Sunday, April 21, 2019

कॉग्रेसमधली बेबंदशाही?

Related image

या निवडणूकीत गांधी घराण्यातील प्रियंका हा तिसरा सदस्य थेट राजकारणात उतरला आहे आणि त्याचा नरेंद्र मोदी वा भाजपाला किती फ़टका बसेल; याचा उहापोह खुप झाला आहे. पण इतरही बरेच परिणाम त्यातून संभवतात, त्याची फ़ारशी मिमांसा झाली नाही. मोदी व अखिलेश मायावती यांना दणका देण्यासाठी राहुल गांधींनी खेळलेला मास्टरस्ट्रोक, अशी प्रियंकांच्या राजकारण प्रवेशाची चर्चा खुप झाली. पण त्यातले इतर पैलू अजून गुलदस्त्यात आहेत. ते जसे प्रियंकांनी झाकून ठेवले आहेत, तसे़च राहुल-सोनिया आणि कॉग्रेसनेही त्याविषयी बोलायचे टाळलेले आहे. त्यापेक्षाही नवलाची गोष्ट म्हणजे माध्यमातील दिग्गजांना वा राजकीय विश्लेषकांनाही त्यावर बोलायची गरज वाटलेली नाही. की त्यामुळेच अस्वस्थ होऊन प्रियंकाचा पती व वादग्रस्त उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांनी आपले तोंड उघडलेले असेल? या आठवड्यात अकस्मात एका वाहिनीशी बोलताना वाड्रा यांनी वाराणशीत पंतप्रधानांच्या विरोधात लढत द्यायला प्रियंका सज्ज असल्याचे सूतोवाच केलेले आहे. म्हणजे प्रियंका तिथून निवडणूक लढवायला तयार आहे. तिने तशी संमतीही दिलेली आहे. पण तिला उमेदवारी द्यावी किंवा नाही, त्याचा निर्णय पक्षाने घ्यायचा आहे. वाड्रा असे म्हणतात तेव्हा कॉग्रेस पक्ष म्हणजे तरी कोण व काय; असा प्रश्न आधी विचारला गेला पाहिजे. कारण कॉग्रेसचे सर्व निर्णय सोनिया-राहुल हेच घेत असतात आणि अधूनमधून प्रियंकाही त्या निर्णयप्रक्रीयेत सहभागी होत असते. अन्य कोणी कॉग्रेस पक्षांतर्गत कुठला निर्णय घेतल्याचे एकविसाव्या शकतात तरी कोणी ऐकलेले नाही. मग वाड्रा कुठल्या कॉग्रेसविषयी बोलत आहेत? की प्रियंका लढतीला वा नेतृत्वाला सज्ज असूनही तिचा बंधू व मातेनेच अडवणूक चालविली असल्याची जाहिर तक्रार प्रियंकापतीने केलेली आहे? ही गांधी घराण्यातली नवी बेबंदशाही तर नाही ना?

