Thursday, January 28, 2016

महिलांच्या अधिकाराचे शनिमहात्म्य



गेल्या आठवड्यात किंवा नेमके सांगायचे तर प्रजासत्ताकदिनी देशाला एक नवी रणरागिणी मिळाली. शनि शिंगणापुर नावाच्या एका गावातल्या देवस्थानामध्ये शनीची पूजा करण्याचा महिलांना अधिकार आहे आणि त्यामुळे देशात पुरूष महिला समानता प्रस्थापित होणार असल्याचाही देशाला साक्षात्कार झाला. माध्यमातून कुठल्याही गोष्टीचे किती यशस्वी मार्केटींग होऊ शकते, त्याचा एक जीवंत अनुभव घेता आला. किंबहूना देशाच्या कानाकोपर्‍यात पसरलेल्या करोडो लोकांना याच रणरागिणीमुळे शिंगणापुरचे शनिमहात्म्य कळू शकले. कोणीही असा तमाशा करायचा ठरवले, मग चार लोक गोळा होतातच. त्यात पुन्हा माध्यमांनी आपली शक्ती व साधने झोकून दिली, मग मुंग्याही पर्वत गिळून दाखवू शकतात, आजच्या जमान्यात! शिवाय जिहादी दहशतवादापेक्षा माध्यमांना घाबरून जगणारे राजकारणी असले, तर मुंगीलाही अक्राळविक्राळ करण्याची किमया साधता येणे अशक्य नाही. त्यामुळेच प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर गावात एक महान घटना घडली. देशभरच्या महिलांना एक मोठा अधिकार आपल्याला असल्याचा शोध लागला. आजवर आपण अविष्कार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य असली अनेक स्वातंत्र्ये ऐकलेली होती. त्यात पूजेचे स्वातंत्र्य किंवा अधिकार भारतीय नागरिकाला असल्याचा साक्षात्कार नव्याने घडला. त्या स्वातंत्र्यासमोर देशातले विविध प्रश्न व समस्या किती नगण्य आहेत, त्याचाही अनुभव घेता आला. महिलांना त्या चबुतर्‍यावर चढून शनीची पूजा करता आली, म्हणजे या देशातील महिलांना अभेद्य सुरक्षा मिळू शकेल, हे आजवर कोणाच्याच कसे लक्षात आलेले नव्हते, हे गुढ आहे. पण तेच आज माध्यमांच्या युगातले वास्तव आहे. तसे नसते तर देशभर या एका गावातल्या निदर्शनांचा इतका गवगवा कशाला झाला असता?

