Sunday, August 11, 2013

डोके ठिकाणावर आहे?



   ‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. पाटील यांच्याशी बोललो. की, मला ही गोष्ट पटत नाही की, मुस्लिम समाजातील मुलं शुक्रवारच्या दिवशी मस्जिदमध्ये बॉम्बस्फोट घडवतील. ते इतर कुठेही स्फोट करतील मात्र मस्जिदमध्ये नाही करणार.’ हे विधान महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व देशाचे कृषिमंत्री शरद पवार यांचे आहे. गेल्या अर्ध्या शतकापासून पुर्ण वेळ सक्रिय राजकारणात वावरणार्‍या शरद पवार यांनी असे विधान केले, हे वाचून आधी हसू आले होते. पण नंतर त्यांच्या केविलवाण्या बडबडीची कीव करावी असेच वाटले. कारण असे कोणी दुसरा नेता म्हणाला असता, तर गोष्ट वेगळी होती. पण पवार आपल्या चौकस व चाणाक्षपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी असे अत्यंत खुळचट विधान वा युक्तीवाद करावा, याचे अत्यंत वाईटही वाटले. कारण पवार अनेकदा अत्यंत धुर्तपणे बोगस वा अर्धसत्य विधान करतात. पण खुळेपणाचे प्रदर्शन कधी करीत नाहीत. यावेळी त्यांचे हे विधान त्यांनी शहाणपणा व समंजसपणाला सोडचिठ्ठी दिल्याचा पुरावा वाटला. म्हणून त्यांची दया आली. आपण कोणतीही थाप मारावी आणि आपल्या सहकारी अनुयायांसह पत्रकारही डोळे झाकून त्या थापा ऐकून घेतील, असे त्यांना वाटते की त्यांना आता दिग्विजय सिंग यांच्याशी स्पर्धा करायची दुर्बुद्धी सुचली आहे? कारण त्यांच्या उपरोक्त विधानातून त्यांचा वर्तमानकाळाशी किती संपर्क तुटला आहे, त्याचीच साक्ष मिळते. शुक्रवारी मालेगावच्या मशिदीत स्फ़ोट झाला आणि म्हणूनच त्यात पकडले गेलेले मुस्लिम तरूण निष्पाप आहेत, हा दावा निव्वळ बिनबुडाचा आहे. की गेल्या काही वर्षात पवारांनी बातम्याच ऐकायचे वाचायचे सोडून दिलेले आहे?

   गेल्या दोन चार वर्षात भारतच नव्हेतर तर पाकिस्तानपासून इराक अफ़गाणीस्तानपर्यंत प्रत्येक मुस्लिम देशात मशिदीतून बॉम्बस्फ़ोट होत आहेत आणि पाचदहापासून शंभर सव्वाशे मुस्लिम त्यात मारले जात असतात. हे स्फ़ोट कधी, कुठल्या दिवशी व कुठे होतात, त्याच्या बातम्या सतत वाहिन्यांवर व वृत्तपत्रातून येत असतात. हे स्फ़ोट करायला (पवारांच्या भाषेतले) जातीयवादी म्हणजे हिंदूत्ववादी तिथे असतात काय? अफ़गाणीस्तान वा इराकमध्ये बॉम्ब फ़ोडणे सोडून द्या, जे कोणी चुकूनमाकून दोनचार हिंदू, बौद्ध असतील त्यांना आपल्या धर्मस्थळी जाण्याची तरी मुभा आहे काय? मग मशिद असलेल्या परिसरात फ़िरकणे तरी शक्य असेल काय? मग त्या ‘जातीयवाद्यांनी’ शुक्रवारी मशिदीत स्फ़ोट करणे शक्य असेल काय? पण तिथे शुक्रवारीच नेहमी स्फ़ोट होतात आणि त्यात इतके मुस्लिम मारले जातात, त्या बातम्या पवारांनी वाचलेल्याच नाहीत काय? असे स्फ़ोट इराक, अफ़गाण वा पाकिस्तानच्या भूमीत मुस्लिमच कशाला करतात? आणि करतात, त्या मशिदीत जाणारे मुस्लिम कुठले असतात? गेल्या दोन वर्षात तर एकही शुक्रवार असा उजाडलेला नसेल, की ज्या दिवशी पाकिस्तान इराकमध्ये मशिदीत स्फ़ोट होऊन मुस्लिम मारले गेलेले नाहीत. फ़रक एकच आहे, की तिथे पवार म्हणतात ते जातीयवादी हिंदुत्ववादी स्फ़ोट करत नसतात. तर सुन्नी मुस्लिम असे स्फ़ोट करतात आणि त्यात मारले जाणारे मुस्लिम शिया पंथाचे असतात. की पवारांना इस्लाम धर्मात असे दोन भिन्न पंथीय मुस्लिम असतात हेच ठाऊक नाही? की त्यांना जगाच्या पाठीवर मुस्लिम जगतामध्ये काय चालले आहे, त्याचाच थांगपता नाही? असेल तर त्यांनी असे बिनबुडाचे विधान मालेगाव प्रकरणात कशाला केले असते?

   इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतले पाहिजे, की हा पंथीक हिंसाचार केवळ पाकिस्तान अफ़गाण वा इराक भूमीतच चाललेला नाही. आपल्या देशात उत्तरप्रदेश नामक राज्यातही कायम चालू असतो. शिया सुन्नी एकमेकांच्या जीवावर उठण्याच्या अनेक घटना इथेही घडत असतात. आणि मालेगावच्या ज्या मशिदीत स्फ़ोट झाला, ती मशिद कुठल्या पंथाची होती याची तरी गंधवार्ता पवारांना आहे काय? नसेल तर निदान त्यांनी आपल्या पक्षाचे ज्येष्ठ मुस्लिम नेते तारीक अन्वर यांच्याकडून तरी त्याची माहिती करून घ्यायची होती. मालेगावच्या स्फ़ोटात जी मशिद बाधीत झाली, ती शिया पंथीय मुस्लिमांची होती. त्यामुळेच शुक्रवारी तिथे सुन्नी मुस्लिम तरूणांनी स्फ़ोट करायला काहीच हरकत नसते. कारण सुन्नी मुस्लिमांच्या कट्टर भूमिकेनुसार शिया हे मुस्लिमच नसतात. आणि म्हणूनच त्यांचा काटा काढण्याला असे स्फ़ोट होत असतात. पाकिस्तानात तर अहमदीया पंथाच्या मुस्लिमांना कायद्यात दुरूस्ती करून गैरमुस्लिम ठरवण्यात आलेले आहे. म्हणूनच त्यांना मशीद बांधायलाही परवानगी मिळत नाही. त्यांनी स्वत:ला मुस्लिम म्हणवून घेण्यालाही गुन्हा ठरवण्यात आलेले आहे. म्हणूनच मग शिया वा तत्सम सुन्नी नसलेल्या कुठल्याही मुस्लिमांना मारणे वा स्फ़ोटात संपवणे शक्य असते. पवित्र कार्य सुद्धा असू शकते. मालेगावच्या स्फ़ोटासाठी जातीयवाद्यांवर खोटे आरोप करायला अजिबात हरकत नाही. कारण अजून त्यांच्या विरोधात एकही साधे आरोपपत्र पाच वर्षात दाखल करता आलेले नाही. पण असले धडधडीत अज्ञान बोलून दाखवताना हास्यास्पद ठरू नये; याची काळजी पवारांनी घ्यायला हवी होती. नसेल तर लोक म्हणतील तुमचे डोके ठिकाणावर आहे काय?

7 comments:

  1. http://www.outlookindia.com/article.aspx?200790

    ReplyDelete
  2. Very good study and important material but it is sad people do not read such comments. Anupam


    ReplyDelete
  3. It is real tragedy of Indian Politics that when any Muslim person get away from any kind of case against him then our Judiciary system and investigation agencies are said to be doing fantastic work but vice versa debate occurs when any Hindu released from such FAKE CASE... and all the things for Muslim Vote and that also in such country where number of Hindus is more..... We need to wake up not against the Muslim people but against such cruel people who are continuously increasing the gap between Hindus and Muslims

    ReplyDelete
  4. Sir I frequently keep reading your articles and they do provide a fascinating insight into Maharashtra's political scenario...We may not be on the same page on a lot of issues but It is important to take heed of contrarian views of well. In this issue however you seem to be misinformed..The mosque and the burial ground that was bombed in Malegaon was of sunni's. I am guessing that the error in your article was unintentional

    ReplyDelete
  5. भाऊसाहेब, तुम्हाला शरद पटेल यांची दया आली, कींव आली, पण राग कसा काय नाहीं आला? खरं तर 'कानाखाली'चा प्रयोगच योग्य होईल!

    ReplyDelete
  6. साहेबांचा तोल ढासळला आहे. आणि मालेगावची मशीद कोणत्या पंथाची आहे हे इतर कुणाला विचारण्यापेक्षा आपल्या मुंब्रा स्थित इशरत बंधू जितुद्दीन आव्हाड ओवैसींना विचारले असते तरी कळले असते.

    ReplyDelete
  7. भ्रष्टवादी प्रमुख ह्यांना काहीही करुन सरकारला अडचणीत आणायचे आहे मग त्यासाठी ते कुठलेही बेताल वक्तव्य करू शकतात. खर तर फेकुलर्स नेहमीच म्हणतात दहशतवादाला धर्म नसतो मग इथे कसा काय पवार तो जोड़तात??? कठीण आहे बाबा....

    ReplyDelete