Saturday, August 1, 2015

‘लोकसत्ता’ अर्थात कुबेर टाईम्स (भाग पहिला)

शोक-उन्माद शब्दांचे नेमके अर्थ तरी काय?



सर्वप्रथम एक गोष्ट मान्य केली पाहिजे, की मागल्या काही वर्षात मी लोकसत्ता हे दैनिक जवळपास वाचलेले नाही. क्वचित एखाद्या बातमीची लिंक फ़ेसबुक वा अन्य मार्गाने पोहोचली वा कोणी आग्रह धरला तर तितकाच लोकसत्ताशी संबंध राहिला. पण अन्यथा गिरीश कुबेर संपादक झाल्यापासून वा कुमार केतकरांनी लोकसत्तेचा निरोप घेतल्यापासून माझा त्या दैनिकाशी संबंध थांबला. त्याचेही कारण आहे. डॉ. अरूण टिकेकर संपादक असताना निव्वळ मनोरंजनासाठी मी त्यांचे अग्रलेख लेख वाचत असे. कारण भरपूर वाचन केलेले असल्याने टिकेकर संदर्भांचा प्रचंड ढिग वाचकापुढे आणून टाकतात. एखाद्या बांधकामाच्या जागी आवश्यक साहित्याचा पुरवठेदार जसा माल टाकतो, तशी टिकेकरांची लेखनशैली आहे. पण त्या ढिगातून कुठलाही आकृतिबंध वाचकाच्या हाती लागत नाही. जे साहित्य हाती असेल, त्यापासून काही आकार-इमारत उभी करावी व निष्कर्ष द्यावेत, असे टिकेकर लिहीत नाहीत. पण कच्चा माल मात्र आणून टाकतात. आणि त्यात त्यांनी निष्कर्ष काढायची उचापत केलीच, तर भयंकर विनोद निर्माण होतात, असा निदान माझा अनुभव आहे. शिवाय कुठलाही सोपा विषय अत्यंत क्लिष्ट भाषेत किती दुर्बोध करता येतो, त्याचे नमुनेच त्यांनी सादर केलेले आहेत. म्हणूनच अगत्याने त्यांचे लेख मी वाचत आलो. पुढे त्यांच्या जागी कुमार केतकर लोकसत्ताचे संपादक झाले आणि त्या वृत्तपत्राच्या संपादकीयात मोठी जान आली. कुमारची गोष्टच वेगळी. तो माझा आवडता लेखक आहे आणि तपशील नेमका व सुटसुटीत मांडताना अर्थाचा अनर्थ करण्याचे अपुर्व कौशल्य कुमारपाशी आहे. पण तुम्ही तपशील सहसा खोटा वा चुकीचा ठरवू शकणार नाही. वडाची साल पिंपळाला लावण्यात कुमारचा हात कोणीही धरू शकणार नाही. पण त्यातला वड किंवा पिंपळ खोटा असू शकत नाही. म्हणून मी तेव्हाच्या लोकसत्ताचे अग्रलेख अगत्याने वाचत असे.

कुबेरांची गोष्ट वेगळी. ते थेट संपादक झाले तोपर्यंत मी त्यांचे काहीही वाचलेले नव्हते आणि ते लोकसत्ताचे अग्रलेख लिहू लागल्यापासून मी तो पेपर वाचणेच बंद केले. काहीही न वाचताच कुबेर यांच्या लिखाणाकडे पाठ फ़िरवणे हा पूर्वग्रहदुषीत गुन्हा म्हणूनच मला मान्य करायला हवा. मध्यंतरी फ़ेसबुक ब्लॉग अशा सोशल माध्यमात मीही येऊन दाखल झालो आणि त्यावर कुबेर यांच्याविषयी उलटसुलट कॉमेन्ट येत असतानाही मला त्यांचे काही वाचावे असे वाटले नसेल, तर ती चुकच म्हणायला हरकत नाही. कारण भाजपा-संघाला पुरक लिहीतात, अशा स्वरूपाचे प्रच्छन्न आरोप कुबेर यांच्यावर तथाकथित पुरोगामी मित्रांकडून व्हायचे. अगदी कुबेरांचा उल्लेख सरसंघसंपादक असाही हेटाळणी स्वरूपात होऊन मला लोकसत्ता वाचायची इच्छा झालेली नव्हती. त्यात चुक काय? तर मराठी वृत्तपत्रातील पोरकट, हास्यास्पद व भरकटलेपणा शोधून त्यावर टिप्पणी करण्याचा माझा उचापतखोर स्वभाव आहे. आणि त्याचे लोकसत्तेत इतके प्रचंड भरलेले गोदाम असताना मी त्या्कडे पाठ फ़िरवणे गुन्हाच नव्हे काय? निखील वागळे वा तत्सम अनेकजण हे माझ्या मनोरंजनाचे विषय आहेत. निर्बुद्धतेच्या कसरती बघण्यासाठी मी सतत त्यांचा पाठपुरावा करीत असतो. गिरीश कुबेर त्यातले ‘कुबेर’ असतील असे कधी वाटले नाही. म्हणून त्या खजिन्याकडे माझे साफ़ दुर्लक्ष झाले. त्यासाठी प्रथम माझ्या वाचकांपुढे क्षमायाचना मला आवश्यक वाटते. त्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे सरसंघसंपादक अशी हेटाळणी होत असताना त्यांनी संघाविषयी काय प्रेमाचे प्रदर्शन मांडले होते, त्याविषयी मी संपुर्ण अनभिज्ञ आहे. त्याचबरोबर यापुर्वी त्यांनी काय अक्कल पाजळली, त्याबद्दलही माझी पाटी कोरी आहे. किंबहूना याकुब मेमनसाठी त्यांनी मातम करण्यापर्यंत कुबेरांनी काय खजिना उधळला, त्याचा मला थांगपत्ता नाही. फ़क्त क्लिष्ट बोजड भाषेत लिहीणारा इतकीच मला त्यांची ओळख होती.

