Monday, December 16, 2013

निव्वळ बेईमानी

   भ्रष्ट माणसे व सदाचारी माणसे असे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार कुठल्या कायद्याने आम आदमी पक्षाला किंवा त्यांच्या नेत्यांना दिलेला आहे काय? कारण गेल्या काही दिवसात त्यांच्या इमानदारीचा गाजावाजा त्यांनीच इतका चालविला आहे, की देशातल्या कुणालाही प्रामाणिकपणा सिद्ध करायचा असेल तर त्यांनी यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावे, अशीच एकूण स्थिती दिसते. हे भाजपा कॉग्रेसला भ्रष्ट किंवा गुन्हेगारांचा पक्ष ठरवणार, हेच जनरल व्ही. के. सिंग यांना मोदींचे चाटूकार म्हणून घोषित करणार आणि यांच्यापैकी कोणावर आरोप झाले; मग मात्र साक्षी पुरावे मागणार. दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीत थोडेफ़ार यश मिळवल्याने इतकी मस्ती त्यांना चढलेली असेल; तर बहूमत मिळाल्यावर यांनी किती मस्तवालपणा दाखवला असता, त्याचीच लोकांना आता शंका येऊ लागली आहे. कारण त्यांना इतकी लोकप्रियता व प्रसिद्धी मिळवून देणार्‍या अण्णा हजारे यांच्यावरही आता ‘आप’वाल्यांनी गरळ ओकायला सुरूवात केली आहे. अण्णांनी राज्यसभेत मांडल्या गेलेल्या लोकपाल विधेयकाच्या मसूद्याला मान्यता दिल्याचे कळताच, अण्णांना कोणीतरी बहकावत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. अण्णांविषयी त्यांची इतकीच जाण व अनुभव असेल, तर मागल्या दोनतीन वर्षात केजरीवाल अण्णांना बहकावत होते आणि पुन्हा पुन्हा आमरण उपोषणाला बसवत होते; अशीच शंका घ्यायला वाव नाही काय? जोपर्यंत अण्णा यांच्याच सुरात सूर मिसळून अवास्तव मागण्यांचा अट्टाहास व आडमुठेपणा करत होते, तोपर्यंत अण्णा ठिक होते आणि आता यांच्या अरेरावीला झुगारून अण्णा स्वतंत्रपणे निर्णय घेऊ लागल्यावर बहकले आहेत काय? ऐकणारे मुर्ख असतात असे केजरीवाल आणि कंपनीला वाटते काय?

   आता मजा बघा. अण्णा हा लोकपाल आंदोलनाचा चेहरा होता. आणि तरीही त्यांनी राजकारणात पडायच्या भूमिकेला विरोध केला होता. तेव्हा केजरीवालांना कोणी बहकावले, असा आरोप अण्णांनी केलेला नव्हता. आमचे हेतू सारखे पण कामाच्या दिशा वेगवेगळ्या असल्याने आम्ही वेगळे होत असल्याचे दोघांनी दिड वर्षापुर्वी एकत्रच पत्रकारांना येऊन सांगितले होते. त्यानंतर केजरीवाल यांनी आपल्या अन्य सहकार्‍यांच्या सोबत राजकीय पक्षाची स्थापना करून निवडणूकाही लढवल्या. त्यात अण्णांनी कुठला हस्तक्षेप केला नाही, की केजरीवाल यांच्यावर कुठले हेत्वारोप केले नाहीत. आपले आग्रह वा भूमिका पत्करण्याचाही हेका अण्णांनी त्यांच्याकडे धरला नव्हता. या दिड वर्षाच्या काळात दोघे आपापल्या मार्गाने जात होते. पण केजरीवाल विषयी अण्णांनी कधी शंका घेतल्या नाहीत वा संशय व्यक्त केला नाही. मात्र आज अण्णांनी सरकारच्या लोकपालाचा मसूदा मान्य करून त्याची संमतीही आपल्याला समाधानकारक वाटाण्याचा संकेत देताच केजरीवाल यांनी अण्णांचे डोके फ़िरले, असेच म्हणायचे बाकी ठेवले आहे. आणि गेल्या दोन वर्षात क्रमाक्रमाने या कंपूची कार्यपद्धती पाहिली तर ‘हम करेसो कायदा’ अशीच राहिली आहे. अत्यंत आर्जवी भाषेत त्यांची अरेरावी चालते. भाजपा आमदार फ़ोडून सरकार कशाला बनवत नाही? सिर्फ़ हमही इमानदार पार्टी है, असली भाषा घमेंड समोर आणते. यांच्या पक्षाला अवघी तीस टक्के मते मिळालेली आहेत, त्याच्या आधारावर उर्वरित पक्षांना मते देणार्‍या सत्तर टक्के मतदारांना गुन्हेगार वा पापी ठरवण्य़ाच्या अशा वक्तव्यांचा दुसरा काय अर्थ निघू शकतो? हे कोणाला पाठींबा देणार नाहीत आणि कोणी पाठींबा देणार तर तो घेण्यासाठीही हेच अटी घालणार. कसली मस्ती आहे ही?