प्रियंका वाराणशीतून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभी रहाण्याला राजकीय संदर्भाने वेगवेगळे महत्व आहे. त्यातले पहिले महत्व म्हणजे मोदींसाठी कॉग्रेसने जागा मोकळी सोडली नाही आणि तिथे तगडा उमेदवार दिला; असाच सोपा अर्थ लावला जाऊ शकेल. थेट देशातल्या लोकप्रिय नेत्याला भिडण्याची हिंमत प्रियंकामध्ये आहे, असाही अर्थ लावला जाईल आणि तोच खरा कळीचा मुद्दा आहे. कारण आपल्या बालेकिल्ल्यातून राहुलने पळ काढलेला आहे. तीनदा जिंकलेली जागा आणि त्यापुर्वीही अनेकदा गांधी खानदानाच्या कुणा सदस्याने सतत जिंकलेली जागा, अशी अमेठीची ख्याती आहे. पण मागल्या खेपेस तिथून भाजपाच्या आक्रमक नेत्या स्मृती इराणी यांनी जबरदस्त लढत दिली आणि प्रथमच कुणा गांधी कुटुंबियाला अमेठीत हाणामारी करून जागा जिंकण्याइतपत लढत द्यावी लागलेली आहे. त्यानंतरही पराभूत इराणी अमेठीच्या संपर्कात राहिल्या आणि मोदी सरकारमध्ये मंत्री असल्याने अमेठीसाठी विविध योजना घेऊन गेलेल्या आहेत,. पंधरा वर्षात खासदार असून आणि त्यात दहा वर्षे सत्ता हाती असून; राहुलनी अमेठीत काहीच केले नसल्याने इराणी यांनी पराभवानंतर केलेली विकासकामे मतदाराच्याही नजरेत भरलेली आहेत. किंबहूना त्यामुळेच पर्यायी व्यवस्था म्हणून राहुलनी केरळातील सुरक्षित अशी वायनाडची दुसरी जागा लढवण्याचा निर्णय घेतला. थोडक्यात राहुल आपल्या बालेकिल्ल्यातच लढत द्यायला घाबरलेले आहेत. हे चित्र तयार झालेले आहे. माध्यमे वा कॉग्रेसने कितीही इन्कार केले, तरी ती समजूत पुसून काढता येणार नाही. या पार्श्वभूमीवर प्रियंकाच्या वतीने पती वाड्रा यांनी वाराणशीत लढायची केलेली घोषणा तपासली पाहिजे. हा पतीदेव आपल्या पत्नीचे कौतुक करतोय, की आपल्या मेहुण्याचा पळपुटेपणा ओरडून सांगतो आहे? की प्रियंकाचे पंख राहुल सोनियाच छाटत असल्याची बातमी वाड्रा देतो आहे?

लोकप्रिय नेता वा वारंवार निवडून येणार्‍या कुणा उमेदवाराच्या विरोधात कोणी नाव घेण्यासारखा उमेदवार अन्य पक्षाने टाकला, तर चर्चा होतच असते. बेल्लारीमध्ये सोनियांच्या विरोधात सुषमा स्वराज लढल्या; तेव्हा गाजावाजा झालेला होता. पण तेव्हाच अमेठीतून सोनियांच्या विरोधात लढलेल्या उमेदवाराचे नावही फ़ारसे चर्चेत आले नव्हते. दिग्गज उमेदवाराच्य विरोधात कोणी दणकट उमेदवार असला, तर चर्चा होते. म्हणूनच मागल्या खेपेस केजरीवाल दिल्ली सोडून वाराणशीत लढायला गेले होते. त्यांनी मोदींसमोर सपाटून मार खाल्ला ही गोष्ट वेगळी. पण चर्चा झाली ना? कारण सपा- बसपा, कॉग्रेस हे प्रमुख मोठे पक्ष असूनही, त्यांचा कोणी मोठा नेता मोदींच्या समोर उभा ठाकला नव्हता. आताही इराणींच्या आव्हानाने राहुल गडबडले आहेत. तर कॉग्रेसने आक्रमकता दाखवायला वाराणशीत आपला मोठा उमेदवार दिला पाहिजे. पण अजून त्याची कुठे वाच्यता नाही आणि मध्यंतरी पुर्वांचलाच्या दौर्‍यावर असताना प्रियंकानी त्याची तसे सुचक संकेत दिले. तेव्हा त्यांना निवडणूक लढणार काय विचारले गेले होते. त्यांनी वाराणशीतून लढू काय? असा प्रतिसवाल केला होता. त्यावर खुप चर्चा झाली. पण पुढे काही हालचाल नव्हती. त्याचे कारण एकच असते. गांधी घराण्याचा कोणी उमेदवार असा पराभवाच्या छायेत उभा राहिला, तर कॉगेसला तोंड वर कढायला जागा उरणार नाही. शिवाय प्रियंकाला ट्रंपकार्ड मानलेले असेल तर तिचा पराभव म्हणजे खेळ खल्लास म्हणायचा ना? म्हणूनच मग हमखास पराभवाची किंवा चमत्कारानेच जिंकायची शक्यता असलेल्या जागी प्रियंकाने लढावे का? विश्लेषकांना तो खुळेपणा वाटेल आणि कॉग्रेसला उरलासुरला हुकूमाचा पत्ता मातीत जाण्याचे भय वाटेल. पण प्रियंका व वाराणशी हा इतक्यापुरता मामला आहे नाही. उलट मोदींशी लढताना पराभूत होऊनही प्रियंका मोठी राजकीय बाजी मारू शकते.

