियता असली तरी तिचा पुर्ण लाभ त्यांना एकत्रित निवडणूका झाल्यास घेता येणार नाही. गुजरात जिंकल्यावर त्यांना एक सव्वा वर्षाचा अवधी मिळाला, तर ते देशभर दौरे काढून आपल्या लोकप्रियतेचा भरपुर लाभ घेऊ शकतील. त्यापासून त्यांना वंचित ठेवण्याचा सोपा मार्ग म्हणजे गुजरात सोबच्या मध्यावधी लोकसभा निवडणूका होय.

   आताच लोकसभा मध्यावधी निवडणूक घेतल्यास कॉग्रेसचे आणखी दोन लाभ आहेत. एक म्हणजे अनेक घोटाळ्यामुले जी बदनामी दिवसेदिवस वाढते आहे, तिचा प्रादुर्भाव पुढल्या दिडवर्षात आणखी हानीकारक होऊ शकतो, त्यापासून मध्यावधीमुळे आपले नुकसान कमी होऊ शकेल असे कॉग्रेसला वाटते आहे. दुसरीकडे मोदी भाजपा वगळता जे अन्य विरोधक आहेत, त्यांना बेसावध गाठले तर अपुर्‍या तयारीमुळे त्यांनाही फ़ारसे यश मिळणार नाही. इतक्या अल्पावधीत तिसरी सेक्युलर आघाडी आकार घेऊ शकणार नाही, म्हणुनच ते एकत्रित निवडणूक लढू शकणार नाहीत. आणि सध्या अण्णा-रामदेव यांच्या प्रेमात पडलेल्या मतदाराला त्यांचे अनुयायी वापरू शकणार नाहीत. कारण इतक्या अल्पकाळात अण्णा टिमला आपल्या पक्षाची संघटनत्मक उभारणी करून निवडणूका लढणे अशक्य आहे. म्हणूनच त्यांच्याकडून होणारे कॉग्रेसचे नुकसानही मध्यावधीमुळे टळू शकते.

   त्याच बाबतीत सल्लामसलत करायला सोनिया राष्ट्रपती भवनात जाऊन प्रणबदांना भेटल्या असाव्यात. आणि म्हणुनच त्या भेटीचे कारण गोपनिय राखण्यात आले आहे. एकतर राष्ट्रपती अशी राजकीय सल्लामसलत करू शकत नाहीत असे आहे आणि दुसरे कारण मध्यावधी निवडणूका विरोधकांसह मोदींना बेसावध गाठण्याचा डाव आहे. आणि तसे असल्यानेच पंतप्रधानांनी पाकिस्तानचे आमंत्रण असूनही तिकडे जाण्याबद्दल व ते स्विकारण्याबद्दल एक महिना उलटून गेल्यावरही टाळाटाळ चालवली आहे. सध्याचे संसदेचे गोंधळात सापडलेले पावसाळी अधिवेशन लौकर गुंडाळण्याचे पाऊल सरकारने उचलले, तर डिसेंबर अखेर लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे म्हणून समजावे