शनि शिंगणापूर हे कित्येक दशके वा शतके कुणाला ठाऊक नसलेले गाव आहे, तिथे उघडयावर एक शीळा उभी आहे आणि ठराविक निर्बंध पाळून शनी नामक देवतेची पूजा करावी, असा दंडक आहे. त्यात पुरूषांनाच शीळेपाशी जाता येते आणि महिलांना प्रतिबंध आहे. हा किती अन्याय आहे? शेकडो वर्षे तसे होत आलेले असले, म्हणून तो अन्याय न्याय्य ठरू शकत नाही. आजवर कुणा महिलेने त्याला आव्हान दिले नव्हते. पण गेल्या दोडदोन महिन्यापासून तिथे पूजेचा अधिकार महिलांनाही असल्याचे वाद सुरू झाले, त्यापुर्वी ह्या देवस्थानाची ख्याती भलत्याच कारणास्तव होती, शनि शिंगणापूर म्हणजे जिथे चोरी होत नाही, असे गाव म्हणून प्रसिद्ध होते. तिथे लोकांच्या घराला दारे नाहीत वा कोणी कुठलीही वस्तु कडी-कुलपात बंद करून ठेवत नाही, अशी ख्याती होती. अशी ख्याती आहे म्हटल्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती तिथे धावून गेली नाही, तरच नवल होते. म्हणूनच त्या समितीचे जनक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी तिथे काही वर्षापुर्वी अंधश्रद्धा निर्मूलन करणाचा घाट घातला होता. चोरी होत नाही ही श्रद्धा गैरलागू असल्याने दाभोळकरांनी तिथे लोकांना नेवून चोरी होऊ शकते, असा वैज्ञानिक प्रयोग करण्याचा निर्धार केला होता. तो पुर्णत्वास जाऊ शकला नव्हता. त्याची दोन कारणे संभवतात. एक म्हणजे दाभोळकरांनी निर्धार केला, तेव्हा देशातील माध्यमांचा पसारा इतका बोकाळलेला नव्हता. त्यामुळेच दाभोळकर यांना त्यात पुढे काही करता आले नाही. तेही भलेच म्हणायचे. अन्यथा तेव्हाच त्यात हालचाली झाल्या असत्या, तर राज्यघटनेने प्रत्येकाला कुठेही चोरी करण्याचा अधिकार दिलेला असल्याचा दावा आपल्याला ऐकू आला असता आणि माध्यमांनी त्यासाठी काहुर माजवले असते. चोर दरोडेखोरांच्या दुर्दैवाने तेव्हा तो संकल्प तडीस गेला नाही आणि शिंगणापूरची जुनी ख्याती कायम राहिली.

पण महिलांच्या तिथल्या पूजेचा अधिकार कधीच चर्चेचा विषय झाला नाही आणि म्हणून देशाला तृप्ती देसाई नावाच्या रणरागिणीचे रुप बघायला मिळाले, प्रजासत्ताकाने शनिची पूजा करण्या़चा अधिकार महिलांनाही दिलेला असल्याचा साक्षात्कार घेऊन ही महिला पुढे झाली आणि शिंगणापुरात चोरी करण्या़चा राहिलेला संकल्प तडीस जाण्याची शक्यता निर्माण झाली. अर्थात श्रद्धाळू व विज्ञाननिष्ठ यांचा संघर्ष कधीच संपणारा नसतो. म्हणूनच शनिवर अशी साडेसाती कधीतरी येणार ते त्यालाही उमजायला हवे होते. शनिची पूजा महिलांनी करू नये, असा कुठला दंडक अन्यत्र असल्याचे ऐकीवात नाही. पण या गावातील तशी समजूत असल्याने त्यांनी चौथर्‍यावर महिलांना बंदी घातलेली आहे. ती जगभरच्या शनिभक्तांनी मानावी, असा त्या गावकर्‍यांचा आग्रह नाही. शिंगणापूर बाहेरच्या कोणीही शनीची पूजा कशी करावी याविषयी त्या गावकर्‍यांनी कुठला दंडक घातलेला नाही. त्यांच्या गावातील जे काही शनिदेव म्हणून ओळखले जाते, त्याच्याविषयी त्यांचा आग्रह आहे. तर त्याला नाकारण्याचा अधिकार कायदा सर्वांना देतो का? दैवत गावाचे आहे आणि तिथे गावकर्‍यांचा अधिकार निर्विवाद असतो. कुठलीही संस्था वा तिथली व्यवस्था स्थानिकांसाठी उभारलेली असते. त्यात ढवळाढवळ करण्याचा बाहेरच्याला अधिकार कसा काय असू शकतो? तो मान्य करायचा तर कुठल्याही संस्थेत वा कुठल्याही जागी कुठलाही नियम बंधन असायचे कारण नाही. विमानतळावर झाडाझडती कशासाठी? अमूक एका शाळेत अमुक एका गणवेशाची सक्ती तरी कशाला? कन्याशाळेत पुरूषांना प्रवेश नाकारण्याची तरी गरज काय? सवाल श्रद्धेचा असतो, तेव्हा यातले दंडक महत्वाचे असतात. ते झुगारून श्रद्धेचे नाटक रंगवण्यात अर्थ नसतो. ते शुद्ध पाखंड असते. म्हणूनच प्रजासत्ताकदिनी जो तमाशा झाला त्याला महिला अधिकाराचे नाटक म्हणावे लागते.

