Wednesday, July 17, 2019

कॉमेडीची ट्रॅजेडी



एकदा चुक झाली तर तिला चुकच मानावे लागते. कारण चुकांमधूनच माणूस शिकत असतो. अनुभवासारखा शिक्षक नाही. पण तरीही तीच वा तशीच चुकही पुन्हा होऊ शकते. त्याला योगायोग मानता येईल. पण माणूस वारंवार तसाच वागू लागला, किंवा त्याच चुकांची पुनरावृत्ती करू लागला, तर त्याला चुक मानता येत नाही. त्याला गुन्हा म्हणावे लागते किंवा शुद्ध मुर्खपणा ठरवावे लागते. आपल्या विशिष्ट गुणवत्तेमुळे प्रकाशझोतात आलेला माजी क्रिकेटपटू किंवा हल्लीचा वादग्रस्त राजकारणी नवज्योतसिंग सिद्धू याला म्हणूनच मुर्ख किंवा गुन्हेगार ठरवणे भाग आहे. अर्थात तो गुन्हेगार अन्य कुणाचा नसून स्वत:साठीच गुन्हेगार आहे. कारण प्रत्येक चमत्कारीक वागण्यातून त्याने आपली गुणवत्ता किंवा मिळालेल्या संधीला मातीमोल करण्याचा जणू सपाटाच लावला आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे त्याने पंजाब सरकारमधून दिलेला मंत्रीपदाचा राजिनामा. आपल्या या राजिनाम्याने खळबळ माजेल किंवा राजकीय उलथापालथ होईल, अशी त्याची अपेक्षा असेल्, तर तो शुद्ध मुर्खपणा आहे. म्हणूनच राजिनाम्याचे जे नाटक सिद्धूने रंगवले, त्याला मुर्खपणाच म्हणावे लागते. कारण त्याच्या प्रामाणिकपणा व हेतूविषयी त्यानेच शंका निर्माण करून ठेवलेल्या आहेत. किंबहूना त्याच्या क्रिकेटभाषेत याला हिटविकेट म्हणतात. जेव्हा फ़लंदाजाच्या बॅटचा स्पर्श होऊन स्टंप वा बेल्स पडतात, तेव्हा त्याने स्वत:लाच बाद केले, असे मानले जाते. सिद्धूच्या राजकारणाची इतिश्री त्याने स्वत:च घडवून आणलेली असेल, तर त्याला हिटविकेट म्हणावे लागेल ना? कारण हा राजिनामा वा मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशी घेतलेला पंगा; यातून त्याने नेमके काय साधले तेही त्याला सांगता येणार नाही. मुख्यमंत्री होण्याची तीव्र महत्वाकांक्षा त्याला इथवर घेऊन आलेली आहे आणि त्याचे क्रिकेटही अशाच बेफ़ाम वागण्य़ाने संपुष्टात आलेले होते.

