Friday, December 20, 2019

चेहरा आणि मुखवटा

pawar khadse के लिए इमेज परिणाम

विधानसभेच्या निकालात भाजपाच्या जागा घटल्या आणि शिवसेनेने पाठ फ़िरवल्याने सत्ता गमावली, त्यानंतर भाजपातील अनेक असंतुष्टांना कंठ फ़ुटला आहे. अर्थात हा भाजपालाच जडलेला आजार आहे असेही बिलकुल नाही. सगळ्याच राजकीय पक्षांना अशी बाधा अधूनमधून होत असते. त्यामुळे भाजपातील काहीजणांनी वेगळा मार्ग चोखाळण्याची भाषा केली असेल, तर नवल वाटण्याचे कारण नाही. पण त्या वेगळ्या मार्गाचा भुलभुलैय्या कुठे घेऊन जातो, ते समजून घेतले पाहिजे. अर्थात आता पक्षाच्या राजकीय अपयशाने शूरवीर झालेल्यांना त्याची गरज वाटणार नाही. पण राजकारण शिकू इच्छिणार्‍यांसाठी असे धडे मोलाचे असतात. कारण राजकारण मुळात चेहर्‍यांवर मुखवटे लावून खेळले जात असते आणि व्यवहार आला, मग मुखवटे उतरून चेहरे समोर आणले जात असतात. तसे नसते तर महिनाभर आधी पवार विरोधी पक्षात बसायची भाषा बोलले नसते आणि व्यवहारात सत्ता बळकावण्याची खेळी खेळत राहिले नसते. आताही त्यांनी आपल्या मुखवट्याला भुललेल्या दोन नेत्यांना सुचक इशारा दिलेला आहे. त्यात एक आहेत अनुभवी राजकारणी एकनाथराव खडसे आणि दुसरे आहेत, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. गेल्या काही दिवसापासून खडसे वेगवेगळ्या मार्गाने आपण वेगळा विचार करीत आहोत असे सुचित करून भाजपाच्या नेतॄत्वाला हुलकावण्या देत आहेत. कधी म्हणतात आपण अन्यायाच्या विरोधात लढत आहोत, कधी ओबीसी म्हणून अन्याय झाल्याची भाषा ऐकू येते आणि अशा पदार्थाला झणझणीत बनवायचे असेल, तर पवार नावाची फ़ोडणी आवश्यकच असते. त्यामुळेच असे अनेक नेते सातत्याने पवारांना भेटतात. हा आता पायंडा झालेला आहे. पण फ़ोडणीत पडतो कोण आणि फ़ोडणीचा आस्वाद कोण घेतो, हे ओळखणाराच राजकारणात टिकत असतो. हे पवारांच्या कढईत पडल्यावर नाथाभाऊंना समजले असेल काय?

काही दिवसांपुर्वी नाथाभाऊ आपल्यावरच्या अन्यायाची दाद मागायला दिल्लीला पोहोचले होते. पण पक्षश्रेष्ठी तेव्हा नागरिकता सुधारणा विधेयक संसदेत संमत करून घेण्याच्या गडबडीत होते. त्यामुळे नाराज नाथाभाऊंनी आपले पक्षश्रेष्ठी सोडून राष्ट्रवादीचे श्रेष्ठी शरद पवार यांची भेट घेतली होती. दिल्लीहून माघारी आल्यावर त्यांनी पंकजाच्या गोपिनाथगड मोहिमेत तलवार उपसली होती आणि तरीही काहीच झाले नाही. म्हणून विधानसभेच्या नागपूर अधिवेशनात हजेरी लावून तिथेही पुन्हा पवारांचीच भेट घेतली. या सर्व काळात खडसे भाजपा सोडून पक्षांतराचा मार्ग पत्करणार, अशा बातम्यांचे काहूर माजलेले होते. मात्र तसे काही होण्याची शक्यताच नाथाभाऊंना वाटत नसल्याने त्यांनीच पक्षातच रहाणार असल्याचा पुर्णविराम देऊन पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. पण एकदा कढईत वा फ़ोडणीत पडल्यावर काही चटके बसणारच. म्हणून तर पवारांनी त्यांना तडका दिला आहे. भले आज नाथाभाऊ पक्षांतराचा विषय नव्हता असे म्हणत असतील. पण औरंगाबादला आलेल्या पवारांनी नाथाभाऊंचे मनसुबे उध्वस्त केल्याची खबर जाहिरपणे देऊन टाकलेली आहे. खडसे व आपली भेट झाली आणि त्यात काय झाले, त्याचा तपशील स्पष्टपणे पवारांनी सांगितलेला नाही. पण खडसेंना चुरचुरीत चटके बसतील, असे विधान करताना पवार म्हणतात, ‘खडसे हे मला भेटले होते. माझी त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. मात्र, त्यांचं समाधान करण्याइतपत साधनसामुग्री माझ्याकडं नाही.' याचा अर्थ काय होतो? तर पक्ष सोडून काही भूकंप घडवण्याच्या प्रयत्नात नाथाभाऊ होते आणि पवारांची त्यांच्याशी चर्चा झाली. पण त्यासाठी आवश्यक असलेली साधनसामग्री आपल्यापाशी नाही, असेच पवार सांगत आहेत. त्याचा साधासरळ अर्थ इतकाच, की खडसे आपल्याशी सौदेबाजी करीत होते. पण पक्षांतरासाठी त्यांनी मागितलेली किंमत आपण देण्याच्या स्थितीत नाही.

