Sunday, September 20, 2015

जमाते इस्लामीचे धाडसी पाऊल



कुठलीही बातमी रंगवून सांगणे हा मानवी स्वभाव आहे आणि जितके मिरचीमीठ लावले जाईल तितकी बातमी मजेदार होते; अशी एक समजूत असते. पण त्याचाच हव्यास केला, मग अनेकदा अर्थाचा अनर्थ होऊन जातो. सनसनाटी माजवण्याच्या नादात सत्याचा विपर्यास होतो, तशाच अनेक इतर महत्वाच्या बातम्याही झाकल्या जातात. वास्तवात अशा बातम्या सामाजिक स्वास्थ्य व सौहार्दाला हातभार लावणार्‍या असतात. नेमक्या त्याच बातम्या दुर्लक्षित केल्या जातात किंवा सनसनाटीच्या हव्यासापायी झाकल्या जातात. उदाहरणार्थ जमाते इस्लामी या मुस्लिम धार्मिक राजकीय संघटनेची पत्रकार परिषद होय. अलिकडेच या जुन्याजाणत्या इस्लामी संघटनेने एक महत्वाची भूमिका घेतली आणि अगदी जाहिरपणे तिचा उच्चार केलेला आहे. त्याकडे माध्यमांनी साफ़ दुर्लक्ष केले आहे. ती बातमी केवळ मुस्लिम समाजासाठी महत्वाची नाही, तर एकूणच सर्व समाजघटकांच्या व जगाच्या हिताची भूमिका आहे. पण तीन दिवस उलटून गेल्यावरही पुरोगामी म्हणवणार्‍या माध्यमांनी त्यातले महत्व जगासमोर मांडण्याचा प्रयत्नही केलेला दिसला नाही. केरळात कोझिकोडे येथे या संघटनेच्या म्होरक्यांनी पत्रकार परिषद घेऊन इसिसच्या अरबी देशातील हिंसाचारी कृत्यांना प्रतिकार करण्याचा पवित्रा जाहिर केला आहे. म्हणजे नेमके काय करायचे त्याचा तपशील मांडला नसला, तरी भूमिका तर घेतली आहे? मग त्याचे कौतुक कशाला होऊ नये? वर्षभर इथले मुस्लिम तरूण इसिसकडे आकर्षित होत असल्याचे वा जिहाद करायला इराकपर्यंत गेल्याच्या बातम्या आल्या. त्याबाबतीत अगत्य दाखवणार्‍या माध्यमांनी जमातची ही भूमिका दुर्लक्षित कशाला करावी? म्हणजे त्याबद्दल किरकोळ दखल घेणार्‍या बातम्या प्रसिद्ध झाल्या. पण त्या संदर्भात उहापोह का होऊ नये? की मुस्लिम संघटना चांगली दिसू नये, असे माध्यमांच्या जाणत्यांना वाटत असावे?

