Wednesday, June 10, 2020

मटाच्या फ़ुत्काराचा इतिहास

Atal Bihari Vajpayee, the man who turned India into nuclear-armed ...

‘आपले राज्यकर्ते, त्यांचे पाठिराखे किंवा सहानुभूतीदार वारंवार पाकिस्तानला हिणवत असतात. अधुनमधून पाकव्याप्त काश्मीरही भारताला जोडून घेण्याच्या चर्चा गंभीरपणे चालू असतात. ते होईल किंवा न होईल; पण भारताला सर्व अर्थांनी खरा व अधिक मोठा धोका हा चीनपासून आहे आणि तो कधीही लपलेला नाही. संरक्षणमंत्री असताना असे स्पष्टपणे बोलण्याचे धाडस एकट्या जॉर्ज फर्नांडिस यांनी दाखवले होते. तेव्हा त्यांच्यावर सगळे नाराज झाले, याचे कारण त्यांनी चीनला म्हणे दुखावून ठेवले.’

बुधवार १० जुन २०२० रोजीच्या ‘महाराष्ट्र टाईम्स’ च्या संपादकीयातला हा उतारा आहे. शीर्षक आहे, ‘ड्रॅगनच्या फ़ुत्काराचा अर्थ’. एकूण अग्रलेख वाचला तर आपल्याला असे वाटेल की भारत सरकारपेक्षा या संपादकांनाच देशाच्या परराष्ट्र धोरणाची किंवा सुरक्षाविषयक धोरणाची अक्कल आहे. किंबहूना त्यांना विचारल्याशिवाय भारत सरकारने चीन वा पाकिस्तानशी कुठलेही व्यवहार करणे म्हणजे साक्षात मुर्खपणाच असू शकतो. पण वस्तुस्थिती इतकी उलट आहे, की आजच्या या अग्रलेखातून या महाशयांनी जे काही अकलेचे तारे तोडलेले आहेत, ते त्यांनाही आणखी काही दिवसांनी आठवणार नाहीत. कारण परराष्ट्र धोरण किंवा अन्य देशांशी असलेले संबंध हा अग्रलेख खरडून काढण्याइतका साधा विषय नसतो, इतकीही जाण अशा लोकांकडे नाही. यानिमीत्ताने त्यांनी फ़र्नांडिसांचे जे कौतुक केले आहे, त्यांचेच आणखी एक विधान इथे नमूद करणे योग्य ठरेल.

सोनिया गांधी राजकारणात आल्या त्यावेळी कुठल्याशा एका पत्रकाराने जॉर्जना काही प्रश्न विचारला आणि पुढली रणनिती काय असा पिच्छा पुरवला होता. त्याला रणनिती या शब्दाचा अर्थ त्यांनी समजावला होता. तुमच्यासमोर बोललो तर ती रणनिती उरत नाही असेच जॉर्ज म्हणाले होते. पण त्याचा बोध संबंधित पत्रकाराला तेव्हा झालेला नव्हता आणि विद्यमान मटा संपादकांनाही झालेला नाही. रणनिती वा मुत्सद्देगिरी पत्रकार परिषदेतून होत नसते., त्यात वावरणारी माणसे खुप काही बोलतात आणि काहीही ‘सांगत नाहीत.’ त्याला रणनिती वा मुत्सद्देगिरी असे म्हटले जाते आणि ज्यांना त्यातले काहीही कळत नसते असेच लोक त्यावर तात्कालीन मुक्ताफ़ळे उधळत असतात. नेमके तसेच तेव्हाही कुमार केतकरांच्या बाबतीत झालेले होते. ते तात्कालीन संपादक होते.

