Monday, August 24, 2015

आषाढी कार्तिकी भक्तजन येती?



इन्व्हेस्टीगेशन डिस्कव्हरी या वाहिनीप्रमाणेच ‘लाईफ़ ओके’ ही एक उपग्रह वाहिनी आहे. त्यावर अनेक मनोरंजक मालिका दाखवल्या जातात. त्यातच ‘सावधान इंडीया’ असाही एक सत्यकथा आधारीत कार्यक्रम आहे. भारताच्या विविध राज्यात घडलेल्या अतिशय रहस्यमय वाटणार्‍या गुन्ह्यांचा तपास त्यात दाखवलेला असतो. विशेष असे, की यातल्या कथांमध्ये प्रामुख्याने पोलिसांपेक्षा बळी पडलेल्यांच्याच कुणा आप्तस्वकीय वा मित्राने पुरावे शोधण्याचा पराक्रम दाखवलेला असतो. ही अत्यंत सामान्य घरातली वा कुटुंबातील माणसे असतात. पण आपल्या कुणाला हकनाक मारले गेले, पळवले गेले किंवा फ़सवले गेल्याने चिडलेल्या अशा लोकांनी सत्याचा वेध घेण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नातून गुन्ह्याचा गुंता उलगडला असेच दिसते. काही प्रकरणात तर पोलिस अशा आप्तस्वकीयांना हाकलून देतात आणि त्यांच्याशी संपुर्ण असहकार्य करताना दिसतात. तपास चालू आहे अशा नुसत्या आश्वासनावर पिडीतांची पोलिस बोळवण करताना दिसतात. म्हणजेच त्यांची व्यथा दाभोळकर पानसरे पाठीराख्यांपेक्षा किंचीतही वेगळी नाही. पण गुन्ह्याचा शोध घेण्याची दुर्दम्य इच्छशक्ती दोन बाजूंमध्ये जमिन अस्मानाइतकी भिन्न दिसते. इथे दोन वर्षे होऊन खुनी मिळत नाही म्हणून सरकार वा पोलिसांवर आरोप करण्यात दाभोळकर अनुयायी धन्यता मानताना दिसतात. त्याचा गाजावाजा करून राजकीय भूमिका मांडण्याची संधी त्यात शोधली जाते. पण त्यापलिकडे कुणाची मजल जात नाही. हा अजब विरोधाभास दोन बाजूंमध्ये आढळून येतो. तिथे सामान्य घरातली व सामान्य बुद्धीची माणसे आपल्या अपुर्‍या शक्ती व साधनांनिशी गुन्हेगाराचा वेध घेण्यासाठी अगदी जीव धोक्यात घालून कसोशीने प्रयत्न करतात. रोजच्या रोज या वाहिनीवर तशा दोन तरी सत्यकथा दाखवल्या जातात. कोणीही त्या बघून आपले समाधान करू शकतो.