थोडक्यात खडसे काही मोठे पद घेऊन राष्ट्रवादीमध्ये दाखल व्हायला आलेले होते. पण देण्यासारखे कुठलेही मोठे पद आपल्यापाशी आता नाही, असेच पवारांनी सुचित केलेले आहे. अन्यथा साधनसामग्री म्हणजे सुरूंगाच्या काड्या किंवा स्फ़ोटकाची दारू वगैरे नसते ना? राजकारणात एका पक्षाला दगा देऊन दुसर्‍या पक्षात येणार्‍यांना कुठले तरी मोठे पद दिले जात असते. त्यातून नाराजांना आपला हेतू साध्य करता येतो आणि पक्षाच्या नेतृत्वावर सूडही उगवता येत असतो. स्वागत करणार्‍या पक्षाला गनिमी कावा केल्याची बाजी मारता येते. मात्र त्यासाठी जी किंमत नाथाभाऊ मागत होते, ती परवडणारी नाही वा आता हातात नाही; असे पवारांनी उघड सांगून भाजपातच नाथाभाऊंची गोची करून टाकली आहे. दिर्घकाळ महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाच्या पदावर काम करूनही खडसे यांना पवारांचा मुखवटा आणि चेहरा ओळखता आलेला नसेल, तर त्यांची कींव केली पाहिजे. खडसेंपेक्षाही उद्धव ठाकरे सावध निघाले म्हणायचे. निदान आपला चेहरा शाबुत राखुन त्यांनी पवारांनी ‘साधनसामग्री’ सुपूर्द करण्यापर्यंत कळ काढली होती. अर्थात ती सामग्री कुठे आणि कोणता भूकंप करणार आहे, त्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. त्या सुरूंगाची वात कुठवर पोहोचली आहे, त्याचा अंदाज उद्धवरावांनाही अजून यायचा आहे. तसे नसते तर त्याच औरंगाबादच्या संवादात पवारांनी बाळासाहेबांचे नाव घेऊन नव्या मुख्यमंत्र्यांना चाबकाचे फ़टके कशाला मारले असते? जिथे खडसेंचा डाव पवारांनी उघडा पाडला, तिथेच स्मारकासाठी झाडे तोडणार्‍या शिवसैनिकांना फ़टके मारताना बाळासाहेबांनी काय केले असते, त्याची पवार ग्वाही देत होते. आरेची झाडे वाचवायला पुढाकार घेणार्‍या शिवसेनेने आपल्या स्मारकासाठी झाडे तोडली, म्हणून बाळासाहेबांनीच फ़टके मारले असते, असे फ़टकारे पवार मारतात, तेव्हा त्यांचा चेहरा समोर येतो ना?

