Thursday, October 22, 2015

या अभिनयाला अमिताभही दाद देईल!



कुठल्या तरी वाहिनीच्या चर्चेतच प्रसिद्धी उर्दू साहित्यिक मुनव्वर राणा यांनी म्हणे आपला अकादमी पुरस्कार परत केला होता. अर्थातच मग असा साहित्यिक पुरोगामी गौरवास पात्र ठरणे अपरीहार्य असते. पुढे मग याच साहित्यिकांचे एक एक पराक्रम उघडकीस येऊ लागले. त्यात मुनव्वर राणा यांनी सोनिया गांधींच्या गुणगानाची केलेली कविता कोणीतरी सोशल मीडियातून समोर आणली. मग त्यांच्यावर दोषारोप सुरू झाले. आता तर त्याच राणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमंत्रण दिले आहे. त्याचे पुढे काय होते वा त्यातून काय निष्पन्न होते, त्याचीही प्रतिक्षा राणा यांनी केलेली नाही. ते इतके सुखावले की परस्पर त्यांनी घोषणा करून टाकली. मोदींनीच पुन्हा प्रदान केला, तर आपण तोच साहित्य अकादमी पुरस्कार परत घेऊ. याचा अर्थ इतकाच, की नुसत्या मोदींच्या आमंत्रणाने हे गृहस्थ सुखावलेत. ते किती समाधानी झालेत त्याचा अंदाज येऊ शकतो. पण आणखी एक प्रश्न असा पडतो, की त्यांनी पुरस्कार कशासाठी परत केला होता? देशातील सहिष्णूता संपत चालली म्हणून? अविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी वाढत चालली म्हणून? की मोदींचे आमंत्रण व नुसता आंखोका इशारा मिळावा म्हणून? नसेल तर त्यांनी इतक्या घाईगर्दीने पुरस्काराच्या परतीचे विधान करण्याची गरज काय? इतरांची कथा तरी वेगळी असेल असे मानायचे काही कारण नाही. बहुतांश पुरस्कार विजेते तसेच सरकारी मर्जीचे भुकेले असतात आणि त्यानुसार मिठाला जागणारे असतात. सोनिया गांधींचे गुणगान करणारी कविता लिहील्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कदाचित उद्या मोदींवरही अशीच स्तुतीसुमने उधळतील. अर्थात ही बाब आजचीच आहे वा भारतातलीच आहे असेही मानायचे कारण नाही. जगभरच्या बहुतेक पुरस्काराची मूळ कल्पनाच तशी असते. बुद्धीमंतांना आश्रित करून पदरी बाळगण्याकडे सत्ताधीशांचा कल असतो. त्यातून असे पुरस्कार जन्माला येतात आणि पुरस्कारप्राप्त अशी एक नवी उपाधी प्रसिद्धीच्या भुकेल्यांना मागे लावण्याची सोय होत असते.

आता अर्थातच दोन्ही बाजू आपापल्या परीने मुनव्वर राणांच्या विरोधात वा समर्थनासाठी कंबर कसून उतरतील. आधीपासून त्यांची हेटाळणी करणारे मोदी समर्थक राणा यांची टिंगल करतील आणि काही जुने पुरोगामी समर्थक राणा यांचा कडकडीत निषेध करतील. तर काही कडवे समर्थक अजूनही राणांच्या या आशाळभूतपणाला रणनिती ठरवण्याची कसरत करतील. कुठल्याही भक्तगिरीची तीच अगतिकता असते. त्यांना आपण मुर्ख ठरलो हे मान्य करणे अशक्य असते. मग आधीच्या पोरकट वर्तनाचे समर्थन करताना आणखी वेडगळ भूमिका घ्याव्याच लागतात. पण म्हणून राणा यांच्या सारख्यांवर तुटून पडलेल्या विरोधकांचेही म्हणणे खरे ठरले, असे म्हणता येत नाही. कारण राणा वा अन्य पुरस्कार त्यागींचे नाटक नवे मुळातच नाही. असे नाटक युगानुयुगे प्रत्येक समाजातले बुद्धीमंत करतच आलेले आहेत. त्यांचे समर्थक व विरोधक त्या त्या युगात असेच वागलेले आहेत. बदमाशी करण्यासाठी मूळात तल्लख बुद्दी आवश्यक असते आणि त्यात वाकबगार असल्याशिवाय कोणी बुद्धीमंत तरी कशाला होऊ शकेल? विरोधाकांना डिवचून त्याच्या प्रतिपक्षात वसलेल्यांना आपले समर्थक म्हणून उभे करण्याची कला अवगत असलेल्यांना विचारवंत वा बुद्धीमंत म्हणून लौकर मान्यता मिळत असते. एकदा अशी मान्यता मिळवतांना योद्धा वा लढवय्या म्हणून किर्ती प्राप्त केली, मग त्या ‘बंडखोराला’ सत्ताधीशांचे लक्ष वेधून घेणे सोपे जात असते. त्यासाठी सत्ता विरोधकांचा शिडीसारखा वापर करून घेता येत असतो. त्याचे छान विवरण दिवंगत लेखक अभ्यासक विश्वास पाटिल यांच्या ‘झुंडीचे मानसशास्त्र’ ग्रंथात आलेले आहे. ते वाचले व समजून घेतले तर विद्यमान पुरस्कार वापसीचे नाटक समजू शकेल. ते म्हणतात,