ज्यांना कुणाला डॉ. दाभोळकर वा कॉ. पानसरे यांच्याविषयी किंचीतशी आस्था असेल, त्यांनी मुद्दाम दोनचार दिवस वेळ काढून लाईफ़ ओके या वाहिनीवरचे ‘सावधान इंडीया’ मालिकेतील दोनचार भाग मुद्दाम बारकाईने बघावेत. मग गुन्हेतपास आणि त्यातले पुरावे शोधणे किती जिकीरीचे काम असते, त्याचा अंदाज येईल. किंबहूना गुन्ह्याची जी माहिती आपल्या समोर येत असते किंवा सांगितली जात असते; त्यापेक्षा सत्य किती भयंकर भिन्न असते, त्याची कल्पना येऊ शकेल. त्यात अनेकदा खुद्द गुन्हेगारच सगळ्या तपासाला कशा हुलकावण्या देत असतो ते लक्षात येऊ शकेल. पोलिसांच्या कुशाग्र बुद्धीलाही गुन्हेगार कशा झुकांड्या देतात, ते लक्षात येऊ शकते. पण त्याहीपेक्षा अशा गुन्ह्यात सामान्य बुद्धीची, पण आस्था असलेली जवळची माणसे गुन्ह्याचा छडा लावण्यात किती परिश्रम घेतात त्याची जाणिव होते. जर तुमच्या मनात बळी पडलेल्याविषयी तितकी आस्था असेल, तर तुम्ही पोलिसांवर खापर फ़ोडण्यात धन्यता मानत नाही, किंवा त्याचे भांडवल न करता खर्‍या गुन्हेगारापर्यंत कसे पोहोचू शकता. त्याचा अंदाज त्यातून येऊ शकेल. कालपरवाच एक मध्यप्रदेशातील एक अशी कथा बघण्यात आली. त्यात अतिशय कुटीलपणाने एक महिला विवाहित सहकार्‍याचा खुन पाडते आणि अगदी सहजपणे त्यातून निसटते. पण मृताची सामान्य पत्नी नुसत्या तर्काच्या आधारे पुरावे गोळा करून आपल्या पतीच्या बुद्धीमान खुनी महिलेला पोलिसांना पकडायला कशी भाग पाडते. त्याचे वास्तव बघायला मिळाले. यापैकी मागल्या दोन वर्षात काय होऊ शकले? पोलिसांना व सरकारला दोष देण्यापलिकडे दाभोळकर समर्थक काय करू शकले आहेत? त्यापैकी कोणालाच खरे खुनी ‘आपण सारे शोधू’ असे का वाटू शकलेले नाही? अनिवार इच्छा असण्यापेक्षा घडलेल्या भयंकर घटनेचे नुसते राजकीय भांडवल करण्याचा सोस कशाला?

उपरोक्त घटना भारतातल्याच आहेत आणि तिथेही तितक्याच पोलिसी अनास्था वा हलगर्जीपणाचा अनुभव सामान्य लोकांना नेहमी येत असतो. त्यापेक्षा दाभोळकर प्रकरणात काहीही वेगळे घडलेले नाही. मग अशी शंका येते, की खरे खुनी मिळण्यापेक्षा एका हकनाक हत्येचे नुसते राजकीय भांडवल करण्याचाच हेतू साधला जातो आहे काय? म्हणजे त्या हत्येचे सोहळे साजरे करण्यात रस असल्याने समर्थकांनाच खरे खुनी पकडले जाण्याची आवश्यकता वाटत नाही काय? असती तर त्यापैकी कोणी विविध मार्गाने खरे खुनी, हल्लेखोर, दुष्मन शोधण्याचा वा पुरावे गोळा करण्याचा कोणता प्रयत्न केला आहे? नसेल तर कशाला केलेला नाही? पोलिस नालायक जरूर असतील. पण तुम्ही किती प्रामाणिक आहात, त्याचा पुरावा कोणी द्यायचा? पोलिसांनी प्लॅन्चेट वापरल्यावरून काहुर माजवण्यात आले. कारण दाभोळकर वैज्ञानिक भूमिका मांडत होते. हरकत नाही, पण मग ज्या वैज्ञानिक भूमिकेचा आग्रह धरला जातो, त्याच मार्गाने कितीजण खुन्याचा शोध घेण्यासाठी पुढे सरसावले? नुसता कालवा करण्यात सगळे पुढे आहेत. पण स्वत: काही करावे अशा इच्छेचा लवलेश नाही. मात्र सहा महिने आणि वर्षाने सोहळा करायला अगत्याने हजेरी लावली जाते. २० ऑगस्टला अगत्य दिसले. पण आता पुढे काय? एकदम २०१६चा २० ऑगस्ट? की २० फ़ेब्रुवारीचा पानसरेंचा स्मृतीदिन? मधला काळ कोणाला त्या दोघांचे स्मरण तरी होते काय? कशाला होत नाही? दोन तारखांपुरते हे लोक महत्वाचे होते आणि त्यांच्या हत्येला बाकी काहीच महत्व नाही काय? ‘आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभागेमध्ये स्नान गे करीती’, या आरतीप्रमाणे हे दोन दिवस साजरे करण्यासाठी दोन चांगल्या माणसांचा बळी गेला आहे काय? जे कोणी अशा सोहळ्यात सहभागी होतात, त्यांनी जरा हे प्रश्न आपल्याच मनाला विचारून बघावेत.