कुणाला चटकन पटणार नाही. पण वस्तुस्थिती तशीच असते. कोणा मोठ्या लोकप्रिय नेत्याशी लढताना पराभूत होऊनही मोठी बाजी मारली जाऊ शकते. प्रामुख्याने जेव्हा कॉग्रेसचा अध्यक्ष आपल्या बालेकिल्ल्यातून पराभवाच्या भयाने दुसरा सुरक्षित मतदारसंघ शोधतो, तेव्हा त्याच पक्षाची सरचिटणिस व भगिनी सर्वात प्रभावशाली पंतप्रधानाच्या विरोधात उभी ठाकते, म्हणून ती हिंमतबाज दिसत असते. खास करून पक्षाध्यक्ष भावाला आपलीच हक्काची जागाही खात्रीची वाटत नाही किंवा वाराणशीत जाऊन मोदींना आव्हान देण्याची हिंमत नाही, तेव्हा प्रियंकाने वारणशीत उभे रहाण्याचा अर्थ, एकूण राजकारणातली मोठी घटना असते. त्यात विजय पराजयालाही अर्थ उरत नाही. अजिंक्य मोदींना आव्हान देण्याची हिंमत निर्णायक परिणाम घडवित असते. अशा बहिणीसमोर अध्यक्ष भाऊ फ़िका पडतो, दुबळा ठरतो. किंबहूना वाराणशी लढायचे संकेत देऊन प्रियंकाने तोच मोठा डाव टाकला आहे. त्यातला डाव दिसायला भाजपा मोदींसाठी असला; तरी पेच मात्र बंधू राहुल व कॉग्रेस पक्षाला टाकला आहे. वाड्रा यांनी प्रियंका सज्ज असल्याचे केलेले निवेदन म्हणूनच भाजपासाठी नसून राहुलना दिलेले आव्हान आहे. राहुलमध्ये मोदींना भिडण्याची हिंमत नाही आणि बहिण प्रियंका ती हिंमत करायला तयार असताना लेचापेचा सेनापती लढाई सोडून पळ काढतो आहे. असा वाड्रा याच्या ताज्या विधानाचा अर्थ आहे. कॉग्रेसपाशी अस प्रचप्रसंग आहे, की आताच प्रियंकाचे कार्ड वापरून संपवायचे काय? त्यातून राहुलचा नाकर्तेपणा जगासमोर आणायचा काय? कारण प्रियंका लढून पडली तरी हिरोच ठरेल आणि राहुल काठावर अमेठीतून जिंकले, तरी पळपूटेपणा लपणारा नाही. याच अडचणीत राहुल असल्याने प्रियंकाला आपले वजन पक्षात व जनमानसात वाढवून घ्यायचे आहे. म्हणूनच ही कॉग्रेस पक्षातले निकटवर्ति व गांधी कुटुंबातली बेबंदशाही वाटते आहे.

वरकरणी कोणाला ही वाड्रा वा प्रियंकाने भाजपाला दिलेली हुलकावणी वाटणे स्वाभाविक आहे. पण वाराणशी हा प्रियंकाने काढलेला विषय माध्यमांना चटकदार हेडलाईन म्हणून केलेली विधाने अजिबात नाहीत. कुटुंबाच्या अंतर्गत व भावाबहिणीत रंगलेल्या सत्तास्पर्धेचा झरोक्यातून दिसणारा घटनाप्रसंग आहे. कार्यकर्ते व कॉग्रेसप्रेमींना त्या मुलीमध्ये इंदिराजी दिसत असतील, तर राजकारणापासून प्रियंकाला कटाक्षाने दुर ठेवण्याचा सोनियांचा अट्टाहास समजून घेता येत नाही. व्यक्तीमत्व किंवा जनसंपर्क अशा बाबतीतही राहुलपेक्षा र्प्रियंका प्रभावी असल्याचे कोणी नाकारू शकत नाहीत. तोंडावर ताबा ठेवून मोजक्या शब्दात संकेत देण्याची तिची शैली व समज कौतुकास्पद आहे. प्रामुख्याने राहुलच्या बेताल बडबडीच्या तुलनेत सामान्य माणूस वा पक्ष कार्यकर्त्यालाही प्रियंकामद्ये भविष्य दिसणे स्वाभाविक आहे. ती जाणिव झाल्यानंतर ही मुलगी आपल्या महत्वाकांक्षा सुचीत करू लागली आहे काय? तिला आपल्या घरातले बंधन व दडपण झुगारून राजकारण खेळायचे आहे काय? नसेल तर तिनेच एका प्रसंगी वाराणशीचा उल्लेख करणे व पक्षातून वा राहुलकडून कुठलाच प्रतिसाद नसताना अकस्मात तिच्या पतीने पुन्हा वाराणशीचा विषय उकरून काढणे, सोपे वाटत नाही. तिथले मतदान शेवटच्या फ़ेरीत व्हायचे असून उमेदवारी अर्ज भरणे व माघार घेण्याची मुदत एप्रिल अखेरीस संपणार आहे. म्हणजेच २९-३० एप्रिलपर्यत आठवडाभर सवड आहे. कॉग्रेसने तिथला उमेदवार अजून जाहिर केलेला नाही. अशा स्थितीत वाड्राने हे विधान करणे ,राहुल सोनियांवर आणलेले दडपणच नाही काय? की प्रियंका आपल्या पतीच्या तोंडातून आपल्या इच्छा व महत्वाकांक्षा बोलून दाखवते आहे? कारण वाराणशीतला पराभवही तिला भावापेक्षाही मोठा नेता व आक्रमक लढवय्या ठरवू शकते. हे तिला नेमके कळलेले आहे. तिथूनच बेबंदशाही सुरू झाली आहे काय?

