Monday, November 18, 2013

वेडगळपणाची परिसीमा

Insanity: doing the same thing over and over again and expecting different results...........Albert Einstein

   पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करीत रहाणे आणि नव्याने काही वेगळे घडेल अशी अपेक्षा बाळगणे; हा शुद्ध वेडगळपणा असतो, असे विख्यात वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन म्हणतो. भारतीय राजकारणात तरी निदान त्याचा अलिकडे वारंवार अनुभव येऊ लागला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी, यांच्यावर विविध आरोप करण्यात आणि त्यांना गुजरातच्या सत्तेतून पदभ्रष्ट करण्यासाठी मागली दहा वर्षे अखंड प्रयास झाले आहेत. पण गुजरातमध्ये झालेल्या दंगली वा अन्य कुठल्याही बारीकसारीक प्रकरणात त्यांना गुंतवण्याचे अक्षरश: हजारो प्रयास निकामी झालेले आहेत. उलट त्यातूनच त्यांची आज देशव्यापी प्रतिमा उभी राहिली आहे. माध्यमे व त्यातील सेक्युलर पत्रकारांसह सेक्युलर पक्षांनी, मोदींना याप्रकारे आरोप ठेवून बदनाम करण्याचा उद्योग केलाच नसता, तर आज त्यांना गुजरातबाहेरच्या लाख दोन लाख लोकांनी तरी ओळखले असते किंवा नाही; याचीच शंका आहे. हा एक मुख्यमंत्री सोडून देशातील अन्य कुठल्या राज्यातील मुख्यमंत्री अन्य भागात इतका परिचित आहे का? नसेल तर कशाला परिचित नाही? मोदींच्या कारभाराचे बरेवाईट कौतुक होते, तसे अन्य कुणा मुख्यमंत्र्याचे का होत नाही? भाजपाचेच डॉ. रमण सिंग, शिवराज चौहान याही मुख्यमंत्र्यांचे काम मोदींच्या इतकेच कौतुकास्पद आहे, असे दावे करून त्यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार का केले नाही; असा सवाल मोठे पत्रकार भाजपाला विचारत असतात. मग त्यांनीच आधी उत्तर द्यावे, की त्या अन्य मुख्यमंत्र्यांबद्दल याच माध्यमांनी, अभ्यासकांनी, व विरोधकांनी आजवर मौन कशाला धारण केलेले आहे? त्या अन्य मुख्यमंत्र्यांवर आरोप वा त्यांचे कौतुक कशाला झाले नाही?

   उत्तर सोपे आहे. गुजरातच्या दंगलीचे निमित्त करून भाजपाला लक्ष्य करण्यासाठी माध्यमातून सेक्युलर मोहिम राबवली गेली. त्यातून मोदींवर खरेखोटे आरोप करण्यात आले. आज खोटे दाखले व घटना सांगितल्याचा मोदींवर सर्रास आरोप होतो. पण मागल्या दहा वर्षात मोदींवर खोटेनाटे आरोप झाले त्याचे काय? त्याचा खरेखोटेपणा कोणी कधी तपासला आहे काय? मोदींच्या भाषणाचा तपशील तपासणार्‍यांनी मोदींच्या विरोधात तपास चालू असताना, कुठला तरी सज्जड पुरावा का सादर केला नाही? म्हणजेच त्यांना प्रत्येक तपासानंतर क्लिन चीट देणार्‍या कोर्टांनी मोदींवर आरोप करणार्‍यांना साफ़ खोटे पाडलेले आहे ना? यातून मोदींवरचे आरोप नुसते खोटे पडले नाहीत किंवा त्यांनाच कोर्टाकडून निर्दोष असण्याचे प्रमाणपत्र लाभलेले नाही; तर पर्यायाने मोदींवर होत असलेले आरोप निव्वळ खोटारडेपणा असतो, हेच सिद्ध झालेले आहे. त्याचा परिणाम ‘लांडगा आला रे आला’ या गोष्टीसारखा झालेला आहे. आता मोदींवर कोणी खोटेपणाचा आरोप केला; मग तो ऐकणार्‍या सामान्य माणसाला तोच मोदींचा खरेपणा वाटू लागला आहे. त्यासाठी इतिहास वा साक्षीपुरावे देण्याचा कुठला उपयोग राहिलेला नाही. सतत तेच तेच खोटे आरोप करण्याच्या वेडगळपणाने मोदींना आज लोकप्रियतेच्या शिखरावर आणून बसवले आहे. मात्र त्या जुन्या व फ़सलेल्या डावपेचातून त्यांचे विरोधक व शत्रू बाहेर पडायला तयार नाहीत. बदनामीतून मोदी यांना रोखता येणार नाही, पराभूत करता येणार नाही, की संपवता येणार नाही, हेच दशकातला अनुभव सांगतो आहे. साक्षीदाराची विश्वासार्हता त्याने दिलेल्या पुराव्यापेक्षा अधिक महत्वाची असते. ती विश्वासार्हता गमावलेल्या मोदी विरोधकांना आपले डावपेच व रणनिती बदलल्याखेरीज मोदींचा अश्वमेध रोखता येणार नाही.

