Wednesday, April 3, 2019

‘मटा’ रडे खोटा-रडे

कधीकाळी महाराष्ट्राच्या दोन पिढ्या महाराष्ट्र टाईम्सच्या अग्रलेखांनी सुशिक्षित व समजूतदार बनवण्याला मोठा हातभार लावलेला आहे. गोविंद तळवलकर यांचे संपादकीय लेख लोकांना राजकारण समाजकारण यातली गुंतागुंत समजावण्यात मोठी कामगिरी बजावत होते आणि सामान्य लोकांना रहस्य वाटणार्‍या घडामोडींचा हळुवार उलगडा करण्यात त्यांच्या अग्रलेखाचा हातकंडा होता. पण आजकाल त्याच मटामध्ये अग्रलेख कोण लिहीतो वा कशासाठी छापला जातो, असा प्रश्न लोकांना पडत असतो. कारण सामान्य वाचकालाही जे सहज समजले आहे किंवा उलगडले आहे, अशा सोप्यासरळ गोष्टी अकारण गुंतागुंतीच्या करून सांगण्यासाठीच हा अग्रलेख ओळखला जाऊ लागला आहे. त्यात काय लिहीले आहे आणि कशाशी संबंधित आहे, ते बहुधा लिहीणार्‍यालाही ठाऊक नसते. अन्यथा इतके असंबंद्ध लिखाण दहावीच्या विद्यार्थ्यालाही प्रयत्नपुर्वक करता येणार नाही. दि. २९ मार्चच्या ‘भाजप आणि काँग्रेसची रणनीती’ अग्रलेखात मटाकार काय लिहीतात, त्याच्या एक एक वाक्याचे पोस्टमार्टेम करायला गेल्यास बहुधा ते राहुल गांधींनी लिहीलेले असावे असेच वाटते. कारण आजच्या भारतीय सार्वजनिक जीवनात इतकी असंबंद्ध मांडणी दुसर्‍या कोणाला शक्य नाही. नुसती सुरूवातच बघा, ‘यंदाची लोकसभा निवडणूक ही २०१४ सारखी एकतर्फी ठरेल, असे वाटत नाही. निदान वरकरणी तरी तसेच भासत आहे.’ मुद्दा तुम्हाला भासते काय त्यापेक्षा तुम्हाला खात्रीपुर्वक वाटते काय, याचा निष्कर्ष अग्रलेखात मांडायचा असतो. की त्याचेही भान उरलेले नाही? एकतर्फ़ी निवडणूक होईल असे प्रत्येक बाजूच सांगत असते. मग ते मोदी असोत किंवा त्यांचे विरोधक असोत. हे नेहमीचेच झालेले नाही काय? मग त्यात भास आभासाचा प्रश्नच कुठे येतो? मैदानात उतरलेला प्रत्येकजण आपल्याच विजयाचे हवाले देत असतो. पत्रकाराला भासाच्या आधारावर विश्लेषण जरून चालते काय?

एखादी गोष्ट तुम्हाला भासते तशी नसतेही. कारण भास फ़सवा असतो. त्याला कसला आधार नसतो. प्रचार अपप्रचार किंवा मतचाचण्या आणि बातम्या, यातूनच एक प्रतिमा तयार होत असते. देशाच्या कानाकोपर्‍यात प्रत्येक पत्रकार जाऊ शकत नाही. सहाजिकच इतरांच्या बातम्या व अहवाल वाचून त्याला आपले निष्कर्ष काढावेच लागत असतात. त्यात काही चुकीच्या बातम्या असू शकतात, तर काही अहवाल दिशाभूल करणारेही असू शकतात. त्यामुळेच कुणा पत्रकार संपादकाकडून आपण पक्के भाकित मागू शकत नाही. पण ज्या विषयावर आपण लिहीत आहोत, त्यातला आशय तरी आकलन झालेला असला पाहिजे ना? की अधांतरी वाटेल ते खरडून द्यायचे? अग्रलेखाचे दुसरे वाक्यही तसेच विनोदी आहे. ‘नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने, तर त्यांना रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी यंदा पुरेसा गृहपाठ केलेला दिसतो.’ गृहपाठ करण्यामुळेच भाजपा मागल्या खेपेस सहज बहूमतापर्यंत पोहोचला होता आणि नंतरच्या विधानसभांतही त्याने मोठी बाजी मारली. पण विरोधकांनी कुठला गृहपाठ केला, त्याचा तपशील लोकांना खरोखर जाणून घ्यायचा आहे. रोजच्या रोज वाहिन्यांचे संयोजक विरोधात आघाड्या व एकमत होऊ शकले नाही, म्हणून कंठशोष करीत असतात. मग मटाकारांना त्यात कुठला गृहपाठ दिसू शकला? हा संशोधनाचा विषय नाही काय? इतका मोठा अग्रलेख लिहीण्यापेक्षा मोदींना वाटते तितकी निवडणूक सोपी नाही हे एक वाक्यही पुरले असते ना? तितकीच छपाईची शाई तरी वाचली असती. ‘उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचा अपवाद वगळता बहुतेक राज्यांत प्रमुख प्रादेशिक पक्षांचे काँग्रेसशी 'सामंजस्य' झाले आहे.’ हा शोध या महाभागांनी कुठून लावला? आंध्रप्रदेश, केरळ वा दिल्ली. तेलंगणा, आसाम ही भारतातील राज्ये नाहीत काय? या राज्यात ९० जागा आहेत ना? तिथे कुठली एकवाक्यता झाली आहे? आता हा सलग अर्धा परिच्छेदच वाचा,