इसिसमध्ये भारतीय मुस्लिम तरूण गेल्याच्या बातम्या झळकतात, तेव्हा मुस्लिमांकडे वा त्यांच्या तरूणांकडे शंकास्पद नजरेने बघितले जात असते. पण २०-२२ कोटी मुस्लिमातील २०-२२ तरूण तिकडे आकर्षित झाले तर ती संख्या नगण्य असते. पण ठळक बातम्यांमुळे इतरेजनांची मुस्लिमांकडे बघण्याची नजर कलुषित होते. अशा वेळी मुस्लिम तरूणांना रोखण्यासाठी समाजातले म्होरके काहीच करत नाहीत, अशीही धारणा तयार होऊ लागले. जमातने त्यातच पुढाकार घेतला आहे, म्हणूनच त्या बातमीला खरे महत्व आहे. एका बाजूला इसिसचा धर्माशी काहीही संबंध नसून उलट त्यांनी जिहादच्या नावाने चालविलेला हिंसाचार धर्मबाह्य असल्याची जमातची घोषणा बहुमोलाची आहे. कारण सामान्य मुस्लिम धर्मभिरू असतो आणि धर्माच्या नावावर त्याच्या गळी काहीही उतरवणे सोपे असते. इसिसचा हेतू तोच आहे आणि त्याच्या विरोधातले मोठे पाऊल म्हणजे त्यांच्या कृत्याशी जोडलेला धर्माचा संबंध तोडला जाणे. अजून तरी जगातील कुठल्या धर्ममार्तंड वा धर्मसंघटनेने इसिस विरोधत इतके मोठे खंबीर पाऊल उचललेले नाही. त्याच्या तुलनेत जमाते इस्लामीने उघडपणे इसिसची निर्भत्सना करण्याचे धैर्य दाखवणे, अनेक अर्थांनी महत्वाचे आहे. एक म्हणजे इस्लाम धर्म व मुस्लिम यांच्या संबंधात जे गैरसमज होतात, त्याच्या निराकरणाचे ते पाऊल आहेच. पण त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे इसिसच्या हिंसाचाराला धर्मबाह्य ठरवण्यापर्यंत मारलेली मजल महत्वाची आहे. संगीतकार रेहमान याच्या विरोधात रझा अकादमीने काढलेल्या फ़तव्यापेक्षा जमातची बातमी म्हणूनच मोठी ठरते. किंबहूना एकप्रकारे जमातच्या अशा भूमिकेमुळे रझा अकादमीच्या धर्मांध भूमिकेलाही नाकारले जात असते. म्हणून प्रसिद्धी देताना चांगले सौहार्दाचे परिणाम साधणार्‍या जमातच्या घोषणेचा गाजावाजा व्हायला हवा असतो. पण माध्यमे तिकडे दुर्लक्षच करतात.

इस्लामिक स्टेट नावाने इराक-सिरीयाच्या काही जिहादींनी स्थापन केलेली खिलाफ़त ही तोतयेगिरी असून, तिला इस्लाममध्ये कुठला धार्मिक आधार नाही, म्हणूनच त्या तोतयेगिरीचा निषेध केला पाहिजे व तिच्या विरोधात उभे राहिले पाहिजे, इतकी ठाम स्पष्ट भूमिका जमातने घेतली आहे. इथे आणखी एक ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेतला पाहिजे. खिलाफ़त हा असा विषय आहे, की ज्यामुळे मुस्लिम मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्यलढ्यात ओढला गेला होता व त्याचेही नेतृत्व जमातनेच केले होते. खिलाफ़त याचा अर्थ इस्लामी धर्मसत्तेचे जागतिक मुख्य सिंहासन होय. विसाव्या शतकाच्या पुर्वार्धात तुर्कस्थानातले आटोमान साम्राज्य खिलाफ़त होती व जगभरच्या अन्य इस्लामी सत्ताधीशांना मुस्लिम राज्य स्थापन करताना त्याच पिठाची मान्यता घ्यावी लागत असे. ब्रिटीश फ़्रेन्च वसाहतवादाने आटोमान साम्राज्य मोडून टाकले व परिणामी खिलाफ़तही बरखास्त करून टाकली. तेव्हापासून सगळे मुस्लिम देश वा सत्ताधीश स्वयंभू होऊन गेले. पण जनमानसात खिलाफ़त हा शब्द धर्मभावनेशी जोडला गेला आहे. इसिसच्या तोतयांनी त्याच भावनेला हात घालून रक्तरंजित नाटक रंगवले आहे. त्याच्या विरोधात तितक्याच ठामपणे राजकीय व धार्मिक भूमिका घेऊन उभे रहाण्याला म्हणूनच महत्व आहे, जगातल्या कुठल्याही देशातील मुस्लिम संघटना संस्थेने ते धाडस केलेले नाही. अगदी अरबी आखाती देशातले सत्ताधीशही मूग गिळून गप्प बसले आहेत, अशा वेळी जमाते इस्लामीने घेतलेली ठाम भूमिका निर्णायक महत्वाची असते आणि त्यासाठीच तिचा प्रसार प्रसार अगत्याचा आवश्यक होऊन जातो. किंबहूना त्यामुळे निदान भारतात तरी मुस्लिमांविषयी जी विकृत प्रतिमा असू शकते, ती पुसण्याच मोठा हातभार लागू शकतो. त्याहीपेक्षा भरकटणार्‍या मुस्लिम तरुणांना सावध करण्यात मोठे योगदान होऊ शकते.

