Monday, November 30, 2015

डब्बा है रे डब्बा. अंकलका टिव्ही डब्बा

Image courtesy: Facebook page

गेल्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या आधीपासून नरेंद्र मोदी यांच्यावर मार्केटींगचा आरोप होत राहिला. गुजरातमध्ये आपण खुप विकास वा प्रगती केली, असे दावे मोदींनी तेव्हाही केले नव्हते. फ़क्त अन्य पुरोगामी राज्ये आणि गुजरात यांची तुलना मोदी करीत राहिले. तेव्हा त्यांच्या मूळ दाव्यांना खोडण्यापर्यंत पुरोगाम्यांची मजल गेली होती. पण उलट गुजरात दंगलीचे जे बारा वर्ष मार्केटींग चालले, ते मात्र प्रत्येक दिवसागणिक कोर्टातही खोटे पडत चालले होते. त्याबद्दल माध्यमे वा पुरोगाम्यांनी चकार शब्द कधी बोलला नाही. एकूणच सामान्य माणसाला ही मार्केटींग काय भानगड आहे, त्याचा फ़ारसा गंध नसतो. म्हणूनच असे अनेक शब्द सरसकट माध्यमातून वा बोलण्यातून लोकांच्या माथी मारले जात असतात. त्यातून काही प्रतिमा व कल्पना लोकांच्या डोक्यात भरवल्या जातात. त्या खर्‍या नसल्या तरी सतत माथी मारून खर्‍या वाटाव्यात, अशी स्थिती निर्माण केली जाते. गुजरात दंगल असो किंवा फ़ेअर एन्ड लव्हली सारखी क्रीम असोत. त्याच्या मार्केटींगची एक ठराविक रणनिती असते. त्यातला पहिला भाग असा आसतो की तुमच्यात न्युनगंड निर्माण करणे आणि मग त्यावर आपले मार्केटींग माथी मारणे. त्वचेचा काळेपणा किंवा निमगोरेपणा ही त्रुटी असल्याचे एकदा तुमच्या डोक्यात बसले, मग तुम्हाला गोरे होण्याची अनिवार इच्छा होते. त्यातून मग चारपाच दिवसात गोरेपण देणार्‍या क्रीमचा धंदा सुरू होतो. त्यामुळे तुम्हाला गोरेपण मिळत नाही. पण गोरे होत नसलो तरी आपण अमूक एक क्रीम वापरतो, म्हणून गोरे अशा भ्रमात तुम्ही न्युनगंडाला दाबू शकता. स्पष्टपणे ही चाललेली दिशाभूल असते. त्याला जितका मार्केटींगचा मारा कारणीभूत असतो, तितकाच तुमच्यातला न्युनगंडही जबाबदार असतो. तुम्ही आपल्याच त्वचेच्या रंगाने लाजत असता, हे अशा मार्केटींगचे खरे भांडवल असते.

गुजरात दंगलीत मुस्लिम वा हिंदू आपापल्या लोकसंख्या प्रमाणातच मारले गेले आणि दोन्ही धर्माच्या लोकांनी आपापल्या प्राबल्याच्या भागात तितकीच हिंसा केली. पण त्यात मुस्लिम मारले गेल्याचा प्रचंड गवगवा करण्यात आला आणि हिंदूंच्या हत्या झाल्याचा तपशील सातत्याने झाकला गेला. सहाजिकच गुजरात बाहेरच्या हिंदूंच्या मनात त्यातून अपराधगंड निर्माण करण्याचा सपाटा माध्यमातून व विविध व्यासपीठावरून लावला गेला. त्याचा परिणाम असा झाला, की भाजपाचेही अनेक कार्यकर्ते व नेते मोदींच्या बचावाला पुढे येऊ शकले नाहीत. पण जेव्हा गुजरात दंगलीचा बाजार उठू लागला आणि मोदींनी सत्ताकाळात केलेल्या विकास व प्रगतीच्या गोष्टी बाहेर येऊ लागल्या; तेव्हा पुरोगामी मार्केटींगची तारांबळ उडाली. म्हणून मग मोदी खोटे बोलतात व प्रगतीचे खोटे आकडे सांगतात, असा भडीमार सुरू झाला. त्यात कुठल्याही सत्यापेक्षा आकड्यांचा मारा जास्त होऊ लागला. मार्क ट्वेन म्हणतो, एक साधे खोटे असते आणि दुसरे धडधडीत खोटे असते. पण त्याच्याहीपेक्षा भयंकर धोकादायक खोटे म्हणजे आकडेवारी! त्याच तंत्राचा वापर मग मोदी विरोधात सुरू झाला. पण बारा वर्षाच्या सातत्याने बोलल्या गेलेल्या खोटारडेपणाने कंटाळलेल्या लोकांनी कुठलीच आकडेवारी मान्य केली नाही आणि मोदींनी लोकसभा जिंकली. तेव्हा दिर्घकाळ राजकीय मार्केटींग करणारेच मोदींचा विजय मार्केटींगचा विजय असल्याचे ओरडू लागले. ते नाकारण्यात अर्थ नाही. पण तेच सत्य असेल, तर आजवरचा देशातील पुरोगाम्यांचा वरचष्माही मार्केटींगच असणार ना? नव्हे आहेच व होताच. कारण नेहरू वा त्यांचे वारस यांचा बाजार मांडण्यापलिकडे पुरोगामी म्हणून काय होऊ शकले होते? नातूही पंतप्रधान होऊन गेल्यावर रोजगार हमी म्हणून खड्डे पाडायची वा खड्डे भरण्याची कामे काढावी लागणे, हा विकासाचा निकष होता की पुरावा होता?

असो, तर असे राजकीय वा बाजारू उत्पादनाचे मार्केटींग होत असते. ग्राहक वा सामान्य माणसाच्या मनात अपराधगंड वा न्युनगंड उत्पन्न करून, त्याच्या गळी आपला माल वा आपली भूमिका मारण्याला मार्केटींग म्हणतात. त्यातून तुमची नसलेली गरज निर्माण केली जाते आणि त्यासाठी तुमच्या माथी तयार माल मारला जातो. आजकाल अशीच एक जाहिरात प्रत्येक वाहिनीवर धुमाकुळ घालते आहे. एक गृहस्थ नवा टिव्ही खरेदी करून आणतो आणि शेजारीपाजारी बघायला जमा होतात. टिव्ही लावताच, तो एचडी या तंत्राचा नाही हे लक्षात येते आणि एक शेजारी म्हणतो, ‘इसमे तो एचडी नही है. तो ये टिव्ही नही डब्बा है’. झाले, तिथली एक मुलगी गृहस्थाच्या भोवती गिरकी घालून म्हणते, डब्बा है रे डब्बा, अंकलका टिव्ही डब्बा! मग तीच ओळ गुणगुणत कॉलनीतली मुले फ़ेर धरून नाचतात. तो गृहस्थ आपल्याच नव्या टिव्हीसमोर हिरमुसलेला दिसतो. जाहिरात संपली! गेले काही दिवस अखंड झळकणार्‍या या जाहिरातीतून कोणता संदेश बघणार्‍याच्या मनात ठसवला जात असतो? त्याने आणलेला टिव्ही एचडी तंत्रज्ञानाचा नसल्याने डब्बा आहे. निरूपयोगी आहे. एक नवी जादा सुविधा नसल्याने टिव्ही डब्बा म्हणजे निरूपयोगी होतो काय? नसेल तर यातून ती जाहिरात काय करते? ग्राहकाच्या वा ज्यांच्या घरात तसा नव्या तंत्राचा टिव्ही नाही, त्यांच्यात न्युनगंड निर्माण करते. अशा जाहिरातीत मुद्दाम शाळकरी वयातली मुले हेतूपुर्वक वापरली जातात जेणेकरून ती मुले आपल्या आईबापांवर नवा टिव्ही घेण्य़ासाठी दबाव आणू लागतील. त्या वयातल्या मुलांनाच आईबापाच्या विरुद्ध कंपनीचे सेल्समन म्हणून अशा मार्केटींगमधून उभे केले जाते. मुलेच आपल्या पालकांच्या मनात मग न्युनगंड ठसवण्याचे काम करू लागतात, याला मार्जेटींग म्हणतात. नसलेली चुक वा त्रुटी तुमच्या माथी मारून तुम्हाला पापी ठरवायचे आणि ‘पापमुक्त’ व्हायला उद्युक्त करायचे.

सध्या देशात असंहिष्णूतेचे मार्केटींग भयंकर जोरात सुरू आहे. सामान्य माणसाला जे अनुभवता येत नाही वा दिसत जाणवत नाही, अशी असंहिष्णूता दिडदोन महिने आपल्या माथी मारली जाते आहे, त्याचे रहस्य अशा मार्केटींगमध्ये शोधावे लागेल. एका बाजूला ‘लोकमत’च्या जळगाव येथील कार्यालयावर हिंसक हल्ला मुस्लिम जमाव करतो आणि त्याचा निषेधही कोणी करीत नाही. उलट संपादकच माफ़ी मागतात. दुसरीकडे राजरोस हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचा सपाटा चालू आहे. त्याचा विरोधही होत नाही. तरी हिंदू बहुसंख्यांकच असंहिष्णू असल्याचा ओरडा मात्र जोरात चालू आहे. हिंदू त्यातल्या खोटारडेपणाचा निषेधही करायला बिचकत आहेत. अगदी अनेक पत्रकार व माध्यमकर्मी खाजगीत बोलताना त्याची कबुली देतात. पण उघड बोलायला घाबरतात. कारण स्पष्ट आहे. प्रत्येकाला आपली ‘बुद्धी डब्बा’ अशी टवाळी होण्याच्या भयगंडाने पछाडले आहे. ज्यांनी या असंहिष्णूतेचा पहिला गजर करून साहित्य अकादमीचा पुरस्कार परत करायची मोहिम सुरू केली, त्यालाच आता आपल्या कर्माची फ़ळे भोगायची पाळी आलेली आहे. कवि उदय प्रकाश यांनी या मोहिमेचा मुहूर्त केला होता. कालपरवा त्यांनी कुठल्याशा मोदींच्या भाषणाचे कौतुक करताच, उदय प्रकाश प्रतिगामी असल्याचे आरोप सुरू झाले. रातोरात उदय प्रकाशची ‘बुद्धी डब्बा’ झाली. याला मार्केटींग म्हणतात. जिथे तुम्हाला आपली विवेकबुद्धी वापरून काही बोलायला, मतप्रदर्शन करायला स्वातंत्र्य नसते, त्याला अविष्कार स्वातंत्र्य म्हणतात. ठराविक एक भूमिका एकदा पुरोगामी म्हणून फ़तवा निघाला, मग प्रत्येकाने त्याचे पालन करायचे असते आणि त्याच मर्यादेत राहून एकसूरात टाळ्या पिटत म्हणायचे असते, ‘डब्बा है रे डब्बा, अंकलका टिव्ही डब्बा’! मग झालात पुरोगामी. मग झालात बुद्धीमंत! मग झालात हायडेफ़ीनेशन सेक्युलर!

देशद्रोही, दहशतवादी आणि परकीय हस्तक //// महायुद्धाची छाया (४)

  

कुठलाही देश वा समाज एक व्यवस्था असते. तिथे काही नियम, कायदे व त्यांच्या पायावर उभ्या केलेल्या काही संस्था असतात. त्यातून तो समाज नियंत्रित होत असतो आणि एकजीव घटक म्हणून जगत असतो. उदाहरणार्थ अकस्मात डोळ्यात काही कुसळ वा कचरा जाण्याची शक्यता असेल तर विनाविलंब आधी पापणी डोळा झाकते आणि डोळा वाचवायचा प्रयत्न करते. तरीही गफ़लत झाली तर डोळ्यात गेलेला कचरा काढायला हात पुढे सरसावतो. कुठला हल्ला शरीरावर होणार असेल तर हात आधी डोके वाचवायचा प्रयत्न करतात आणि पाय धोक्याच्या स्थळापासून देहाला सुरक्षित जागी घेऊन जाण्यासाठी आपोआपा कार्यरत होतात. त्याला एकजीव व्यवस्था म्हणतात. जिथे आपोआप कार्यरत होणारी व्यवस्था असते. त्यातल्या एकाही घटकाने अवयवाने ठरल्या कामात दिरंगाई वा हलगर्जीपण केला, तरी शरीराला इजा होऊ शकते, हानी होऊ शकते. पण सहसा असे होत नाही. म्हणूनच त्याला एकजीव व्यवस्था म्हणतात. समाज म्हणजे शेकडो हजारो वा कोट्यवधी लोक असतात आणि त्यांनी एकत्र जगताना काही अशाच व्यवस्था उभ्या केलेल्या असतात. त्यात प्रत्येकाच्या जबाबदार्‍या ठरलेल्या असतात. ते उत्तरदायित्व प्रत्येकाने पार पाडण्याचे कर्तव्य ही त्याची सामाजिक तितकीच कायदेशीर बांधिलकी असते. उलट त्याच्याशी विपरीत वागू लागेल, तो अशा समाजासाठी विघातक असतो, धोका असतो. असा धोका उत्पन्न केला, मग ते शरीर वा तो समाज संपायला वेळ लागत नाही. तसा काही धोका उत्पन्न होऊ नये म्हणून जी सावधानता बाळगली जाते, तिला सुरक्षा म्हणतात. जी गोष्ट माणसाच्या देहासाठी असते तीच समाज व देशाच्या बाबतीत लागू असते. जेव्हा तुमच्याच शरीरातील कुठला अवयव हानीला पुरक वागू लागतो, तेव्हा तो शरीराला म्हणजे पर्यायाने तुमच्या जीवाला धोका बनलेला असतो.

असा धोका जेव्हा समाजजीवनात निर्माण होतो, त्याला गद्दार वा देशद्रोही म्हणतात. हेरगिरी म्हणूनच दोन प्रकारची असते. एका बाजूला समाजाला घातक असे शत्रूचे हस्तक गद्दार असतात, तेही हेर असतात, पण शत्रूला फ़ितूर झालेले असतात. उलट अशा गद्दारांना रोखणारे व त्यांच्याशी दोन हात करणारेही काही असतात, त्यांना सुद्धा हेरच म्हटले जाते. जे समाजाचे हित जपण्यासाठी सतत कार्यरत असतात. शत्रूचा हल्ला हा सैनिकी आक्रमणाने होत असतो, तसाच हस्तकांच्या मदतीने एखादा देश पोखरून नष्ट करण्याच्या मार्गानेही हल्ला होऊ शकत असतो. त्यातला दुसरा मार्ग खुप स्वस्त व कमी हानिकारक असतो. शत्रू देशाची सुरक्षा व्यवस्था पोखरून निकामी केली, तर लढाईशिवाय त्याच्यावर विजय मिळवता येतो. त्यासाठीच सुरक्षेचा उत्तम मार्ग म्हणून सतत शत्रूला आतून पोखरण्याचे उद्योग केले जातात. अवघे दहा हल्लेखोर मुंबईत पाठवून पाकिस्तानने दोनशे माणसे मारली आणि भारताचे कित्येक पटीने नुकसान केले. शिवाय भारतीयांच्या मनात शंका संशयाचे रान उठवले. दहशतीने कोट्यवधी भारतीयांना असुरक्षित मानसिकतेमध्ये ढकलून दिले. जे दोनतीन युद्धातून पाकिस्तानला साधता आलेले नाही, त्याच्या अनेपटी्ने युद्धाशिवाय जिहादी मार्गाने पाक साधू शकला. हे त्यांच्या सैन्याचे कर्तृत्व नाही, तर त्यांनी भारतात जे हेर हस्तक उभे केलेत, त्यांच्यामुळे शक्य झाले आहे. असे हस्तक हे नेहमीच घातपाती वा गुंड गुन्हेगार नसतात. जे असे हिंसक कृत्य करतात, त्यांच्यापेक्षा घातक व भेदक असे अस्त्र असते, उजळमाथ्याने वावरणारे शत्रूचे हस्तक! मुंबई हल्ल्याची तयारी करण्यासाठी हेडली हा अमेरिकन पाकिस्तानी वापरला गेला. तो इथे येऊन अनेक मान्यवरांमध्ये उठबस करून गेला, महेश भट यांच्या पुत्राशी त्याने जवळीक साधली होती. हेडली दिसायला वागायला भयंकर व्यक्ती नव्हता ना?

कालपरवा ज्यांना पाक हेरखात्याचे हस्तक म्हणून पकडण्यात आले आहे, ते अटकेपर्यंत इथे उजळमाथ्याने जगत वावरत होते. आपण त्यांच्यावर कुठली शंका देखील घेऊ शकलो नव्हतो. कारण आपण सामान्य माणसे असतो आणि दिसते त्यावर विश्वास ठेवत असतो. पण विश्वास असेल तरच विश्वासघात करता येत असतो ना? म्हणून मग शत्रू देशाला वा प्रतिस्पर्ध्याला आधी विश्वास संपादन करावा लागतो. हेरगिरीचे काम असेच चालते. आधी अशी माणसे तुम्हाला विश्वासात घेण्यासाठी सर्व मदत करतात आणि जवळीक साधतात. अगदी उपकार वाटावे इतकी मदत करतात. कधीकधी तुमच्या इच्छाआकांक्षा, हव्यास, स्वार्थ, रागलोभ हुडकून त्याला खतपाणी घालतात आणि तुमच्या मानसिकतेवर कब्जा मिळवतात. एकदा तुम्ही त्या जाळ्यात फ़सलात, मग तुम्ही त्याच्या हातची कठपुतळी बनून जाता. मगच तुमचा वापर त्याचे हेतू साध्य करण्यासाठी होत असतो. थोडक्यात कायद्याच्या वा नियमाच्या कुठल्याही निकषावर टिकणार नाही, असेच काम तो तुमच्याकडून प्रेमाने किंवा सक्तीने करून घेऊ शकत असतो. त्याचा तपशील उघड झाल्यावर आपण जागे होतो. ही कामे विभिन्न प्रकारची असतात. फ़क्त तुमच्या देशात घातपात, बॉम्ब फ़ोडणे इतकेच परकीय हस्तकाचे काम नसते. त्याखेरीज अनेक मार्गाने तुमच्या ज्या व्यवस्था, संस्था, जीवनशैली नियंत्रित करणार्‍या यंत्रणा आहेत, त्यात बिघाड करणेही शत्रूला लाभदायक असते. कारण त्यातून तुमचा समाज विस्कळीत होऊ लागतो. त्याला आपलीच सुरक्षा यंत्रणा धोकादायक वाटू लागते आणि देश, समाज किंवा राष्ट्र यातली एकजीवता धोक्यात येते. खिळखिळी होऊ लागते. जेव्हा अशी स्थिती येते, तेव्हा तुम्ही आपला बचाव करायला नालायक होता आणि म्हणूनच समाज देशालाही वाचवण्याची इच्छा आकांक्षा गमावून बसता. परकीय हस्तक मायभूमीची  तीच अवस्था करून टाकतात, की तो लढायची इच्छा गमावून बसतो.

