Wednesday, September 24, 2014

अंधश्रद्धा निर्मूलनाला देवभक्तांच्या शुभेच्छा



बुधवारी सकाळी भारताच्या शास्त्रज्ञांनी अवकाशात पाठवलेले मंगळयान सुखरूप त्या ग्रहाच्या कक्षेत पोहोचले आणि लौकरच तिथे स्थिरावले. मग स्वत:ला विज्ञाननिष्ठ किंवा अंधश्रद्धा निर्मूलनवादी समजून जगणार्‍या भुरट्यांच्या छात्या इतक्या फ़ुगल्या, की त्यांनी नेहमीप्रमाणे देवधर्म मानणार्‍या किंवा नवससायास करणार्‍यांची मनसोक्त अवहेलना करायचा सपाटा लावला. कुणी प्लान्चेट वा कुंडलीतला मंगळ उकरून काढला, तर कोणी शनिमहात्म्य वा अन्य कसल्या श्रद्धेला डिवचण्याचा पुरूषार्थ सुरू केला. पण यापैकी कितीजणांना मूळात विज्ञानाने घेतलेल्या गरूडभरारीचे कौतुक होते? त्यातल्या कुणाला तरी खरोखर विज्ञानाने इतकी मोठी झेप घेतली त्यामागचे रहस्य वा प्रेरणा उमगली होती? त्यांना मंगळयानाच्या यशस्वी सांगतेचे काडीमात्र कौतुक नव्हते, की आनंद झाला नव्हता. त्यापेक्षा देवधर्म मानणार्‍यांना डिवचण्याची एक अपुर्व संधी गवसल्याच्या आसुरी आनंदाने अशी निर्मूलनवादी मंडळी वेडीपिशी झालेली होती. आणि जेव्हा माणूस कुठल्याही कारणाने वेडापिसा होतो, तेव्हा त्याला वास्तवाचेच भान उरत नाही, तर विज्ञानाचे भान कशाला रहावे? सहाजिकच आपल्या विज्ञाननिष्ठेचे प्रदर्शन मांडताना विवेकाची चड्डी कंबरेला टिकलेली नाही याचेही भान त्यांना कसे असेल? जणू यांच्या अंशश्रद्धा निर्मूलन संघटनेतल्या कोणी तरी फ़टाक्यासारखा अग्नीबाण उडवून मंगळयान थेट तिथे करोडो मैलावर अवकाशात मंगळाच्या कक्षेत नेवून सोडले असावे, अशाच थाटात विविध माध्यमातून बरळणे चालू होते. आणि ज्यांनी खरेच त्या यानाचे प्रक्षेपण करण्यापासून त्याची यशस्वी सांगता केली, त्यांचा अशा निर्मूलनवाद्यांची दूरान्वये संबंध नाही, याचेही अशा शहाण्यांना भान नव्हते. उलट ज्या अंधश्रद्धा वा देवधर्माची असे निर्मूलनवादी अहोरात्र हेटाळणी करतात, त्यापैकीच काही श्रद्धाळूंनी हा यशस्वी प्रयोग केला आणि त्यांच्या श्रद्धेच्या निष्ठेनेच त्याला पहिल्या प्रयत्नात यशस्वी केलेले आहे. थोडक्यात मंगळयानाच्या मोहिमेचे अपुर्व यश, ह्या श्रद्धाळू व देवभक्तांनी अंधश्रधा निर्मूलनाला दिलेल्या वैज्ञानिक शुभेच्छा होत.