‘गेल्यावेळी उत्तर प्रदेश व बिहारमधील १२० पैकी १०४ जागांची कमाई करणाऱ्या भाजप आघाडीला हे संख्याबळ बहुतांश शाबूत राखले तरच सत्तेत परतण्याची संधी मिळू शकेल. या जाणिवेतूनच भाजपने रणनीती आखली आहे. कर्नाटक वगळता दक्षिणेतील पाच राज्यांमध्ये भाजपला फारशी संधी दिसत नाही. दुसरीकडे उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांची आघाडी झाली असली तरी त्यांचे काँग्रेसशी जमलेले नाही. या दुहीचा फायदा उठविण्याचा मोदी-शहांचा प्रयत्न आहे. पण प्रियांका गांधी वाड्रा यांच्या पदार्पणामुळे तेथील चित्र काहीसे धूसर झाले आहे. मोदी-शहांप्रमाणेच राहुल-प्रियांका यांच्या प्रचारावर काँग्रेसची मदार असेल. त्यांच्यासोबत कन्हैयाकुमार, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, अखिलेश यादव, शरद पवार, मायावती, केजरीवाल, तेजस्वी यादव, कुमारस्वामी, राज ठाकरे, हार्दिक पटेल आदींमुळे कागदावर तरी विरोधी पक्षांच्या प्रचाराचे पारडे जड दिसू शकते. यंदा विरोधी पक्षांच्या ऐक्याला शक्य तितके तडे देण्याला भाजपने सर्वोच्च प्राधान्य दिले. त्याला उत्तर प्रदेश, बंगालमध्ये यशही आले. दुसरीकडे काँग्रेसनेही प्रादेशिक मित्रपक्षांच्या साथीने किमान चारशे मतदारसंघांत एकास एक लढतीच्या माध्यमातून भाजप आघाडीला शह देण्याचे डावपेच आखले आहेत.’

शेंडा ना बुडखा अशी स्थिती आहे ना? ‘विरोधी पक्षांच्या ऐक्याला तडे देण्याला भाजपाने प्राधान्य दिले’ या वाक्याचा अर्थ काय होतो? विरोधी पक्ष वा कॉग्रेस इत्यादि पक्षांची धोरणे वा वाटाघाटी करण्याचे काम त्यांनी भाजपावर सोपवलेले आहे काय? त्यांच्या पक्षात काय किंवा कसे व्हावे, याचेही निर्णय भाजपा वा मोदीशहा घेतात असा या अग्रलेखकाचा समज आहे काय? नसेल तर भाजपाने ‘प्राधान्य’ दिले म्हणजे काय? दुसर्‍या पक्षात काय व्हावे, याचे प्राधान्य भाजपा ठरवू शकत नाही. किंवा भाजपाने काय धोरण ठरवावे, त्याचा निर्णय कॉग्रेस वा बसपात होत नसतो. इतकेही राजकारण या अग्रलेख खरडणार्‍यांना समजू शकत नाही काय? प्राधान्य प्रत्येक पक्षाने आपापले ठरवायचे असते आणि त्यात अन्य कोणाच्या डावपेचांना बळी पडणार नाही, याची काळजी घ्यायची असते. पण इतके छोटे तत्व संपादकांच्या गावीही नसावे. अन्यथा विरोधकांनी काय करावे, त्याचे प्राधान्य त्यांनी विना टेंडर भाजपाकडे कशाला सोपवले असते? विरोधी ऐक्याला भाजपा कसे तडे देऊ शकतो? की ह्या तमाम पक्षानी आपले धोरण व निर्णयही मोदीशहांकडे आऊटसोर्स केले, अशी मटा संपादकांची समजूत आहे? कारण ते असले बालीश वाक्य लिहून थांबलेले नाहीत. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी एक जावईशोधही लावला आहे. विरोधी ऐक्याला तडे जाण्याच्या डावपेचात भाजपाला उत्तरप्रदेश बंगालमध्ये यश आल्याचाही दावा त्यांनी केला आहे. ह्याचा अर्थ राहुलपासून अखिलेश, ममता व मायावती मोदींच्या इशार्‍यावर उठाबशा काढतात, अशी संपादकांची समजूत दिसते. अन्यथा असले राहुल पारायण त्यांनी लिहून छापले नसते. दिवंगत तळवलकरांचा आत्मा कुठे घोटळत असेल, तर त्याला किती यातना होत असतॊल, त्याची नुसती कल्पना करावी. कारण असे फ़क्त राहुल गांधी लिहू शकतात वा बोलू शकतात. आजकाल तेच मटाचे अग्रलेख खरडतात काय?

