Saturday, June 6, 2020

परिक्षा हव्यातच कशाला?

Uddhav Thackeray meets Governor Koshyari day after he calls for ...

कोरोनामुळे एकूणच सगळ्या व्यवस्था कोसळून पडल्या आहेत. त्यामुळे कशाला कायदा नियम म्हणायचे आणि कशाला गुन्हा म्हणायचे; असा प्रश्न सामान्य कायदा आंमलदारांनाही भेडसावत आहे. त्याचा अर्थ इतकाच, की कशालाही आजकाल निकष वा कसोटी राहिलेली नाही. ज्या देशात राजरोस दोन साधूंची जमावाकडून सामुहिक हत्या होते, त्याला न्यायाचे राज्य म्हणायचे आणि हमरस्ता अडवून बसणार्‍यांसाठी तो राज्यघटनेने दिलेला नागरी अधिकार असल्याचे आपण ऐकत असतो. तेव्हा परिक्षा या शब्दाला काही अर्थ उरलेला असतो का? सध्या अमेरिकेत जाळपोळ चालली आहे, दंगली पेटलेल्या आहेत आणि त्यालाच न्यायाची लढाई ठरवण्याच्या बौद्धिक कसरती चाललेल्या आहेत. अशा स्थितीत महाराष्ट्रामध्ये पदवी बहाल करण्यापुर्वी कुठली परिक्षा घेण्याचा अट्टाहास कितीसा योग्य ठरू शकतो? सत्तेत बसलेल्यांना परिक्षा अनावश्यक वाटत असेल तर ती रद्द व्हायला काय हरकत आहे? खरे तर आजकाल शिक्षणसंस्था किंवा महाविद्यालये विद्यापीठांची तरी काय गरज उरली आहे, तेही विचारले गेले पाहिजे. लोकसंख्येचा अल्प घटक असलेले काही शिक्षक व संस्था उभारून लाभ पदरात पाडून घेणार्‍या संस्था यांना प्राधान्य आहे. बाकी बालक वा विद्यार्थी अशा शब्दांनाच काही अर्थ उरलेला नाही. मग परिक्षा काय उपयोगाची रहाते? रघुराम राजन किंवा अभिजित बानर्जी अशा दिग्गजांच्या खुद्द राहुल गांधी परिक्षा घेतात आणि तेही मोठ्या अगत्याने त्यासाठी हजर रहातात. इतके अर्थशास्त्र समाजशास्त्र सोपे होऊन गेलेले असेल, तर त्याच विषयात विद्यार्थ्यांना परिक्षेच्या जाचातून जाण्याची काय गरज आहे? त्यांनी त्या अभ्यासक्रमाला वर्षभराची नोंद केली म्हणजे पुरेसे आहे. हजेरी, वर्गात बसणे वा परिक्षा वगैरेच्या कटकटी कशाला हव्या आहेत? परोक्षेसह वर्ग, वह्या पुस्तके अशा गोष्टी कायमच्याच काढून टाकल्या तरी उत्तम. तेवढाच सरकारी तिजोरीवरचा खर्चही कमी करता येईल ना? शिवाय त्यात राज्यपाल वगैरेंची कटकटही परस्पर संपून जाईल.

मागले काही दिवस हा परिक्षांचा वाद खुप रंगला आहे, म्हणून त्याविषयी उहापोह करणे भाग आहे. यावर्षी कोरोनाचे संकट उदभवले म्हणून. अन्यथा जेव्हा कोरोना नव्हता, तेव्हा या परिक्षा किती नेमाने व योग्य वेळेत मुदतीत झालेल्या आहेत? कुठल्या अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका वेळच्या वेळी तपासून निकाल लावले गेले आहेत? त्यात कधीच गफ़लती झालेल्या नाहीत काय? लाखोच्या संख्येने या परिक्षांना बसणारे विद्यार्थी खरोखरच उत्तीर्ण होतात आणि निकालात कुठलीच त्रुटी राहिलेली नसते काय? उत्तरपत्रिका इतर कोणाकडून तपासून घेणारे काही परिक्षक महाभाग आपण कधी बघितलेलेच नाहीत काय? आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर जे पदवीधर तयार झाले, त्यांचा बेकारीत भर घालण्यापेक्षा अन्य कुठला लाभ समाजाला मिळू शकलेला आहे? अनेक अभ्यासक्रमाच्या परिक्षा ठरल्या वेळेत झाल्या नाहीत, म्हणूनच्या तक्रारी ऐकता ऐकता अनेक विद्यार्थी पालक होऊन गेले आणि आपल्या संततीच्याही शैक्षणिक जीवनात त्याच समस्यांना तोंड देत आहेत. मुद्दा इतकाच, की कोरोना आला नसता, म्हणून सगळ्या परिक्षा व निकाल वेळच्या वेळी होणार होते काय? अशा रितीने परिक्षा लांबणे व निकाल लांबणे, यामुळे पुढल्या उच्चशिक्षणात बाधा येण्यासाठी कोरोनाच्या आगमनाची आपल्याला कधीपासून चिंता वाटू लागली? प्रवेश परिक्षांचा गोंधळ उडाल्याने उच्चशिक्षणाचे अभ्यासक्रम वा प्रवेश दिवाळीपर्यंत लांबल्याच्या घटना आपण कधी ऐकलेल्याच नाहीत काय? असतील, तर मुलांचे वर्ष वाया जाऊ नये, असली साळसुद भाषा आलीच कुठून? आज ज्यांना मुलांच्या शैक्षणिक वर्ष वाया जाण्याच्या विलंबाने चिंतातूर केले आहे, त्यांना आजवरच्या परिक्षा निकाल वेळच्या वेळी लागल्याचा अनुभव आहे काय? मुले पालक व सगळेच बुद्दू असल्यासारख्या चर्चा कशाला चालल्या आहेत?