एक वर्षापुर्वी जेव्हा या यानाचे प्रक्षेपण व्हायचे होते, तेव्हा देशभरचे निर्मूलनवादी ‘सनातन’च्या कुणाला दाभोळकर हत्या प्रकरणात अटक करण्याच्या मागण्या व निदर्शने करण्यात गर्क होते. कुठल्याही पुराव्याशिवाय आपल्या समजूती व भ्रमापोटी त्यांचा आटापिटा चालला होता. नेमक्या त्याचवेळी तिकडे श्रीहरीकोटा या प्रक्षेपण तळावर मंगळयानाला अवकाशात पाठवण्याची तयारी चालली होती. त्यासाठी सर्व अचुक सज्जता झाल्यावरही इस्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन देशातील नवसाचे देवस्थान मानल्या जाणार्‍या तिरूपती येथे पोहोचले आणि त्यांनी मोहिम यशस्वी करण्याचे साकडे त्या देवाला घातले होते. त्यावेळी राधाकृष्णन म्हणाले होते, ‘वैज्ञानिक बाबतीत आम्ही सर्वकाही अचुक सज्ज केले आहे. पण अनिश्चीत कारणे उदभवल्यास सर्वकाही देवाच्याच हाती असते, म्हणून त्याला शरण आलो.’ त्या आशीर्वादानंतरच त्यांनी मंगळयानाचे प्रक्षेपण केले होते. आपण विज्ञानाचे सर्वज्ञ नाही किंवा जगाची सर्वच रहस्ये आपल्याला उलगडलेली नाहीत, याचे भान असल्याची ती साक्ष होती. पण यातला कसलाही गंध नसलेल्या निर्मूलनवाद्यांना मात्र विज्ञानाचे सर्वज्ञान झाल्यासारखे ते वागतात. सुदैवाने देशातील संशोधन वा विज्ञानाची सुत्रे व अधिकार अशा निर्मूलनवाद्यांच्या हाती अजून गेलेली नाहीत. अन्यथा मंगळयान दुरची गोष्ट झाली. आपला देश पेन्सीलच्या आकाराचाही अग्नीबाण वा चेंडूच्या आकाराचाही उपग्रह अवकाशात पाठवू शकला नसता. मंगळाची गोष्ट सोडा, ढगापर्यंत पोहोचणेही अशक्य होऊन बसले असते. कारण कुठलाही शोध घ्यायचा असेल, तर अनिश्चीततेचा वेध घ्यावा लागतो. तो शोध न घेताच त्याला नाकारण्याने विज्ञान वा संशोधन खंडीत होऊन ज्ञानाचाप्रवाह थिजतो. ज्यांना त्याचेच आकलन झालेले नाही, त्यांना मग श्रद्धा वा अंधश्रद्धा यातला फ़रक तरी कसा उमगायचा? त्यामुळेच अंधश्रद्धा निर्मूलन हीच एक जटील अंधश्रद्धा होऊन बसली आहे.

समजा इस्रोची सुत्रे अशा कुणा निर्मूलनवाद्याच्या हाती असती, तर मंगळयानाला अवकाशात झेप तरी घेता आली असती काय? दाभोळकर हत्याप्रकरणी पोलिसांना कोणी आरोपी सापडला नाही म्हणून तक्रार आहे. पण तो शोधायची मुभा मात्र हे लोक पोलिसांना देत नाहीत. पोलिसांनी म्हणे प्लान्चेटचा आधार घेतला, म्हणून याच लोकांनी आयुक्तावरच गुन्हा दाखल करण्यापर्यंत मजल मारली. मात्र कुठलाही पुरावा नसताना सनातनच्या अनुयायांना खुनाच्या आरोपाखाली पकडण्याचा त्यांचा आग्रह विज्ञाननिष्ठ, विवेकवाद असतो. समजा अशाच कुणा माथेफ़िरूच्या हाती इस्रोचे अधिकार असते, तर त्याने मंगळयानाच्या आरंभीच राधाकृष्णन तिरूपतीच्या आशीर्वादाला गेले, म्हणून त्यांना तडकाफ़डकी निलंबित केले असते. मग दुसर्‍या दिवशी मंगळयानाचे प्रक्षेपणही होऊच शकले नसते. थोडक्यात काय तर विज्ञाननिष्ठ अंधश्रधा निर्मूलन हीच एक भीषण घातक अंधश्रद्धा होऊन बसली आहे. आपल्या विज्ञानविषयक ज्या अंधश्रद्धा आहेत, त्याला घट्ट धरून बसलेल्यांचा एक कळप, देशात उदयास आलेला आहे आणि त्याने उर्वरीत निरागस लोकसंख्येला ओलीस ठेवून मनमानी चालविली आहे. त्याचे विरोधाभासी दुष्परिणाम मग आपल्याला नित्यनेमाने अनुभवास येत असतात. शाहु-फ़ुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका आणखी तीन आठवड्यात व्हायच्या आहेत आणि त्यासाठीचे अर्ज दाखल करण्याचे पाच दिवस उलटून गेल्यावरही पन्नास अर्जही दाखल होऊ शकलेले नाहीत. ज्यांनी आठदहा महिन्यापुर्वी वाजतगाजत अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा विधानसभेत संमत केला, त्यातल्या किती आमदार व पक्षांनी पाच दिवसात आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत? जागांची भांडणे रंगवून पितृपक्षात उमेदवारी भरायचा धोका प्रत्येकाने पाळला आहे. आणि निर्मूलनवादी ‘अर्ज भरून दाखवा’ असे केविलवाणे आव्हान त्यांनाच देत आहेत.

