Sunday, April 13, 2014

अरूण जेटलींचा सवाल

  भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारी अर्जाच्या निमित्ताने जे वादळ उठवयात आले, त्याबाबतीत अनेकांच्या प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत. पण माध्यमातल्या चर्चेत भाजपाचेच नेते अरूण जेटली यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर फ़ारसा उहापोह झाला नाही, याचे नवल वाटते. कारण तोच अशा बाबतीतला सर्वात कळीचा मुद्दा होता व आहे. आधीच्या आपल्या उमेदवारी अर्जात मोदी यांनी आपल्या वैवाहिक नात्याची माहिती द्यायचे टाळले आणि यावेळी निवडणूक आयोगाने सक्तीच केली असल्याने आपण विवाहित असल्याचे मोदी यांनी अर्जात लिहीले आहे. मात्र पत्नीचे नाव त्यात लिहीलेले असले, तरी तिच्या उत्पन्न वा अन्य माहिती त्यात आलेली नाही. कारण मोदींनी त्या महिलेशी वैवाहिक संसारी जीवन व्यतीत केलेले नाही. तात्कालीन परंपरेनुसार त्यांचा घरच्यांनी कोवळ्या वयात विवाह उरकलेला होता. त्या काळात वयात येणार्‍या मुलांच्या विवाह विषयक आवडीनिवडी विचारात घेतल्या जात नव्हत्या. मात्र प्रत्यक्षात जशोदाबेन यांच्याशी मोदींनी वैवाहिक जीवन व्यतीत केले नाही. अल्पवय असल्याने पत्नीने शिक्षण पुर्ण करावे, असे त्यांनी सुचवले होते. त्यामुळे जशोदाबेन माहेरी निघून गेल्या आणि शिक्षण पुर्ण होईपर्यंत पतीने राष्ट्रकार्यासाठी आजीवन वाहून घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जशोदाबेन यांनी पतीकडे घटस्फ़ोट मागितला नाही, की त्याबद्दल कुठे तक्रार केली नाही. सहाजिकच वैवाहिक बंधन तोडले नसल्याने कायम राहिले आणि दोघेही स्वतंत्ररित्या जगत राहिले. एकमेकांविषयी त्यांनी कधी कुणाकडे तक्रार केली नाही. त्याचवेळी दोघांनी दुसरा लैंगिक वा वैवाहिक संबंध जोडण्याचा कुठलाही प्रयास केला नाही. याबद्दल इतरांनी तक्रार करण्याचे काही कारण उरते काय?

   पण गंमत बघा, त्याचबद्दल तावातावाने तक्रारी होत आहेत. दोन समजदार व्यक्तींच्या परस्पर संबंधाविषयी त्यांना निर्णय घेण्याची मोकळीक असली पाहिजे आणि त्यात अन्य कोणी हस्तक्षेप करायचे कारण नाही, असला आग्रह मोठ्या उदारमतवादी शहाणे धरतात, त्यांनीच मोदींच्या अशा वैवाहिक संबंधाविषयी आकाशपाताळ एक केलेले आहे. नरेंद्रभाई व जशोदाबेन यांच्यात कसे संबंध असावेत, हा त्या दोघा समजूतदार व्यक्तींचा आपसातला मामला नाही काय? जर अशा अन्य कुठल्या दोन व्यक्तींना समलिंगी वा भिन्नलिंगी संबंध राखण्याचे स्वातंत्र्य द्यायला ही मंडळी उतावळी झालेली आहेत; तर त्यांनीच मोदी दांपत्याच्या खाजगी संबंधात नाक खुपसणे हा निव्वळ दांभिकपणाच नाही काय? विनाविवाह सहवासात रहाणे, लैंगिक संबंध ठेवणे वा समलिंगी संबंध ठेवणे, परंपरेनुसार अनैतिक मानले गेलेले आहे. पण एकविसाव्या शतकात त्याला जुनाट मनोवृत्ती म्हणायचे आणि मुक्त संबंधाचे कौतुक करायचे असेल, तर तोच हक्क मोदी नावाच्या माणसाला का नसावा? मोदी हा भारतीय नागरिक नाही, की त्याला पंतप्रधान पदाचा उमेदवार झाला म्हणून कुठलेही घटनात्मक अधिकार नाकारले जातात, असा या उदारमतवाद्यांचा दावा आहे? जशोदाबेन यांनी कधी आपल्यावर अन्याय झाल्याची तक्रार किंवा दावा केलेला नाही. मग त्यांना न्याय देण्याचा किंवा त्यांच्या न्यायासाठी संघर्ष करण्याचा प्रयास दांभिकपणा नाही तर दुसरे काय आहे? ज्यांचे चारित्र्य लैंगिक संबंधात शंकास्पद आहे किंवा वैवाहिक जीवनात ज्यांनी अनेक अनैतिक वर्तने केलेली आहेत, त्यांनीच आज मोदींना जाब विचारावा काय? यालाच हिंदीत उलटा चोर कोतवाल को डाटे, असे म्हणतात. दोनतीन दिवस चाललेला कल्लोळ त्यातलाच प्रकार आहे.