नाहीतरी उद्धवराव आजकाल पवारांचे आदेश मानत असतात. मग पक्षप्रमुखाचा आदर्श म्हणून शिवसैनिकांनीही पवारांचे फ़टके निमूट सहन करण्याला कुठे पर्याय उरतो? कधीकाळी शिवसेनाप्रमुख आपल्या पाठीराख्यांना आदेश द्यायचे आणि त्याची भिती शासनालाही असायची. आता पवार शिवसेना पक्षप्रमुखांना आदेश देतात आणि फ़टकेही मारतात. पण कोणाची बोलायची हिंमत उरली आहे काय? भाजपाच्या काही लोकांनी औरंगाबादच्या स्मारकासाठी झाडे तोडल्याचा मुद्दा आणला, म्हणून शिवसैनिक त्यांच्यावर तुटून पडलेले होते. पण पवारांनी तोच मुद्दा घेऊन शिवसेनेला चाबकाचे फ़टके मारल्यावरही शिवसेना कशी चिडीचुप आहे ना? कारण पवारांवर चकार शब्द उच्चारला तर मुख्यमंत्रीपद सोडावे लागेल. ते मिळवण्यासाठी पवारांचे आदेश शिरसावंद्य मानण्याला पर्याय कुठे आहे? याला नव्या युगातला सन्मान स्वाभिमान म्हणतात. बिचार्‍या खडसेंच्या पदरात काहीच पडलेले नसता त्यांना चटके बसलेले असतील, तर मुख्यमंत्री होण्यात शिवसेनेने फ़टके सहन करायला कुठे पर्याय असतो? याला राजकारण म्हणतात. ते खेळताना पवार कधी मुखवटा लावून समोर येतात आणि कधी अकस्मात मुखवटा काढून चेहरा दाखवित व्यवहार सुरू करतात, त्याचा थांगपत्ता लागत नाही. त्यासाठीच तर पवार साहेब मुरब्बी धुर्त असे गोडवे माध्यमात पत्रकारांकडून गायले जातात ना? उद्धवना मुख्यमंत्री होण्यासाठी आदेश देण्यापासून शिवसैनिकांना फ़टके देण्यापर्यंत शिवसेना पवारांच्या आहारी कधी गेली, ते शिवसैनिकांनाही अजून समजलेले नाही. पण हे चालायचेच. पित्याने दिलेला शब्द पाळण्यासाठी प्रभू रामचंद्राने वनवास सोसला होता. तर आधुनिक रामभक्तांनी पित्याला दिलेला शब्द पाळण्यासाठी कितीही टोकाची अगतिकता केली, तर त्याला चुकीचे कसे म्हणता येईल? कदाचित शिवसेनेला पुर्णपणे राष्ट्रवादीत सामावून घेण्यासाठी आवश्यक असलेली ‘साधनसामग्री’ हातात येण्याची प्रतिक्षा पवार करीत असावेत. तोपर्यंत नुसते फ़टके व फ़टकारे यावर काम चालवणे त्यांनाही भाग आहे.

19 comments:

  1. खडसे यांच्याबद्दल काही बोलण्यात अर्थ नाही. पराभूत झालेल्यांच्या धमकीला कोणी घाबरत नाही हे त्यांनी आणी पंकजा मुंढे यांनी लवकर लक्षात घ्यावे. वाईट वाटतं ते शिवसेनेबद्दल. कीव येते. पार लाचार झाले आहेत.

    ReplyDelete
  2. Serves SS very well. This is only beginning.. Gandhi's have shown Thakre his place once. There will be many more incident like this .

    ReplyDelete
  3. भाऊ, श्री पवार सध्या सातत्याने फडणवीसांना टार्गेट करत आहेत. फडणवीस सरकार जाऊन एक महिना होत आला आहे, तरी पवारांचे लक्ष्य अजून फडणवीसच आहेत. आता फडणवीसांवर आर्थिक घोटाळ्याचा आरोप करण्यात येत आहे. कृपया याबाबत विश्लेषण करावे.

    ReplyDelete
  4. अतिशय समर्पक फटके आणि चटके ही !
    फटके कुणाला आणि चटके कुणाला ते ज्याचे त्याने ओळखावे. पाठ दुखली तर फटका आणि बुड शेकलं तर चटका !
    मानलं भाउ तुम्हाला.....