  चाणाक्ष राजकारणी असल्याने मोदी हे नेमके जाणून आहेत. म्हणूनच आपल्या भाषणात राहिलेली त्रुटी वा जाणूनबुजून घुसडलेले चुकीचे संदर्भ सुधारण्याचा प्रयासही मोदी करीत नाहीत. शेवटी त्यांना आपल्या विरोधकांचे समाधान करायचे नसून, मते मिळवण्यासाठी सर्वसामान्य जनतेची मने जिंकायची आहेत आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कलाने मोदी बोलतात, मुद्दे मांडतात. त्यातला खोटेपणा सांगण्यापेक्षा त्यांच्या विरोधकांनी जनमानसातून आपणच गमावलेला स्वत:चा खरेपणा पुन्हा नव्याने प्रस्थापित करण्याची गरज आहे. नुकतेच एक कुणा मुलीचे फ़ोन चोरून ऐकणे वा तिच्यावर पाळत ठेवण्याचे गुजरात पोलिस खात्याचे प्रकरण बाहेर आणले गेले आहे. त्यावर मोठाच गदारोळ चालू आहे. तसे हे प्रकरण क्षुल्लक आहे. याच प्रकारचे आरोप मनमोहन सरकारवर त्यांच्या अर्थमंत्री प्रणब मुखर्जी, दिग्विजय सिंग, मित्रपक्षाचे नेते प्रकाश करात किंवा विरोधी नेते अरूण जेटली यांनीही केलेले होते. तेव्हा कॉग्रेस पक्षाने आपल्याच सरकारच्या पापाची कुठली चौकशी केली व कोणाला शिक्षा दिलेली आहे? कुठलाही सत्ताधारी अशा किरकोळ चुका करतो किंवा गडबडी करीत असतो. स्त्रियांची सुरक्षा धोक्यात आल्याच्या गप्पा कॉग्रेसच्या महिला नेत्या मारत होत्या. त्यापैकी कितीजणी अकरा महिन्यांपुर्वी दिल्लीत सामुहिक बलात्काराची घटना घडल्यावर पिडीत मुलगी वा तिच्या कुटुंबाच्या मदतीला धावल्या होत्या? तिथेच त्यांची विश्वासार्हता रसातळाला गेलेली असते. त्यांनी मोदींवर असले शिळेपाके आरोप केल्याने मोदींना रोखता येणार नाही. उलट त्या फ़सलेल्या वेडगळपणातून बाहेर पडून आपण उत्तम कारभार करू शकतो आणि गुजरात व मोदींपेक्षा आपल्या पक्षाने व सरकारने उत्तम कारभार केला आहे; हे लोकांना पटवून देण्यात भले होईल.

No comments:

Post a Comment