ही एक बाजू असली, तरी त्याची दुसरी बाजूही तितकीच लक्षणिय आहे. शनि हा देव बाकीच्यांसारखा सहिष्णू वा दयाळु नाही, शनिची ख्याती कोपीष्ट देव अशी आहे. त्याचा कोप सांगणारे शनिमहात्म्य सतत कानावर येत असते. म्हणूनच शनीवर आणि त्याच्या कोपदृष्टीवर ज्यांची प्रामाणिक श्रद्धा असेल, त्यांनी असल्या पापकर्माचा बंदोबस्तही तोच शनी करील, यावर इतकीच श्रद्धा ठेवली पाहिजे. बारीकसारीक गोष्टीत चुक झाली तर शनीची वक्रदृष्टी नडते, असे म्हणतात. त्याच्या शेकड्यांनी कथा सांगितल्या जातात. त्यावर ज्यांचा विश्वास नाही, त्यांना वाटेल ते करू द्या. यांना शिक्षा व प्रायश्चित्त द्यायला खुद्द शनी समर्थ नाही काय? जो शनिदेव शिंगणापूर गावात कोणाला चोरी केली म्हणून शिक्षा देवू शकतो, त्याला चौथर्‍यावर येऊन कुणा महिलेने अनाचार केला, तर शिक्षा देता येईलच ना? मग भक्तांनी तृप्ती देसाई वा अन्य कुणा महिलांनी तिथे जाण्यात आडकाठी कशाला करावी? त्यांना हवे ते करू द्या. आपली श्रद्धा पक्की असेल तर शनिदेव त्यांना क्षमा करणार नाही. केलेल्या पापाची फ़ळे त्यांना भोगावीच लागतील. पण सवाल इतकाच आहे, की जे श्रद्धाळू आहेत, त्यांच्या श्रद्धा तरी अढळ असायला हव्यात. जे काम शनिदेवाचे आहे, त्यात त्याच्या भक्तांनी श्रद्धाळूंनी हस्तक्षेप करणे कितपत प्रामाणिक आहे? शनि गप्प असताना भक्तच रोखायला पुढे येतात, तेव्हा त्यांच्या श्रद्धा व विश्वास किती ठिसूळ आहे, त्याचीच साक्ष देत नाहीत काय? पूजेचा अधिकार मागणार्‍यांना शनीच्या कोपाची फ़िकीर नसेल. पण त्यात हस्तक्षेप करणार्‍यांची श्रद्धा किती तकलादू आहे, त्याचेही प्रत्यंतर यातून येतेच ना? थोडक्यात शनिशिंगणापूरात झालेला तमाशा दोन परस्पर विरोधी भूमिकांचा आहे. त्यात कुणालाही श्रद्धा वा अधिकाराशी कर्तव्य नाही. आपापले उल्लू सिधे करण्याचा निव्वळ राजकीय तमाशा रंगवण्यात शक्ती खर्ची घातली जात आहे.

==========================

२६ जानेवारी म्हणजे यंदाच्या प्रजासत्ताकदिनापासून माझ्या नव्या (वेबसाईट) संकेतस्थळाचा आरंभ झाला आहे. क्रमाक्रमाने ब्लॉगपासून इथेच सर्व लेख आणले जातील व पुढले सर्व लेख इथेच बघायला मिळतील. मित्रांनी शक्यतो इमेलद्वारे सदस्यत्व स्विकारले तर थेट नव्या लेखाचा दुवा आपोआप मिळू शकेल. मला इमेल पत्ता देऊ नये, तर वेबसाईटवर तशी सुविधा असल्याने स्वत:च नोंदणी करावी. किंवा फ़ेसबुकवरून नियमित दुवा दिला जाईलच. नव्या जगात सर्वांचे स्वागत!
-भाऊ तोरसेकर

http://bhautorsekar.in/

11 comments:

