Friday, August 16, 2013

नियम बदलायचे तर

  या स्वातंत्र्यदिनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी थेट पंतप्रधानांच्या लाल किल्ल्यावरील भाषणालाच आव्हान दिल्याने अनेक जाणकार अस्वस्थ होऊन गेले आहेत. त्यांच्या मते स्वातंत्र्यदिन हा राष्ट्रीय सोहळा असतो आणि पंतप्रधान हे देशाचे प्रतिनिधीत्व करत असतात. त्यामुळेच त्यांच्या त्या निमित्ताने होणार्‍या भाषणावर अशी राजकीय हेतूने वा राजकीय भूमिकेतून टिकाटिप्पणी होता कामा नये. अर्थात असा कुठला नियम नाही वा तशी कायद्यात कुठे तरतूद नाही. म्हणूनच मोदी यांनी त्याच भाषणाच्या निमित्ताने पंतप्रधानांना जे आव्हान उभे केले; त्यातून अनेकजण विचलीत झाले आहेत. त्यांचे आक्षेप ग्राह्य धरले, तरी मुद्दा असा शिल्लक उरतो, की ती संधी साधायची नसेल तर मग दुसरी संधी असतेच कुठे? आपल्या देशाचे पंतप्रधान बोलतातच कुठे? सीमेवरील जवानांचे मुंडके कापले जावो किंवा राजधानीत धावत्या बसमध्ये कुणा तरूणीवर सामुहिक बलात्कार होवो; त्यावर पंतप्रधानांनी कधी दोन शब्द बोलायचे कष्ट घेतले आहेत काय? नसतील तर ज्याक्षणी वा ज्या निमित्ताने मनमोहन सिंग बोलतील, तीच संधी साधून त्यांच्यावर टिका करायला हवी. मागल्या आठवड्यात त्यांच्याच संरक्षणमंत्र्याने सीमेवरील घटनेनंतर देशाला अडचणीत आणणारे विधान संसदेतच केले. निदान त्यानंतर तरी पंतप्रधानांनी आपले तोंड उघडून देशाला काही चार आश्वासक शब्द सांगण्याची गरज होती. पण मनमोहन सिंग काही बोलतच नाहीत. मग त्यांच्या भूमिका वा कारभाराचा समाचार घ्यायचा कधी? आजवरचे पंतप्रधान असे मौनीबाबा कधीच नव्हते. म्हणूनच त्यांचा कोणी कधी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणावरून समाचार घेतला नव्हता. मनमोहन सिंग यांनीच ती पाळी आणली आहे.

   ब्रिटनमध्ये एका लष्करी छावणीपाशी सैनिकाची हत्या झाली, तर परदेश दौर्‍यावर असलेले त्यांचे पंतप्रधान दौरा सोडून मायदेशी परतले. रशीयाने अमेरिकन सरकारचा विश्वासघात करणार्‍या फ़रार अधिकार्‍याला संरक्षण देताच, तिथल्या राष्ट्राध्यक्षांनी रशीयाचा ठरलेला दौरा रद्द केला. जेव्हा असे पेचप्रसंग ओढवतात, तेव्हा राष्ट्रनेता असलेल्या व्यक्तीने देशाला विश्वासात घ्यायचे असते. त्यासाठी स्पष्टीकरण देऊन धीर द्यायचा असतो. पण त्यासाठी बोलणे आवश्यक असते. आमचे पंतप्रधान कुठल्याच प्रसंगी बोलत नाहीत. मग त्यांना कोणी व कधी सवाल करायचे? मोदी यांनी म्हणूनच मनमोहन सिंग हमखास बोलणार असलेल्या प्रसंगाचा मुहूर्त साधून त्यांना पेचात पकडले. भले नियम वा कायदा नसेल, पण संकेत व परंपरा तर पंतप्रधानांना संरक्षण देत होती आणि तिचा भंग झाला; असाही दावा होऊ शकतो. खुद्द भाजपाचे व मोदींचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही वेगळ्या शब्दात त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पण म्हणून मोदी यांना चुकीचे ठरवता येईल काय? त्यामागचा मोदींचा हेतू कोणी लक्षात घेतला आहे काय? जगातले कुठलेही नियम, कायदे व परंपरा, संकेत हे त्यांच्या पालनातून बदलले गेलेले नाहीत. ते ज्यांनी झुगारण्याची हिंमत केली; त्यातूनच अशा रुढी मागे पडून नव्या रुढी वा परंपरा उदयास आलेल्या आहेत. जेव्हा कुठला नियम वा संकेत निर्माण होत असतो, त्यामागचा हेतू शुद्ध असतो. पण जर कोणी त्याच नियम रुढीच्या मागे लपून हेतूला हरताळ फ़ासणार असेल; तर त्या संकेतांना व नियमांना संपवणेच इष्ट असते. मोदी वेगळे काहीच करायला पुढे सरसावलेले नाहीत. गेल्या नऊ वर्षात युपीए नावाची जी आघाडी व राजकारण सुरू आहे, त्यातून नियम व संकेतांच्या आडोशाने न्याय व सत्याचाच बळी घेतला जात आहे.