    ReplyDelete
  5. भाऊ तुम्ही जे लिहिता त्यातील वाक्य सोडाच एक न एक शब्द मनाला पटतो.. तुमचे लिखाण जर का ह्या सो कॉल्ड पुढार्यांनी वाचले तरी त्यांचा नादान पणा ते स्वतः आटोक्यात
    ठेवू शकतील. शरद पवार एक नाकाम व्यक्तिमत्व आहे. कधी
    पाठीत सुरा भोकस्तील आणि कधी कानामागे कोणता सूर काढतील ह्याची कल्पना कोणताही रॅशनल नॉर्मल व्यक्ती करू शकणार नाही. आपल्याला हेड अँड नेक केटेगरीतील
    ओरल कॅंसर झालेला आहे. तो दोन वेळा मेटॅस्टॅटीक झाला आहे. त्यावरील बायोलॉजिकल थेरपी 10 वर्ष काम करून समहाऊ ओरल कॅंसर ला कंट्रोल मध्ये ठेवते आहे, आपले वय
    ८० च्या आसपास आहे अश्या वेळी कुणीही रॅशनल व्यक्ती
    आपले पोस्ट कॅंसर आयुष्य नको त्या भानगडी करत जगणार
    नाही. पण हे पडले जाणते राजे. ह्यांना ते मान्य नाही. नको त्या वयात नको त्या गोष्टी कण्हता राजा करणारच. नको ते
    खोटे मुखवटे लावून जनतेची खोटी काळजी दाखवून जनतेने
    नाकारले असताना नको त्या पक्षांचा संकर घडवून नको ते
    लोक सत्तेवर आणलेच. बर नको ते लोक सत्तेवर आणले तर
    आणले त्यांच्यावर ह्यांचाच रिमोट चालणार. अवगढ आहे. हुरळलेली मेंढी लांडग्या च्या मागे जाते तसेच शरद पवारांच्या
    मागे जाणाऱ्या लोकांची हालत होणार आहे. कितीही टोकाची अगतिकता केली तरी लांडग्याला खायला मेंढीचं लागते लांडगा गवत खात नाही. कळेल लवकरच कळेल. बाकी कुणी नाही तर जनताच दाखवून देईल कि हुरळलेली मेंढी लांडग्या च्या मागे गेल्यावर द एन्ड कुणाचा होतो ते. राज्यात
    अपूर्ण जलसिंचन प्रकल्प आहेत ते कण्हत्या राजाला
    पूर्णत्वात नेण्याची क्षमता नाहीये. आणि म्हणे हे शेतकऱ्यांचं
    भलं करणार. राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या तोट्याची महामंडळं एकतर बंद करा किंवा पुनर्जिवीत करा म्हटलं तर महामंडळं समोर ठेवून त्यांच्यावर नेमणूक करण्यासाठी आदा पादा कोण कोण कोण पादा चा जो खेळ कण्हत्या राजाने रंगवला आहे तो बेरंगी होणार. अन हे म्हणे
    राज्य करणार. जे लोक ह्यांच्या नादी लागले त्यांच्या चड्डीच्या
    नाड्या ह्यांनी सोडल्या. खडसे घ्या ठाकरे घ्या मोठी किंमत
    देउन स्वतःच अपरिमित नुकसान भरून आणू शकणार नाहीत.











    ReplyDelete
  6. भाऊ, नक्कीच शिवसेना नष्टप्राय होईल किंवा राष्ट्रवादीत विलीन होईल.

    ReplyDelete
  7. अगदी बरोबर आहे भाऊ.

    ReplyDelete
  8. Kadak bhau.... Susarbai tuzi path mau aahe sadhya uddhawala...pahikade jayla madat havi aahe na

    ReplyDelete
  9. Pudhachya electionla rashtravadi Congresschi sath sodel. Pawar Ani BJP ashi kheli kartil ki Sena Ani Congress chya vadat sarkar padel. Pan to paryant senechi Hindu votebank Ani Congresschi secular votebank sampleli asel. Mag rashtravadisena Ani BJP madhe saral ladhat hoil Ani Congress suddha sampun jail.

    ReplyDelete
  10. पंकजा मुंडे, एकनाथ खडसे आणि इतर समवृत्तीच्या व्यक्ती या सर्व शतृघ्न सिन्हा, यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी यांच्या मार्गाने जात आहे. असे वाटते.