ज्यांचा अशा पितृपक्षावर इतका गाढ विश्वास आहे, त्यांच्याकडून तो कायदा संमत करून घेतल्याचा जल्लोश निर्मूलनवाद्यांनीच साजरा केला होता ना? मग अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हवाच कशाला होता? ज्यांनी तो संमत केला, त्यांचाच त्यावर विश्वास नाही. तर त्यांच्याकडून कसली अंमलबजावणी होणार? पण कायद्याने सर्व प्रश्न सुटतात अशी ज्यांची अंधश्रधा असते, त्यांना अंधश्रद्धा निर्मूलनवादी समजले जाण्याची एक श्रद्धा आहेच. पण विज्ञान अनाकलनीय गोष्टींचा वेध घेते अशी ज्यांची निष्ठा आहे, त्यांनी मनाच्या समाधानासाठी तिरूपतीला साकडे घातले आणि आपले काम नीट पार पाडले; तर हे निर्मूलनवादी त्याच शास्त्रज्ञांची अंधभक्त हेटाळणी करणार. अध्यात्म व विज्ञान यापैकी कशाचेही आकलन ज्यांना झालेले नाही, अशा अर्धवटरावांनी कुठलेही काम धड केल्याचा जगात दाखला नाही. जादूटोणा करणार्‍यांच्या हातचलाखी किंवा कुणा भंपक भोंदूबुवाचा पर्दाफ़ाश केल्याने कोणी विज्ञाननिष्ठ होत नसतो. विज्ञानाच्या सहाय्याने अनाकलनीयतेच वेध घेण्यातूनच निसर्ग व विश्वाची रहस्ये उलगडत जातात आणि पुढल्या काळात त्याच्यापेक्षाही अधिक रहस्ये उलगडतात, तेव्हा आधीचे विज्ञान कालबाह्य होत असते. याचे भान नसलेले आपल्याला गवसले, तेच अंतिम सत्य म्हणून कवटाळून बसतात. त्यांचा समावेश आपोआप अंधश्रद्धाळूंमध्येच होत असतो. मग त्यांनी साईबाबा, तिरूपती समोर माथा टेको किंबा आपल्या पुर्वग्रहानुसार कसले आग्रह धरो. मंगळयानाच्या यशस्वी मोहिमेतून त्याचीच पुन्हा एकदा प्रचिती आली. ज्याचा आरंभच मुळात तिरूपतीच्या आशीर्वादाने झाला, त्याच्या यशाचे श्रेय घ्यायला सरसावताना देवाधर्माची टवाळी करण्यातून अज्ञानाचे प्रदर्शन मात्र भरपूर झाले. ज्यांना दाभोळकरांच्या हत्याकांडाचा विज्ञाननिष्ठ शोध वा संशयही घेता येत नाही किंवा विचार करता येत नाही, त्यांनी विवेकाच्या आडोशाने श्रद्धाळूंची हेटाळणी करणे, खुप केविलवाणे नाही काय?
=================================

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/isro-seeking-lord-balajis-blessings-before-space-missions-is-superstition-cnr-rao/articleshow/26300378.cms?

http://www.agrowon.com/Agrowon/20131106/5034836929354336484.htm

 http://www.khaskhabar.com/hindi-news/National-mission-mars-begins-PSLV-C-25-successfully-launched-from-%20sriharikota-22524747.html

 http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16427591.cms?prtpage=1

2 comments:

  1. विज्ञाननिष्ठ अंधश्रधा निर्मूलन हीच एक भीषण घातक अंधश्रद्धा होऊन बसली आहे. (y)

    ReplyDelete
  2. भाऊ, आपण ज्या बातम्यांचे दुवे दिले आहेत, त्या बातम्या जशाच्यातशा दिलेल्या आहेत. परंतू निखिल कावळ्याने मी मराठी वाहिनीवर सरळसरळ धर्मच त्यात घुसवला. आपल्या शिळोप्याच्या ओसरीवर एकाने त्याबद्दल एक पोस्ट टाकली होती आणि निखिल आणि गांधीजींचा नातू अशा दोघांनाही भरपूर शिव्या घातल्या होत्या. कावळ्याने तुषार गांधींना प्रश्न विचारला की एका हिंदू शास्त्रज्ञाने तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन यानाच्या प्रतिकृतीची पूजा केली. हेच जर एका मुसलमानाने केले असतेतर काय प्रतिक्रिया आल्या असत्या? तुषार गांधीही आजोबा पेक्षा अधिक मुस्लिम निघाला. त्याने सरळ उत्तर दिले की हिंदू लोकांनी होहल्ला केला असता. म्हणजे पहा भाऊ हे लोक हिंदू आणि मुसलमानात कसा भेद करत आहेत.

    ReplyDelete