१९९८ साली अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी फ़र्नांडिसांचा आपल्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री म्हणून सहभागी करून घेतलेले होते. सहाजिकच हिंदूत्ववादी पक्षाच्या सोबत गेले म्हणून तमाम पुरोगाम्यांचे फ़र्नांडिस तात्काळ दुष्मन झालेले होते. अशा काळात अतिशय गोपनियता पाळून पोखरण येते दुसरा अणुस्फ़ोट करण्यात आला आणि तो झाल्यावरच त्याचा गवगवा झालेला होता. अमेरिकेने तात्काळ भारतावर निर्बंध लागू केले होते आणि अर्थातच सेक्युलर कुमार केतकरांचा जळफ़ळाट झालेला होता. त्यांच्यासारख्यांना भारताने यशस्वी केलेला हा गौप्यस्फ़ोट अजिबात मान्य नव्हता. म्हणूनच त्याच महाराष्ट्र टाईम्सचे संपादक म्हणून केतकरांनी लगेच अग्रलेख लिहीला होता. ‘आणि बुद्ध ढसढसा रडला’. त्या अग्रलेखातून केतकरांनी मांडलेली भूमिका वा विचारलेला सवाल आजच्या संपादकांनी वाचला असता, तरी त्यांनी निदान मटामध्ये आज जॉर्ज यांचे गुणगान करण्याचे धाडस केले नसते. केतकर किंवा तत्सम पुरोगामी विचारवंत संपादकांच्या मते त्या अणुस्फ़ोटाची गरज नव्हती. तो करण्यासाठी भारताला कुठूनही धोकाच नसेल तर अण्वस्त्रांची गरज काय होती, असा सवाल विचारलेला होता. त्याचे उत्तर देताना जॉर्ज फ़र्नांडिस यांनी चीनकडे बोट दाखवलेले होते. धोका फ़क्त किंवा केवळ पाकिस्तानपासून नाही. भारताचा खराखुरा शत्री चीन आहे असेच त्यांनी म्हटलेले होते. थोडक्यात कुमार केतकर किंवा मटाच्या संपादकीयाला मुर्खपणाचे विवेचन ठरवण्यासाठीच फ़र्नांडिसांनी उपरोक्त भूमिका मांडली होती. त्याच्या विरोधात असलेल्या प्रत्येकाला म्हणजेच तसा अग्रलेख खरडणार्‍या मटालाही त्यांनी मुर्ख ठरवले होते, मग आज त्यांच्यावर कौतुकाची उधळण करताना मटाने काय म्हणायला हवे होते?

फ़र्नांडिसांचे कौतुक करायला हरकत नव्हती. पण ती भूमिका तेव्हा किंवा अन्य प्रसंगी मान्य नसलेल्यांना जॉर्जनी चुकीचे ठरवले होते आणि त्यांचेच शब्द आज खरे ठरलेले आहेत. त्यासाठी अन्य राज्यकर्त्यांना वा राजकीय पक्षांना नाकर्ते ठरवताना मटाने तितक्याच अगत्याने आपल्या पुर्व संपादकांनाही मुर्ख नाकर्ते ठरवायला हवे होते ना? कारण आजवरचे राज्यकर्ते चीन बाबतीत चुकीचे ठरले असतील, तर त्याला तात्कालीन संपादक अभ्यासकही तितकेच जबाबदार आहेत. सुदैवाने तेव्हाचे फ़र्नांडिस वा आजचे मोदी अशा संपादकांची खर्डेघाशी वाचत नाहीत वा त्याकडे ढुंकूनही बघत नाहीत, हे देशाचे नशीब म्हणायचे. त्या अणुस्फ़ोटाला आव्हान देताना केतकर म्हणालेले होते, ‘थ्रेट पर्सेप्शन काय होती?’ ती बघण्याची दृष्टी नुसती पुस्तके वाचून येत नसते. त्यासाठी प्रत्यक्ष राजकारण वा कारभारात झोकून द्यावे लागत असते. वातानुकुलीत केबिनमध्ये बसून जगाचे चिंतन करता येते. पण निर्णय घेणे वेगळी गोष्ट असते. धोरण आखणे व क्षणाक्षणाला बदलत्या परिस्थितीत त्यात आवश्यक बदल करून अंमल करणे अधिक जिकीरीचे काम असते. ते केतकरांना कधी जमले नाही आणि आजच्या संपादकांना तर केतकरही ठाऊक नसतात. त्यामुळे काही वर्षापुर्वी केतकरांची टिमकी वाजवणारे आज फ़र्नांडिसांचे गुणगान करू लागतात. मुद्दा इतकाच असतो, की परराष्ट्र निती, सीमेवरची रणनिती वा कारभारातील बारकावे, यांचा गंधही नसलेल्यांनी पुस्तके वाचून ताशेरे झाडण्यात अर्थ नसतो. किंवा न्यायदान केल्याप्रमाणे घडण्यापुर्वीच इतिहास लिहायची घाई करायची नसते. पण तितकी अक्कल आली, तर यांना केबिनमधले संपादक म्हणून नेमणार कोण? सिम्युलेटरवर इतरांना प्रशिक्षण देऊन कोणी वैमानिक होऊ शकत नाही. तसाच या गहन विषयातला कारभार असतो. लडाखच्या बाबतीत मागले कित्येक दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी चकार शब्द बोललेले नाहीत. पण चीनी सैन्याला आक्रमकता सोडून चार पावले माघार घ्यावी लागली, ही अस्सल भारतातही वस्तुस्थिती आहे. आयडिया ऑफ़ इंडियातली कुठली परिकथा नाही.