तुमच्या देशात तुमचे व्यक्तीगत संरक्षण कोणी करीत नाही. तुमच्या कुटुंब भावनांची कदर होत नाही. तुम्ही इथे सुरक्षित नाही, अशी धारणा जनमानसात रुजली, की देश खिळखिळा व्हायला सुरूवात होत असते. घरदार, गावेवस्त्या सोडून शेकड्यांनी लोक स्थलांतर करू लागतात व सुरक्षित जागा शोधू लागतात. काश्मिरमधुन लाखो हिंदू पडीत पळुन परागंदा झाले आहेत. मागल्या दोन वर्षात सिरीया, इराकमधून लक्षावधी नागरिक निर्वासित म्हणून सुरक्षित आडोसा शोधायला सहकुटुंब पळत सुटले आहेत. पण असे कुठे गुजरात दंगलीनंतर झाले होते काय? असे दादरीच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश वा अन्य कुठे भारतात घडले आहे काय? अगदी ज्या मुस्लिमांवर दंगलीतून अन्याय अत्याचार झाला असे म्हटले जाते, त्यांनी सहकुटुंब घरदार सोडून पळ काढलेला आहे काय? त्याचा अर्थ आजही अशा पिडीतांना भारतीय कायदे व सुरक्षा व्यवस्थेवर विश्वास आहे. पण त्याचवेळी माध्यमापासून बुद्धीमंत यांच्यातला एक वर्ग तसा भयगंड निर्माण करण्यासाठी झटत आहेत. तेव्हा त्यामागचे उद्दिष्ट लक्षात घ्यावे लागते. असंहिष्णुता माजली असे म्हटले जाते आणि ती दिसत नाही, त्याची कारणमिमांसा म्हणून अगत्याची होऊन जाते. ज्यांच्यासाठी ही असंहिष्णुता असुरक्षितता आहे असे म्हटले जाते, ते सुखरूप विश्वासाने इथे जगत आहेत. पण त्यांना जो धोका नाही, तोच धोका असल्याचे त्यांच्या मनात भरवण्याच्या जोरदार मोहिमा मात्र राबवल्या जात आहेत. मग अशा मोहिमा चालवणार्‍यांच्या हेतूचा शोध घेणे अगत्याचे नाही काय? हा भयगंड उभा करून या संहिष्णुता पूजकांना साधायचे तरी काय, असा प्रश्न विचारणे भाग नाही काय? त्याचे उत्तर इथल्या नियम, संस्था व व्यवस्था खिळखिळ्या करणे इतकेच नाही काय? जनतेचा कायद्याच्या राज्यावरला विश्वास उडवून देण्यात लाभ समाजाचा असतो, की देशाच्या शत्रूचा असतो? त्यासाठी झटणारे समाजसेवक असतात की समाजाच्या शत्रूसाठी राबणारे लोक असतात? दहशतवादी हिंसेने भयगंड निर्माण करतात. त्यांच्यापेक्षा हिंसेविना भयगंड निर्माण करणारे अधिक दहशतवादी नसतात का? त्यांना देशहितवादी म्हणावे की दहशतवादी? दाऊद़चे घातपात आणि असंहिष्णूतेची मोहिम यातले परस्पर पुरक संबंध म्हणून ओळखता आले पहिजेत. (अपुर्ण)

Sunday, November 29, 2015

छोटा राजन देशप्रेमी की गुन्हेगार? //// महायुद्धाची छाया (३)



छोटा राजनच्या निमीत्ताने लिहीताना त्याने भारतीय हेरखात्याला मदत केली, असे मी अनेकदा लिहीत असतो आणि ते उघड गुपित आहे. सहाजिकच अनेकजणांना ते रुचत नाही. अशी माणसे निरागस असतात किंवा त्यांना हेरखात्याचे काम व त्याची कुठल्याही देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात असलेली आवश्यकता ठाऊक नसते. पहिली गोष्ट म्हणजे बहुतेकांना हेरखात्याची गरज व त्याच्या कामाची शैली वा पद्धती ठाऊक नसते आणि दुसरी गोष्ट हेरगिरीच्या वाचलेल्या अतिरंजित कथा वा पाहिलेल्या चित्रपटामुळे हेरांविषयी लोकांच्या मनात प्रचंड गैरसमज असतात. हेर म्हणजे जेम्स बॉन्ड वा रॅम्बो अशा काही चमत्कारिक समजूती लोकांमध्ये असतात. त्यामुळेच दाऊद वा राजन यांचा हेरखात्याने वापर केला, मग असे निरागस लोक अस्वस्थ होऊन जातात. कुठल्याही देशाला आपली जी धोरणे वा हेतू कायदेशीर मार्गाने साधता येत नसतात, ते साधण्यासाठी बेकायदा मार्गही अवलंबावे लागत असतात. त्या कृत्याला मायदेशी वा अन्य कुठल्या परदेशातील कायदा मान्यता देत नसतो. पण ती कामे झाल्याशिवाय गाडे पुढे सरकणार नसते. मग त्यातून मार्ग कसा काढायचा? तो मार्ग काढायचेच काम हेरखाती परस्पर उरकत असतात. ज्याची जबाबदारी कुठलेही सरकार जाहिरपणे स्विकारत नाही. त्यात गुंतलेल्या आपल्या हेराला संरक्षणही देऊ शकत नाही. दाऊद भले पाकिस्तानात असेल, पण पाकिस्तान सरकार ते कधीच मान्य करत नाही. तसेच छोटा राजनने भारतीय हेरखात्यासाठी कितीही काम केलेले असेल, भारत सरकार ते कधीही उघडपणे मान्य करणार नाही. तसा आग्रह कोणी हेर वा हेरखात्याचा हस्तकही धरणार नाही. म्हणूनच अशा विषयात बोलताना वा लिहीताना आधी हेरखात्याचे काम व गरज समजून घेण्याची गरज असते. मग गुंड गुन्हेगार असून छोटा राजनची मदत का घेतली, हे लक्षात येऊ शकते.

अर्थात हेरखाती देशात वा परदेशात आपल्या कारवाया करताना फ़क्त गुंड गुन्हेगारांचाच वापर करतात, असेही मानायचे कारण नाही. अगदी सभ्य सुसंस्कृत अशा प्रतिष्ठीतांचाही हेरखाती वापर करीत असतात. हस्तक वा हेर हे कामानुसार वा गरजेनुसार निवडले वा घेतले जात असतात. कारण यातला कारभार सगळाच गुपचुप चालत असतो. इस्त्रायलचा एक हेर लेबॅनॉन या अरबी देशात जाऊन थेट मंत्री होऊ शकला, हे लक्षात घेतले; तर यात प्रतिष्ठीत वा नावाजलेले लोकही कसे सामिल करून घेतले जातात, ते समजू शकेल. कधी प्राध्यापक, इतिहासकार, सरकारी अधिकारी, समाजसेवक अशा विविध स्वरूपातले लोक परदेशी व देशी हेरखात्यात हस्तक म्हणून वापरले जात असतात. काहीजणांना विचारांचे आकर्षण असते, काही लोकांना पैसा, स्वार्थ वा भावनांच्या मार्गाने त्यात ओढले जाते. कधीकधी एका देशाचा हस्तक वा हेर दुसर्‍या देशाला फ़ितूर होऊन दुतोंडेपणाही करू शकतो. अमेरिकेने सीआयएचा हस्तक म्हणून भारतात धाडलेला डेव्हीड कोलमन हेडली त्याचवेळी पाकिस्तानी हेरखाते आयएसआय यांच्यासाठीही काम करत होता. मुंबई हल्ल्यासाठी आवश्यक असलेली माहिती व तपशील गोळा करण्याचे काम त्यानेच पार पाडले होते. म्हणूनच ते सत्य समोर आल्यानंतरही अमेरिकेने हेडलीचा ताबा तपास चौकशीसाठीही भारताला दिला नाही. कारण उघड आहे. पाकिस्तानची माहिती देताना त्याने अमेरिकेच्या पापाचाही पाढा वाचला तर? असे अतिशय गुंतागुंतीचे व घातपाती काम हेर करीत असतात. त्याखेरीज अनेकांना आपण हेरगिरीसाठी वापरले जातोय, याचाही थांगपत्ता नसतो. भावना, संबंध, आस्था वा विचारांच्या आहारी जाणार्‍या अशा लोकांचा, परकीय हेर सहजगत्या आपले हेतू साध्य करण्यासाठी अप्रत्यक्ष वापर करत असतात. उदाहरणार्थ भारतातील मुस्लिम तरूणांच्या धर्मभावनांचा गैरफ़ायदा पाक उठवतेच ना?

इथे एक गंमत असते. आपण भारतीय हेरखात्याविषयी सहसा बोलत नाही. पण परदेशी वा पाक हेरांविषयी नित्यनेमाने बोलत असतो. कारण तितकीच माहिती वा बातम्या माध्यमातून आपल्याकडे येत असतात. पाकिस्तानी माध्यमे तपासली तर तितक्याच संख्येने तिथे भारतीय हेरखात्याचा उद्धार चाललेला दिसेल. कम्युनिस्ट देशात गेलात वा कम्युनिस्ट विचारांच्या संस्थांमध्ये गेलात, तर अमेरिकन हेरसंस्था सीआयए विषयी ऐकायला मिळेल. अरबी मुस्लिम देशात गेलात तर इस्त्रायली हेरसंस्था मोसादविषयी शंख चाललेला कानावर येईल. मात्र त्याचे फ़ारसे तपशील बातम्यातूनही येत नाहीत. म्हणूनच प्रत्यक्ष हेरखात्याच्या कामाविषयी लोकांचे अनेक गैरसमज असतात. आपली गुन्हेगारी पार्श्वभूमी विसरून भारतीयांनी आपल्याला हिरो मानावे, अशा भ्रमात छोटा राजनही अजिबात नसतो. त्याचेही काही स्वार्थ यातून साधलेले असतात. पण आपण काही गोष्टी देशप्रेमासाठी केल्या, असे तो देखावा म्हणून बोलत असतो. त्या कामाच्या बदल्यात त्याला इथे वा अन्यत्र काही सोयीसवलती मिळत असतात. त्याची तेवढीच अपेक्षा असते. पण आपल्याला कोणी कुठल्या सोयी पुरवल्या, त्याबद्दल तो अवाक्षर बोलणार नाही. एका बाजूने विचार केला, तर तोही खुप प्रामाणिक म्हणावा लागेल. कारण तो कायद्याच्या चौकटीत व व्याख्येत सा्पडणारा गुन्हेगार आहे. पण आजही आपल्या देशात प्रतिष्ठीत म्हणुन जगणारे कित्येक लोक असे आहेत, की जे प्रत्यक्षात आपल्या शत्रू देशाला लाभकारी व मायदेशाला घातक अशा गोष्टी करण्यात गुंतलेले असतात. जाणतेपणी वा अजाणतेपणी त्यांचा वापर शत्रू देशांनी चा्लविलेला असतो. मात्र देशातील कायदे त्यांच्या अशा घातपाती कृत्याला वेसण घालू शकत नसतात. इथे मग कायद्याच्या पलिकडे जाऊन त्यांचा बंदोबस्त करावा लागत असतो. जो कोर्टाच्या चौकटीत शक्य नसतो.

कुठलाही सभ्य सुसंस्कृत माणूस आज राजनची पाठ थोपटणार नाही. कारण त्यांच्यासमोर राजन हा खुन, दरोडे वा खंडणी उकळणारा गुन्हेगार आहे. पण त्यानेच शरद शेट्टी, सावत्या अशा दाऊदचे सहकारी व देशाला घातक ठरलेल्या काही लोकांचा काटा दुबईत जाऊन काढण्याचे काम उरकलेले आहे. ते काम भारत सरकार कुठल्या कायदेशीर मार्गाने पार पाडू शकणार होते? दाऊदसारख्या गुन्हेगाराचे मुंबईतले टोळीनेटवर्क, पाक हेरखात्याने बॉम्बस्फ़ोट मालिका घडवण्यासाठी वापरले. त्यात अनेक मुस्लिम तरूणांच्या धार्मिक भावनांचा उपयोग करून घेतला. मग त्यांच्या बचावाला जी एक मोठी फ़ळी कोर्टापासून सार्वजनिक रितीने उभी राहिली, त्यांचे कृत्य खरेच मानवाधिकार म्हणून चालले होते, की पाकिस्तानच्या हस्तकांना वाचवण्यासाठी चालले होते? फ़ाशीच्या विरोधात म्हणुन त्यांनी मानवाधिकाराचा मुखवटा चढवलेला होता. पण आजवर शेकडो गुन्हेगार फ़ाशी गेले, तेव्हा त्यातला एकही मायका लाल इतका आटापिटा करायला पुढे सरसावला नव्हता. त्यातून लक्षात येते, की हे मान्यवर फ़ाशी या शिक्षेसाठी मैदानात आले नव्हते, तर मानवाधिकाराचा मुखवटा चढवून पाकिस्तानी हस्तकाला वाचवायला उघडपणे पुढे आले होते. त्यातले काही शत्रूचे हस्तक असू शकतात, तर काहीजण निव्वळ भावनात्मक मानवी हेतूने आलेले असू शकतात. यांना खेळवणारा इथे कोणतरी असतो. पण कायद्याच्या कचाट्यात त्याला पकडता येत नसते. राजरोस असे लोक देशाच्या व समाजाच्या हितासाठी म्हणत देश व समाजाला विघातक भूमिका पार पाडत असतात. ते अर्थातच शत्रू देशाच्या पथ्यावर पडत असते. हे सर्व समजून घ्यायचे, तर हेरखाती कशी चालतात, त्यांची कार्यशैली वा मोडस ऑपरेन्डी कशी असते, ते बारकाईने समजून घ्यावे लागेल. शेकडो तुकड्यात विखुरलेल्या कोड्याची नेमकी रचना करावी, तेव्हा त्यातले भीषण कारस्थान उलगडू शकते. मग छोटा राजन समजू शकतो, तसाच सन्मान व पारितोषिके परत देण्यामागचे खरे हेतू उलगडू लागतील. छोटा राजन आणि सध्याच्या ‘असंहिष्णूते’चा काही संबंध जोडला जाऊ शकेल काय? खरे तर छोटा राजनपेक्षाही पुरस्कार वापसीचे कारस्थान पुढल्या काही लेखांतून उलगडण्याचा माझा प्रयत्न रहाणार आहे. (अपुर्ण)

मोदींनी सोनियांना कशाला बोलावले?



क्या खुब लगती हो, बडी सुंदर दिखती हो
फ़िरसे कहो, कहते रहो, अच्छा लगता है
जीवन का हर सपना अब सच्चा लगता है

असे एका हिंदी चित्रपटातले गीत तुम्ही अनेकदा ऐकलेले असेल. पण त्याचा मतितार्थ कितीजण समजून घेतात? गुणगुणायला चांगले व सोपे म्हणून ती सुरावट व शब्द आपण सहज स्विकारत असतो. पण त्याचा अर्थबोध महत्वाचा असतो. तो हुडकावा लागतो. कुठल्याही वयात येणार्‍या मुलीला (ती कुरूप असली तरी सुद्धा) ‘तू रुपमती आहेस’ असे शब्द ऐकायची अनिवार इच्छा असते. मग असे शब्द जो कोणी तिच्यासमोर सुरेल आवाजात बोलेल, त्याच्यावर विश्वास टाकणे अपरिहार्य होऊन जाते. काहीशी तीच अवस्था हळव्या लोकांची असते. त्यांना खरे ऐकाय़चे नसते, तर आवडणारे शब्द ऐकयचे असतात. मग ते खोटे असले तरी बेहत्तर! त्यावर विश्वास ठेवायला असे हळवे लोक उतावळे झालेले असतात. मग त्यांना कोणीही भामटा सहज टोपी घालू शकत असतो. भाजपाची तीच अवस्था १६ मे २०१४ रोजी झाली होती आणि आपण भारत कॉग्रेसमुक्त केला किंवा आता आपण देशात कुठलीही मनमानी करू शकतो, हे ऐकायला त्यांचे कान उतावळे झालेले होते. मग त्यांना तसे शब्द ऐकवायला काही अर्धवट विश्लेषक सज्ज असतील तर नवल कुठले? उलट अशा वेळी कोणी सावधपणाचे दोन शब्द सांगू जाईल, तर तो अशा उतावळ्यांना शत्रू भासू लागतो. म्हणूनच १६ मे २०१४ नंतर भाजपा त्यांना ऐकायला आवडणारे विश्लेषण देणार्‍या पत्रकार माध्यमांकडे आकर्षित झाला, तर नवल नव्हते. पण खोटे वा अर्धवट विश्लेषण ही सुद्धा कला असते. त्याचा एक नमूना महाराष्ट्र टाईम्सचे सहसंपादक समर खडस यांच्या लेखात मिळतो. दोनच दिवसांनी भाजपाच्या बहुमताचे विश्लेषण करताना खडस लिहीतात, ‘आता ३३७ जागा एनडीएच्या ताब्यात आहेत. त्यामुळे दोन-तृतीयांश सदस्य संख्येवर कायदे करण्याची व कायद्यात बदल करण्याची ताकद जनतेने भाजपाच्या हातात दिली आहे, हे पुरोगाम्यांच्या लक्षात आले आहे काय?’

वास्तवात असे काहीही नव्हते. याचे कारण लोकसभेतले बहूमत कुठलाही कायदा मनमानी करून संमत करून घेऊ शकत नाही. तर कुठलेही विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात बहूमताने संमत व्हावे लागते. त्यापैकी राज्यसभेत भाजपाकडे बहूमत नव्हते. म्हणूनच कुठलाही कायदा मनमानी करून संमत करायची शक्ती भाजपात आली नव्हती. उलट विरोधकांशी तुसडेपणाने वागले तर पुरोगामी एकजुटीने राज्यसभेत प्रत्येक विधेयक हाणून पाडण्याची शक्ती पुरोगाम्यांपशी होती. पण हे खडससारख्या अर्धवटांना कुठे ठाऊक असते? त्याच्याही पुढे जाऊन खडस महोदय दोनतृतियांश बहुमताचे हवाले देतात. त्याचा कायद्याशी काय संबंध? घटना दुरूस्ती करायची असेल तरच प्रस्ताव दोनतृतियांश बहुमताने मान्य व्हावे लागतात. अन्यथा कुठलाही कायदा साध्या बहूमताने संमत होऊ शकतो. पण देशातले राजकारणी जितके उथळ; त्याहीपेक्षा राजकीय अभ्यासक व विश्लेषक निर्बुद्ध असले, मग यापेक्षा वेगळे काय व्हायचे? तेव्हा पुरोगाम्यांनी सर्वकाही गमावले म्हणून त्यांचे सांत्वन खडस महोदय करीत होते आणि अवघ्या काही महिन्यातच त्याच्या उलट प्रचिती आली. भूमी अधिग्रहण विधेयक लोकसभेत मंजूर करायची कुवत असूनही मोदी सरकारला राज्यसभेत तेच विधेयक मान्य करून घेता आले नाही. उलट तीनदा त्याचा अध्यादेश राष्ट्रपतींकरवी जारी करून शेवटी त्याचा नाद सोडावा लागला. म्हणजेच दोनतृतियांश बहूमताचे जे थोतांड खडस मांडतात, ते किती निरर्थक होते, त्याची प्रचिती आली. अर्थात सुदैवाने कुणा पुरोगामी पक्षाने अशा सल्ल्यावर विश्लेषणावर विश्वास ठेवला नाही. म्हणूनच त्यांना मोठ्या दारूण पराभवातून सावरणे शक्य झाले आहे. पण भाजपाची अवस्था मात्र त्या कुरूप मुलीसारखी होती, जिला आपण रुपमती असल्याचे शब्द ऐकायचे होते. सहाजिकच भाजपा किंवा त्याचे नवे अध्यक्ष मात्र खडससारख्यांच्या विश्लेषणावर खुश होऊन बुडीत गेले.

अशा विश्लेषणानेच आधी पुरोगम्यांना गाफ़ील केले होते आणि नंतर त्यांनी माध्यमांतील सल्लागारांकडे पाठ फ़िरवली. पण अमित शहा व मोदीभक्त इत्यादी मंडळी मात्र अशा सल्लागार मंडळींचे शब्द प्रमाण मानू लागली. त्यातून मग ‘शत-प्रतिशत’ भाजपाचे भुत या नेत्यांच्या बोकांडी बसले आणि त्याचे परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. ज्या भाजपाला कुठलाही कायदा दोनतृतियांश बहुमताने संमत करण्याची शक्ती मिळाली असा दावा होता, त्यालाच राज्यसभेत जीएसटी विधेयक संमत करून घेण्यासाठी शेवटी सोनिया व मनमोहन यांना शरण जावे लागले आहे. वास्तविक तीच पाळी येऊ नये म्हणून मागल्या वर्षभर भाजपाच्या नेत्यांनी चाणक्य नितीचा खास अवलंब केला होता. शत-प्रतिशत भाजपा किंवा ‘पार्लमेन्ट टू पंचायत’ स्वबळावर सत्ता, अशी निती राबवली होती. त्याचे दुष्परिणाम आम्ही इथे वर्षभर आधीच कथन केले होते. पण धोक्याचे इशारे कुणाला आवडतात? अमित शहा यांनी एकामागून एक मित्र पक्षांना टांगा मारून स्वबळावर राज्यातील सत्ता हस्तगत करण्याचा मार्ग स्विकारला. त्यासाठी कुठल्याही पक्षातून उमेदवार नेते आणून पक्षाचे बळ वाढवण्याची रणनिती आखली. हे सर्व कशासाठी होते? तर राज्यात स्वबळावर आमदार निवडून आणले, तर त्यांच्या मतावर राज्यसभेतही लौकरच आपले हुकमी बहूमत सिद्ध करता येईल. म्हणजे मग मित्रपक्ष वा सहकारी शोधण्याची कुठेच गरज उरणार नाही. म्हणून मित्रांना शत्रू करण्याचा सपाटा लावला गेला. त्यातून हाती काय आले आहे? दिल्ली व बिहारमध्ये संपुर्ण दारूण पराभव नशीबी आला आहे. असलेल्या जागा गेल्या अणि पर्यायाने राज्यसभेत मिळू शकल्या असत्या, त्याही जागा गमावण्याची पाळी आली. केवळ स्वपक्षाला मिळणार्‍या जागा भाजपाने गमावलेल्या नाहीत. तर जे राज्यसभेत मोदी सरकारच्या बाजूने उभे राहू शकले असते, अशाही मित्रांच्या जागा कमी केल्या आहेत.

महाराष्ट्रात युती तुटल्याने दोन्ही कॉग्रेस प्रत्येकी चाळीसहून अधिक जागा जिंकू शकल्या. म्हणजेच त्यांना एक एक राज्यसभा जागा जिंकणे शक्य झाले. युती अबाधित असती तर दोन्ही कॉग्रेसच्या आमदारांची बेरीज अवघा एक राज्य्सभा सदस्य निवडू शकली असती. त्यांना अधिक एक राज्यसभा सदस्य ‘शहा’णक्य नितीने बहाल केला ना? दिल्लीत दोनपैकी एक सदस्य भाजपाला मिळत असे. आता सुपडा साफ़ झाल्याने दोन्ही जागा आम आदमी पक्षाला मिळणार आहेत. बिहारमध्ये दोन जागा भाजपाला मिळू शकायच्या. त्यातून एक कमी होणार आहे. अशा हक्काच्या जागा गमावण्याला राज्यसभेतील बहुमत संपादण्याची रणनिती म्हणायचे काय? लोकसभेतले बहूमत स्वबळावरचे नव्हते, तर मित्रांच्या सहकार्याचे व विरोधकांच्या विभाजनचे मधूर फ़ळ होते. पण ते चाखल्यावर भाजपाने आधी मित्रांना हाकलले आणि दुसरीकडे विखूरलेले पुरोगामी पक्ष एकत्र येतील, अशी रणनिती योजली. आपल्याशिवाय राजकारणात कुठलाच पक्ष असू नये अशी भिती अमित शहांच्या विविध उपायांनी शत्रुंच्या नव्हेतर मित्राच्याही मनात अशी घातली. त्याचा परिणाम असा झाला, की लोकसभेच्या वेळी असलेली मतांची बेरीज मोडीत निघाली आणि विरोधकांनी आपल्या मतांची विभागणी टाळण्याचे प्रयास सुरू केले. आपण जिंकलो कसे, कोणामुळे व कोणत्या बेरीज वजाबाकीने, याचे भान भाजपाने सोडले म्हणून ही स्थिती आली. कारण तेव्हा धोक्याचे इशारे मिळत होते व दिले जात होते. पण ऐकायचे कोणाला होते? त्यापेक्षा भामटेगिरीचे विश्लेषण आवडणारे सत्य होते. त्यातून हाती आलेला पुढाकार भाजपा गमावून बसला. दुसरी बाब म्हणजे मोदींची लोकप्रियता म्हणजे पक्षाची लोकप्रियता असल्याचा भ्रम इतक्या टोकाला गेला, की मोदींच्या नावाने कुणालाही शेंदुर फ़ासायचे प्रकरण अंगी आले.  सोनिया मनमोहन यांना मोदींनीनिवासस्थानी बोलावण्यापर्यंत नामुष्की कशामुळे आली, त्याचे हे सविस्तर उत्तर आहे.

