Saturday, November 23, 2013

रितीरिवाजांचे राज्य

   आपल्याकडे सुधारणावादी किंवा बुद्धीमंत लोक नेहमी कसल्या ना कसल्या सव्यापसव्यात गुंतलेले असतात. एकीकडे जुन्या रितीरिवाजांना व कालबाह्य अशा गोष्टींना मूठमाती द्यावी, असा आग्रह धरला जात असतो. कारण हे नियम, निर्बंध वा रितीरिवाज कालबाह्य झालेत, असा दावा असतो. पण कालबाह्य म्हणजे तरी काय? तर ते नियम-कायदे रिवाज परिणामशून्य झालेले असतात. पण दुसरीकडे त्यांच्या जागी नवे रितीरिवाज आणले जात असतात आणि त्याचीही अंमलबजावणी तितकीच परिणामशून्यतेने व्हावी; असाही आग्रह होत असतो. ज्यांचा कुठल्याही परिणामांशी संबंध येत नाही, अशाच लोकांचा त्या बाबतीतला आग्रह अधिक असतो आणि अशा रुढीप्रिय लोकांना विद्वान बुद्धीमंत समजणारा एक स्वयंघोषित शहाणा समाजघटक त्यांच्या मागे फ़रफ़टत असतो. याच आठवड्यात त्याची प्रचिती आली. गुजरातच्या पोलिसांनी एका पित्याच्या मागणीवरून त्याच्या तरूण मुलीवर पाळत ठेवली. तर तिच्या खाजगी जीवनातील गोपनीयतेवर अतिक्रमण झाल्याचा गदारोळ उठला आहे. थोडक्यात तिच्यावर पाळत ठेवली गेल्याने तिच्या खाजगी जीवन जगण्याच्या स्वातंत्र्यावर गुजरात पोलिसांनी, अर्थात तिथल्या मुख्यमंत्र्याने गदा आणली, अशी तक्रार आहे. त्यासाठी दिल्लीतल्या सत्ताधार्‍यांपासून महिला आयोगापर्यंत तमाम सरकारी संस्था खडबडून जाग्या झालेल्या आहेत. त्या अनामिक मुलीने न मागितलेला न्याय तिला देण्याची जबरदस्त मॅराथॉन शर्यतच सुरू झाली आहे. पण गेल्या वर्षी याच काळात त्याच दिल्लीत एका मुलीवर सामुहिक बलात्कार भररस्त्यावर आणि धावत्या बसमध्ये झाला होता. तेव्हा याच सरकारी यंत्रणा, सत्ताधारी वर्ग आणि महिला आयोग ढाराढूर झोपा काढत होते. त्यांना जागवण्याचे तमाम प्रयत्न फ़ोल ठरले होते.

   दिल्लीच्या रस्त्यावर किंवा कॉग्रेसची सत्ता असलेल्या कुठल्याही राज्यात आज महिला सुरक्षित उरलेल्या नाहीत. आजही सामुहिक बलात्कार वा अपहरणाच्या घटना घडत आहेत, त्यावेळी अवाक्षर न बोलणार्‍या महिला आयोगाची, या अज्ञात मुलीच्या स्वातंत्र्याविषयीची सतर्कता म्हणूनच संशयास्पद होऊन जाते. पण मुद्दा त्याहीपेक्षा भीषण तेव्हा होतो, जेव्हा त्यात बुद्धीमंत व माध्यमे उडी घेतात. काही वर्षापुर्वी ह्या मुलीवर पाळत ठेवली गेली आणि इशरत जहान प्रकरणी तपास करताना एका पोलिस अधिकार्‍याने दिलेल्या माहितीतून या पाळतीचे धागेदोरे समोर आलेले आहेत. त्याची स्पष्टता अजून होऊ शकलेली नाही. तरीही त्यावर सार्वत्रिक काहूर माजले असून नरेंद्र मोदी त्यात फ़सणार काय, याची चर्चा आहे. म्हणजेच त्यावर आक्रोश करणार्‍या कुणालाही तिच्या स्वातंत्र्याबद्दल फ़िकीर नसून मोदींना गोत्यात आणण्यासाठी तिच्या स्वातंत्र्याचा मोहर्‍याप्रमाणे वापर होतो आहे. पण त्याचवेळी बंगलोरच्या हमरस्त्यावरील एका एटीएममध्ये पैसे काढायला गेलेल्या महिलेवर प्राणघातक हल्ला झाला व त्याचे भीषण चित्रण उपलब्ध आहे, त्या महिलेच्या जीवावर बेतलेल्या प्रसंगाबद्दल कुणाला फ़िकीर नाही. याचा अर्थ काय होतो? ज्या महिलेच्या खाजगी जीवनात अतिक्रमण झाल्याचा कागदी दावा आहे, तिच्या त्या भ्रामक स्वातंत्र्याविषयी कायद्याच्या शब्दाचे पावित्र्य जपायला सगळे सिद्ध झालेले आहेत. आपली बुद्धी पणाला लावत आहेत. पण त्यापैकी कुणालाच बंगलोरमध्ये एका महिलेचा जीव धोक्यात येण्यापर्यंत प्रसंग आला त्याची फ़िकीर नाही. याला रिवाजांचे पावित्र्य म्हणतात. ज्याचा वास्तविक जीवनाशी संबंध नसतो. महिला राक्षसी हल्ल्यात मारली गेली तरी बेहत्तर, पण तिच्या कागदोपत्री स्वातंत्र्याची जपणूक मात्र व्हायला हवी.

