Thursday, September 26, 2013

मोदी यांची विश्वासार्हता

   थापा मारणार्‍याची शान त्यातला खोटेपणा उघडा पडणार नाही तोपर्यंतच असते. म्हणजेच आपल्या विश्वासार्हतेच्या आधारावरच थापेबाजी शक्य असते. त्यामुळेच थापा मारणार्‍याने आपण सगळीकडे खोटे पडणार नाही, याची काळजी घ्यायची असते. पण थापाड्या असतो, त्याच्या थापा पचनी पडू लागल्या, की त्याला मोह आवरता येत नाही. अधिकाधिक थापा मारायच्या मोहात तो फ़सत जातो. किंबहूना मग असा माणूस कारण वा लाभ नसतानाही थापा मारून उघडा पडत जातो. मोदींच्या विरोधकांची अवस्था काहीशी तशीच होत चालली आहे, म्हटल्यास वावगे ठरू नये. गेल्या दहा वर्षात मोदींच्या विरोधात असलेल्या लोकांनी व प्रामुख्याने सेक्युलर लोकांनी, मोदींच्या विरोधात इतक्या वावड्या, थापा व खोट्या गोष्टी सांगुन झाल्या आहेत, की आता त्यांची एकूण विश्वासार्हताच पुरती रसातळाला गेली आहे. सहाजिकच त्यांना साध्या थापा मारण्याचीही सोय राहिलेली नाही. त्यामुळे ते अतिशयोक्तीच नव्हे, तर कल्पनाविलासाच्याही पलिकडे जाऊन पोहोचले आहेत. त्यात अर्थातच कॉग्रेस नेते व दिग्विजय सिंग आघाडीवर असतात. म्हणूनच मग परवा भोपाळ येथे होणार्‍या भाजपाच्या मेळाव्यात मुस्लिम महिलांची गर्दी दाखवण्यासाठी दहा हजार बुरखे व मुस्लिम टोप्या खरेदी करण्यात आल्याची लोणकढी थाप दिग्विजय सिंग यांनी ठोकली. ती खरी असल्याचे भासवण्यासाठी त्यांनी चक्क एका बुरखा विक्रेत्याच्या दुकानाचे बिलच पत्रकारांना सादर केले. पण विषय तिथे संपला नाही. दिग्विजय बोलले तर ते छापताना किंवा प्रक्षेपित करताना आपली अब्रु जाऊ नये; इतकी काळजी आता पत्रकारही घेऊ लागलेत. त्यातूनच मग दिग्विजय सिंग यांचा बुरखा फ़ाटला. त्यांच्यावर तोंडघशी पडायची वेळ आली.