Saturday, November 28, 2015

मिस्टर ओबामा, सव्वा दोनशे वर्षे मागे जा

As our enemies have found we can reason like men, so now let us show them we can fight like men also. -Thomas Jefferson

आपल्या शत्रूंना उमगले आहे की आपण सभ्य गृहस्थाप्रमाणे बोलणी करू शकतो. आता आपण मर्दासारखे लढूही शकतो, हे शत्रूला दाखवू या! -थॉमस जेफ़रसन



सध्या जे रणकंदन सिरीया व इराकच्या परिसरात माजले आहे, त्याला इसिस ही जिहादी संघटना कारणीभूत आहे आणि त्याला अर्थातच पाश्चात्य प्रगत देश जबाबदार आहेत. कारण या श्रीमंत देशांचा डोळा तिथल्या अरबी वा मुस्लिम प्रदेशातील भूगर्भात दडलेल्या खनीज तेलावर आहे. मागल्या दोनतीन दशकात आपल्या मनावर हे विश्लेषण इतके ठसवण्यात आले आहे, की जिहाद वा मुस्लिम धर्मयुद्धाचे वास्तविक संकट आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही आणि खुल्या मनाने ती समस्या समजून घ्यायलाही राजी नसतो. आज ज्याला आधुनिक जगात दहशतवाद (जिहाद) म्हटले जाते, त्याचा आरंभ तब्बल सव्वा दोनशे वर्षापुर्वीचा आहे. म्हणजे औद्योगिक क्रांतीच्या आसपास हा आधुनिक जिहाद सुरू झाला आणि तेव्हा कुठेही खनीज तेलाचा शोध लागला नव्हता, की तेलाच्या खाणी अरबी प्रदेशात सापडलेल्या नव्हत्या. अमेरिकेने या अरबी प्रदेशात नाक कशाला खुपसावे, असा सवालही विचारला जातो. पण हा प्रश्न विचारणार्‍या कितीजणांना जिहादमुळेच अमेरिकेला दोन शतकांपुर्वी अरबी प्रदेशात घुसावे लागले, याची माहिती असते? आज जगाच्या सागरी क्षेत्रावर अमेरिकेचे वर्चस्व आहे, कारण अमेरिकेपाशी जगातले सर्वात सुसज्ज व पुढारलेले भेदक आरमार आहे, असेही मानले जाते. त्या अमेरिकेन नौदल वा आरमाराचा जन्मच मुळात अरबी देशातील जिहादचा बंदोबस्त करण्यासाठी झाला, ह्याची किती लोकांना जाणिव आहे? आज ज्याला अवघे जग दहशतवाद विरोधी युद्ध म्हणून ओळखते, त्याचा आरंभ तब्बल सव्वा दोनशे वर्षापुर्वी झाला आणि त्याला बार्बरी युद्ध म्हणून ओळखले जाते. त्या बार्बरी युद्धातून सुटका मिळावी म्हणून अमेरिका आपल्या अर्थसंकल्पात चक्क २० टक्के रक्कम खंडणीसाठी संसदेत मंजूर करत होती. ऐकून धक्का बसला ना? बसणारच, कारण यातले काही आपल्याला कोणी सांगत नाही, की संदर्भही समजावत नाही. कुठे त्याचा उल्लेखही येत नाही. वर अमेरिकन राज्यघटनेचा एक शिल्पकार थॉमस जेफ़रसन याचे एक विधान दिले आहे. त्याचा उदभव तिथूनच आला असावा.

हा जेफ़रसन व जेम्स अडाम्स हे दोघे पुढे अमेरिकेचे अध्यक्षही झाले. पण तेव्हा म्हणजे अठराव्या शतकाच्या अखेरीस व अमेरिका हे नवजात राष्ट्र म्हणून रांगत असताना ते दोघे युरोपातील राजदूत म्हणून काम करत होते. अमेरिकेच्या स्वातंत्र्याची लढाई संपल्यावर ते राष्ट्र वेगळे म्हणून उभे रहात होते. तेरा राज्यांनी मिळून आपल्याला सार्वभौम राष्ट्र म्हणून घोषित केले होते आणि अमेरिकन व्यापारी प्रामुख्याने युरोपशी व्यापार करत होते. त्यांच्या मालवाहू नौका व जहाजे आफ़्रिकेच्या उत्तर बाजूने युरोपात येजा करायची. त्यांना उत्तर आफ़्रिकेच्या समुद्रात गाठून काही चाचे त्यांची लूट करीत. त्यातला सर्व माल लूटला जाई आणि जहाजावरच्या गोर्‍या खलाशी आणि अन्य कर्मचार्‍यांना पकडून गुलाम म्हणून विकले जात असे. त्यापासून मुक्ती हवी असेल, तर व्यापारी कंपनीला खंडणी मोजावी लागत असे. असे सातत्याने होऊ लागले, तेव्हा जेफ़रसन व अडाम्स यांनी त्यातून मार्ग काढायचा प्रयत्न केला. हे काम तुर्कस्थानच्या आटोमान साम्राज्याचे मांडलीक असलेल्या चार छोट्या देशातील सागरी चाचे म्हणजे दरोडेखोर करायचे. अर्थात त्याचा हिस्सा तिथल्या सुलतानांना दिला जायचा. हा सुलतान ट्रायपोली या बंदरी शहराचा राजा होता. त्याचा राजदूत लंडनमध्ये होता. अमेरिकेच्या फ़्रान्स व ब्रिटनमधील दूतांनी या ट्रायपोलीच्या दुताकडे लूटमारीविषयी तक्रार केली आणि खुलासा मागितला. त्याचा खुलासा वाचला तर आज काही चालले आहे, त्याचे योग्य व नेमके उत्तर आपल्याला मिळू शकेल. सिद्दी हाजी अब्दुल रहमान अडजा असे त्याचे नाव आणि त्याने जेफ़रसन व अडाम्स यांना लुटीचे कारण काय सांगितले, ते अमेरिकन कॉग्रेसच्या दफ़्तरात आजही नोंदलेले आहे. तो म्हणतो,

‘आमचे राज्य प्रेषिताच्या आज्ञेवरून स्थापन झालेले आहे आणि कुराणामध्ये हे लिहीलेले आहे, की ज्या कुठल्याही देशांनी (अल्लाहचे) वर्चस्व स्विकारलेले नाही, ते पापी आहेत. म्हणूनच इस्लाम स्विकारलेल्या प्रत्येकाचे हे कर्तव्य आहे, की जिथे कोणी असे पापी सापडतील, त्यांच्या विरोधात युद्ध पुकारावे, त्यांची संपत्ती लुटावी, त्यांना गुलाम करावे आणि असे युद्ध करताना जो मुसलमान मारला जाईल, त्याला जन्नत (म्हणजे स्वर्ग) प्राप्त होईल.’

थोडक्यात जो कोणी मुस्लिम नाही वा जो समाज-देश मुस्लिम नाही, त्याच्या विरोधात युद्ध पुकारणे, त्याला लुटणे वा गुलाम करणे; हे प्रत्येक मुस्लिमाचे धर्मकर्तव्य आहे. किती सोपे धर्मकर्तव्य आहे ना? कुठल्याही गुन्हेगार प्रवृत्तीच्या माणसाला हे कर्तव्य आवडले नाही तरच नवल! सहाजिकच त्याही काळात असे जे कोणी लुटारू वा दरोडेखोर होते, त्यांनी आपापल्या परिसरात वा सागरी मार्गावर लुटमारीचा (पवित्र धर्मकर्तव्याचे पालन म्हणून) जिहाद आरंभला होता. त्याला अर्थातच ट्युनिशिया, मोरक्को अशा मुस्लिम देशातील सत्ताधीशांचे समर्थन होते. कारण लुटीतला हिस्सा सुलतानाला मिळत होता. त्यापासून मुक्ती वा सुरक्षा हवी असेल, तर संबंधित सुलतानाला एकरकमी मोठी खंडणी आणि वार्षिक ठराविक रक्कम भरणा करावी लागत असे. अर्भकावस्थेतील अमेरिकेपाशी अन्य कुठला मार्ग होता? त्यांच्यापाशी आधुनिक युद्धसामुग्री नव्हती की नौदल नव्हते. सहाजिकच या सुलतानांना काही लाखाची वार्षिक खंडणी देण्याचे मान्य करून तडजोड करण्यात आली. त्यासाठी मग अमेरिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पातही तशी तरतुद केली जात असे. ही बाब अठराव्या शतकाच्या अखेरच्या दशकातील आहे. तेव्हा अरबी प्रदेशात किंवा जगात खनीज तेलाचा शोध लागला नव्हता, की अमेरिका जगातली महाशक्ती वगैरे झालेली नव्हती. पण १७९२ सालात अमेरिकेने ४० हजार डॉलर्सची खंडणी अल्जिअर्सच्या सुलतानाला मोजली आणि १७९६ सालात ती खंडणी दहा लाख डॉलर्सपर्यंत गेली. तेव्हा अमेरिकेचा एकूण वार्षिक अर्थसंकल्प अवघा ५७ लाख डॉलर्स इतका होता. यातून लक्षात येईल, की एकूण अमेरिका-अरबी संघर्षाची सुरूवात कधी व कशी झाली. दिवसेदिवस अमेरिकेला हा बोजा अवघड असह्य होत चालला होता. पण त्यापासून सुटका नव्हती. एक मार्ग होता तो नौदलाची उभारणी करून या अरबी जिहादी चाचेगिरीचा कायमचा बिमोड करणे. पण तितका पैसा व साधनसंपत्ती अमेरिकेकडे तेव्हा नव्हती.

पण जे चालले होते ते अपमानास्पद होते आणि असह्यही होते. म्हणूनच १७९३ सालात राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन म्हणाले होते, ‘आपल्याला अपमान सहन करायचा नसेल तर तशी परिस्थिती येऊ देता कामा नये. आपल्याला शांतता हवी असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला कायमस्वरूपी युद्धसज्ज व्हावे लागेल.’  मग पुढल्याच वर्षी म्हणजे १७९४ सालाच्या मार्च महिन्यात अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांनी आपले स्वतंत्र नौदल उभे करण्याचा निर्णय घेतला. थोडक्यात आज सर्वच सागरी क्षेत्रावर जी अमेरिका आरमारी वर्चस्व गाजवते, त्याचा आरंभच मुळी जिहादचा बंदोबस्त करण्यासाठी झालेला होता. त्याचा खनीज तेलाशी काडीचा संबंध नव्हता. कारण तेव्हा खनीज तेलाचा शोधही लागलेला नव्हता. तर धर्माचा मुखवटा लावून चाललेल्या जिहादी चाचेगिरीचा बिमोड करण्यासाठी अमेरिकेला आरमार उभे करायची पाळी तेव्हाच्या जिहादींनी आणली होती. आज अमेरिका व आजचे तिचे नेते आपलाच हा जुना इतिहास पुरता विसरून गेले आहेत आणि म्हणूनच त्यांना युद्धसज्ज असूनही अपमानित व्हावे लागते आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असूनही शांतता संपादन करता येत नाही अशी दुर्दैवी परिस्थिती आलेली आहे. अर्थात १७९४ सालात जरी नौदलाची उभारणी सुरू झाली तरी त्यातून जिहादला वेसण घालण्यासाठी पुढली दोन दशके खर्ची पडली. एकामागून एक युद्धे व चाचेगिरीशी दोन हात करताना अमेरिकन नौदलाला खुप पराभव पचवावे लागले आणि त्याची मोठी किंमतही मोजावी लागली. पण चिकाटीने लढत १८१५ सालात म्हणजे नेमक्या दोन शतकापुर्वी अमेरिकेला अरबी वा मुस्लिम जिहादी चाचेगिरीचा बिमोड करणे शक्य झाले होते. त्यातून प्रेरणा घेऊन मग अनेक प्रगत युरोपियन राष्ट्रांनीही या आफ़्रिकन व अरबी मुस्लिम देशांचा पुरता बंदोबस्त केला आणि तिथल्या लुटारू वृत्तीला गुलामीच्या पातळीवर आणुन जगात शांतता निर्माण केली होती.

अर्थात केवळ अरब मुस्लिमच लुटारू वा चाचेगिरी करत होते आणि बाकीच्या जगात शांतता व सुरक्षा होती, असे मानायचे कारण नाही. जगात सगळीकडे अशी लुटमार दरोडे व चाचेगिरी तेव्हाही चालू होती. पण त्यातला एक महत्वाचा फ़रक लक्षात घ्यायला हवा. इस्लामने मुस्लिम गुन्हेगारांच्या तशा कृत्याला धार्मिक मुखवटा चढवला होता. सहाजिकच गुन्हा हे पवित्र धार्मिक कार्य होऊन बसले आणि राजरोस त्याला तिथले मुस्लिम सत्ताधीश व सुलतान मान्यता देत होते. धर्माचे कार्य म्हणून अशा अन्य धर्मियांच्या नशीबी येणार्‍या लुटमार व अत्याचारावर धार्मिक कर्तव्याच्या उदात्ततेचे पांघरूण घातले जात होते. पण अमेरिकेने तेव्हा ती हिंमत करून त्याचा मुकाबला करण्याचे धाडस दाखवले आणि मगच अन्य युरोपियन समर्थ राष्ट्रे त्यात पुढाकार घेऊ लागली. ब्रिटन, इटाली अशा देशांनी आपापले आरमार सज्ज करून ही चाचेगिरी मोडून काढली. पण त्याचे संयुक्त प्रयत्न झाले नाहीत आणि जिहाद नावाची चाचेगिरी उजळमाथ्याने चालूच राहिली. ज्या देशांनी आपले आरमार सज्ज करून त्याचा पुरता बिमोड केला, त्यांना अशा चाचेगिरीपासून मुक्ती मिळू शकली. तरी बाकीच्या देशाची व्यापारी जहाजे त्याला बळी पडतच राहिली. त्यावर अखेरचा बोळा फ़िरवला तो फ़्रान्सने! १८१७ सालात फ़्रान्सने अल्जिअर्सची सुलतानी सत्ताच संपवली आणि तिथे आपले राज्य लादले. उत्तर आफ़्रिकेत मग फ़्रान्सची वसाहत सुरू झाली आणि गुलामीत जाऊन पडलेल्या मुस्लिम समाजाला चाचेगिरी करण्यापासून संरक्षण मिळणे बंद झाले. तेव्हाच अमेरिका वा युरोपात होणारे नौकानयन सुरक्षित झाले. पुढल्या काळात एकामागून एक युरोपियन देशांनी आफ़्रिका व पश्चिम आशियातील अराजकाची स्थिती युद्ध पुकारून नियंत्रणाखाली आणली. तिथले टोळीवाले व टोळ्यांचे सुलतान संपवले आणि आपले साम्राज्य अरबी आफ़्रिकन व पश्चिम आशियाई प्रदेशात स्थापन केले. विसाव्या शतकापर्यंत हे साम्राज्य टिकले. पण दुसर्‍या महायुद्धानंतर अशा वसाहती टिकवणे युरोपियन देशांना शक्य झाले नाही, म्हणून पुन्हा तिथे पुन्हा इस्लामी सत्ता उदयास आल्या. कुठे टोळीचे राजे सत्तेवर आले, तर कुठे लष्करशहा मुजोर झाले. सुलतान वा गुलाम अशी मानसिकता असलेल्या या समाजाला कधी लोकशाही वा पुढारलेल्या युगात आणणे कोणाला शक्य झाले नाही. म्हणूनच आज आपण बघतो वा अनुभवतो आहोत, ती अवस्था नवी नाही. तर दोन अडीचशे वर्षापुर्वीचीच आहे. फ़रक असेल तर त्यांच्या हातातल्या तलवारी व प्रवासाला लागणारे घोडे नाहीत, तर अत्याधुनिक शस्त्रास्त्रे व तोफ़ा क्षेपणास्त्रे आलेली आहेत. बाकी चाचेगिरी तशीच व त्यांचे आश्रयदातेही तेव्हासारखेच आसपासचे शेख सुलतान आहेत. मानसिकताही जशीच्या तशी रानटी, क्रुर व अमानुष आहे. आणि जिहादचे तेच तसेच तत्वज्ञान पुन्हा जगाला भेडसावते आहे.

इसिसचा बगदादी वा अलकायदाचा ओसामा समजून घ्यायचा असेल, किंवा पलिकडे पाकिस्तानच्या सईद हाफ़ीजची प्रेरणा समजून घ्यायची असेल, तर बार्बरी युद्धाची अब्दुल रहमान अडजा याने जेफ़रसनला सांगितलेली व्याख्या आधी उमजून घ्यावी लागेल. ती जाणली तरच त्यातून उदभवलेल्या समस्येवर उपाय शोधता येतील. जसे तेव्हाच्या नवजात अमेरिका नावाच्या राष्ट्राने शोधले व अंमलात आणले होते. शांतता, संहिष्णूता वा उदारमतवादी संवादाने असे प्रश्न सुटत नसतात. कारण ती भाषा अरबी मानसिकतेला समजत नाही. त्यांच्या लेखी ते उदात्त पवित्र धर्मकार्य करत असतात. तुम्ही भले त्याला पाप समजून आत्मघातकी वागलात, म्हणून त्यांना फ़रक पडत नाही. कारण खंडणी मोजून जी समस्या दोनशे वर्षापुर्वी संपली नाही, ती मेणबत्त्या पेटवून वा हिंसेच्या जागी पुष्पगुच्छ ठेवून सुटत नसते..

(पूर्वप्रसिद्धी  तरूण भारत नागपूर)
रविवार  २९/११/२०१५

अण्णांची महत्ता कोणी, कशी संपवली? //// महायुद्धाची छाया (२)



अरब उठाव असो किंवा भारतातले असंहिष्णूतेचे आंदोलन असो, त्यातले पुरस्कार वापसीचे नाटक असो, यामागे काही ठराविक प्रेरणाशक्ती काम करत असते. वरवर बघितल्यास तसे वाटणार नाही. अशा घटना घडवून आणल्या जातात हे चटकन तर्कबुद्धीला पटणार नाही. कारण त्यातले सर्व धागेदोरे आपल्या समोर येणार नाहीत याची काळजी घेतलेली असते. एखादा चित्रपट वा कथाकादंबरी वाचताना तिची मांडणीच अशी केलेली असते, की त्यातली पात्रे लेखक संयोजकला हवी तशीच वागणारी खेळणारी असतात. सहाजिकच तुमच्या तर्कबुद्धीला ती विचार करू देत नाहीत, तर लेखकाला अपेक्षित असलेले मत तुमच्या माथी तुमचेच मत असावे अशा रितीने परिणाम घडवत असतात. अरब उठाव वा जगातल्या अनेक घटना नेमक्या तशाच घडवल्या जात असतात. तिथे सर्व सज्जता असते आणि योग्यवेळी योग्य पात्रे आपल्या समोर आणून अलगद पेश केले जाते. उदाहरणच द्यायचे तर आपण गुजरातच्या दंगलीकडे बघू शकतो. आजवर भारतामध्ये शेकडो जातीय वा धार्मिक दंगली घडलेल्या आहेत. त्यापेक्षा गुजरातची दंगल किंचितही वेगळी नाही. पण इथे राज्य सरकार व त्याच्या म्होरक्यांनीच ही दंगल घडवून आणली, असे चित्र साळसुदपणे उभे करण्यात आले. त्यात प्रश्न वा शंका विचारणार्‍यांचा आवाज ठरवून दाबला गेला. सलमान खान या अभिनेत्याचा पिता सलीमखान सतत तशा शंका विचारत होते आणि कोणी त्यांची दखलही घेत नव्हता. असे प्रश्न विचारणारे सलीमखान एकटे नव्हते. पण त्यांच्या शंका वा प्रश्न सामान्य जनतेपुढे येऊच दिले नाहीत आणि दंगलीचे खापर एकतर्फ़ी मोदींच्या माथ्यावर फ़ोडण्याचा उद्योग चालू राहिला. माध्यमे, बुद्धीमंत, राजकीय कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, नामवंत म्हणून पेश करण्यात आलेले प्राध्यापक अभ्यासक; प्रत्येकजण एका सुरात मोदी विरोधी सूर आळवत होते ना?