Friday, September 14, 2012

पुरोगामी पतिव्रतांच्या उरावर सेक्युलर ‘बाजार’बसवी

   गुरूवारी डिझेलची दरवाढ केल्यावर काहूर माजणार याची कॉग्रेसला पुर्ण कल्पना होतीच. मात्र ते काहूर माजल्यावर एक दोन रुपयाची कपात करून दरवाढ पचवली जाईल, असे बहुतेक वाहिन्यांवरील मुर्खांनी सांगितले होते. कारण पुस्तकापलिकडचे जग बघायची सवय नसलेल्यांम अशा पढतमुर्खांना जगात खरोखरच काय घडते याच्याशी कर्तव्य नसते. अगदी अपेक्षेप्रमाणे विरोधकांनीच नव्हेतर कॉग्रेसच्या मित्र पक्षांनीही डिझेल दरवाढीला कडाडून विरोधाचे नाटकही छान रंगवले. पण आपला पुरोगामी देश शेवटी पतीपरमेश्वर मानणार्‍या मनोवृत्तीचाच आहे ना? तिथे पुरोगामीत्वही त्याच पातिव्रत्याच्या सोवळ्यात अडकलेले असते. मग बाहेरख्याली नवरा जसा रुसलेल्या पतिव्रता पत्नीला दाद देत नाही, तशीच आजच्या सेक्युलर कॉग्रेसची अवस्था आहे. त्यामुळेच जोवर मित्र व सहकारी पक्ष कपाळावर सेक्युलर सौभाग्यलेणे मिरवण्या्चे पातिव्रत्य जपणार आहेत; तोवर सेक्युलर व्याभिचारी नवर्‍याने लग्न मोडायची भिती कशाला बाळगायची? दोन दिवस शिव्या घालणारी पतिव्रता शेवटी वटसावित्रीचा दिवस उजाडला, मग पुन्हा हातात तबक घेऊन वडाची पूजा बांधतेच ना? आणि सातजन्मी हाच सेक्युलर नवरा हवा म्हणून उपास करतेच ना? मग कॉग्रेसने घाबरायचे कशाला? असा नवरा नुसता त्या सतीसावित्रीचा अपेक्षाभंगच करत नाही तर तिच्या उरावर बसून भावना पायदळी तुडवणारा चंगीभंगीपणा उजळमाथ्याने करतच असतो. अशा मुर्ख पतिव्रतेवरच्या अन्याय किंवा फ़सवणूकीने हळहळतात, तेही बेअक्कल असतात. तशीच आजच्या कॉग्रेस व सेक्युलर लाचारांची अवस्था आहे. म्हणुन तर इकडे हे सेक्युलर लाचार डिझेल दरवाढीवर रुसून बसले असताना; तिकडे कॉग्रेसने दरवाढ कमी करण्यापेक्षा उलट अनेक व्यापार उद्योगात ५१ टक्क्याहून अधिक परदेशी गुंतवणुकीची वारांगना या सेक्युलर पतीव्रतांच्या उरावर आणून बसवली. कारण हे लाचार सेक्युलर पक्ष तोंडाने खुप कॉग्रेसला शिव्या घालतील; पण गळ्यातले सेक्युलर मंगळसुत्र काढून घेण्याची वेळ आली किंवा पुरोगामीत्वाचे कुंकू पुसायची वेळ आली, मग निमुटपणे त्यागी पतिव्रतेसारखे कॉग्रेसच्या समर्थनाला उभे रहातील याची कॉग्रेसला खात्री आहे. म्हणूनच डिझेल दरवाढीची नाराजी कमी करण्याऐवजी मनमोहन सरकारने परदेशी गुंतवणूकीची बाजारबसवी या सेक्युलर पतिव्रतांच्या उरावर आणून बसवण्यापर्यंत मजल मारली आहे.

   गुरूवारी डिझेल दरवाढ केल्यावर शुक्रवारी आपल्या जनानखान्यातील या सेक्युलर पाळीवांमध्ये कुरबुरी होणार याची कॉग्रेसला खात्री होतीच. पण नाराजी दुर करण्याऐवजी कॉग्रेसने त्यांना आणखी दुखावण्याचे कारण काय असेल? त्याचे उत्तर वाहिन्यांवरील दिवट्य़ांना सापडत नव्हते. कारण त्यांची बुद्धीच खुंटली आहे. सेक्युलर मित्रांना दुखावून कॉग्रेस पक्ष आपल्याच सरकारला धोका का न्रिर्माण करते आहे? त्याचे उत्तर कुठल्याही शहाण्याकडे नव्हते. ते उत्तर असे आहे की कॉग्रेसला हे सरकार चालवायचे नाही, तर शक्य झाल्यास येत्या डिसेंबरपुर्वी निवडणुका घ्यायच्या आहेत. पण सत्ता अर्धवट सोडली व लोकसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणूका घेतल्या, असे पाप आपल्या डोक्यावर नको आहे. ते सरकार पाडायला विरोधी भाजपा सोबत जनानखान्यातले सेक्युलर पक्षच गेले आणि म्हणुन सरकार पडले व मध्यावधी निवडणूका आल्या, असे कॉग्रेसला दाखवायचे आहे. गुजरातच्या विधानसभा निवडणूका येत्या डिसेंबरमध्ये होत आहेत. त्यात मोदी जिंकणार याची कॉग्रेसला खात्री आहेच. पण तिथे यश मिळवल्यावर मोदी दिल्लीच्या मोहिमेवर निघणार आणि त्यांना अवघे सहा महिने मिळाले तरी ते देश ढवळून काढतील, याची भिती कॉग्रेसला सतावते आहे. म्हणूनच मोदींना गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये अड्कवून लोकसभा निवडणूका उरकायची रणनिती कॉग्रेसने आखलेली आहे. मात्र तसे थेट करण्यासाठी लोकसभा बरखास्त केली, तर कॉग्रेस मोदींना घाबरलेली दिसेल. तसे व्हायला नको म्हणुन सरकार पाडायचे पाप आपल्या जनानखान्यातील सेक्युलर पतीव्रतांना करायला भाग पाडायचा डाव कॉग्रेसने योजला आहे. त्यासाठीच हमखास विरोध होईल अशी मि्त्र पक्षांची कळ कॉग्रेसने काढली आहे.