नंतर उपरोक्त परिच्छेदातील चारशे मतदारसंघात एकास एक लढती देण्याची तयारी मटाकारांनी कुठून शोधून काढली ते शोधावे लागते. दक्षिणेतील चार राज्यात भाजपाला फ़ारशी संधी नसेल तर किमान शंभर जागा आधीच बाद होतात. तेलंगणा, आंध्र, तामिळनाड व केरळात भाजपाला संधी नसेल तर शंभर जागा अशाच बाद झाल्या. म्हणजे उरल्या ४४० जागा. त्यापैकी उत्तरप्रदेश व बंगाल मध्ये तिरंगी चौरंगी लढती होत असतील तर आणखी १२० जागा बाद झाल्या. म्हणजे उरल्या ३२० जागा. जिथे कॉग्रेस व त्यांच्या तथाकथित मित्रपक्षांनी मटाकारांच्या मध्यस्थीने केलेल्या ‘सामंजस्या’मुळे एकास एक लढती होणार आहेत. त्यामध्ये बहुधा ओडीशा नावाचे राज्य मटाकारांना ठाऊकच नसावे. तिथल्या २१ जागा आणखी वगळल्यास उरल्या फ़क्त तिनशे जागा. मग चारशे जागी मटाकार एकास एक लढती कशा घडवू बघतात? की भास आभासात जगायची सवय लागल्याचा हा परिणाम आहे? त्याच मटाचे माजी संपादक कुमार केतकर जसे त्यांच्या सोयीनुसार बुद्धीबळाच्या पटावर पासष्टावे घर निर्माण करून वाढीव चटईक्षेत्र काबीज करायचे; तसे नवे मटा संपादक लोकसभेच्या जागा आपल्याच अधिकारात कमीअधिक करीत असावेत काय? राफ़ायलच्या खरेदी किंमतीत राहुल गांधी दोनशे कोटीपासून सहासातशे कोटीपर्यंत कुठलाही आकडा बेधडक ठोकून द्यायचे. हे संपादक मजकूर बहुधा राहुलकडूनच अंकशास्त्र शिकलेले असावे. अन्यथा त्यांनी अशी आकड्यांची कसरत वा युक्तीवादाची बुळबुळीत लवचिकता कुठून आत्मसात केली असेल? त्या मटा वाचकांची दया येते ज्यांना आजकाल असे काही नासलेले वा बिनसलेले वाचावे लागत असते. शक्य झाल्यास संपादकांनी १९६० पासून १९९५ पर्यंत गोविंदरावांनी लिहीलेले व प्रकाशित झालेले अग्रलेख काढून पुन्हा वाचावेत आणि त्याचे अध्ययन करून अग्रलेख म्हणजे काय, ते जाणून घ्यावे. मग लेखणी उचलावी. मगच प्राधान्य, डावपेच, एकास एक असल्या साध्या मराठी शब्दांचा बोध त्यांना होऊ शकेल. त्यांचा वापरही करता येईल. निदान मटा रडे खोटा रडे म्हणायची पाळी वाचकावर येणार नाही.