१९९० च्या दशकात सिद्धू भारतीय कसोटी संघाचा आघाडीचा फ़लंदाज म्हणून सदस्य होता आणि तेव्हा इंग्लंडच्या दौर्‍यावरून तो असाच प्रक्षुब्ध होऊन परतला होता. तेव्हाही त्याचा खटका संघाचा कॅप्टन महंमद अझरुद्दीन याच्याशी उडाला होता. दोघांमध्ये काही शाब्दिक बाचाबाची झाली आणि सिद्धू उठून अर्धा दौरा सोडून माघारी भारतात परतला होता. त्याचा किंचीतही परिणाम अझरुद्दीनला भोगावा लागला नाही आणि तो पुढली काही वर्षे भारतासाठी खेळत होता व कर्णधारपदी कायम होता. मात्र सिद्धूचे क्रिकेट तिथेच संपून गेले. मग निवृत्ती पत्करून सिद्धू समालोचनाकडे वळला आणि आपल्या चुरचुरीत वक्तव्ये किंवा प्रवचनातून त्याने क्रिकेट शौकीनांची मने जिंकली. पुढे क्रिकेटच्या सोबतच त्याने टेलिव्हिजनवर होणार्‍या विनोदी व नकलाकारांच्या कार्यक्रमात परिक्षक वा समालोचकाचे काम सुरू केले. त्याचे किस्से व वचनांनी श्रोत्यांची मने जिंकली होती. त्याचा चहाता इतका वाढला होता, की भाजपाने त्याला राजकारणात आणुन लोकसभेपर्यंत पोहोचवले. तिथून सिद्धूच्या राजकीय महत्वाकांक्षा जाग्या झाल्या. त्याला पंजाबचा मुख्यमंत्री व्हायचे वेध लागले आणि त्यासाठी तात्कालीन मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल व त्यांच्या पक्षाशी सिद्धूने वादावादी सुरू केली. वास्तवात तिथे अकाली दल व भाजपाची मैत्री असल्यानेच सिद्धूला सहज लोकसभा बघता आलेली होती. मात्र सिद्धूच्या महत्वाकांक्षेसाठी भाजपा दिर्घकालीन मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाशी पंगा घेण्याची शक्यता नव्हती. परिणाम इतकाच झाला, की मागल्या २०१४ च्या लोकसभेत अकाली दलाने सिद्धूला अमृतसरहून भाजपाने उभे करू नये, अशी अट घातली आणि सिद्धूच्या राजकारणाला ग्रहण लागले. मग तो राजकीय पर्याय शोधत होता आणि आम आदमी पक्ष, किंवा स्वतंत्रपणे आपला पक्ष स्थापन करता करता सिद्धू कॉग्रेसच्या गोटात येऊन दाखल झाला.

अर्थात त्याची लोकप्रिय प्रतिमा कॉग्रेसला हवी असली, तरी त्याच्यापेक्षाही पंजाबची सत्ता हवी होती आणि लोकप्रिय अमरिंदर सिंग यांना टाळून कॉग्रेस सिद्धूला सरळ मुख्यमंत्रीपदी बसवू शकत नव्हती. पण पक्षश्रेष्ठींपेक्षाही राज्यात वरचढ असलेल्या अमरिंदरना वेसण घालण्यासाठी पक्षातच सिद्धूसारखे लोढणे राहुलना हवे होते. तिथे सिद्धूला महत्व मिळाले. पण अमरिंदर सिंग आणि अझरुद्दीन यात फ़रक नव्हता. राहुलच्या या मोहर्‍याला कॅप्टन अमरिंदर असे खेळवत गेले, की त्याने आपल्यालाच हिटविकेट करून बाजूला व्हावे. सिद्धूने त्यांची अजिबात निराशा केली नाही. मुख्यमंत्र्याने आक्षेप घ्यावा आणि सिद्धूने नेमके तेच करावे, असा प्रकार राजरोस सुरू झाला. कॅप्टनला दुखवायला सिद्धू पाकिस्तानात गेला आणि इमरान व बाजवा यांना मिठ्य़ा मारून आला. परिणामी जी संतप्त प्रतिक्रीया उमटली, तिला दाद देऊन सोनी टिव्हीने कपील शर्माच्या शोमधून सिद्धूला हाकलून लावले. त्यातून धडा घेईल तो सिद्धू कसला? तरीही पक्षाने कान उपटले नाहीत, म्हणून सिद्धू जास्त मोकाट झाला आणि ऐन लोकसभा निवडणुकीत त्याने अशी वक्तव्ये केली, की पंजाबमध्ये कॉग्रेसला त्याचा फ़टका बसला. परिणामी अमरिंदर सिंग यांनी सिद्धूचे खाते बदलले आणि त्याला हटवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे लकडा लावला. इथे सावध होईल तो सिद्धू कसला? त्याने मुख्यमंत्र्याला शह देण्यासाठी दिल्लीत येऊन राहुल-प्रियंका यांच्यासमवेत फ़ोटो काढला आणि पंजाबात बहाल झालेल्या मंत्रालयाचा कारभारही सुरू केला नाही. त्या फ़ोटोचा काहीही राजकीय परिणाम झाला नाही आणि महिनाभर काळ उलटून गेल्यावर सिद्धूने आपला जुना राजिनामा सोशल मीडियातून जगजाहिर केला आहे. पण त्याची ना अमरिंदरनी दखल घेतली आहे, ना कॉग्रेस पक्षाकडून काही हालचाल झालेली आहे. त्यामुळे हात चोळत बसण्याची नामुष्की मात्र सिद्धूवर आलेली आहे.