असो. परवा याकुबच्या फ़ाशीदिनी त्यांच्या ‘एक शोकान्त उन्माद’ या अग्रलेखाची लिन्क इतक्या लोकांनी सोशल मीडियात टाकली, की रहावले नाही आणि या क्लिष्ट संपादकावर अन्याय तर होत नाही ना, म्हणून तिकडे मोर्चा वळला. मग जसजसा तो अग्रलेख वाचत गेलो, तसतसे माझे कुतुहल मलाच थक्क करीत गेले. आजवर इतके भुरटे, बेताल, भंपक व बिनबुडाचे संपादकीय माझ्या तरी वाचनात आलेले नव्हते. म्हणजे लेखकाची भूमिका भले आपल्याला पटणारी नसो किंवा नावडती असो, त्याने पुढे केलेला तपशील चुकीचा खोटा असू नये, इतकी किमान अपेक्षा असते. त्याला विषयाची किमान जाण व माहिती असावी, याला अतिशयोक्त अपेक्षा म्हणता येणार नाही. पण या अग्रलेखातून कुबेर यांनी निखील वागळे सारख्या अत्यंत बेताल पोरकट पत्रकारालाही शरमेने मान खाली घालायची वेळ आणल्याचे पाहून, मी थक्क झालो. म्हणून पहिल्यांदा फ़ेसबुकवर तशी प्रतिक्रिया दिली आणि पुन्हा दुसर्‍यांना कुबेरांचा शोकमग्न उन्माद वाचून काढला. या माणसाला लिहीतोय त्या शब्दाचे अर्थ तरी कळतात काय, अशी शंका येते. आक्रोश आणि उन्माद यातला किमान फ़रक कुठल्याही तारतम्य असलेल्या व्यक्तीला उमजू शकतो. ज्याने बलात्कार केला, त्याला पोलिस ठाण्यात पकडून आणल्यावर पिडीत महिलेने त्याच्या थोबाडीत मारण्याला, शिव्याशाप देण्याला उन्माद म्हणतात, की टाहो-आक्रोश म्हणतात? याकुबच्या फ़ाशीच्या निमीत्ताने मुंबई व अन्यत्र ज्या प्रक्षोभक प्रतिक्रिया उमटल्या, त्याला उन्माद असा शब्द वापरणार्‍याला मराठी भाषा कितीशी कळत असेल? कुठल्याही भाषेचा वापर करताना येणारे शब्द त्यामागचे आशय घेऊन येत असतात. उन्माद हा शिरजोरी व मस्तवालपणा केल्यानंतरच्या खिदळणे व त्यातून खिजवणारा पाशवी प्रकार असतो. दिल्लीच्या निर्भया प्रकरणात त्याची प्रचिती आलेली आहे.