पण दुसरीकडे शेकडो  पत्रकार, अभ्यासक, कार्यकर्ते वा समाजसेवी असेही होते, ज्यांनी या प्रचाराला आव्हान दिलेले होते. पण माध्यमातून त्यांचा आवाज दडपला गेला. इतक्या सफ़ाईने अशी कारस्थाने राबवली जात असतात. आणि हे फ़क्त इथे झाले असेही मानायचे कारण नाही. पद्धतशीर रितीने योजना आखून हे नाट्य रगवले जात असते. मोक्याचा जागी माणसे पेरलेली असतात. त्यापैकी अनेकांना आपण कुठल्या एका योजनेचा हिस्सा म्हणून काम करतोय, त्याचाही थांगपत्ता नसतो. उदाहरणार्थ अण्णा हजारे यांच्यासारख्या व्यक्तीला अकस्मात जनलोकपाल आंदोलनात ओढले गेले. एकविसाव्या शतकातला महात्मा गांधी व्हायला उत्सुक असलेल्या अण्णांसारख्या व्यक्तीच्या त्या इच्छेचाही वापर अशावेळी करून घेतला जात असतो आणि अण्णांना त्याचा थांग लागलेला नसतो. अकस्मात मिळालेल्या लोकप्रियतेने ते भारावून जातात आणि गरज संपली, मग त्यांना कचर्‍याच्या टोपलीत फ़ेकून दिले जाते. महाराष्ट्रातही खेडापाड्यापर्यंत अण्णांचे महात्म्य पोहोचले नसताना एका रात्रीत अण्णा देशाचा आवाज कसे बनून गेले? कधी अण्णांनी तरी शांतपणे त्याचा विचार केला काय? खरे तर अण्णांना मुंबईतील उपोषण फ़सल्यावर त्याचा बारकाईने विचार करण्याची गरज होती. दिल्लीसारख्या परक्या प्रदेशात त्यांच्यासाठी हजारो लोक अहोरात्र मंचासमोर बसून होते, तिरंगा फ़डकावत होते. त्याच अण्णांचे माहेरघर म्हणावे अशा मुंबईत त्यांच्यासाठी २०-३० हजार लोकही जमू शकले नाहीत आणि तीन दिवसात उपोषणाचा गाशा गुंडाळावा लागला होता. मग दिल्लीत अशी कुठली व कोणाची जादू चालली, की अण्णांसाठी दोन आठवडे गदारोळ चालू राहिला? मी सुद्धा अण्णांच्या त्या आंदोलनाचा एक समर्थक होतो आणि खुप भावनाविवश होऊन पाठराखण करत होतो. थोडक्यात माझ्याशी भावनांचा कोणीतरी सराईतपणे वापर करून घेतला होता.

तेच अण्णा, केजरीवाल यांच्यापासून विभक्त झाले आणि पुढे अण्णांनी कितीही गर्जना केल्या, तरी कुठले आंदोलन उभे राहू शकलेले नाही. लोकपालच्या कालखंडात अण्णांनी एखादे राजकीय विधान केल्यावर त्यांना खडसावणारे अनेकजण पुढे लोकसभेत आम आदमी पक्षाचे उमेदवारही होऊन गेले. यापैकी कितीजणांनी जागेपणी त्यात भाग घेतला आणि कितीजणांनी भावनेच्या आहारी जाऊन त्यात उडी घेतली होती? पण मनिष शिसोदिया वा अरविंद केजरीवाल असे लोक जागेपणी त्यामध्ये आलेले वा आणले गेलेले होते. उलट किरण बेदी, प्रशांत भूषण इत्यादी लोक भावनेच्या वा मानसिक स्थितीमुळे त्यात ओढले गेलेले होते. गरज संपत गेली, तसे त्यांना भल्‍याबुर्‍या मार्गाने बाजूला काढण्यात आले. लोकपाल विषय कुठल्या कुठे फ़ेकला गेला. मात्र ज्यांनी कोणी इथे अरब उठावाची पुनरावृत्ती करायची योजना आखली होती, त्यांना त्यात तितके यश मिळू शकले नाही. पण मुद्दा भारतातला नसून जगभर चाललेल्या अशा योजनाबद्ध राजकीय हेराफ़ेरीचा आहे. यामागे काही योजना असावी तशा घटना घडतात व घडवल्या जातात. जिथे अशी नाटके रंगवली जातात, त्यात स्थानिक पात्रेही अलगद येऊन त्यात आपापली भूमिका निभावताना दिसतात. काही पात्रे तर मुद्दाम आधीपासून त्यासाठी रंगभूषा वा वेशभूषा करून सज्ज ठेवलेलीही दिसतील. पुरस्कार वापसीपासून आम आदमी पक्षाच्या देशव्यापी मोहिमेपर्यंत बघा. शैक्षणिक प्रांतापासून साहित्य कलाक्षेत्रापर्यंत नामवंत म्हणून पेश केलेल्या माणसांची नावे आपण तपासत जाऊ, तेव्हा त्यामध्ये एक समान धागा दिसून येऊ शकतो. गुजरात दंगलीपासून कालपरवा पुरस्कार वापसीच्या नाटकापर्यंत तीच तीच पात्रे वेशभूषा बदलून भूमिका पार पाडताना दिसतील. अरब स्प्रिंग त्यापेक्षा वेगळी घटना नव्हती. तिथेही हा सगळा तमाशा ठरवून घडवला गेला होता.

जगातल्या कुठल्याही देशात, समाजात वा व्यवस्थेत गेलात, तर तिथे कुठल्या न कुठल्या कारणाने नाराज अस्वस्थ असलेला गट सापडतोच. कुठे अनेक गट असतात. ते आपल्यावर अन्याय होत असल्याच्या तक्रारी करीत असतात. कमीअधिक प्रमाणात त्यांच्या तक्रारी खर्‍याही असू शकतात. थोडक्यात आपण ज्याला ठिणगी म्हणतो ती स्थानिक पातळीवर उपलब्ध असते. त्याचा भडका उडवणारे सरपण गोळा करून होळी पेटवणे अशक्य नसते. असे ‘होळकर’ तिथे पोहोचण्याची फ़क्त गरज असते. तेच काम कोणी तरी करतो. मग आपण एक प्रक्षोभक आंदोलन उभे राहिलेले बघत असतो. अशा आंदोलनाचे मार्ग भिन्न असू शकतात. कुठे सशस्त्र हिंसक आंदोलन उभे रहाते आणि सत्तेला शरण आणते. भ्रष्ट व खिळखिळी सत्ता असली तर जनसंख्येसमोर शरण येते. सत्ताधीश अहंकारी असेल तर सद्दाम-गडाफ़ी यांच्यासारखा शेवट त्याच्या नशीबी येतो. जिथे तितके खिळखिळे शासन नसते आणि सशस्त्र उठाव कामाचा नसतो, तिथे मानवाधिकाराचे मुखवटे लावून आंदोलन उभे केले जाते. मात्र दोन्ही बाबतीत कुठून तरी त्यात आर्थिक गुंतवणूक होत असते. म्हणजे अरब स्प्रिंगसाठी आंदोलकांना पैसा पुरवला गेला, तर असद विरोधातील उठावाला शस्त्रे दारुगोळा पुरवला गेला. देशाबाहेरच्या शक्तींनी देशात परिवर्तन घडवण्याचा हा प्रकार कित्येक वर्षे विविध मार्गाने चालू आहे आणि त्याला अर्थातच स्थानिक लोकांचाच हातभार लागलेला आहे. दुसरे महायुद्ध संपल्यापासून जगाची प्रत्यक्ष पारंपारिक युद्धाची रणनिती बदलून गेली आहे. वसाहतवाद व साम्राज्यवाद संपला आणि आपल्या हस्तक राजकारण्यांना सत्तेत बसवण्याचे नवे तंत्र विकसित झाले. अरब स्प्रिंग, पश्चिम आशियातील सध्याचा जिहाद वा भारतातील असंहिष्णुता त्याच निकषावर तपासून बघणे म्हणून अगत्याचे आहे. त्यामागील सुत्रधार, बोलविते धनी तपासणे आवश्यक आहे.  (अपुर्ण)

Friday, November 27, 2015

तहरीर चौक ते सिरीया लिबीया //// महायुद्धाची छाया (१)



आज सिरीयात धुमश्चक्री चालू आहे आणि तिथला सत्ताधीश बशर अल असद हतबल होऊन गेला आहे. कारण कुठलाही शस्त्रसज्ज देश उठतो आणि सिरीयात वाटेल तसे हवाई हल्ले करतो आहे. त्यातल्या काही हल्ल्याचा असद निषेध करतो आणि काही हल्ल्याचे समर्थन करतो आहे. अर्थात रशियाने असदची खुर्ची वाचवण्यासाठी हवाई हल्ले केलेत, म्हणून असद त्यांचे स्वागत करतो आहे. तर अमेरिका व पाश्चात्य देश त्यालाच संपवायला निघालेत, म्हणून असद त्यांचा निषेध करतो आहे. पण आपल्या प्रदेशात कुणीही हवाई सरहद्द ओलांडली म्हणून असद वा त्याची सेना हल्लेखोरांचा (तुर्कस्थानप्रमाणे) बंदोबस्त कशाला करत नाही? तर त्याच्यपाशी हवाई दल उरलेले नाही किंवा अशा हल्ल्यांना चोख उतर देण्याइतकी सज्जता उरलेली नाही. नाटो संघटनेच्या युद्धसज्ज देशांनी मनमानी करून असदचे सरकार व त्याच्या सुरक्षा दलांना नामोहरम करून टाकलेले आहे. त्याची सुरूवात आज झालेली नाही. त्याला आता पाच वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. २०१० च्या सुमारास अकस्मात ट्युनिशिया नावाच्या इवल्या अरब मुस्लिम देशात ‘अरब स्प्रिंग’ म्हणजे अरबी उठाव नावाचे एक बंड सुरू झाले. तिथे असलेल्या सत्ताधीशाच्या विरोधात सामान्य गांजलेल्या जनतेने उठाव केला आणि बघता बघता ती अन्याय्य सत्ता कोलमडून पडली. त्यातून प्रेरणा घेऊन मग तशाच प्रकार इजिप्तच्या होस्ने मुबारक या लष्करी सत्ताधीशाच्या विरूद्ध सुरू झाला. इजिप्तची राजधानी असलेल्या कैरो महानगरात शेकडो लोक तरूणांच्या नेतृत्वाखाली तहरीर चौकात जमले आणि घोषणा देवू लागले. ती संख्या क्रमाक्रमाने वाढत गेली आणि पोलिसांच्या आवाक्यात परिस्थिती राहिली नाही. म्हणून लष्कराला पाचारण करावे लागले. राष्ट्रपती निवासाच्या समोर जमलेल्या जमवाला आवरायला रणगाडेच येऊन हजर झाले. पण जमाव आवरला नाही की पांगला नाही.

असे जगात आजवर अनेकदा झाले आहे. सोवियत साम्राज्य कोलमडू लागले, तेव्हा तिथले सेनाधिकारी व गुप्तचर संघटनेने लोकशाही आणायला निघालेल्या मिखाईल गोर्बाचेव्ह यांनाच स्थानबद्ध करून सत्ता ताब्यात घेतली होती. त्यांच्या विरोधात येल्तसीन या स्वातंत्र्यपेमी नेत्याने जनतेला लाल चौकात येण्याचे आवाहन केले आणि अक्षरश: लक्षावधी लोक तिथे जमले. त्यांच्यावर रणगाडे घालण्यात आले तरी जमाव हटला नाही. तेव्हा लोकभावनेला शरण जाऊन सैनिकांनी गोळ्या झाडण्याचे नाकारले. परिणामी सोवियत युनियन ढासळले आणि रशियात जवळपास अराजक माजले होते. काहीशी तशीच स्थिती इजिप्तमध्ये तहरीर चौकाच्या आंदोलनानंतर झाली. कित्येक दिवस चौकात तंबू ठोकून बसलेल्या लक्षावधी लोकांवर गोळ्या चालवायला सेनेने नकार दिला आणि तशीच अन्य शहरातली स्थिती असल्याने सेनेने आंदोलकांच्या भूमिकेला मुजरा करून राष्ट्राध्यक्ष होस्ने मुबारक यांना सत्ता सोडायला भाग पाडले. हा उठाव कुठल्या राजकीय पक्षाने वा संघटनेने केलेला नव्हता. तर उत्स्फ़ुर्त अशा तरूणांच्या आंदोलनाने त्याला जन्म दिला होता. नव्याने जगाला जवळ आणणार्‍या सोशल मीडियातून झपाट्याने लोकांपर्यंत संदेश जाणे व त्याला प्रतिसाद मिळण्याच्या सोयीने ही क्रांती घडवून आणली होती. मग त्याचे पडसाद बाजूला सिरीया व लिबीया नामक अरबी देशात उमटू लागले. आजवर तिथे गळचेपी केलेल्या संघटना, विरोधी मत यांनी पुढाकार घेतला आणि नव्याने पुढे आलेल्या तरूण पिढीच्या समर्थनाला उभे राहून क्रांतीचा झेंडा हाती घेतला ट्युनिशिया व इजिप्त येथील उठाव आणि सत्तापालट निदान उत्स्फ़ुर्त दिसत होते, त्यात परदेशी उघड हात नव्हता. पण लिबीया वा सिरीयाची कहाणी एकदम भिन्न होती. या दोन देशातील उठावाला साथ देण्यासाठी खुलेआम अमेरिका व नाटो देशाच्या फ़ौजा मैदानात आल्या होत्या.

आपल्याकडे तेव्हा लोकपाल आंदोलन पेटले होते आणि त्यात कोणीही मान्यवर राजकीय वा प्रस्थापित राजकीय संघटना नेते दिसत नव्हते. तुलनेने अजिबात अनोळखी असे चेहरे त्यात नेतृत्व करीत होते आणि त्यांची समाजसेवी स्वयंसेवी अशी ओळख होती. भारतीय सत्ता, घटनाधिष्ठीत सरकार आणि कायदे यांना आव्हान देत, त्यांची जनमानसातील प्रतिष्ठा निकामी करण्याचा पवित्रा त्यात दिसत होता. म्हणूनच एका बाजूला सत्ताधीशांच्या विरोधात हा उठाव चालू होता, तर दुसरीकडे त्याचवेळी लोकशाही प्रक्रियेत सहभागी असलेल्या अन्य पक्षांवरही आरोपांची बरसात चालू होती. एकप्रकारे प्रस्थापित संपुर्ण राजकीय व्यवस्थाच मोडीत काढल्याशिवाय जनतेला न्याय मिळू शकत नाही, अशी भूमिका लोकपाल आंदोलनातून मांडली जात होती. ती जवळपास अरब उठावाचीच प्रतिकृती होती. फ़रक इतकाच होता, की अरबी प्रदेशात त्याला जितके यश मिळू शकले, तितके इथे मिळू शकले नाही. ट्युनिशिया व इजिप्त पाठोपाठ इजिप्तची राजव्यवस्था ढासळली होती. मात्र तिथे पर्यायी कुठलीही व्यवस्था सज्ज नव्हती. त्याच्याहीपेक्षा सिरीया व लिबीयाची स्थिती खराब होती. कारण तिथे तर अमेरिका व नाटो देशांनी मानवतेचा मुखवटा धारण करून सत्ता खिळखिळ्या करण्याचा पवित्रा घेतला होता. लिबीयाचा गडाफ़ी व सिरीयाच असद आपल्याच बंडखोर नागरिकांचा उठाव चेपण्यासाठी रासायनिक अस्त्रे वापरत असल्याचा दावा करून, त्यांना रोखण्यासाठी नाटो विमानांनी त्या दोन्ही देशात बेछूट हवाईहल्ले आरंभले होते. थोडक्यात तहरीर चौकाप्रमाणे इथेही सत्ताधीश बदलण्यासाठी बंडखोर लोक अपेशी झाल्यावर नाटो व अमेरिकेचा उतावळेपणा लपून राहिला नाही. मात्र या दोन्ही सत्ताधीशांनी शरण जाण्यास नकार दिला आणि त्यात लिबीयाचा गडाफ़ी मारला गेला. तर सिरीयात कायमचे अराजक उभे राहिले. आजचा सिरीया त्याचे परिणाम भोगतो आहे.

सिरीयातील आजच्या दुर्दशेला जितका असद जबाबदार आहे, तितकेच व थोडे अधिक अमेरिका व नाटो जबाबदार आहेत. की सगळा अरब उठावाचा तमाशा बनाबनाया खेळ होता? त्याचा तपशील हवा असेल, तर अनेक पुरावे शोधावे लागतील, अनेक गुंतागुंतीची कोडी सोडवावी लागतील. ती सोडवताना आपण थेट भातरातल्या एवार्ड वापसीपर्यंतही येऊन पोहोचू शकतो. कारण अरब उठाव हे उत्स्फ़ुर्त आंदोलन नव्हते किंवा लोकपाल आंदोलनही तसे भारतीयांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात पुकारलेला एल्गार वगैरे काही नव्हता. आजचा पुरस्कार वापसीचा तमाशाही तितकाच योजनाबद्ध आहे. म्हणूनच जगातल्या विविध भागात देशात व प्रदेशातल्या या घटनांचा परस्पर संबंध जोडण्याची गरज आहे. त्या तपशीलात जाण्यापुर्वी एक नमूना बघा. कालपरवा म्हणजे पॅरीसचे स्फ़ोट व रशियन विमन पाडण्याच्या दरम्यानच शेजारी ट्युनिशियातही मोठा घातपाती जिहादी हल्ला झालेला आहे. आणि त्याच ट्युनिशियात राजकीय आवर्तन घडून आले, त्याचे श्रेय काही स्वयंसेवी संस्थांना देत त्यांच्यावर नोबेल पारितोषिकाची खैरात करण्यात आलेली आहे. कुठल्याही देशात सत्तांतर करण्याबद्दल नोबेल देण्याचा पायंडा कधीपासून पडला? नोबेलचे उद्दीष्ट जगात सत्तांतर घडवणे असे आहे काय? कोण ह्या संस्था, त्यांचे कर्तृत्व कोणते? त्यांनी ट्युनिशियाचे काय कोटकल्याण केले? अरब उठाव घडवून आणण्यासाठीच नोबेल त्यांना दिले जाणार असेल, तर त्याचाच परिणाम असलेल्या उध्वस्त लिबीया, सिरीया व तिथल्या निर्वासितांच्या मुडद्यांसाठी कोणाला सन्मानित करायचे? कारण सत्तांतराइतकेच लाखो निर्वासितांचे उध्वस्त जीवन आणि लाखोंचे मृत्यूही त्याच अरब उठावाचे फ़लित नाही काय? हे सन्मान कोण कशासाठी देतो आणि त्या स्वयंसेवी संस्थांचा खरा बोलविता धनी कोण आहे? सिरीयाला विध्वंसाच्या खाईत लोटून जगाला महायुद्धाच्या कडेलोटावर आणून उभा करणारा, तोच खरा खलनायक नाही काय? (अपुर्ण)

बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना



बंगलोर येथील एका महाविद्यालयातील विद्यार्थिनींसमोर राहुल गांधी यांचे भाषण झाले. तिथे त्यांनी नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ़ा डागल्या. मग त्यावर त्यांनी स्वत:च खुश होणे स्वाभाविकच आहे. राहुल गांधी हे कॉग्रेसचे उपाध्यक्ष आहेत आणि ते कायम खुश असतात. आपला पक्ष मागल्या चार वर्षात प्रत्येक निवडणुक हरला, तरी ते एकदाही विचलीत झालेले कोणी बघितले आहेत काय? जगात काय घडते आहे किंवा त्यात काय चांगलेवाईट आहे, त्याचा त्यांना कधीही अर्थबोध झाल्याचे त्यांची भाषा वा कृतीतून एकदा तरी दिसले आहे काय? शक्यच नाही! सहाजिकच अवतीभवती जे काही घडते, त्यापासून राहुल संपुर्ण अलिप्त असतात. त्यामुळे जगातल्या घटनांविषयी त्यांनी अपरिचित असण्याने काही बिघडत नाही. किंबहूना म्हणूनच त्यांना सर्व गोष्टी नेमक्या कळू शकतात आणि तेच बुडत्या पक्षाला वाचवू शकतील, अशी प्रत्येक निष्ठावान कॉग्रेस कार्यकर्त्याची श्रद्धा आहे. परिणामी राहुल चुकले तरी त्यांची चुक कोणी दाखवून देवू शकत नाही. मग बिचार्‍या राहुलना तरी आपण कुठे चुकलो आणि काय सुधारले पाहिजे, याचा बोध कसा व्हावा? त्यामुळे चुका करूनही ते खुश असतात. बंगलोरला तेच झाले. देशात मोदी सरकार आल्यापासून खुप घोषणा झाल्या, पण प्रत्यक्षात काहीही घडू शकलेले नाही, असे राहुलनी तिथे ठामपणे सांगितले. आता तिथेच थांबायला हवे होते. पण राहुल गांधी यांनी पुढे जाऊन समोर बसलेल्या श्रोत्या मुलींना सवाल केला, की काही घडताना तुम्हाला दिसते आहे काय? क्लीन इंडिया वा मेक इन इंडिया असल्या घोषणांचे पुढे काय झाले? त्यांचा उपयोग होत आहे काय? तर त्या मुलींनी जोरदार आवाजात होकार भरला आणि राहुल चकीत झाले. कारण असे वेगळे मत ऐकायची त्यांना सवयच नाही. सहाजिकच आपल्या कानांवर विश्वास बसला नाही म्हणून त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला.

