Sunday, September 20, 2015

आजन्म देणेकरी म्हणून जगलेला कार्यकर्ता!

 Displaying IMG-20150920-WA0030.jpg

१९७० च्या पुढे मागे दोन मोठ्या चळवळी वा संघटना मुंबईत उगम पावल्या. त्यातली एक होती शिवसेना आणि दुसरी होती दलित पॅन्थर! यातली शिवसेना आजही तितकीच प्रभावी आहे आणि प्रस्थापित राजकारणात मोठे फ़ेरबदल घडवायला कारणीभूत झाली आहे. मात्र सेनेच्या मागोमाग चारपाच वर्षात उदयास आलेली पॅन्थर ही संघटना नामशेष झाली आहे. त्याची मिमांसा हा स्वतंत्र विषय आहे. पण आजही दलित राजकारण वा समाजकारणात पॅन्थर हा शब्द तितकाच प्रभावी आहे, जितका चार दशकांपुर्वी होता. सेना वा पॅन्थर या दोन्ही युवकांच्याच संघटना होत्या. त्यातले साम्य-साधर्म्य असे, की ठराविक विचार भूमिकांच्या प्रस्थापित नेतृत्वाच्या गलथान वागण्याने वैफ़ल्यग्रस्त झालेल्या तरूणांचा उद्रेक म्हणून या दोन्ही संघटना उदयास आल्या. संयुक्त महाराष्ट्र समितीने मराठी राज्याची मागणी करून जन्म घेतला होता. पण ते राज्य स्थापन होतानाच समितीतील पक्षांमध्ये बेबनाव निर्माण झाला आणि ते पक्ष पांगले. त्यांच्या नेतृत्वाखाली एकवटलेल्या मराठी तरूणाची कुठल्याही पक्षाशी बांधिलकी नव्हती. म्हणूनच तो समितीच्या भूमिकेला धरून जाणारे पर्यायी नेतृत्व शोधत होता आणि ते शिवसेनेच्या रुपाने पुढे आले. दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पनेनुसार त्यांच्या पश्चात स्थापन झालेल्या रिपब्लिकन पक्षाचीही नेत्यातल्या बेबनावाने फ़ाटाफ़ुट झाली आणि पुर्वाश्रमीच्या शेड्युल कास्ट फ़ेडरेशन या संघटना पक्षाचे तुकडे रिपब्लिकन पक्ष म्हणुन पडत गेले. त्यांचा अनुयायी प्रचंड प्रमाणात खेडोपाडी, गावोगावी व शहरातून पसरला होता. त्यातल्या तरूणाची जी घुसमट चालू होती, त्याला गटबाजी विसरून संघर्षाचे शिंग फ़ुंकणारे नेतृत्व हवे होते. त्यातून दलित पॅन्थरचा जन्म झाला. सेना असो किंवा पॅन्थर, दोन्हीचे नेतृत्व पुर्णत: अननुभवी होते आणि तो तत्कालीन परिस्थितीचा उद्रेक होता.

यातल्या पॅन्थरची स्थापना नामदेव ढसाळ व ज. वि. पवार अशा दोघांच्या पुढाकाराने झाली. त्यातला नामदेव आज हयात नाही आणि शनिवारी ज. वि. पवार याची सत्तरी साजरी झाली. त्या समारंभात मी एक वक्ता म्हणून हजर होतो आणि १९७० च्य दशकातले अनेक चेहरे वार्धक्याकडे झुकलेले बघून मला जुना काळ आठवला. पण त्याहीपेक्षा प्रकर्षाने आज जाणवणारी गोष्ट म्हणजे म्हातारा वा अस्तंगत होत चाललेला कार्यकर्ता! नामदेव किंवा ज वि पवार हे पॅन्थरचे संस्थापक वा नेता म्हणूनच ओळखले जातात. पण त्यातला जवि हा कधीच नेता नव्हता. आजही नेता होऊ शकलेला नाही. कार्यकर्ता कसा असावा, त्याचे मुर्तिमंत उदाहरण म्हणुन त्याच्याकडे बोट दाखवता येईल. मागल्या चार दशकात समाजकारण वा सारजनिक जीवनाची झालेली सर्वात हानी कुठली असेल, तर त्यातून ज. वि. पवार याच्यासारख्या कार्यकर्त्याची जमात कुठल्या कुठे लुप्त होऊन गेली आहे. दलित पॅन्थरची संकल्पना साकारताना त्यांच्यापाशी पत्रक छापून घेण्याइतकेही पैसे नव्हते आणि बॉम्बे लेबर युनियनच्या कार्यालयातील सायक्लोस्टाईल यंत्रावर छापलेल्या शंभर चिटोर्‍याच्या आमंत्रणावर बैठकीचे आयोजन झाले होते. त्यातून एक झुंजार संघटना उदयास आली. त्यामागचे मोठे भांडवल ज. वि, पवार हेच होते. त्याला मी भांडवल इतक्यासाठी म्हणतो, की त्याला कुठला स्वार्थ वा महत्वाकांक्षा नव्हती आणि आजही नाही. एका विचार-भूमिका यांनी भारावलेल्या व पदरमोड करून जग बदलण्याची स्वप्ने बघणार्‍यांच्या योगदानावर संघटना व पक्ष संस्था उभ्या रहात. परदेशी सोडा, कुठले देशी निधी वा देणग्याही लागत नसायच्या, अशा परिस्थितीत उभी राहिली त्या संघटनेचे नाव होते पॅन्थर! यात सहभागी होणार्‍या तरूणांकडे कुठले पद नव्हते की सदस्यत्वाच्या पावत्याही कोणी फ़ाडल्या नव्हत्या. हेतू, उद्दीष्ट व विचार यासाठी जीव ओवाळून टाकणार्‍यांचा जमाव म्हणजे पॅन्थर!

