Sunday, December 22, 2013

संच नवा, नाटक जुनेच


   निवडणूकांच्या प्रचारात सगळेच पक्ष एकमेकांवर चिखलफ़ेक करीत असतात. पण निवडणुका संपल्यावर राजकारणात एकप्रकारची सभ्यता व सुसंस्कृत भाषा आणि वर्तनाची अपेक्षा असते. पण राजकारणातला अश्लाघ्य भाग आणि टपोरी गुंडवृत्ती बदलायला आपण अवतार घेतला आहे, असा नित्यनेमाने दावा करणार्‍या आम आदमी पक्षाचे नेते व सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल वा अन्य नेत्यांनी भाषा दिल्लीतल्या मर्यादित यशाने अधिकच भरकटत चाललेली दिसते. निकाल लागल्यापासून भाजपा किंवा कॉग्रेस या दोन्ही पक्षांनी अत्यंत संयमाने आपल्या भूमिका मांडल्या आहेत. पण या नव्या पक्षाचे यशस्वी नेते मात्र ‘विनम्रपणे’ रस्त्यावरची कडवी बोली सातत्याने बोलताना दिसतात. कोणी कॉग्रेसला दुतोंडी साप म्हणतो तर कोणी लुटेरा व चोर अशी अन्य पक्षांची संभावना करीत असतो. निकाल लागल्यानंतर भाजपाला बहूमत नाही आणि कॉग्रेस तिसर्‍या क्रमांकावर फ़ेकली गेली. तेव्हा तेच दोन्ही पक्ष भ्रष्ट आहेत व अपराध करणारे आहेत, म्हणून त्यांनीच एकत्र येऊन सरकार बनवावे, असे मानभावीपणे सांगताना केजरीवाल यांची भाषा काय होती? हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन सरकार बनवू शकत नाहीत, असे कुणा पत्रकाराने म्हटले, की केजरीवाल म्हणायचे, ‘थोडा तो भरोसा करो इनकी बेशर्मीपर’. म्हणजे त्यांनी निवडणुका विरोधात लढवून सरकार बनवायला एकत्र येणे वा एकमेकांचा पाठींबा घेऊन सरकार बनवणे; हा बेशरमपणा होता. मात्र त्या दोन्ही पक्षांनी त्यापैकी काहीच केले नाही. पण कुणाचा पाठींबा घेणार नाही, की कोणाला पाठींबा देणार नाही, असा दोन आठवड्यांचा तमाशा केल्यावर केजरीवालच कॉग्रेसच्या पाठींब्याने सरकार बनवायला सिद्ध झाले आहेत. मग त्यांच्याच भाषेत याला बेशर्मी म्हणायचे की सार्वसामान्य भाषेत सभ्यता म्हणायचे?

   दिल्लीच्या मतदाराने आजवरच्या पक्षांवर नाराजी दाखवण्यासाठी आम आदमी पक्षाला मते दिलीत, म्हणजे त्यांना सातत्याने अन्य पक्षावर चिखलफ़ेक करण्याचा विशेषाधिकार दिलेला नाही किंवा तोच एकमेव इमानदार पक्ष असल्याचे आजीवन प्रमाणपत्र दिलेले नाही. तर आजवर जी आश्वासने दिली व कबुल केले; त्यांची पुर्तता करण्याची संधी दिलेली आहे. ती आश्वासने पुर्ण करायचे सोडून अमुकतमूकाला तुरुंगात डांबण्याच्या वल्गना केजरीवालांनी करायची गरज आहे काय? पहिली गोष्ट म्हणजे दिल्लीच्या मुख्यमंत्र्याचा पोलिसांवर अधिकार चालत नाही आणि कुणालाही आपल्या शंका व संशयाच्या आधारावर तुरूंगात डांबण्याचा अधिकार देशातल्या कुठल्याही मंत्री मुख्यमंत्र्याला देशाची राज्यघटना देत नाही. मग कॉग्रेस भाजपाच्या भ्रष्टाचार्‍यांना तुरूंगात डांबण्याच्या वल्गना आता निकालानंतर कशाला? त्यासाठी आधी निदान सरकार बनवायची तयारी असायला हवी. जे सरकार बनवायला लोकांच्या मताचा कौल घेण्याचे अगत्य केजरीवाल दाखवतात, तितकेच अगत्य त्यांनी कुणाला तुरूंगात डांबावे किंवा नाही; यावरही जनमत कौल घेण्यात दाखवायला नको काय? मुख्यमंत्री होण्यासाठी जनतेचा कौल पाहिजे, मग दुसर्‍या पक्षांच्या नेत्यांना गजाआड पाठवताना मनमानी कशी चालेल? तिथेही लोकांचा कौल न घेताच वल्गना कशाला? की लोकांना पाणी व वीजपुरवठ्याचे आश्वासन द्यायचे आणि मते मिळाल्यावर आपला सूडबुद्धीच्या राजकारणाचा अजेंडा राबवायचा असा बेत आहे? आपल्या सोयीनुसार न्याय व कायदा चालत नसतो. कायदा सरकार बनवण्याचा मार्ग मोकळा करीत असताना जनमत कौल घ्यायचे नाटक रंगवायचे आणि सूडबुद्धीचे राजकारण करताना मात्र जनमताला लाथ मारून मनमानी करायची काय?

