Saturday, April 27, 2019

प्रज्ञासिंग नावाचा सापळा

Image result for pragya singh

राजकारणात किंवा कुठल्याही लढाईत अनेक असे डाव खेळले जतात, जिथे अमूक एक चाल करणारा वेडगळ वाटत असतो. त्याचे नुकसान आपल्याला दिसतही असते. मग तो अशी चाल कशाला खेळतो, असा आपल्याला प्रश्न पडतो आणि आपण त्याला मुर्ख म्हणण्यापर्यंत मजल मारतो. पण जी काही चाल असते, ती आपण आपल्या नजरेने व समजुतीने बघत असतो. आपल्या निकषावर समोरची व्यक्ती तशी चाल खेळत असते असे नाही. किंवा त्यामागे त्याची भलतीच अपेक्षा असू शकते, ज्यावर आपण विचारही केलेला नसतो. सहाजिकच त्याला अशा कृतीतून काय साधायचे आहे, त्याचा आपल्याला सुतराम पत्ता नसतो आणि आपण त्याला खुळ्यात काढायला उतावळे झालेले असतो. असा माणूस वा खेळाडू धुर्त असेल, तर जाणिवपुर्वक तो इतरांकडून झालेली हेटाळणी सहन करतो. पण त्याच्या मनातला सुप्त उद्देश कधीच स्पष्ट करून सांगत नाही. त्यापेक्षा आपला अंतिम हेतू साध्य होईल कसा, याकडे त्याचे बारीक लक्ष असते. जेव्हा अशा खेळी केल्या जातात, तेव्हा त्यात अनवधानाने इतरांनाही वापरून घेतले जात असते आणि त्यांच्याही नकळत असे भाबडे लोक त्या डावाचा एक भाग होऊन आपला वापर होऊ देत असतात. भोपाळमधून भाजपाने साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना उमेदवारी देणे, किंवा मागल्या दिडदोन वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पद्धतशीरपणे राहुल गांधी यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करून त्यांनाच आपल्या विरोधातले प्रमुख स्पर्धक असल्याचे चित्र रंगवणे; तशाच खेळी असतात. त्याचा जाहिर उल्लेख वा उहापोह भाजपाचा कुठलाही नेता करणार नाही किंवा त्यावर होणारी चर्चाही थांबवण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण त्यातून वेगळेच डाव साधायचे असतात. प्रज्ञासिंग यांची उमेदवारी तशीच एक फ़सवी खेळी भाजपाने खेळलेली असू शकते. त्यातून भाजपाला काय साधायचे आहे? ते कितपत साधले गेले आहे?

लोकसभा निवडणूक जवळ येत गेली, तेव्हा कुठेही भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञासिंग यांच्या उमेदवारीचा विषय चर्चेत नव्हता. अगदी पहिल्या मतदानाची वेळ आली, तेव्हाही कुठे हे नाव पुढे आलेले नव्हते. मग अचानक हे नाव समोर कुठून आले? आधी भोपाळची चर्चा सुरू झाली ती कॉग्रेसच्या उमेदवारामुळे. मागल्या तीन दशकात भोपाळ ही जागा भाजपाने कायम जिंकलेली आहे. तिथे भाजपाला सहजासहजी हरवणे शक्य नाही. असे असतानाही अचानक मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी वेगळाच डाव खेळल्याची बातमी प्रथम आली. तिथून कॉग्रेसचे वाचाळ नेते दिग्विजयसिंग यांना उभे करण्याचा विचार असल्याची बातमी आली. त्यामागे आपल्या या प्रतिस्पर्धी नेत्याला पक्षातच पराभवाने नामोहरम करण्याची खेळी कमलनाथ खेळत असल्याचा आरोप होता. तेव्हाही प्रज्ञासिंग यांचे नाव कुठे आले नव्हते. अखेरीस कॉग्रेसमधले वादळ शमले आणि दिग्विजयसिंग उमेदवार असणार यावर शिक्कामोर्तब झाले. मात्र त्यांच्या विरोधातला भाजपाचा उमेदवार कोण, याविषयी कुतूहल होते. उलटसुलट खुप काही बातम्या येत राहिल्या. त्यात एक नाव साध्वी उमा भारती होते. पण त्यांनी नकार दिला आणि अचानक साध्वी प्रज्ञासिंग हे नाव पुढे आले. अनेकांना त्यात तथ्य वाटले नव्हते. कारण त्या मालेगाव स्फ़ोटातील आरोपी असून त्यांनाच भाजपाने उभे केल्यास वादळ निर्माण होईल, अशी शक्यताही वर्तवली जात होती. तरीही शहा मोदींनी त्याच नावावर शिक्कामोर्तब केले आणि तथाकथित पुरोगामी गोटात खळबळ माजली. मात्र अशा वादळाला घाबरून जाणे या साध्वीला शक्य नव्हते. सलग नऊ वर्षे पोलिस कस्टडीत घातपाती दहशतवादी असला आरोप झेलत काढलेल्या या महिलेला नुसत्या आरोपांनी इजा करणे वा भयभीत करणे कोणालाही शक्य नव्हते. उलट नुसता तसा प्रयत्न झाला तरी ती वाघिणीसारखी चवताळून अंगावर जाणार, हे शहा-मोदी जाणून होते. तोच तर खरा डाव होता.