आजही राज्यात राजरोस दलितांवर अत्याचार होतात, अन्याय होतात, त्यावर मोर्चे निघतात, आवाज उठवला जातो. तेव्हाही १९७० च्या जमान्यात परिस्थिती वेगळी नव्हती. पण आजचे रिपब्लिकन गट जसे निषेधाचे शब्द बोलून पाठ फ़िरवतात, तशीच तेव्हाची गोष्ट होती. त्यामुळे बेचैन झालेल्या मुठभर दलित तरूणांना आपण फ़क्त मूठभर नाही तर जागोजागी पसरलो आहोत, याचे भान येऊ लागले आणि त्यांनी आधी स्वत:तला सुप्त ज्वालामुखी जागवला. त्याचा वणवा पुढे पसरत गेला तोच पॅन्थर म्हणून ओळखला गेला. आपल्या आतल्या धुमसता ज्वालामुखी जागा केला पाहिजे, म्हणून ज्यांनी पुढाकार घेतला त्यातला आजही जागरुक असलेला एक ज्वालामुखी आहे ज. वि. पवार! शनिवारी त्याच्या गौरवासाठी हजेरी लावली आणि चार शब्द बोलत होतो, तेव्हाही त्याच्यातली धग जाणवत होती. आजही तितकाच निस्वार्थी, निस्पृह पण निर्धारी जवि बघून खुप बरे वाटले. किंबहूना विशीतल्या जमान्यात गेलो. वंचितांचा लढा लढवण्यात हयात गेली असतानाही, सर्व सन्मान वा पदे यांना वंचित ठेवला गेलेला हा हाडाचा कार्यकर्ता. पण अजून स्वत:ला काही मिळाले नाही याची तक्रारही करत नाही. आजच्या रिपब्लिकन चळवळ, पक्ष व गटांना ज्यांनी नेते पुरवण्याचे काम चाळीस वर्षापुर्वी आरंभले होते, त्याच्या साध्या गौरव समारंभात रामदास आठवले वा अर्जुन डांगळे वगळता कोणी मोठा नावाजलेला दलित नेता हजर राहू नये, याचे मला खुप वैषम्य वाटले. पण जविच्या कपाळावर एकही आठी नव्हती, की त्याला त्याची काडीमात्र फ़िकीर नव्हती. आपणच सत्कारमुर्ति आहोत याचेही भान नसलेला हा माणुस, तिथेही व्यवस्था बघत सामान्य कार्यकर्त्यासारखा वागत होता. आजवर काय व किती केले, त्याचे मोजमाप त्याच्या वागण्यात नसतेच. पण सत्काराच्या प्रसंगीही राहुन काय गेलेय त्याचीच बोली जवि बोलत होता.