धावत्या बसमध्ये चार नरराक्षसांनी त्या मुलीवर सामुहिक बलात्कार केला आणि त्यातही तिने प्रतिकार करून झुंज दिली होती. पुढे ती त्यात शुद्ध हरपून बसली आणि तिच्या त्या प्रतिकारशुन्य देहाची जी विटंबना त्या बलात्कार्‍यांनी केली, त्याला उन्माद म्हणतात कुबेरसाहेब. आणखी बलात्काराचे बळ ज्यांच्यात उरलेले नव्हते, अशा त्या राक्षसांनी तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई खुपसून तिला यातना देण्याचा अमानुष प्रकार केला, त्याला उन्माद म्हणतात. जी गुन्ह्यानंतर विवश पिडीताच्या देह, भावना व मनाशी केलेली क्रुर थट्टा विटंबना असते. उलट बाजू अशी, की इस्पितळात ती पिडीत मुलगी मृत्यूशी अखेरची झुंज देत असताना एकदाच शुद्धीवर आली. त्या अल्पावधीत एकच प्रश्न तिने विचारला होता. ‘त्यांना पकडले का?’ बस्स! आपल्या जगण्यापेक्षा व आपली प्रकृती पुर्ववत होण्यापेक्षा त्या निर्भयाच्या मनाला तेव्हा फ़क्त न्यायाच्या आकांक्षेने व्यापले होते. म्हणून तिने आरोपी पकडले गेले काय, असा एकमेव प्रश्न शुद्धीवर येताच विचारला आणि तेच तिचे शेवट्चे शब्द होते. त्याला सूड म्हणायचे की उन्माद म्हणायचे कुबेरसाहेब? त्या अनुभवातून गेल्यावर निर्भयासाठी जगणे-मरणे यात किंचितही फ़रक उरला नव्हता. तिच्यासाठी अशा अनुभवातून तिला जायला भाग पाडणार्‍यांना कायद्याने कठोर शिक्षा करावी, इतकीच शेवटची इच्छा उरलेली होती. त्यांची शिक्षा हेच तिच्यासाठी जगण्याचे एकमेव उद्दिष्ट उरलेले होते. कायद्याने संरक्षण दिले नाही, तर निदान गुन्हेगारांना शिक्षा तरी त्याच कायद्याने द्यावी, या अपेक्षेला उन्माद म्हणतात काहो कुबेर साहेब? निर्भयाची ती अपेक्षा आणि मुंबईच्या बॉम्बस्फ़ोट मालिकेत बळी पडलेल्या शेकडो लोकांचे आप्तस्वकीय व जखमी जायबंदी होऊन गेलेल्यांची अपेक्षा दोन दशकांनंतरही किंचित भिन्न नाही. आपण गमावले ते मिळणार नाही, पण ज्याचे ते पाप आहे, त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळावी, ही यातनामय अपेक्षा पुर्ण होताना उमटलेल्या भावनांचा उद्रेक उन्माद असतो काहो कुबेर साहेब? तर मग शोक कशाला म्हणायचे? याकुबने बाबरीनंतर शेकडो लोकांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्य़ाचा उद्योग केला त्याला तुमच्या मराठी भाषेत शोकसभा म्हणतात काहो? कुठल्या शब्दकोशातून तुमची मराठी अवतरली ते तरी सविस्तर लिहाल कधी? शोक आणि उन्माद शब्दांचे विवेचन करून समजवाल जरा मराठी भाषिकांना? (अपुर्ण)

19 comments:

  1. ek number lekh...vaachun ji maazhi bhavana zaali hoti,tich tumhi chaan shabdat lihili...

    ReplyDelete
  2. Bhau avdhi maval bhasha nako tyana pachnar nahi thodi tari jahal asavi tyanchya tulnet......

    ReplyDelete
  3. atishay sanyamit lihilay....shabda-devacha varadhasta ahe bhau tumhawar..!

    ReplyDelete
  4. लोकांचा बुद्धीभेद करुन प्रसिद्धी मिळवायचा प्रयत्न करणारया गिरिश कुबेरला जोड्याने हाणला पाहिजे.......सापडला तर नक्की जोडा हाणेन

    ReplyDelete
  5. Unfortunately you proved Mr. Kuber right

    ReplyDelete
  6. भाऊ कुबेरांचा लेख मलाही पटलेला नाही. पण केवळ त्या एका लेखामुळे तुम्ही त्यांची तुलना इतर बाजारू पत्रकारांबरोबर केली हे जरा अतीच, एकीकडे तुम्ही म्हणता कि मी त्याचं लिखाण जास्त वाचत नाही किंवा वाचलेलं नाही आणि दुसरीकडे इतकी उथळ टीका करता हे तुमच्यासारख्या तर्क-कठोर विचारांना सजेस नाही अस मला वाटत. कारण कुबेरांचे विविध विषयांवरचे लेख वाचल्यावर तुम्ही सांगताय त्याची प्रचीती कधी आली नाही. आपला आदर खूप आहे . नियमित वाचक आहे. पण इथे कुबेरांचा एकांगी विरोध तुम्हीपण कराल अस वाटल नव्हत. मला वाटत समाज माध्यमांवर उठसुठ टोकाची टीका करण्याचा संसर्ग भयानक आहे त्याची बाधा निदान तुम्हाला न होवो म्हणून काळजी घ्या. आणि कृपा करून प्रतिक्रियेला उद्धटपणा समजू नका.