  1. Aamachya natyateel ek vyaktee saha kutumb Shanishinganapur la darshanala gele hote. Choutharyavar sheelepaashi jayacheasel tar purushani aanghol karun mag oletya kapadyani jayache asa dandak aahe. aamachya natevaeek purushane to palala naahee. Kaay hotey ase mhanale aani gurujina khotech sangeetale kee me aanghol karun aalo aahe. Tyani tasech darshan ghetale aani sheelechee pooja keli. Darshan aani pooja zalyavar sagale car madhe basun Punyakade yayala nighale. Nevasechya javalach tyanchya car la vichitra apaghat zala. apaghat honyasarakhee paristheetee navhatee. Tyancha bhachha car chalavat hota aani tyane achanak car valavalee aani tee vegane eka zadavar aadalali. He gruhastha maagachya seat var basalele hote aani driver chya shejarachya seat var tyancha mulaga basalela hota. Mulala jabar maar lagala aani to beshudhha zala. Driving karat asalelya bhachyala sadha orakhada dekheel uthala naahee. He gruhastha jya bajula basale hote to darvaja ughadun he gruhastha 50 foot baaher phekale gele aani on the spot gele. Tyanche shareer phar vichitra avsthet hote. Tyanchyach baajula basalelya tyanchya bayako la aani mulila-bhacchhila kaahich zala naahee. Sudaivane mulala velevar treatment milali mhanun don mahinyachya hospitalization nantar aani 1-2 operations kelyavar mulaga bara houn gharee gela.

    ReplyDelete
  2. हल्ली न्यूज पहानेच बंद केले आहे कोन ही रनरागीनी तिने हेच मंदिर का निवडले हिची आस्था याच मंदिराच्या बाबतित का तीव्र झाली की या मंदिराच्या गाभार्यात प्रवेषाचा महिलांच्या समानतेशी संबध जोडुन टाकला आपल्या धर्माची तसेच संस्क्रुतीची परिचय नसलेल्या भरकटलेल्या व्यक्तीची फक्त प्रसिध्दीच्या हव्यासापोठी केलेले आंदोलन आहे याच्यातुन काहीच निष्पन्न होनार नाही फक्त बिकाऊ मिडीयासाठी ब्रेकींग न्यूज राहील दुसरे काही नाही

    ReplyDelete
  3. माफ करा पण हा शेवटचा पॅरेग्राफ काही पटला नाही. मुळात या देवता निर्गुण-निराकार असतात आणि ते एक चैतन्य तत्व असते. तेव्हा त्या स्वतः अवतरून कोणाला शासन करतील ही अपेक्षाच हास्यास्पद आहे. हे तत्व ज्यांच्या अंगी आहे अशा बहुसंख्य भक्तांच्या करवीच या देवता कार्य सिद्धीस नेत असतात अशी श्रद्धा बाळगायला तरी निदान काही हरकत नसावी.
    पंढरीच्या सेवेकरी ब्राह्मणांना काही कारण नसताना केवळ आकसापोटी जेव्हा आधीच्या सरकारने काढून टाकल, तेव्हा त्यांच्यावरील अन्याय दूर करायला काही प्रत्यक्ष पांडुरंग अवतरले नव्हते.. पण या असंख्य भक्तांकरवी त्याने जुने सरकार तर घालवलेच वर पुन्हा ब्राह्मणच मुख्यमंत्री आणला (ज्याला प्रथम पुजेचा मान असतो) अशी कोणाची श्रद्धा असल्यास ती कोणाला टोचायचे कारणच काय ?
    त्याचप्रमाणे शनिमहाराजांनी देखील स्थानिक श्रद्धाळू भक्तांकरवीच तृप्ती देसाईसारख्या ढोंगी पुरोगाम्यांचा बंदोबस्त केला व तिथे चोर्यामार्या होऊ दिल्या नाहीत अशी कोणाची श्रद्धा असल्यास गैर नाही.
    श्रद्धेपोटी का होईना पण अनेक गोष्टी सकारात्मक घडतायत (ज्या आत्यंतिक विज्ञानवादामुळेही घडत नाहीत) येवढाच त्यातला भावार्थ आहे !

