Tuesday, February 19, 2019

तुम रुठी रहो, मै मनाता रहू

amit shah at matoshree के लिए इमेज परिणाम

आठदहा महिन्यापुर्वी महाराष्ट्रातील दोन मतदारसंघात लोकसभेची पोटनिवडणूक पार पडली होती आणि त्यात भाजपाने एक तर राष्ट्रवादीने एक जागा जिंकली होती. त्यापैकी गोंदियाची भाजपाची जागा दोन्ही कॉग्रेस एकत्र आल्याने राष्ट्रवादी जिंकून गेली. तर पालघरच्या जागेची लढत सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना भाजपा यांच्यात झाली. तिथे भाजपाचे चिंतामण वनगा यांच्या निधनाने जागा मोकळी झाली होती आणि त्यांच्या पुत्राला तिथून लढायचे होते. त्याला भाजपाने नकार दिल्याने त्याला शिवसेनेत घेऊन सेनेनेही ती जागा लढवली होती. कॉग्रेस आणि बहूजन विकास आघाडी असेही आणखी दोन उमेदवार होते. पण अटीतटीची लढाई सेना भाजपा यांच्यात होऊन अखेरीस भाजपाने बाजी मारली. त्यावर विविध वाहिन्यांवर उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या आणि दावे प्रतिदावेही चाललेले होते. अशा एका चर्चेत मीही सहभागी होतो आणि पक्षप्रवत्यांची मांडणी झाल्यावर माझे विश्लेषण विचारण्यात आले होते. यापुढे युतीचे भवितव्य काय, असाही प्रश्न त्यात सहभागी होता. त्याचे उत्तर देताना मी केलेली गंमत आज वास्तवात खरी ठरलेली आहे. युतीचे भवितव्य पन्नास वर्षापुर्वीच लिहून ठेवलेले आहे. राजकारण हा आशेचा खेळ असतो आणि हिंदीत त्याला ‘आसका पंछी’ म्हणतात. योगायोगाने १९६० च्या दशकात त्याच नावाचा हिंदी चित्रपट आलेला होता आणि त्यात नायक नायिकेच्या तोंडी असलेल्या गीतामध्ये सेना भाजपा युतीचे भाकित सांगितलेले होते. असे सांगून मी त्या गाण्याचे शब्द त्या चर्चेत सांगितले, तेव्हा हास्यकल्लोळ झालेला होता. सगळेच त्यात बुडून गेलेले होते. ते शब्द होते,
नायक:   तुम रुठी रहो, मै मनाता रहू. तो मजा जिनेका औरही आता है
नायिका:  थोडे शिकवे भी हो,कुछ शिकायतही हो, तो मजा जिनेका औरही आता है

एका लोकप्रिय सिनेमा गीतामध्ये इतका राजकीय आशय सामावलेला असतो, हे तेव्हापर्यंत माझ्याही कधी लक्षात आलेले नव्हते. पण गेल्या साडेचार वर्षात महाराष्ट्रात शिवसेना व भाजपा यांनी ज्याप्रकारचे राजकारण केले, त्यातून अर्धशतकापुर्वीच्या त्या गीताचे बोल किती खरे करून दाखवले आहेत ना? त्याची प्रचिती सोमवारी पत्रकारांना आली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत आले आणि मुख्यमंत्र्यांसह मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुखांच्या निवासस्थानी पोहोचले. मग सगळे एकत्र एकाच गाडीत बसून वरळीला पत्रकारांना भेटायला आले आणि तिथे पुन्हा एकत्र निवडणूका लढण्याचा फ़ॉर्म्युला त्यांनी घोषित करून टाकला. वरिष्ठ नेत्यांसाठी आघाड्या युत्या जुळवून आणणे किंवा मोडून टाकणे किती सोपी गोष्ट आहे, त्याचे उदाहरण त्यातून मिळाले. पण नेत्यांच्या अहंकाराला पक्षाचे धोरण वा भूमिका समजून एकमेकांच्या नित्यजीवनात हल्ले प्रतिहल्ले करणा‍र्‍या त्यांच्याच अनुयायी वा कार्यकर्त्यांना त्यानुसार जुळवून घेणे किती कठीण असते? दोन्ही पक्षातल्या एका तरी नेत्याला त्याची फ़िकीर होती काय? चौकीदार चोर है, इथपासून अफ़जलखानापर्यंत शेलक्या भाषेतले सेनेचे आरोप; किंवा भाजपाच्या नेत्यांनी वारंवार सेनेच्या शीर्षस्थ नेतृत्वासह धोरण भूमिकांवर केलेले आरोप, इतके सहजगत्या धुवून जात असतात काय? हा सगळा संघर्ष वा आटापिटा अमित शहांनी मातोश्रीवर येण्यापुरता होता काय? तसेच असेल तर शिवसेनेने किती जागा मिळवल्या त्यापेक्षाही आपले मोठे नुकसान करून घेतलेले आहे. सगळा वाद जागांचा व सत्तापदांचाच होता, याचीच साक्ष दोन्ही पक्षांनी आपल्याच वागण्यातून दिलेली आहे. तिकडे कॉग्रेस आणि राष्ट्रवादी यांनीही त्यापेक्षा काही वेगळे केलेले नाही. युती झाल्याबद्दल सेना भाजपावर शेरेबाजी करण्याचा त्यांना कुठलाही नैतिक वा तात्विक अधिकार नाही. कारण त्यांच्याही आघाडीत असली नाटके कमी झालेली नाहीत. त्याला पर्याय म्हणून मतदार सेना भाजपाकडे बघत होता आणि त्यांनीही आपण कॉग्रेस राष्ट्रवादीपेक्ष तसूभर कमी नसल्याची साक्ष मागल्या चार वर्षात दिलेली आहे.

