Monday, March 24, 2014

कोणाचा कोणाला धोका?

   शनिवारी मध्यरात्री राजस्थानच्या जोधपूर शहरात ठराविक जागी धाडी घालून अत्यंत घातक असे काही जिहादी पोलिसांनी पकडले. त्यामध्ये एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे. तो दिर्घकाळ भारतात बेकायदा वास्तव्य करून होता आणि आजवर अनुत्तरीत राहिलेल्या अनेक स्फ़ोटाच्या तपासात पोलिसांना हवा असल्याचे निष्पन्न झालेले आहे. या टोळीने भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना ठार मारण्याचे कारस्थान रचलेले होते असाही आरोप आहे. त्यानंतर आपलीच पाठ थोपटून घेताना देशाचे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी असेच आणखी काही दहशतवादी शोधायची मोहिम चालू असल्याचेही सांगितले. त्याच्याही पुढे जाऊन मोदींनी घाबरण्याचे कारण नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी द्यावी यासारखा मोठा विनोद नाही. कारण शिंदेच्या शब्दावर विसंबून रहायचे असते, तर मोदींना गुजरातबाहेर पडणेच अशक्य झाले असते. एक वर्षापुर्वी राजस्थानची राजधानी जयपूर येथे कॉग्रेस पक्षाचे सिबीर झालेले होते. तिथे बोलताना शिंदे यांनी कुठली मुक्ताफ़ळे उधळली होती? त्यांनी तेव्हा मोदी वा भाजपाला सुरक्षेविषयी निश्चिंत रहाण्याचे आवाहन केलेले नव्हते. उलट भाजपाची सहकारी संघटना रा. स्व. संघच दहशतवादी असल्याचा आरोप करीत त्याच्या हिंदु दहशतवादाचा भारताला धोका असल्याचे विधान केले होते. अर्थात त्यासाठी त्यांनी कुठला पुरावा दिलेला नव्हता. त्यामुळेच टिकेची झोड उठताच आपल्याला तसे म्हणायचे नव्हते, असे म्हणून शिंदे यांनी आपले शब्द फ़िरवले होते. पण त्याच वेळी भारताच्या गृहमंत्र्याचे दुसर्‍या कुणीतरी दिलखुलास स्वागत केले होते. आज शिंदे ते शिफ़ारसपत्र विसरून गेलेतच. आपणही सगळेच त्या शिंदे प्रशंसकाचे ते शिफ़ारसपत्र विसरून गेलो आहोत.

   जयपूरमध्ये शिंदे यांनी हिंदू दहशतवादाचा आरोप केला आणि सीमेपलिकडून सईद हफ़ीझ नावाच्या व्यक्तीने तात्काळ शिंदे यांचे अभिनंदन केले होते. कोण हा सईद हफ़ीझ? कोणी भारतीय सुरक्षा व्यवस्थेतला महत्वाचा अधिकारी आहे काय? जग त्याला २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सुत्रधार म्हणून ओळखते. म्हणजेच त्याला त्याच कारणास्तव भारताच्या हवाली करण्याची मागणी भारत सरकारच्या गृहखात्याने केलेली आहे, तोच हा सईद हफ़ीझ आहे ना? मग त्यानेच भारताच्या गृहमंत्र्याचे दिलखुलास स्वागत कशाला करावे? तर तो गृहमंत्री मुंबई हल्ल्यातील आरोपीला सोडून भलत्यालाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करतोय, याचा हफ़ीझला आनंदच होणार ना? शिवाय दुसरीकडे भारताचा गृहमंत्रीच आपल्याला अशी क्लिनचीट देत असेल, तर हफ़ीझने भारतामध्ये आणखी घातपाती पाठवावेत, यात नवल ते काय? शिंदे खर्‍या धोक्याकडे पाठ फ़िरवून हिंदु दहशतवादाचा डंका पिटू लागले, तर हफ़ीझला ते स्वागतार्हच वाटणार ना? त्याचाच परिणाम मग आपल्याला वकास किंवा त्याच्यासारखे अधिक घातपाती पाकिस्तानी भारतात तळ ठोकायला येण्यातून दिसतो. कारण भारताचा गृहमंत्री आपल्यावर पाळत ठेवण्यापेक्षा संघाकडे बोट दाखवतोय, यातून हफ़ीझला प्रोत्साहनच मिळणार ना? वकास उर्फ़ झिया उर रहमान याची धरपकड झाल्यानंतर शिंदे यांनी पोलिसांच्या चौकसपणाचे श्रेय घेण्यापेक्षा वर्षभरापुर्वी आपण जी मुक्ताफ़ळे उधळली, त्याचा खुलासा आधी करायला हवा आहे. कारण त्यांच्याच असल्या मुक्ताफ़ळातुन जिहादी व पाकिस्तानी घातपात्यांना प्रोत्साहन मिळालेले आहे. अन्यथा हा वकास नावाचा जिहादी देशाच्या विविध शहरात स्फ़ोट घडवून पुन्हा सुरक्षितपणे जोधपुरमध्ये कसा वास्तव्य करू शकतो?

   सेक्युलर राजकारणाने देश व जनतेची जीवन किती संकटात आणून सोडले आहे; त्याचाच हा सज्जड पुरावा आहे. सेक्युलर असायचे तर भाजपाला संघाला विरोध करायला हवा. तो विरोध करायचा तर त्यांच्या विरोधात कोणीही काहीही बोलले वा केले, तरी त्याचे समर्थन करायला हवे. तो विरोध करताना देश रसातळाला गेला वा असुरक्षित झाला तरी बेहत्तर. त्यामुळे आता देश सेक्युलर असण्यासाठी देशाचा विनाश झाला तरी चालेल, अशी एक सेक्युलर मनोवृत्ती उदयास आलेली आहे. त्याचे परिणामही साफ़ दिसू लागले आहेत. अबु जुंदाल वा यासिन भटकळ यांना बिहार नेपाळच्या सीमेवर पकडायचे होते, तर तिथल्या सेक्युलर नितीश सरकारने दिल्ली पोलिसांना सहकार्य द्यायचे नाकारले होते. नशीब राजस्थानात हल्लीच सेक्युलर सरकार जाऊन भाजपाचे जातीय सरकार सत्तेवर आले आहे. अन्यथा वकास नावाच्या जिहादीला अटक करणेही जिकीरीचे होऊन बसले असते. थोडक्यात आता जिहादी व सेक्युलर मनोवृत्ती यातला फ़रक क्रमाक्रमाने पुसला जातो आहे. वकास किंवा जोधपूर येथून पकडलेल्या टोळीची कहाणी भटकळपेक्षा वेगळी नाही. बहूतेक जिहादीच्या कहाण्या सारख्याच असतात. केवळ त्यातली नावे बदलतात. बाकी मामला तोच तोच असतो. थोडे दिवस थांबा, इशरतप्रमाणे किंवा अफ़जल गुरूप्रमाणे या वकासच्या मानवी हक्काची पायमल्ली होत असल्याच्या तक्रारी आपल्याला ऐकायच्या आहेत. कारण देशाची सत्ता अजून सेक्युलर राजकारण्यांच्या हाती आहे. जोपर्यंत सेक्युलर राजकारणाची नांगी ठेचली जात नाही आणि मतपेढ्यांचे राजकारण उखडून टाकले जात नाही; तोपर्यंत असे जुंदाल, भटकळ वा वकास आपल्याला भेडसावतच रहाणार आहेत. त्याच भयातून मोदींविषयी जनतेचे आकर्षण वाढलेले आहे.

No comments:

Post a Comment