13 comments:

  1. वेगळा विचार पण अस असु शकत.सत्ता व राजकारण फार निष्ठुर असत.

    ReplyDelete
  2. भाऊ तुम्ही जे म्हणताय, तोच विचार माझ्या मनात आला होता. ...
    हे प्रकरण राहुल गांधी ला जड जाणार हे नक्की.

    ReplyDelete
  3. उत्तम विष्लेषण.

    ReplyDelete
  4. ही पण बाजू असू शकते परंतु सोनिया बाई धूर्त आहे ती असे काही होऊ देणार नाही

    ReplyDelete
  5. ‖ हरि ॐ ‖

    आदरणीय भाऊ तोरसकर जी,

    मी आपल्यापेक्षा खूप लहान आहे.
    पण आपला हा लेख वाचल्यानंतर मला असे वाटते की आपल्याला बेबंदशाही न म्हणता भाऊबंदकी म्हणायचे असावे ...
    औद्धत्याबद्दल आधीच माफी मागतो ...

    विराज नाईक ...

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर आहे, शब्दांत दुरूस्ती

      Delete
  6. भाउ , तुमचे विश्लेषण अगदी संयुक्तिकच आहे. राॅबर्ट भाउजींनी मेव्हण्याला आणि सासूला कात्रीत पकडले आहे. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती आणली आहे. तुमच्या विश्लेषणाशी मी शंभर टक्के सहमत आहे.

    ReplyDelete
  7. भाऊ, तुस्सी ग्रेट हो.. 🙏🙏

    ReplyDelete
  8. का हे असे आहे की मला जेल मध्ये जाण्यापासून वाचवा

    ReplyDelete
    Replies
    1. नागरिक,

      मलाही नेमकं असंच वाटतंय. रॉबर्ट जावईबापूंना तुरुंगात जाण्यापासून वाचविण्यासाठी पप्पू कुचकामाचा गडी आहे. सोनिया वा प्रियांकाचाच भरवसा देता येऊ शकतो. सोनिया वयस्कर आहेत. मग राहिला पर्याय प्रियांकाचा, असं काहीसं गणित दिसतंय.

      आपला नम्र,
      -गामा पैलवान

      Delete
  9. Nice Article. Please keep posting this type of inspirational posts in the future. Get the latest free Nykaa coupons here only.

    ReplyDelete
  10. Bhau
    yes Its Raga Vs Priyanka & After election new Episodes will be very much Interesting & Entertaining.

    As per my Updates there is fight between both of them for Cong leadership & they have their own supporters within the Party.
    At the same Time Rajmata is in favor on her Son as usual.

    So there going to be allot coming on this. Again a game is making her in charge for U.P. Polls is also to protect Pappu. Because it will be easy to save Pappu by saying that Cong didnt do well in U. P. & so they lost & culprit will be the in charge for U. P. which is Wadra Bai.

    So do write on this internal war withing them Bhau.

    ReplyDelete