Monday, October 19, 2015

न लाभलेला सर्वोत्तम पंतप्रधान



देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली कालपरवा बारामतीला येऊन गेले. तिथे त्यांचा यथेच्छ पाहुणचार करण्यात आला. त्यात शरद पवार वाकबगार आहेत. सहाजिकच जेटली यांनी यजमानांच्या बाबतीत चार शब्द चांगले बोलणे गैरलागू ठरत नाही. सतत राजकीय विरोध करूनही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे पवारांना नेहमी आपला मित्र मानत आले. शरदबाबू पंतप्रधान होणार असतील, तर त्यांना शिवसेनेचा पाठींबाच राहिल, असे सेनाप्रमुख खुलेआम सांगायचे. तर जेटली यांनी पवारांच्या बारामतीचे कोडकौतुक केल्यास वावगे काय असू शकते? पण आठ महिन्यापुर्वी व्हेलेन्टाईनडे अशा मुहूर्तावर खुद्द पंतप्रधानांनी पवारांचे असेच कौतुक केले असल्याने, अनेकांना त्याची छाया जेटलींच्या विधानावर पडलेली दिसली आणि अपेक्षेप्रमाणे टिकेचे मोहोळ उठले. त्याचे कारण वेगळे आहे. मागल्या दोन वर्षात मोदींनी देशामध्ये शंभर स्मार्ट सिटीज म्हणजे शहरे विकसित करण्याची भाषा केलेली आहे. तर जेटली यांनी देशात शंभर बारामती असल्या तर विकासाची गंगा दुथडी भरून वाहू लागेल, अशी ग्वाही दिली. त्यातला शंभर आकडा अनेकांना खटकला असावा. जेटली-मोदी बारामतीलाच स्मार्ट सिटी समजतात काय, अशी शंकाही त्यामागे असावी. बारामतीचे कौतुक करणार्‍यांना त्याहीपेक्षा स्मार्ट असलेल्या लवासाचे स्मरण होत नाही, याचीही वेदना त्यात असु शकते. कारण कुठलेही असो, पवार कायम चर्चेत असतात. त्यांच्यावर जितकी टिका होत असते, तितकेच त्यांचे गुणगान थोरामोठ्यांकडून होत असते. सहाजिकच जेटली काय बोलले, त्यावरून वादळ उठले तर नवल नाही. पण त्याच कार्यक्रमात त्याहीपेक्षा महत्वाचे विधान उद्योगपती राहुल बजाज यांनी केले, त्याची मात्र पुरेशी वा कसलीच दखल कोणी घेतली नाही. त्यांनी पवारांचे केलेले खास गुणगान इतके दुर्लक्षित रहावे, याचे वैषम्य वाटायला हवे.

खरे तर कार्यक्रम बजाज यांच्या पुर्वजांचे नाव पवारांच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयाला देण्याचा हा समारंभ होता. कसे योगायोग असावेत? राहुलजींच्या पुर्वजाचे नाव ‘कमल’नयन बजाज आहे. तिथे बोलताना त्यांनी पवार हे देशाला न लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान आहेत, अशी मल्लीनाथी केली. त्यांना काय म्ह्णायचे होते, त्याचा खरे तर वेध घेतला गेला पाहिजे. ‘न लाभलेले’ म्हणजे देश दुर्दैवी असे राहुलना म्हणायचे होते, की लाभले नाहीत हे सर्वोत्तम म्हणायचे होते? चार दशकापासून शरद पवार हे महाराष्ट्रासाठी एक महत्वाचे व्यक्तीमत्व राहिलेले आहे. यशवंतराव चव्हाण सोडले तर देशाच्या पंतप्रधान पदावर दावा सांगू शकलेला दुसरा नेता म्हणून पवार यांच्याकडे बघितले गेले. किंबहूना राजीव गांधी यांच्या घातपाती निधनानंतर पवार यांनी त्या दिशेने झेपही घेतली होती. तुलना करता नरसिंहराव यांना बाजूला करून पंतप्रधानपद मिळवणे पवारांना अशक्य नव्हते. कारण त्या काळात तरी देशात पवारांच्या इतका अनुभवी व मुत्सद्दी कॉग्रेसनेता दुसरा कुणी नव्हता. तितकाच अन्य कुठल्या पक्षातला सर्वमान्य होऊ शकणाराही नेता दिल्लीच्या समिकरणात दिसत नव्हता. पण त्यासाठी झोकून देण्याची जी हिंमत हवी, ती पवार कधीही जुळवू शकले नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणात आले तरी पवार कायम बारामतीपुरते राहिले. त्यांना आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून बाहेर पडणे कधीच शक्य झाले नाही. देशाचे राजकारण करायचे असेल तर महाराष्ट्रातूनही बाहेर पडायची हिंमत हवी. पवारांना ते कधीच शक्य झाले नाही. म्हणूनच आजही जेटली बारामतीचे कौतुक करतात, पण महाराष्ट्राचे कौतुक करीत नाहीत, हे विसरता कामा नये. मोदींचे नाव झाले ते गुजरातच्या विकासामुळे, पवार अर्धशतकानंतरही बारामतीचे म्हणून ओळखले जातात. राहुल बजाज निकटवर्तिय असल्याने त्यांच्या हे लक्षात कसे आले नाही?

