Wednesday, October 21, 2015

तस्लिमा नसरीन आणि हिंदू उन्माद



गेल्या काही दिवसात अनेक साहित्यिकांनी आपल्या मस्तीत पुरस्कार परत करण्यातून जे नाटक रंगवले, त्याचा बुरखा फ़ाडायला तस्लिमा नसरीन या बांगला देशी लेखिकेला समोर यावे लागले. ही भारतीय साहित्याची खरी शोकांतिका आहे. कारण तस्लिमाने नुसताच या साहित्यिकांचा बुरखा फ़ाडलेला नाही, तर भारतीय पुरोगामी व सेक्युलर म्हणून तमाशे करणार्‍यांच्या अब्रुची लक्तरेच वेशीवर टांगली आहेत. भारतातले सेक्युलर व साहित्यिक, मुस्लिमधार्जिणे व हिंदू विरोधी आहेत, असे ताशेरे तिने झाडले आहेत. ते बोलके आहेत. तस्लिमावर हैद्राबाद येथे मुस्लिम जमावाने हल्ला केला आणि तोही पत्रकार संघाच्या वास्तुत केला होता. त्यानंतर तिला सुरक्षा देण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. तर सेक्युलर सत्ता असलेल्या डाव्या आघाडीच्या मार्क्सवादी सरकारने तिला कोलकात्यात येऊ दिले नव्हते आणि भारताच्या सेक्युलर युपीए सरकारचे माहितीमंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांनी तस्लिमाला मुस्लिमांच्या धर्मश्रद्धेचा मान राखण्याचा सल्ला दिलेला होता. तेव्हा कुठल्याही सेक्युलर सरकारच्या सुरक्षेविषयी तस्लिमाला खात्री नव्हती. म्हणून तातडीने तिला कडव्या धर्मांध मानल्या जाणार्‍या भाजपाचे सरकार असलेल्या, राजस्थान सरकारच्या अतिथी भवनात दडवून ठेवावे लागले होते. दुसरीकडे देशातले कुठलेही पुरोगामी सरकार तिची जबाबदारी घ्यायला राजी नव्हते. इतकी पुरोगामी अविष्कार स्वातंत्र्याची हमी तेव्हा आपल्या देशात होती. अशावेळी गुजरातमध्ये तस्लिमाला संरक्षण देण्याची तयारी तिथले अत्यंत जातियवादी माथेफ़िरू मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी दाखवली होती. या अनुभवानंतर तस्लिमा आज आपले मन मोकळे करत आहे, हे विसरता कामा नये. म्हणूनच ती साहित्यिकांविषयी काय बोलते, यापेक्षा भारतातल्या पुरोगामीत्वाविषयी काय बोलतेय, त्याला अधिक महत्व आहे. साध्या शब्दात सांगायचे, तर भारतीय पुरोगामीत्व म्हणजे कट्टर इस्लामवाद असा तिचा आरोप आहे.

