Tuesday, September 29, 2015

वडनगरचा ढोकळा, खायी त्याला खवखवे!



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील भारतीयांच्या एका समारंभात ‘सासू-जावई’ अशा स्वरूपाचे काही विधान केल्याने कॉग्रेसजन खवळले असतील तर ते आजच्या कॉग्रेसला जडलेल्या आजाराचे लक्षण आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा आमचा पक्ष आहे आणि त्याला सव्वाशे वर्षाचा इतिहास आहे, असा दावा करणार्‍यांना आपण कुणा सासू-जावयाचे गुलाम नाही, इतके तरी लक्षात रहायला हवे. ज्या पक्षाने खंडप्राय देशाला परकीय गुलामीतून सोडवले हा दावा आहे, त्याने सासू जावयाचेही आपण गुलाम नसल्याचे उक्ती-कृतीतून सिद्ध करायला नको काय? तसे असते तर मोदींनी कुठेही अशी काही शेलकी टिका केल्यास. त्याकडे काणाडोळा केला पाहिजे. पण कारण नसताना कॉग्रेस नेते प्रवक्त्यांनी तो आरोप अंगावर ओढवून घेतला आणि आपलीच जगापुढे शोभा करून घेतली. पक्षाचे अघोषित प्रवक्ते राशिद अल्वी यांनी आधी सुरूवात केली. सासू-जावई म्हणजे सोनिया आणि वाड्रा हे आम्हाला कळत नाही काय, असे म्हणून त्यांनी प्रथम हा आळ अंगावर घेतला. मग कॉग्रेसचे आणखी एक अतिशहाणे बुद्धीमान प्रवक्ते आनंद शर्मा यांनी मोदींच्या आईपर्यंत मजल मारली आणि त्याचा शोधपत्रकारांनी तपास करण्यापर्यंतचे आदेश देऊन टाकले. एक गोष्ट स्पष्ट आहे, की मोदींच्या आईने कुठे कष्ट उपसले वा कुणाच धुणीभांडी केली असतील वा नसतील. पण मोदी मुख्यमंत्री वा पंतप्रधान होण्यापुर्वी त्यांचे नातलग जिथे होते, त्याच अवस्थेत आजही गुजराण करीत आहेत. वाड्राचे तसे नाही. प्रियंकाशी विवाह होऊन सोनियांचा जावई होण्यापुर्वी कुठल्या मार्केटमध्ये किरकोळ नकली दागिने विकणारा हा कोणी सामान्य माणूस, पुढल्या दहापंधरा वर्षात अब्जाधीश झाला आहे आणि त्यासाठी त्याला इथली काडी तिकडे करावी लागलेली नाही. हे लोकांच्या नजरेत भरणारे सत्य आहे. ज्याचा कोणी शोध घेण्याची गरज नाही.