चार दशके महाराष्ट्राचे राजकारण यशस्वी करून पवारांनी आपली ओळख निर्माण केली यात शंका नाही. पण फ़ार तर पश्चिम महाराष्ट्रापलिकडे त्यांना आपला ठसा मराठी जनमानसावर उमटवता आला नाही. पवारांची गुणवत्ता, मुत्सद्देगिरी वा अनुभव कोणी नाकारू शकत नाही. पण त्याच्या जोडीला एक मुरब्बीपणा आवश्यक असतो, तिथे पवार कायम तोकडे पडत गेले. मुरब्बी राजकारण करण्यापेक्षा त्यांनी माध्यमातल्या मुठभर लोकांना खुश राखण्यासाठी मुत्सद्देगिरीचा थिल्लरपणा केला, त्याने त्यांचे नुकसान होत गेले. म्हणून पवार महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून ‘लाभले’ तरी महाराष्ट्राचा कुठला लाभ करून देवू शकले नाहीत. म्हणजेच पर्यायाने पवार हे महाराष्ट्राला ‘न लाभलेले मुख्यमंत्री’ ठरले. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करताना म्हटले होते. ‘शेजारी राज्याकडे बघा. तिथला मुख्यमंत्री आपल्यासाठी काही धाडसी गोष्टी करतोय, अशी जनतेची धारणा आहे.’ जेव्हा तमाम कोपर्‍यातून मोदींवर टिकेची झोड उठली होती, तेव्हा पवारांनी उदगारलेले हे शब्द आहेत. पण तसेच आपल्या बाबतीत महाराष्ट्राच्या जनतेने बोलावे, असे त्यांना कधीच कशाला वाटले नाही, हे एक मोठे गुढ आहे. मोदींपेक्षा अधिक अनुभव वा जाण असलेला पवार हा नेता आहे. पण कुठलीही गोष्ट गांभिर्याने करण्यापेक्षा त्यात धांदरटपणा करण्यातून त्याने आपले सर्वच सदगुण उधळून टाकलेले आहेत. त्यातून आपले व्यक्तीगत नव्हेतर महाराष्ट्राचेही मोठे नुकसान केलेले आहे. दिल्लीकडे झेप घेतल्यावरही त्यांचे मन मुंबईच्या मंत्रालयातच घुटमळत राहिले. म्हणून संधी लाभली तरी पंतप्रधान होण्याच्या दिशेने तिचा लाभ उठवण्यात पवार तोकडे पडले. आपल्या गुणवत्तेचा सकारात्मक उपयोग करण्यापेक्षा तोडमोड व कलागतीत त्यांनी आपली उर्जा उधळून टाकली.

दिर्घकाळ दिल्लीतले राजकारण करणार्‍या पवारांना राज्याबाहेर अन्य प्रांतात आपला कोणी समर्थक निष्ठावान निर्माण करता आला नाही. १९९९ सालात पक्षात बंडाचा झेंडा उभारला, तेव्हा त्यांच्या पाठीशी किती अन्य प्रांतातले कॉग्रेसनेते उभे राहिले? का नाही राहिले? महाराष्ट्रातही पश्चिम महाराष्ट्र वगळता कुठला प्रदेश पवारांच्या मागे ठामपणे उभा राहिला? अर्धशतक सत्तेचे राजकारण खेळूनही पवारांना एका राज्यात सर्वदूर आपले भक्कम नेतृत्व उभे करता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे. तिथे आंध्रात राजशेखर रेड्डी, बंगालमध्ये ममता बानर्जी, पवारांच्या नंतरच्या पिढीतले! त्यांची गुणवत्ताही तुलनेने पवारांपेक्षा खुपच कमी. पण त्यांच्याइतकाही पल्ला पवारांना कधी गाठता आला नाही. त्याचे आत्मपरिक्षणही त्यांनी कधी केले नाही. ही पवारांची शोकंतिका आहे. स्कॉलर मुलाने कुवत असूनही अभ्यास न करता कॉपी करूनच गुणवत्ता यादीत येण्याचा अट्टाहास करावा आणि कायम पकडले जावे, अशी ही शोकांतिका आहे. संघटनात्मक कामापासून प्रशासकीय अनुभवापर्यंत पवारांच्या इतका पुर्ण नेता दुसरा सापडणार नाही. पण तरीही तो कधीच राष्ट्रीय नेतृत्वाच्या स्पर्धेत येऊ शकला नाही. कारण सर्वगुणांना शह देणारा पवारांचा एकमेव दुर्गुण, म्हणजे विश्वासार्हतेचा दुष्काळ! कुठल्या क्षणी हा नेता कशी कोलांटी उडी मारेल, याबद्दल कोणी हमी देऊ शकत नाही. त्या एका गोष्टीमुळे पवारांनी आपल्या सर्व गुणांची माती करून टाकली. अनेकदा तर त्यांनी स्वत:ला नको तितके हास्यास्पद करून घेतले. म्हणून सर्वोत्तम पंतप्रधान होऊ शकणारे पवार, कधीच त्या पदाच्या जवळपास फ़िरकू शकले नाहीत. त्यासाठी जी बुलंद इच्छाशक्ती हवी, ती त्यांना दाखवता आली नाही की त्यावर टिकून रहाणे जमले नाही. अन्यथा खुद्द शरद पवार यांनाच मॉडेल म्हणून उभे करून बजाजांनी जाहिरात केली असती,

ये जमीन आसमान, हमारा घर, हमारा यार
बुलंद भारत की बुलंद तसवीर, हमारा पवार

3 comments:

  1. Lihinare shahana aahe pan sahebanbaddal kuthatari manal sal gheun lihilyamule pratek shabdh Na shabdh saheban virudh baryach gostinchi Jan aani mahiti karun ghyavi lagel as disat

    ReplyDelete