पोलिस नालायक आहेत आणि राज्यकर्त्यांना दाभोळकर पानसरे यांचे मारेकरी शोधण्यात अजिबात रस नाही, हा आरोप मान्य केला. पण जे कोणी असा आरोप सतत करत आले, त्यांनी कोणी तपासासाठी आपल्या परीने काय केले आहे? काय काय करता येऊ शकेल? उपरोक्त वाहिनीच्या ‘सावधान इंडिया’ कार्यक्रमात पिडितांनी केलेले प्रयास बघितले तर सामान्य माणूस किती बारकाईने शोध घेऊ शकतो, त्याचा साक्षात्कार होऊ शकतो. किंबहूना या दोन हत्याकांडाचे राजकीय भांडवल करणार्‍यांनी काहीच तसे केलेले नाही, त्याचीही प्रचिती येते. कारण खुनाच्या वा अन्य कुठल्याही गुन्ह्यामागे नेहमी हेतू व लाभार्थी महत्वाचे दुवे असतात. दाभोळकर व पानसरे यांच्या हत्येचा शोध घेताना याच दोन गोष्टींकडे साफ़ पाठ फ़िरवण्यात आलेली आहे. केवळ राजकीय हेतूनेच त्यांच्या हत्या झाल्या, असे गृहीत पोलिसांच्या माथी मारून त्यांना वास्तविक गुन्ह्याचा मूलभूत तपासच करू दिलेला नाही. उपरोक्त गुन्ह्यांचा तपास लागू शकला व सामान्य लोकांनी लावला, त्याचे एकमेव कारण त्यात कोणाला कसला लाभ होऊ शकतो आणि कोणाचा त्यात हेतू असू शकतो, याचा कसून शोध घेतला गेला आहे. दाभोळकर पानसरे हत्याकांडात राजकीय हेतूपेक्षा अन्य काही हेतूही असू शकतात. त्याचा शोध खरे तर त्यांचेच निकटवर्तिय घेऊ शकतात. किंबहूना अशा जवळच्या लोकांपाशी असलेली बारीकसारीक माहिती खर्‍या गुन्हेगार खुन्यांपर्यंत घेऊन जाण्यास निर्णायक महत्वाची ठरू शकेल. पण त्यासाठी कोणी पुढाकार घेतल्याचे दोन वर्षात कुठे दिसले नाही. मग शंका येते, की यापैकी कोणाला शहीद झालेल्यांविषयी आस्था आहे की नुसते सोहळे करण्य़ातच त्यांना आस्था आहे? त्याची साक्ष आता पानसरे यांच्या स्मृतीदिनापर्यंत काय होते त्यातूनच लक्षात येऊ शकेल. कारण आता ‘आम्ही सारे’ २० फ़ेब्रुवारीपर्यंत काहीही हालचाल करणार नाहीत आणि तेव्हा पुन्हा एक सोहळा करून पोलिस व सरकारच्या नावाने गदारोळ केला जाईल. पुन्हा सर्वकाही शांत होईल, ते २० ऑगस्टपर्यंत.

5 comments:

  1. भाऊ तुम्ही जे म्हणत आहात तसे तपास स्वतःचे डोके वापरुन करावा लागतो पण पुरोगामी पुरोगामी म्हणत फ़क्त रस्त्यावर नाटके करणारयां ना कसे जमणार

    ReplyDelete
  2. you are giving extreme and exceptional example.its police duty and those were against pansare's , dabholkar's ideology should interrogate first. and this is very serious issue.

    ReplyDelete
  3. no it's police responsiblity.everyone think this is wrong means they can not perform each activity.i think those who were against dabholkar ideology should interrogate.

    ReplyDelete
  4. सत्याचा शोघ घेण्या पेक्शा त्याचा टाहो फोडण्यात घन्यता मानतात असे तथाकथीत पुरोगामी

    ReplyDelete
  5. भाऊ, अनुयायीबद्धल तुम्ही जे म्हणता आहात ते नक्की खरं आहे पण त्यासाठी 'सावधान इंडिया' चे निकष नको. कारण त्यातील केसेस सत्य घटनांवर आधारित असल्या तरी मनोरंजन व टीआरपी साठी त्यात रंजकता आणण्यासाठी अतींनाटकीय अन अतिशयोक्ति करण्यात आली असते. बाकी अनिस व अनुयायी हे नाटकीय आहेत यातही वाद नाही!

    ReplyDelete