सर्वात पहिल्यांदा तस्लिमाच्या जीवाला बांगला देशात धोका निर्माण झाला, तेव्हा भारतात तिचा गाजावाजा सुरू झाला. तिची ‘लज्जा’ ही कादंबरी भारतात प्रकाशित करण्यात इथलेच पुरोगामी आघाडीवर होते. मुंबईत प्रथमच तस्लिमा आली, तेव्हा तिच्या स्वागताला जावेद अख्तर व शबाना आझमी विमनतळावर उपस्थित होते. आज त्यांनी अवाक्षर उच्चारू नये, याचा काय अर्थ लावायचा? तस्लिमा जोपर्यंत पुरोगाम्यांच्या हातातले खेळणे होते, तोपर्यंतच तिच्या पाठीशी ही मंडळी उभी होती. पण मग स्थिरावलेली तस्लिमा पुरोगमी चाळे बघून सावध होत गेली. आपल्याला बांगलादेशी कट्टरवाद्यांच्या इतकाच धोका इथल्या पुरोगाम्यांपासून असल्याचे तिच्या लक्षात येत गेले. आज तिच्या समर्थनाला कोणी पुरोगामी उभा राहिलेला नाही. आणि तसे असूनही बिनदिक्कत आपले मत व्यक्त करण्याची हिंमत तस्लिमात आलेली आहे. याचे कारण आज भारतात पुरोगामी म्हणवणार्‍यांचे सरकार नाही, म्हणून ती निश्चींत आहे. इतक्या उघडपणे कट्टर इस्लामी पुरोगामीत्वावर हल्ला करायची यापुर्वी तिला कधी हिंमत झाली नव्हती. पण आज तस्लिमा मनमोकळी बोलते आहे. यापेक्षा भारतातल्या अविष्कार स्वातंत्र्याचा दुसरा कुठला पुरावा देण्याची गरज उरत नाही. नेमक्या त्याच पार्श्वभूमीवर आपण देशात मोकाट झालेल्या ‘हिंदू उन्मादा’चा विचार करण्याची गरज आहे. आज नधी नव्हे इतकी आक्रमकता हिंदू संघटनांमध्ये दिसून येते आहे. त्याविषयी दुमत होण्याचे कारण नाही. पण मग इतके दिवस त्याच संघटना निमूट कशाला बसल्या होत्या? त्याचीही मिमांसा आवश्यक आहे. तर आजवर त्याच हिंदू संघटनांच्या अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी चालली होती आणि पुरोगामीत्व म्हणुन इस्लामी कट्टरपंथीयांच्या उन्मादाला मोकाट रान होते. आता परिस्थिती बदलली आहे इतकेच!

जेव्हा एखादा माणुस खुप वेळ घुसमटल्या अवस्थेत रहातो, तेव्हा थोडी मोकळी हवा मिळाली तरी तो धापा टाकल्यासारखा वेगाने श्वास घेऊ लागतो. हावर्‍यासारखा प्राणवायू घेऊ लागतो. त्याला उन्माद म्हणायचे काय? अगदी तसाच एखादा समाज दिर्घकाळ घुसमटल्यासारखा जगतो, तेव्हा त्याला आपल्या भावना कथन करायची संधी मिळाल्यावर आक्रमक होऊन बोलू लागतो. हिंदू समाजाची हीच मानसिकता आज आपण बघतो आहोत. पुरोगामी वा सेक्युलर राज्य म्हणून या देशात हिंदूंची मागल्या दोनतीन दशकात सार्वत्रिक गळचेपी व मुस्कटदाबी करण्यात आली. केवळ हिंदू असणे वा त्याविषयी अभिमान बाळगणेही, पुरोगामीत्वाने गुन्हा ठरवून टाकलेले होते. त्यातून जी घुसमट हिंदू अनुभवत होता. त्यानेच मोदींना पंतप्रधानपदी आणुन बसवले आहे. त्यामुळेच आता आम्ही हिंदू असल्याचे सांगायला भित नाही, असे सांगण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. त्यातला उत्साह किंवा उतावळेपणाचा अतिरेक योग्य की अयोग्य, हा विषय वेगळा आहे. पण त्यामागची प्रेरणा तिथून आलेली आहे. दिर्घकाळ कोंडमारा करण्यात आल्याची ती प्रतिक्रीया आहे. अर्थात त्यात हिंदू समाज कायम राहू शकत नाही. म्हणूनच त्याचा अतिरेक झाल्यावर अशा हिंदू संघटनांना त्यांचा समाजच पायबंद घातल्याशिवाय रहाणार नाही. पण त्याच्या उलट आजच्या प्रतिक्रीयांना गुन्हा ठरवायला गेले, तर तोच हिंदू समाज अधिक त्या अतिरेकी समर्थनाला पुढे येतच राहिल. कारण त्यांच्या उतावळेपणा वा अतिरेकातून प्रत्यक्षात त्याच कोट्यवधी सामान्य हिंदूंचा कोंडमारा व्यक्त होत आहे. किंबहूना तस्लिमाही म्हणून इतकी उघडपणे पुरोगाम्यांवर तुटून पडली आहे. मात्र स्वभावत: हिंदूंमध्ये अतिरेकी मानसिकता नाही. म्हणूनच हा अतिरेक फ़ार काळ टिकू शकत नाही. तो टिकवणे हिंदू संघटनांपेक्षा पुरोगामी अतिरेकावर अवलंबून आहे.