इथे बसून असले वायफ़ळ अग्रलेख लिहीणारे आणि चिनी राजधानी बिजींगमध्ये बसून ग्लोबल टाईम्समधून पोकळ धमक्या देणारे चिनी प्राध्यापक; यात तसूभर फ़रक नाही. त्यांना शब्दांचे बुडबुडे उडवायची खेळणी दिलेली असतात आणि ते त्यातच रममाण झालेले असतात. त्यांना पायाखाली काय जळते आहे, ते कळत नाही किंवा आपल्याच शेजारच्या घरातल्या गोष्टीही ठाऊक नसतात. पण आंतरराष्ट्रीय घडामोडींवर शहाणपणा शिकवण्याची हौस मात्र दांडगी असते. अन्यथा मटाकारांनी राहुल गांधींच्या पंगतीत बसून असा अग्रलेख लिहीला नसता. त्यांना चीनमध्ये वा त्याच्या दक्षिण पुर्वसीमेवर काय धमाल उडालेली आहे, त्याचाही थांगपत्ता लागलेला नाही. अक्साई चीन वा पाकव्याप्त काश्मिरातील घडमोडी शी जिनपिंगला कशाला अस्वस्थ करीत आहेत आणि लडाखमध्ये त्यांना हातपाय कशाला आपटायला लागत आहेत, त्याचा अंदाज तरी आला असता. तेव्हा फ़र्नांडिसांना चीनपासून धोका असल्याचे दिसू शकत होते आणि केतकर बघू शकलेले नव्हते. आज जिनपिंगसह चिनी कम्युनिस्ट पक्षालाच भारतापासून धोका असल्याचे दिसते आहे, पण विद्यमान संपादकांना घायकुतीला आलेला चीन भारतावर स्वारी करायला आलेला चेंगीझखान भासतो आहे. ३७० हटवल्यानंतर अक्साई चीन वादग्रस्त भूमी झाल्याची पोटदुखी चीनला भेडसावते आहे. भारत तिथे आक्रमक पवित्रा घेत असतानाच दक्षिण चिनी समुद्राच्या किनार्‍यावरच्या शेजार्‍यांची जमवाजमव चीनला भयभीत करते आहे. पण ते समजून घ्यायला हवे. असली रणनिती वा परराष्ट्रनिती कोणी पत्रकार परिषद घेऊन समजावत नसतो. ज्याला समजेल त्याला समजेल. इतरांना व प्रामुख्याने संपादकांना असली निती समजून काही उपयोगही नसतो. उलट अशा रणनितीमध्ये खुळ्या संपादकांचा मोहरे प्यादे म्हणूनही परस्पर वापर होत असतो. त्यांनाही त्याचा कधी पत्ता लागत नाही.

12 comments:

  1. मटा चा मोहरा/प्यादा म्हणून वापर होतो आहे आणि हे त्यांना कळेपर्यंत नेहमी प्रमाणे खूप उशीर झालेला असेल.

