Friday, September 25, 2015

खरेच भ्रमनिरास केलात, देवेन्द्रजी!

Fadnavis has dinner at farmer's house; spends the night there

राजदीप सरदेसाई या दिल्लीतील इंग्रजी पत्रकाराच्या अनावृत्त पत्राला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उत्तर देऊन गप्प केल्याने त्यांचे समर्थक सुखावले आहेत. त्याला दोन कारणे संभवतात. पहिले म्हणजे अशा समर्थकांचा आधीपासूनच राजदीपवर राग असू शकतो. म्हणूनच त्याला कोणीही झापडले तर यांना आनंद होणे स्वाभाविकच आहे. तर दुसर्‍या गटात आपल्या आवडत्या मुख्यमंत्र्याने विरोधकाला चोख उत्तर दिल्याचेही एक राजकीय समाधान असू शकते. त्यात काही गैर नाही. प्रत्येकाच्या आपापल्या भूमिका व समज असतात. त्यानुसार लोक अर्थ लावत असतात. पण वास्तविक विचार करून हे पत्र व त्याला दिलेले उत्तर वाचले, तर देवेंन्द्र फ़डणवीस यांनी राजदीपला उत्तर देण्याची गरज होती काय, असाही एक प्रश्न उदभवतो. तो प्रश्न त्यांच्याही मनात असल्याचे लपून रहात नाही. राजदीपसारखे काही पत्रकार व माध्यमे आपला पक्षपाती अजेंडा घेऊनच पत्रकारिता करीत असतात. म्हणूनच त्यांना लोकांचे प्रबोधन करण्यापेक्षा एक राजकीय अजेंडा पुढे न्यायचा असतो. म्हणूनच कुणाविषयी त्यांचा भ्रमनिरास होण्याचा विषयच उदभवत नाही. खुद्द देवेन्द्रजींनी त्याची आरंभीच ग्वाही दिलेली आहे. मग तसे असताना भ्रमात जगणार्‍यांना व त्यातच समाधानी असणार्‍यांचे शंकानिरसन कशाला करायचे? त्यासाठी वेळ देण्याइतकी सवड निदान आजच्या मुख्यमंत्र्याला असू शकत नाही. महाराष्ट्राला दुष्काळ व शेतकरी आत्महत्यांनी पछाडलेले असताना, असा वेळेचा दुरूपयोग व उर्जेचा अपव्यय कितपत रास्त आहे? राजदीप वा तत्सम लोकांनी काही भ्रम जोपासले आहेत आणि त्यालाच वास्तव ठरवण्याचा त्यांचा अट्टाहास असतो. तोच अजेंडा पुढे नेण्यासाठी ते तुमचा वेळ व उर्जा खराब करायला असे बोलत-लिहीत असतात. त्याला प्रतिसाद देण्यानेही तुम्ही त्यांचाच अजेंडा पुढे न्यायला हातभार लावत असता.