   आता मुद्दा असा आहे, की मित्र सेक्युलर पक्षांना मान्य नसेल तर त्यांनी सरकार भाजपाच्या मदतीने पाडावे. नाहीतर आहे ते निमुटपणे सहन करावे. म्हणजे दोन्ही बाजूंनी कॉग्रेसच जिंकते ना? आजचे सरकार चालवणे म्हणजे कसरतच आहे. त्यात अशा मित्रांच्या इशार्‍यावर नाचण्यापेक्षा आपले निर्णय ठामपणे घेऊन मित्रांनाच अडचणीत आणायचे डाव कॉग्रेस खेळते आहे. सेक्युलर मित्र गप्प बसले तर भ्रष्टाचार व घोटाळ्यांचे ते भागिदार ठरतात, अधिक महागाई दरवाढीचेही खापर सरकार समर्थक म्हणून त्यांच्याही डोक्यावर फ़ुटते. आणि विरोधात जाऊन सरकार पाडले तर त्यांच्या सेक्युलर पातिव्रत्यावर कलंक लावता येतो. म्हणजे दोन्हीकडून व्याभिचारी नवरा कॉग्रेस सुटतो आणि फ़सते ती सेक्युलर पतिव्रता. कॉग्रेसला येत्या डिसेंबरमध्ये लोकसभा निवडणूका हव्या आहेत आणि त्यामागे नरेंद्र मोदींचे भय कारणीभूत आहे. त्यातूनच हा आक्रमक पवित्रा कॉग्रेसने घेतला आहे. त्यात मोदींचे कॉग्रेसला वाटणारे भय हा मुद्दा ज्या सेक्युलर मुर्ख विश्लेषकांच्या हिशोबातच नाही, त्यांना कॉग्रेसचा हा आक्रमक पवित्रा कशामुळे आला त्याचा थांगपत्ता लागू शकणार नाही. मग ज्याचे उत्तर सापडत नाही व तर्कानेही शोधता येत नाही, त्याला हे शहाणे अनाकलनिय ठरवतात. मुद्दा सोपा व सरळ आहे. येत्या डिसेंबरमध्ये गुजरात मोदी पुन्हा जिंकणार आहेतच. पण तो विजय त्यांना २०१४ सालच्या लोकसभेतील अर्धे यश मिळवून देईल. आणि पुढले दहा बारा महिने मिळाल्यास मोदी संपुर्ण देशच पादाक्रांत करतील, या भयातून कॉग्रेसने हा जुगार खेळलेला आहे. सर्वकाही परत मिळवण्याच्या आमिषाने युधिष्ठीराने जशी द्रौपदी पणाला लावली होती; तशीच आज कॉग्रेसने आपली लुळीपांगळी सत्ता पणाला लावली आहे.

Friday, September 7, 2012

सानेगुरूजी म्हणतात, निखिलसारखे पत्रकारच दंगली पेटवतात


अमळनेर गांवात आज विश्वधर्ममंडळाच्यावतीने थोर, पैगंबर महंमद यांची पुण्यतिथि साजरी होणार होती. विश्वधर्ममंडळ तेथे नवीनच स्थापन झाले होते. नवीन जीवनाचा तो एक लहानसा अंकुर होता. हजारो वर्षे जो विशाल भारत बनत आहे, त्याच्याच सिद्धीसाठी ते लहानसे मंडळ होते. जे महाभारताचे महान वस्त्र परमेश्वर अनंत काळापासून विणीत आहे, त्या वस्त्रांतील एक लहानसा भाग म्हणजे ते मंडळ होते.

