Sunday, July 13, 2014

दुसरा डाव आधी का खेळत नाही?

    फ़िफ़ा फ़ुटबॉलच्या अंतिम सामान्याने भारताच्या इंग्लंड दौर्‍याला झाकोळून टाकले आहे. अन्यथा एव्हाना तिथे चाललेल्या कसोटी सामन्याच्या किती ब्रेकिंग न्युज झाल्या असत्या, सांगता येत नाही. पण पहिल्या डावात खेळताना भारताची फ़लंदाजी शेवटच्या जोडीने गाजवल्याची एक बातमी बघायला मिळाली होती. त्यावरून जुना काळ आठवला. तेव्हा बेदी, प्रसन्ना, वेंकटराघवन, चंद्रशेखर असे गोलंदाज आणि पतौडी, विश्वनाथ, ब्रिजेश पटेल यासारखे अपवादात्मक फ़लंदाज सोडले, तर बाकीचा भारतीय कसोटी संघ मुंबईच्याच खेळाडूंनी भरलेला असायचा. त्या काळात फ़लंदाजी अशीच अकस्मात ढासळून पडायची आणि मग प्रतिस्पर्धी संघाच्या धावांचा डोंगर डोक्यावर घेऊन दुसरा डाव सुरू व्हायचा. त्यात मात्र हीच कमकुवत भारतीय फ़लंदाजी पराक्रमाची शर्थ करायची. पहिल्या डावात बहुधा सव्वाशे दिडशे धावात गुंडाळला गेलेला भारतीय संघ, दुसर्‍या डावात तब्बल चारशे पाचशेच्या पुढे मजल मारून दाखवायचा. आणि असे एकदा दोनदा व्हायचे नाही, अनेकदा व्हायचे. पण तेव्हा टिव्हीचे इतके चॅनेल नव्हते, की खेळाला माध्यमांच्या, वृत्तपत्रांच्या बातमीत इतके महत्व नसायचे. अशा काळात ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या शेवटच्या पानावर वि. वि. करमरकर क्रीडा पत्रकारितेची पावनखिंड लढवणारा जणू एकमेव बाजीप्रभू होता. त्यांनीच मराठीत खेळाच्या बातमीदारीला प्रतिष्ठा मिळवून दिली म्हटल्यास वावगे ठरू नये. तर अशी भारताची फ़लंदाजी पहिल्या डावात ढासळून जायची आणि दुसर्‍या डावात सावरायची, तेव्हा एकूणच क्रिकेटप्रेमींमध्ये उदासिनता भरून यायची. त्याचेही प्रतिबिंब करमरकरांच्या पत्रकारितेत पडलेले आठवते. एकदा अशाच एका सामन्याचे समालोचन करतांना त्यांनी लिहीलेले एक वाक्य कायमचे लक्षात राहुन गेले आहे.

   ‘हा भारतीय कसोटी संघ सामन्याचा दुसरा डाव प्रथम का खेळत नाही?’

   त्याचा अर्थ असा, की दुसर्‍या डावात जी जिगर दाखवली जाते व धावा केल्या जातात, तशाच पहिल्या डावात का होत नाहीत? म्हणजे धावा करण्याची क्षमता भारतीय फ़लंदाजात आहे. पण सामन्याच्या पहिल्या डावात ती कुठे हरवून जाते? पण व्हायचे तसेच आणि अनेकदा खेळात असेच होत असते. खेळ वा सामन्यातील अनिश्चितताच त्यातले खरे आकर्षण असते. ज्या क्रमाने गोष्टी घडायच्या असतात, त्याच क्रमाने घडत असतात. दुसरा डाव जसा पहिल्यांदा खेळता येत नाही, तशाच प्रत्यक्ष जीवनातील अनेक गोष्टी वा घटना आधीच घडवून ठेवता येत नाहीत. एकूण घटनाक्रमाचा तो भाग असतो. पुढल्या काळात मर्यादित षटकांचे क्रिकेट आले आणि अलिकडल्या काळात तर अत्यंत वेगवान २०-२० षटकांचे सामने आलेत. त्यात तर पहिल्या षटक नव्हेतर चेंडूपासूनच फ़टकेबाजी सुरू होते. प्रत्येक षटकाचे आधीपासून नियोजन केल्यासारखे खेळले जाते आणि प्रसंगी धावांच्या नादात विकेटही फ़ेकली जाते. फ़लंदाजांच्या मनातही धावगतीचे गणित चालू असते. सहाजिकच त्यात धावगती राखायची म्हणून शेवटच्या पाच षटकाचा खेळ पहिल्या पाच षटकात खेळता येत नाही. नेमके तसेच खरे आयुष्यही असते. त्यात दोन चार वर्षानंतरच्या गोष्टी आता उरकता येत नसतात. त्यासाठी तितकी वर्षे थांबायलाच हवे. पण त्याचे भान अनेक जाणत्यांनाही नसते. असते तर अवघ्या दोन महिन्यात नवे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमुकतमूक कसे अजून केले नाही, असले सवाल विचारून चर्चा कशाला सुरू झाल्या असत्या? पन्नास षटकांच्या डावात आरंभीच्या षटकात पंचेचाळीस शेहेचाळीसव्या षटकातील फ़टक्यांची अपेक्षा करता येईल काय?