इंजिनियरींग वा वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी दिवाळी उजाडण्यापर्यंत प्रवेश प्रक्रिया चालल्याचा अनुभव नेहमीचा आहे. तरी असले वाद कशाला रंगवले जातात? अगदी परिक्षा घेतल्याने उत्तरपत्रिका योग्य प्रकारे तपासल्या जातील याची कोणी हमी देऊ शकत नाही, इतकी दारूण स्थिती आहे. मुले शिकतात, त्यांना विषयाची जाण कितीशी आली, त्याला महत्व आहे. अभ्यासक्रम मोठा लांबलचक असल्याने त्यात काटछाट करूनही वर्षाचा कार्यकाल तोकडा करून विषय हाताळला जाऊ शकतो. यंदाच्या परिक्षा उशिरा होतील आणि त्यातून पुढे शिकायला जाऊ इच्छिणार्‍या मुलांचा तेव्हाचा अभ्यासक्रम व कार्यकाल तोकडा करूनही पर्याय निघू शकतात. कुलपती व कुलगुरू एकत्र बसून असे सोपे व सुटसुटीत पर्याय काढू शकतात. पण समस्या सोडवण्यापेक्षा त्यात खोडा घालण्यालाच प्राधान्य आले, मग विचका कशाचाही करता येतो. विषय साधाच होता. राज्य सरकारांनी स्थलांतरीत मजुरांची फ़क्त नोंदणी करून रेल्वेला द्यायची आणि त्या मोजक्या व निवडक प्रवाश्यांसाठीच ठराविक स्थानकावरून श्रमिक गाडी सोडायला सांगायचे. तुमची यादी आली मग ठरल्या वेळी गाडी येईल आणि त्याच वेळी नेमक्या तेवढ्याच प्रवाशांना तिथे आणून सोडायचे होते. त्यात वादाला कुठे जागा होती? पण त्यातही राजकारण खेळायला बसलेल्या लोकांच्या समस्या सुटणार कशा? परिक्षेविना पदवी देऊन टाकणे सरकारसाठी खुप सोपे काम आहे. पण असली पदवी घेतलेल्यांच्या माथी कायमचा कोरोना शिक्का बसतो त्याचे काय? त्यांच्याकडे कायम परिक्षेविनाचा पदवीधर असे़च बघितले जाणार आणि ती पदवी पात्रतेपेक्षा अपात्रता प्रमाणपत्र बनुन जाणार. कोणी उघडपणे तसे बोलणार नाही. पण २०२० चा पदवीधर म्हणजे ‘असाच’ हे गृहीत होऊन जाते आणि त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार नाहीत. ज्यांच्या शैक्षणिक वर्षाची चिंता करता, त्यांच्यासाठी ही आयुष्यभराची समस्या असेल.