   कायदा व नियमांच्या पालनाचे रितीरिवाज जपले गेले पाहिजेत आणि ते जपण्यालाच प्राधान्य असले पाहिजे. मग त्याची जपणूक करताना त्याच महिलेचा बळी पडला तरी बेहत्तर; असेच ना? कुणा महिलेचा पाठलाग झाला, तिच्यावर पाळत ठेवली गेली, तिचे कुणाशी झालेले संभाषण चोरून ऐकले गेले तर मोठा धोका आहे. पण प्रत्यक्ष तिच्यावर प्राणघातक हल्ला झाला, बलात्कार झाला, तर ती क्षुल्लक गोष्ट आहे, असाच या आग्रहाचा अर्थ होत नाही काय? महिलेला सुरक्षा हवी, तर तिने रितसर तक्रार द्यायला हवी, त्याची तपासणी व्हायला हवी, तिच्यावर बलात्कार झाला तर त्याची तक्रार बघणार्‍याने द्यायला हवी. मगच कायद्याने त्यात हस्तक्षेप करावा, असाच हा आग्रह नाही काय? मग घटना घडत असेल तर त्यात इतर कोणी हस्तक्षेप करणे गुन्हा झाला ना? याचा अर्थ इतकाच, की जोपर्यंत गुन्हा होत नाही वा तशी तक्रार होत नाही, तोपर्यंत कारवाई होता कामा नये. ती केली तर कायद्याच्या शब्दांचे उल्लंघन होते. म्हणूनच तो गैरकारभार आहे. आणि असाच आग्रह असल्याने पोलिसही हल्ली गुन्हे होऊ देतात व तक्रार आल्याशिवाय कुठली हालचाल करीत नाहीत. कसे छानपैकी रुढी व रितीरिवाजांचे पालन चालले आहे ना? आणि त्याचा आग्रह धरणारे लोक बुद्धीमंत आहेत, पुरोगामी सुधारणावादी आहेत. उलट अशा घटनांना रोखू बघणारे गुन्हेगार असतात. बंगलोरच्या महिलेला संरक्षण देण्यात अपेशी ठरलेल्यांना कुणी जाब विचारत नाही, पण काही वर्षापुर्वी एका मुलीवर पित्याच्या आग्रहास्तव पाळत ठेवली गेली; तर त्याबद्दल काहूर माजवले जाते. ह्यालाच सुधारणा, पुरोगामीत्व म्हणायचे असेल, तर प्रतिगामी शब्दाचा अर्थ कसा लावायचा? शब्दप्रामाण्यालाच बुद्धीप्रामाण्य बनवणार्‍या बुद्धीमंतांनी प्रतिगामीत्वाला पुरोगामीत्वाचे प्रमाणपत्र दिल्यावर दुसरे काय व्हायचे?

No comments:

Post a Comment