Friday, November 24, 2017

अहमद पटेलांचे काय?

rahul ahmed patel के लिए चित्र परिणाम

आता राहुल गांधी कॉग्रेसचे भावी अध्यक्ष होणार याविषयी कोणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. कारण निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीमध्ये पक्षाला अंतर्गत निवडणूका घेऊन नव्या पदाधिकार्‍यांची यादी सादर करावी लागणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रकही जाहिर झालेले आहे. त्यात एकच अर्ज येईल आणि दुसरा कोणी स्पर्धक नसल्याने राहुल ह्यांची निवड झाल्याची घोषणा विनाविलंब होऊन जाईल. त्यात नाविन्य राहिलेले नाही. पण राजधानीतील राजकीय अभ्यासकांना् राहुलच्या निवडीपेक्षा त्यांची टिम कशी असेल आणि त्यात आज श्रेष्ठी म्हणून मिरवणार्‍यांचे काय स्थान असेल, याची विवंचना लागलेली आहे. मागल्या १५-१६ वर्षापासून सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्ष राहिलेल्या असून, त्यातला बहुतांश काळ अहमद पटेल हे त्यांचे राजकीय सल्लागार म्हणून सर्वात वजनदार कॉग्रेस नेता मानले गेलेले आहेत. नव्या अध्यक्षाच्या कारकिर्दीत त्यांचे स्थान कोणते असणार? असे तिथल्या राजकीय निरिक्षकांना वाटणेही स्वाभाविक आहे. कारण मागली दोनतीन वर्षे सतत राहुलच्या राज्याभिषेकाची बातमी चालूच होती. पण कुठेतरी माशी शिंकत होती आणि ते पुढे ढकलले जात होते. त्यांनी एकतरी विधानसभा जिंकून दाखवावी, मगच अध्यक्ष होणे योग्य ठरेल, असा त्यामागचा युक्तीवाद होता. शिवाय तसे झाल्या सर्व बुजूर्गांची गठडी वळली जाण्याचीही भिती होती. म्हणूनच हे जुनेजाणते राहुलला आडवे येत असल्याचीही राजधानीतली नेहमीची चर्चा होती. त्यातही प्रमुख्याने अहमद पटेल हे झारीतले शुक्राचार्य असल्याचे दबल्या आवाजात सांगितले जायचे. म्हणून आता सर्वोच्चस्थानी बदल होणार असेल, तर अहमदभाईंचे भवितव्य काय असा सवाल आहे. कारण राहुलशी त्यांचे अजिबात जमत नसल्याचेही सांगतात. आताही राहुल यांनी गुजरातची मोहिम जोरात चालविली असली, तरी पटेलांना चार हात दूर ठेवलेले आहे.

