Sunday, January 10, 2016

भारताच्या अस्तनीतले विषारी साप



कॉग्रेस नेते आणि युपीएचे माजी मंत्री मनिष तिवारी यांनी पुन्हा एकदा अक्कल पाजळली आहे. सुरजेवाला, कपील सिब्बल यांच्यासह मनिष तिवारी असे काही कॉग्रेसी तोंडपाटिलकी करणारे नेते आहेत, ज्यांनी कॉग्रेस रसातळाला नेली. अतिशय उत्तम इंग्रजी बोलण्यापलिकडे ज्यांना राजकारणात काहीही करता आलेले नाही, अशा या लोकांनी कुणाकडून शतायुषी पक्षाच्या सर्वनाशाचे कंत्राट घेतलेले आहे, माहित नाही. पण मागल्या आठदहा वर्षात त्यांच्यासारख्यांनीच या पक्षाला बुडवण्याचे काम केले आहे. आपली अक्कल पाजळण्यासाठी ते असे काही बोलतात, की त्यामुळे पक्षाचेच नव्हेतर देशाचेही नुकसान व्हावे. म्हणून कधीकधी शंका येते, हे लोक मुर्ख आहेत की वेडेपण पांघरून सुपारी घेतल्यासारखे वागतात? आताही कारण नसताना अवेळी मनिष तिवारी यांनी भारतीय सेनेच्या संदर्भातील केलेले विधान, त्यांच्याच पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्याला विनाविलंब फ़ेटाळण्याची पाळी आलेली आहे. चार वर्षापुर्वी इंडियन एक्सप्रेस दैनिकात प्रसिद्ध झालेल्या त्या बातमीने तेव्हा खळबळ उडवलेली होती आणि तेव्हाही तिवारी ज्या सरकारमध्ये मंत्री होते, त्याच सरकारने त्या बातमीचा इन्कार केलेला होता. कारण त्यातून त्याच सरकारची नाचक्की झाली होती. अधिक देशाला सुरक्षा विषयक मोठी हानी पोहोचलेली होती. तेव्हाचे सरसेनानी जनरल व्ही. के. सिंग यांचे सरकारशी खटकलेले होते. त्यांच्या जन्मतारखेच्या विषयाची शहानिशा करायला त्यांनी कोर्टात धाव घेतल्याने संरक्षणमंत्र्याशी सिंग यांचे बिनसले होते. त्यांना बदनाम करण्यासाठी माध्यमांना हाताशी धरून एक मोहिम कॉग्रेसमधील काही उतावळ्यांनी राबवलेली होती. कदाचित त्यात तिवारी यांचाही समावेश असावा. अन्यथा त्यांनी इतक्या वर्षानंतर त्याच बातमीला दुजोरा देण्याचे अन्य काय कारण असू शकते? ती बातमी कुठली व त्यातून कोणती हानी झाली?

दिर्घकाळ भारतात लोकशाही नांदली आहे आणि भारतीय सेनादलाने कधीही लोकशाही सरकारच्या सत्तेला आव्हान दिलेले नाही. असे असताना मंत्री व सरसेनानी यांच्यातील वादाला राजकीय रंग चढवण्याचा उद्योग आत्मघातकी होता. सिंग यांचा तो विषय कोर्टात सुनावणीला येणार होता. त्याच्या आदल्या रात्री हिस्सार येथील लष्कराच्या दोन चिलखती तुकड्या दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्या, अशी ही बातमी सोडून देण्यात आलेली होती. अर्थातच ती बातमी काही आठवड्यांनी प्रसिद्ध झाली. प्रत्यक्षात तसे काहीही घडलेले नव्हते. कारण तसेच काही करायचे तर बाहेरून दिल्लीत लष्कर आणायची गरज नव्हती. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी तेव्हा अनेक तुकड्या राजधानीतच हजर व तैनात होत्या. मग बाहेरून त्यासाठी रसद आणायचा मुर्खपणा कुठला सेनापती करील? ही अतिशयोक्ती ज्यांना सेनादलाची पद्धती वा कार्यशैली ठाऊक नसते, त्यांच्याच सुपीक डोक्यातून अवतरलेली होती. म्हणूनच त्या बातमीचा तेव्हाच सरकारने इन्कार केला. पण त्यापेक्षाही महत्वाची बाब म्हणजे त्यातून मग सिंग यांना राजकीय सत्ता काबीज करायला उत्सुक असलेला सेनापती, असे दाखवण्याचा राजकीय डाव उघडा झालेला होता. बहुधा तिवारी त्यातलेच एक कारस्थानी असावेत. अन्यथा त्यांच्याच सरकारने साफ़ नाकारलेली बातमी, ते आज पुन्हा कशाला उकरून काढत आहेत? त्या बातमीचा इन्कार झाला तरी नंतरच्या काळात सिंग यांच्या विरोधात अनेक कंड्या पिकवण्यात आल्या आणि त्याही पाकच्या हेरखात्याला कोलित म्हणून वापरता येण्यासारख्याच घातक होत्या, हे विसरता कामा नये. सिंग यांनी आपल्या कार्यकाळात काश्मिरच्या राजकारणात हस्तक्षेप करीत संरक्षण खात्याचा निधी खर्च केला व उचापती केल्याचा आरोप झाला होता. मग त्याचा गवगवा होऊन गोपनीय कामे करणारा एक विभाग बरखास्त करावा लागला होता.