हिंदुस्थानभर हिंदुमुसलमानांचे दंगे सुरू असताना असे मंडळ स्थापण्याचा बावळटपणा कोणी केला? ही स्वाभिमानशून्यता कोणाची? या दंग्याच्या आगीत तेल ओतल्याचे सोडून हे नसते उपद्व्याप कोण करीत होते?

काय सर्व हिंदुस्थानभर दंगे आहेत? नाहीत. ती एक भ्रांत कल्पना आहे. हिंदुस्थानांतील दहावीस शहरांत मारामारी झाली असेल. परंतु ही दहावीस शहरे म्हणजे कांही हिंदुस्थान नव्हे. लाखो खेड्यापाड्यांतून हिंदुमुसलमान गुण्योगोविंदाने नांदत आहेत. त्यांचे संबंध प्रेमाचे व जिव्हाळ्याचे आहेत. शेकडो प्रामाणिक मुसलमान नोकर हिंदूंची मुले खेळवीत आहेत. एकमेकांच्या ओटीवर हिंदुमुसलमान पानसुपारी खात आहेत. हिंदुमुसलमानात सलोखा आहे. 

परंतु वर्तमानपत्राना हे खपत नसते. ऐक्याचे व प्रेमाचे वारे पसरविण्याऐवजी वर्तमानपत्रे द्वेषमत्सराचे विषारी वारेच सोडत असतात. हिंदुमुसलमानांच्या दग्यांची, तिखटमीठ लावून विषारी केलेली वार्ता वर्तमानपत्रे जगभर नेतात, आणि कोट्यवधि हिंदुमुसलमानांची मने अशांत केली जातात. आग नसेल तेथे आग उत्पन्न होते. प्लेग नसेल तेथे प्लेगाचे जंतु जातात. हिंदुस्थानची दैना झाली आहे तेवढी पुरे, असे या वर्तमानपत्रांना वाटत नाही. भडक काहीतरी प्रसिद्ध करावे, पैसे मिळावे, अंक खपावे हे त्यांचे ध्येय. मग भारत मरो का तरो. समाजाला आग लागो की समाजाची राखरांगोळी होवो. 

मुंबईला एका इमारतीस आग लागते. परंतु आपण त्याच गोष्टीस महत्त्व देतो. मुंबईतील लाखो इमारती देवाने सुरक्षित ठेविल्या होत्या हे आपण विसरतो. त्याप्रमाणे एके ठिकाणी दंगा झाला तर त्यालाच आपण महत्त्व देतो. इतर लाखो ठिकाणी प्रेमळ शांतता आहे, ही गोष्ट आपण डोळ्याआड करून उगीच आदळआपट करु लागतो. प्रत्येक धर्मांतील संकुचित वृत्तीचे लोक अशा प्रकारे आपल्या श्वासोच्छवासाबरोबर अश्रद्धा घेऊन जात असतात. जगाची होळी पेटत ठेवतात.  

   पुज्य सानेगुरूजी यांच्या ‘धडपडणारी मुले’ या ग्रंथातील ‘स्वामी’ नावाच्या कथेतील हा उतारा आहे. साठ वर्षापुर्वीच सानेगुरूजींचे निधन झाले. पण तेव्हाच त्यांनी हिंदू-मुस्लिम व भांडणे कोण लावून देतो आणि त्यावर आपली पोळी कोण भाजून घेतो ते लिहून ठेवले आहे. आपल्यावर त्याच सानेगुरूजींच्या राष्ट्र सेवा दलाचे संस्कार असल्याचा दावा निखिल वागळे आणि त्याच्या चॅनेलवर जमणारे प्रकाश बाळ, हेमंत देसाई, निळू दामले, डॉ.कुमार सप्तर्षी, किंवा अन्य चॅनेलवर दिसणारे डॉ. रत्नाकर महाजन, प्रताप आसबे, समर खडस इत्यादी अतिशहाणे करता असतात. त्यांची भाषा व बोलणे सानेगुरूजी यांच्या विचारांच्या जवळपास तरी येणारे आहे काय? की हेच दिवटे गुरूजींच्या शिकवणीचे विकृतीकरण करत असतात?