जावई रॉबर्ट वाड्रा हे नुसते सासुबाई सोनिया गांधींचे दुखणे नाही, तर एकूणच कॉग्रेसचे अवघड जागीचे दुखणे आहे. हरयाणा व राजस्थानात एकही पैसा खिशात नसता त्याने बळकावलेल्या कित्येक एकर जमिनी व नंतर त्याच्या व्यवहारातून खात्यात जमा झालेले अब्जावधी रुपये, कॉग्रेसला भेडसावत आहेत. म्हणूनच वाड्रा सोनियांचा जावई म्हणजे प्रत्यक्षात कॉग्रेसचाच जावई आहे. तेव्हा पक्षाला दुखणे अपरिहार्य आहे. शिवाय अल्वी म्हणतात, तसे देशाला लुटणारे सासू-जावई म्हटल्यावर नावे घेण्य़ाची गरजच काय? नुसते लुटणारे म्हटले की नावाची गरज उरत नाही, असे प्रवक्ताच म्हणतो तेव्हा अन्य कोणी कुठले पुरावे देण्याची गरज उरते काय? त्याविषयी खुलासा करता येत नसेल, तर निदान गप्प बसण्यात शहाणपणा असतो. पण देशात पावसाचा दुष्काळ असताना कॉग्रेसमध्ये अकलेचा दुष्काळ पडलेला आहे. तसे नसते तर आनंद शर्मांनी आपल्या अकलेचे तारे कशाला तोडले असते? मोदींनी चहा कधीच विकला नाही असे ठामपणे सांगताना पत्रकारांनी शोध घेण्याचे आवाहन शर्मांनी केले आहे. त्याची गरज काय? शर्मांनी पत्रकार परिषद घेण्याआधी थोडी माहिती त्यांचेच ज्येष्ठ सहकारी मणिशंकर अय्यर यांच्याकडून घेतली असती, तर मोदींनी कधी व कुठे चहा विकला, त्याचा तपशील मिळू शकला असता. दोनच वर्षापुर्वी कॉग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये भरलेली असताना, अय्यर यांनी तिथे मोदींना चहाविक्रीसाठी स्टॉल देऊ केला होता. मणिशंकर अय्यर यांना ‘वो चायवाला’ कोण इतके विचारले, तरी आनंद शर्मा यांना मोदींनी खुद्द कॉग्रेसच्या मंडपातच चहा विक्री केल्याचे पुरावे व साक्षिदार मिळाले असते की! त्यासाठी पत्रकारांना कामाला जुंपायची आवश्यकता काय? पण हे सर्वकाही शहाण्यासारखे करायचे, तर अक्कल हवी आणि त्याच्याच टंचाई व दुष्काळातून सध्या कॉग्रेस वाटचाल करते आहे ना?



एका बाजूला सासू-जावयाच्या लूटमारीचे समर्थन करायचे आणि दुसरीकडे आपणच मोदींच्या नि:स्वार्थी वर्तनाचे दाखले द्यायचे, असला मुर्खपणा कॉग्रेसमध्ये असलात तरच होऊ शकतो. मोदी आपल्या आईच्या आठवणी सांगून खोटे अश्रू ढाळतात, इतका आरोप करून थांबले असते तर शर्मांच्या वक्तव्यातली मजा राहिली असती. पण त्याच्या पुढे जाऊन शर्मा म्हणतात, मोदींनी आपल्या आईला शपथविधीलाही आमंत्रण दिलेले नाही, की पंतप्रधान निवासात पाऊल टाकू दिलेले नाही. म्हणून मोदींचे मातृप्रेम खोटे आहे. किती टोकाचा विरोधाभास आहे बघा. मोदी सोनियांवर जावयाचे लाड पुरवायला सरकारी यंत्रणा वापरली व वाकवली असा आरोप करीत आहेत. तर त्याला प्रत्यूत्तर देताना कॉग्रेस प्रवक्ता मोदी आपल्या आप्तस्वकीयांना सरकारच्या जवळपास फ़िरकू देत नाहीत, म्हणून दोष देतात. याला विनोद म्हणावे की खुळेपणा? एक बाजूला आप्तस्वकीयांसाठी सरकारी खजिना लुटणार्‍या सोनिया व दुसरीकडे आप्रस्वकीयांना सरकारी समारंभापासूनही दूर ठेवणारे पंतप्रधान! यापैकी लोकांना काय आवडू शकेल? कशाने लोक भारावतील? याला बौद्धिक व राजकीय दिवाळखोरी म्हणतात. जिथे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्याची स्पर्धा चालते, त्याला कॉग्रेस आजकाल धुर्त राजकारण समजते आहे. किंबहूना मग मोदी जाणिवपुर्वक अशा खेळी करून त्यांना तोंडघशी पडायला भाग पाडतात की काय, अशी शंका येते. राहिला प्रश्न मोदींनी अमेरिकेत भारतीयांच्या समारंभात असे काही बोलणे कितपत उचित आहे हा! पहिली बाब म्हणजे तिथे घरच्याच म्हणजे भारतीयांपुढे मोदींनी हे भाषण केले होते आणि म्हणूनच जगाच्या व्यासपीठावर काही मांडले असे म्हणण्यात अर्थ नाही. पण त्याच संदर्भातले औचित्य मोदी विरोधकांना कधी लक्षात आले? गुजरात दंगलीचा आडोसा घेऊन बारा वर्षे काय चालले होते?

मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा देऊ नये म्हणून पन्नासाहून अधिक भारतीय संसद सदस्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षांना निवेदन पाठवले होते. त्यातले औचित्य कोणते? तिथेच वसलेल्या वा इथून तिथे मुद्दाम जाऊन मोदी विरोधातला प्रचार करणार्‍या तथाकथित बुद्धीमंतांनी कुठले उचित कार्य केले होते? भारतात कायद्याने मोदींना कुठलाही दोषी ठरवलेले नसताना परदेशाच्या सत्तेने इथल्या राज्याचा मुख्यमंत्री असलेल्या मोदींना अमानुष वा मारेकरी ठरवून व्हिसा नाकारल्याचा उल्लेख अभिमानाने करणारे देशातले तमाम पुरोगामी कुठले औचित्य बाळगून तसे करत होते? भारतीय घटनेने व एका राज्याच्या जनतेने निवडून दिलेल्या भारतीय मुख्यमंत्र्याची विटंबना वा बदनामी जगाच्या व्यासपीठावर करण्याने औचित्य दाखवले गेले असेल, तर एका समारंभात मोदींनी नाव टाळून केलेला सोनिया वाड्रांचा लूटमारीचा उल्लेख औचित्याला धरूनच म्हणायला हवा. किंबहूना त्याला सेक्युलर पुरोगामी पायंडा म्हणून संबंधितांनी मोदींची पाठच थोपटायला हवी. पण गंमत अशी, की कालपर्यंत आपण जे केले ते पुण्य असल्याचे दावे करणारेच आज त्यापेक्षा सौम्य कृतीसाठी मोदींना पापी ठरवायला धावत सुटले आहेत. त्यात जसे कॉग्रेसचे प्रवक्ते आहेत, तसेच अनेक पुरोगामी सेक्युलर विचारवंतही आघाडीवर आहेत. आजची त्यांची वेदना समजू शकते. पण असे आपल्या वाट्याला येऊ नये, याची काळजी पुर्वी घ्यायला हवी होती. तुम्ही ते चुकीचे पायंडे पाडलेत. मोदी आज चुकत असतील, तर ते तुमच्याच पुरोगामी सेक्युलर पायंड्याचा अवलंब करीत आहेत. तुम्हीच धार लावलेले हत्यार मोदींनी तुमच्याच विरोधात परजलेले आहे. त्यासाठी कपाळ आपटून घेण्यापेक्षा आणखी मुर्खपणा होणार नाही, असे वागण्यात शहाणपणा आहे आणि मोदींचा पाठलाग करणे सोडून नव्याने आपले पुरोगामी राजकारण जनमानसात कसे प्रस्थापित करावे, याचा विचार करणे उपकारक ठरेल. जे घडले त्याबद्दल इतकेच म्हणता येईल

वडनगरचा ढोकळा, खायी त्याला खवखवे!

8 comments:

  1. बुडत्याचे पाय डोहात दुस्रेकाय भाऊ

    ReplyDelete
  2. भाऊ खरच जबरदस्त,
    तुमचे काम अद्वितीय आहे.
    great.

    ReplyDelete
  3. Bhau, tujhya talwarila aata veglich dhar aali aahe. Proud to be ever closely associated with you.

    ReplyDelete
  4. वडनगरचा ढोकळा इटलीच्या ईडलीवर भारि पडतोय हेच खरे

    ReplyDelete
  5. अतुल गडकरीOctober 1, 2015 at 11:43 AM

    मला एकच प्रश्न पडतो,हे कांग्रेस चे पायचाटू नेते आम्हा सर्वसामान्य भारतीयांना मुर्ख समजतात की आम्ही खरच मुर्ख आहोत ?

    ReplyDelete
  6. its time to kick congress out of india very nice article.

    ReplyDelete