सेनेला २३ आणि भाजपाला २५ असे लोकसभा जागांचे वाटप झालेले आहे. पण विधानसभेसाठी मित्रपक्षांना जागा देऊन झाल्यावर उरलेल्या जागा समसमान वाटून घ्यायच्या, अशी तडजोड झालेली आहे. मग तशी तडजोड तेव्हाही २०१४ मध्ये होऊ शकली असती. पण १५१ खाली यायला सेना राजी नव्हती, म्हणून युती तुटण्यापर्यंत ताणले गेले. आताही पदरात नेमके काय पडले आहे? लोकसभेत भाजपाच एक जागा अधिक घेऊन मोठा भाऊ आहे आणि विधानसभेत समसमान जागा घेऊन दोघे सारखेच आहेत. आम्हीच मोठा भाऊ ही गुर्मी कुठे गेली? लोकसभेतील बहूमत टिकवण्यासाठी भाजपा आज अगतिक आहे आणि त्याची अडवणूक करून सेनेने‘ अधिक काही पदरात पाडून घेतलेले नाही. तर जे पाच वर्षापुर्वी मिळत होते, तेच घेण्यावर समाधान मानलेले आहे. फ़रक एकाच गोष्टीचा आहे. भाजपा अध्यक्षाने मातोश्रीवर यावे, ही दिर्घकालीन मागणी मान्य झाली आणि युती पुर्ववत झालेली आहे. अण्णा हजारे यांचे उपोषण कुठल्याही मागण्या मान्य केल्याशिवाय फ़क्त यादवबाबा मंदिरात मुख्यमंत्री पोहोचले मग सुटते. त्यापेक्षा अमित शहांनी वेगळे काय केले किंवा दिले? सगळा अट्टाहास अमित शहांनी मातोश्रीवर येण्यापुरता किंवा तेवढ्यासाठीच होता काय? २०१४ मध्येच मोदींच्या विरोधात दंड थोपटून मार खाल्लेले नितीशकुमार दोन वर्षापुर्वी आपले मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी एनाडीएत आले आणि आता लोक्सभा समोर असताना त्यांनीही ४ जिंकलेल्या जागांच्या पुढे आणखी १३ जागा अधिक मिळवल्या आहेत. भाजपाने जिंकलेल्या पाच जागांवर नितीशसाठॊ पाणी सोडलेले आहे. पासवान यांनीही एक अधिकची जागा मिळवली आहे. त्याच्या तुलनेत चार वर्षे अखंड शिमगा करून शिवसेनेने मिळवले काय? मातोश्रीवर अमित शहांची पायधुळ? त्या वास्तुला जगप्रसिद्ध करणार्‍या बांळासाहेबांचे शब्द कोणाला आठवतात काय? सौ सोनारकी एक लोहारकी, हेच ना ते शब्द?