शिवसेनेवर नेहमी संकुचित प्रादेशिकवादाचा आरोप झालेला आहे. पण मुंबईत सेनेने गुलाम अलीचा कार्यक्रम हाणून पाडला. कुलकर्णीच्या तोंडाला काळे फ़ासले वा पाक संघाच्या क्रिकेट दौर्‍याच्या विरोधात घिंगाणा घातला, त्याचे अमराठी लोकांकडून होणारे स्वागत कशाचा संकेत देते? हिंदी भाषिक सोशल मीडियात शिवसेनेचे चाललेले समर्थन तिच्या मराठी बाण्याला पाठींबा देणारे नाही, तर सेनेच्या खांद्यावरील हिंदूत्वाच्या झेंडयाला मुजरा करणारे आहे. सेनेविषयीचा पुर्वग्रह सोडुन परप्रांतियांनी सेनेच्या दंगामस्तीचे असे समर्थन करण्याचा योग्य अर्थ समजून घेतला, तरच त्यावरचा उपाय शोधता येईल. पण साचेबद्ध पुरोगामी निषेधाने काहीही होणार नाही. उलट त्यामुळेच मराठी प्रांताच्याही बाहेर शिवसेनेला समर्थन मिळते आहे. ते राजकीय समर्थन नाही, तर जिहादी पुरोगामीत्वाने हिंदू समाजाचा मायदेशी जो कोंडमारा केला, त्यावर उमटलेली ती प्रतिक्रीया आहे. त्याला उन्माद ठरवून निंदा करता येईल. पण उपयोग काहीच होणार नाही. उलट त्यातून ज्यांना सेना वा अन्य हिंदू संघटना खुश करीत आहेत, त्यांना त्याच बाजूला लोटण्याचे काम मात्र होईल. नव्हे होतेच आहे. देशभरच्या अशा कोंडमारा झालेल्या हिंदू बहुसंख्यांकाना अशा नेत्याचा दिर्घकाळ शोध होता आणि वाजपेयी वा अडवाणी त्याच्या अपेक्षा पुर्ण करू शकत नव्हते. अशावेळी दुखावलेल्या हिंदूंना तसा खमका नेता शोधून देण्याची मोठी कामगिरी मागल्या तीन वर्षात पुरोगाम्यांनीच पार पाडली. एका छोट्या मध्यम राज्यातला मुख्यमंत्री तुम्हाला हवा तसा हिंदूंच्या भावनांची काळजी घेणारा नेता असल्याचे देशभर ओरडून सांगायचे काम, पुरोगाम्यांनीच केले आणि तसा नेता हिंदूंना मिळवून दिला. त्याचे परिणाम दिसत आहेत. तस्लिमा बोलू लागली आहे आणि हिंदू सुखावले आहेत. त्यांना कुणाच्या अविष्कार नाट्याची वा पुरोगामी संकटाची अजिबात फ़िकीर नाही. तुम्ही त्याला उन्माद म्हणा किंवा कट्टरता म्हणा.

5 comments:

  1. ढोंगी पुरोगाम्यांना आता तोंड दाखवायला जागा उरली नाही

    ReplyDelete
  2. या देशात फालतु पुरोगामीत्व देरसबेर मोडीत निघालेय. अल्पसंख्यांकांना जे कळते पण यांना वऴत नाही हेच खरे!

    ReplyDelete
  3. पुरोगाम्यांचे अस्सल देशी मानसिकतेशी असणारे शत्रुत्व जोवर संपत नाहि तोवर त्यांना या भुमीत मातीच खायला लागेल.देरसबेर मुस्लिमांच्या लक्षात येत आहे की पुरोगामी आता राज्यशकट हाकायच्या लायकीचे राहीले नाहीत. एमआयएम ही त्यापोटीच झालेली उपज आहे.

    ReplyDelete
  4. तस्लीमा जे बोलत आहेत ती वस्तुस्थिती आहे! आपल्याकडे पुरोगामीत्व हे डिग्री सर्टिफिकेट असल्याप्रमाणे मिरवले जात आहे. स्वतःचं स्वतःला पुरोगामी म्हणून घेतल्याने कोण कसा पुरोगामी होईल?

    ReplyDelete