26 comments:

  1. भाऊ,
    पानवलकर नावाचे गृहस्थ संपादक आहेत तर कोणीतरी चावके राजकीय लेख लिहीतात. मटा हे काँग्रेसचे मुखपत्र झाले आहे, राहुलप्रभाव असणारच

    ReplyDelete
  2. लोकसत्ताकारांचा नवीन सट्टा ऐकला का

    ReplyDelete
  3. परखड भाउ.अशीच खरडपट्टी लोकसत्तेची पण काढा.तिथेही फार भयानक परीस्थिती आहे.

    ReplyDelete
  4. केतकरांपासुन मटा सुमार झाला होता...
    आता बेसुमार झालाय...

    ReplyDelete
  5. हे वाचकांची दिशाभूल करण्यासाठी असे लिहीत असावेत

    ReplyDelete
  6. भाऊ,महाराष्ट्र टाईम्स हे वर्तमानपत्र माझ्या घरी गेली 2 वर्षे चालु आहे पण त्याचा उपयोग आम्ही महिना अखेरीस रद्दीत विकण्यासाठीच करतो.

    ReplyDelete
  7. भाऊंची मराठी भाषेला देणगी:
    खोटारडा = मटारडा

    ReplyDelete
  8. भाऊ.........लेख छानच...!! तुम्ही ' म.टा.' चा अग्रलेख वाचायचे धाडस केले याबद्दल अभिनंदन. म.टा. च्या संपादकांनाही आठवत नसेल त्यांनी काय खरडले होते ते. अजून एक दाट शक्यता अशी आहे की म.टा संपादकांनी हे अग्रलेख लिहावयाचे काम कोणा शिकाऊ ( आउटसोर्स ) पत्रकाराकडे दिले असावे. बिनकण्याचे हे ' पगारी ' संपादक. सत्ताधारी पक्षही खुश आणि विरोधकही खुश. पाऊस पडूही शकेल अथवा नाहीही असे दोन्हीही लिहिले की समोरचा ' भंजाळला ' गेला पाहिजे. सध्याचे संपादक म्हणजे माहितीच्या ' चुळा ' भरणारे संपादक. चार चॅनेलवरील चर्चा बघा , इंटरनेट वर बातम्या बघा आणि द्या ठोकून एक ' अग्रलेख ' .............नाहीतरी अग्रलेख वाचणारे ग्राहकांमध्ये १% पण नसतील हे निश्चित.

    ReplyDelete
  9. काका, फेब्रुवारी महिन्यातला असाच एक लोकमत (काँग्रेस मत) मधला संपादकीय आठवला. त्यानुसार निवडणूक लागून भाजप फक्त हारायचेच बाकी राहिलेत. त्यात प्रत्येक राज्यांचा ओघवता उल्लेख केलेला होता. त्यानुसार भाजप 200 सुद्धा गाठत नाही. फार हसलो.
    त्यानंतर अजून लोकमत वाचालाच नाही.

    ReplyDelete
  10. भाउ मी मटा विकत घेतो कारण तो 499 रूपयात 365 दिवस पुण्यात घरपोच मिळतो. रद्दी ला चांगला भाव येतो. केतकरां मुळे आधीच अग्रलेखाचा विट आला होता. नवीन संपादक कोण हे माहित नाही. असो रद्दी ला भाव मिळतो खूप झाले.

    ReplyDelete
  11. चांगलीच फिरकि घेतली तुम्ही भाऊ...

    ReplyDelete
  12. Ma Ta ha fakt raddi mhanun bara ahe
    Useless paper Ani sadki mansikta Ani vicharsarni

    ReplyDelete
  13. झणझणीत एनीमा दिला भाऊ तुम्ही. चाटूगीरी तरी किती करावी? यामुळेच यांना २०० रूपयात वर्षभर रद्दी द्यावी लागते. वर एखादी भेटवस्तू पण..

    ReplyDelete
    Replies
    1. १०० % खरं.. माझी बरीच मित्रमंडळी रद्दी देण्यासाठीच घेतल्याचे म्हणतात.. हल्ली लोकसत्ताही रद्दी पुरवायला लागलाय..

      Delete
  14. Bhau do not waste your energy on this third grade raddi paper. What you said is correct

    Prasanna Rajarshi

    ReplyDelete
  15. मटा चे अग्रलेख मी हल्ली द मा मिरासदार आणि पू ल देशपांडेंचे सगळे साहित्य वाचून झाले म्हणून वाचतो. शपथेवर सांगतो, लेख वाचून तेवढेच हसू येते!