‘खरी गोष्ट ही आहे की सत्तेवर जे आरूढ झालेले असतात, त्या थोर लोकांनी या शब्दवीरांची जर वेळीच दखल घेतली आणि त्यांच्या लायकीला शोभेल अशी वागणूक दिली तर हेच शब्दवीर नाना प्रकारची कारणे पुढे करून गोरगरिबांच्या विरूद्ध सामर्थ्यवानांची बाजू घेऊ लागतात, असेही जगात दिसून येते. जर्मनीतल्या गरीबांच्या बाजूने राजेलोकांशी लढण्यासाठी बाहेर पडलेल्या मार्टीन ल्युथरचेच उदाहरण घ्या. प्रस्थापित चर्च मार्टीन ल्युथरला जेव्हा मुळीच विचारीत नव्हते तेव्हा गरीब, साध्याभोळ्या सामान्य जनांच्या नावाने मार्टीन ल्युथर चर्चला आव्हान देत होता. ऐकणारांचे अंत:करण हेलावून टाकील अशा शब्दात गोरगरीबांच्या बाजूने बोलत होता. पुढे जर्मन राजेलोकांशी त्याने हातमिळवणी केली आणि हातमिळवणी करताच त्याची भाषा बदलली. आता तो म्हणू लागला की, एखादे शासन कितीही अकल्याणकारक असले आणि बाजारबुणग्यांची बाजू कितीही न्याय्य असली, तरी त्यांची झोंडशाही चालवून घेण्य़ापेक्षा राजेलोकांचे दुष्ट शासनच परमेश्वर अधिक पसंत करील. एखाद्या बर्कला अमीर उमरावांकडून पुरस्कार मिळतो आणि मग हे बर्कमहाशय जनसामान्यांचा उल्लेख डुकरासारखे जनसामान्य अशा शब्दात करू लागतात. नुसता हा उल्लेख करून ते थांबत नाहीत तर सगळ्या गोरगरीब मंडळींना वर असा उपदेश करतात की गरीबांनी धीर धरला पाहिजे. सबु्री राखली पाहिजे. चिकाटी धरली पाहिजे. काटकसर शिकली पाहिजे. धर्माने राहिले पहिजे. किंवा नाझी जर्मनी आणि बोल्शेविकांच्या रशियाचे उदहरण घ्या. दोन्ही ठिकाणी कोणा ना कोणावर अन्याय अत्याचार चालूच होते; लोकांना दशहत दाखवली जात होती. परंतु एकही शब्दवीर त्यांच्या बाजूने तेथे उभा राहिला नव्हता. कारण त्या शब्दवीरांना सरकार दरबारी कौतुक मिळत होते. त्यांची चंगळ सुरू होती. सारंश दु:खीतांच्य दु:खाने व्यथित होणार्‍यांची आणि त्यांच्या बाजूने उभे रहाणार्‍यांची संख्या या जगात नेहमीच अगदी थोडी आते. इतरांच्या दु:खाने दु:खी होऊन त्यांच्या बाजूने भांडणासाठी उभे रहाणारांपैकी बरेचजण स्वत:च्या दु:खासाठी रडत असतात आणि सत्ताधीशांकडून जो मान त्यांना हवा होता, तो न मिळाल्याने सत्ताधीशांशी भांडत असतात.’

