Saturday, July 21, 2018

सोनिया गांधी जिंकल्या... हरले मात्र विरोधी पक्ष

 rahul hug के लिए इमेज परिणाम

गेल्या चार दिवसातल्या घटनाक्रमात काय होईल वा काय होणार नाही, याचा सार्वत्रिक उहापोह झाला. त्यात मोदी सरकार कोसळण्यापासून शिवसेना मतदान करण्यापर्यंत अनेक वावड्या उडाल्या. अखेरीस बारा तासाची मॅराथॉन संपून खरोखर मतदान झाले, तेव्हा विरोधकांचे डोळे पांढले करणारे आकडे पुढे आले. मोदींनी नेहमीप्रमाणे मोठी बाजी मारली व विरोधक दुबळे असल्याचे आकड्यांनीच सिद्ध केले. तसे बघितले तर मतदान झाल्यास हेच दिसणार हे गृहीत होते. पण गृहीत व वास्तव यात नेहमी फ़रक असतो. म्हणून तर प्रत्यक्ष सामना लढवावा लागतो. हा सामना मोदींच्या पाठीशी खरेच बहूमत आहे किंवा नाही, अस अजिबात नव्हता. कारण ते बहूमत असल्याचे कागदोपत्रीच दिसत होते. स्वपक्षाचे बहूमत मिळवून मोदी निवडणूक जिंकले होते आणि अधिक मित्र पक्षांची कुमक त्यांच्या पाठीशी होती. म्हणूनच तेलगू देसम वा शिवसेना अशांनी संगत सोडल्याने, बहुमताचा प्रश्नच येत नव्हता. शिवाय भाजपातही फ़ुट वगैरे पडल्याचे कुठे दिसलेले नव्हते. मग कसोटी कोणाची होती? की उगाच माध्यमांनी हवा निर्माण केली होती? सोनिया गांधींनी त्यावर प्रतिक्रीया देताना आपल्या पाठीशीही संख्याबळ आहे असे म्हटले आणि माध्यमांना सुरसुरी आली. तिथून हा तमाशा सुरू झाला होता. पण सोनियांनी नुसताच आव आणला असेल, तर त्यातून विरोधकांचीच नाचक्की आकड्यातून सिद्ध व्हायचे निश्चीत होते. तरीही तो धोका कशाला आणि कोणी पत्करला? त्यातून काय साध्य झाले? मुळात साधायचे तरी काय होते? प्रस्ताव मताला टाकण्यापुर्वी आणि नंतर कसली चर्चा होते आहे? ते बघितल्यास त्यातला हेतू साफ़ होऊन जातो. अन्य कोणाच्या खांद्यावर बंदुक ठेवून कोणी काय साध्य केले, त्याचा अंदाज करता येऊ शकतो. मोदी त्यात जिंकलेले दिसतात, पण बाजी सोनिया मारून गेल्या आहेत आणि पराभव मात्र विरोधी एकजुटीचा झाला आहे.