Tuesday, September 4, 2012

कोडग्या कोडग्या लाज नाही

सोमवारपासून किरी्ट सोमय्या सर्वच चॅनेलवर झळकत होते आणि विजय दर्डा, राजेंद्र दर्डा व देवेंद्र दर्डा यांच्यासह दर्डा कुटुंबावर कोळसा खाण घोटाळ्य़ासंबंधात सरसकट आरोप करत होते. त्याला अपवद एकमेव चॅनेल होता, त्याचे ना
व कायबीइन लोकमत. आणि आपले झाकून ठेवत दुसर्‍याचे वाकून बघणारे निखिल वागळे सच्चा पत्रकारितेच हवाले देत दुसर्‍य़ांची कुलंगडी काढण्यात गर्क होते. त्यावर मी फ़ेसबुकवर ‘डॉबरमना सज्जना’ ही टिपण्णी केल्यावर मंगळवारी सुर्य मावळल्यानंतर सच्चाईच्या आणाभाका घेत त्यांनी दर्डा फ़ॅमिलीवरच्या धाडी व एफ़ आय आर दाखल झाल्याची पहिली बातमी दिली. आणि आपण दर्डा फ़ॅमिलीच्या बातम्या दडपून ठेवल्या नाहीत, असे भासवण्यासाठी ‘आम्ही बातमीशी प्रामाणीक असतो’ असाही दावा केला. पण तसा दावा करण्यापुर्वी निखिलने आपल्यातल्या हुंग्या पत्रकाराचा आपण मुडदा पाडला आहे असे का सांगू नये? हे दर्डा कोण? ते कायबीइन लोकमतचे कोण लागतात, ते कोणी सांगायचे?

आमच्या वागळे, गलका चुपकर किंवा आणखी कोणाला कुठले् फ़ुरस्कार मिळाल्यावर त्यांचे चॅनेलशी असलेले नाते सांगणार्‍या वागळेने विजय दर्डा यांना एवढा मोठा सीबीआयचा ‘पुरस्कार’ मिळाला तर त्यांचे कायबीइन लोकमतशी असलेले नाते का लपवावे? डॉ. नीतू मांडके यांना युती सरकारच्या काळात अंधेरी येथे इस्पितळ वांधायला भूखंड मिळाला, तर त्यांनीच शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया केली होती आणि म्हणुनच त्यांना भूखंड मिळाला असे दुरदुरचे नाते शोधणार्‍या निखिलच्या मेंदूला आता गंज चढला आहे काय? हिंदमाता दादर येथील उड्डाण पुलाच्या बांधकामाचे कंत्राट युनीटी कंपनीला मिळाले, तर त्याच कंपनीने मातोश्री बंगल्याचे सुशोभीकरण केले होते, असे बारीकसारीक तपशील शोधणार्‍या निखिलला विजय दर्डा त्याच्याच वाहिनीचे विजय दर्डा हे मालक असल्याचे ठाऊक नाही काय? असेल तर ते सांगण्याची लाज का वाटावी? की निखिल व त्याचे सहकारी विजय दर्डांना नवरा मानतात आणि नवर्‍याचे नाव उखाण्यात घ्यावे, तसे त्यांचे झाले आहे? विजय दर्डा कॉग्रेसचे खासदार आहेतच. पण ते कायबीइन लोकमतचे कंपनी अध्यक्ष सुद्धा आहेत. किंबहूना त्याच कंपनीच्या व्यावहारिक ताकदीमुळे त्यांना कोळसाखाण मिळू शकली आहे. मग एवढी लपवाछपवी कशाला?

बाकीच्या जगासाठी विजय दर्डा कॉग्रेस खासदार असतील. पण निखिल व त्याच्या वाहिनीवरील सहकार्‍यांसाठी तेच विजय दर्डा मालक आहेत ना? मग आमचे विजय दर्डा आणि आमचे देवेंद्र दर्डा यांच्यावर एफ़ आय आर दाखल असे अभिमानाने सांगायला नको काय? तसे सांगितले असते तर तो बातमीशी प्रामाणिकपणा म्हणता आला असता. पण सच्चाई व प्रामाणिकपणा यांच्याशी निखिलचे सात जन्माचे वैर असल्यावर दुसरे काय होणार? मंगळवारी सीबीआयने एफ़ आय आर दाखल केले नसते आणि त्यासाठी शुक्रवार शनिवार उजाडला असता तर कायबीइन लोकमतवर ही सच्चाई निखिल उखाण्यात मालकाचे नाव घेऊन तरी दाखवू शकला असता काय? इतरांसाठी विजय दर्डा कॉग्रेस खासदार असतील, पण निखिल व लोकमतसाठी ते आमचे मालक असा अभिमानाने उल्लेख व्हायला हवा ना?