या पत्रात राजदीपने अनेक विषय उपस्थित केले आहेत आणि सत्तांतरानंतर त्याला नवे सत्ताधीश हात घालतील, अशी अपेक्षा असल्याचे मतप्रदर्शन केले आहे. त्या प्रश्न व समस्यांसाठी त्याने आधीच्या राज्यकर्त्यांना गुन्हेगारही ठरवले आहे. मग पहिला सवाल असा, की ते राज्यकर्ते त्यातले गुन्हेगार असल्याचे राजदीपला कधी उमगले? जनतेने त्यांना हाकलून लावल्यावर? जेव्हा आधीचे सत्ताधीश महाराष्ट्राचा चुथडा करीत होते, तेव्हा राजदीपने कधी दोन ओळीचे पत्र मुख्यमंत्र्याला लिहीले होते काय? शरद पवार यांच्याशी राजदीपची असलेली जवळीक सर्वश्रूत आहे. तेच पवार दहा वर्षे सलग शेतीमंत्री असताना देशात आत्महत्येचे सत्र सुरू झाले व वाढतच गेले. तेव्हा पवारांना मुलाखतीत वा पत्र लिहून राजदीपने असे काही प्रश्न केले होते काय? शेतकर्‍याचा मुलगा वा शेतीतला जाणकार शेतीमंत्री असताना देशातला शेतकरी अधिक संख्येने आत्महत्या करू लागला, तर पवारांविषयी सामान्य जनतेचाही भ्रमनिरास झाला होता. त्याची प्रचिती लोकसभा विधानसभा मतदानानेच दिली. तोवर हाच राजदीप शेतकरी गुण्यागोविंदाने नांदतो आणि मौज म्हणून आत्महत्या करतोय, अशाच भ्रमात रहाणे पसंत करत होता ना? कारण भ्रमात जगणे आणि तेच वास्तव असल्याचे दावे करत रहाणे, हाच त्यांचा छंद वा अजेंडा आहे. पण नवे सरकार सत्तेत आल्यापासून जलयुक्त शिवार वा तत्सम योजनांचा लाभ घेऊन दुष्काळातही काही सुविधा उभ्या राहिल्याने राजदीपचा भ्रमनिरास झालेला असू शकतो. अशावेळी त्याच्या पत्राला उत्तर देण्यापेक्षा शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले काय, याचाच शोध मुख्यमंत्री म्हणून देवेन्द्रनी घ्यायला हवा होता. कारण आत्महत्या म्हणजे शेतकरी आनंदात जगतो, असा मुळात राजदीपचा भ्रम असणार आहे. त्या संख्येत घट आल्याने तोव विचलित होऊन त्याचा भ्रमनिरास होऊ शकला असेल.

असो, राजदीपचा भ्रमनिरास त्याला लखलाभ होवो. आमची गोष्ट वेगळी आहे. आम्ही भ्रमात नव्हेतर वास्तव जगात जगतो आणि म्हणूनच वास्तवात भेडसावणार्‍या प्रश्न विषयांचा उहापोह करण्याचा प्रयत्न करतो. म्हणूनच आम्हाला राजदीपच्या अनावृत्त पत्रापेक्षा दत्ता आत्माराम लांडगे याचे देवेन्द्रनाच उद्देशून लिहीलेले आठ पानी पत्र अधिक मोलाचे वाटते. देवेन्द्रजी ओळखता काहो तुम्ही त्या विदर्भातल्या दत्ता लांडगेला? ३६ वर्षाचा हा तरूण शेतकरी तेरा एकर शेतीचा मालक! कुठल्याही सरकारी मदतीशिवाय स्वावलंबी शेती करण्यातून थकला आणि त्याने आत्महत्या केली. कारण जवळचे किडुकमिडूक विकून शेती पिकवताना तो कर्जबाजारी झाला. शेतात पाणी आहे म्हणून पाईपलाईन टाकली आणि तिला आवश्यक असलेली वीज मिळाली नाही म्हणून दिवाळखोर झाला. आसपास शेतकरी निमूट आत्महत्या करताना पाहूनही तो जिद्दीने एकटाच एकाकी लढत होता. दोन वर्षे वीज जोडणी मिळाली नाही, म्हणून त्याच्यावर आत्महत्येची पाळी आली आणि आत्महत्येची पाळी कशामुळे येते त्याचे विदारक वर्णन करणारा वास्तविक अहवालच त्याने तुमच्यासाठी लिहून, मग गळफ़ास लावला. कोणी अधिकारी वा दिल्लीतले खुशालचेंडू पत्रकार खोटे अश्रू ढाळून तुमच्यापर्यंत वास्तव जाऊ देत नाहीत वा तुम्हाला भ्रमातच खेळवत ठेवतात, अशा खात्रीमुळे त्याने परस्पर आत्महत्या करून पळ काढलेला नाही. तर शेतकरी आत्महत्या कशाला करतो त्या आजाराचे निदान सविस्तर लिहून त्याने जगाचा निरोप घेतला. निदान केल्यावर त्याने उपाय व उपचारही आपल्या बुद्धीने सांगितला आहे. विरंगुळा म्हणून जगाने वाचावे म्हणून तुम्हाला अनावृत्त पत्र लिहीले नाही, तर काही हालचाल व्हावी म्हणून त्याने आठ पानी पत्र लिहीले. तेही वृत्तपत्राकडे छापायला न पाठवता आपल्या मृत्यूचे तिकीट लखोट्यावर डकवून पाठवले होते.