जगात कोणीही कितीही दिवस शिवसेना वा बाळासाहेबांच्या विरोधात टिकेची झोड उठवावी. मग साहेब एक सभा घेऊन असे घणाघाती भाषण ठोकायचे, की त्याखाली सगळे आक्षेप आवाज भूईसपाट होऊन जायचे. दोन आमदार वा एकही खासदार पाठीशी नसताना शिवसेनाप्रमुखांचा असा दबदबा होता. त्यामुळे़च मातोश्रीवर कोण कधी आला व काय झाले, त्याची बातमी व्हायची. मातोश्रीवर या असे आमंत्रण वा अटी साहेबांनी कोणाला कधी घातल्या नाहीत. कारण त्या वास्तुला स्थानमहात्म्य कधीच नव्हते. तिथे वास्तव्य करणार्‍या माणसाचे ते व्यक्तीमहात्म्य होते. तिथे जाणार्‍या व्यक्तीमुळे साहेबांची महत्ता कधी वाढली नाही. तर त्या वास्तुची महत्ता वाढत होती. त्यात साहेबांना कधी मोठेपणा वाटला नाही, की त्यांनी तशा अपेक्षा कोणाकडे केल्या नाहीत. राष्ट्रपती पदाचे उमेदवार प्रतिभाताई पाटिल वा प्रणबदा मुखर्जीही तिथपर्यंत आले. तिथे अमित शहांनी यावे ही अपेक्षा म्हणूनच त्या वास्तुचे महात्म्य सांगण्यापेक्षा तिची प्रतिष्ठा कमी करणारी ठरते. त्यातून अमित शहा वा भाजपा झुकले असे भासवण्याचा हेतू असेल, तर त्याला बालीशपणा म्हणावे लागेल. कारण झालेल्या युतीने व तिच्या फ़ॉर्म्युलाने शिवसेनेला अधिक काही मिळालेले दिसत नाही. २०१४ मध्ये  मिळत होते, त्यापेक्षाही घट नक्की झाली आहे. तेच स्विकारायचे होते, तर चार वर्षे झुंज कशाला दिली, त्याचेही उत्तर निदान शिवसैनिकांना मिळायला हवे. पण त्या ‘सच्चाईचा सामना’ करायचा कोणी आणि कधी? भाजपाने आज किती जागा देऊ केल्या, त्यापेक्षा स्वबळावर उभे रहाण्याची संधी शिवसेनेने याच चार वर्षात कशी गमावली, तो घटनाक्रम महत्वाचा आहे. जी तडजोड वा युती झाली ती सेनेला अधिक आवश्यक होती आणि त्याचा भाजपाने राजकीय लाभ उठवला, असेच म्हणावे लागेल. आता सवाल इतकाच आहे, की युती झाली तिचा खरा ‘सामना’ कोणाशी होणार? कॉग्रेस राष्ट्रवादीशी की दोन्ही पक्षाच्या दुभंगलेल्या कार्यकर्त्यांचा आपापसात?

25 comments:

  1. मजा जीने का अब जादा आयेगा ।

    ReplyDelete
  2. शिवसैनिकांची गोची करुन ठेवली आहे....
    आणि हेच सर्वात वाईट आहे.

    ReplyDelete
  3. भाऊ तुम्ही ग्रेट आहात.

    ReplyDelete
  4. अगदी बरोबर भाऊ. आमच्या मनांतलेच विचार! एवढ महाभारत झाल्यानंतर युतीसाठी एवढी आगतिकता? भाजप कडुन हे अपेक्षित नव्हत.आणी उध्दवरावांचा कालच्या पी सी तला शुष्क चेहरा बरच काही सांगुन गेला. बहुधा राधा कृष्णांनी या मागच गुपीत बरोबर ताडलेल दिसतय. धन्यवाद.

    ReplyDelete
  5. कार्यकर्ता तर पक्षाची भूमिका रेटत असतो, पण दोन्ही पक्षांच्या मतदाराला युती हवीच होती. मतदारासाठी आनंदाची बातमी आहे.