खरे तर या निमीत्ताने एकूणच शिक्षण पद्धतीचा व व्यवस्थांचा विचार नव्याने करण्याची वेळ आलेली आहे. परिक्षा कशासाठी असते आणि शिक्षणाची मानवी जीवनातील गरज काय? समाजात आपल्याला उपयुक्त घटक म्हणून घडवण्याच्या प्रक्रीयेला शिक्षण म्हणतात. त्याचा सगळ्यांनाच विसर पडलेला आहे. अन्यथा असले वाद निर्माण झाले नसते, किंवा त्यातूनही राजकारण रंगवले गेले नसते. प्रत्येकाला मुलांच्या शैक्षणिक वर्षाची चिंता सतावते आहे. पण त्याने घेतलेल्या शिक्षणाची उपयुक्तता हा कोणालाही महत्वाचा विषय वाटलेला नाही. मुलांच्या शिक्षणाचा खर्च पालक करतात किंवा उच्चशिक्षणासाठी अनेक पालक कर्जही काढतात. एकूणच शिक्षण म्हणजे आजकाल गुंतवणूक झालेली आहे आणि ठरविक लोकांसाठी तो किफ़ायतशीर धंदाही झालेला आहे. चालू परिक्षा पद्धती त्यामुळे कितीशी उपयुक्त उरली, असा प्रश्न आहे. परिक्षा घेतली वा त्याशिवाय पदवी बहाल केली, म्हणून एकूण समाजजीवनावर काय परिणाम होणार आहे? त्या मुलांचे शैक्षणिक वर्ष वाचणार म्हणजे काय आणि त्याच वाचलेल्या वर्षाचा सदूपयोग मुले कसा करणार? याचा उहापोह यात कुठे आला आहे काय? मुलांचे शिक्षण वा परिक्षा याकडे सरकार बोजा म्हणून बघते आहे. कुलपती नियमांचे पावित्र्य पाळत आहेत आणि पालक मुले एका वर्षासाठी चिंतातुर आहेत. पण शिकलो काय वा शिकवले काय, याविषयी कोणालाही कसलीही फ़िकीर नसावी, यातच आपली सत्वपरिक्षा होऊन गेलेली आहे. अवघे जगच अपवादात्मक स्थिती म्हणून कोरोनाला सामोरे जात असेल तर मुलांचे वर्ष, परिक्षा वगैरे गोष्टी भवितव्याशी किती जोडलेल्या आहेत? कारण अवघ्या जगाचे, देशांचे व अर्थकारणाचे भवितव्य काय त्याची भ्रांत आहे. ज्या कोरोना परिक्षेत अवघे जग व सर्व व्यवस्थाच नापास झाल्यात त्यातून सावरायचा विचार कोणी करायचा?

19 comments:

  1. काल लोकमतला कौतुकाची बातमी होती की," 1100 किमी अंतर बाईकवर प्रवास करून शिक्षक कर्तव्यासाठी मुंबईत आला." सामान्य माणसाला प्रश्न पड़तो की यात त्या शिक्षकाने कोणता पराक्रम केला की त्याची बातमी देऊन कौतुक व्हावे ? करोड़ो लोक पायी व मिळेल त्या वाहनाने गावी गेलेत व परत येत आहेत. त्यातील बहुतेकांना दहा ते पंधरा हजारांच्या आत पगार आहे. या शिक्षकाला 50000 च्या पुढे पगार आहे. स्वतःची नोकरी टिकवण्यासाठी तो बाईकवर आला यात कोणती देशसेवा केली त्याने ? निर्बुध्द पत्रकार व संपादक आहेत. सरकारी नोकर भक्कम पगार घेतो त्यामुळे तो करत असलेल्या कामाला सेवा कसे म्हणता येईल?

    ReplyDelete
  2. मी तुमचे लिखाण आवर्जून वाचतो व बरेचदा सहमत पण असतो. पण ह्या विषयात मला वाटत तुमचं सपशेल हुकल आहे. तुम्हाला स्वतः ला परीक्षा हॉल मध्ये आठ दहा दिवस जाऊन परीक्षा द्यायच्या नाहींयत, आपण घरात सुरक्षित राहून इतरांना परीक्षा द्या म्हणणे सोपे असते. परीक्षा कायमच्या रद्द नाही केल्या तर ह्या वर्षीच्या अभूतपूर्व परिस्थितीने हा निर्णय घ्यावा लागलाय हे समजून घ्या. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव परीक्षाहट्टा पायी संकटात टाकणे कितपत योग्य आहे, त्याहीपेक्षा एक इंफेक्ट झालेला विद्यार्थी घरी जाऊन पूर्ण फॅमिली इंफेक्ट करेल हा सारासार बुद्धी च्या माणसाला पण कळेल. तर हे तज्ञांवर व प्रशासनावर सोडून देणे उचित. परीक्षा देऊन मार्क मिळवून असे किती मोठे दिवे विद्यार्थी लावतात , की एक वर्षी परीक्षा न घेतल्याने फरक पडणार आहे ? तर परीक्षा न घेता पुढे ढकलणे व शेवटच्या सेमिस्टर च्या मुलांना आजवरच्या सर्व सेमिस्टर च्या सरासरी गुण देऊन पुढे जाऊ देणे हा निर्णय रॅशनल आहे. कारण प्रशासनव सरकार आधीच भयंकर तणावात आले आहे त्यात हा परिक्षहट्ट नको.