गेल्या जुलै महिन्यात राज्यसभेच्या निवडणूकीतही राहुल गुजरातला फ़िरकलेले नव्हते आणि अहमदभाईंनी एकहाती आपल्या रणनितीने पुन्हा जागा जिंकून दाखवलेली होती. त्यासाठी त्यांचे अभिनंदन करताना राहुल यांनी आता गुजरात विधानसभा जिंकण्याच्या तयारीला लागा; असे जाहिरपणे म्हटलेले होते. मात्र दोन महिन्यापुर्वी खुद्द राहुल अमेरिकेहून परतले आणि त्यांनी गुजरातेत मुलूखगिरी सुरू केली, त्यात कुठे अहमदभाई दिसलेले नाहीत. हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर वा जिग्नेश मेवानी अशा तरूणांना कॉग्रेसच्या मदतीला आणण्यापासून विविध सभांमध्ये मोदींवर हल्ला चढवताना राहुलनी कुठेही पटेलांना सोबत ठेवलेले नाही. ते मुस्लिम असल्यामुळे व सध्या हिंदू मतांवर मदार ठेवून राहुल कार्यरत असल्याने जाणिवपुर्वक अहमदभाई लांब राहिलेले आहेत? की जाणिवपुर्वक राहुलनीच त्यांना दूर ठेवलेले आहे? प्रामुख्याने गुजरातच्या प्रचार व मोहिमेत अहमदभाई दिसत नाहीत, ही दिल्लीतल्या जाणत्या अभ्यासकांसाठी चिंता झालेली आहे. त्याचीही दोन कारणे संभवतात. खरोखरच राहुल गांधींना अहमदभाई जवळपास नको असतील, तर त्यांचा कॉग्रेसी राजकारणातला बाजार उठला असे मानावे लागेल. ते इतक्या सहजासहजी तो पराभव मान्य करतील काय? हा जसा प्रश्न आहे, तसाच वेळ आलेली असेल तर अहमदभाई राहुलना यशस्वी होऊ देतील काय, हा आणखी एक गंभीर प्रश्न आहे. कारण राहुलच्या गुजरात यशाने अहमदभाई संपणार असतील, तर राहुलचे अपयश त्यांच्यासाठी बुडत्याला काडीचा आधार ठरू शकते. म्हणजे मुरब्बी अहमदभाई नामानिराळे राहुन पक्षाचे नुकसान होण्याला हातभार लावतील आणि आपल्याशिवाय गुजरात काय कुठेही कॉग्रेसची रणनिती यशस्वी होऊ शकत नाही, असे डाव खेळतील. त्यात अर्थात भाजपाला फ़ायदा असल्याने घातपाताला भाजपाचे नेतेही हातभार लावू शकतील.

दिल्लीतल्या ज्येष्ठ राजकीय निरिक्षकांना म्हणूनच कॉग्रेसमधील येऊ घातलेल्या बदलाची चिंता सतावते आहे. एक तर अशा बहुतांश लोकांशी सोनियांचा थेट कुठलाही संबंध नाही आणि त्यांना कॉग्रेस पक्षातील हालचाली अहमदभाईंच्याच गोटातून मिळत असतात. तेच जागेवर राहिले नाहीत, तर पत्रकारी जगातही अनेकांची पदावनती होण्याचा धोका आहे. कारण नव्या अध्यक्षांच्या सल्लागारपदी जो कोणी येईल, त्याच्याकडून माहिती मिळवू शकेल त्यालाच वजन येऊ शकेल. ही सगळी गुंतागुंत लक्षात घेतली, तर कॉग्रेस अध्यक्षीय निवडणूक ही केवळ त्या पक्षाची अंतर्गत बाब रहात नाही. त्यातले अनेकांचे आतले बाहेरचे हितसंबंध लक्षात घ्यावे लागतात. त्यात पक्षाच्या नेतॄत्वाचा प्रश्न गंभीर नसून, गुजरातचे निकाल व त्यातल्या घडामोडी महत्वाच्या होऊन जातात. ज्याप्रकारे हार्दिक पटेलच्या आरक्षणाचा विषय लोंबकळत ठेवून चुथडा करण्यात आला, त्यातून तशी शंका घेण्यास वाव आहे. राहुल कुठल्याच गोष्टी मुरब्बीपणे व निर्णायक रितीने पुढे घेऊन जाऊ शकत नाही, हे सिद्ध करण्यासाठी त्या वाटाघाटी व बोलणी फ़िसकटून टाकण्यात आली काय? राहुलप्रणीत उमेदवारांची यादी जाहिर होताच कॉग्रेसच्या गुजरातमधील अनेक कार्यालयांवर हिंसक हल्ले व हाणामार्‍या झाल्या. त्या उत्स्फ़ुर्त होत्या, की जाणिवपुर्वक घडवून आणल्या गेल्या होत्या? असे अनेक प्रश्न सध्या कॉग्रेसी पत्रकारांना सतावत आहेत. कारण ही घडामोड वेगात आलेल्या कॉग्रेस प्रचार मोहिमे्ला अपशकून करणारी ठरली आहे. त्यामागे कोणीतरी नक्की आहे. अन्यथा जुळवून आणलेला खेळ उधळला गेला नसता. अखेरीस त्यात तडजोड झाली आहे. पण लोकांसमोर अब्रु जायची ती गेलीच. काही कारण नसताना झालेला हा प्रकार शंका निर्माण करणारा आहे आणि त्यापासून अलिप्त असलेल्या अहमद पटेल यांचे वागणे शंकास्पद होऊ लागले आहे.

