Wednesday, July 16, 2014

हे सगळे मौनमोहन कशाला झालेत?



   हे वैदिक प्रकरण चव्हाट्यावर आले तेव्हापासूनच रहस्यमय होते. प्रथमदर्शनी तो सरळ व उघड मामला आहे असे कितीही वाटत असले, तरी ते अत्यंत गुढरम्य अधिकच गुंतागुंतीचे बनत जाणारे कोडे व्हावे, अशीच आमची अपेक्षा होती. म्हणूनच त्यावर विनाविलंब मतप्रदर्शन करण्याची घाईगर्दी आम्ही टाळली होती. जसजसे तास उलटत चालले आहेत, तसतसा हा गुंता सुटण्याऐवजी अधिकच रहस्यमय होत चालला आहे. आता साधी गोष्ट घ्या. ज्या कारणास्तव कॉग्रेसने तो विषय इतका कळीचा बनवला आहे, त्याच कॉग्रेस पक्षाचे काही नेते व समर्थक त्यातले ‘जाणकार’ मानले जातात. उदाहरणार्थ मणीशंकर अय्यर, सलमान खुर्शीद किंवा पत्रकार दिलीप पाडगावकर, सिद्धार्थ वरदराजन किंवा बरखा दत्त ही माणसे सतत नरेंद्र मोदींवर दुगाण्या झाडायला टपलेली असतात ना? मग आज अशीच माणसे इतकी सुवर्णसंधी समोर असताना गप्प कशाला? सतत पाकिस्तान विरोधात भाजपा, संघ वा शिवसेनेने दोन शब्द बोलायची खोटी, की त्यांची खिल्ली उडवायला असे विद्वान एका पायाची लंगडी खेळत धाव घेत आल्याचे आपण काही वर्षे बघत आहोत. पण वेदप्रताप वैदिक याचे निमीत्त करून मोदी-संघाला झोडण्याची अशी अपुर्व संधी आज उपलब्ध आहे, तर हे सेक्युलर संघातले नामवंत फ़लंदाज कुठल्या कुठे गायब आहेत. हा काय चमत्कार आहे? नरेंद्र मोदींच्या बालविवाहाचा विषय असो, किंवा त्यांच्या तरूण वयात त्यांनी टपरीवर चहा विक्रेत्याचे केलेले काम असो, उपरोक्त विद्वानांनी नेत्यांनी त्यावर भाष्य केलेले नव्हते काय? मग आज त्यांना सर्वाधिक मोठी संधी आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दूत म्हणून पाकिस्तानात जाऊन थेट खतरनाक सईद हाफ़ीज याचीच ‘ग्रेटभेट’ घेणारा वैदिक नावाचा संघवाला जाळ्यात आयता अडकला आहे, तर अशा सेक्युलर शहाण्यांनी त्याला अभय देण्याची गरज आहे काय? मग हे तमाम पुरोगामी योद्धे आपापली शस्त्रे म्यान करून कुठल्या बिळात कशाला दडी मारून बसलेत?

   ‘तुम नंपुसक हो’ अशा शब्दात निवडणूक काळात मोदींची निर्भत्सना करणारे सलमान खुर्शीद, किंवा ‘वो चायवाला देशका प्रधानमंत्री कभी नही बन सकता’ अशी त्रिवार घोषणा करणारे मणिशंकर अय्यर; आता कशाला गप्प आहेत? वैदिकावर काहुर माजवणारे कोणीच, यापैकी कोणाला कुठलाच प्रश्न कशाला विचारत नाहीत? वास्तविक बाकी कोणाहीपेक्षा हीच मंडळी ह्या प्रकरणातले सर्वात मोठे जाणकार साक्षीदार आहेत. कारण त्यांनीच तर या वैदिकाला काखोटीला मारून पाकिस्तानात नेलेले होते. वैदिकला थेट आपल्या मर्जीने पाकिस्तानात जाता आलेले नाही. एका पाकिस्तानी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांना तिथे जाता आलेले आहे. त्या संस्थेचे म्होरक्या आहेत पाकिस्तानचे माजी  परराष्ट्रमंत्री खुर्शीद महंमद कसुरी. त्याखेरीज संस्थेच्या नियामक मंडळात आणखी दोन पाकिस्तानी महानुभाव आहेत. एकाचे नाव एहसान उल हक़ तर दुसर्‍याचे नाव आहे असद दुर्रानी. हे दोघे पाकिस्तानी फ़ौजेचे निवृत्त लेफ़्टनंट जनरल आहेत आणि केवळ योगायोगाने बदनाम पाक गुप्तहेर खात्याचे प्रमुखपद त्यांनी भुषवलेले आहे. अशा पुण्यवंत शांतताप्रिय लोकांनी मणिशंकर अय्यर नामक सोनिया-राजीव गांधी यांच्या निकटवर्तियाला हाताशी धरून प्रादेशिक शांतता संस्था स्थापन केली. त्याच संस्थेच्या माध्यमातून वैदिकला पाकिस्तानात आमंत्रित करण्यात आलेले होते. अर्थात वैदिक एकटाच आमंत्रित नव्हता. अय्यर, खुर्शीद आदी सेक्युलर गोतावळ्याची त्यात भरती होतीच. मग अशा वैदिकला अगत्याने सोबत घेऊन पाकिस्तानला जाणारे व त्याची बडदास्त राखणारे मणिशंकर अय्यर वा सलमान खुर्शीद या पाक दौर्‍यातले सर्वाधिक जाणकार नव्हेत काय? ज्या संस्थेत आयएसआय या पाक हेरसंस्थेचे दोन माजी प्रमुख म्होरके आहेत, त्या संस्थेत मणिशंकर अय्यर एक प्रमुख पदाधिकारी असतात, तेव्हा वैदिक प्रकरणावर त्यांनीच प्रकाश पाडायला नको काय?