    ReplyDelete
    Replies
    1. आपण पंढरपूरच्या मंदिरातून बाहेर काढलेल्यापैकी एक दिसताय ! ;)
      नाहीतर विठ्ठलाच्या शेजारी उभारून काही भ्रष्टाचार (लोकांना घाबरवून, वाट्टेल तसं अपमानास्पद बोलून पैसे उकळणे इत्यादी) चालू नव्हता असं म्हणायचं धाडस कोणीही करणार नाही.

      Delete
    2. प्रसादजी उत्तम लिहिले आहे.माझेही मत तेच आहे.
      देवळातील पवित्रता, देवतेचे तत्व टिकवून ठेवण्यासाठी श्रद्धाळू भक्तांनाच हे कर्तव्य समजून पार पडले पाहिजे.भले कोणास पटो अथवा न पटो.

      Delete
  4. भलतेच तर्कट लावताय तुम्ही.

    गावात काय करायचा हा त्या त्या गावाचा अधिकार असं असेल तर खाप पंचायत , उत्तरेतल्या अनेक ठिकाणी अजूनही चालू असणारी प्रभूदासी प्रथा आणि त्यासारख्या गोष्टीना पायबंद घालायचा कोणी? कारण गावकरी अनेकदा आवाज उठवू शकत नाहीत. मग बाहेरच्यांनी उठवला तर बिघडला कुठं? बाहेरच्या कोणालाही जावून पूजा करायचा अधिकार आहे पण गावातल्या महिलांना नाही. का बुवा? त्यांनी काय घोडं मारलंय?

    शनी शिंगणापूरच्या नावानं सध्या जे काही चालू आहे त्याबाबत माझाही आक्षेप आहे. पण तो इतर धर्मियांनी स्वतःच्या गोष्टी बाजूला ठेवून हिंदू धर्मात लुडबुड करण्याबाबत आहे आणि मेडिया वाले हेतुपुरस्कर जे चालवतायत त्याला आहे.

    आपले लेख आम्हाला आवडतात पण आपण भलतेच तर्कट लावून बाजू लावून धरू नये अशी नम्र विनंती. नाहीतर इतर डावे, काँग्रेसी संपादक आणि आपल्यात फरक काय ?

    ReplyDelete
  5. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  6. bhau tumacha pratyek lekh mi vachato pan SHEVATACHA VAKYA PATALA NAHI as kahi tumachya lekhatun vachayala milel as vatal nhavat.... mughalanni devale padalyavar devach tyancha bandobast karil as mhanun shivaji maharaj basale asate tar kay zal asat.... dharm parampareche rakshan karane he aapale kartavya aahe. te karayalach pahije.... shevati dev je karayach te karanarach aahe.... pratyek thikani rajkaranach asate as nahi.

    ReplyDelete
    Replies
    1. kishorkumar jagtap.... dada tumche mat barobar aahe.... sahmat aahe

      Delete
  7. स्री अधिकाराचा तथाकथित प्रश्न ही प्रसारमाध्यमांनी उठवलेली हूल आहे. शनिदेवाविषयी असणारी ख्याती लक्षात घेता, चौथर्‍यावर पूजा करण्याचा हट्ट म्हणजे माकडाने कापलेल्या लाकडातील पाचर काढण्यासारखे आहे.

    ReplyDelete
  8. http://makaranddesaimarathi.blogspot.com/2016/04/blog-post.html

    ReplyDelete