प्रत्येक अविश्वास प्रस्ताव हा सरकार पाडण्यासाठी नसतो, तर ते निमीत्त साधून सत्ताधार्‍यांच्या विरोधात मुद्देसुद भाषणे करून विरोधकांना आपली बाजू समर्थपणे समोर आणायची संधी मिळत असते. सरकारचे मनसोक्त वाभाडे काढण्याची ती अपुर्व संधी असते. म्हणूनच त्या निमीत्ताने विविध पक्षांच्या संख्याबळाची बेरीज वगैरे मांडायचे काही कारण नसते. आताही तेलगू देसमला तितकेच करायचे होते आणि प्रस्ताव तासभर मांडणारे गल्ला नामक टेलगू देसमचे सदस्य, केवळ आंध्रप्रदेश राज्याचेच दुखणे मांडत होते. त्यांनी आध्रप्रदेश बाहेरच्या उर्वरीत देशातल्या घडामोडी वा कारभाराविषयी एक शब्द उच्चारला नाही. पण त्यानंतर एकामागून एक पक्षाचे वक्ते सभागृहात उभे राहून बोलले, त्यापैकी क्वचितच कोणी आंध्रप्रदेशच्या दुखण्याला हात घातला. इस्पितळात रुग्णाला सदिच्छा भेट द्यायला येणार्‍या अभ्यागताने रुग्णाला दिलासा देण्यापेक्षा आपल्याच आजारपणाचा पाढा त्याच्यासमोर वाचावा, अशी एकूण चमत्कारीक स्थिती होती. प्रस्ताव मांडून झाल्यानंतरच्या एकूण चर्चेमध्ये तेलगू देसमचे खासदार दुर्लक्षित होते आणि त्यांच्या पक्षाने मांडलेला प्रस्ताव किंवा मुद्देही दुर्लक्षित राहिले. ज्या पक्षांनी व नेत्यांनी चर्चेत भाग घेतला, त्यांनी आपल्या भूमिका व मुद्दे मांडले आणि मोदी सरकारचे गुणगान वा निंदा करून घेतली. पण यात भाग घेताना कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जे काही करून दाखवले, तोच यातला चर्चेचा मुद्दा होऊन गेला. त्यांच्या आधी वा नंतर कोण काय बोलले, त्याची दखलही कोणी घ्यायला तयार नव्हता. राहुल काय बोलले आणि मोदी त्यांना कसे उत्तर देणार, असाच खेळ चालू राहिला होता. बाकी आंध्रप्रदेश, तेलगू देसमाचा प्रस्ताव किंवा इतर नेत्यांची टिका, सगळे काही अडगळीत जाऊन पडले. सोनिया गांधीना हेच तर घडायला हवे होते काय? थोडा शांतपणे विचार करून बघा.

या प्रस्तावाला मोदी झणझणीत उत्तर देणार आणि राहुलची खिल्ली उडवणार, हे गृहीत होते आणि ती मोदींनी खोटी पडू दिली नाही. पण एक मान्य करावे लागेल, की आपल्या वर्तन व कृतीने राहुलनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मातोश्रींची तीच अपेक्षा होती का? तेवढ्यासाठी सोनियांनी संख्याबळाचा विषय काढून अविश्वास प्रस्ताव असा कळीचा मुद्दा बनवला होता काय? या प्रस्तावावर बोलताना राहूलनी आपल्या नेहमीच्या शैलीत मोदींवर चौफ़ेर हल्ला चढवला. त्यांच्यावर हवे तितके आरोप करून घेतले आणि त्याच्या शेवटी यालाच प्रेमाची भाषा म्हणतात, असाही संदेश देऊन टाकला. आपला संदेश ज्यांना शब्दातून कळलेला नसेल, त्यांना कृतीतून दिसावा म्हणून राहुल आपली जागा सोडून थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचले. मोदींना मिठी मारण्याचे नाट्यही सादर केले, काय घडते आहे, ते सभापतींच्याही लक्षात आलेले नव्हते म्हणून नंतर सुमित्रा महाजन यांनी राहुलना समजही दिली. पण प्रत्यक्षात घडले काय, याचा खुलासा मोदी बोलायला उभे राहाण्यापर्यंत होऊ शकला नाही. राहुल तिथे पोहोचले आणि त्यांनी पंतप्रधानांना आपल्या जागी उभे रहाण्यास ‘फ़र्मावले’. त्याचा अर्थ उकलला नाही, म्हणून मोदी जागीच बसून राहुलना हातानेच नेमके काय हवे, म्हणून विचारत होते. इतक्यात राहूलच त्यांच्या अंगावर झेपावले व बसलेल्या मोदींना बळेच मिठी मारण्याचा तमाशा त्यांनी झकास पार पडला. कुठलेही नाटक रंगवले जाते, तेव्हा त्यात प्रत्येक पात्राची भूमिका आधीच ठरलेली असते. राहुलना हे नाटक रंगवायचे होते तर त्यात मोदींना गाफ़ील ठेवून ते रंगण्याची अजिबात शक्यता नव्हती. ते उलटण्याचीच खात्री असते. झालेही तसेच! मोदी बोलायला उभे राहिले आणि त्यांनी त्या एकूण नाटकाचा आपल्या भाषणात झकास उपरोधिक वापर करून घेतला. राहुलच्या उर्मटपणाचा खुलासा त्यातून होऊ शकला.