साध्वीला उमेदवारी दिल्यावर भाजपाच्या स्थानिक नेत्यांकरवी त्याची घोषणा करण्यात आली आणि पक्षाध्यक्ष अमित शहा व पंतप्रधानांसह अन्य राष्ट्रीय नेते त्यापासून कटाक्षाने दुर राहिलेले होते. या पत्रकार परिषदेत साध्वीने तोंड उघडले आणि हलकल्लोळ सुरू झाला. एका बाजूला मालेगाव प्रकरणाचा अतिरेक करून अवघ्या हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याच्या कॉग्रेसी मोहिमेचे सुत्रसंचालन केलेला कॉग्रेस उमेदवार आणि दुसरीकडे त्याचाच बळी झालेली एक महिला साध्वी; अशी धुर्त रचना करण्यात आलेली होती. ज्या पोलिस खाते व पथकाकडून आजवर सिद्ध न झालेला आरोप व छळवाद सहन केला; त्याच्यावर साध्वीने तुटून पडावे ही भाजपाची अपेक्षा नव्हती, यावर कोण विश्वास ठेवू शकेल. पण त्या विषयात साध्वीने काही वादग्रस्त विधाने केली तर ती भाजपाला हवीच होती. कारण त्या विधानांना वादग्रस्त बनवुन तमाम पुरोगामी व पत्रकार मंडळी धुमाकुळ घालू लागतील आणि पुन्हा एकदा विस्मृतीत गेलेला हिंदू दहशतवादाचा मुद्दा उकरून काढला जाईल, अशीच अपेक्षा असणार ना? पर्यायाने पुन्हा हिंदूत्वाचे राजकारण सुरू होते आणि त्याचे खापर भाजपावर नव्हेतर साध्वीपेक्षाही तिच्या टिकाकारांच्या माथी फ़ोडले जाते. थोडल्यात पंतप्रधानांसह भाजपाचे सर्व ज्येष्ठ नेते अलिप्त राहून विरोधकांकडूनच हिंदूत्वाचा अजेंडा पटलावर आणला जातो. अर्थात त्यासाठी मालेगाव प्रकरणातला आरोपी हवा आणि त्यानेही वादग्रस्त विधान करायला हवे होते. साध्वीने ती अपेक्षा पुर्ण केलीच. पण त्याहीपेक्षा अवघे पुरोगामी माध्यमविश्व आणि पुरोगामी छावण्या उसळून अंगावर आल्या. हेच तर शहा-मोदींना हवे होते ना? त्यांच्या तोंडातून हिंदूत्वाचा शब्दही उच्चारला गेला नाही आणि राजकीय आखाड्यात हिंदूत्वाचा मुद्दा उडी घेतल्यासारखा आला. म्हणून साध्वी प्रज्ञासिंग हा उमेदवार नव्हता व नाही. तो पुरोगाम्यांसाठी लावलेला सापळा मानावा लागतो.