आणि होय, आमीर खानची पहिली मराठी मुलाखत किंवा तत्सम काहीही फ़डतुस बाबतीत आम्हीच पहिले, असे दावे करण्यात धन्यता मानणार्‍या निखिलने तर अभिमानाने सांगायला हवे होते, देशभर गाजणार्‍या व संसदेचे कामकाज दिर्घकाळ ठप्प करणार्‍या कोळसा घोटळ्यातही संपुर्ण देशातला पहिला एफ़ आय आर आमच्या कायबीइन लोकमतच्याच वाट्याला आलाय. मग मी सुद्धा दिलखुलासपणे निखिलसह त्याच्या प्रकाश बाळ, हेमंत देसाई इत्यादी भडभुंज्यांची प्रशंसाच केली असती. सानंदा प्रकरणात किंवा आदर्श घोटाळ्यात विलासराव देशमुखांना थोडी जरी लाज असेल तर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असे छाती फ़ुगवून सांगणार्‍या हेमंत देसाईंनी आता कुठल्या खाणीतल्या कोळश्याने आपले तोंड काळे केले आहे? विजय, राजेंद्र व देवेंद्र दर्डासह निखिलला लाज नाही असे देसाईंना म्हणायचे आहे काय? नसेल तर ते कुठे दडी मारून बसले आहेत? निखिलची लाज शोधायला त्यांनी आतापर्यंत कायबीइन लोकमतच्या स्टूडियोमध्ये यायला हवे होते ना? कसे येतील, त्यासाठी आधी आपल्या गाठीशी थोडी का होईना लाज असायला हवी ना? इथे मामला कोडगेपणाचा आहे. म्हणतात ना, कोडग्या कोडग्या लाज नाही, कालचे बोलणे आज नाही.

आवडले तर लाइक बरोबर शेअर सुद्धा करा

http://bhautorsekar.blogspot.in/2012/05/blog-post_9562.html

मुर्खनाम शिरोमणी

मागल्या वर्षी बिहारच्या विधानसभा निवडणूका जवळ आल्या होत्या, तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना बिहारमध्ये प्रचाराला येऊ देणार नाही; अशा धमक्या बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिल्या होत्या. एका राज्याचा म
ुख्यमंत्री असा दुसर्‍या राज्याच्या मुख्यमंत्र्याला धमक्या देऊ शकतो काय? भारतीय राज्यघटना एका पक्षाच्या नेत्याने दुसर्‍या पक्षाच्या नेत्याला अमुक एका राज्यात यायला बंदी करण्याचे अधिकार दिले आहेत काय? नसतील तर तेव्हा कोण्या वाहिनीला किंवा त्यावरील दिवट्या बुद्धीमंतांना त्यातल्या घटनात्मक विरोधाभासाचा साक्षात्कार का झाला नव्हता? त्यापैकी कोणीच नितीशकुमार यांना तेव्हा कानपिचक्या देऊन राज्यघटनेचे हवाले देत उलट प्रश्न विचारले नव्हते ना? उलट त्याच धमक्यांचे सेक्युलर पराक्रम म्हणून कौतुक चालविले होते. त्यात आपले मुर्खनाम शिरोमणी कायबीईन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांचाही समावेश होता. आज त्यांनाच राज ठाकरे यांनी बिहारींना मुंबई-महाराष्ट्र बंद करू म्हटल्यावर राज्यघटना आठवली आहे. मग ही राज्यघटना तेव्हा तयार झाली नव्हती आणि आजच निर्माण झाली असे म्हणायचे आहे काय? वाहिन्या व माध्यमे यांच्या सेक्युलर खोटारडेपणाचा व बदमाशीचा यापेक्षा आणखी कुठला पुरावा देण्याची गरज आहे काय? सेक्युलर म्हणजे मराठी विरोध आणि सेक्युलर म्हणजे हिंदूच्या मुळावर येणे, असेच हळुहळू स्पष्ट होत आहे ना? मग समस्या काय आहे? प्रादेशिक अस्मिता किंवा हिन्दू-मुस्लिम अशी समस्याच नाही. सेक्युलर पाखंड हीच आज आपल्या देशाला भेडसावणारी समस्या आहे ना? मग तिच्यातूनच देशाला मुक्त करावे लागणार आहे ना?

