Thursday, November 20, 2014

करोडो मतदारांना शिव्या आवडतात?

(सेनेला नेहमी नावे ठेवणार्‍या राजदीपची भाषा)



विधानसभा निवडणुका ऐन रंगात आलेल्या असताना व नंतर निकाल लागल्यापासून शिवसेनेच्या प्रचारातील भाषेचा खुप उल्लेख झाला. भाजपाच्या नेते प्रवक्त्यांनी तर त्याविरोधात मोठीच आघाडी उघडली होती आणि आजही दोन पक्षांनी एकत्र येण्याचा विषय झाला, मग ठाकरी भाषेचा उद्धार सुरू होत असतो. असले युक्तीवाद व वक्तव्ये ऐकल्यावर वाटते की बहूधा शिवसेनेशी भाजपाचा पहिलाच संबंध आलेला असावा. गेल्या पंचवीस वर्षात शिवसेना म्हणजे काय व तिची भाषा कोणती, याचा गंधही भाजपाला नसावा. मागल्या पाव शतकात ज्या शिवसेनेशी भाजपाची युती व मैत्री होती, ती कुठली तरी वेगळीच शिवसेना असावी. अन्यथा त्यांनी इतक्या तावातावाने सेनेच्या भाषेवर आक्षेप घेण्याचे काहीच कारण नव्हते. कारण आज ज्या भाषेवर भाजपावाले आक्षेप घेत आहेत, तीच सेनेची मागल्या ४८ वर्षापासूनची भाषा राहिलेली आहे. अनेकदा यापेक्षाही शिवराळपणा त्यातून डोकावला आहे. पण त्याबद्दल भाजपाने कधी अवाक्षर उच्चारल्याचे कोणाच्या ऐकीवात नाही. सत्तेवर बसल्यानंतर भाषेचे सौजन्य सांगणार्‍या भाजपावाल्यांनी जरा एकोणिस वर्षे मागे जायला हरकत नाही. तेव्हा शिवसेनेशी सत्तेत भागी केलेली होती आणि त्याच काळात सेनेच्या या भाषेवरून खुप काहूर माजलेले होते. अनेक संपादक किंवा मातब्बर मान्यवर लोक सेनेच्या भाषेवर आक्षेप घेत होते. असली भाषा वापरणार्‍यांसोबत भाजपा कसा सत्तेत भागीदारी करतो, असेही सवाल केले जात होते. पण त्याबद्दल चकार शब्द न बोलता भाजपाने खुर्च्या उबवल्या होत्या. त्यांची स्मरणशक्ती भरकटलेली असेल, तर काही प्रसंग मुद्दाम सांगावे लागतील. कारण हा भाषेचा मामला गंभीर असून त्यावर तेव्हा बराच उहापोह झालेला होता. भाषाविदांनी त्यावर विवेचनही केले होते. मग त्यापैकी भाजपाच्या कानावर काहीच गेलेले नव्हते काय?