एकूणच राहुलचा राजिनामा कॉग्रेसला गोंधळात पाडून गेला आणि त्याच्या परिणामी अनेक राज्यातली कॉग्रेसची सरकारे दोलायमान झालेली आहेत. त्यात सिद्धूच्या राजिनाम्याचे कौतुक करायला कोणाला वेळ आहे? सिद्धूच्या महत्वाकांक्षेसाठी कॉग्रेस तीन राज्यातील सत्तेवर पाणी सोडू शकत नाही. म्हणूनच अशावेळी राजिनाम्याचे नाटक निरूपयोगी असल्याचेही सिद्धूला उमजणार नसेल, तर त्याच्या राजकीय महत्वाकांक्षेला अर्थ उरत नाही. राजकारणात प्रसंग व योग्य संधीला खुप निर्णायक महत्व असते. चुकीच्या वेळी केलेली मोठी खेळी धुळीस मिळवते आणि योग्यवेळी केलेली नगण्य खेळी मोठा लाभ देऊन जाणारी असते. सिद्धूने प्रत्येक मोठी खेळी चुकीच्या वेळी केलेली आहे. भाजपा जोमात आला असताना त्या पक्षाचा त्याग केला आणि कॉग्रेस डबघाईला आलेली असताना तिथे आसरा शोधला. पंजाबात मुसंडी मारून मुख्यमंत्री व्हायचे, तर श्रेष्ठींचा आशीर्वाद हवाच. पण राज्यातही आपले पक्षांतर्गत काही स्थान व पाठीराखे असायला हवेत. सिद्धू दोन्ही बाबतीत शून्य आहे. कारण पंजाबात आजतरी श्रेष्ठींपेक्षा अमरिंदर सिंग याचा शब्द वजनदार आहे. दुसरीकडे मंत्री होऊन दोन वर्षे उलटली तरी सिद्धू पंजाब कॉग्रेसमध्ये उपराच राहिलेला आहे. मग त्याने नखरे करण्याला काय अर्थ उरतो? त्याच्या राजिनाम्याच्या घोषणेनंतर पंजाबच्याच काही सहकारी मंत्र्यांनी उडवलेली सिद्धूची खिल्ली त्याचा सज्जड पुरावा आहे. नको त्यावेळी राजिनामा किंवा नखरे करण्यातून सिद्धू नेहमीच गोत्यात आलेला आहे. पण चुकीच्या वेळी चुकीचे निर्णय घेण्याची त्याची क्षमता अपुर्वाईच आहे. त्यातून बाहेर पडायची त्याला इच्छा नाही. खरेतर सिद्धू हा कायम स्वत:शीच लढत भांडत आलेला आहे आणि स्वत:लाच प्रत्येक लढाईत पराभूत करत आलेला आहे. समोर कोणीतरी भासमात्र शत्रू असावा लागतो, इतकेच. त्यातून ता विनोदवीराची शोकांतिका झाली आहे. तर दोस्तो, ठोको ताली!