थोडक्यात राहुलनी आपलीच फ़टफ़जिती त्या विद्यार्थिनींच्या पुढे करून घेतली. भाषण देवून विषय संपला असता. त्यांनी मुलींना उलटा प्रश्न करायचे काही कारण नव्हते. आणि विचारलाच तर त्यावर उलट उत्तर आल्यावर विषय बदलून पुढे जायला हवे होते. पण ते शक्य नव्हते. कारण मोदी सरकार नुसत्या घोषणा करते आणि प्रत्यक्षात काहीही होत नाही, अशी राहुलची ठाम श्रद्धा आहे. तशा बातम्याही झळकत असतात. माध्यमातून त्याचाच नित्य गवगवा चालू आहे. मग राहुलनी कशावर विश्वास ठेवायचा? ‘मोदींच्या थापांवर’ की माध्यमातल्या बातम्यांवर? राहुल अर्थातच माध्यमांवर विसंबून आहेत. जगात काय घडते वा बिघडते, त्याची माहिती त्यांना माध्यमाकडून मिळत असते. प्रत्यक्ष जगाशी त्यांचा काडीमात्र संबंध उरलेला नाही. त्यातून काही सुटलेले असेल तर दिग्विजयसिंग, जयराम रमेश असे विश्वासू सहकारी माहिती द्यायला आहेतच. त्यांनीच लिहून दिलेले मुद्दे राहुल व्यासपीठावर उभे राहुन बोलत असतात. बंगलोरला तेच झाले. पण समोर बसलेल्या मुली सामान्य घरातल्या व समाजात वावरणार्‍या होत्या. माध्यमातल्या बातम्यांपेक्षा वास्त्व जगातल्या घडामोडी त्यांना अनुभवाव्या लागत असतात. त्यामुळेच मोदी सरकार सत्तेत आल्यापासून बदल झाला किंवा नाही, त्याचा अनुभव त्यांना नित्यनेमाने येत असतो. त्यासाठी माध्यमातया बातम्यांवर विसंबून रहाण्याची त्यांना अजिबात गरज नाही. अधिक माध्यमांनी लपवाछपवी केली, तरी आजची ही तरूण पिढी सोशल माध्यमातून माहिती मिळवत असते. म्हणूनच काही होत असेल वा नसेल, तर त्याचा तपशील या पिढीकडे नेमका असतो. म्हणून मग त्यांच्याशी संवाद करण्याचा धोका राहुलनी पत्करायला नको होता. तीच चुक त्यांना महागात पडली. नव्या पिढीसमोर हा कॉग्रेसचा तरूण नेता तोंडघशी पडला. खोटा पडला.

ही गोष्ट एकट्या राहुलचीच नाही. अनेकांची तीच अवस्था असते. त्यांचा जगाशी संपर्क तुटलेला असतो आणि त्यांना माध्यमे दाखवतात, तितकेच जग ठाऊक असते. त्यावरच ही माणसे मतप्रदर्शन करीत असतात. उद्या माध्यमांनी बातम्या रंगवल्या, की देशात वा अमुक शहरात प्रचंड पाऊस पडला आणि जागोजागी महापूर आलेले आहेत. तर असे लोक छत्र्या घेऊन बाहेर पडतील वा पूरात बुडण्याच्या भयाने घराबाहेरही पडणार नाहीत. मग त्यांच्या डोळ्याला दिसणारे कडक भाजणारे सूर्याचे ऊन असले म्हणून काहीही फ़रक पडत नाही. देशातल्या मुठभर प्रतिष्ठीतांना असंहिष्णुता दिसते आणि मग माध्यमातून त्याचा गवगवा झाल्यावर आमिर खानच्या पत्नीला आपल्या बाळाचा जीव धोक्यात आल्याच्या भितीने उगाच पछाडले जात नाही. कर्नल महाडिकच्या मातेला आपला पुत्र सीमेवर कायमच्या गोळीबाराला तोंड देत उभा असतानाही आपले लेकरू धोक्यात असल्याचे वाटत नाही, हजारो सैनिक वा पोलिस डोळ्यात तेल घालून सुरक्षेसाठी अहोरात्र जीवाची बाजी लावतात. त्यांच्या कुटुंबिय वा परिवाराला कुठे जीव धोक्यात आल्याची भिती वाटल्याचे आपण ऐकतो काय? मग आमिर खान वा त्याच्या पत्नीलाच असे कशाला वाटते? त्यांच्या भोवताली काही घडले असेल तर समजू शकते. पण तसे काही घडले तेव्हा ही मंडळी खुशाल निश्चींत होती. राहुल गांधी २६/११ च्या हल्ल्यानंतर विचलीत झाल्याचे कोणी बघितले होते काय? शाहरुख आमिर पंचतारांकित हॉटेलात समारंभ साजरे करतात. त्याच ताज वा ओबेराय येथे कसाब टोळीने कित्येकांना बेछूट गोळीबारात ठार मारले. तेव्हा भारतात जगणे असुरक्षित असल्याची तक्रार त्यांनी केली असती, तर गोष्ट वेगळी होती. पण तेव्हा तर त्यांना कमालीचे सुरक्षित वाटत होते. कारण माध्यमात मुंबई स्पिरीट दाखवले जात होते ना? तेव्हा खरोखर त्यांच्यापर्यंत देशातली असुरक्षितता येऊन भिडली होती. आज तसा कुठलाही प्रत्यक्ष धोका नसताना त्याच लोकांना अशी भिती वाटणे स्वाभाविक आहे. त्यांचे जग हे माध्यमापुरते मर्यादित झालेले आहे आणि त्यांच्या व्यक्तीगत मानवी जाणिवा बोथटल्या आहेत.

मागल्या दोन दिवसात आमिर खान व त्याच्या भयभीत झालेल्या पत्नीवर अनेकजण खवळून प्रतिक्रिया देत आहेत. त्यांनी देश सोडून कुठे पाकिस्तान वा इराकमध्ये जावे असेही आगंतुक सल्ले दिले जात आहेत. हा देखील मुर्खपणाच आहे. काही मंडळी ज्या भ्रामक जगात जगतात, त्याचा हा परिणाम वास्तविक जगातल्या लोकांवर होण्याचे काही कारण नाही. कारण त्यांच्यासाठी भारत नावाचा देश जसा काल्पनिक वा आयाडीया असते, तशीच सुरक्षा वा संहिष्णूताही काल्पनिक असते. मग इराक वा पाकिस्तान तरी खरे देश कशाला असतील? राहुल गांधी वा आमिरखान यांच्या विधानाची मार्केटींग करून माध्यमांना काहीकाळ आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचे असते. लग्नाच्या वरातीमध्ये घोड्यावर बसलेल्या नवरदेवाच्या भोवती मागेपुढे अ़चकट विचकट हावभाव करून काहीजण नाचत असतात, ते शोभा वाढवत असल्याचे फ़क्त नाटक करतात. वास्तवात त्यांना लोकांचे लक्ष वेधुन घ्यायचे असते. माध्यमांची अवस्था आजकाल तशी झाली आहे. बेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना अशी एकुण पत्रकारितेची केविलवाणी स्थिती आहे. मग कधी राहुल, कधी आमिर अशा लोकांचे कुठले तरी नगण्य विधान घेऊन काथ्याकुट चालतो. त्यात मग रंगत आणायला काही प्रतिष्ठीत नावाजलेले चेहरे आणले जातात. तेच चेहरे सतत आणले गेले, मग त्यांनाही आपण बुद्धीमंत विचारवंत झाल्याचे भास होऊ लागतात. राहुल गांधींना ती़च बाधा झालेली आहे. म्हणून कसलाही अनुभव वा अक्कल नसताना हा तरूण काहीही बकवास करतो. आमिरला तर अभिनयाची लोकप्रियता आपल्याला बुद्धीमंत ठरवुन गेलीय असे वाटू लागले आहे. अशा दिवट्यांच्या मुलाखती घेऊन पेश करणर्‍या पत्रकारांनी ही दुर्दशा केलेली आहे. मग त्यात राहुल वा आमिरही बेगाने होऊन नाचू लागले तर नवल कुठले? ते काय बोलले त्याची दखल तरी कशाला घ्यायची?

Thursday, November 26, 2015

‘अमिर’ संहिष्णूता आणि गरीब असंहिष्णूता



उंटाच्या पाठीवर काडी ठेवली आणि उंट बसला, असे म्हटले जाते. याचे कारण असे, की आधीच उंटावर नको तितके ओझे लादलेले असते आणि तेच उचलण्याची शक्ती त्याच्यात राहिलेली नसते. म्हणूनच एका काडीचे वजन जास्त झाल्याने उंट बसलेला नसतो. तर त्याच्या कुवतीपेक्षा त्याच्यावर बोजा लादण्याचा अतिरेक झालेला असतो. म्हणून मग एक काडीही उंटाला जड होत असते. कुठलाही अतिरेक असेच परिणाम देत असतो. मग चर्चा काडीची करायची नसते, तर अतिरेकाची करायला हवी. आताही तेच झाले आहे. असंहिष्णूतेचे नाटक छान रंगले होते. पण त्याचाही अतिरेक होऊ लागला होता आणि लोकांना त्याचा कंटाळा नव्हेतर संताप येऊ लागला होता. नाटक आणि वास्तव याचे भान नाटककार व नाटकातल्या कलावंतांनीही ठेवायला हवे. अन्यथा त्यांची वेशभूषा व रंगभूशा सामान्य माणासाला खरडून काढायची वेळ येते. एकूणच संहिष्णूतेच्या नाटकाचा तोच अतिरेक होत गेला होता. मुख्यप्रवाहातील माध्यमांपासून राजकीय, सामाजिक व बौद्धिक क्षेत्रात त्याचा नको इतका अतिरेक झाल्यावर लोक कंटाळले होते आणि हळुहळू लोकांना संताप येऊ लागला होता. अशावेळी त्यात आमिरखानने उडी घेतली आणि तीच मग उंटाच्या पाठीवरची काडी झाली. त्याचा पहिला फ़टका आमिर खानला नव्हेतर त्याला आपल्या जाहिरातीचा ब्रॅड लिडर बनवणार्‍या कंपनीला बसला आहे. स्नॅपडील नावाची इंटरनेट व्यापार कंपनी आहे. आमिर तिच्या जाहिराती करतो. आमिरच्या ताज्या वक्तव्यांनी माध्यमातले पुरोगामी सुखावले असले, तरी त्याचा गाजावाजा करताना पुरोगामी पत्रकार व कलावंत यांनी आपल्याच पायावर आता धोंडा पाडून घेतला आहे. त्याचा पहिला फ़टका स्नॅपडील कंपनीला बसला आहे. आमिरच्या त्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काही लाख लोकांनी स्नॅपडील कंपनीशी काडीमोड घेतला आहे. एका माहितीनुसार दोन दिवसात कंपनीने ३८ कोटीचा धंदा गमावला आहे.

अविष्कार स्वातंत्र्य, संहिष्णूता ही दिवसेदिवस देशात पाखंड व थोतांड बनत चालली आहेत. मग त्यात काळापैसा ओतून लोकांच्या माथी खोट्या गोष्टी व भ्रामक वार्ता मारण्याचा उद्योग चालू राहिला. त्याचा दुष्परिणाम मागल्या लोकसभा निवडणूकीत दिसून आला असतानाही, एक वर्षात पुन्हा त्याच नाटकाचे प्रयोग सुरू झाले आहेत. आमिरने त्यातच उडी घेतली आणि त्याच्याच पोटावर आता पाय आला आहे. कारण जाहिरपणे काही लाख लोकांनी स्नॅपडील कंपनीच्या मोबाईल खरेदीसुविधेचे साधन आपल्या फ़ोनवरून हटवले आहे. आमिर जाहिरातीत असल्याच्या निषेधार्थ आपण स्नॅपडीलला रामराम ठोकत असल्याच्या हजारो प्रतिक्रिया लोकांनी सोशल माध्यमातून दिल्याच. पण ज्यांनी शांतपणे रामराम ठोकला त्याचे आकडे कंपनीला कळू शकतात. हे आकडे सहा लाखाहून अधिक असल्याने ही कंपनी हादरून गेली आहे. आमिर खानला जाहिरातीतून बाजूला करण्यापर्यंत आपण या कंपनीशी व्यवहार करणार नाही, असा इशाराही काही लोकांनी सोशल माध्यमातून कंपनीला दिला आहे. त्याची सहसा कधी दाद घेतली जात नाही. असे काही माथेफ़िरू असतात. पण जेव्हा आपल्या ऑनलाईन ग्राहकांच्या नोंदबुकातली संख्या झपाट्याने घसरू लागली, तेव्हा कंपनीला खडबडून जाग आली आहे. अर्थात ही सुरूवात आहे. कारण आता माध्यमांपेक्षा सोशल माध्यमे प्रभावी झाली असून, व्यापारावरही त्यांची हुकूमत चालते याचा साक्षात्कार यातून घडणार आहे. खरेच स्नॅपडील कंपनीला याचा आर्थिक फ़टका बसला, तर त्यांना आमिरला हटवावे लागेल. किंवा मग अशाच पैशावर नावारुपास आलेल्या आमिरला तरी आपले शब्द मागे घेऊन विरोधाला शरण जाणे भाग पडेल. आणि हे नवे अजिबात नाही, अविष्कार स्वातंत्र्य असो किंवा संहिष्णूतेचे नाटक असो, पैशासमोर सगळे पाखंडी शरण जातात हा जगाचा इतिहास आहे.

आठ वर्षापुर्वी अमेरिकेतली एक घटना त्याचा दाखला आहे. डोनाल्ड आयमस नावाचा अत्यंत लोकप्रिय रेडीओ कलाकार अशाच चक्रव्युहात सापडला होता. अमेरिकाभर त्याच्या रसभरीत खोचक भाषेतील शेरेबाजीसाठी तो प्रसिद्ध होता. शेकडो रेडिओ स्टेशनवरून त्याचा कार्यक्रम प्रसारीत केला जात होता. विविध नेटवर्क तो प्रसारीत करीत होती. रग्गर नामक विद्यापिठाच्या महिला बास्केटबॉल संघाने २००७ साली राष्ट्रीय अजिंक्यपद संपादन केले आणि त्याही अंतिम सामन्यावर आयमसने शेरेबाजी केली होती. त्या संघात बहुतांश कृष्णवर्णिय मुली होत्या आणि त्यांच्याबद्दल केलेल्या शेरेबाजीने वादळ निर्माण झाले. त्याची शेरेबाजी वर्णद्वेषी असल्याचा गदारोळ उठला आणि अनेक संघटनांनी त्याच्या कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी केली. पण अभिजन वर्ग, प्रतिष्ठीत मान्यवर (म्हणजे आपल्याकडे जसे असंहिष्णूतेचे नाटक करणारे आहेत तसे) लोक आयमसच्या बाजूने ठामपणे उभे राहिले आणि बहुतेक नेटवर्क कंपन्यांनी आयमसला हाकलण्यास नकार दिला. ते अविष्कार स्वातंत्र्य आहे आणि त्याच्यावर बंदीची मागणी म्हणजे मुस्कटदाबी व असंहिष्णुता असल्याचा तमाशा चालू झाला. दोन दिवस हा तमाशा जोरात चालला आणि अखेरीस रग्गरचा तो महिला संघ पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर आला. त्यांनी एकच भूमिका जाहिर केली. ‘आयमसचा कार्यक्रम प्रसारीत करणार्‍या रेडीओ स्टेशन, नेटवर्क यांच्यावर जाहिरात करणार्‍या कुठल्याही कंपन्या वा जाहिरातदाराला आमचा संघ प्रायोजक म्हणून घेणार नाही’. ही घोषणा झाली आणि एका तासात पाच मोठ्या अमेरिकन कंपन्यांनी आयमसचे प्रसारण करणार्‍या नेटवर्कच्या आपण जाहिराती थांबवत असल्याचा इशारा दिला. पुढल्या दोन तासात त्या नेटवर्कने आयमसचे पुढील सर्व कार्यक्रम रद्दबातल केल्याची घोषणा केली होती. याला म्हणतात नाक दाबले की तोंड उघडते.

दोनतीन दिवस अविष्कार स्वातंत्र्याचा तमाशा चालला. पण उत्पादक व जाहिरातदार कंपन्यांनी आपल्यावर येऊ घातलेले संकट ओळखून आयमसला वार्‍यावर सोडून देण्याचा दिलेला इशारा जादूची मात्रा ठरली. तमाम माध्यमे शेपूट घालून शिस्तीत वागू लागली. स्नॅपडील कंपनीवर सोशल माध्यमातून आमिर विरोधात सुरू झालेला बहिष्कार हे अतिरेकी अविष्कार स्वातंत्र्याचे फ़लित आहे. ही नुसती सुरूवात आहे. असा इशारा गोदरेज कंपनीला दिल्यावर त्यांनी आमिर आपला मॉडेल नसल्याचा खुलासा केला आहे आणि स्नॅपडील समोर दुसरा पर्याय नाही. पण आज हे चक्र सुरू झाले आहे, ते कुठवर जाऊ शकते? जे कोणी अशाप्रकारे संहिष्णूतेचे नाटक करत आहेत आणि अतिरेक करीत आहेत, त्यांची मदार जाहिराती व उत्पादक कंपन्यांच्या पैशावर आहे. उद्या आपल्याला नावडत्या भूमिका प्रेक्षक वाचकाच्या गळी मारण्याचा उद्योग असाच चालू राहिला, तर हेच प्रक्षुब्ध सामान्य लोक त्या माध्यमाला जाहिरात देणार्‍या कंपन्या वा तिच्या उत्पादनावर बहिष्कार घालू लागतील, तेव्हा संपादक पत्रकार काय करणार आहेत? उदाहरणार्थ राजदीप वा बरखा दत्त यांच्या खोटारडेपणाला सामान्य माणुस रोखू शकणार नाही. पण त्यांच्या कार्यक्रमाला प्रायोजक असेल त्या कंपनीच्या उत्पादनावर असा सार्वत्रिक बहिष्कार सुरू झाला मग? म्हणजे टाटा चाय प्रायोजक जाहिरातदार असेल आणि अशा बहिष्काराची घोषणा झाली, त्यातून मुंबई वा दिल्लीसारख्या शहरात साप्ताहिक चहाच्या खपात टाटा चहाची विक्री घटली तर काय होईल? मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये ग्राहक राजा झाला आहे आणि तोच सुत्रधारही होऊ लागला, तर माध्यमांचे अविष्कार स्वातंत्र्याचे काय होईल? कुठलाही अतिरेक विनाशाला आमंत्रण देत असतो. मग तो मोदीभक्तांचा असो किंवा पुरोगामी विचारवंतांचा असो! संहिष्णूतेचा गळा घोटणारी संहिष्णुता लोकांना आता असह्य झालीय, इतकाच त्याचा अरर्थ आहे.

Wednesday, November 25, 2015

२६/११ आणि तिसरे महायुद्ध



आज २६/११ म्हणजे २६ नोव्हेंबर ही तारीख आहे. जगभर तिची ओळख आहे. कशामुळे ही तारीख जगाच्या इतिहासात नोंदली गेली त्याचे काही स्मरण आपल्याला आहे काय? तर त्या दिवशी किमान दोनशे माणसे मुंबईत हकनाक मारली गेली. रक्ताचे पाट वाहिले आणि त्या फ़ेर्‍यात सापडलेल्या कोणालाही त्यापासून मुक्ती नव्हती. कारण रक्ताला चटावलेले दहा जिहादी पशू इथे मुंबईत आलेले होते. त्यांना आपल्या जीवाची पर्वा नव्हती. ते कराचीहून इथे मरायलाच आलेले होते आणि मरताना शक्य होतील तितक्या इतर निरपराधांना ठार मारून मरायचे, असा त्यांचा मनसुबा होता. त्याला हे दोनशेहून अधिक मुंबईकर बळी पडले. त्याखेरीज चारपाचशे मुंबईकर कमीअधिक जखमी झाले वा कायमचे जायबंदी झाले. तो दिवस म्हणून जग २६/११ या आकड्यांची इतिहासातली नोंद आहे. पण ज्या मुंबईत हा रक्तपात घडला तिथल्या मुंबईकरांना त्याचे स्मरण आहे काय? जे मेले वा जायबंदी झाले, त्यांच्यावर ही पाळी कशामुळे आली, आपण त्यातून बचावलो, असा थोडा तरी विचार कोणी मुंबईकर करतात का? अशा अनुभवाचा विचार आपण भारतीयांनी विचार केला असता आणि त्यापासून काही शिकलो असतो, तर मुळात कसाबच्या त्या टोळीला इथे येण्याची हिंमत झाली नसती. त्यांना रक्तपाताचे प्रशिक्षण देवून इथे धाडणार्‍यांच्या मनाला तसा विचारही शिवला नसता. पण तसे घडले, अनेकदा घडतेच आहे कारण आपणच त्यांचे प्रायोजक आहोत. आपल्याच हत्येला, रक्तपाताला प्रोत्साहन देणारा असा जगात दुसरा कुठला समाज वा देश नसेल, ज्याची भारताशी व भारतीय मानसिकतेशी तुलना होऊ शकेल. कुठल्याही ऐतिहासिक अनुभवातून शिकायचे नाही, की येऊ घातलेल्या संकटाला प्रतिकार करायची तयारी करायची नाही, हाच आपला इतिहास आहे. म्हणून इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसते आहे.

