Monday, August 26, 2013

कळवळ्याचा अत्याचार थांबवा

   ज्या मुलीवर मुंबईत सामुहिक बलात्कार झाला, तिला व तिच्या कुटुंबियांना उठलेल्या गदारोळाने खुप मोठा धीर मिळाला; यात शंकाच नाही. पण असा गदारोळ करण्यामागे जी जागल्याची भूमिका असते, ती समाजाला जागवण्या पुरतीच मर्यादित असते. ज्या सत्तेने वा कायद्याने झोप झटकून कायद्याचा अंमल करावा अशी अपेक्षा असते; त्याच्या निद्रीस्तपणामुळे असे गुन्हेगार सोकावत असतात. त्या समाजाला झोपेतून जागवणे हेच जागल्याचे काम असते. पण एकदा समाज व त्याच्या कायद्याची यंत्रणा खडबडून जागी झाली, मग पुढले काम त्यांच्यावर सोपवून जागल्याने अन्य बाबतीत जागवण्याचे काम हाती घ्यायचे असते. त्याऐवजी जागल्या त्याच त्याच गोष्टी अडकून पडला, मग त्याचा कर्कशपणा त्रासदायक वा जाचक होऊन जात असतो. मुंबईतील त्या पिडीत मुलगी व तिच्या कुटुंबियांवर नेमकी तीच पाळी आलेली आहे. म्हणून की काय, त्यांनी एक पत्रक काढून समाजातील जागलेपणाचे आभार मानताना आता गप्प बसायचे काय घ्याल; असे विचारण्यापर्यंत पाळी आलेली आहे. आम्हाला निवांत मोकळा श्वास घेण्य़ाची तरी मोकळीक सोडा, असे म्हणायची वेळ तिच्या कुटुंबियांवर यावी, यातच माध्यमांपासून तमाम उत्साही मंडळींच्या उतावळेपणाच्या खळखळाटाचे बिंग फ़ुटते. मग त्यांना या मुलीविषयी आस्था किती? अशा बलात्कार पिडितांविषयी सहानुभूती किती? आणि एकूणच समाजातील गुन्हेगारीविषयीचा तिटकारा किती, अशा शंका येऊ लागतात. कारण न्यायाच्या व विवेकाच्या सांस्कृतिक गप्पा मारण्याचा एक दांभिकपणा आता सोकावत चाललेला दिसतो आहे. जणू मुंबईत प्रथमच वा पहिलाच असा प्रकार घडल्याचा आवेश धादांत खोटेपणाचा आहे.

   यात अटक झालेल्यात काही दाखलेबाज गुन्हेगार आहेत. मग त्यांच्या आधीच्या गुन्ह्याबद्दल असाच गदारोळ का झाला नव्हता, असाही प्रश्न वाचळवीर समाजाला विचारावा लागेल. ज्यांनी सहजगत्या असा सामुहिक बलात्कार केला, त्यांनी तिथे आजवर अनेक मुलींवर असाचा अत्याचार त्याच जागी केलेला असणार हे उघड आहे. त्याखेरीज अनेक वस्त्या व परिसरात असे अपराध नित्यनेमाने घडत असल्याच्या बातम्याही आहेत. मग या एका घटनेवरून असे काहूर माजवणार्‍यांना खरेच न्यायाची चाड व अत्याचाराची चिड आहे, की निव्वळ प्रसिद्धी मिळवण्याचा उद्योग चालू होतो? हे सगळे तात्कालीन उद्रेक अलिकडे एक देखाव्याचे निमित्त होऊन बसले आहेत. अशा प्रसिद्धीलोलूपांचे पेव फ़ुटते, पण त्यात अन्यायपिडीतांचा जीव घुसमटतो, हेच त्या मुलीच्या आप्तांना व कुटुंबाला सांगायचे आहे. कारण आज कितीही असा आवेश आणला जात असला; तरी उद्या जेव्हा त्या मुलीला घराबाहेर पडायचे आहे, तेव्हा तिच्याकडे ज्या नजरा असतील त्या सहानुभूतीच्या असतात. तेव्हा तिला होणार्‍या यातना अधिक अत्याचारी असतात. ‘हीच ती’ किंवा ‘हेच तिचे आई वडील, भाऊ’ असा त्या नजरांचा रोख असतो. तो रोख त्या बलात्काराच्या वेदनेपेक्षा भीषण असतो. कारण तो कायम पाठलाग करीत रहातो. म्हणूनच बलात्कार पिडीतेची ओळख लपवली जाते. आज ज्यांनी त्या मुलीचा पत्ता शोधून तिच्या आप्तस्वकीयांचे सांत्वन करण्यासाठी तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयास केला; त्यांनी ती ओळख उघडी पाडली आहे. त्यांनी त्या कुटुंबाला कायमचे संकटात टाकले आहे. तिचा मित्र वा कुटुंब यांच्या मुलाखती घेणार्‍यांनी तेच पाप केले आहे. ही विकृती बलात्कारी गुन्हेगारापेक्षा भली आहे काय?

   केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर वर्षभरापुर्वी हल्ला झालेला होता. एका माथेफ़िरू इसमाने त्यांच्या थोबाडीत मारण्याचा अतिप्रसंग केला होता. त्याबद्दल मग संसदेत निषेध करण्यात आला. त्यावेळी जनता दलाचे नेते शरद यादव यांनी व्यक्त केलेले मत अतिशय समर्पक आहे. ते म्हणाले होते, मारणार्‍याने तर एकच थप्पड मारली. पण विविध वाहिन्यांनी त्याचे इतक्यावेळी प्रक्षेपण केले, की निदान पाचदहा हजार थपडा मारून घेतल्या. असे विकृत चित्रण नमूना म्हणून दाखवून थांबायला हवे, याचे भान समाजाच्या संयमाचा ठेका घेतल्याच्या भाषेत बकवास करणार्‍यांना कधी येणार आहे? आपण जे शब्द बोलतो वा लिहितो किंवा जे चित्रण दाखवतो; त्याचा जनमानसावर होणारा परिणाम ओळखण्याचे शहाणपण या लोकांना कधी येणार आहे? अमेरिकेत जुळ्या मनोर्‍यावर विमाने आदळून केलेल्या घातपाताला एक वर्ष पुर्ण व्हायच्या वेळी, अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या पत्नीने ते चित्रण प्रक्षेपित करू नये अशी विनंती वाहिन्यांना केलेली होती. त्याचे कारण देताना त्या म्हणाल्या, असे चित्रण बघून बालमनावर सूडभावना व द्वेषभावनेचा प्रभाव पडतो. त्यांचा आग्रह तिथल्या वाहिन्यांनी मान्य केला व संयम दाखवला होता. आपल्याकडे आविष्कार स्वातंत्र्याच्या आवेशात जनमानसावर पडणार्‍या प्रभावाचा कुठला शहाणा विचार तरी करायला तयार आहे काय? आज त्या मुलीच्या कुटुंबावर अशी समज वा उपदेश; माध्यमांना व उतावळ्या सुधारकांना द्यायची वेळ यावी यासारखी शरमेची गोष्ट नाही. एकीकडे असे बलात्कार होतात, याची शरम वाटल्याचे हवाले देणारेच किती बेशरमपणे त्या अन्यायाचे भांडवल आपापले हेतू साधायला करीत असतात; त्याचाच हा नमूना आहे. मग अन्याय परवडला हा कळवळ्याचा अत्याचार थांबवा म्हणायची पाळी येणारच ना?

No comments:

Post a Comment