    ReplyDelete
    Replies
    1. वाचक महाशय, भाऊ यांची पत्रकारितेतली कारकीर्द आणि कुबेराचे वय यातही फॉर फरक नाही. एखाद्याचा एखादा लेख वाचून भाऊ त्या संबंधिताचा अभ्यास आणि बौद्धिक पात्रता ओळखू शकतात.

      Delete
    2. घाव वर्मी लागलेला दिसतोय.. महाशय निदान कमेंटी नीट वाचून नडा हो उगाच कशाला मधेमधे लांगुन चालन करताय.. असहमती दर्शवणे हाही एक वाचक म्हणून अधिकार असतो. भाऊंचा आदर फ़क़्त सहमती दर्शून अन विषय न समजता वा वा करूनच दाखवायचा नसतो..

      Delete
    3. Bhau cha lekh chan ahe ani bhau je bolale te hi agdi sadetod ani uttam dakhla deun ch bolale....

      Ajun ek shekaryanvishayi alela lekh hota to hi agdich kalicha mudda mhnun udayala ala hota...

      Khi lekh kuberanche ahet changle manya ahe. Mi tyanchi stuti hi krto telache rajkaran tyatla ek pn kuberani jra nitnetke awlokan krave ass mla dekhil vatt

      Delete

  7. भाऊ, कुबेर हे 'क्लिष्ट बोजड भाषेत' लिहितात असे तुम्हाला वाटते यावरून तुम्हालाही भाषेचे किती ज्ञान आहे याविषयी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे… कोटीबाज, शैलीदार लेखन आणि क्लिष्ट, बोजड लेखन यातला साधा फरक तुम्हाला कळू नये याचे आश्चर्य जरूर वाटते…

    ReplyDelete
  8. bhau khupch sanyami bhashet tumhi lihile ahe!! he mr kuber yanna kalel tari ka?? yachich shanka vatate

    ReplyDelete
  9. bhau, mala as vatal ki tumhi headline sodun tyanchyaa agrlekhachi chirfad keliye pan tumhi tar nirbhaya prakarnavarch nimma vel ani shakti kharch keliye...

    ReplyDelete
  10. BHAU, KUBERS LATEST, YESTERDAY THEIR WAS A EDITORIAL 'ASANTANCHE SANT' ON MOTHER TERESA ,TODAY LOKSATTA HAS PUBLISHED FEW REACTIONS NAMALY BY JOEL PAREA, SACHIN MENDIS, FATHER FRANCIS DIBRITO, AND MARKUS DABRE, AND IT'S HIGHT THAT LOKSATTA HAS TAKEN BACK IT'S EDITORIAL!

    ReplyDelete
  11. आमच्या अनुभवानुसार, तुम्ही वर उल्लेख केेलेल्या अग्रलेखाद्वारे कुमार केतकरांचे शिष्यत्व पत्करल्याचे लक्षात आले.त्यानंतर तर त्यांचा वारसा जपायला लागले.खरी व स्पष्ट माहिती दिल्याबद्दल आभार.
    विद्याधर(विजय) कुलकर्णी

    ReplyDelete
  12. Sampadakachya navane paper chalnyache divas gelet asech mhanave lagel.........

    ReplyDelete
  13. लोकसट्टाची सहिष्णुता आहे ती.... केतकर त्या पेक्षा खूपच उजवे आहेत.....

    ReplyDelete
  14. kumar ketkar is not editor, he is the very danger politician and spoke person of congress, he has nothing to do with media in another world he and mr wagle behave like terrorist of media.

    ReplyDelete
  15. श्री टिकेकरांबद्दल वाचून प्रचंड हसलो, इतके समर्पक त्यांच्या बद्दल कोणी लिहले नसेल, स्थळकाळ का काहीतरी त्यांचे सदर वाचत असे तो काळ समजावा म्हणून पण मूठ रिकामी राहिली. सगळी वाळू खाली पडून गेली. आणि हे एशियाटिक मध्ये मुख्य होते म्हणे, कशी ती लोकांपर्यंत पोचणार? वाईकर भटजी कादंबरी senior टिकेकरांनी कितीतरी लोकाभिमुख लिहली आहे....असो, थँक्स

    ReplyDelete
  16. कुबेर संपादक झाल्यापासून लोकसत्ताला ओहोटी लागली, आतातर रोज सकाळी खोट्या बातम्या आणि एकांगी, अतार्किक अग्रलेख वाचून कंटाळा आला म्हणून ते वृत्तपत्र बंद करून टाकलं.

    ReplyDelete