या एका खेळीतून मागल्या वर्षभरात राहुल गांधी व अन्य कॉग्रेस नेत्यांनी झिजवलेल्या हिंदू मंदिरांच्या पायर्‍यांचे पुण्य वाया गेलेले आहे. मागल्या लोकसभेत कॉग्रेस पक्षाचा धुव्वा उडाला, त्याचे मुख्य कारण तो हिंदूविरोधी पक्ष असल्याची त्याची प्रतिमा होय, असा अभ्यास अहवाल पक्षाच्याच अन्थोनी समितीने दिलेला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठीच दिडदोन वर्षात गुजरातच्या विधानसभा निवडणूकीपासून कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वाटेत दिसेल अशा कुठल्याही मंदिरात जाऊन पुजाअर्चा करण्याचा सपाटा लावलेला होता. आपण हिंदूविरोधी नाही किंवा हिंदूंवर दहशतवादाचा आरोप करीत नाही; असे चित्र बनवण्याचा तो आटापिटा होता. अशावेळी दिग्विजय यांच्या विरोधात प्रज्ञासिंगना आणून भाजपाने मुद्दामच ह्या जखमेवरची खपली काढलेली आहे. त्यात साध्वी प्रज्ञा यांच्या वाणीवर कुठलाही प्रतिबंध पक्षाने लावलेला नाही. व्यक्तीगत आयुष्यातील वेदना दु:खावर बोलण्यास त्यांना कुठलाही कायदा रोखू शकत नाही. त्यात पुन्हा समोरचा उमेदवार दिग्विजय असला, मग मोकाट बोलण्याची सोय असते. कारण त्यानेच तर मागल्या सहाआठ वर्षात जगभर हिंदू दहशतवादाचा डंका पिटलेला आहे आणि त्यासाठी साध्वीचे खुलेआम नाव घेतले आहे. मग एका उमेदवाराला आपले दु:ख सांगायची बंदी कशी असू शकते? पण जितकी साध्वी मोकाट बोलणार, तिला दिग्विजय नेहमीच्या तिखट भाषेत प्रत्युत्तर देऊ शकत नाहीत. मग तोंड दाबून बुक्क्याचा मार खाण्यापलिकडे त्यांना दुसरी कुठली सोय नाही. मात्र भोपाळमध्ये ही जुगलबंदी रंगली नाही व दिग्विजयसिंग मौन राहिले, तरी माध्यमातून त्यावर गदारोळ होणारच. त्याचे देशव्यापी पडसाद उमटत रहाणारच. आपोआप हिंदूत्वाचा मुद्दा कानाकोपर्‍यात माध्यमे व त्यातली चर्चा घेऊन जाणार आणि भाजपा नेते त्यापासून नामानिराळे रहाणार. जितके आरोप साध्वीवर होणार, तितका अस्वस्थ हिंदू भाजपाच्या गोटात ओढला जाणार ना?

इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की साध्वी प्रज्ञासिंग भावनेच्या आहारी जाऊन एटीएसप्रमुख हेमंत करकरे यांच्याविषयी शापवाणी उच्चारल्या, हे अजिबात खरे नाही. त्यांनी अतिशय जाणिवपुर्वक ते विधान केलेले आहे आणि म्हणूनच त्यांनी आपले व्यक्तीगत मत असल्याचा खुलासा केलेला आहे. त्यातल्या शापवाणीपेक्षाही पुरोगामी जगतातून प्रक्षोभक देशव्यापी प्रतिक्रीया माध्यमातून उमटावी; ही त्यांच्यापेक्षाही भाजपाच्या गोटातली अपेक्षा असणार. म्हणूनच त्याला सापळा म्हणावे लागते. शब्द मागे घेण्याने त्याचे परिणाम संपत नसतात. २६/११ च्या मुंबई हल्ल्यात करकरे मारले गेल्याने त्यांच्याविषयी लोकांना सहानुभूती नक्कीच आहे. परंतु हयात असताना त्यांनी हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी ज्या कारवाया व विधाने केली; त्यामुळे विचलीत झालेला समुदाय अधिक मोठा आहे आणि त्याला साध्वी व कर्नल प्रसाद पुरोहित यांच्याविषयी अधिक आत्मियता होती व आहे. त्याच भावनांना जागवण्याचे काम या शापवाणीतून झालेले आहे. नंतर शब्द मागे घेतले गेल्याने त्या भावना मावळत नसतात आणि तेव्हाच्या जखमेवरची निघालेली खपली प्रतिक्रीया देतच असते. पण हे विधान व शापवाणी भोपाळपुरती राहिली असती, तर तिचे पडसाद देशभर उमटले नसते. ते काम एकट्या साध्वीच्या शब्द वा शापवाणीतून झाले नसते. पुरोगामी प्रक्षोभ व माध्यमातला गदारोळ झाला नसता, तर ती खपली निघाली नसती आणि इतक्या मोठ्या संख्येने भोपाळच्या बाहेर दुसरीही प्रतिक्रीया उमटण्याची शक्यता नव्हती. त्यासाठी पुरोगामी उतावळ्यांचे सहकार्य त्यांची इच्छा नसतानाही मोदी-शहांनी साध्वीला उमेदवारी देऊन सहज मिळवलेले नाही काय? अर्थात भाजपाचा कोणी नेता हा डाव मान्य करणार नाही. पण परिणाम कोणी नाकारू शकत नाही. साध्वीची उमेदवारी भोपाळपुरती आहे. पण भाजपाला अपेक्षित हिंदूत्वाच्या भावना देशव्यापी चाळवल्या गेल्या ना? याला म्हणतात सापळा!