    ReplyDelete
  6. हिंदूद्वेष्ट्यांचा सपशेल पराभव.हिंदू साम्राज्य परत ऊभे करायचं असेल तर अशा तडजोडींचीच गरज आहे.दोन्ही पक्षांनी दोन पावल मागे घेतली पण आता तेच दहा पावल पुढे जातील यात शंका नाही

    ReplyDelete
  7. सर्वसामान्यांंना युती पाहिजे होती. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या संख्येपेक्षा हे सर्वसामान्य कितीतरी पट अधीक आहेत.

    ReplyDelete
  8. लोकसभेसाठी या युतीचा भाजपला फारसा फायदा तोटा होणार नाही. परंतु सेनेला प्रचंड फायदा होईल.

    परंतु विधानसभेसाठी या युतीचा भाजपला प्रचंड तोटा होईल व सेनेला प्रचंड फायदा होईल.

    सेनेसाठी ही युती विन-विन स्थिती आहे. मात्र भाजपने स्वत:च्या हाताने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे.

    सेनेला मोठी लॉटरी लागली आहे हे कालांतराने लोकांना समजेल.

    सेनेला स्वबळावर जेमतेम १-२ खासदार निवडून आणता आले असके. आता लोकसभेची १ जागा जास्त व भाजपच्या मतांचा खुराक मिळणार. म्हणजे लोकसभेत किमान १० जास्त जागा जिंकता येणार.

    विधानसभेत सेनेला स्वबळावर जेमतेम ३० जागा जिंकता आल्या असत्या व भाजप ११० च्या आत येणे अशक्य होते. आता युतीमुळे सेना ७० पर्यंत व भाजप ९० पर्यंत जाईल. भाजप बहुमतापासून खूप दूर राहून सेनेवर प्रचंड अवलंबून राहील व सेनेला महत्त्वाची अनेक मंत्रीपदे द्यावी लागतील.

    ४ वर्षात भाजपने बरीच ताकद वाढविली आहे व सेनेने बरीच ताकद गमावली आहे हे वास्तव आहे. दोघांच्या ताकदीत २०१४ मध्ये जितका फरक होता तो २०१९ मध्ये जास्तच वाढलेला आहे हे वास्तव आहे. मागील ४ वर्षातील निवडणुक निकालातून हे अनेकदा सिद्ध झाले आहे.

    बरोबरीचे जागावाटप करणे हा गाढवपणाच आहे. एकमेकांच्या उरावर ४ वर्षे बसून एकमेकांची जाहीर अब्रू काढूनसुद्धा युतीची एवढी खाज होती तर भाजपने
    निदान स्वत:ला बऱ्यापैकी जास्त जागा घ्यायला हव्या होत्या.

    आता भाजप मूर्खपणा करून अनेकवेळा मोठ्या मताधिक्याने स्वबळावर जिंकलेले कोथरूड, पालघर सारखे हक्काचे मतदारसंघ अप्पलपोट्या सेनेच्या घशात घालेल.

    स्वत: कष्टाने कमावलेली संपत्ती अप्पलपोट्या आळशीला देऊन टाकणे हा मूर्खपणा आहे. २०१४ पासून वेगळे लढून भाजपने जी भक्कम पायाभरणी केली ती काल एका क्षणात मातीमोल झाली. मागील २ वर्षात १९ महापालिकांपैकी १४ भाजपने जिंकल्या. स्थानिक संस्थांमध्ये भाजप प्रथम क्रमांकावर तर सेना तिस-या किंवा चौथ्या क्रमांकावर आहे. अगदी एक महिन्यांपूर्वी झालेल्या ५ नगरपालिकांपैकी ३ भाजपने जिंकल्या. इतकी चांगली स्थिती असूनसुद्धा सेनेला आपले नुकसान करून बरोबरीचा वाटा द्यायची अवदसा भाजपला का आठवली ते समजत नाही.


    ReplyDelete
  9. जर २०१९ च्या निवडणुकीनंतर फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मंत्रीमंडळात ४२ पैकी २१ मंत्री सेनेचे असतील (आता १२ आहेत व सर्व महत्त्वाची खाती भाजपकडे आहेत) व सभापती, गृहमंत्री, अर्थमंत्री, महसूलमंत्री, नगरविकास मंत्री यापैकी काही महत्त्वाची पदे सेनेला द्यावी लागतील. त्यामुळे त्यांना सरकार चालविणे अत्यंत अवघड होणार आहे. सेना प्रत्येक विकास प्रकल्पाला कडाडून विरोध करेल. सेनेला बरोबर घेतल्याचा त्यांना शेवटी पश्चाताप होईल.