    ReplyDelete
  11. भाऊ खडसे यांचा विषय भाजपमधून संपला आहे त्यांना भाजप नेतृत्व अनुल्लेखाने मारेल, राहता राहिला प्रश्न शिवसेनेचा तो मात्र महत्वाचा आहे, मुंबई पाठोपाठ ज्या मराठवाड्यात शिवसेना विस्तारली ती ज्या कारणाने तोच विषय पुन्हा एकदा अमित शहा यांनी आणलेल्या नागरिकत्व कायद्यामुळे परत एकदा मराठवाड्यात ऐरणीवर आला आहे, मराठवाड्यात अल्पसंख्याक या कायद्या विरोधात रस्त्यावर आले आहेत आणि इथेच शिवसेना स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची गोची झाली आहे कारण या ठिकाणी हिंदू समाजाचे ध्रुवीकरण होणे अटळ आहे आणि याचा फायदा फक्त भाजपला होणार आहे,भाऊ पवारांनी सेनेला मुख्यमंत्री पद देऊन हिंदुत्वासाठी लढणारी एक आख्खी चळवळ संपवून टाकली आहे

    ReplyDelete
  12. भाऊ ,सेनेची खासकरुन ऊ.ठा.यांची मान जाणता राजा नामक कोल्ह्याच्या जबड्यात अडकली आहे,हे कमी म्हणुन काँग्रेस लांडगा सेनेचा फाडशा पाडायला टपला आहे. वाईट याचे वाटते की जमिनीवर शिवसेने साठी घाम गाळणारे सैनिक यांचा वाली कोणी नाही . सेनेचा ह्रास वेगाने होत आहे नागरीक सुधारणा विधेयकाला लोकसभेत समर्थन व राज्यसभेत पलायन करुन आपण आता हिंदुत्व सोडले आहे हे कबुल केले. भाऊ महायुति सरकारने खास करुन मुख्यमंत्री यांनी फडणविस सरकारचे महत्वाचे प्रकल्प बासनात गुंडाळायला सुरुवात केली केवळ सुडबुद्धिने. कुलाबा सीप्झ मेट्रो कार शेड केवळ सुड बूद्धिने थाःभवल्या सारखे आता मुंबई करांना जाणवायला लागले व सेनेला भविष्यात त्याची किंमत चुकवावी लागेल, सध्या देशभर CAA ला विरोध ज्या तह्रेने होत आहे सुनियोजितविनंती जाळपोळ ,पोलिसाना मारहाण दगडफेक करणारे व त्यांचे प्रायोजक यावर कृपया आपले विचार लवकर ब्लाॕगवर लिहावे ही विनंती.

    ReplyDelete
  13. भाऊ, एकदम बरोबर अर्थ लावता आपण या भेटीचा आणि खरं तर तसेच होईल असं वाटतं , देव करो आणि सेनेला लवकर जाग येवो नाहीतर .....

    ReplyDelete
  14. भाऊ, एकदम बरोबर अर्थ लावता आपण या भेटीचा आणि खरं तर तसेच होईल असं वाटतं , देव करो आणि सेनेला लवकर जाग येवो नाहीतर .....

    ReplyDelete
  15. या पुढे उठा महाराष्ट्रातले चंद्राबाबू नायडू म्हणून ओळखले जातील.

    ReplyDelete
  16. भाऊ तुमी नेहमी म्हणता पवार जे बोलतात त्यांचे उलटे करतात, मग खडसे आणी शिवसेना बाबतचे वक्तव्य तशा प्रकारे घ्यायला नको का.

    ReplyDelete
  17. खडसेंच्या बाबतीत भाजपचे वर्तन खरोखरच अनाकलनीय आहे. विधानसभा निवडणुकीत अखेरपर्यंत लटकवून ठेवून शेवटी तिकीट नाकारले जाणे; मुलीला तिकीट देऊन पाडण्याची व्यवस्था करणे; पक्षश्रेष्ठींनी भेटही नाकारणे. ४० वर्षे अविश्रांत परिश्रम करून पक्ष शून्यातून वैभवाला नेऊनही अशी वागणूक???

    ReplyDelete
  18. "बाळासाहेबांना दिलेली वचने" हे पुस्तक लवकरच निघावे.
    कृपया खुलासा करावा.

    ReplyDelete