युतीची सत्ता असताना प्रमुख वृत्तपत्रातून त्यांच्यावर कडवी टिका सुरू होती आणि त्यामुळे शिवसेनाप्रमुख भलतेच खवळलेले होते. सहाजिकच त्यांनी अशा संपादक आणि पत्रकारांच्या टिप्पण्य़ांचा समाचार ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीतून घेतला होता. ‘लोकसत्ता’चे तात्कालीन संपादक डॉ. अरूण टिकेकर यांना फ़ोरास रोड व वेश्यावस्तीत नेण्यापर्यंत भयंकर भाषा बाळासाहेबांनी केली होती आणि ती छापून आलेली होती. त्यावेळी मग प्रख्यात भाषा विशारद आणि प्राच्यविद्येचे जाणकार प्रा. मे. पुं. रेगे यांनी एक प्रदिर्घ लेखच लिहीला होता. वाई येथून प्रकाशित होणार्‍या ‘नवभारत’ द्वैमासिकाच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या त्या लेखाचे पुनर्मुद्रण ‘महाराष्ट्र टाईम्स’ आणि ‘महानगर’मध्ये झालेले होते. ‘ठाकरे यांची भाषा’ असाच त्याचा विषय होता. अशी भाषा वापरण्यामागची मानसिकता, हेतू, त्यातून निघणारे अर्थ व पाठवले जाणारे संकेत, इत्यादीचा रेगे यांनी व्यापक उहापोह केलेला होता. मुद्दा इतकाच, की अशा भाषेमध्ये वापरले जाणारे शब्द कधी तसेच्या तसे घ्यायचे नसतात. त्यातून भावना व्यक्त होतात, त्यांचा हेतू समजायचा असतो, असे रेगे यांनी म्हटले होते. पण तशी भाषा लोक कशासाठी व केव्हा वापरतात, त्याचे उत्तम विवेचन होते. भाजपाच्या कुणा विद्वानाने त्यावेळी रेगे यांची पाठ थोपटल्याचे कधी दिसले नाही किंवा त्यासाठी युतीमधून बाहेर पडण्याचा इशाराही दिल्याचे स्मरत नाही. भाषेच्या पावित्र्याचे आज इतके ढोल वाजवणार्‍यांना तेव्हा भाषेपेक्षा सत्ता प्यारी होती आणि तिच्यापुढे भाषा निरर्थक होती ना? मग आज त्याच भाषेवर इतके काहूर कशाला माजवायचे? तर ते एक निमीत्त असते. भाषेचे वावडे तेव्हाही भाजपाला नव्हते आणि आजही नाही. पण तेव्हा त्यावरून काहूर माजवण्यात तोटा होता आणि आज त्याचेच भांडवल करणे सोयीचे आहे. सहाजिकच सेना वा सामनाच्या भाषेचे अवडंबर माजवले जात आहे.

अगदी आपण त्याचा आणखी एका वेगळ्या बाजूनेही विचार करू शकतो. जर भाजपा किंवा त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांना शिवसेनेने अफ़जलखानाची फ़ौज, आदिलशहा असली संबोधने लावणे आक्षेपार्ह असेल, तर मग त्यातून दुखावलेल्यांनी त्याच भाषेचा वापर करणार्‍यांशी पुन्हा युती करावी काय? भाजपाला मते देणार्‍यांना ते मानवेल काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पित्याचा उद्धार करणार्‍यांना भाजपाच्या मतदाराने धडा शिकवला, असाच एकूण भाजपाचा आव असतो. तो खरा असेल, तर त्यांनी आता सत्ता टिकवण्यासाठी त्याच शिवराळ शिवसेनेसोबत जाण्यात कुठले पावित्र्य शिल्लक उरते? पण त्याच्याही पलिकडे जाऊन प्रचारातील भाजपाच्याही भाषेची छाननी करावी लागेल. त्यांनीही राष्ट्रवादीचे उसनवारी करून उमेदवार आपल्या झेंड्याखाली आणले, त्याचा खुलासा काय केला होता? रावणाची लंका जाळण्यासाठी बिभीषण सोबत घ्यावा लागतो. अशा बिभीषणांना सोबत घेण्य़ाची जी भाषा होती, तिने राष्ट्रवादी पक्ष तिचे नेते शरद पवार यांना दशानन रावणच संबोधले नव्हते काय? मग आता बिभीषणाच्या मदतीने जितके यश मिळवले, त्यात त्रुटी राहिली तर खुद्द रावणालाच सोबत घेण्यात कुठले पावित्र्य जपले जात आहे? सेनेच्या भाषेवर प्रश्नचिन्ह लावताना आपण कुठली भाषा वापरली होती, तिचे स्मरण कोणी ठेवायचे? अफ़जलखान म्हटल्यावर दुखत असेल, तर दुसर्‍याला रावण संबोधल्याने गुदगुल्या होत असतील काय? त्यानंतरही त्या थिल्लरपणाकडे काणाडोळा करून भाजपाला परस्पर पाठींबा देऊ केलेल्या पवारांचे समर्थन नाकारण्याचे धाडस भाजपा का दाखवू शकलेला नाही? सेनेच्या भाषेचे दुखणे इतकेच खुपत असेल, तर रावणाचे औदार्य नाकारण्याचाही प्रामाणिकपणा दिसायला हवा ना? पण दुटप्पीपणा करणार्‍यांची स्मृती नेहमी सोयीस्कर रितीने विसराळू होत असते ना?