24 comments:

  1. जे नाण खणखणीत वाजतं आहे त्या नाण्याची दुसरी बाजू दाखवली भाऊ तुम्ही.
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाराणसी पेक्षा भोपाळ ची जागा अलगदपणे देशात सगळ्यात प्रतिष्ठेची जागा करून टाकली.

    ReplyDelete
  2. भाऊ आम्ही मोदीला गुजरात विकासाचे मॉडेल म्हणून मत दिले.हिंदुत्ववादी म्हणून नव्हे.प्रज्ञा सिंगचे मत म्हणूनच आमच्या सारख्या मतदाराला बेताल बडबड वाटते.

    ReplyDelete
    Replies
    1. SECULARISM AN OPIUM PILL CUNNINGLY ADMINISTERED BY CONGIS,LEFTIST TO FOOL HINDUS.

      Delete
  3. अफाट भाऊ.....अफलातून...

    ReplyDelete
  4. चैतन्य म करंबेळकरApril 27, 2019 at 11:29 PM

    भाऊ, लेख राजकारण उलगडून दाखवणारा आहे,पण एक शंका आहे, भाजप विकासाच्या मुद्द्यावर मते मागत असताना हिंदुत्वाच्या मुद्द्याचे पुनरुज्जीवन करण्याची जोखीम खरोखर घेईल ?
    तुमचे लेख वाचून " राजकारण म्हणजे गजकरण,या भानगडीत न पडलेलं बरे" ही मानसिकता बदलली हे खरे आहे!


    ReplyDelete
  5. भाउ
    खरंच करकरे शहिद आहे? असेल तर फक्त पुरोगामि सत्यानुसार.
    सिनेमात दाखवता तसा वापरुन शेवटि दुर केला त्याला. तो पलटला तर राजमाता धोक्यात. मग काटा काढला नि वर उदो उदो, शहिद शहिद.
    एकदा शहिद बनवला कि त्याचे पापं झाकले जातिल हि खेळि. मग त्याचि अस्लियत सांगितलि कि पेड लेफ्टिस्ट मिडिया भुंकणार.
    पण तरिहि लोकं खरं जाणुन आहेत.

    ReplyDelete
  6. Not only that much. In future this may re open the investigation which may incriminate many stalwarts. As per my opinion Mr. Karkare was used as Pown and was eliminated by the masterminds. It is heard that Mr. Karkare had expressed wish to resign little earlier to the incident of 26/11.

    ReplyDelete
  7. भाऊ, कसल्या सापळ्यांचा ऊल्लेख करताय...लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्यासाठी आणि देशाला प्रगतीपथावर नेऊन समाजजीवन उंच्चावण्यावर भर असावा. प्रत्येक निवडणुकीत जातीय अथवा धार्मिक भावना भडकावून देशाला एकसंध कसं करणार..... तुर्तास या सापळ्यात कोण अडकेल.. राजकीय नेते की देश����������

    ReplyDelete
  8. वा!!या कहाणीचा हा नवीनच पैलू पुढं आणला तुम्ही तर भाऊ!!👍👍

    ReplyDelete
  9. २६/११ च्या मुंबई हल्ल्यात करकरे मारले गेल्याने त्यांच्याविषयी लोकांना सहानुभूती नक्कीच आहे. परंतु हयात असताना त्यांनी हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी ज्या कारवाया व विधाने केली; त्यामुळे विचलीत झालेला समुदाय अधिक मोठा आहे.