अजून मोदींची भेट झाली नसताना वा परिस्थितीत काहीही फ़रक पडला नसताना मुनव्वर राणा यांनी त्याचीच साक्ष दिलेली आहे. त्यांना पंतप्रधानांनी नुसते बोलावले आहे. थोडक्यात आपण नुसता ‘डोळा मारणे’ म्हणतो, तितका इशारा या थोर साहित्यिकाला अन्यायपिडीत गोरगरीबांकडे पाठ फ़िरवण्यासाठी पुरेसा ठरला आहे. अशा कृतीकडे बारकाईने बघितले व त्यातला युक्तिवाद समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर यापुर्वी असे साहित्यिक अन्यायाने कसे विचलीत झाले नव्हते त्याचे उत्तर मिळते. त्यांनी तेव्हा काय केले किंवा तेव्हा गप्प कशाला बसले, त्याचे उत्तर सहज मिळू शकते. त्यासाठी जाहिरपणे प्रश्न विचारण्याची गरज नसते. अशा कॄती वा पुरस्काराच्या परतीमागची वेदना आपल्याला लक्षात येऊ शकते. किंबहूना आजच्या साहित्यिक मान्यवरांना त्यासाठी जाब विचारण्याचीही गरज नाही. कारण हेच दिर्घकाळ सर्व समाजात सदोदीत होत आलेले आहे. दुसर्‍याच्या दु:खाने व्यथित होण्यामागची खरी वेदना व दाखवलेली यातना, यातला फ़रक आपल्याला ओळखता येत नाही, हा त्यांचा गुन्हा नसतो. ती आपली चुक असते. ते आपले अज्ञान असते. त्यासाठी त्यांना गुन्हेगार ठरवून जाब विचारणे, हा म्हणून आपल्यासारख्या सामान्य बुद्धीच्या लोकांचा गुन्हा असतो. असे दु:खाचे प्रदर्शन मांडून त्यासाठी त्यागाचे व हौतात्म्याचे नाटक रंगवणे, हा त्यांचा पेशा असतो. कुठल्याही समाजात अशा बुद्धीमंत विचारवंत व तमासगीरांची सभ्यतेच्या देखाव्यासाठी गरजही असते. म्हणुन तर पुरस्काराचे प्रयोजन असते. एका नाटकात खलनायक रंगवून अल्पावधीत दुसर्‍या नाटकात साधूत्व रंगवणारा अप्रतीम अभिनय उपजतच अंगी असल्याशिवाय इतके अपुर्व अविष्कार करणे शक्य नसते. म्हणूनच आता मुनव्वर राणा वा त्यांची पाठ थोपटलेल्यांना जाब विचारत बसण्यापेक्षा एकुणच रंगलेल्या अप्रतिम अभिनय व त्याच्या नाट्यसंहितेला टाळ्या वाजवणे सभ्यपणाचे होईल.

6 comments:

  1. आणीबाणीच्या काळात बाईंवर कविता लिहून दिल्लीला पाठवली व बाई खुश झाल्या, डायरेक्ट तोंडी हुकुम आणि लगेच इरिगेशन खात्यात नोकरी मिळाल्याच्या उदाहरण मी पाहिले आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. ;-) gamti jamti et saryach...

      Majhya sarkhya navkhyala... aikava te navaal... ann ... pahava te ipreet... asa vattay...

      Bhau... mi tumcha bhakt nai mhnnar... pan niyamit vachak nakki jhaloy... tumche lekh... ani vishesh bhalloy te... tumcha "Vaidhanik ishara"...

      Keep it up bhau... Ambadnya...

      Delete
  2. मुनवर राणा चांगलाच फसला आहे.

    ReplyDelete
  3. या निमित्ते मला कै. प्र के अत्रे यांचं "झेंडुची फुले" मधील प्रहसन आठवले, "आम्ही कोण म्हणून काय पुसता, दाताड वेंगाडुनी। फोटो मासिक पुस्तकातुनी न कधी का आमुचा पाहिला . . . . .😆😆😆

    ReplyDelete
  4. पूरस्कार परती च्या वाटेवरील साहित्यिक हे बहुतेक करून या पूर्वी च्या सरकारचे भाट होते त्यांना पूर्वीच्या राजाश्रया मुळे मिळालेल्या पूरस्काराने ते साहित्यिक म्हणून ओळखले जाऊ लागले सरकार बदलले राजाश्रय गेले खरे साहित्यिक नसल्याने समाजाची खरी अवस्था कळेना लेखणी समाज परिवर्तना चे खरे साधन ते तरी कूठे वापरता येते पूरस्कार परतीच्या निमित्ताने पुन्हा माध्यमा पुढे जाता येते सरकारने आमंत्रण दिल्यास पुन्हा राजाश्रय व पुन्हा.....
    असे साहित्यिकी राजकारण.

    ReplyDelete
  5. अरे आनीबाणीच्या काळात बाईसाठी तुरुंगात गेलेले लोक नंतर आमदार झालेत आणि स्वता 35 वर्ष आणि आता मुलगा आमदार आहे. गांधी घरण्याला फ़क्त स्वताची स्तुति करणारे लोक लागतात.

    ReplyDelete