डॉबरमना सज्जना श्वान पंथेची जावे


श्वान हे अत्यंत इमानदार जनावर असते असे अवघ्या जगात मानले जाते. पण त्याचे इमान हे त्याला पाळणार्‍याशी असते. मग तो पाळणारा गुन्हेगार आहे किंवा चारित्र्यसंपन्न माणुस आहे, याच्याशी श्वानाच्या इमानाला कर्तव्य
 नसते. अलिकडे ही इमान दारी बांधण्या्ची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात मानवी जमातीनेही आत्मसात केली आहे. त्यामुळे ज्या पैसेवाल्यांना चार पायांचे श्वान म्हणजे कुत्रे पाळण्य़ाचा किंवा त्यातले जातिवंत कुत्रे पाळण्याच साफ़ कंटाळा आलेला आहे, त्यांनी असे मानवी श्वानपंथीय पाळण्याचा श्रीमंती छंद जोपासलेला दिसतो. त्यातले काही श्वान मग भुंकण्यात वाकबगार म्हणून ख्यातकिर्त झालेले आहेत तर काहींनी सामुहिक भुंकण्याचे नवनवे विक्रम करुन दाखवले आहेत. मग अशा श्वानांच्या मालकांनी त्यांच्यासाठी खास थेट प्रक्षेपणाच्या सुविधाच उभ्या करून दिल्या आहेत. उपग्रहवाहिन्या म्हणून त्या ओळखल्या जातात. अशा वाहिन्यांमध्ये कायबीइन लोकमत आघाडीवर असेल तर नवल नाही. कारण ज्यांचा जन्मच लायका कुत्रीने अवकाशात झेप घेण्याच्या युगात झाला, त्यांच्याकडून तशीच अपेक्षा करायला हवी ना?

जेव्हा उपग्रहाचा जमाना सुरू झाला नव्हता आणि नुसतेच अग्नीबाण सोडून प्रक्षेपणाची क्षमता वाढवली जात होती, तेव्हा अवकाशात ज्या पहिल्या सजीव प्राण्याला पाठवण्याचा प्रयोग यशस्वी झाला, त्याचे श्रेय लायका नावाच्या कुत्रीला होते. सोवियत युनियनच्या अवकाशयानातून सर्वप्रथम तिनेच अवकाशात झेप घेतली. बहुधा त्याच वर्षी निखिल वागळेचा जन्म झालेला असावा. त्यामुळे उपग्रहाच्या वाहिनीवरून भुंकण्याचे नवनवे विक्रम तो नेहमी प्रस्थापित करत असतो. सोमवारी ३ सप्टेंबर रोजी त्याने मनसेचे आमदार प्रविण दरेकर यांच्यावर सलग पाच मिनिटे भुंकण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला. अर्थात जो खरे बोलतो त्याला भुंकण्याची गरज नसते. आणि दरेकर खरेच बोलत असल्याने त्यांना आवाज चढवावा लागला नाही. पण समोर येण्यार्‍या सत्याला भेदरल्यामुळे निखिलला भुंकण्याखेरीज गत्यंतर नव्हते. म्हणूनच की काय हा डॉबरमन श्वान पंथेची गेला.