 असो, शिवसेनेनेही लक्षात ठेवावे, की त्यांनी जी काही भाषा वापरली आणि शिवराळपणा केला, त्यानंतरच त्याना आजपर्यंत कधी नाही इतकी प्रचंड मते मिळालेली आहेत. एक कोटीहून अधिक मते या विधानसभेत सेनेला मिळाली. तितकी यापुर्वी कधी मिळालेली होती? नसतील तर यावेळी कशाला मिळाली? त्याची कारणे मग अशा भाषेत शोधता येऊ शकतील. कदाचित भाजपाला अफ़जलखानाची फ़ौज संबोधणे आवडलेलाच तो मतदार असू शकतो. आपले तेच शब्द विसरून शिवसेना त्याच अफ़जलखानाच्या फ़ौजेशी मैत्री करायला गेल्यास, तो एक कोटी मतदार सेनेला माफ़ करील काय? भाषेची नजाकत अशी असते, की सार्वजनिक पातळीवर महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात आणि शहरांच्या गल्लीबोळात अशीच भाषा सरसकट बोलली जात असते. बहुतांश मतदार त्याच भाषेत रोजच व्यवहार करत असतो. एकमेकांच्या आईबापाचा उद्धार नित्यनेमाने करणारे अल्पावधीतच गुण्यागोविंदाने परस्परांना चहा पाजतात, एकत्र बिड्या फ़ुंकतात, तंबाखूची देवाणघेवाण करीत असतात. काढलेला बाप दाखवत उरावर बसत नसतात. शाब्दिक उद्धार हा तेवढ्यापुरता असतो. त्याच्यावरून डुख धरून हेवेदावे मांडले गेले असते, तर प्रत्येक गावात रोजच्या रोज पंधरावीस मुडदेच पडले असते. पण तसे होत नाही. कारण हीच सामान्य माणसाची संपर्काची भाषा आहे आणि तिचाच सर्रास वापर होत असतो. त्यावरून इतके काहूर माजवणे किंवा राजकीय भांडवल करणे निव्वळ कांगावा असतो. जाहिरसभा ह्या विचारप्रवर्तक कार्य नसते, तर आपला मुद्दा ठासून मांडण्य़ासाठी केलेली शाब्दिक कसरत असते. सभा संपते तिथेच त्याची महत्ता संपलेली असते. त्यावरून राजकीय निमीत्त शोधणे वा त्याचे हत्यार बनवणे बौद्धिक चतूराई असू शकते. पण लोकांवर त्याचा अजिबात प्रभाव पडत नाही. कारण करोडो लोकांची तीच लोकभाषा आहे व असणार आहे.

4 comments:

  1. बाळा साहेबांच्या 'शिव्या म्हणजे ओव्या' होत्या!

    ReplyDelete
  2. Bhau,

    To Regencha lekh mudrit karal kay?

    ReplyDelete
    Replies
    1. खुप मोठा आहे. शक्य होईल तसा लौकरच टाईप करून टाकीन इथे. अभ्यासू व चिकित्सक वाचकांसाठी मेजवानीच आहे.

      Delete
  3. एकदम बरोबर भाऊ, अहो कोल्हापुरात पण रंडीच्या म्हटल्याशिवाय मित्राबरोबर बोलणे सुरु होत नाही . आमच्याकडे नगर मध्ये पण च्या आयला म्हटल्याशिवाय वाक्य सुरु होत नाही . मग कशाला सुसंस्कृत पानाचा आव आणायचा म्हणतो मी?

    ReplyDelete