Friday, September 7, 2012

सानेगुरूजी म्हणतात, निखिलसारखे पत्रकारच दंगली पेटवतात


अमळनेर गांवात आज विश्वधर्ममंडळाच्यावतीने थोर, पैगंबर महंमद यांची पुण्यतिथि साजरी होणार होती. विश्वधर्ममंडळ तेथे नवीनच स्थापन झाले होते. नवीन जीवनाचा तो एक लहानसा अंकुर होता. हजारो वर्षे जो विशाल भारत बनत आहे, त्याच्याच सिद्धीसाठी ते लहानसे मंडळ होते. जे महाभारताचे महान वस्त्र परमेश्वर अनंत काळापासून विणीत आहे, त्या वस्त्रांतील एक लहानसा भाग म्हणजे ते मंडळ होते.

हिंदुस्थानभर हिंदुमुसलमानांचे दंगे सुरू असताना असे मंडळ स्थापण्याचा बावळटपणा कोणी केला? ही स्वाभिमानशून्यता कोणाची? या दंग्याच्या आगीत तेल ओतल्याचे सोडून हे नसते उपद्व्याप कोण करीत होते?

काय सर्व हिंदुस्थानभर दंगे आहेत? नाहीत. ती एक भ्रांत कल्पना आहे. हिंदुस्थानांतील दहावीस शहरांत मारामारी झाली असेल. परंतु ही दहावीस शहरे म्हणजे कांही हिंदुस्थान नव्हे. लाखो खेड्यापाड्यांतून हिंदुमुसलमान गुण्योगोविंदाने नांदत आहेत. त्यांचे संबंध प्रेमाचे व जिव्हाळ्याचे आहेत. शेकडो प्रामाणिक मुसलमान नोकर हिंदूंची मुले खेळवीत आहेत. एकमेकांच्या ओटीवर हिंदुमुसलमान पानसुपारी खात आहेत. हिंदुमुसलमानात सलोखा आहे. 

परंतु वर्तमानपत्राना हे खपत नसते. ऐक्याचे व प्रेमाचे वारे पसरविण्याऐवजी वर्तमानपत्रे द्वेषमत्सराचे विषारी वारेच सोडत असतात. हिंदुमुसलमानांच्या दग्यांची, तिखटमीठ लावून विषारी केलेली वार्ता वर्तमानपत्रे जगभर नेतात, आणि कोट्यवधि हिंदुमुसलमानांची मने अशांत केली जातात. आग नसेल तेथे आग उत्पन्न होते. प्लेग नसेल तेथे प्लेगाचे जंतु जातात. हिंदुस्थानची दैना झाली आहे तेवढी पुरे, असे या वर्तमानपत्रांना वाटत नाही. भडक काहीतरी प्रसिद्ध करावे, पैसे मिळावे, अंक खपावे हे त्यांचे ध्येय. मग भारत मरो का तरो. समाजाला आग लागो की समाजाची राखरांगोळी होवो. 

मुंबईला एका इमारतीस आग लागते. परंतु आपण त्याच गोष्टीस महत्त्व देतो. मुंबईतील लाखो इमारती देवाने सुरक्षित ठेविल्या होत्या हे आपण विसरतो. त्याप्रमाणे एके ठिकाणी दंगा झाला तर त्यालाच आपण महत्त्व देतो. इतर लाखो ठिकाणी प्रेमळ शांतता आहे, ही गोष्ट आपण डोळ्याआड करून उगीच आदळआपट करु लागतो. प्रत्येक धर्मांतील संकुचित वृत्तीचे लोक अशा प्रकारे आपल्या श्वासोच्छवासाबरोबर अश्रद्धा घेऊन जात असतात. जगाची होळी पेटत ठेवतात.  

   पुज्य सानेगुरूजी यांच्या ‘धडपडणारी मुले’ या ग्रंथातील ‘स्वामी’ नावाच्या कथेतील हा उतारा आहे. साठ वर्षापुर्वीच सानेगुरूजींचे निधन झाले. पण तेव्हाच त्यांनी हिंदू-मुस्लिम व भांडणे कोण लावून देतो आणि त्यावर आपली पोळी कोण भाजून घेतो ते लिहून ठेवले आहे. आपल्यावर त्याच सानेगुरूजींच्या राष्ट्र सेवा दलाचे संस्कार असल्याचा दावा निखिल वागळे आणि त्याच्या चॅनेलवर जमणारे प्रकाश बाळ, हेमंत देसाई, निळू दामले, डॉ.कुमार सप्तर्षी, किंवा अन्य चॅनेलवर दिसणारे डॉ. रत्नाकर महाजन, प्रताप आसबे, समर खडस इत्यादी अतिशहाणे करता असतात. त्यांची भाषा व बोलणे सानेगुरूजी यांच्या विचारांच्या जवळपास तरी येणारे आहे काय? की हेच दिवटे गुरूजींच्या शिकवणीचे विकृतीकरण करत असतात?

4 comments:

  1. वागळ्याला हे सर्व करताना आनंदाच्या उकळ्या फ़ुटतात ख-या पण त्याच्या याच आततायीपणापायी तो एक दिवस हाकनाक जाणार आहे असे मला वाटते...

    ReplyDelete
    Replies
    1. निखिल वागळे, कुमार केतकर, प्रकाश बाळ, हेमंत देसाई, निळू दामले, डॉ.कुमार सप्तर्षी, किंवा अन्य चॅनेलवर दिसणारे डॉ. रत्नाकर महाजन, प्रताप आसबे, समर खडस, वगैरे मंडळींना पोसणारे राज्य करते ह्या राज्यात आहेत तो पर्यंत हे सगळे वळवळणार !!!!!!

      Delete
  2. आजच तुमचा लेख वाचला, लिखाण आवडले, पध्दत आवडली.........

    ReplyDelete
  3. भाऊंनी आरशात पाहून लेखन करावे...

    ReplyDelete