    ReplyDelete
  2. भाऊ, मटा काय आणि लोकसत्ता काय हे मोदी विद्वेषाची कावीळ झालेले लोक आहेत, त्यामुळे चीन हातपाय का आपटतोय यांना कसे कळणार? भारताच्या सीमा जेथे जेथे चीनजवळ भिडतात किंवा पाकिस्तानशी भिडतात तेथे सैन्याचे दळणवळण सोपे व्हावे यासाठी गेली पाच वर्षे पक्क्या रस्त्यांची बांंधकामे पूरी झालेत, या बांधकामांचा अर्थ न कळण्याइतका चीन मूर्ख नाही. परवा दोन्ही देशांच्या लष्करी अधिकारी लेव्हलवर बैठक झाली त्यात चीनच्या प्रतिनिधींनी हाच आक्षेप घेतला की तुम्ही रस्ते का बांधले आणि भारतीय आधिकाऱ्यांंनी सडेतोडपणे उत्तर दिले असणार म्हणून बोलणी फिसकटली.
    आता हे संपादक यांच्या हाताखाली अनेक पत्रकार, तर यांनी एकादा वार्ताहर पाठवायचा होता विवादित जागेवर आणि माहिती काढायची ना? पण मोदी विद्वेषात हे सगळं विसरलेत हे बरोबर आहे, की यांना लायकीपेक्षा जास्त मोठे पद मिळाले आहे हे बरोबर आहे?

    ReplyDelete
  3. भाऊ
    लेख स्पष्ट आणि डोळ्यात अंजन घालणारा.सामान्य माणसाला मात्र माहित आहे पंप्र मोदींच्या हाती देश सुरक्षित आहे.येणार्या बातम्यांवरून मतितार्थ तो बरोबर घेतो.असल्या अग्रलेखांची कुणी दखल घेत नाही.

    ReplyDelete
  4. भाऊ,
    फार छान! हलकट लोकांना त्यांची लायकी दाखवावी ती तुम्हीच. काँग्रेसेतर सरकार ला उत्तरदायित्वाचा निर्देश आणि त्याविषयी दिग्दर्शन करणारे अतिशहाणे इतके निर्बुद्ध आणि नीच असतात की त्यांना एक गोष्ट दिसत नाही पेक्षा बघायची नसते ती ही की काँग्रेसेतर सरकार ने ज्या नाकर्त्या देशद्रोह्यां कडून सत्ता सूत्र घेतली आहेत त्यांनी आधी किती दुर्धर विषवल्ली पेरून जोपासून ठेवली आहे. त्या विषवल्ली ला आलेली फळे जेव्हा सर्व देश भोगत आहे तेव्हा त्या विषयी प्रश्न उपस्थित करणे आणि ज्यांनी ती विषवल्ली पेरलेली जोपासलेली नाही त्यांच्याच माथी त्याचे उत्तरदायित्व मारणे हे या हलकटांचे काम आहे. हेच काँग्रेस चे राष्ट्रद्रोही धोरण आहे. त्यांचे हे श्वान मालकाचे खाऊन इतर सर्वांवर यथेच्छ भुंकतात, गुरकवून अंगावर धावून जातात. भारता समोर इतक्या क्लिष्ट भयानक समस्या सर्व स्तरांवर निर्माण कोणी केल्या हे विचारायचे नीति धैर्य तर नाहीच पण कसलीच सृजनशक्ती नाही. त्यामुळे भ्रष्ट आचार न करतील तर उपाशी मरतील ना. कारण एरव्ही यांच्यात काय गुणवत्ता आहे? खरोखर उत्तम काहीतरी जगाला देऊन त्या प्रित्यर्थ जगाने कृतज्ञता पूर्वक क्षेम सांभाळणे हे सर्व किती अवघड आहे. त्यापेक्षा भ्रष्टांची चाकरी करत जनतेची दिशाभूल करत धन मिळवायचे आणि मौज मजा करायची, आरामात राहायचे हे बरे.