    भाऊ काका, अगदी खरे आहे.

    ReplyDelete
  10. स सुपर भाउ.मोदी शहा हे करु शकतात,मोदी मुलाखतीत साध्वीच्या उमेदवारीच समर्थनच करताना दिसतात.आज तक वर तर मुद्दामच symbolic उमेदवारी दिलीय अस म्हनाले.

    ReplyDelete
  11. भाऊ, खरे आहे . मी स्वतः विखे यांना मतदान करण्याच्या मुड मध्ये नव्हतो पण साध्वी यांच्या उमेदवारी मुळे विखे यांचे एक मत निश्चितच चाढले

    ReplyDelete
  12. Agadi barobar aani chapakhal varnan

    ReplyDelete
  13. अतिशय समय सूचक विवेचन !
    23 मे रोजी भाजपाचा हा सापळा कसा योग्य आहे , ते समजेलच ! तो पर्यंत ॐ शांतिः शातिः शांतिः ।

    ReplyDelete
  14. खरेतर साध्वींना अड़कवण्याच्या कारस्थानाचे नायक आपले साहेबच आहेत असे वाटते. या कारस्थानाला सुरुवात त्यांच्या स्टेटमेंटपासून झाली होती.

    ReplyDelete
  15. भाऊ मी तुमचे लेख आवडीने वाचतो. त्याचसोबत तुमचे यू ट्यूब वरील व्हिडिओज देखिल पाहतो. तुम्ही ज्या पध्दतीने राजकीय विश्लेषण करता त्या प्रमाणे दुसरे कोणीच करू शकत नाहीत. टीव्ही चॅनेल वरील तथाकथित राजकीय विश्लेषक हे अतिशय वर वरच्या गोष्टीवर विश्वास ठेवून विश्लेषण करतात. पण तुमचे लेख वाचून मला समजले की खर राजकारण कसे असू शकते. धन्यवाद!

    ReplyDelete
  16. Fielding PRAGYA THAKUR as a candidate was indeed a Modi Masterstroke. Besides, Pragya's seemingly shocking outburst at the press conference was no Faux Pas but a well planned tactical statement.
    Modi's soft stand on Hindutva off late was perhaps alienating Hindus. The advent of Pragya Thakur can go a long way in winning back the alienated Hindu Voter and at the same time expose the Hypocrisy and Double Standards of the Congress and combined Opposition.
    Excellent insights Mr.Torsekar ��

    ReplyDelete
  17. मोदी-शहा चतुर आहेत.. साध्वी हि विनाकारण हिंदू दहशतवाद या नाटकाची बळी पडली हे हि खरे.. पण लोकशाहीची लढाई कुठे चालली आहे? हि लोकशाहीची अवहेलना वाटते.. मतांचे ध्रुवीकरण हेच ध्येय असल्यासारखं वाटतंय.. आता या राजकारणाचा कंटाळा यायला लागलाय, खरंच कोणाला सामान्य माणसाची लढाई लढून सामान्य माणसाला जिंकण्यासाठी हे निवडणूकीचे माध्यम वापरायचे आहे कि फक्त स्वतःची पोळी भाजून घ्यायची आहे हेच कळेनासे झाले.. मोदींवरती किती विश्वास ठेवावा असा कधी कधी प्रश्न पडतो.. पण तरी अजूनतरी बाकीच्यांपेक्षा मोदी बरे हाच निकष आहे..

    ReplyDelete
  18. Khseli tr rk no. Hoti pn me pn ek hindu aahe .. Trihi sangto hindu dahshdvaad ka karu shakt nahit karu shktat na..? Dshshtvadi konihi asu shkte kontyahi darmacha asu shkto..... Aani heman karkare yani kahi vidhan kele astil manun te cukiche houuuu shakt nahit na .. Tyani pran dila 26 11 mdhe jr tse ase tr te duty vrti gelech nste base of politics ..... Mala ase vatate ki modi sadya dharmache rajkaran करत aahet

    ReplyDelete