देशाच्या सर्वोच्च सभागृहाचा नेता आपल्या जागी स्थानापन्न झालेला असताना कुणा सामन्य सदस्याने त्याच्यासमोर जाऊन त्याला उठून उभे रहायला ‘फ़र्मावणे’ किती औचित्यपुर्ण असू शकते? तुम्हाला खोट्यानाट्या प्रेमाचा उमाळा आलेला असू शकतो. म्हणून समोरच्याने त्या नाटकात सहभागी होण्याची सक्ती करता येत नसते. पण हा झाला प्रौढत्वाचा विषय. तो बालबुद्धीच्या राहूलला समजायला अजून कित्येक वर्षे जावी लागणार आहेत. खरेतर तो अत्यंत उर्मटपणा होता आणि मोदींनी उपरोधिक प्रतिक्रीया आपल्या भाषणात देऊन त्याचा पर्दाफ़ाश केला. पण तरीही एक गोष्ट शिल्लक उरते. असे राहुल अचानक वागलेले नाहीत व त्यांनी पक्षातील दिग्गज नेत्यांशी आधी चर्चा मसलत नक्की केलेली असेल. असे नाट्य रंगवले तर काय होऊ शकते, त्याचीही चाचपणी झालेली असणार. म्हणूनच ते नाटक रंगवून विंगेत परतलेल्या राहूलनी ज्योतिरदित्य शिंदे यांना डोळा मारून त्याची कबुलीही देऊन टाकली. थेट प्रक्षेपण होत असलेल्या कामकाजाने तेही दृष्य़ टिपले आणि राहुलच्या प्रेमकहाणीचा बुरखा फ़ाटला. त्याला बालीशपण ठरवण्याचे कोलित भाजपावाल्यांना मिळाले आणि त्यांचे कौतुक करण्याचे निमीत्त राहुलभक्तांनाही मिळून गेले. पण खरी कोंडी कॉग्रेस समर्थक वा मोदी विरोधक असलेल्या अनेक पत्रकार भाष्यकारांची होऊन गेली. राहुलच्या मिठीचे कौतुक चालले असतानाच कॅमेराने मारलेला डोळा टिपला आणि सर्व मेहनत राहुलने पाण्यात घातल्याची प्रामाणिक प्रतिक्रीया अशा भाष्यकारांनाही द्यावी लागली. हीच तर राहुलची खरी गुणवत्ता आहे. आईने वा कुटुंबियांनी घरात मस्त सजावट मांडणी करावी आणि बालीश खोडसाळ पोराने काही उचापत करून सर्वकाही विस्कटून टाकावे, असा बालिशपणा ही राहुलची खरी गुणवत्ता आहे. त्याचेच प्रत्यंतर ती मिठी व त्या डोळा मारण्यातून आले.

अशाच जुन्या एका प्रसंगात वाजपेयी हे संसदेतले तरूण खासदार होते आणि त्यांनी पंतप्रधान नेहरू व त्यांच्या सरकारवर जबरदस्त झोड उठवणारे भाषण केलेले होते. तर त्यानंतर सभागृहाचे कामकाज स्थगीत झाल्यावर स्वत: नेहरू त्यांच्याकडे गेले आणि वाजपेयींचे अभिनंदन केले होते. भविष्यात वाजपेयी मोठा नेता होण्याचे त्यांनी भाकित केले होते. तशी पाठ थोपटून घेण्यासाठी वाजपेयींनी पंतप्रधानाच्या आसनापर्यंत धाव घेतली नव्हती, की मिठी मारण्याचे नाटक रंगवलेले नव्हते. आणखी एक गोष्ट महत्वाची. राहुल ही नेहरूंची चौथी पिढी संसदेत आहे आणि आजवर सत्तर वर्षात, त्या खानदानाच्या कुणाला खड्या शब्दात समज देण्याची वेळ सभापतींवर आलेली नव्हती. राहुल गांधींनी तोही विक्रम या निमीत्ताने करून दाखवला आहे. त्यांनी नंतर ज्योतिरादित्यला भुवई उडवून इशारा केला आणि आधीच फ़ालतू रंगवलेल्या नाटकातलेही नाट्य धुळीस मिळवले. पण त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, की त्या नाट्याला पक्षाची व खुद्द सोनियांचीही संमती होती. आपल्याला दिलेली भूमिका आपण योग्य पार पाडली ना? असाच त्या भुवई उडवण्यातला संकेत होता. मग सवाल असा येतो, की जो प्रस्ताव इतक्या तिप्पट मतांनी फ़ेटाळला गेला, त्यात असल्या नाट्याचे प्रयोजन काय होते? तर सगळा विषय अविश्वासापासून उडवून राहुल विरुद्ध मोदी असा बनवण्याचा प्रयास होता. त्यात कॉग्रेस व सोनिया यशस्वी झाले आहेत. आता पुढल्या काही महिन्यात चर्चा विरोधी एकजुट वा अविश्वास प्रस्तावात उपस्थित झालेल्या मुद्दे व तपशीलाची होणार नसून, राहुल व त्यांचे लोकसभेतील वर्तन हाच चर्चेचा विषय झालेला आहे. विरोधकांचे दुर्दैव असे आहे, की राहुलच्या खुळेपणाचेही समर्थन करण्याची नामुष्की त्यांच्या नशिबी आलेली आहे. कारण त्यातला खुळेपणा कबूल करायचा, तर मोदींचे समर्थन केल्याचा भयगंड विरोधकांनी आपल्यावर ओढवून घेतलेला आहे.