केरळ व अन्य राज्यात स्थलांतरीत कामगार म्हणजे अन्य राज्यातून येणार्‍या कामगार श्रमिकांची रितसर नोंद केली जाते. पोलिसांकडे तशी नोंद व्हावी लागते, असा मुद्दा आमदार दरेकर मांडत होते. तर निखिलने थेट त्यांच्यावर डॉबरमन या जातिवंत कुत्र्यालाही मागे टाकील, एवढ्या भसाड्या आवाजात भूंकायला आरंभ केला. जेणे करून प्रेक्षकांना दरेकर सांगत असलेले सत्य ऐकता येऊ नये. उलट दरेकर खोटे बोलत असल्याचे निखिल भुंकून भुंकून सांगत होता. आणि ज्याअर्थी निखिल खोटे म्हणतो त्याअर्थी दरेकर खरे सांगत असणार याची मला खात्री पटली होती. म्हणूनच मी मंगळवारी इन्टरनेटवर शोध घेऊन सत्यशोधनाचा प्रयास केला. आणि दरेकरच खरे असल्याचा पुरावाच मला मिळाला. मला आश्चर्य वाटले ते कॉग्रेस आमदार व प्रवक्ते भाई जगताप यांचे. कारण मी त्यांना बुद्धीमान व विवेकी अभ्यासू नेता म्हणून ओळखतो. त्यांनीही निखिलच्या धडधडीत खोटेपणाला दुजोरा देण्याचा प्रमाद केला, त्यात माझी मोठी निराशा झाली. कारण जगताप स्वत: कामगार नेता आहेत आणि त्यांनी निखिलच्या नादी लागून आपले अज्ञान असे जगासमोर आणायला नको होते. कारण केरळा्त अशी स्थलांतरीत परप्रांतिय कामगारांची नोंद होते, ही नुसती बातमीच नाही तर त्यावर तिथल्या विधानसभेत चर्चाही झालेली आहे. इथे त्या बा्तमीचा इंतरनेट दुवा मी देत आहे तो निखिल बघेल असे मला वाटत नाही. कारण तो अज्ञानातच आनंदी आहे व राहो. पण जगताप यांनी जरूर बघावा.

प्रेस ट्रस्टने ११ जुलै २०१२ रोजी दिलेल्या बातमीत केरळमध्ये सरकारच्या हुकूमान्वये पोलिसांनी ६३,२०० परप्रांतिय स्थलांतरीत कामगाराची नोंद केल्याची माहिती गृहमंत्री तिरुवंकूर राधाकॄष्णन यांनी विधानसभेत दिल्याची ही बातमी आहे. तिथे केरळात मनसेचे राज्य नाही, तर भाई जगताप यांच्याच कॉग्रेस पक्षाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या अघाडीचे सरकार आहे. तेव्हा निखिलच्या भुंकण्याला दाद देऊन जगताप यांनी आपली प्रतिष्ठा धुळीस मिळवू नये एवढीच अपेक्षा. मुद्दा इतकाच, की दरेकर देत असलेली माहिती शंभरटक्के खरी होती. मग निखिल त्यांच्यावरच खोटेपणाचा आरोप करून भूंकत का होता? कारण सोपे होते. त्याच दिवशी त्याच्या मालक दर्डा फ़ॅमिलीच्या कंपनीवर सीबीआयच्या धाडी पडल्या होत्या ना? ते जे कोणी सीबीआयवाले तिथे आले वा धाडी घालत होते, त्यांच्यावर भूंकायची हिंमत नसली मग या डॉबरमनाने दुसरे काय करावे? निदान मालकाची अब्रू जाते आहे त्यावरचे लोकांचे लक्ष उडवण्याचे इमान तरी दाखवायला नको काय? त्यासाठी मग दरेकरना ‘दर्डा’वत शिकारीचा आव आणणे त्याला भाग होते. कारण बाकी सगळ्या चॅनेलवर दर्डा कंपनीचे धिंडवडे निघत असताना त्याची लपवाछपवी करायची, तर अन्य कुणाच्या अंगावर भुंकायला नको का? राज ठाकरे कोण लागून गेलेत; असे म्हणतानाचा निखिलचा आवेश असा होता, की सीबीआयवाले कोण लागून गेलेत. असेच त्याला भुंकताना म्हणायचे असावे. पण तिकडे तोंड वळवले तर कायबीईन लोकमतच्या शेअर्सचीही तपासणी व्हायची भिती असेल ना? त्यापेक्षा दरेकरवर भुंकण्यात डॉबरमना सज्जनाने आपली ताकद व बुद्धी खर्ची घातली. तिथे आपली खोटेपणाची भूक भागवून घेतली

आवडले तर लाइक बरोबर शेअर सुद्धा करा

http://www.ndtv.com/article/south/kerala-police-to-identify-lakhs-of-unregistered-migrant-labourers-208005



http://www.dailypioneer.com/state-editions/kochi/90613-kerala-mulls-law-for-migrant-workers-registration.html


http://www.mid-day.com/news/2012/sep/030912-mumbai-Raj-Kerala-govt-registers-migrants-so-why-cant-we.htm


http://www.ndtv.com/article/south/over-60-000-migrant-workers-register-with-kerala-police-242172


http://bhautorsekar.blogspot.in/2012/02/blog-post_27.html
 — withSuresh Chiplunkar and 5 others.