   किती मजेशीर गोष्ट आहे ना? पण त्या शिष्टमंडळात सहभागी असलेले आणि वैदिकला आपल्या सोबत पाकिस्तानात घेऊन जाणारे; हे तमाम सेक्युलर बुद्धीमंत, शहाणे आता गायब आहेत आणि वैदिकला मोदींनीच आपला दूत बनवून पाकिस्तानात सईदला भेटायला धाडल्याचा गदारोळ चालू आहे. तसेच असेल तर मग त्यासाठी पाकचा व्हिसा मिळवून देण्याचा उद्योग मणिशंकर अय्यर यांनी कशाला करावा? की खुद्द अय्यरच मोदींचे हस्तक आहेत? नसतील तर त्यांनी मोदींच्या दूतासाठी इतक्या उचापती कशाला कराव्यात? मणिशंकर अय्यर व त्यांचे भारतप्रेमी पाक गुप्तहेर यांनी मिळून अशा कुठल्या कार्यक्रमाचे आयोजनच पाकिस्तानात केले नसते; तर वैदिक पाकिस्तानात जाऊ तरी शकला असता काय? आणि पकिस्तानात जाऊच शकला नसता, तर त्याला सईद हाफ़ीजपर्यंत पोहोचणे तरी शक्य झाले असते का? थोडक्यात वैदिकने पाकिस्तानात जाऊन काय केले वा कोणाकोणाच्या भेटी घेतल्या; त्यापेक्षा त्याला पाकिस्तानात कोण घेऊन गेले व त्यासाठीच्या सर्व सोयीसुविधा कोणी उपलब्ध करून दिल्या, त्याला महत्व आहे. ते काम पाकिस्तानी माजी पंतप्रधान व माजी गुप्तचर खात्याच्या प्रमुखांनी केले यात शंकाच नाही. कारण संस्थाच त्यांची आहे. पण मग त्यांच्या वतीने इथे वैदिकला ‘पटवण्याचे’ काम कोणी केले? खुर्शीद व अय्यर यांनीच नाही, तर दुसर्‍या कोणी केले? त्यामुळेच या प्रकरणात वैदिकने तिथे काय दिवे लावले वा अक्कल पाजळली, त्याचा खुलासा भारत सरकारने करण्यापेक्षा, त्याच्या नामवंत ‘सहप्रवाशांनीच’ त्या रहस्याचे स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. इतरवेळी त्यासाठी अय्यर, खुर्शीद, बरखा किंवा दिलीप पाडगावकर धावून पुढे आले असते. पण यावेळी ते सगळेच कुठल्या कुठे गायब आहेत. जणू एकेकाची वाचाच बसली आहे. हे सगळे असे ‘मौनमोहन’ कशामुळे झालेत?