खरेतर अविश्वास प्रस्तावाच्या निमीत्ताने सरकारचे वाभाडे काढणे व आपली बाजू जगासमोर आणण्याची विरोधकांना अपुर्व संधी असते. पण राहुलने तिचा तमाशा करून टाकला आणि मोदींनी विरोधकांची विश्वासार्हता किती दुबळी आहे, त्याचे विवेचन करून घेतले. एकजुटीच्या गर्जना करीत हात उंचावणारे प्रत्यक्षात मोदींना आव्हान द्यायची वेळ आल्यावर कसे विस्कटून जातात, त्याचे दर्शन या निमीत्ताने घडले. किंबहूना विरोधकांनीच घडवले. वास्तविक एनडीए म्हणून २०१४ सालात नरेंद्र मोदींच्या पारड्यात ३४० जागा पडलेल्या होत्या. त्यातील शिवसेना १८ आणि तेलगू देसम १६ अशा ३४ सदस्यांनी या विश्वास प्रस्तावाच्या निमीत्ताने घट झालेली होती. अधिक भाजपाचेच संख्याबळ ९ जागांनी घटलेले आहे. म्हणजे आज चार वर्षानंतर मोदी सरकारला फ़ार तर साधे बहूमत दाखवता आले असते. ती संख्या तीनशेही होऊ शकत नाही. पण प्रत्यक्षात मतदान झाले तेव्हा मोदींवर ३२५ सदस्यांनी विश्वास व्यक्त केला आणि विरोधकांना त्याच्या निम्मेही संख्या दाखवता आली नाही. ती दाखवता येणार नाही, हे सोनियांना ठाऊक नव्हते, असे कोणाला म्हणायचे आहे काय? नक्कीच ठाऊक होते. जबरदस्त मतांनी मोदी जिंकतील आणि विरोधी एकजुटीचे नाटक नामोहरम होईल, हे सोनिया पक्के जाणून होत्या. पण तसे होताना आपल्या सुपुत्राचे सक्तीने कौतुक करून घेण्याचा डाव सोनियांना यातून साधायचा होता आणि त्यात त्यांनी मोठे यश मिळवलेले आहे. आधी तावातावाने मोदी सरकारवर आरोप, मग मोदींना मिठी मारणे आणि शेवटी भुवई उड्वण्यातून राहुलनी विरोधी एकजुटीचा नेता किती थिल्लर व छचोर आहे, त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. तरीही मोदी विरोधकांकडून त्याचे निमूट समर्थन होताना बघितल्यावर सोनिया गांधी आपल्या डावपेचात किती यशस्वी झाल्या, त्याचीच प्रचिती येते. अर्थात त्यात विरोधी एकजुट वा गठबंधन रसातळाला गेले आहे, हा भाग वेगळा.