तसे दिसायला पटेल गुजरातच्या प्रचारसभा वा इतरवेळी व्यासपीठावर दिसतात आणि नजरेतही भरतात. पण त्यापेक्षा कुठल्या निर्णय प्रक्रीयेत त्यांना सहभागी करून घेतलेले दिसत नाही. पण खरेच त्यांचा गाशा गुंडाळला जाणार असेल तर निष्ठावान कॉग्रेसजनाच्या शिस्तीला जागून पटेल माघार घेतील काय? जो माणूस अमित शहांनी आमदार फ़ोडल्याचे दिसताच उरलेले आमदार दोन आठवडे कर्नाटकात लपवून आपल्या मतांची बेगमी करतो, तो इतक्या सहजपणे कॉग्रेसमधील आपले महत्व निकालात निघताना गप्प बसणे शक्य वाटत नाही. अर्थात तो एकटाच निर्वासित होण्याची शक्यता नसून, इतरही डझनभर जुन्याजाणत्या नेत्यांची एक्सपायरी डेट जवळ आलेली आहे. त्यामुळे त्यांनाही पटेल यांच्यासारखीच धाकधुक असली तर नवल नाही. अशा सर्वांची मोट बांधून अहमदभाई आपले गेम अजून खेळू शकतात. अध्यक्ष नवा यायला हरकत नाही. पण जुन्यांचे स्थान व महात्म्य कायम रहावे, यासाठी नव्या अध्यक्षाला पांगळा ठेवणे त्यांनाही भाग असेल. गांधी घराण्याबाहेरचा कोणीही अध्यक्ष वा नेता होऊ शकत नाही, हे सत्य आहे. पण आजवरचे मक्तेदार आहेत, त्यांनाही आपल्याशिवाय कोणी कॉग्रेस चालवू शकत नाही, अशी खात्री आहेच ना? मग पक्षाच्या व पर्यायाने देशाच्या भल्यासाठी त्यांची सेवा कॉग्रेसमध्ये कायम राखणे भाग नाही काय? त्यासाठी मग पक्षाला एका राज्यात पुन्हा पराभवाच्या दरीत ढकलून देण्याची वेळ आली तर बिघडले कुठे? म्हणूनच राहुल यांच्यासमोर दुहेरी आव्हान आहे. अध्यक्ष म्हणून त्यांना नुसता गुजरात जिंकायचा नाही वा नरेंद्र मोदींचा पराभव करायचा नाही. स्वपक्षातील अशा झारीतल्या शुक्राचार्यांनाही कुशलतेने हाताळावे लागणार आहे. ते शक्य झाले तरच पक्षाचे नेतृत्व यशस्वीपणे करायला राहुल सज्ज झाले असे ठामपणे म्हणता येईल. कारण त्यांना हार्दिक व अहमद असे दोन्ही पटेल गुंडाळायचे आहेत.