   त्याचे काही खास कारण असू शकेल काय? त्यासाठी आपल्याला सईद व वैदिक यांच्या फ़ोटोचे बारकाईने अवलोकन करावे लागेल. हा फ़ोटो स्वत: वैदिकनेच प्रसिद्ध केला आहे. पण तो फ़ोटो कोणी केव्हा टिपला, याचा वैदिकलाही पत्ता नाही. म्हणजेच सईद-वैदिक भेट चालू असताना कोणीतरी छुप्या कॅमेराने त्यांचे चित्रण केलेले आहे. हे चित्रण केवळ स्थीर कॅमेराचे आहे, की संपुर्ण लांबीचा चित्रपट संवादासह चित्रमुद्रीत झाला आहे? वैदिकलाही त्याचा पत्ता नाही. पण त्याच्याही नकळत काढलेला त्याचा हा सईदसोबतचा फ़ोटो, सईदनेच त्याला पाठवला आणि वैदिकने तो प्रसिद्ध केला. मग असेच फ़ोटो वा चित्रण वैदिक सोबत पाकिस्तानची वारी करणार्‍यांचेही टिपले गेले असतील का? असतील तर कोणा कोणाशी भेटीगाठी झाल्या, त्याचेही पुरावे बनू शकतात. आज ज्या फ़ोटोमुळे वैदिकला सईदचा हस्तक वा भागीदार बनवायचा घाट घातला गेला आहे, तसेच इतरांचे फ़ोटो समोर आले तर त्यांच्यासाठी तो भारतप्रेमाचा पुरावा असेल, की देशद्रोहाची साक्ष असेल? असे फ़ोटो चित्रण झालेले आहे वा नाही, याबद्दल कोणीचा खात्री देऊ शकत नाही. पण झालेले असेल, तर त्या शिष्टमंडळातला प्रत्येकजण वैदिक इतकाच गोत्यात येऊ शकतो. असे चित्रण करणारा वा फ़ोटो काढून ठेवणारा, त्याचा सदूपयोगच करील, याची कोणी खात्री देऊ शकत नाही. म्हणूनच असा एक फ़ोटो चव्हाट्यावर आला, मग त्या प्रकरणात गुंतलेल्या सर्वांनाच धडकी भरत असते. आपले कुठे कुठे नकळत फ़ोटो टिपले गेले असतील व संवाद ध्वनीमुद्रीत केले असतील तर? या भयाने अशा भानगडीत गुंतलेल्यांची पाचावर धारण बसणे स्वाभाविकच असते. परिणामी त्यात हस्ते परहस्ते गुंतलेल्यांची बोलती बंद होऊन जाते. तसे नसते तर निव्वळ वाचाळतेसाठीच प्रसिद्ध असलेल्य खुर्शीद, अय्यर, पाडगावकर, वरदराजन वा बरखा यांनी अकस्मात मौनव्रत कशाला धारण केले असते? तसे काही नसेल तर, हे सगळे मौनमोहन कशाला झालेत?

4 comments:

  1. बरोबर नसेवरच बोट ठेवलेत भाऊ.. खुर्शीद, अय्यर, पाडगावकर, वरदराजन वा बरखा हे सारेच पाकधार्जिने देशद्रोही आहेत.ही भामट्या सेक्युलरांची गँग हा बखेडा ऊभा करण्यासाठीच त्या बावळट वैदिकला घेवून तिकडे गेले होते. जो काही धुराळा उठला आहे ते एक सुनियोजित षडयंत्र आहे. त्यात आय.यस.आय., पाकिस्तान, काँग्रेस आणि पत्रकारितेला वेष्येच्या पातळीवर नेणारे भिकारचोट पत्रकार असे सर्वांनी मिळून केवळ मोदींना अडचणीत आणण्यासाठी केलेला हा खेळ आहे.

    ReplyDelete
  2. भाऊ, हा वैदिक जरा भोळसट माणूस दिसतोय. India TV वर त्याची मुलाखत पहिली तेव्हा हे जाणवले. आपण काय गडबड करुण बसलोय हे त्याच्या गावीही नाही. तो रजत शर्माला सांगत होता की मी किती पेपरवाल्यांना सांगितले की 'आप मेरी जो हाफिज सईद भेंट हुई है उसकी स्टोरी बनावो, लेकीन किसी ने नहीं सुना, लेकिन रजतजी आपको मै धन्यवाद देता हुं की आपने मेरी इंटरव्यू की तो अब सब भागे दौड़े मेरे पास आ रहे है।' तो हेही बोलला की मी २-३ जुलैला भारतात परत आलो. पण कोणीही माझी साधी दखल घेतली नाही. दिलीप शिंदे म्हणतात तसे मोदींना फसवन्याचे हे षडयंत्र असेल.

    ReplyDelete