या मतदानाने विरोधी एकजुट किती पोकळ व निरर्थक आहे, त्याची साक्ष मिळाली. एनडीएतले दोन खंदे मोदी समर्थक वेगळे होऊनही कॉग्रेसला दिडशेचा पल्ला गाठता आला नाही. विरोधकांना या चाचणीत आपल्यातले मतभेद विसरून मोदी हटावसाठी एकदिलाने उभे रहाता येत नसल्याची साक्ष दिली गेली. अनेक पक्षांनी आपण भले मोदी समर्थक असलो, तरी आपण कॉग्रेस वा राहुल समर्थक नसल्याची साक्ष दिली. तर कॉग्रेस पक्षाने आपल्याला नेतृत्व मिळणार नसेल तर मोदी पुन्हा जिंकले तरी बेहत्तर, अशीच साक्ष यातून दिलेली आहे. ज्यांना मोदींना पराभूत करायचे आहे, त्यांनी निमूट कॉग्रेसच्या व पर्यायाने राहुलच्या पाठीशी येऊन उभे रहावे. येणार नसला, तर एकजुटीला चुड लावून कॉग्रेस वाटचाल करणार आहे, असाच संदेश यातून सोनियांनी दिलेला आहे. आपल्या सुपुत्राला देशाचा नाही तरी विरोधाचा नेता बनवण्यातून आपण कुठलीही तडजोड करणार नाही. त्यात पुन्हा मोदी वा भाजपा जिंकणार असेल तरी आपल्याला फ़रक पडणार नाही, असा सोनियांनी दिलेला संकेत आहे. म्हणून विजय त्यांचा झाला आहे. जे विरोधी पक्ष वा मित्रपक्ष राहुलला युपीएचा नेता म्हणून स्विकारायला राजी नाहीत, त्यांच्यासाठी हा इशारा आहे. अर्थात प्रत्येक पक्षाचा आपापल्या अजेंडा किती मोदीविरोधी आहे, त्यानुसार परिणाम व्हायचे आहेत. आपल्या समोर नतमस्तक होणार नसाल तर मोदींना पर्याय नाही, हा त्यातला सोनियांचा संदेश आहे. तोच आपल्या मित्रपक्ष व मोदीविरोधी पक्षांना देण्याची संधी सोनियांनी साधून घेतली. त्यासाठीच मोदींना इतका मोठा दृष्य विजय त्यांनी मिळवून देण्यास हातभार लावलेला आहे. म्हणून म्हटले व्यवहारी भाषेत मोदींनी विश्वास जिंकला आहे. पण विश्वासघात प्रस्तावात राहुल वा लौकिकार्थाने सोनिया गांधींचा प्रचंड विजय झालेला आहे. अर्थात मोदीद्वेषाची कावीळ झालेल्यांना त्याचा आभासही होण्याची शक्यता नाही. तर मोदींचे भाषण कसे कळावे? उगा़च नाही मोदींनी हा मुहूर्त साधून आपल्या विरोधकांना शुभेच्छा दिल्या. ‘२०२४ सालातही असाच विश्वास प्रस्ताव आणण्यासाठी इश्वर तुम्हाला शक्ती देवो’, याचा अर्थ समजला का?

http://www.sify.com/news/one-day-this-young-man-will-be-pm-nehru-on-vajpayee-news-columns-omxua0gfeifdi.html

29 comments:

  1. Excellent and pinpoint analysis of no confidence motion.

    ReplyDelete
  2. If what you say about Ms. Sonya Gandhi's intentions is true, then the opposition better resign themselves to BJP rule for at least the next 3 election cycles... मग पुढचं पुढे बघू...

    ReplyDelete
  3. काल सहजच मराठी चॅनेल काय म्हणतात ते पहिल,तुम्ही म्हणता तसंच सीन दिसला ,इथे पुरोगामी लोक जास्त आहेत त्यामुळं उदयनि त्यांनाच बोलावलं होत. ते चक्क राहुलची तारीफ करत होते ,तेही बळजबरी वाटत होती ,एरवी काही झालं नसताना हे लोकशाहीच्या नावाने मोदींना नावे ठेवतात ,पण राहुल त्यांच्या पाणी फिरवतो,आणि परत त्यांनाच त्याची भलामण करावी लागते ,मोदीद्वेष मोठा आहे ना

    ReplyDelete
  4. आंध्र प्रदेशावर अन्याय झाला आहे आणि आंध्र प्रदेशातील जनता होरपळून निघत आहे असे इतर कोणत्याही पक्षाला वाटले नाही. हा तेलुगू देशम या पक्षाचा पराभव आहे.