कालपरवा मुंबईत सुधींद्र कुलकर्णी नामक एका माणसाच्या तोंडाला काळे फ़ासण्याची घटना घडली. कशासाठी काही लोकांनी हा उद्योग केला? तर सुधींद्र कुलकर्णी यांनी खुर्शीद कसुरी नावाच्या पाकिस्तानी माजी परराष्ट्रमंत्र्याला इथे बोलावले होते. त्याच्या पुस्तकाचे वाजतगाजत प्रकाशन करण्याचा समारंभ योजला होता. कोण हा कसुरी? तर जनरल परवेझ मुशर्रफ़ या पाक लष्करशहाचा सहकारी व पाक हेरसंस्थेच्या आश्रयाने चालणार्‍या संस्थेचा मुख्याधिकारी. ह्या हेरसंस्थेनेच मुंबईत कसाबला तयार करून कत्तलीसाठी पाठवला होता. म्हणजेच अप्रत्यक्षरित्या मुंबईतल्या सात वर्षापुर्वीच्या कत्तलीत ज्याचे हात मुंबईकरांच्या रक्ताने माखलेले आहेत असा हा खुर्शीद कसुरी! त्याला मुंबईत सन्मानाने बोलावले जाते आणि त्याच्या पुस्तकाचे प्रकाशन होताना मुठभर मुंबईकर त्याला काळे फ़ासायला पुढे जातात. तेव्हा त्याच हिंमतबाजांचा निषेध करायला याच मुंबईचे एकाहून एक मोठे बुद्धीमंत वा प्रतिष्ठीत पुढे सरसावतात. निषेध कोणाचा होतो? ज्याचे हात निष्पाप मुंबईकरांच्या रक्ताने माखलेले आहेत, त्याचा निषेध होत नाही. तर त्याला विरोध करणार्‍यांचा निषेध होतो. हे काळे फ़ासणारे मुंबईकरच नव्हेत, बाकीची प्रचंड मुंबई व मुंबईकर संहिष्णू आहेत, असे सांगण्यात धन्यता मानली गेली ना? अगदी महाराष्ट्र सरकारही त्याच मुठभरांवर गुन्हे नोंदवायला पुढे आले. हे मुठभर कोण होते? बाकीची प्रचंड मुंबईकर संख्या कोण आहे? सात वर्षे मागे जा म्हणजे कळेल, की तेव्हाही बाकीची सर्व मुंबईकर लोकसंख्या शेपूट घालून भयभीत झाली होती आणि काही मुठभरच कसाबच्या टोळीशी दोन हात करायला पुढे सरसावले होते. बाकी सगळी मुंबई पुढे आलेली नव्हती. त्या मुठभरांनीच कसाबला आवरला, ठार मारला आणि त्यात आपलेही प्राण गमावले. मगच बाकीच्या लाखो मुंबईकरांचा जीव भांड्यात पडला होता.

आज सात वर्षांनी काळ किती बदलला आहे ना? आम्हाला ओंबळे-करकरे आठवत नाहीत. त्यांचे बलिदान आठवत नाही. त्यापेक्षा आम्हाला गुलाम अलीच्या गजला ऐकण्यात स्वारस्य आहे आणि म्हणून त्याला रोखणार्‍यांचा आम्ही निषेध करतो. कसाबचा बोलविता धनी इथे सन्मानाने वागवला जात नाही, म्हणून आम्हाला लाज वाटतेय. आम्हा्ला त्या मुठभरांची लाज वाटतेय, ज्यांनी आपल्यावर गुन्हे ओढवून घेत, तो कार्यक्रम हाणून पाडला. उद्या वेळ आली तर या निषेधकर्त्यांपैकी कितीजण पुन्हा हल्ला झाल्यास कसाबसारख्या मारेकर्‍याला सामोरे जाणार आहेत? असे मुठभर कोणी असतात, जे अभिमानासाठी झीज सोसतात, म्हणून समाजाला सुरक्षितता मिळत असते. कसाबसारख्यांना रोखले जात असते. कसाबला कशासाठी रोखायचे असते? कसाबला मरायचेच होते. पण त्याच्या टोळीने ज्यांना हकनाक ठार मारले, त्यापैकी कोणाला मरायची इच्छा होती काय? त्यांना इच्छेविरुद्ध कशाला मरावे लागले? कोणीतरी कसाबला आधीच ठार मारला असता आणि त्याची मरायची इच्छा पुर्ण केली असती, तर बाकीच्या दोनशे लोकांना हकनाक मरावे लागले नसते ना? पण तसे झाले नाही वा होत नाही. अशा सामान्य लोकांना नेहमीच हकनाक मरावे लागते आणि शांततेच्य थोतांडासाठी हे सामान्य लोक नेहमीच बळीचे बकरे होत असतात. कधी ते मुंबईकर असतात कधी ते पॅरीसकर असतात, तर कधी न्युयॉर्कर असतात. त्यांना मरायचे नसते, पण शांततवाद्यांना मारेकर्‍यांचे चोचले पुरवता यावेत, म्हणून सामान्य लोकांनी बळीचे बकरे व्हावे अशी जगाची रीत झाली आहे. सुधींद्र कुलकर्णी यांच्या समंजसपणासाठी सामान्य माणसाला मरावे लागते आणि युरोपियन युनियनच्या उदारमतवादी हट्टापायी तिथल्या सामान्य माणसाला हकनाक मरावे लागते. त्या सामान्य माणसाचा गुन्हा एकच असतो, तो मुर्खांना शहाणे समजून जगत असतो.

लिओ ट्रॉटस्की हा रशियन विचारवंत नेता म्हणतो, ‘तुम्हाला भले युद्ध नको असेल, पण तुम्ही मात्र युद्धाला (बळी म्हणून) हवे असता.’ त्याचा अर्थ समजून घेतला तर आपण असुरक्षित कशामुळे असतो, हे लक्षात येऊ शकेल आणि जीवन अधिक सुरक्षित होऊ शकेल. आपले दुर्दैव असे, की अशा जटील प्रश्नांची सोपी सुटसुटीत उत्तरे नसतात आणि फ़सवी उत्तरे आपल्याला नेहमीच भुरळ घालतात. मग आपण कसायाला शरण जात असतो. कधी तो हातात बंदूक घेऊन येतो, तर कधी साळसूद चेहरा लावून शांतता सामंजस्याचे मुखवटे लावून आपल्याला मृत्यूच्या गर्तेत लोटून देत असतो. कसाबला मरायचेच होते. अशा हल्ल्यानंतर आपण सुखरूप निसटणार नाही, हे त्यालाही ठाऊक होते. पण त्याच्या हातून जे मारले गेले, त्यांना तर कसाबला मारायचे नव्हते? त्यांना कुणालाच मारायचे नव्हते? स्वत:ही मरायचे नव्हते ना? मग त्यांच्या नशीबी हा असा हिंसक क्रुर मृत्यू कशाला यावा? तर युद्ध हे त्याचे उत्तर आहे. ते तुम्हाला नको असल्याने टाळता येत नाही. कारण कुणाला तरी युद्ध हवे असते आणि तो तुमच्यावर युद्ध लादत असतो. तेव्हा त्याच्यापासून पळ काढून सुरक्षा मिळत नसते की युद्धाची स्थिती नाकारून जगता येत नसते. त्याला सामोरे जाऊन अशा युद्धखोरीचा नि:पात करणे, हाच एकमेव मार्ग असतो. थोडक्यात ज्याला युद्धाची खुमखुमी असते, त्याच्यावर युद्ध लादून त्याचा खात्मा करणे, हाच एकमेव युद्ध थांबवण्याचा मार्ग असतो. दुसर्‍या महायुद्धानंतर युद्ध टाळण्यासाठी राष्ट्रसंघाची स्थापना झाली व तसे प्रयत्न झाले. म्हणून युद्धे टळली नाहीत, की त्यात मरणार्‍या माणसांना जीवदान मिळू शकले नाही. उलट युद्धापेक्षा अधिक संख्येने माणसे मारली गेलीत. युद्धापेक्षा शांततेने अधिक लोकांचा बळी घेतला आणि सुरक्षेचे तर कुठे दुरदुर दर्शन होत नाही. किंबहूना त्याच पळपुट्या शांततावादाने जिहाद नावाचा भस्मासूर उभा केला आहे, जो आता तिसर्‍या महायुद्धाचे अक्राळविक्राळ रुप धारण करून सामोरा येतो आहे.

Tuesday, November 24, 2015

मुस्लिमाचा तरी मुस्लिमावर विश्वास आहे?



एक मुस्लिम डोळ्यावर पट्टी बांधून आलिंगनाची अपेक्षा करत असेल तर त्याला कांगावा म्हणावे काय? त्याला कांगावा संबोधणे क्रुर नाही काय? आस्था, आपुलकी वा प्रेमाची भाषा आम्हाला समजत नाही काय? अशी शंका आधीचा लेख वाचून अनेकांच्या मनात नक्की अलेली असणार. पण त्या व्यक्तीने जो फ़लक झळकवला आहे, तो वाचून त्यातला अर्थबोध कितीजण घेतात? ‘मी मुस्लिम आहे आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुमचा माझ्यावर विश्वास आहे काय? असेल तर मला आलिंगन द्या!’ हे वाचणे ठिक आहे. पण त्यातला अर्थ असा, की मुस्लिमांवरचा इतरांचा विश्वास उडाला असला तरी मुस्लिम मात्र बिगरमुस्लिमांवर विश्वास ठेवून आहेत. यात कितपत तथ्य आहे? आज जगात किती ठिकाणी आपल्याला मुस्लिमांविषयी अविश्वास दिसून येतो? तेही बाजूला ठेवा. मुस्लिमांनी अन्य कुणावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यांनी मुस्लिमांवर तरी विश्वास ठेवला पाहिजे ना? इसिस वा सुन्नी मुस्लिम अन्य पंथाच्या मुस्लिमांशी तरी विश्वासाने वागतात काय? जगातली आजची समस्या मुस्लिम व बिगर मुस्लिम अशी नसून, त्यांच्या कडव्या धर्मश्रद्धांनी उभी केलेली समस्या आहे. कारण एक मुस्लिमच दुसर्‍या पंथाच्या मुस्लिमाच्या विश्वास व श्रद्धा नाकारून त्याच्या जीवावर उठलेला असल्याचे सातत्याने दिसते आहे. सवाल बिगरमुस्लिमाने मुस्लिमावर विश्वास दाखवण्याचा नसून, मुस्लिमाने अन्य पंथीय मुस्लिमावर विश्वास दाखवणेही खुप शांतता निर्माण करू शकेल. इसिसने कोणा अन्य धर्मियाची कत्तल केली, तो विषय सोडून द्या! त्यांनी सर्वाधिक कत्तल मुस्लिमांचीच केली आहे आणि त्यातून पन्नास लाख मुस्लिमच इस्लामी देशातून निर्वासित झाले आहेत. त्यांना आश्रय द्यायला कुठला मुस्लिम देश पुढे आला आहे? निर्वासिताचे लोंढे धावत पळत सुटले आहेत, त्यांना कुठला मुस्लिम (देश) विश्वासाने जवळ घेतो आहे काय?

एक साधी गोष्ट आपल्या डोळ्यांना दिसते आहे. युरोपकडेच नव्हेतर अन्य पाश्चात्य देशांकडे आणि अतिदूर ऑस्ट्रेलियापर्यंत मुस्लिम देशातील निर्वासितांचे लोंढे धावत आहेत. जे देश मुस्लिम नाहीत वा ख्रिश्चन वा सेक्युलर आहेत, तिथेच हे मुस्लिम निर्वासितांचे लोंढे कशाला धावत सुटले आहेत? त्यांचा आपल्याच धर्माचे मुस्लिमांचे राज्य असलेल्या देशावर, तिथल्या मुस्लिम सत्ताधीशांवर किंवा तिथे वसलेल्या मुस्लिमांवर विश्वास नसल्याचे ते लक्षण नाही काय? सिरीया, इराक, पॅलेस्टाईन, लिबीया वा अफ़गाण अशा देशातले हे मुस्लिमांचे तांडे शेजारीच जवळ असलेल्या सुखवस्तू श्रीमंत सौदी, कुवेत ओमान वा आखाती तेलसंपन्न देशात आश्रयाला का जाऊ धजलेले नाहीत? तर तिथे आपल्याला कोणी स्विकारणार नाही. आपलेच धर्मबंधू मुस्लिम नागरिक वा सत्ताधीश गोळ्या घालून पिटाळून लावतील, हाच त्या निर्वासित मुस्लिम लोंढयांना वाटणारा विश्वास आहे ना? म्हणजेच आज जगापुढली सर्वात मोठी विश्वासाची समस्या आहे, ती मुस्लिम बिगरमुस्लिम अशी नसून मुस्लिमांचाच मुस्लिमांवर विश्वास उरलेला नाही. मग अशी आलिंगनाची नाटके हवीत कशाला? मुस्लिम असून इतरांवर विश्वास ठेवणे सोपे आणि नैसर्गिक आहे. सवाल मुस्लिमाने मुस्लिमांवर विश्वास ठेवण्याचा आहे. बिगर मुस्लिमाच्या जीवनशैलीत इतर धर्मियांवर विश्वास ठेवणे ही समस्याच नाही. सवाल मुस्लिमांच्या विश्वासार्हतेचा आहे. एक मुस्लिमच आज दुसर्‍या मुस्लिमावर विश्वास ठेवू शकत नाही. एक मुस्लिमच आज दुसर्‍या मुस्लिमाच्या जीवावर उठलेला आहे. तेव्हा समस्या समजून घेतली पाहिजे. मुस्लिमांवर इतरांचा विश्वास असणे नसणे ही समस्याच नाही. मुस्लिमांमध्येच आपसात विश्वासाला तडा गेलेला आहे. त्याची सर्वात मोठी साक्ष म्हणजे आखाती मुस्लिम देशांनी आपल्याच धर्मबंधू मुस्लिम निर्वासितांना वार्‍यावर सोडून दिले आहे, तर बिगर मुस्लिम देशांनी त्यांना आश्रय दिलेला आहे.

मग हे नाटक कशाला? जेव्हा आश्रय देणार्‍यांवरच मुस्लिम जिहादी अतिरेक्यांनी प्राणांतिक हल्ला केलेला आहे, तेव्हा सवाल नाटकाचा नसून कृतीचा आहे. बेल्जमपासून तमाम युरोपियन देशांनी अशा आलिंगनातून आपल्या देशात व जीवनात असलेली सुरक्षितता धोक्यात आणली आहे. मजेची गोष्ट म्हणजे मुस्लिम देशातून हजारो मैल दूर निर्वासित पळत आहेत. युरोपातील कडाक्याच्या थंडीत उघड्यावर पडलेले आहेत आणि कुणी कुराणाचा अवमान केला, म्हणून दंगलीही करीत आहेत. त्यानंतरही हा तमाशा सोसण्याची परमावधी युरोपियन देशांनी दाखवली आहे. पण शेजारी सौदी अरेबिया नामक मुस्लिम देशात एकाच वेळी ३० लाख लोकांना तात्पुरता आश्रय देता येईल, इतकी यंत्रणा सज्ज आहे. हाज यात्रा करायला येणार्‍या जगभरातील मुस्लिमांना तात्पुरती वास्तव्याची सुविधा म्हणून उभारलेली ही व्यवस्था ३० लाख लोकांना आश्रय देवू शकते. तिथे अद्ययावत नागरी सुविधा आहेत. पण देशोधडीला लागलेल्या आपल्याच धर्मबांधवांना सौदी तिथे घ्यायला आश्रयाचे आलिंगन द्यायला तयार नाही. याला कसला विश्वास म्हणायचे? की सौदी राजे व मक्का मदिना या प्रमुख धर्मस्थळांचे राखणदारच मुस्लिम नाहीत आणि ते मुस्लिमांवरही विश्वास ठेवत नाहीत असा दावा आहे? सवाल म्हणूनच मुस्लिमाने बिगर मुस्लिमांवर विश्वास असल्याचे नाटक रंगवण्याचा नाही. सवाल मुस्लिमांनीच आपल्याच धर्माच्या इतर पंथाच्या अनुयायांवर विश्वास दाखवण्याचा विषय आहे. त्यावरून इतरांचे लक्ष उडवण्याचे हे नाटक आहे. आपला धर्म आपल्याला कुणावरच विश्वास ठेवू देत नाही आणि अगदी आपल्याच धर्माच्या अन्य पंथांचाही द्वेष करायला शिकवण देतो, या वास्तवापासून इतरेजनांची दिशाभूल करण्याचा हा कांगावा आहे. यात किंचित प्रामाणिकपणा असता, तरी हे फ़लकधारी व डोळ्यांवर पट्टी बांधणारे मुंबई पॅरीसपेक्षा सौदीच्या रस्त्यावर जाऊन तसे उभे राहिले असते.

आपण मुस्लिम आहोत आणि आपल्याच धर्माच्या शिकवणूकीचा आधार घेऊन हजारो निरपराधांची नित्यनेमाने जगात कुठेतरी हत्या चालली आहे, तर आपल्या धर्माची शिकवण बदनाम होते आहे, याचे तरी भान असायला नको का? सुन्नी लोक शिया मुस्लिमांची हत्या करत आहेत. सिरीयातील मुस्लिमांना घरदार सोडून परागंदा व्हावे लागले आहे. जगात कुठेही मुस्लिमांचा हिंसक चेहरा समोर आला आहे. अशा वेळी ज्या धर्माच्या प्रेरणेने हे चालले आहे असा दावा केला जातो, त्याला आव्हान देण्याची गरज आहे. किंबहूना आपल्या धर्माची चाललेली विटंबना रोखण्यासाठी तरी इतर धर्मातील लोकांना येऊ घातलेल्या धोक्यापासून सावध करण्याची प्रामाणिक गरज आहे. अशावेळी हे आलिंगनाचे नाटक म्हणूनच घातपाताचाच प्रकार आहे. दोन महिन्यापुर्वी बाहू पसरून युरोपियन देश निर्वासितांचे स्वागत करत होते. त्या लोंढ्यातून काही जिहादी येतील, ही शंकाही कुणाच्या मनात आली नाही. कारण आलिंगनाची नशाच और असते. आता दोन महिन्यानंतर पॅरीसमध्ये आलिंगनाचे धमाके झाल्यावर तिथे सरकार व लोकांना जाग येऊ लागली आहे. बेल्जमने तर सगळ्या सार्वजनिक सुविधा ठप्प करून एक एक घराची झडती आरंभली आहे. त्याला विश्वासाला तडा जाणे म्हणतात. तो विश्वास तोडणारे कोणी बिगरमुस्लिम नाहीत तर मुस्लिमच आहेत. आणि त्यांचे डाव हाणुन पाडण्यानेच विश्वासाचा पुरावा समोर येऊ शकतो. आपण मुस्लिम असण्यापेक्षा आपण हिंसक जिहादी तत्वज्ञानाचे विरोधक आहोत, असे फ़लक घेऊन रस्त्यावर मुस्लिमांनी उतरण्याची गरज आहे. आज असे आलिंगनाचे नाटक रंगवावे लागते आहे, कारण मुस्लिमांवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे आणि अकारण कुठल्याही मुस्लिमाकडे लोक संशयाने बघू लागलेत. त्यावरचा उपाय आलिंगनाचे नाटक नाही, तर आपल्या आसपास जिहादी शिकवण देणार्‍यांना शोधून पोलिसांच्या हवाली करण्याची गरज आहे. त्याची शक्यता किती आहे?

तिसर्‍या महायुद्धाची चाहुल



“You may not be interested in war, but war is interested in you.” ― Leon Trotsky

आज मंगळवारी सिरीयातील जिहादी अतिरेक्यांवर हल्ला करायला नेहमीप्रमाणे उड्डाण केलेल्या रशियन लढावू विमानाला तुर्कस्तानच्या लष्कराने विमानविरोधी हल्ला करून पाडले. ही येऊ घातलेल्या महायुद्धाची चाहुल आहे. आपण ज्याला जिहाद वा दहशतवाद म्हणून चिवडत बसतो, त्याने आता जगाच्य राजकारणाची सुत्रे हाती घेतली असून, त्यात एकामागून एक देश ओढले जात आहेत आणि ओढले जाणार आहेत. सात दशकापुर्वी पुन्हा युद्धाचा विध्वंस नको म्हणून स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या उदारमतवादी भूमिकेचे हे पाप आहे. त्यामुळेच महायुद्धात जितकी माणसे मारली जणार नाहीत, त्यापेक्षा अनेकपटीने लोक उदारमतवादी शांततेच्या भूमिकेने बळी घेतले आहेत. राजकारण वा राजकीय तत्वज्ञान कोणतेही असो, त्याला सत्तेची ओढ लागली, मग असे डावपेच खेळले जातात, की युद्ध नको म्हणत जग युद्धाच्या खाईत लोटले जात असते. जिहाद नावाच्या भस्मासूराला ज्या उदारमतवादी राजकारणाने जोजवले, त्याचे खरे स्वरूप आता समोर येत चालले असून, येत्या काही महिन्यात वा वर्षात जग युद्धाच्या खाईत लोटले जाणार आहे. आज सिरीयात हवाई हल्ला करायला गेलेल्या रशियन लढावू विमानाला पाडून तुर्कस्तानने त्याची नांदी केली आहे. प्रथमच दोन देशांत थेट युद्धाची स्थिती उभी ठाकली आहे. ज्यापैकी एका बाजूला अमेरिका तर दुसर्‍या बाजूला रशिया खडा उभा आहे. दिसायला भले हा दोन देशातील वाद दिसेल. पण रशियाने उघड इराण व सिरीयाच्या राजसत्तेशी हातमिळवणी केली आहे आणि अमेरिका आधीपासूनच सौदी व तुर्की यांच्याशी इसिसला मदत देण्याबाबत संमनमत करून बसली आहे. राहिला प्रश्न युरोपमधल्या प्रगत राष्ट्रांचा व नंतर उदयास आलेल्या भारत, ब्राझील, चीन वा अन्य देशांचा! त्यांना यापासून फ़ार काळ अलिप्त रहाता येणार नाही. म्हणूनच हा सगळा गुंता समजून घ्यावा लागेल.