देवेन्द्रजी, राजदीपच्या अनावृत्त पत्राचे वाचन-मनन करून त्याला उत्तर देण्याच्या नादात तुम्ही दत्ता लांडगेच्या पत्राचा लखोटाही उघडून बघायचे विसरून गेलात काय? कारण त्यावरची तुमची प्रतिक्रीया कुठे ठळकपणे वाचायला मिळाली नाही. सरकार जी भरपाई देते त्यातून दिवंगत शेतकर्‍याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होत नाही, किंवा किती दुर्दशा होते, त्याचे काळीज फ़ाटणारे तपशील लांडगेने तुमच्यासाठी खास लिहीलेत हो! सामान्य जनता पोटाला चिमटा घेऊन ज्यांचा बोजा उचलते, असे सरकारी कर्मचारी कसे मजेत जगतात. त्यांच्या ताटातले शिळेपाके तरी मरणार्‍या शेतकर्‍याच्या नशिबी यावे, यासाठी टाहो फ़ोडलाय त्या लांडगेने. तुमच्या कानी त्याचा आक्रोश पडला नाही काय? नसेल तर राजदीपपेक्षा सामान्य माणसाचा अधिक भ्रमनिरास झाला म्हणावे लागेल. असेच एक पत्र अकोल्याच्या गजानन घोटेकरने तीन वर्षापुर्वी लिहून मग गळफ़ास लावला होता. कॉग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी शापवाणी उच्चारणार्‍या घोटेकरच्या पत्राचीही दादफ़िर्याद कोणा राज्यकर्त्याने तेव्हा घेतली नाही. परिणाम समोर आहेत देवेन्द्रजी! तेव्हा पवार, अजितदादा असोत की पृथ्वीराज असोत, त्यांनी घोटेकरपेक्षा राजदीपसारख्यांचा भ्रमनिरास दूर करण्यासाठी वेळ दिला. त्यामुळेच त्यांना आज सत्ताभ्रष्ट व्हावे लागले आहे. कारण त्यांनी गजानन घोटेकरच्या वास्तविक यातनेपेक्षा राजदीप शैलीतल्या काल्पनिक समस्या सोडवण्यात धन्यता मानली होती. वाशिम जिल्ह्यातल्या जऊळका रेल्वे गावचा दत्ता लांडगे त्याच घोटेकरच्या वंशावळीतला आणखी एक वैफ़ल्यग्रस्त शेतकरी! त्याने शिव्याशाप दिलेले नाहीत की शापवाणी उच्चारलेली नाही. पण अशा व्याकुळ शेतकरी कष्टकर्‍याची वेदना हाच गंभीर इशारा असतो. त्याचे निरसन नव्हेतर निराकरण अगत्याचे असते. राजदीपला उत्तर द्यायला जो वेळ खर्ची घातलात, त्यात दहा लांडगे घोटेकर वाचवता येतील. राजदीपचा भ्रम वा भ्रमनिरास त्यापेक्षा अधिक मोलाचा नाही. देवेन्द्रजी उत्तर द्यायचे असेल, तर लांडगे घोटेकरांना असे उत्तर द्या, की आत्महत्येचा विचारही त्याच्या मनाला शिवता कामा नये. एका घोटेकर लांडगेवर शंभर राज‘दीप’ ओवाळून टाकायचे धाडस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करू शकला तर??????


4 comments:

  1. भाऊ एकदम योग्य विश्लेशन.विनोदचा भाग सोडा पन ह्यांच पोट पाहीले तर तरुण पनातील बारामतीकरच वाटतात. त्या काळातील मार्मिक मधील बारामतीकरांच्या चेहरया वर फक्त हा नविन मुखवटा ठेवला तर एकदम फिट बसतय.दुर्दवाने वागन्यात पन हेच वास्तव वास्तव आहे.

    ReplyDelete
  2. Bhau, this post has to given to our CM. We will ask him to answer.

    ReplyDelete
  3. भाऊ मी यातला काही भाग कॉपी करुण CM च्या पेज वर टाकतो,अनुमति असावी.

    ReplyDelete