   जेव्हा आपण जनमताचा आदर करतो असे केजरीवाल मानभावीपणे सांगतात, तेव्हा त्यांनी किंवा त्यांच्या पक्षाच्या कुणा नेत्याने अन्य पक्षाच्या नेत्यांविषयी वापरलेल्या भाषेला वा योजलेल्या उपायांना जनतेचा पाठींबा तपासायची त्यांना गरज का वाटत नाही? जनता राज करेगी असे बोलायचे. पण जनतेला मात्र आपल्या वास्तविक हेतूविषयी अंधारात ठेवायचे, असलाच सगळा प्रकार नाही काय? जनता पाणी वीजदरासाठी आशाळभूतपणे यांनी कारभार करायची प्रतिक्षा करते आहे आणि आपचे नेते मात्र आपल्या विरोधातील पक्षाच्या नेत्यांना तुरूंगात डांबायची स्वप्ने बघत आहेत. यातूनच त्यांच्या इमानदारीची साक्ष मिळते. त्यांनी सरकार बनवले, की हळूहळू त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर येणारच आहे. यश मिळवणे एकवेळ सोपे असते. पण यश पचवणे अतिशय अवघड असते. आपच्या नेत्यांना यशाची भलतीच झिंग आलेली दिसते. अशी झिंग आलेले ‘इमानदार’ राजकारणी भारतीय राजकारणाने खुप बघितले आहेत आणि त्यांची उडालेली दैनाही बघितलेली आहे. १९७७ साली राजघाटावर महात्माजींच्या समाधीला साक्षी ठेवून आलेले जनता पक्षाचे सरकार असल्याच पोरखेळाने अवघ्या तीन वर्षात उध्वस्त झाले आणि जनतेचा पुरता भ्रमनिरास झालेला होता. त्यावेळचे ‘इमानदार’ इन्कीलाब झिंदाबादची गर्जना करणारे लालूप्रसाद व मुलायमसिंग, पासवान आज निबर राजकारणी होऊन गेलेत. म्हणून इतिहासाबद्दल अनभिज्ञ असलेल्या नव्या पिढीला व तितक्याच अजाणते असलेल्या नव्या पत्रकारांना लोकांकडे कौल मागणार्‍या ‘इमानदार’ केजरीवालांचे अप्रुप वाटले तर नवल नाही. पण इतिहास घडताना बघितलेल्यांना त्यात नव्या संचातले जुने नाटक समजू शकते. काही महिन्यातच या रंगभूषेचे रंग विरतील आणि खरे चेहरे लोकांसमोर येतील.

1 comment:

  1. Bhau looks like you have selective amnesia.. You remember only what suits your point of view, which seems biased here.... Don't you remember following scams done right inside PMO office or inside Parliament 1) Cash filled briefcases given by Harshad for saving PV Narsimharao government, 2)Cash deals struck by Congress govt. through the middleman Amar singh(then SP leader) before the vote of confidence for MAnmohan singhs govt. 3) Bellary's reddy brothers 'kidnappin' BJP MLAs inside Andhra resort when the corrupt reddy brothers revolted against yeddyyurappa govt. So nothing wrong when AAP said that these parties will do same in Delhi. The reason BJP did not do that is a completely different topic of discussion which has more to avoid getting caught before 2014 General elections.It has nothing to do with ethics etc...

    ReplyDelete