   एका वाहिनीच्या पत्रकाराने त्या बिलाचा शोध घेत बुरखा विक्रेत्यापर्यंत जाण्याचे कष्ट घेतले. तो विक्रेता बिचारा राजकीय नेता नाही, की सेक्युलर विचारवंत नाही. त्यामुळेच त्याला आपल्या अब्रुची व विश्वासार्हतेची चिंता होती. म्हणूनच त्याने सत्य काय ते बेधडक कॅमेरा समोर सांगून टाकले. दिग्विजय सिंग यांनी पत्रकारांना बुरखा खरेदीचे बिल म्हणून जे कागदपत्र दाखवले, ते मुळात खरेदीचे बिल नसून आदल्याच दिवशी त्या विक्रेत्याकडून कोणी तरी कोटेशन म्हणून इतक्या बुरख्यांसाठी लागणार्‍या किंमतीचे मागितलेले दरपत्रक होते. ते देताना त्याने कार्बनकॉपी काढून ठेवली होती. म्हणूनच सत्य उजेडात आले. खोटे बिल बनवून मोदी वा भाजपा विरोधातला पुरावा म्हणून दिग्विजय जे माध्यमांच्या गळ्यात बांधत होते; ती चक्क हेराफ़ेरी होती. अपप्रचारासाठी कॉग्रेसनेते इतक्या थराला गेलेले असतील; तर मग खोटे आरोप करून खटले भरण्यासाठी असे राजकारणी काय काय करू शकतात, त्याचा आपण नुसता अंदाज केलेला बरा. योगायोग असा, की त्या बुरखा विक्रेत्याने दिग्विजयचा बुरखा फ़ाडला; त्याचवेळी अजमेर स्फ़ोटातील एक संशयित आरोपी भावेश पटेल यानेही आपल्यावर दबाव आणून संघ व भाजपाच्या नेत्यांना घातपातामध्ये गुंतवण्याचा कबुलीजबाब लिहून घेण्यात आल्याचा दावा केलेला आहे. त्यात पुन्हा केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्यासह दिगविजय सिंग यांचेही नाव आलेले आहे. अर्थात सिंग-शिंदे यांनी त्या आरोपाचा इन्कार केलेला आहे. पण जी माणसे बुरख्याचा खोटा आरोप करतात व त्यासाठी अशी खोटी बिले बनवून घेतात; त्यांची विश्वासार्हता किती मानायची? गेली पाच वर्षे मालेगाव व अजमेरच्या स्फ़ोटाचे नुसते आरोप चालू आहेत, पण खटले चालविले जात नाहीत, हा कशाचा पुरावा आहे?

   एकूण परिस्थिती आज अशी आलेली आहे, की गेल्या दहा वर्षात मोदीना आरोपी व खोटारडा पाडण्याच्या नादात भरकटलेल्या लोकांनी आपलीच विश्वासार्हता पुरती गमावली आहे. त्यांच्या खोटेपणामुळे मोदींची विश्वासार्हता मात्र दिवसेदिवस वाढत गेली आहे. म्हणुनच आता मोदींनी आपले विरोधक व टिकाकारांच्या विरोधात कुठलेही विधान केले, तरी लोकांना खरे वाटू लागले आहे. ते खरे असण्याची गरज उरलेली नाही. कारण मोदी काहीही बोलले वा त्यांनी काहीही केले; तर तात्काळ त्यांच्यावर खोटेपणाचा एक ठाशीव आरोप सुरू होतो. त्या आरोपातूनच लोकांना मोदी खरे असल्याची खात्री पटत असते. मोदी काय बोलले, याला महत्व उरलेले नाही. विरोधकांनी मोदींना खोटे म्हणायचा अवकाश, लोक तेच सत्य मानू लागले आहेत. सहाजिकच मोदींना आपले घोडे पुढे दामटताना खरे व वस्तुस्थितीपुर्ण बोलण्याची अजिबात गरज राहिलेली नाही. त्यापेक्षा लोकांना आवडणारे बेधडक ठोकून द्यायची सवलत मिळालेली आहे. ही मोदी विरोधकांची कृपाच म्हणायला हवी. त्या दिवशी मोदी यांनी देशाच्या विकास दराचा मुद्दा उपस्थित केल्यावर अर्थमंत्री तो खोटा पाडायला पुढे सरसावले. पण त्यात पुन्हा मोदी खोटे पडण्य़ापेक्षा चिदंबरम यांचीच गोची झाली. कारण मोदी खरे व संपुर्ण सत्य बोलले नव्हते. आपल्या सोयीचे तेवढेच सत्य बोलले होते. ते खोडताना चिदंबरमही सोयीचे सत्य सांगत होते. पण चिदंबरम वा त्यांच्या पक्षाची विश्वासार्हता रसातळाला गेल्यामुळे लोकांना मोदींचे सत्यकथन भावले. ही मोदींना लाभलेली विश्वासार्हता म्हणूनच दिग्विजय किंवा तत्सम उतावळ्या मुर्खांनी मोदींना बहाल केलेले मोठेच शस्त्र आहे, ज्याच्या बळावर आज मोदी आपल्या विरोधकांवर मात करत चालले आहेत.

No comments:

Post a Comment