    ReplyDelete
  5. भाऊ खरंय राहुल मोदींना उठण्याचे हातवारे करत होता ते तर दिसत होत,सामान्य माणूस असता किंवा दुसरा कोणी राजकारणी असता तर उभा राहिला पण असता अशा अचानक वेळी ,पण मोदी पक्के आहेत ते उभे राहिले नाहीत तस करण चूक होत ते प्रसंगावधान मोदींना आहे ,पण राहुलना नाही २ मिनिटात दिसलं कॅमेरा आपल्यावर असणार आहे त्यामुळं लगेच डोळा मारून फत्ते झाल्याशी घाई करू नये हे नाही जमल, राहुल एकदम कूल आहे त्याला वाटतंय कि लोक कंटाळून काँग्रेस ला १५ वर्षांनी होईना का सत्ता देतील तेवा वयही आहे त्यांच्याकडे,पण मोदी शाह जोडी काँग्रेस ला जिवंत ठेवतील का तो पर्यंत

    ReplyDelete
  6. मोदींनी नायडूंची पण बरोबर फिरकी घेतली ,नायडूंचे लोक आमच्यावर बोला म्हणून सारखा आवाज चढवत होते,ठेवा मोदी संमत म्हणले बोलतो तुमच्याविषयी पण ,मग ते वाट बघत शांत राहिले ,तोवर मोदी दुसर बोलून घेतलं म्हणजे त्यांना ताटकळत ठेवलं परत आंध्रचा विषय बोलून झाल्यावर ते गोंधळ करणार हे जोखून कुणालाही इंटरेस्ट नसलेल आकडेवारी देणार भाषण वाचत राहिले. आपल्याला जनता म्हणून मोदी जवळचे वाटतात ,पण त्यांच्याशी वर्तन करताना सहकारी ,विरोधी पक्षातले लोक ,त्यांचे नोकरशहा याना किती जपून वागावे लागत असेल आणि ते किती कठीण असेल .

    ReplyDelete
  7. अचूक विश्लेषण भाऊ. परंतु यानिमित्ताने मोदींनी काँग्रेसवर आणि गांधी घराण्यावर जे काही तोंडसुख घेतले ते अद्वितीय असे होते. केवळ कालच्या प्रकारातून अनेक मते मोदींनी आपल्याकडे वळवून घेतली हे नक्की समजावे

    ReplyDelete
  8. I dont think so,half part drama might be planned but last episode was rahul's ""talent"{?}.

    ReplyDelete
  9. भाऊ यात गंमत म्हणजे काही महामुर्ख चॅनेलसनी राहुलच्या झाप्पीचे कौतुक सुरू केले अनेक राहुल भक्त पत्रकारांना यात राहुलने बाजी मारल्याचा भास झाला आज एका प्रथितयश चॅनेलच्या संपादकाने फ्रान्स जिंकला पण खरा विजय क्रोइसियाचा झाला असे ट्विट पण केले आहे खरच राहुलसारखा देवदुर्लभ प्रतिस्पर्धी मिळणे हे मोदींचे भाग्यच आहे

    ReplyDelete
  10. आयला डाव असा होता होय....
    सोनी मावशी लै हुश्शार...

    ReplyDelete
  11. अगदी तंतोतंत विवेचन.

    ReplyDelete
  12. भाउ
    राहुलला नको इतके आणि लायकिपेक्षा जास्त महत्व तुम्हिपण विकाउ मिडियाप्रमाणे देत आहात. असो

    शेवटि फुटक्या डब्यात काहिहि, कुणिहि आणि कितिहि वेळा टाकले तरि तो डबा रिकामाच असतो. मग अशा विषयावर मिडियाने तासतास घालवणे, तुमच्या सारख्यानि लिहणे हा सगळा वेळेचा अपव्यय फक्त आहे.

    कावळा कितिहि घासला तरि बगळा होत नाहि
    मग कशाला हि डोकेफोङ?