    ReplyDelete
  3. भाऊ, हा सगळा सावळा गोंधळ आहे. "अनुनभवी राजा आणि मूर्ख दरबारी"

    ReplyDelete
  4. १) महत्त्वाचा लेख. २) पुन्हा विनंती करतो की, निदान काही काळानंतर आपली यूट्यूब वरील विवेचन, लेख स्वरूपात द्यावे ही विनंती. म्हणजे काळजीपूर्वक वाचता येईल. धन्यवाद

    ReplyDelete
  5. Where there is will there is way. Companies that pay best CTC conduct online exams through third party that ensure that there is no foul play with the help of technology. Some tests are conducted on mobile. Students who have access to the technology can give the exam remotely others can give it in person or at any college that exist in their vicinity . Colleges and Universities need to collaborate, This is the time show we are authentic and respect talent.

    ReplyDelete
  6. पूर्वी जळके ग्रज्युएट्स होते तसे आता कोरोना ग्रज्यूएट्स होतील.

    ReplyDelete
  7. भाऊ 2020 ला शेवटच्या वर्षाला असणारा विध्यार्थी हा मतदार सुद्धा आहे. न परीक्षा देता पदवी मिळाली तर नोकरी मिळेल किंवा काम धंदा करता येईल याची जरी खात्री नसली तरी ती परीक्षा देऊन मिळालेली पदवीच्या असण्याऱ्याबाबत तरी कुठे देता येते? त्यामुळे शैक्षणिक आयुष्यात परीक्षेला कंटाळलेल्याचे मत पुढल्या एका निवडणुकीपुरते जरी मिळाले तरी काम झाले म्हणायचे कारण बाकी सरकारच्या कामगिरीमुळे (सकारात्मक अर्थाने) मते मिळणे किंवा मागता येणे अशक्यप्राय आहे...

    ReplyDelete
  8. Very good article, Shikshan ya vishayawar nirnay kulguru aani kulpati yàanich ghywa, tyache palan karawe.

    ReplyDelete
  9. माझी सूचना प्रतिपक्ष बाबत आहे, कारण तेथे सूचना करायची सोय नाही. आपली निरिक्षणे चांगली आहेत. वागळे चार आठवडे बिळात गेलेत.
    आपल्या व्हिडिओमधे अनेकदा तुम्ही बोलताना " आता मला नाव आठवत नाही " असे येते, तरी कृपया टिपण काढून सोबत ठेवलेत तर असे बोलावे लागणार नाही व विश्लेषणाचा फ्लो व्यवस्थित साहिल

    ReplyDelete
    Replies
    1. मलाही हेच सुचवावेसे वाटते.

      भाऊ, आपले 'प्रतिपक्ष' आवर्जून पाहतो आणि इतर अनेकांना शेअर केले जाते. आपले मुद्दे समोरच्याला समजवताना तुमच्या व्हिडीओंचा (आणि लेखांचाही) उपयोग होतो. पण 'आठवत नाही' असे आल्यामुळे उगाच समोरच्याला मुद्दा मिळतो. टिपण सोबत असले की तुमच्या विश्लेषणातील प्रवाहीपणा जपला जाईल असे वाटते.

      Delete
  10. अगदी योग्य विचार. खूप महत्त्वाच्या विषयावर विचार मंथन केले आहेत तुम्ही.यातून नक्कीच पुढे काही ठोस बदल होण्याच्या दिशेने पावले उचलली गेली पाहिजेत.आणखी असे सुचवायचे आहे की परीक्षा बोर्ड वेगवेगळ्या संस्थांना दिली जावीत व वर्ष भरात वेगवेगळ्या इंटरव्हलने वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जाण्याची सोय असवी ज्यांचे बुकींग विद्यार्थी सोई प्रमाणे करू शकतील.सीट्स लिमिटेड ठेवल्यास परीक्षांचे घोळ होणार नाहीत.संस्थांनी मेन्टेन केलेल्या स्टॅंडर्ड प्रमाणे त्या संस्थांची विश्वासार्हता राहील व एक प्रकारे सुसुत्रता येईल.

