Monday, December 16, 2013

‘आप’ आणि गिरणी कामगार



   दिल्लीची विधानसभा आणि आम आदमी पार्टी यांचे भवितव्य काय? ज्याप्रकारे त्या पक्षाचे प्रमुख नेते अरविंद केजरीवाल आणि त्यांचे अन्य सहकारी बोलत व वागत आहेत; त्यामुळे अनेक राजकीय अभ्यासकांना हा प्रश्न आतापासूनच सतावू लागला आहे. कारण तसा हा नवा पक्ष आहे आणि स्थापनेपासून अवघ्या सव्वा वर्षातच त्याने दिल्लीच्या विधानसभा निवडणूकीत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. पण इतके यश मिळावल्यावर जी जबाबदारी येते आणि जितके गंभीरपणे वागायला हवे; त्याचा या पक्ष नामक जमावामध्ये संपुर्ण अभाव दिसतो आहे. त्याचे अर्थातच स्पष्टीकरण त्या पक्षाचे प्रवक्ते व नेत्यांनी वारंवार दिलेले आहे. आम्ही सत्तेचे हपापलेले नसून राजकारणात आम्हाला रस नाही. आम्ही राजकारणाची दिशा व दशा बदलण्यासाठी अवतार घेतला आहे. सहाजिकच आजवरच्या राजकीय मापदंड व निकषांनी आमचे मोजमाप होऊ नये; असा त्यांचा आग्रह असतो. पण ते तितकेच खरे असेल, तर त्यांनी राजकीय डावपेच व कुटीलपणे आपल्या हालचाली करता कामा नयेत. उदाहरणार्थ आपला सर्व कारभार व निर्णय पारदर्शक पद्धतीने घेतले जातात, असा त्यांचा दावा आहे. म्हणूनच सरकार स्थापनेसाठी कोणाचा पाठींबा घ्यावा किंवा कोणाला पाठींबा द्यावा, याविषयी थेट जनतेशी सल्लामसलत करण्याचा पर्याय त्यांनी समोर मांडला आहे. इतकाच त्यांना जर जनमताचा पुळका आहे, तर त्यांनी भाजपा व कॉग्रेस पक्षाला जी प्रश्नावली पाठवली, त्यातले मुद्दे एका बंद खोलीत बसून मुठभर नेत्यांनी कशाला तयार केले? त्यावरही त्यांच्या पद्धतीने सार्वमत घ्यायला नको काय? त्यात मुद्दे कुठले असावेत, हे नेत्यांनी परस्पर कसे ठरवले? सगळाच मामला आपल्याच निकष व नियमांची पायमल्ली करण्याचा नाही काय?

   असो, हळूहळू या उपटसुंभगिरीला प्रोत्साहन देणार्‍या तथाकथित सेक्युलर अभ्यासक व जाणकारांचा भ्रमनिरास होऊ लागला असून त्यांना प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. त्यापैकी कुठल्या प्रश्नांना उत्तरे देण्याची वा स्पष्टीकरण देण्याची ‘आप’च्या नेत्यांना गरज नाही. त्यांना प्रश्न विचारणारा वा शंका उपस्थित करणारा आपोआप बेईमान असतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल शंका घेणेच मुलात बेईमानी असल्यावर खुलासे वा उत्तरे देण्याची काही गरज उरतेच कुठे? हा सर्व तमाशा त्यांनी कितीही काळ चालू ठेवायला काहीच हरकत नाही. पण त्यांच्यावर विसंबून ज्यांनी त्वरेने काही प्रश्न सुटतील, अशी अपेक्षा बाळगली, त्यांचाही भ्रमनिरास होणार आहे. कारण त्यापैकी बरेच मतदार पारदर्शिता वा जनलोकपालसाठी त्यांना मत द्यायला पुढे आलेले नव्हते. विजदरात कपात, भरपूर मोफ़त पाणी व हंगामी कामगारांना कायमसेवेत सामावून घेण्याच्या विषयांना मतदाराने प्राधान्य दिलेले आहे. पण त्याची पुर्तता होण्याची शक्यता संपलेली आहे. केवळ आताच नव्हेतर आगामी निवडणूकात या पक्षाला मते दिली, तरी त्याची पुर्तता होऊ शकत नाही, याचीच हमी हे नेते आपल्या वागण्यातून देत आहेत. सहाजिकच जो प्रतिसाद त्यांना आज मिळाला, तो राहुल गांधी, नरेंद्र मोदी वा पंतप्रधानांच्या विरोधात त्यांनी लोकसभेच्या निवडणूका लढवाव्यात म्हणून मिळालेला नव्हता. पण लोकांना आज भेडसावणार्‍या समस्या सोडवायची संधी सोडून ही मंडळी जेव्हा कुणाला तुरुंगात डांबायची किंवा कुणाविरोधी निवडणूका लढवायच्या गमजा करतात; तेव्हा त्यांच्याच मतदाराचा भ्रमनिरास करीत असतात. त्या मतदाराने कॉग्रेस वा शीला दिक्षित, राहुल याना तिथवर जाऊन कानपिचक्या दिल्या नव्हत्या. तर आपली नाराजी मतदानातून व्यक्त केली होती. त्याचीच वेगळी पुनरावृत्ती होणार आहे.