    विनाकारण झगा गळ्यात बांधून घेतल्याची ही शिक्षा असेल.

    बरोबरीचे जागावाटप करणे हा गाढवपणाच आहे. एकमेकांच्या उरावर ४ वर्षे बसून एकमेकांची जाहीर अब्रू काढूनसुद्धा युतीची एवढी खाज होती तर निदान स्वत:ला बऱ्यापैकी जास्त जागा घ्यायला हव्या होत्या.

    ReplyDelete
  10. मला या युतीमुळे दोघांचाही विशेषतः शिवसेनेचा तोटा अधिक होणार आहे

    ReplyDelete
  11. या युतीमध्ये दुरी वाढवणारे संजय राऊत हे चर्चेत आणि पत्रकार परिषदेत दिसले नाहीत. मला वाटते म्हणूनच दोघांत एकमत झाले.

    ReplyDelete
  12. संजय यांनी आता बोरूत कोणती शाई टाकावी आणि काय लिहावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तूर्तास त्यांनी पुढील 3 महिने जगाच्या पाठीवर सफरीसाठी जावे हे उत्तम !!

    ReplyDelete
  13. शिवसेना आणि भाजप यांची पुन्हा युती झाल्यामुळे भल्याभल्यांची बोटे तोंडात गेलेली आहेत. परंतु आम्हाला याच्यामध्ये विशेष काही वाटले नाही आजही नाही आणि तेव्हाही नाही. तेव्हा म्हणजे केव्हा? जेव्हा प्रथमच भाजप-शिवसेना युतीचे सरकार मोठ्या बहुमताने महाराष्ट्रात सत्तेवर आले, त्या काळामध्ये त्या सरकारला अपशकुन करण्याचा प्रयत्न बारामतीच्या शकुनीमामा ने एकदा करून पाहिला होता पहा . अगदी त्या दिवसापासून राजकारण करणे म्हणजे केवळ आमचीच मक्तेदारी आहे अशा मस्तीत वावरणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अत्यंत सुंदर पद्धतीने भाजप आणि शिवसेना खेळवू लागले. सरकारच्या स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो हा खेळ दोघांनी अगदी व्यवस्थित वठवला. त्यामुळे झाले असे की जनतेचे विभाजन शिवसेना वादी आणि भाजप वादी अशा दोन प्रमुख पक्षांमध्ये होऊन गेले नकळत. मुख्य म्हणजे विरोधी पक्षाचे काम सतत शिवसेनेने आपल्या हातात घेतलेले असल्यामुळे राज्यांमध्ये विरोधीपक्ष नावाची गोष्टच उरली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीला सुद्धा त्यामुळे आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या की दोघे आपापसात भांडत आहेत तर भांडू द्यावेत परंतु त्यांना यामागचे शिवसेनेचे राजकारणाच लक्षात आले नाही की त्या निमित्ताने दोघे पक्ष भांडल्यासारखे करतात मात्र निर्णय घ्यायचे दिवशी दोघे एकत्र येऊन पटकन निर्णय घेऊन मोकळे सुद्धा होतात. आज वरच्या कुठल्याही शासनापेक्षा सर्वाधिक लोकहिताचे निर्णय वरील सरकार घेऊ शकले याचे एकमेव कारण त्यांचे हे लुटूपुटूचे राजकारण होय. या राजकारणामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी पूर्णपणे गाफील राहिले अगदी आत्तापर्यंत दोन्ही पक्ष गाफील आहेत कारण ते शिवसेना आणि भाजप यांच्यात युती तुटणार हे डोक्यात ठेवूनच निवडणुकांचे नियोजन करत होते. भाजप आणि शिवसेना ही नैसर्गिकरित्या इतके समविचारी पक्ष आहे ते की त्यांच्यामध्ये बेबनाव होणेच अशक्य आहे, हे मी मी म्हणणाऱ्या काकांना सुद्धा कळाले नाही. मोदी विरोध हे एकमेव सूत्र घेऊन राजकारण करण्याची इच्छा बाळगणाऱ्या विरोधकांना हेच लक्षात आले नाही की आपल्याला शिवसेनेने मोदी विरोध सुद्धा कधी करू दिला नाही ! त्यामुळे तेलही गेले तूपही गेले आणि हाती मात्र धुपाटणे आले !