युद्ध कोणालाच नको असते. पण ते व्हायलाही पर्याय नसतो. कारण युद्ध तुमच्या इच्छेनुसार होत नाही, की टाळता येत नाही. युद्ध तुमच्यावर लादले जात असते आणि मग त्यापासून सुटका नसते. आपला बचाव करणे किंवा पराभव मान्य करून शरण जाणे; इतकेच पर्याय असतात. यात मग युद्ध नको आणि शांतता हवी असा घोषा लावणारेही तितकेच जबाबदार असतात. तालिबान, मुजाहिदीन, अलकायदा, बोको हराम, इसिस वा तत्सम डझनावारी जिहादी गट कुठल्या ना कुठल्या समर्थ देशाच्या पैशाने व पाठबळानेच हिंसाचार करीत असतात. इसिसचे दैनंदिन उत्पन्न पंधरा लाख डॉलर्स इतके आहे. हे कुठून येत असते? नुसते बलात्कार करून वा बॉम्ब फ़ोडून पैसे मिळत नाहीत. लूटमारीतून इतकी प्रचंड रक्कम दरोडेखोरही मिळवू शकत नाहीत. मग इसिसला इतके दैनंदिन उत्पन्न कुठून मिळते? त्यांनी व्यापलेल्या इराक व सिरीयातील प्रदेशातल्या खनीज तेलाच्या खाणीतून आजही तेलाचा उपसा चालू आहे आणि त्याची विक्रीही चालू आहे. त्यातूनच हा पैसा येत असतो. शिवाय असदला नामोहरम करण्यासाठी व जिंकलेल्या प्रदेशावर आपला कब्जा राखण्यासाठी त्या हिंसक संघटनेला सौदी व आखाती देशांकडून रितसर पैसे-हत्यारे मिळत असतात. युरोपातून तुर्कस्थान मार्गे कोणीही अन्य देशातला मुस्लिम सुखरूप इसिसमध्ये लढवय्या व्हायला पोहोचू शकत असतो. बदल्यात इसिस चोरलेले वा उपसलेले खनीज तेल तुर्कस्थानला बहाल करीत असतो. अमेरिका व नाटो इसिसचा बंदोबस्त करीत नाहीत. पण इसिसचा कणा मोडू बघणार्‍या सिरीयाच्या असदशी निष्ठावान सैन्यावरच हल्ले करतात. पर्यायाने इसिस बळकट होत गेली, शिरजोर होत गेली. रशियाने त्यात हस्तक्षेप केल्यावर इसिसचा दबदबा संपू लागला तरी रशियाला उघडपणे अमेरिका वा सौदी आव्हान देवू शकत नव्हते. म्हणून तुर्कस्थानला पुढे केलेले आहे.

रशियन लढावू विमाने आपल्या हवाई हद्दीचा भंग करीत असतात, अशी तुर्कस्थानची तक्रार होती. तेच कारण पुढे करून त्यांनी मंगळवारी एक लढावू विमान पाडले आहे. पण आपल्या हवाई दलाने तुर्कस्थानच्या हवाई हद्दीचा कुठेही भंग केलेला नाही, असा दावा रशियाने केलेला आहे. त्यात तथ्यही दिसते. कारण पडलेले रशियन विमान कित्येक किलोमिटर्स आत सिरीयाच्या प्रदेशात पडलेले आहे. किंबहूना त्याच्याही पुढे जाऊन रशियन अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी तुर्कस्थानवर पाठीत वार केल्याचा आरोप केला आहे. तो करताना त्यांनी विमान पाडणारे दहशतवाद्यांचे साथीदार असल्याचेही म्हटले आहे. मध्यंतरी पुतीन यांनी चाळीस देश इसिसला सहाय्य करीत असल्याचा आरोप केला होता. आता तर त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी तुर्कीवर इसिसचे साथीदार असल्याचा आरोप केला आहे. मजेची गोष्ट म्हणजे हा आरोप फ़क्त तुर्कस्थानला लागत नाही. कारण तो देश अमेरिकाप्रणित नाटो लष्करी आघाडीचा सहसदस्य आहे. म्हणजेच इसिसचा पाठीराखा अमेरिका व सौदी असल्याचाच अप्रत्यक्ष आरोप पुतीन यांनी केला आहे. त्यात तथ्यही वाटते. कारण जोवर सिरीयाचा अध्यक्ष असद व त्याचे सैन्य कमकुवत होते, तोवर अमेरिका वा तुर्कीने कुठलेही हल्ले सिरीयात केले नव्हते आणि इसिसला शिव्या घालत प्रत्यक्षात असदच्या अधिकृत राष्ट्रीय सेनेला कमकुवत करण्यात धन्यता मानलेली होती. पण रशियाने सिरीयाला मदत देण्यासाठी इसिसच्या प्रभावक्षेत्रात सरसकट हल्ले सुरू केले, त्यात इसिसचा कणा मोडला आहे. त्यांना वाचवायचे तर रशियन हल्ल्यांना पायबंद घालणे आवश्यक आहे. तुर्कस्थानने रशियन विमान पाडून तेच काम केले आहे. मात्र त्यातून थेट दोन देशांना एकमेकांशी भिडण्याचा प्रसंग येऊ शकतो. कारण पुतीन शांतपणे हा प्रतिहल्ला सहन करतील अशी शक्यता नाही. म्हणूनच ही येऊ घातलेल्या महायुद्धाची नांदी वाटते.

अनेकांचा असा गैरसमज आहे की या युद्धाचा, हवाई हल्ल्याचा वा तिथून निघालेल्या निर्वासितांचा मामला सिरीया, इराक वा युरोपपुरता मर्यादित आहे. भारताचा त्याच्याशी काय संबंध? आपण युरोपपासून खुप दूर आहोत आणि सिरीया इराकही मैलोगणती दूर आहेत. युद्ध पेटले तरी आपल्यावर त्याची सावलीही पडणार नाही, असेही वाटू शकते. पण वस्तुस्थिती खुप भयंकर आहे. आपल्याला दिसत आहेत वा दाखवले जात आहेत, ते एका भयंकर जटील कोड्याचे अनंतविध तुकडे आहेत. ते संगतवार मांडले, तरच त्याचा खरा अर्थबोध होऊ शकेल. मग छोटा राजनला मायदेशी आणणे असो, किंवा पुरस्कारवापसी असो. अकस्मात देशात असंहिष्णूतेचे काहूर माजवून निर्माण केला जात असलेला भयगंड असो, किंवा दिड वर्षात पंतप्रधान मोदींनी लागोपाठ केलेले विविध देशांचे दौरे असोत. मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी यांना हटवण्यासाठी पाकिस्तानची ‘मागितलेली मदत’ असो, किंवा सुधींद्र कुलकर्णी यांनी पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्याला मुंबईत आणून सन्मानित करताना सोसलेली मानहानी असो. फ़ोर्ड फ़ौडेशनचे अब्जावधीचे देशात येणारे निधी व त्याचे लाभार्थी असोत, वा मॅगसेसे वा नोबेल पारितोषिके असोत. यांचा येऊ घातलेल्या युद्धाशी, पेटलेल्या जागतिक जिहादशी, जगभर उत्पन्न झालेल्या राजकीय अस्थीरतेशी कसा गुंतागुंतीचा संबंध आहे, ते उलगडायला हवे. तरच मंगळवारी रशियन विमान तुर्कीने पाडण्यातून काय भयंकर भविष्य पुढ्यात वाढले आहे त्याचा थोडाफ़ार अंदाज येऊ शकेल. किंबहूना येत्या काही दिवसात तीच गुंतागुंत उलगडण्याचा प्रयास मी करणार आहे. सहज डोळ्यांना न दिसणारे हे विस्काटलेले धागे जुळवून व्यापक परिस्थितीचे चित्र उभे करायचा माझा प्रयास असेल. त्यामुळे काहीकाळ स्थानिक राजकारण वा त्यामधले दुवे मांडण्याला वेळ देता येणार नाही, की मित्रांच्या प्रश्न शंकांना उत्तरे वा खुलासे देता येणार नाहीत. तेव्हा कृपया तसा आग्रह धरू नये ही नम्र विनंती!

Monday, November 23, 2015

तुकाराम ओंबळे यांना अनावृत्त पत्र

   

प्रिय तुकारामजी ओंबळे,

मला ठाऊक आहे की हे पत्र वाचायला तुम्ही आज हयात नाही. खरेच ती किती चांगली गोष्ट आहे ना? कारण जखमी होऊन हयात राहिला असता, तर पश्चात्तापाने तुम्ही त्या विकलांग अवस्थेत आत्महत्याही करू शकला नसता. त्यापेक्षा अजमल कसाबला ‘आलिंगन देवून तुम्ही या जगाचा निरोप घेतलात, तेच खुप चांगले झाले. किंबहूना तेव्हा देश किती संहिष्णू व सुरक्षित होता, त्याचीच तुम्ही आपल्या ‘आलिंगन’ कृतीतून साक्ष दिलीत. ज्या गिरगाव चौपाटीवर तुम्ही कसाबला असे आलिंगन दिलेत, तिथेच आजची तरूण पिढी कुणा मुस्लिमाला विश्वास असल्याचे सांगायला आलिंगन द्यायला पुढे जाताना बघितल्यावर तुमच्या कृतीचा जो अर्थ घेतला गेला हे तुम्हाला कितपत मानवले असते? देश सुरक्षित होता म्हणून त्याने संहिष्णूतेचा आदर्श निर्माण केला ना तेव्हा? कसाबच्या टोळीचे दहा शांतता सैनिक सागरी मार्गाने मुंबईत आले आणि त्यांनी कशी स्मशान शांतता प्रस्थापित केली होती ना? त्या ओबेराय टॉवर्स, ताजमहाल या पंचतारांकित हॉटेलपासून बोरीबंदरच्या गजबजलेल्या रेल्वे स्थानकातही किती शांतता पसरली होती ना? शाहरुख, आमिर वा मणिशंकर अय्यर व सुधींद्र कुलकर्णी किती सुखावले होते? देशातले तमाम पुरोगामी विचारवंतही शांत बसले होते. तुम्ही त्या कसाबला ‘आलिंगन’ दिलेत आणि त्या शांतता सोहळ्याची समाप्ती झाल्यावर बुद्धीमंतांनी ‘मुंबई स्पिरीट’ म्हणून त्या संहिष्णू सोहळ्याचा दांडगा समारोह गेटवेपाशी साजरा केला होता. तेव्हाही इथल्या तरूण पिढीने तिथे मेणबत्त्या पेटवायला झुंबड उडवली होती. आमच्यासारखे मुठभर लोक मात्र तुम्ही आणि करकरे, साळसकर, कामथे इत्यादी लोक शहीद झाल्याचा अंधश्रद्ध टाहो फ़ोडून आक्रोश करीत राहिले. पण इतक्या मोठ्या देशात काही लोक तरी मुर्ख अंधश्रद्ध असणार ना? बरे झाले हे सर्व बघायला तुम्ही हयात नव्हता.

आता तो अमिर खान काय म्हणाला ऐकलेत? त्याच्या पत्नीला देश असुरक्षित वाटतोय. स्वाभाविकच आहे. मागल्या दिड वर्षात देशात कुठेही मोठी घातपाताची घटना घडलेली नाही, देशातले जिहादी हिंसाचाराचे प्रकार अकस्मात थंड पडलेत. माणसे हकनाक मारण्याच्या तमाम उदात्त शांततामय मोहिमा संपुष्टात आल्यात. मग देशाच्या सुरक्षेची चिंता खर्‍या संवेदनाशील माणसांना भेडसावणारच ना? त्यांनी नाही तर कोणी टाहो फ़ोडायचा अशा काळात? ओंबळेजी, तुम्ही गेल्यापासून मागल्या सात वर्षात देशातली भाषा व शब्दकोषच काहीच्या काही बदलून गेलेत. तुम्ही ज्या अर्थाने सुरक्षा, संहिष्णूता वा शांततेचा अर्थ लावत होता, त्याच्या उलट अर्थाने आजकाल सगळे शब्द वापरले जातात. कोणीही उठून देशाच्या पंतप्रधानाची खिल्ली उडवू शकतो, इतकी इथे अविष्कार स्वातंत्र्याची सध्या गळचेपी झालेली आहे. कुणालाही देशात आंदोलन करण्याची मुभा असल्याने लोकशाही धोक्यात आलेली आहे. खुल्या वातावरणात मुक्त मतदान व निवडणुका होत असल्याने, देशात एकप्रकारे भयंकर हुकूमशाही प्रस्थापित झाली आहे. माणसे किती हिंसक झालीत ठाऊक आहे? कालपरवा तुमच्यासारखेच कर्नल संतोष महाडिक काश्मिरात जिहादींकडून मारले गेले. त्यांची पत्नी आपल्याला पतीच्या जागी सैन्यात भरती करावे, अशी इच्चा व्यक्त करते. किती हा हिंसेचा हव्यास ना? नाहीतर आमच्या आमिर खानची पत्नी किरणकडे बघा. ती इतक्या सुरक्षित भारतात वास्तव्य करायलाच घाबरून गेली आहे. तिच्यासह आमिरला भारतातली सुरक्षा भयभीत करू लागली आहे. देश सोडून कुठे इराक सिरीया वा हिंसाग्रस्त युरोपात जायचे डोहाळे त्यांना लागले आहेत. सर्वच शब्द आणि त्यांचे अर्थ कुठल्या कुठे बदलून गेलेत. आजची भाषा तुम्हाला कळली नसती ना? किती बदलून गेला ना आपला देश ओंबळेजी?

एका बाजूला तुमच्या बलिदान स्थळी कसाबचा धर्मबंधू फ़लक घेऊन आपल्यावर विश्वास ठेवायचे आवाहन करतोय आणि दुसरीकडे त्याचाच धर्मबंधू आमिरखान देशावर विश्वास राहिला नाही म्हणून ग्वाही देतोय. विश्वास, सुरक्षा, संहिष्णूता, प्रतिष्ठा, न्याय कशाला म्हणून नेमका अर्थ उरलेला नाही. दोन दिवसांनी तुमचे व सहकार्‍यांचे पुण्यस्मरण करायचा दिवस आहे. किती तरूण मुंबईकर तिकडे फ़िरकतील याची मला शंका आहे. पण त्याचवेळी आमिरखान, शाहरुखखान यासारखे महानुभाव रस्त्यात विश्वास दाखवा म्हणून ‘आलिंगन’ मागायला उभे राहिले; तर कोट्यवधी तरूण तरूणी तिथे धावतील. त्यातल्या कुणाला सुद्धा तुमची आठवण उरलेली नाही. देशप्रेम आता शहीद शिकवत नाहीत, त्याचा वास्तवाशी संबंध नाही. तुमच्यासह कित्येकांची कुटुंबे उध्वस्त होऊन गेली. कशासाठी? तर देश व भारतीयांना सुरक्षित राखण्यासाठी, अशी माझ्यासारख्या काही बेअक्कल लोकांची समजूत आहे. कालपरवा कर्नल महाडिक त्यासाठीच हरपले असे मला वाटते. पण तो निव्वळ मुर्खपणा असतो, आजच्या व्याख्येनुसार! तुमच्या अनाथ झालेल्या कन्येला पित्याप्रमाणे पोलिसात जावेसे वाटले, पण परदेशी पळून जायची कल्पनाही तिच्या मनाला शिवली नाही. घर उध्वस्त झाले याचे भान विसरून कर्नल महाडीक यांची पत्नी सैन्यात भरती व्हायला बघते. याला असंहिष्णुता म्हणतात आजकाल. संहिष्णूता व सुरक्षा आपल्याला किरण खान शिकवतात. त्यासाठी रामनाथ गोयंका फ़ौंडेशन व्यासपीठ उपलब्ध करून देते. तुम्हा शहीदांच्या कुटुंबिय पत्नीच्या भावना मांडायला कुठले व्यासपीठ उरलेले नाही. कारण हे तुमचे कुटुंबिय असंहिष्णू वा हिंसक काहीतरी बोलण्याचीच शक्यता भयभीत करते आजच्या बुद्धीवादाला. म्हणून म्हटले तुम्ही हयात नाही, हे खुप चांगले झाले. अन्यथा मरणाच्या यातनांपेक्षा अधिक वेदना सहन कराव्या लागल्या असत्या तुम्हाला!

आजकाल आम्ही भारतात रहातच नाही. आम्ही जगतो, ‘आयडिया ऑफ़ इंडिया’ नावाच्या भासमात्र जगात! त्याचा वास्तवातल्या कुठल्याही घटना घडामोडींशी संबंधच उरलेला नाही. आमचे जग टिव्हीच्या पडद्यावर असते आणि चित्रपटाच्या कथानकातून वा काल्पनिक कथा कादंबर्‍यातून आम्ही जगतो. आमच्या त्या कल्पनिक जगात खर्‍या धोक्याच्या जाणिवा नसतात. मात्र काल्पनिक भ्रामक भितीने आम्ही पछाडलेले असतो. जिथे म्हणून हिंसेने थैमान घातले आहे, त्यात शांतता सुरक्षा दिसू लागते आणि शांत सुरक्षित जीवनाला आम्ही घाबरून जातो. तसे नसते तर कसाबच्या हल्ल्यानंतर शाहरुख आमिर व पर्यायाने त्यांच्या चहात्यांना भिती वाटली असती आणि त्यांनी तेव्हाच देश सोडायचा विचार बोलून दाखवला नसता का? ज्या देशाने व समाजाने प्रतिष्ठा पैसा व यश देवून डोक्यावर घेतले, त्याची आमिरला कशाला भिती वाटली असती? ज्या इस्लाममध्ये चित्रपट नाचगाण्याला अक्षम्य गुन्हा मानले आहे. त्याच विचारसरणीचे भय आमिरला वाटत नाही आणि त्याचा धंदा करून प्रतिष्ठीत झालेला हा माणूस आज आपल्याच चहात्यांच्या प्रेमाने भयभीत होऊन गेलाय, याचा अर्थ कसा लावायचा? ओंबळेजी तुम्ही गेल्यानंतर देश खुप बदललाय हो! आता शब्दांचे अर्थ जसेच्या तसे वाचणार्‍या, ऐकणार्‍यापर्यंत पोहोचतील याचीही शाश्वती उरलेली नाही आपल्या देशात. अर्थाचा अनर्थ करण्याचा उद्योग इतका तेजीत आलेला आहे, की शब्दांनाही आपल्यात सहभागी असलेल्या अक्षरांचा विश्वास वाटेनासा झाला आहे. याकुब मेमनला शहीद ठरवून अंत्ययात्रेला लोटलेल्या हजारो लोकांच्या गर्दीने इथे कोणी विचलीत होत नाही, पण नथूरामच्या स्मृतीदिनी शे-सव्वाशे लोक जमले तर इथल्या बुद्धीवाद्यांना दरदरून घाम फ़ुटतो. कदाचित काही वर्षांनी तुमच्याही स्मृतीदिनी मुठभर लोक जमले तर देश धोक्यात आल्याचा ओरडा सुरू होऊ शकेल. म्हणून म्हटले तुम्ही हयात नाही, हे बरे झाले. सुटलात ओंबळे, तुम्ही आणि तुमचे अन्य सहकारी या देशाच्या, समाजाच्या पाशातून!
-----------------------------------
तुम्ही २६/११ रोजी काय करणार?

मागल्या सहा वर्षापासून मी व्यक्तीगतरित्या एक व्रत पाळतो. २००८च्या मुंबई हल्ल्यानंतर विचलीत झाल्यावर काय करावे अशा विचारांनी मी अस्वस्थ होतो. दु:खात सहभागी होण्याची भंपक कल्पना मला मानवत नाही. कारण त्यातल्या वेदना यातनांची भागिदारी शक्य नसते. पण ज्याच्याविषयी सहवेदना आहे, त्याच्या वेदनांची थोडी अनुभूती घ्यावी असे डोक्यात आले. ओंबळे वा २६/११ च्या घटनेत जे शहीद झाले, त्यांना मनाविरुद्ध या जगाचा निरोप घ्यावा लागला. जगण्याची इच्छा आकांक्षा हा जबरदस्त मोह असतो आणि त्याच्यावर पाणी सोडण्याची वेदना तितकीच असह्य असते. थोडक्यात आपल्याला मानवणार नाही वा असह्य होईल असे काही करून त्या शहीदांना आपल्या परीने श्रद्धांजली देण्यासाठी काय करता येईल असा विचार सुरू झाला. व्यक्तीगत पातळीवर शक्य असलेले एक व्रत मी सुरू केले. गेल्या सहा वर्षात २६ नोव्हेंबर या दिवशी मी अनवाणी असतो. घरात असो किंवा बाहेर असो, कुठेही पायात चप्पल वा पादत्राणे घालत नाही. रस्त्यावरची घाण चिखल वा काच पत्रा लागून जखम होण्याची चिंता मन पोखरते. बाहेर पडलो की लोक विचित्रपणे बघतात. कोणी विचारलेच तर मी कारण सांगतो. आपणहून काही सांगत नाही. पण माझा अनुभव चांगला आहे. श्रद्धांजली म्हणून योजलेला हा मार्ग अनेकांना भावतो. काहीजण त्याचे अनुकरणही करतात. आमिर खानला दोष देणे सोपे आहे. आपण काय करणार याचे उत्तर कधीतरी शोधायला हवे. माझे उत्तर मी शोधले आहे. व्रत म्हणून पाळतो आहे. ज्यांना यात तथ्य वाटेल, त्यांनीही आपल्या परीने असे काही करावे, ज्याची जाहिरात व्हायची गरज नाही. पण त्यातून आपल्यासाठी हौतात्म्य पत्करतात, त्याची जाणिव कायम उरात रहावी असे काहीही करावे. मात्र मनात महाडीक, ओंबळे वा देशासाठी शहीद होणार्‍यांविषयी आत्मियता असेल, तरच असे काही करावे. आपण काही उदात्त वा सक्तीने करतोय अशी भावना असेल, तर अजिबात असे काही करू नये. कारण हा अनुभूतीचा व सहवेदनेचा विषय आहे. देश समाज आणि आपले व्यक्तीगत जीवन यांच्यात तसूभर फ़रक ज्यांना वाटला नाही, त्यांच्या त्या भावनेशी श्रद्धेशी एकरूप होण्याचा हा किंचित प्रयत्न अशी माझी धारणा आहे. ती भावना मला सुरक्षेची हमी देते म्हणून!   - भाऊ तोरसेकर

(आवडले भावले तर शेअर करा)

इटाली‘वाल्या’ कोळीणीचा जावई



मागल्या दहा वर्षात देशाचाच जावई असल्यासारखी शाही वागणूक मिळालेले ‘उद्योग’पती रॉबर्ट वाड्रा यांना मोदी व भाजपाची सरकारे सतावत असल्याचे त्यांनीच एका मुलाखतीतून स्पष्ट केले आहे. त्यांना तसे वाटणे स्वाभाविकच आहे. कारण या देशातले कायदे सामान्य माणसाला लागू होत असले, तरी नेहरू-गांधी खानदानाशी कुठलाही संबंध असेल, तर त्या व्यक्तीला कायदे नियमातून सूट मिळत असते. देशाच्या राज्यघटनेत नसलेली ही अलिखीत तरतुद आहे. पण मोदी घटनाच मानत नसतील, तर त्यातल्या अलिखीत गोष्टींचे पालन त्यांच्याकडून कसे होईल? सहाजिकच देशात सत्तांतर झाल्यापासून वाड्रा यांच्यामागे कायद्याचा ससेमिरा लागला आहे. त्यांनी ‘उद्योग’पती म्हणून जी विकासाची कामे हाती घेतली होती, त्यात खंड पाडला जात आहे. उदाहरणार्थ हरयाणामध्ये वाड्रा यांनी हजारो एकर जमिन खरेदी केली होती. ज्यांच्याकडून ही जमिन खरेदी केली, त्याच कंपनीने वाड्रा यांना जमिन खरेदीसाठी कोट्यवधी रुपये उसने व बिनव्याजी दिले होते. मग पुन्हा तीच जमिन काही काळानंतर त्याच कंपनीने वाड्रा यांच्याकडून पुन्हा खरेदी केली आणि अनेकपटीने त्याची किंमत मोजली. कुठलीही खरेदी करायला खिशात पैसे असावे लागतात, हा सामान्य व्यवहाराचा नियम आहे. खिशात दमडा नसताना तुम्ही कुठली खरेदी करू शकत नाही. पण हा नियम नेहरू खानदानाचे जावई असल्याने वाड्रांना लागू होत नाही, विकणाराच त्यांना खरेदीसाठी पैसे उसने देतो आणि पुन्हा तीच वस्तू अनेकपटीने किंमत देवून विकत घेऊ शकतो. हे अर्थशास्त्र मोदी सरकार वा भाजपाला अजून उमगलेले नाही. म्हणून त्यांनी वाड्रा यांना छळायला सुरूवात केली आहे. सामान्य माणसाला लागणारे नियम वाड्रांना लावणे, हा अन्यायच नाही काय? मग त्यांनी तक्रार केल्यास चुक ते काय? इथपर्यंत वाड्रा यांचा आक्षेप समजू शकतो. पण दुसरा भाग थोडा चमत्कारीक वाटला.