   म्हणजे ‘आप’चे भवितव्य काय असेल? तीन दशकांपुर्वी मुंबईत झालेल्या अभूतपुर्व गिरणी संपाचे भवितव्य काय? तेव्हाची कामगार आघाडी संघटना व तिचे नेते डॉ. दत्ता सामंत यांच्यासह अन्य नेत्यांची भाषा आज कोणाला आठवते काय? गिरणी धंदा डबघाईला आलेला होता आणि गिरण्या बंद करून मालकवर्ग त्याखालची जमीन विकायला उत्सूक होता. पण त्यासाठी त्याला परवानगी मिळत नव्हती. म्हणून गिरण्या कशाबशा चालवल्या जात होत्या. त्या गिरण्यातील कामगारांना हजारो रुपयांच्या पगारवाढीचे व प्रचंड बोनसचे आमिष दाखवून सामंतांनी बेमुदत संपात उतरवले होते. आजपर्यंत तो संप कोणीही मागे घेतलेला नाही. पण संप चालू असला तरी गिरण्याच नामशेष होऊन गेल्या आहेत. लाखो कामगार व त्यांची कुटुंबे देशोधडीला लागली. त्यांची एक पिढी बरबाद होऊन गेली. उरलेसुरले कामगार वा त्यांचे वारस आज उध्वस्त गिरण्यांच्या जागेवर उभ्या राहिलेल्या इमारतीत निदान मोफ़त घर मिंळावे म्हणून अक्षरश: गयावया करीत फ़िरत आहेत. त्यांच्या तोंडाला पाने पुसण्यापलिकडे काहीही होत नाही. हे सर्व कशामुळे झाले? कुठलीही तडजोड नाकारून घेतल्या तर सगळ्या मागण्या, नाहीतर काहीच नको; असा पवित्रा त्याला कारणीभूत झाला होता. ‘कोण म्हणतो देणार नाय, घेतल्या शिवाय र्‍हानार नाय’ या भाषेने व हेकेखोरपणाने ती अवस्था त्या कामगारावर आणली. कुठलेही युद्ध वा लढाई अंतिम नसते. जे मिळेल ते पदरात पाडून घ्यायचे आणि पुढले मिळवण्यासाठी संघर्ष चालू ठेवायचा; अशी युद्धनिती असते. तीच पायदळी तुडवताना सामंतांनी लाखो गिरणीकामगारांचे जीवनच उध्वस्त करून टाकले. एका उत्स्फ़ुर्त कामगार लढ्याची केविलवाणी अवस्था करून टाकली. केजरीवालांची भाषा वेगळी नसेल, तर भवितव्य तरी वेगळे कसे असणार?

4 comments:

  1. सामंतांनी लाखो गिरणीकामगारांचे जीवनच उध्वस्त करून टाकले. एका उत्स्फ़ुर्त कामगार लढ्याची केविलवाणी अवस्था करून टाकली. केजरीवालांची भाषा वेगळी नसेल, तर भवितव्य तरी वेगळे कसे असणार? khup chhan

    ReplyDelete
  2. seemingly razor-sharp, poignant, toxic, many'a-times -ve, critical-appraisals in all these r also constructive too & I w'd like all AamAadmiParty-folks take all these blog-scribes, sportingly & in spirit of 'nidakache ghar assave shejari' . . . so well done, keep writing more & more - but let the author of these blogs must c 2 it that these writings r primarily & must-remain-always 2 elevate/enhance AAP's qualitative improvements - ComeWhatMay-NoMatterWhat . . . sent by Founder-AsianDevelopemntSociety-Solapur/MAH' (e'm: asiandevelopmentsociety@gmail.com)

    ReplyDelete
  3. जे मिळेल ते पदरात पाडून घ्यायचे आणि पुढले मिळवण्यासाठी संघर्ष चालू ठेवायचा _कॉ डांगे म्हणाले होते !

    ReplyDelete