    याला म्हणतात राजकारण !
    हिंदुत्वाच्या विरोधकांनो,
    शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा !

    ReplyDelete
  14. Bhau Aaj Tumcha Ek Modi Sarkar chya Kamacha Adhava Ghenara VIDEO bahitala, Thanks a ton need many more, sending it to at least 10 k people in my contact thru whats up facebook. Thanks a ton once again
    Prasanna

    ReplyDelete
  15. Bhau we are ready to pay for your blog, Please let me know how we can contribute little bit for your hard work. Always buying all your new books.

    ReplyDelete
  16. उद्धव ठाकरे हा मुळात राजकारणी मनुष्य नाही. बळे बळेच त्याला सेनेच्या घोड्यावर बसवलेले आहे. आता अरे अरे घोड्या.... मला कुठे न्हेतो आहेस ...असं म्हणता म्हणता हे ' वरातीच ' घोड भाजपच्या दावणीला बांधलं गेलं. आरोप ...विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी केला असला तरी त्यात खूपच तथ्यांश आहे ...तो म्हणजे ' एन्फोर्समेंट डिरेकटोरेट ' ने उद्धव ठाकरेंना त्यांच्या काही फायली दाखवल्या असतीलच. त्यामुळे युती झाल्याची घोषणा करताना ज्या जोशात & उत्साहाने फडणवीस अक्षरशः ढोल वाजवत असताना ' दूरचित्रवाणीवर ' दिसले तो जोश श्री. उद्धव ठाकरे यांच्या ढोल वाजवण्यात अजिबात न्हवता. बाळासाहेबांकडे जे एक आश्चर्याचा झटका देण्याचे कसाब होते ते या त्यांच्या पुढील पिढीत अजिबात नाही. शिवसेना हळू हळू अस्तांगताच्या मार्गावर आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.

    ReplyDelete
  17. भाऊराव,

    सुमारे एक वर्षापूर्वी लिहिलेल्या माझ्याच प्रतिसादाची आठवण झाली : http://jagatapahara.blogspot.com/2018/02/blog-post_11.html?showComment=1518441753440#c5098047757516233585

    युती चुटकीसरशी झाली याचं कारण म्हणजे उद्धव यांच्या अंगी दम नाही हे आहे. हे मत मी अत्यंत व्यथित मनाने व जड अंत:करणाने मांडतो आहे. माझं मत चुकीचं ठरो हीच ईश्वराकडे प्रार्थना.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  18. युतीची घोषणा झली म्हणून युती होईलच असे नाही....

    ReplyDelete
  19. भाऊ, यात भिडे गुरुजींची मध्यस्थी आहे असे कळले ! हे खरे आहे का ?

    ReplyDelete
  20. भाऊ,
    आपण एक विसरला आहात????
    २०१४च्या लोकसभेनंतर भाजपाचा एक नेता आपणांस खासगी मध्ये म्हणाला होता की,आम्ही युती तोडणार आहोत(आपल्या जुन्या लेखात तसे नमुद आहे)मग उध्दव ठाकरे यांच्या १५१ घोषणेचे निमित्त आपण का दाखवता?(जर युती तोडणारच होते तर)आणि १२३ आमदार असलेली भाजपा मिञपक्ष सोडून जरी १४४ सीटस् लढवल्या तर मानहानी कुणाची?(६३ आमदार असलेल्या पक्षाची का जगत मान्य पक्षाची?)
    -होय मी शिवसैनिक आहे,परंतु आपला नियमित वाचक आहे म्हणून मला विचारण्याचा हक्क आहे....

    ReplyDelete
  21. गत पंचवार्षिक चा अनुभव पाहता लोकसभेला युती करताना दिलेली आश्वासने bjp विधानसभेला पाळेलंच अस नाही.

    ReplyDelete
  22. ‖ हरि ॐ ‖

    लोकसभा निवडणुका झाल्या की मग भाजप दाखवेल विधानसभेत काय करायचे ते ...

    शहा-फडणवीस यांनी पायाने मारलेल्या गाठी उद्धवाला हाताने सोडविता येणार नाहीत ...

    ReplyDelete
  23. Perfect thoughts.... I also think the same way

    ReplyDelete