   गुणवत्तेवर पाठींबा घेण्याच्या अटी घालणार्‍या केजरीवाल यांनी, गुणवत्तेवर पाठींबा देण्याची भूमिका कशाला घेतली नाही? ‘राजनीती बदलने आये’ म्हणायचे तर पाठींबा देऊन प्रस्थापित पक्षांना उत्तम कारभार करायला भाग पाडा ना? त्यांना करू देणार नाही आणि आम्ही करणार नाही. भाजपा कॉग्रेसला प्रश्न विचारायचे आणि त्याची उत्तरे म्हणे जनतेसमोर मांडून निर्णय घेणार. पण हे असे करणार हे मतदानापुर्वी जनतेला सांगितले होते काय? ज्या विषयांसाठी वा कृतीसाठी प्रश्न विचारले आहेत, त्यातला कुठलाही विषय विधानसभेतील कामकाजाशी संबंधित नसून त्या प्रशासकीय कारवाया आहेत. त्याचे आदेश जारी करण्यासाठी विधानसभेत बहूमताची गरज नाही. मंत्री वा मुख्यमंत्री आदेश काढून ते निर्णय घेऊ शकतात. मग असे प्रश्न पाठींब्यासाठी विचारायचेच कशाला? निव्वळ जनतेची दिशाभूल करायला. सभागृहात बहूमत सिद्ध झाले, मग सहा महिने कोणी तुमचे मंत्रीमंडळ पाडू शकत नसतो. तेवढ्या कालावधीत तुम्ही सरकार म्हणून घोटाळ्यांच्या चौकशा, विजखरेदी वा विजदरातील भ्रष्टाचारावर कारवाई सुरू करू शकता. अगदी भाजपा व कॉग्रेस विरोधात गेले, तरी तुमचा बाल बाका करू शकत नाहीत. मग केजरीवाल अशा अटी कशाला घालत आहेत? आधीच सर्व विषयांवर पाठींबा लिहून घ्यायचा असेल तर विधानसभा हवी कशाला? तिथे चर्चा व प्रस्ताव तरी कसले मांडणार आहात? की एकदा पाठींब्याचे कबुल करून घ्यायचे आणि मग विधानसभाच गुंडाळून ठेवायची असा बेत आहे? प्रामाणिकपणाचा मुखवटा लावून आजवरच्या कुठल्याही राजकीय पक्षाने इतकी बेईमानी सामान्य जनतेशी केलेली नसेल, इतका बनेलपणा ‘आप’चे नेते करीत आहेत. त्यात पत्रकार व राजकीय पक्ष फ़सले, तरी सामान्य मतदार त्यांना फ़ेरनिवडणूकीत योग्य तो धडा नक्कीच देईल.

3 comments:

  1. Why is suddenly Anna Hazare agreeing to the diluted, mocked and absolutely toothless version on govt.s Lokpal bill. He is acting in a more political way without joining politics.
    Read the various key provisions which are purposely dropped from this current Lokpal bill which was passed in Loksabha and is going to be tabled in Rajyasabha.
    It is almost like Anna Hazare just wants to have a 'achievement' against his name, at any cost, even if its by deceiving himself and the indians about the nature of lokpall bill,

    http://www.aamaadmiparty.org/news/the-farce-in-the-name-of-the-lokpal-bill

    ReplyDelete
  2. At Satya,Asha Va Prayatnavadi,Shri Bhau Torsekar has expressed his views.If you want to have debate with him then it can be here also.But your language isn't that polite.This is not the way to debate.First learn to respect the opinion of the other person and then come to debate.

    ReplyDelete
  3. @v.s.tondale,tumhala mi konatya sandarbhat bhaunshi ase bolat ahe yachi kalpana nahi.krupaya bhaunchya facebook profile var mazya comments bagha.bhau,modincha udoudo karnyasathi aam admi pakshala ugach badnam karat ahet.mi bhauni aam admi pakshavar kelelya anek aropanche puravyasakat khandan kele ahe.bhauncha yababtitla khotepanahi mi siddha kela ahe.pan bhau mafi magnyache sadhe saujanyahi dakhvat nahit.bhauni yababtitil mate swatapurati thevali tar mala akshep ghyayche kahi karan nahi.pan hi sagli mate te jahirpane mandatat.ani te chukiche ahe.

    ReplyDelete