4 comments:

  1. भाऊ तुम्ही एक अॅंड्रॉईड अॅप सुरु करा

    ReplyDelete
  2. भाऊ राहुल गांधी या बाबत एक मोठे गूढ आहे (तसे नेहरु गांधी घराण्याचे पण गुढच आहे कोण कोण म्हणतांत की नेहरु मुसलमान होते पण मिडियावाले ( पेपर टिव्ही) कधीही या बाबत खरे सांगत नाहीत बर तुमच्या सारख्यांकडून खरे समजु शकेल. संजय गांधी, इंदिरा, राजीव यांचे गुढ मृत्यु झाले व सोनिया गांधीचा सत्तेवर बसण्याचा रस्ता साफ झाला) युपीए सरकार सत्ताधारी असताना राहुल गांधीना पंतप्रधान पदी बसवता आले असते तसेच पक्षाचे अध्यक्ष पण करता आले असते पण हे काहीच झाले नाही हे एक गुढ आहे तसेच पंतप्रधान असताना राहुल गांधीचे लग्न करुन हुशार अष्टआवधानी पत्नी /सुन घरात आणुन तरी थोडी फार गांधी घराण्याची लाज राखता आली असती. हे सामान्य माणसाच्या बाबतीत घडु शकते. परंतु सुमार बुद्धी अती सामान्य असुन सुद्धा गांधी च्या या पिढीला काय झाले आहे हे लक्षात येणं सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरचे आहे.
    परंतु 1980 पासुन या सर्व घटना क्रमातील गुढ काही बाहेर येत नाही येणार नाही.
    राहुलला असमंजस ठरवुन असमर्थ असा शिक्का मारून प्रियांका वाडरा यांना पुढे आणुन गांधी घराणे निर्वंश करुन वाडरा पुढे आणण्याचा लाँग टर्म दुरगामी प्लॅन यात आहे का हे येणारी काही दशके स्पष्ट करतील..
    कारण 1980 मध्ये सोनिया गांधी या देशाच्या सर्वेसर्वा होतील असे भाकित दोन मुलगे व एक देशी व एक विदेशी सुन (व वरुण गांधी असताना राहुल ) असलेल्या राजेशाही घराण्यात होवु शकते असे कोणत्याही द्रेष्ट्रया विचारवंतला वाटलेले नव्हते. तसेच आजही वरिल गोष्ट वाटत नाही.
    हे सर्व घटना क्रम गुंता गुंतीचे आहेत व रहातील कारण देशाचे राजकारण या घराण्या भोवती फिरत राहणार हि मानसिकता देशाच्या जनतेत आहे. ( हे देशी आणि खास करुन विदेशी ताकती जाणुन आहेत व त्याप्रमाणे सुकाणु कोणी फिरवतो आहे हे देव जाणे.
    कोणाला तरी भार सोपऊन आपण नामा निराळे (स्वामीत्व मिळवायचे) राहुन ऐश / वानप्रस्थाश्रमी मजेत रहायचे / दुसर्या कडुन अपेक्षा करायच्या/ ऊंटा वरुन शेळ्या हाकायच्या ( कारण जनता पण करणार्यांना दोष देण्यात एकदम एक्सपर्ट आहे मग पडला की कुसित टाळ्या वाजवायच्या) यात धन्यता मानणारी आहे. हे पिढ्यांपिढ्या चालू आहे राहिल. कोणतरी शतकांतुन एखादा देशात जन्म घेइल व परत काही प्रमाणात सुरळीत करेल परत येत रे माझ्या मागल्या हे होत रहाणार.
    यामुळे राहुल गांधीचे काय होते हे गुढ आहे.
    भाऊ नेहरू घराण्याची व्हायरल टेस्ट करावी व खरे काय आहे की काही गैरसमज(हे जसे मुसलमान आहेत) हे जनतेला समजावे . ही विनंती.
    एकेएस

    ReplyDelete
    Replies
    1. पद्मावती सिनेमावर आक्षेप घेण्यापेक्षा नेहरु आणि नेहरु घराण्यावर वास्तववादी चित्रपट काढावा आणि मग पुरोगामी जमात काय करते ते पहावे लागेल.

      Delete
  3. Are Tya gharanyane deshasathi kahitari kele aahe 70 varshat are tumcha kay kahi tar kara mag kalel sarvana gandhi nehru ka aani kon kahi karayche nahi aani bin budhche bolayche 70 varsha janta kay zopli hoti ka vichar kara

    ReplyDelete