13 comments:

  1. भाऊ थोडीशी दुरुस्ती .
    सिद्धू विंडीज दौऱ्यावरून परत आला होता . त्यानंतर त्याला परत संघात घेतलेले होते . त्यानंतर त्याने विंडीजविरुद्ध द्विशतकही ठोकले होते .

    ReplyDelete
    Replies
    1. अझर सिद्धूला "माँ के सिद्धू" हाक मारायचा. सिद्धूला वाटलं तो शिवी देतो. म्हणून कोणालाही काहीही न सांगता तडक भारतात निघून आला. हैदराबादी भाषेत प्रेमाने "माँ के... " बोलतात असं मोहिंदरनी त्याला नंतर सांगितलं.

      Lele reveals why Sidhu walked out of 1996 England tour

      http://timesofindia.indiatimes.com/articleshow/10489326.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppst
      https://timesofindia.indiatimes.com/sports/new-zealand-in-india-2016/top-stories/Lele-reveals-why-Sidhu-walked-out-of-1996-England-tour/articleshow/10489326.cms

      Delete
    2. He returned from England only. Then there was ban of 10 test on him. After That he returned to Test team and scored double century against WI

      Delete
    3. https://m.timesofindia.com/sports/new-zealand-in-india-2016/top-stories/Lele-reveals-why-Sidhu-walked-out-of-1996-England-tour/articleshow/10489326.cms

      Delete
  2. Bhau namaskar aapan navjyot sing siddhu che je akalan kele te shat pratishad khare v barobar aahe tyachya hit viket ne tyache rajnaitik bhavishya sampale aahe tyachi parithiti ghar ka na ghatka dhobika kutta ashi zali congress chya adhyakhala pakshat kahich mahatva rahilya mule siddhu sarkhya netyala kon vichaar?

    ReplyDelete
  3. सिद्धूची मनोवृत्ती आत्मकेंद्रीत आहे. त्याला आपली लोकप्रियता, आपल्या सवंग विनोदाला मिळणारी दाद+इतरांचे मौन, बाकी सर्व पक्षाचे + कार्यकर्त्यांचे त्याने क्षुद्र मानलेले कतृत्व यातच तो मग्न आहे. अशा व्यक्तींना मानसिक रुग्णालयातच ऊपचार होऊ शकतो.

    ReplyDelete
  4. माकड म्हणते माझीच लाल तेच सिद्धूचे तत्व आहे. आणि म्हणूनच त्याची अवस्था कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ अशी झालेली आहे.

    ReplyDelete
  5. शत्रुघ्न सिन्हाची कहाणी याहुन वेगळी नाही. बिगर-राजकीय क्षेत्रांतून येऊन भलत्याच उच्च महत्वाकांक्षा बाळगल्यामुळे त्यांची कारकीर्द संकटात सापडली आहे.

    ReplyDelete
  6. असेच मागे राजेश खन्ना याने केले. त्याने पक्षात महत्व मिळत नाही म्हणून काँग्रेस सोडली. सोडतेवेळी मुलाखतीत सांगितले की मला अनेक पक्षांतून आमंत्रणे आहेत. परंतू एकाही पक्षाने त्याच्यात रस दाखवला नाही. शेवटी परत काँग्रेसमध्ये जावे लागले.

    ReplyDelete
  7. भाऊ बयखा दत्त बद्दल काही लिहिले नाही लेखात...

    ReplyDelete
  8. अकाली आणि। भाजप सत्ता भ्रष्ट का झाले?
    सिद्धू काय वेगळं सांगत होते का अकाली सोनात राहून भाजप देखील हरेल.....

    भाऊंनी भाजप आणि मोदीजी ह्यांची कोणतीही चूक मान्यच करायची नाही आणि लेख लिहायचा असा विडा उचलला।आहे का?

    ReplyDelete
  9. तोंड वाकडं करून our boys played well करण्याऱ्या match fixer ला आज क्रिकेट क्षेत्रात , आणि बाहेर कुत्रे तरी विचारते का?

    ReplyDelete