    भाऊ आज हा विषय काढलात ते फार बरे झाले. अश्या देशद्रोही पत्रकारिते चे एक व्यवच्छेदक लक्षण थोडे दुर्लक्षित राहते. तुम्ही अनेक वेळा त्याचा उच्चार केला आहे. ते लक्षण म्हणजे अश्या लोकांची लेखन शैली. अनेक वेळा विकाऊ पत्रकारितेचे वर्णन करताना तुम्ही एक गोष्ट सांगता जी फार महत्त्वाची वाटते. ती गोष्ट अशी की विकाऊ देशद्रोही पत्रकार जेव्हा लिहितात तेव्हा कटाक्षाने एक गोष्ट पाळतात. त्यांना कदाचित त्याचे प्रशिक्षण कुठल्यातरी पाताळयंत्री शिक्षण संस्थेत मिळत असावे आणि मग ते देशद्रोही कार्यास लागत असावेत. त्या प्रशिक्षणात प्रत्येक विकाऊ पत्रकाराला लिहिण्याची एक पद्धत शिकविली जात असावी. ती पद्धत अशी की लेख वाचल्यावर नेमका अर्थबोधच वाचकाला होवू नये. म्हणजे ज्या विषयावर लेख असेल त्या विषयी कसलेही आकलन वाचकाला होवूच नये अश्याच पद्धतीने लेख लिहिला जातो. कारण अश्या पत्रकार संपादकांच्या पक्षी सत्य सांगणे म्हणजेच स्वतःचे आणि स्वतःच्या मालकांचे गुन्हे प्रकाशित करणे! पण वार्ता पत्र तर चालवायचे आहे, वार्तांकन तर करायचे आहे. मग ते असेच करणे क्रमप्राप्त होते की ज्यामुळे कसलेही अर्थपूर्ण क्रांतिकारक उद्बोधन घडूच नये. अत्यंत क्लिष्ट बुद्धिभेद करणारी भाषा शैली हे अश्या पत्रकारितेचे व्यवच्छेदक लक्षण आपोआपच होते. सत्य स्वच्छ सरळ भाषेत मांडले तर निर्भीड निष्पक्ष परखड होण्याचा धोका संभवतो ना.

    - पुष्कराज पोफळीकर



    ReplyDelete
  5. Agralekh lihinare he sampadak vara vahil tashi path detat.
    He sagle gharachya mhatariche kaal ahet. Yanchi nishtha kiwa vichatsarni hi vikleli aste ani vikau akkal ani nishtha hi ekhadya bajarbasvi sarkhi ahe.
    Punha ekch sangave batate...
    Yana ek varah rojdarichya kamawar kiwa shetar rojdar mhanun kamala thevave. Mag Yana desh kaahta ani khara hindustan kalel

    ReplyDelete
  6. भारताला खरा आणि मोठा धोका चीनपासुन आहे, ही वस्तुस्थिती आहे. फक्त जॉर्जच नव्हे तर मुलायम सिंह यादव यांनी देखील संरक्षण मंत्री असतांना असे म्हटले होते. परंतू दुर्दैवाने भारतात डाव्या विचारसरणीला आणि नेहरूंच्या कॉंग्रेस विचारसरणीला तसे वाटत नाही. याचा अनुभव 1962 मधे भारताला आलाय. त्या अनुभवापासून धडा घेउन, 135 कोटी भारतीयांनी आज परीस्थितीला एकमताने तयार राहण्याची गरज आहे.

    ReplyDelete
  7. भाऊ फारच जहाल कोरडे ओढता तुम्ही. असले खुळचट संपादक वारंवार तोंडघशी पडतात आणी मग पुढचे अग्रलेख आधिच्या लेखाच्या उलटे लिहायची वेळ येते. पण त्यासाठी लाज सोडावी लागते यांना.

    ReplyDelete
  8. सगळे पत्रकार आणि हे मीडिया चॅनेल विकले गेले आहेत. आजच झी 24 तास वर रामराजे शिंदे यांनी एक ब्लॉग लिहिला होता यात शिवसेने चा चूक दाखवल्या होत्या आणि राष्ट्रवादी कसा फायदा घेते हे लिहिलं होतं तसंच फडणवीसांची स्तुती केली होती. पुढच्या 5 तासात तो ब्लॉग काढायला लावला गेला. आणि हे म्हणे मोदी आणि भाजप माध्यमाची गळचेपी करतायत.. धन्य आहे...तो फावड्या चा मुलगा महा मोरचुद आहे

    ReplyDelete
  9. योग्य विश्लेषण । अशी भंपक संपादकीय खरडणाऱ्या खर्डेघाशांची तुम्ही चांगलीच खरडपट्टी केलीत ।

    ReplyDelete
  10. Perfect Analysis

    ReplyDelete
  11. मयुर कांबळेJune 20, 2020 at 7:11 AM

    "सिम्युलेटरवर इतरांना प्रशिक्षण देऊन कोणी वैमानिक होऊ शकत नाही"

    भाऊ, तुम्ही कायम चकित करत असतात आम्हाला. तुम्ही राजकीय अभ्यासक तर आहातच, पण नवनवीन टेक्नोलॉजी चे हि तुम्ही गाढे अभ्यासक आहात. भाऊ मनापासून नमस्कार तुम्हाला.

    ReplyDelete