दुर्दैव असे, की त्यात सामाजिक लाभ असला तरी सनसनाटी माजवायचा माल नसल्याने जमातची ही भूमिका किरकोळ बातम्या देवून संपवली जाते. उलट रझा अकादमीने काढलेल्या फ़तव्याचा डांगोरा पिटला जातो. ज्या फ़तव्याने मुस्लिम समाजात अस्वस्थता निर्माण होते आणि धर्मभावना दुखावल्याचे निमीत्त करून इसिस सारख्या संघटना अधिक मुस्लिम तरुणांना आपल्याकडे ओढू शकतात, त्याला माध्यमे प्राधान्य देतात. यातून एक गोष्ट स्पष्ट होते, की अशा चुकीच्या बातम्या रंगवून व ठळकपणे पेश करणार्‍यांना या देशात वा विविध धर्मियात सलोखा निर्माण करण्यापेक्षा वितुष्ट माजवण्याचा हव्यास आहे. पण ज्यातून मुस्लिमांना भरकटण्यापासून रोखता येईल, अशा बाबतीत काहीही करायचे नाही. हे एकूणच भारतीय समाजाचे दुर्दैव आहे, की माध्यमे विध्वंसक वृत्तीला खतपा्णी घालत आहेत आणि विधायक अशा भूमिकांना फ़ारसे प्राधान्य देत नाहीत. आपल्या याच पत्रकार परिषदेत जमातने सिरीयन निर्वासितांकडे पाठ फ़िरवलेल्या आखाती अरबी देशांचाही निषेध केला आहे. ही बाब अधिक लक्षणिय आहे. आज जगात हेच अरबी देश मुस्लिमजगताचे नेते म्हणून मिरवत असतात. पण जेव्हा शेजारी मुस्लिम देशातील मुस्लिमांवरच मोठे संकट आले, तर मात्र त्यांच्या मदतीला जात नाहीत. याचा निषेधही जमात या मुस्लिम संघटनेने केला आहे. माध्यमांची जी गोष्ट आहे, तीच इथल्या धर्मनिरपेक्ष म्हणवणार्‍या राजकीय पक्ष व संघटनांची स्थिती आहे. त्यातल्याही कुणाला जमातच्या भूमिकेचे हिरीरीने स्वागत करायची इच्छा झालेली नाही. एकूण काय तर सामाजिक सौहार्दाच्या गप्पा खुप जोरात चालतात. पण जिथे खरोखरच त्यात सहभागी होऊन योगदान देण्याची संधी येते, तेव्हा हेच धर्मनिरपेक्ष पुरोगामी कुठल्या कुठे गायब असतात. अशाच लोकांच्या अज्ञान वा खोडसाळपणामुळे विविध धर्मिय व समाजघटकात परस्पर शंका-संशय मात्र वाढत असतात.

5 comments:

  1. Bhau, if you talking about our media, let us stop it. It confirmed, they are bias. You only have pointed out many times. It is good decision by the group. Let all welcome the move.

    ReplyDelete
  2. त्रोटक का होइना, ही बातमी वाचायला मीळाली हेच वीशेष!

    ReplyDelete
  3. भाऊराव,

    भारतीय प्रसारमाध्यमे देशद्रोही आहेत. त्यांना हिंदू मुस्लिमांत तेढ वाढलेली बघायला आवडते. एका प्रकारे ती इंग्रजी सत्तेचं धोरण पुढे चालवत आहेत. पीटर मुखर्जीने पेरलेली विषवल्ली चांगलीच फोफावली तिला काटेरी फळं आलीयेत.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete
  4. hindu ani muslim galyat gale ghalayala lagle ki hya media la lagech chakkar yene, ghalmel hone, raktadaab wadhne asha goshti wyayala lagtat...
    freedom of expression hyancya bapacya malkichach ahe asha toryat hi media wagat asatat

    ReplyDelete