आपल्यावर होणार्‍या अन्यायाला वाड्रा यांनी एका माध्यमाला मुलाखत देवून वाचा फ़ोडली. त्यात वाड्रा म्हणतात, ‘आपण सोनिया वा गांधी खानदानाशी संबंधित आहोत म्हणूनच आपल्याला लक्ष्य केले जात आहे. राजकीय हत्याराप्रमाणे आपला वापर होत आहे. एका सामान्य नागरिकाप्रमाणे आपल्याला व्यवसाय करू दिला जात नाही.’ गडबड इथे आहे. वाड्रांची अपेक्षा अशी आहे, की त्यांना सामान्य भारतीयाप्रमाणे कारभार व उद्योग करू दिला पाहिजे. त्यात काही चुक नाही. पण वाड्रा हे देशाचे तितके सामान्य नागरिक कुठे आहेत? ते कायदे व नियम ज्यांना लागू होत नाहीत, अशा घराण्याशी निगडीत आहेत. म्हणूनच त्यांना विशेष वागणूक मिळत असते. सामान्य नागरिकाला विमानतळावर कसून तपासले जाते. त्याच्या सामानाची झडती घेतली जाते. वाड्रा यांना तसे सामान्य पद्धतीने कधी कोणी वागवले नाही. कितीही सुरक्षेचा मामला असो, कुठल्याही तपासणीशिवाय त्यांना विमानतळावर येजा करता आली, तेव्हा त्यांनी कधी सामान्य नागरिकाप्रमाणे आपल्याला वागणूक मिळत नाही, अशी तक्रार केल्याचे कोणी ऐकले आहे काय? कुठल्याही सरकारी खात्यात वा मंत्रालयात सामान्य माणसाचे साधे अर्ज धुळ खात पडलेले असतात. त्यावर वर्षानुवर्षे निर्णय होत नाहीत. पण वाड्रांनी कुठल्याही जमिनी घेतल्या, तर विनाविलंब त्यांच्या नावावर त्याचे दस्तावेज तयार करून द्यायला सरकारी यंत्रणा राबत होती. तेव्हा आपल्याला सामान्य माणसाप्रमाणे ताटकळत ठेवले जात नाही आणि तत्परतेने आपल्या विषयात सरकारी निर्णय होतात, अशी तक्रार वाड्रा यांनी केल्याचे कोणाच्या ऐकीवात आहे काय? सतत ‘समर्था घरीचे’ म्हणून त्यांना विशेष वागणुक मिळत राहिली, म्हणून त्यांनी एकदाही तक्रार केलेली नाही. मग आताच त्यांना असे सामान्य नागरिकाप्रमाणे जगण्याचे, वागण्याचे डोहाळे कशाला लागले आहेत?

ज्या कंपनीकडे कित्येक वर्षे एक जमिन होती आणि त्याविषयी सरकार कुठलाही निर्णय घेत नव्हते, त्याला सामान्य नागरिकाला मिळणारी वागणूक म्हणतात. परंतु त्याच कंपनीने मग तीच जमिन वाड्रांना विकली आणि पैसे नव्हते तर पैसेही दिले. मग तीच जमिन वाड्रांची होताच सरकारी तत्परता कार्यरत झाली आणि रातोरात तीच जमिन विकासाला योग्य व वेगळ्या कामासाठी वापरण्यायोग्य असल्याचे निष्पन्न झाले. एकदा त्या जमिनीवरील आरक्षण उठले आणि वाड्रांनी तीच जमिन पुन्हा त्याच मूळ मालक असलेल्या कंपनीचा परत विकून टाकली. केवळ वाड्रा त्यात सहभागी झाले आणि जमिनीलाही खास वागणुक मिळाली. ह्याची तक्रार वाड्रांनी केलेली नव्हती की जमिनीने केलेली नव्हती. ह्याला वाड्रा ‘उद्योग’ म्हणतात. त्यांनी कुठले उत्पादन वा कारखाने उभे केले म्हणून त्यांना उद्योगपती म्हटले जाते, त्याचाही कधी कोणी खुलासा केलेला नाही. पण पुन्हा अमूक एक गोष्ट म्हणजे उद्योग आणि तो करणार्‍याला उद्योगपती म्हणावे, ही बाब सामान्य माणसाला लागू होत असते. वाड्रा सामान्य नागरिक कधी होते? सोनियांची कन्या वा इंदिराजींची नात असलेल्या प्रियंका गांधींचे पती झाल्यावर वाड्रा यांना कसलाही ‘पती’ म्हणवून घेण्याचा विशेष अधिकार आपोआपाच प्राप्त होतो ना? तसे वाड्रा अकस्मात उद्योगपती होऊन गेले. सामान्य माणूस ज्याला उद्योग म्हणतो, त्यापेक्षा वाड्रांचे ‘उद्योग’ वेगळे असतात, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. केवळ सोनियांचे जावई वा राहुलचे जीजाजी म्हणून त्यांना दोष देण्यात अर्थ नाही. तो निव्वळ पक्षपात आहे. तेव्हा आपल्याला अकारण राजकारणातले हत्यार बनवले जात असल्याची वाड्रा यांची तक्रार योग्यच आहे. एक सामान्य भारतीयाप्रमाणे त्यांच्या विरोधात काही आक्षेप असतील, तर त्याची चौकशी सामान्यपणे व्हायला हवी. त्यासाठी खास चौकशी आयोग कशाला नेमायचा?

मोदी सरकार वा हरयाणाच्या भाजपा सरकारने खास चौकशी नेमून पुन्हा वाड्रा यांना सामान्य नागरिक म्हणून जगण्यापासून वंचित केले आहे. त्याबद्दल त्यानी एक मुलाखत देवून नाराजी व्यक्त केली आहे. खरे तर त्यासाठी आतापर्यंत आणखी काही साहित्यिक वा कलावंतांनी आपापले पुरस्कार परत देण्याची मोहिमच हाती घ्यायला हवी होती. कारण हा लोकशाहीचा संकोच आहे, नेहरू खानदानाच्या कुणा व्यक्तीला वा संबंधिताला अशाप्रकारे कायद्याच्या कचाट्यात पकडण्याचे प्रयत्न, हा असंहिष्णूतेचा कळसच नव्हे काय? या देशात नियम कायदे व व्यवस्था म्हणून नेताजींच्या आप्तस्वकीयांवर पाळत ठेवली जाऊ शकते. कागदोपत्री घोळ घातला जाऊ शकतो. पण नेहरू घराण्याला कुठलेही नियम लावणे, म्हणजे चक्क लोकशाहीचा व सभ्यतेचा गळा घोटणेच नाही काय? मग मोठ्या माध्यमांनी गरीब बिचार्‍या वाड्रा यांच्या दु:खाला वाचा फ़ोडायला प्रदिर्घ मुलाखत घेणे आवश्यकच नव्हते का? पण त्यात एक प्रश्न राहुन गेला. तो असा की नेहरू-गांधी खानदानाशी संबंध आहे, म्हणून छळ होतो, अशी तक्रार आहे, तर त्याच खानदानाशी संबंध असल्याचे लाभ वाड्रांनी आजवर कशाला घेतले? सामान्य नागरिकाप्रमाणे त्यांनी आपली कंपनी चालवली नाही की खिशात दमडा नसताना कुठला पोटापाण्याचा उद्योग केला नाही. म्हणजेच नेहरू खानदानाशी संबंध जोडून त्याचे सर्व लाभ वाड्रा मस्तपैकी उकळत राहिले. त्याचे फ़ायदे घेताना त्यांना कुठला त्रास वा मनस्ताप झाला नाही. मग जेव्हा त्याच नातेसंबंधांचा जाच सोसायची वेळ आली, तेव्हा वाड्रा सामान्य नागरिक व्हायला निघाले आहेत. असे इतिहास वा पुराणात एकच उदाहरण मिळते. वाल्या कोळ्याच्या कुटुंबियांनी त्याच्या पापाचे लाभ उठवायला संमती दिली होती. पण त्याच पापाची भागिदारी व परिणाम भोगायला नकार दिला होता. वाड्रा यांचा पवित्रा त्यापेक्षा वेगळा आहे काय? मग त्यांना काय म्हणायचे? इटाली‘वाल्या’ कोळणीचा जावई?

Sunday, November 22, 2015

आलिंगनाचे कांगावखोर नाटक



सर्वात भयंकर नशा कुठली असेल तर ती उदात्त मानसिकतेची! आपण काही महान कार्य करीत असल्याची समजूत एखाद्या व्यक्तीची करून दिली, मग त्याची सारासार बुद्धी निकामी होऊन जाते. माणसाला जी उपजत विवेकबुद्धी लाभलेली असते, त्यामुळे माणुस समोरच्या घटनांचा अर्थ लावतो आणि त्यानुसार प्रतिक्रीया देत असतो. पण तो विवेक त्याने गमावला, मग त्याला कुठलेच तारतम्य उरत नाही आणि कुठल्याही हानिकारक गोष्टीलाही तो प्रवृत्त होऊ शकतो. गर्द वा तत्सम कुठल्या नशेच्या आहारी गेलेली माणसे अत्यंत विक्षिप्त वागतात, हे आपल्याला ठाऊक आहे. पण निदान ती माणसे नशेच्या आहारी जाऊन आपला विवेक सोडत असतात. काही माणसे कुठल्याही नशेच्या आहारी गेलेली नसूनही तारतम्य सोडून विक्षिप्त कशाला वागतात, असा आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो. मणिशंकर अय्यर वा सुधींद्र कुलकर्णी यासारखी माणसे जाणिवपुर्वक भारताला हानिकारक वागत असतील, तर त्यात त्यांचे स्वार्थ असल्याची शंका आपण घेऊ शकतो. पण जे कोणी त्याला पुरक असे वागतात आणि त्यात त्यांचा कुठलाही स्वार्थ नाही, असे आपल्याला पक्के ठाऊक असते, तेव्हा त्यांच्या वर्तनाविषयी आपल्यावर चकीत व्हायची पाळी येते. सध्या सोशल मीडियात एक चित्रण बघायला मिळते आहे. कोणी एक मुस्लिम वेशभूषेतला माणूस मुंबईच्या पदपथावर एक हस्तलिखीत फ़लक घेऊन उभा आहे. त्याचे डोळे पट्टीने बांधले आहेत आणि त्याच्या पायाशी एक फ़लक आहे. त्यावर लिहीले आहे, ‘मी मुस्लिम आहे आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुमचा माझ्यावर विश्वास आहे काय? असेल तर मला आलिंगन द्या!’ त्याच्या आपसास अनेक कॉलेजचे विद्यार्थी विद्यार्थिनी हिंडत फ़िरताना गोळा होताना दिसतात आणि मग कोणी एक तरूण पुढे जाऊन त्याला आलिंगन देतो, मग इतरही हळुहळू त्याचे अनुकरण करतात.

असाच एक व्हीडिओ आणखी कुठल्या पाश्चात्य देशातला आहे. त्यात एक इसम सिरीयात शांतता नांदावी म्हणून भर चौकात हात वर करून डोळ्यावर पट्टी बांधून उभा आहे आणि आपले हात उभे ठेवण्यासाठी लोकांना आवाहन करणारा फ़लक त्याच्या पायाशी आहे. वरकरणी ह्यात मोठे उदात्त हेतू दिसून येतात. मग ज्यांना अन्य काही उदात्त करणे शक्य नसते किंवा ज्यांनी कधी काही समाजोपयोगी कुठले कर्तव्य बजावलेले नसते, असे लोक ह्या सोप्या गोष्टीतून ‘पुण्य’ गाठीशी बांधायला सहजगत्या पुढे येतात. तसे या चित्रणातून बघायला मिळते. या डोळ्यांना पट्टी बांधलेल्या कुणा अनोळखी व्यक्तीला आलिंगन दिल्याने आपण जगात धार्मिक सौहार्द निर्माण करायला मोठा हातभार लावला, असे खोटे समाधान त्यात पुढे येणार्‍यांना मिळते. कसला खर्च नाही की कसली तोशिस नाही. कसल्याही कष्ट मेहनतीशिवाय गाठीशी पुण्य बांधल्याचे पोकळ समाधान मात्र मिळते. आपण धर्मांध नाही, आपण द्वेषाला झिडकारणारे संहिष्णू असल्याचा खोटा अभिमान काळजात जमा होतो. त्या कुणा इसमाच्या हात उंचावण्याने सिरीयात शांतता स्थापन होत नाही, की तिथे हकनाक मरणार्‍या कुणाला जीवदान मिळत नाही. तिथे वा अन्यत्र हिंसाचार माजवणार्‍या जिहादींना कुठला पश्चात्ताप होत नाही, की जग सुरक्षित सुखी होत नाही. पण दरम्यान या प्रत्येक आलिंगन देणार्‍याला मात्र आपण फ़ार मोठे उदात्त कार्य केल्याचे समाधान पदरी पडलेले असते. यातला कोणी रस्त्याच्या कडेला माजलेला कचरा साफ़ करून जीवन निरोगी होण्यासाठी कष्ट करणार नाही. पण हत्याकांड वा हिंसाचार होऊन गेल्यावर मेणबत्त्या किंवा गुलाबाचे फ़ुल तिथे ठेवायला अगत्याने हजेरी लावील. कारण त्यांना समोरची हिंसा थोपवण्याचे बळ त्यांच्यात नसते. तोच आपला नाकर्ता स्वभाव लपवण्यासाठी त्यांना असे काही पळपुटे उपाय हवे असतात.

मग कोणी डोळ्यांना पट्टी बांधून उभा रहातो, तो डोळे बंद असूनही काय होत आहे ते सहज बघू शकत असतो. कारण डोळे त्याचे बंद असतात, पण उघड्या डोळ्यांनी अशा नाटकात सहभागी होणारे किती आंधळे असतात, त्याची गंमत त्याला बघायची असते. पॅरीसमध्येही अशाच एकाने तो प्रयोग केला आणि अनेक डोळस आंधळ्यांनी त्याला आलिंगन देवून आपणही अजून मुस्लिमावर विश्वास ठेवतो, याची भर चौकात येऊन ग्वाही दिली. पण मुळात अशा विश्वासाचा प्रश्नच कशामुळे येऊ शकला, याचे भान यातल्या कुणा आलिंगनकाराला आहे काय? मुस्लिमांवर अन्य बिगर मुस्लिमांचा विश्वास नसता, तर त्या त्या देशात मुस्लिमांना सुखनैव वास्तव्य करता आले असते काय? अनेक युरोपिय देशांनी निर्वासित म्हणून मुस्लिमांना आपल्यात सामावून घेतले त्याला मुस्लिमांवरील विश्वास नाही तर दुसरा कुठला शब्द आहे? त्या पॅरीसच्या वा इथल्या मुंबईतल्या डोळ्यावर पट्टी बांधणार्‍याने आपल्या वस्तीत लपून व मुखवटे पांघरून जिहादी कृत्ये करणार्‍यांवर ‘(डोळ्यावरची धर्माची पट्टी सोडून) नजर ठेवून पोलिसांना खबर दिली असती तर? तर तिथे इसिस वा मुंबईत कसाब रक्तपात करू शकले नसते. डोळ्यावरची पट्टी काढून मुस्लिमांनी आपली विश्वासार्हता सिद्ध करायची वेळ आलेली असताना असली नाटके काय कामाची? चेंबूरच्या त्या दुकानात तलवार घेऊन गुंड घुसला, तेव्हा नासिरुद्दीन मन्सुरी नावाचा मुस्लिम पुढे सरसावला आणि त्यानेच एका बिगरमुस्लिम दुकानदाराचा जीव वाचवला. त्यासाठी आपला जीव धोक्यात घालणार्‍या नासिरुद्दीनला कुठे डोळ्यावर पट्टी बांधून आलिंगनासाठी उभे रहावे लागले नाही. त्याने कृतीतून आपण मुस्लिम असताना माणुसकीवर विश्वास ठेवतो आणि त्यासाठी आपला जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवतो, हे सिद्ध केले. विश्वास कृतीतून निर्माण होतो व कसोटीला लागतो.

यातला भंपकपणा किती धोकादायक आहे त्याचे भान अजून जगाला आलेले नाही. म्हणून अशी नाटके चालतात. मुस्लिमाचा विश्वास सर्वप्रथम अल्लाहवर असावा लागतो. आज त्याच अल्लाहवर विश्वास दाखवायला म्हणून धर्माच्या शिकवणूकीचा हवाला देवून राजरोस निरपराधांच्या कत्तली चालल्या आहेत. तेव्हा सवाल मुस्लिमाने अन्य कुणा बिगर मुस्लिमावर विश्वास असल्याची साक्ष देण्याचा नाही. विषय बिगर मुस्लिमांनी मुस्लिमांवर विश्वास ठेवायचा नाही. तर आपण धर्मापेक्षा माणुसकीवर विश्वास ठेवतो, याची साक्ष देण्याची गरज आहे. ते काम असे डोळ्यावर पट्टी बांधून वा एकमेकांना आलिअंगने देवून साध्य होणार नाही. नाटके खुप रंगतील, पण विश्वासाचा ठिसूळ झालेला पाया मजबूत होणार नाही. तेव्हा असल्या नाटकातून लोक फ़सतात व बळी पडतात, ही विवेकबुद्धीला गुंडाळलेली पट्टी काढून टाकायची वेळ आली आहे. जगभर जिहाद नावाचा हिंसाचार इस्लाम धर्माच्या नावाने चालू आहे आणि त्याला नाटकाने रोखता येणार नाही. हेच काम जेव्हा कसाब सामोरा आलेला तेव्हा कोणी कशाला केले नाही? कसाब वा त्याचे साथीदार धर्माच्या नावानेच बेछूट गोळ्या झाडत होते, तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवून साक्षात मृत्यूला आलिंगन देणे ही विश्वासाची कसोटी होती? कितीजण तेव्हा पुढे सरसावले? रस्त्यावर कुणाला विश्वासाचे प्रतिक म्हणून आलिंगन देण्याच्या पळवाटेने धोका संपत नाही, अधिक भयंकर रूप धारण करून अंगावर येतो. युरोप त्याच अनुभवातून जातो आहे. असे डोळ्यावर पट्टी बांधणारे नव्हे तर पोलिसी गणवेशातील तुकाराम ओंबळे क्साबला आलिंगन द्यायला पुढे गेला होता. त्याच मुंबईत असली आलिंगनाची नाटके करणार्‍यांना थोडी तरी शरम वाटली पाहिजे. चार दिवसांनी त्या आलिंगनातून शहीद झालेल्या शूरवीर तुकाराम ओंबळेची पुण्यतिथी आहे आणि आपण किती बेशरम होऊन असली नाटके करतोय ना?

https://www.youtube.com/watch?v=lRbbEQkraYg


https://www.youtube.com/watch?v=N96W8CeiT3I&feature=youtu.be