   म्हणूनच अरूण जेटली यांची या बाबतीतली प्रतिक्रिया बोलकी व बोचरी आहे. मोदींच्या प्रतिज्ञापत्र प्रकरणी काहूर माजवणार्‍या कॉग्रेसजनांना जेटली यांनी एक गंभीर सवाल केलेला आहे. जे कॉगेसजन निवडणूक अर्जात किंवा अन्य कागदपत्रापुरताच वैवाहिक संबंधाचा उल्लेख करतात आणि अन्यवेळी विवाहाच्या पवित्र बंधनाच्या पुढे जाऊन अनैतिक संबंध नित्यनेमाने जोपासतात; त्यांचे काय करायचे असा सवाल जेटली यांनी केला आहे. त्यांचा सवाल उलट उत्तर म्हणून बघण्याचे कारण नाही. अशा शेकडो प्रकारांची सामान्य जनतेला जाणिव आहे. आजच्या राजकारणात वावरणार्‍या व जुन्याही अनेक नेत्यांच्या विवाहबाह्य संबंधांची कुजबुज नित्यनेमाने चालू असते. त्याविषयी उघड बोलायचे टाळले जाते. आजही राजरोस असे अनैतिक संबंध राजकारणात उजळमाथ्याने राखले जातात. त्यांच्याविषयी अवाक्षर बोलायचे टाळले जाते. आणि कोणी त्याचा उच्चार केलाच, तर सहमताच्या बाबतीत इतरांनी नाक खुपसणे कशाला, असाच उलटा सवाल केला जात असतो. मग अशा कुठलाही अनैतिक संबंध राखला नाही, प्रस्थापित केला नाही, किंवा आपल्या पत्नीला तक्रार करायची पाळी मोदी यांनी आणली नाही, हाच त्यांचा गुन्हा आहे काय? माजी मुख्यमंत्री वा राज्यपाल म्हणून दिर्घकाळ राजकारणात वावरलेले नारायण दत्त तिवारी यांनीच फ़सवणूक केलेल्या एका महिलेला व तिच्या पुत्राला कोर्टात जाऊन आपला हक्क सिद्ध करण्याचा तमाशा करावा लागला. हा ताजा इतिहास कॉग्रेसचे प्रवक्ते विसरून गेलेत काय? नागड्याने मळकट वस्त्रधार्‍याला चांगले कपडे घालण्याचा दम द्यावा; त्यातलाच हा प्रकार नाही काय? विवाह होऊन ब्रह्मचर्य पाळणे, आज गुन्हा झालाय आणि विवाह करून बाहेरख्यालीपणा करण्याला सोज्वळपणा ठरवले जाते आहे. इतका आपला बुद्धीवाद व वैचारिक पातळी रसातळाला गेलेली आहे, असे समजायचे काय?

No comments:

Post a Comment