आजही आपण पाकिस्तानी माध्यमे वा विश्लेषक जिहादी घटनांनंतर बोलताना ऐकले, तर त्याचाच संदर्भ देतात. काश्मिरात भारतीय सेना राजकीय हस्तक्षेप करते आणि त्यावर संरक्षणाचा पैसा खर्च केला जातो, असा आरोप पाकिस्तान करत असतो. मग त्यासाठी जनरल सिंग यांच्या ‘टेक्निकल सपोर्ट डिव्हीजन’ या तुकडीचा संदर्भ दिला जातो. जिहादी व घातपाती यांना पायबंद घालणे वा त्यांच्यातच बेबनाव निर्माण करण्यासाठी गोपनीय कारवाया केल्या जात होत्या. त्यासाठी हा विशेष विभाग काम करीत होता. पण तिवारी म्हणतात, त्या बातमीनंतर सिंग विरोधात माध्यमांनी आघाडी उघडली व त्या सर्व कारवाया ठप्प होतील, इतक्या उचापती केल्या गेल्या. शेवटी त्या विभागाबरोबर त्या कारवाया थांबल्या आणि पाकिस्तानच्याच भाषेत दिले जाणारे उत्तर संपुष्टात आले. परिणामी घातपाती अघोषित युद्ध निकालात निघाले. पुन्हा मग पाकिस्तान अशा लढाईत शिरजोर होऊ शकला. म्हणजेच तिवारी ज्या बातमीचा उल्लेख करीत आहेत, ती वास्तवात भारतीय राजकारणी व माध्यमे यांनी देशाशीच केलेला विश्वासघात होता. आज पठाणकोटच्या हल्ल्यानंतर भारतातल्या गद्दारांवर खापर फ़ोडले जात आहे. इथले कोणकोण पाकला फ़ितूर झाले याबद्दल चर्चा चालू आहे. पण तसेच फ़ितूर पाकिस्तानात भारतासाठी काम करीत होते. त्यांचा काटा काढला गेला नसता, तर पठाणकोटवर हल्ला होण्यापुर्वीच त्याची माहिती भारताला मिळू शकली असती. पण तशी माहिती मिळवणारी यंत्रणाच माध्यमांच्या मोहिमेने मोडीत काढायला लावली होती. थोडक्यात भारतासाठी पाकच्या हालचालींची गोपनीय माहिती मिळवणारी यंत्रणा संपवण्याचे कारस्थान यशस्वी झाले आणि त्याची सुरूवात तिवारी म्ह्णतात त्या बातमीपासून झालेली होती. त्याची कल्पना कॉग्रेस पक्षाला असल्यानेच विनाविलंब आपल्याच नेत्याच्या विधानाचा इन्कार करण्यात आलेला आहे.

तिवारी जी बातमी खरी होती म्हणातात, ती अफ़वाच होती. पण ती फ़ैलावल्याने देशाच्या सुरक्षेचे किती नुकसान झाले, याची कल्पना तेव्हा सत्तेत असलेल्या कॉग्रेसला आहे. म्हणूनच पठाणकोटनंतर गाफ़ीलपणा व अपुर्‍या सुरक्षेचे खापर युपीएच्या डोक्यावर फ़ुटू नये, अशी काळजी कॉग्रेस घेणारच. कारण त्यांच्याच राजकारणाने पाकच्या कारवायांचा सुगावा लागणारी यंत्रणा निकालात निघाली. म्हणूनच आज त्याची पुन्हा चर्चा सुरू झाली, तर त्याचे बालंट आपल्याच अंगावर येईल, याची कॉग्रेसला पुरेपुर खात्री आहे. तो आरोप होण्यापुर्वी अंग झटकण्याची घाई म्हणूनच पक्षप्रवक्ता चाको यांनी दाखवली आहे. तिवारी यांनी अकारण नसत्या वादाला तोंड फ़ोडले, त्याची काही गरज नव्हती, असे चाको त्यामुळेच म्हणत आहेत. अकारण याचा अर्थ पक्षाच्याच पायावर तिवारी धोंडा मारत आहेत, असे चाको यांना म्हणायचे आहे. दहशतवाद्यांना इथे सुखरूप यायला मदत केल्याचा संशय गुरदासपूरच्या एसपीवर घेतला जात आहे. खेरीज आणखी काही संरक्षण कर्मचारीही फ़ितूर झाल्याचे बोलले जाते. पण ज्यांनी सैनिकी तुकड्या राजधानी दिल्ली काबीज करण्यासाठी छावणीतून बाहेर पडल्याच्या अफ़वा पसरवल्या, त्यांनी केलेले नुकसान किती मोठे आहे? आजही आपण त्याचे भयंकर परिणाम भोगत आहोत. पाकच्या हालचालींवर नजर ठेवणारी वा त्यांना काटशह देणारी यंत्रणा मोडीत काढायला हातभार लावणार्‍यांना देशाचे हितचिंतक नक्कीच म्हणता येणार नाही. त्यामुळेच मनिष तिवारी कोण आहेत, ते वेगळे सांगण्याची गरज नाही. युपीएने सीबीआय विरुद्ध आयबी, अशी दोन प्रमुख तपास यंत्रणांमध्येच भांडणेही आपल्या राजकीय स्वार्थासाठी लावलीच होती. तिवारी म्हणतात ते आणखी वेगळे प्रकरण आहे. अशा लोकांकडून देशाचे कल्याण काय होणार, याची कल्पनाच केलेली बरी. पाक वा तिथले जिहादी घातक नाहीत, इतके हे अस्तनीतले साप देशाची चिंता वाढवणारे आहेत.

4 comments:

  1. मूर्खं छन्दानुरोधेन याथातथ्येन पण्डितम् |

    ReplyDelete
  2. मस्त भाऊ इनकी पीठमे गोलियां मारनी चाहिए।

    ReplyDelete
  3. चंागले िववेचन

    ReplyDelete