    ReplyDelete
  11. या माझ्या प्रतिक्रियेला तुमच्या या परीक्षा विषयावरील यूट्यूब प्रतिपक्ष मधील विचार मंथनचाही संदर्भ आहे

    ReplyDelete
  12. नमस्कार, प्रतिपक्ष ह्या चॅनल वर तुमचा परीक्षेची अग्निपरीक्षा हा व्हिडिओ मी पाहिला. मला तो मनापासून आवडला परंतु त्या व्हिडिओत २-३ बाबी मला पटल्या नाहीत. मी अंतिम वर्षाचा इंजिनिअरिंग चा विद्यार्थी असून अंतिम सत्राची परीक्षा होण्यापूर्वीच ( म्हणजे ७ सत्रांच्या परीक्षांनंतरच) एका सॉफ्टवेअर कंपनीत निवडला गेलेलो आहे. आता ह्या टप्प्यावर माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांसाठी अंतिम सत्रात "मेरीट" ही गोष्ट तितकी महत्त्वाची नाही आहे. औपचारिकता मात्र आहे.
    तसेच उद्धव ठाकरे ह्यांच्या म्हणण्यानुसार अंतिम सत्राचे मार्क्स हे उर्वरित सत्रांची सरासरी असणार आहे. इंजिनिअरिंग हा ८ सत्रांचा अभ्यासक्रम असतो व ७ सत्रांच्या मार्कांच्या सरासरी मार्क्स वरूनच त्या कंपनीची मेरीट माझ्यासारख्या विद्यार्थ्यांनी पार केली आहे. त्यामुळे इंजिनिअरिंग साठी लागणारी जी गुणवत्ता आहे ती ७ सेमीस्टर नंतरच आम्हाला प्राप्त झाली आहे असा त्याचा अर्थ होतो. त्याचप्रमाणे आम्ही ज्या इंडस्ट्री मध्ये काम करणार आहोत त्याचा आणि अंतिम सत्राच्या विषयांचा काडीमात्र संबंध नाही. अभ्यासक्रमाला इंडस्ट्रियल किंमत नाही.
    त्यामुळे गुणवत्ता असलेले विद्यार्थीच तेवढे अंतिम सत्राची परीक्षा देतील अशा आशयाचे तुमचे विधान मला पटले नाही.

    ReplyDelete
  13. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी गुणवत्तेचे निकष वेगवेगळे असू शकतात.

    ReplyDelete
  14. अंतिम सत्र परीक्षा गुणवत्ता सिद्ध करते की नाही ह्यात मतमतांतरे असू शकतात.कारण पदवी नंतर किंवा पदवीचा अभ्यासक्रम चालू असतानाच बरेच विद्यार्थी हे GATE , CAT, GRE अश्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताच असतात. त्यामुळे पदवी ही केवळ औचारिकता मात्र बनून राहते.

    ReplyDelete
  15. बरं इतर विद्यार्थी ज्यांच्या 1st, 2nd, 3rd year च्या परीक्षा आधीच रद्द झाल्या आहेत ती मुले देखील ७ सत्रांच्या गुणांच्या आधारेच पदवी प्राप्त करणार आहेत. त्यांच्याकडे "असाच" म्हणून बघितले जाणार नाही काय ? उलट माझ्या मते अभियांत्रिकी सारख्या अभ्यासक्रमात ७ सत्रांच्या सरसरीवर शेवटच्या सत्राचे गुण ह्या परिस्थितीत देणे हे अयोग्य नाही. मुलांच्या जॉब ची जाॅइनिंग ची तारीख आणि अंतिम सत्राच्या परीक्षेची तारीख एक आल्यास मुलांची तारांबळ उडणार नाही काय ? तसेच MBA महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशाची तारीख व अंतिम सत्राची तारीख एक आल्यास गोंधळ उडणार नाही काय ? असे अनेक क्लिष्ट प्रश्न आहेत. त्यामुळे अंतिम सत्र परीक्षा म्हणजे गुणवत्तेचा निकष असू शकत नाही. व त्यामुळे २०२० चा विद्यार्थी म्हणजे "असाच" हे आपले वरचे विधान मला पटले नाही.

    ReplyDelete
  16. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  17. मी तुमचे प्रतिपक्ष विडिओ नियमित बघतो.तुमची तळमळ या राजकारणी लोकांना कळत नाही हे देशाचे दुर्दैव.

    ReplyDelete
  18. I also have a different opinion about your video on Sonu Sood. I was only 11 years old when Shiv Sena entered my life in 1970 when one of our tenent who was a BEST bus Conductor brought Sens in our village Agashi near Virar. I remember Sena from that time. As you have rightly said Sena was doing real smamjic Work during its first 15-20 years. But since last 20-25 years, it has lost its touch with people. Many old supporters like me hav elost faith in Sena of today which started deteriorating about 20 years back.

    ReplyDelete