   दोन महिने सरकारला सुत्रे हाती घेऊन झालीत. अशावेळी आधीच्याच (सरकारी) निर्णयांचे परिणाम समोर येत असतात. त्याला विद्यमान सरकारचा कारभार जबाबदार नसतो. पण तरीही शहाणे लोक मोदी सरकारला जाब विचारू लागतात, तेव्हा मजा वाटते आणि त्या काळात करमरकर यांनी लिहीलेले वाक्य आठवते, ‘हा भारतीय कसोटी संघ सामन्याचा दुसरा डाव प्रथम का खेळत नाही?’ थोडक्यात मोदी सरकार २०१७ सालचे निर्णय व परिणाम आताच कशाला दाखवत नाही, एवढेच विचारायचे आता बाकी राहिले आहे. अजून पावसाळा सुरू होतोय. त्याला विलंब झालाय. त्यामुळे दुष्काळाची छाया दिसू लागली आहे. पण दुष्काळ पडलेला नाही. तरीही मोदींनी आपल्या मंत्र्यांच्या बैठका घेऊन संभाव्य दुष्काळाला तोंड देण्याची सज्जता आरंभली आहे. पण एकूण चर्चा बघितल्यास दुष्काळ पडलाच आहे आणि त्याच्या निवारणाबाबत सरकार ठप्प असल्याचाच सुर लागलेला दिसतो, तेव्हा गंमत वाटते. दोन वर्षापुर्वी अनेक राज्यात दुष्काळ पडून शेतकरी देशोधडीला लागल्यानंतर व आत्महत्येचा कहर झाल्यावर सरकारला जाग आलेली होती. त्या घटनाक्रमाच्या तुलनेत मोदी सरकारने चालविलेली सज्जता स्पृहणिय नाही काय? पण चर्चा काय चाललीय? दोन महिने झाले नाहीत, तर काळापैसा मायदेशी आणायचे काय झाले? अच्छे दिन कधी येणार? थोडक्यात एकूण प्रश्न व चर्चेचा सूर असा, की पहिल्या पाच षटकात सामना जिंकलेला का नाही? ख्रिस गेलसारखा फ़लंदाज पहिल्याच चेंडूपासून फ़टके मारायला आरंभ करतो. पण किती डावात त्याची ही रणनिती यशस्वी होते? चार पाच डावात लगेच गेल बादही होऊन जातो. त्यानंतर एका डावात धमाल उडवून देतो. तशीच मोदींकडून अपेक्षा दिसते. अर्थात ज्यांनी मोदींना मते दिलीत, त्यांना अशा कुठल्याही अपेक्षा नाहीत. म्हणूनच जनतेत कुठूनही नाराजीचा सूर उमटताना दिसत नाही. पण ज्यांनी मोदींना अपशकूनच करण्यात आजवर धन्यता मानली, ते मात्र अगत्याने ‘मोठ्या अपेक्षा’ असल्याची जपमाळ सातत्याने ओढत असतात. त्यांच्या अशा अपेक्षा बघितल्या, ऐकल्या वा वाचनात आल्या, मग मला चार दशकांपुर्वी करमरकरांनी उपहासाने लिहीलेले ते वाक्य आठवते,

‘हा भारतीय कसोटी संघ सामन्याचा दुसरा डाव प्रथम का खेळत नाही?’ मोदी २०१९चे परिणाम आजच का दाखवत नाहीत?

No comments:

Post a Comment