    ReplyDelete
  13. शिवसेनेच्या ' सामना ' दैनिकाचे संपादक ' संजय राऊत ' काल राहुल बाबाचे कौतुक करताना बघून या लोकांना मोदीद्वेषाने किती पछाडले आहे हे दिसून आले. राहुलमध्ये राऊतांना भारताचे भावी नेतृत्व दिसले ?? ईश्वर शिवसेनेच्या तथाकथित संपादक नेतृत्वाला ' सद्बुद्धी ' देवो...!!

    ReplyDelete
  14. We have seen modiji & bjp was. Confident but we have seen congress came with baseless issues. In Marathi mulacha hattapayi kela ani doka fodun ghetla

    ReplyDelete
  15. Very nice explanation sir

    ReplyDelete
  16. भाऊ,सध्या मोदींना प्रशांत किशोर भेटले याबद्दल बातमी वाचली.क्रपया याबाबतीत आपले विश्लेषण करावे.

    ReplyDelete
  17. फारसं पटलं नाही भाऊसाहेब. ओढूनताणून निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केल्यासारखं वाटतंय. " इतरांच्या पेक्षा आपण खूप वेगळा मुद्दा मांडतो "असं तर तुम्हाला दाखवायचं नाही ना ?
    मी तुमच्या लिखाणाचा चाहता आहे. पण हा लेख पटला नाही हे नक्की.

    ReplyDelete
  18. Well written. Nice Post
    https://www.bloggerbrew.com/

    ReplyDelete
  19. राहुलला प्रमोट करण्यासाठी विरोधी ऐक्याला चुड लावण्याची ही कृती भविष्यात कोणती फळे काँग्रेस च्या पदरात टाकेल याचे भाकित करणे अशक्य असेलही.
    परंतू हे नक्की काय आहे? पुत्र प्रेम, अहंकार की केजरीवाल म्हणतात त्या प्रमाणे 'सब मिले हुआ है जी'.

    ReplyDelete
  20. कड्या शब्दांत समज देणे म्हणजे काय भाऊ?
    आपले लेख चांगले असायचे.
    हल्ली मात्र त्यात अशी भेसळ का दिसते?
    आपण वापरत असलेला एकही हॅशटॅग मराठी का नाही?
    १० लाख मराठी वाचकांना आपण प्रभावित करता.
    चांगलं मराठी वापरलं जावं अशी अपेक्षा आहे.
    कृपया यावर आपण विचार करा.

    ReplyDelete
  21. भाऊ एक नक्की आहे. काँग्रेस पक्षाचा शेवट आणि भाजपा २०१९ ला बहुमत प्राप्त करण्यासाठी स्टार प्रचारक भूमिका मा.राहुल उत्कृष्ट पार पाडणार

    ReplyDelete
  22. No alternative to Modiji and BJP.They have done a lot of good work for the nation and in next couple of years it will be visible for common man

    ReplyDelete
  23. भाऊ खरच फार छान विश्लेषण
    ह्या विजय मुळे विरोधी पक्षाच्या अध्यशान राहुल च नेतुत्व मान्य करावे लागणार व 2019 ला राहुल ला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून काँग्रेस पुढे करणार आणि हाच मुद्दा विरोधी पक्षात फूट पाडेल कारण की शरद पवार मायावती ममता लालू शरद यादव हे लोक राहुल च नेतृत्व मान्य करणार नाहीत आणि मोदी ह्याच गोष्टी चा फायदा घेतील
    भाऊ याचा अर्थ असा तर नाही ना
    कुछ पाणे के लिये कुछ खोना पडता हे
    Plz भाऊ Riple करा

    ReplyDelete
  24. भाऊ खुप चांगलं लिहल आहे
    जो निकाल mp Rj ch चा लागला त्यामुळे काँग्रेस राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा उमेदवार करणार त्यामुळे शरद पवार मायावती ममता लालू शरद यादव यांच्या सारखे मुरबी राजकारणी राहुल यांच नेतृव स्वीकार करणार नाहीत आणि ह्या गोष्टी मुळे विरोधी पक्षात फूट पडेल आणि ह्या गोष्टी चा फायदा मोदी घेतील

    ReplyDelete