   अडवाणी वा भाजपाच्या आजवरच्या नेत्यांना ते नियम संकेत झुगारण्याचे धाडस झाले नाही, त्याचाच फ़ायदा उठवत मनमोहन यांना पुढे करून बेछूट कारभार होत राहिला. मोदी यांनी त्यालाच शह देण्यासाठी त्या नियम व संकेतांनाच आव्हान उभे केले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातून मोदींनी मनमोहन वा पंतप्रधानांना आव्हान दिले, असे समजणे म्हणूनच चुकीचे आहे. मोदी यांनी कालबाह्य झालेल्या व भामटेगिरीचे आश्रयस्थान झालेल्या एकूणच नियम व संकेतांना आव्हान देण्याची भूमिका मागल्या दोनतीन वर्षात घेतली आहे. कारण केवळ पंतप्रधान वा कॉग्रेस पक्ष, इतकेच त्यांचे लक्ष्य नाही. देशाला विनाश व विध्वंसाकडे घेऊन जाणार्‍या संकेत परंपरांचा आडोसाच मोडून काढायचा मोदी यांचा मनसुबा दिसतो. आणि जे नियम मोडीत काढायचे असतात, त्यांच्याच आधीन राहून त्यांना बदलता येत नाही. त्यातल्या छेद व त्रुटी वापरून त्यांना निकामी करावे लागत असते. ज्याचा आडोसा घेऊन पंतप्रधान पदालाच बुजगावणे बनवले गेले आहे, त्याला आव्हान द्यायला मोदी पुढे सरसावले आहेत. ज्या व्यक्तीला स्वत:चे भाषण करता येत नाही. स्वत:च्या बुद्धीने निर्णय घेता येत नाहीत; तो केवळ नियम व संकेतांच्या आधारे बुजगावणे होऊन आपल्यावर राज्य करतो आहे, हेच मोदींना दाखवून द्यायचे असेल; तर त्यांनी पंतप्रधानांच्या भाषणाकडे भक्तीभावाने पाहून काय साध्य होणार होते? आपल्या जनतेला आश्वासक व जगाला ठोस भूमिका सांगू शकणाराच पंतप्रधान हवा, तसे करू शकणार्‍या व्यक्तीच्या हातीच देशाची सत्तासुत्रे असायला हवीत, हेच मोदींना सिद्ध करायचे असेल, तर यापेक्षा वेगळा कुठला मार्ग शिल्लक उरतो? नियम कालबाह्य झाले मग ते बदलणे भाग होते आणि त्यांचे पावित्र्य जपून ते काम होत नसते.

No comments:

Post a Comment