    ReplyDelete
  16. भारतातील एका पक्षाने बहुतेक विकाऊ मिडिया विकत घेतला आहे हे तर सर्वांना माहीत असेलच.
    पण त्याहूनही धक्कादायक गोष्ट अशी कि त्या पक्षाने बहुतेक पत्रकार, विचारवंत आणि विश्लेषक हयांनासुद्धा विकत घेतलेले आहे.
    ह्या सर्व प्रतिभावंत मंडळींच्या प्रतिभेचा त्या पक्षाकडून गैरवापर केला जातोय.
    ज्येष्ठ आणि आदरणीय विचारवंत, पत्रकार आणि विश्लेषक कशी आपली सदसदविवेकबुद्धी बासनात गुंडाळून त्या पक्षाची पगारी नोकरी करत आहेत त्याचेच एक ज्वलंत उदाहरण.

    कृपया नोट करा: ह्यांच्या ब्लॉगवर कंमेंट फक्त त्या पक्षाच्या बाजूनेच दिसतील कारण कंमेंट्स moderate केल्या जातात आणि विरोधी कंमेंट पब्लिश होऊ दिल्या जात नाहीत.
    तीच अवस्था फेसबुक पेज ची, जर तुम्ही थोड्या जरी विरोधी कंमेंट केल्या तर लगेच तुम्हाला ब्लॉक करण्यात येतं.
    हिच का ह्यांची निरपेक्ष पत्रकारीता ????

    आणि वर निर्लज्जपणे इतर प्रामाणिक पत्रकारांना ह्या पगारी लोकांकडून नावं ठेवली जात आहेत.

    पगारी विचारवंत, पगारी पोस्ट बनवणारे आणि पगारी लेखकांपासून दूर रहा.
    स्वतः ची अक्कल वापरा.
    राजकीय नेत्यांची मानसिक गुलामगिरी करणं सोडा.
    #VoteForNOTA

    ReplyDelete
    Replies
    1. aapli prikriya ithe shabut aahe,aani suruvaatichaa usgaaraa vacha mhanje kalel.

      Delete
  17. मटामध्ये एक खडुस नावाचा मोदीद्वेष्टा काम करतो आजकाल

    ReplyDelete
  18. मटा बद्दल योग्य लिहिले आहे. त्यातले चावके अगदी तर्कविसंगत लिहितात।मद्धयंतरी मतदान यंत्रावर विरोधी पद्धतीने लिहिले होते. कुबेर उघड विरोधी, तर मटा छुपा विरोधी आहे. लेखाबद्दल धन्यवाद

    ReplyDelete
  19. Namaskar Bhau,

    Far chan lekh aahe,jase Ma.Ta.chya sampadakanchi buddhichi kiv karavishi vatate tashich loksattachya sampadakanchi karavi vatate. tumhi mhanta tyapramane modi dwesh evdha vadhlay ki yanaa Kavil suddha Bhagvya rangachi vatu lagliy.

    Bhau, khup chan utter dile tumhi ya lekhakala.

    ReplyDelete
  20. अप्रतिम विश्लेषण! सध्याच्या गदारोळात मोदीजींच्या यशाबद्दल थोडी जरी साशंकता वाटली तरी मी तुमच्या उत्साहवर्धक लेखांचं पारायण करून स्वत:ला धीर देतो!
    आपण गोविंदरावांबद्दल खूप उत्तम लिहिलंय! पण मला तर ते कॉंग्रेसचे फक्षपाती वाटतात ! क्षमा असावी

    ReplyDelete
  21. मागे एकदा इसापनितीतली गोष्ट अर्धा अग्रलेख भरून छापला होता तेव्हापासून मी म टा वाचणे बंद केले. गोविंद तळवलकरांच्या अप्रतिम लेखांची तुलनाच सध्या होऊ शकत नाही.

    ReplyDelete
  22. सुनिल चावके यांच्या लेखांमधून त्यांचा अतिरेकी मोदीविरोध जाणवतो...

    ReplyDelete
  23. सुनील चावक्यांचे मूर्ख चावे वाचून त्यांना लावण्याची ईच्छा तीव्र होते। ते काम तुमच्या लेखाने केले।।इतके भ्रामक लिखाण कोण कसे लिहू शकतो? मग समजले की ते क्रीडा पत्रकार होते त्यामुळेच असा रडीचा डाव खेळत असावेत।

    ReplyDelete