याला कार्यकर्ता म्हणतात, तो कुठल्या कुठे लुप्त झालाय हल्लीच्या समाजजीवनात. शेकड्यांनी एनजीओ उदयास आलेत. हजारो समाजसेवक आपल्याला दिसत असतात. पण हातात वाडगा घेऊन निधी देणग्या वा मागण्या करत फ़िरणारे हे वंचित बघितले, की पॅन्थरची श्रीमंती लक्षात येते. सरकार वा अन्य कोणाकडे मागण्या करताना हक्क मागणारा हा पॅन्थर आजही हक्काची मागणी करतोय. समाजाचे लोकांचे इतरांचे हक्क मागणारा हाच संघर्ष व परिवर्तनवादी चळवळीचा कार्यकर्ता असतो. आयुष्यभर नोकरी करून संसार करताना त्याने समाजाकडून घेतले काय? त्याला मिळाले काय? या प्रश्नाचे उत्तर आजही नकारात्मक आहे. सामान्य नागरिक जसा रोजगार करतो आणि आपल्या उपजीविकेच्या विवंचनेत असतो, त्यापासून जविची सुटका नव्हती. पण तितके चुल पेटण्याचे पैसे कमावल्यावर आपला प्रत्येक जादा क्षण व तास-दिवस त्याने वैचारिक संघर्ष व हक्कांच्या लढाईसाठी खर्ची घातला. पण आजही तुम्ही ज वि पवार नावाच्या माणसाला कुठे चुकून भेटलात, तर आपण समाजासाठी अमुकतमुक केले, असे शब्द त्याच्याकडून ऐकायला मिळणार नाहीत. ही दुर्मिळ झालेली गुणवत्ता मला हल्ली जागोजागी खटकते. शनिवारी त्याचा गौरव होता आणि आम्ही त्यातले वक्ते त्याने आजवर दलित शोषित समाजाला काय काय दिले, त्याचा ताळेबंद मांडायचा प्रयत्न आपल्या परीने करत होतो. तर हा माणूस मात्र त्यातले श्रेयही घेण्याला पाप समजून अंग झटकत राहिला. बाबासाहेबांचे लिखाण वा अन्य साहित्य पत्रव्यवहार जविच्या प्रयत्नामुळे कसा प्रसिद्ध होऊ शकला व आधी कसा धुळ खात कोर्ट रिसीव्हरच्या अडगळीत पडला होता, त्याचा किस्सा भीमराव आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सांगितला. तर समारंभ संपला असतानाही जवि बोलायला पुन्हा उभा राहिला आणि त्यातला योगायोग सांगून त्याने त्याचेही श्रेय घ्यायला तत्परतेने नकार दिला.

मी जेव्हा इथे विविध चळवळी, पक्ष-संघटना वा नेते इत्यादींविषयी नेहमी लिहीतो, तेव्हा कायम टिकात्मक लिहीतो असा अनेकांचा आक्षेप असतो. मला नकारात्मकच सर्व दिसते असा अनेकांचा आक्षेप असतो. त्याचे कारण हे जविसारखे निस्वार्थी कार्यकर्ते असतात. माझ्या उमेदीच्या कालखंडात मला अशी माणसे जवळून बघता आली, त्यांच्याशी देवाणघेवाण करता आली. त्यांच्यात मिसळता आले. ज्यांना कधी समाजाकडून काही घेणे लागतो अशा भावना वा स्वार्थाची बाधाच झाली नाही. तर आपण समाजाचे देणे लागतो, अशा धारणेने पछाडलेले होते. आपल्या जगण्यापुरते असले म्हणजे खुप झाले. त्यापेक्षा अधिक काही वाट्याला आले वा हाताशी असले तरी ते समाजासाठी, वंचितांसाठी उधळून वाटून टाकावे, अशा समजुतीने त्यांना पछाडलेले होते, अशीच माणसे माझ्या वाट्याला आली. मागल्या पिढीतले जीएल रेड्डी, बाबू मुंबरकर, सोहनसिंग कोहली वा माझ्याच पिढीतले जविसारखे लोक आयुष्यभर समाजाचे देणेकरी म्हणून जगताना जवळून अनुभवलेला माझा स्वभाव पदासाठी, स्वार्थासाठी तडजोडी बौद्धिक कसरती करणार्‍यांना बघतो, तेव्हा घुसमटून जातो. बाकीचे स्वार्थ सोडाच, साधे श्रेय गौरव समारंभातही नाकारण्याचे औदार्य ज्यांच्यापाशी असते, असे हजारभर कार्यकर्ते उभे राहिले; तर देशाला कुणा प्रेषिताची उद्धारासाठी प्रतिक्षा करावी लागणार नाही. बाबासाहेबांनी शिक्षणाचे व स्वयंउद्धाराचे दरवाजे खुले करून दिले, म्हणून आपण इतकी मजल मारू शकलो. त्याच कर्जाची फ़ेड म्हणून आपण समाजाचे देणे लागतो, ही धारणा असलेला ज. वि. पवार हा खरा आदर्श आहे. पण तो लोकांपुढे आणायचा कोणी? कुठे त्याचे कौतुक होणार नाही, की त्याला आदर्श म्हणून कोणी पेश करणार नाही. बाबासाहेबांनी काय दिले, ते सांगणारे खुप आहेत. पण त्यांच्यापासून घेतले काय, ते उमजलेला ज. वि. पवार विरळाच!

3 comments:

  1. Bhau, karyakarte aasech aastat. Leader should realise the value of them. JVP you are great !

    ReplyDelete
  2. bhau sanghat pan as3eanek karyakarte ahet tyanchya badal lihave vel kadhun hi vinanati

    ReplyDelete