Monday, July 30, 2018

माया की ममता?

रविवारी कॉग्रेस पक्षाच्या नव्या अध्यक्षांनी घेतलेल्या पहिल्याच कार्यकारिणी बैठकीनंतर ठामपणे राहुल गांधींनाच पुढल्या काळातील पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तशी जाहिर घोषणाही करण्यात आली. पण ती गर्जना फ़ार काळ टिकलेली दिसत नाही. विनाविलंब दोन दिवसात अन्य पक्षांच्या प्रतिकुल प्रतिक्रीया आल्यावर राहुलच्या नावाचा आग्रह मागे घेण्यात आला आहे. ममता किंवा अन्य कोणीही विरोधी आघाडीचा पंतप्रधान होऊ शकतो, अ्सा सूचक खुलासा करण्यात आलेला आहे. प्रश्न इतकाच आहे, की सर्वात मोठ्या ठरू शकणार्‍या कॉग्रेसचे राहुल पंतप्रधान होणार नसतील, तर उर्वरीत विरोधी नेत्यांपैकी कोणाला त्या पदावर काम करता येऊ शकेल आणि त्याच्यासाठी त्याला कितीसा पाठींबा मिळू शकेल. हे कोडे जनता पार्टीसारखे आहे. कारण जनता पार्टीच्या मुळच्या हेतूप्रमाणे आता राजकारण टोकाला गेलेले आहे. तेव्हा चार भिन्न राजकीय पक्ष व विचारधारा एकत्र विसर्जित होऊन जनता पक्षाची स्थापना झालेली होती. त्यामागची प्रेरणा नवा पक्ष उभा करून नव्या विचारांनी राज्य चालवण्याची नव्हती. हे चार पक्ष त्यासाठी एकत्र आलेले नव्हते. त्यांना पंतप्रधान कोण होणार व कोणत्या धोरणांनी देशाचा कारभार चालवला जाणार, याच्याशी कुठलेही कर्तव्य नव्हते. त्यांच्यातला समान विचार वा त्यांना बांधून ठेवणारा एकमेव दुवा, इंदिराविरोध इतकाच होता. आपल्याला एकत्र येऊन इंदिरा गांधींना सत्ताभ्रष्ट करायचे आहे, हीच त्यांची प्रेरणा होती आणि तसे झाल्यावर एकत्र आलेल्या चार राजकीय गटांना एकत्र टिकण्यासारखे काही कारणच उरलेले नव्हते. सहाजिकच त्यांच्यात परस्परांची भांडणे सुरू झाली आणि त्या हेव्यादाव्यांमुळे जनता पार्टीच रसातळाला गेलेली होती. यावेळी एका पक्षाऐवजी विविध पक्षांची मिळून आघाडी मोदींना हटवण्यासाठी एकत्र येते आहे. तीच त्या ‘बाळा’ची माया व ममता आहे.

एकास एक उमेदवार किंवा एकदिलाने झालेली विरोधी एकजुट, हे मुद्दे बाजूला ठेवू आणि आधी प्रत्येक अशा इच्छुक भावी पंतप्रधानाची सतराव्या लोकसभेतील संख्या किती असू शकते, याचेच समिकरण मांडून बघू. त्यातल्या दोन इच्छुक मायावती व ममता बानर्जी आहेत. बंगलोरच्या शपथविधीला दोघीही अगत्याने उपस्थित होत्या. पण त्यांनी एकमेकांना अभिवादनही केले नाही. पण आपापल्या राज्यात त्यांचा दबदबा असल्याचे कोणी नाकारू शकत नाही. उत्तरप्रदेशात मायावती व बंगालात ममतांचे वर्चस्व नक्कीच आहे. पण लोकसभेच्या ५४३ जागांच्या हिशोबात त्यांचे वर्चस्व असलेल्या जागांची संख्या प्रत्येकी ४० पेक्षा अधिक नाही. उत्तरप्रदेशात समाजवादी पक्षाला सोबत घेऊन मायावती ४० जागी फ़ारतर मजल मारू शकतात आणि बंगालच्या सर्व जागा लढवून ममताही ४० जागा लोकसभेत मिळवू शकतात. मग त्यात कोणाला श्रेष्ठ व योग्य मानायचे, हे ठरवण्याची पाळी येते. यापैकी कोण दुसरीला मान्यता देऊन औदार्य दाखवील? मोदींवर जो एककल्लीपणाचा आरोप सर्रास होत असतो, त्यापेक्षाही या दोघींचा अहंकार अधिक मोठा आहे. तसे नसते तर दोघींनी बंगलोरला एकमेकांना अभिवादन करण्याचा निदान देखावा तरी नक्कीच केला असता. पण तसे काही होऊ शकलेले नाही. त्यामुळे उद्या मोदी-भाजपाचे बहूमत हुकले, तर सर्वात पहिली झोंबाझोंबी याच दोघींमध्ये लागू शकते आणि त्याचे उत्तर सोनियांनाही शोधता येणे अशक्य आहे. २०१२ मध्ये बंगालच्या मुख्यमंत्री झालेल्या ममतांनी मनमोहन सरकारमध्ये आपले रेल्वेमंत्री द्विवेदी यांच्या तिकीट दर वाढवण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आणि ऐन अर्थसंकल्पी अधिवेशनात मंत्री हाकलून लावण्याची नामुष्की पंतप्रधानांवर आणलेली होती. मायावतीही त्यापेक्षा तसूभर वेगळ्या नाहीत. मग दोघींना एकाच आघाडीत कसे व कोणी संभाळायचे आहे?

एक मात्र निश्चीत, हे समिकरण सरकार चालवू शकले नाही तरी कॉग्रेसपेक्षा प्रभावी मते मिळवू शकणारे आहे. कारण त्यांच्या दोन राज्यात मिळून १२२ जागा आहेत आणि त्यात बिहार तामिळनाडूची भर घातली, तर दोनशेहून अधिक संख्या होते. या दोघींना द्रमुक व लालूंचा निर्विवाद पाठींबा आहे आणि एकत्रित चार राज्यांच्या जागा दोनशे होतात. लालू वा द्रमुकचा नेता स्पर्धेत नाही. म्हणून खरे स्पर्धक या दोघीच उरतात. मात्र त्यांची सांगड घालणे अजिबात सोपे नाही. १९९८ सालात अम्मा जयललितांनी वाजपेयी यांच्यासारख्या वडीलधार्‍या पंतप्रधानावर नाराजी कशासाठी व्यक्त केली होती? तर एनडीएच्या बैठकीत आठ खासदार असूनही ममतांना अधिक मान दिला जातो आणि आपल्याला लांबच्या खुर्चीत बसवले, हे निमीत्त देऊन अम्मांनी पाठींबा काढून घेतला होता. आता तर ममता बंगालच्या अनभिषिक्त सम्राज्ञी आहेत. त्या कोणाला किंमत देत नाहीत, हे कुठल्याही वाहिनीच्या बातमीतून साध्या डोळ्यांनाही दिसू शकत असते. सहाजिकच मोदी विरोधातली आघाडी जमली आणि त्यात या दोघी असल्या, तर त्यांचे रागलोभ रुसवेफ़ुगवे कोणी कसे काढायचे, याला खुप निर्णायक महत्व असणार आहे. अर्थात भाजपाचे बहूमत हुकले तरच्या गोष्टी आहेत. कारण आज त्यांना परिस्थिती एकत्र घेऊन येते आहे आणि त्या परिस्थितीचे नाव मोदी असे आहे. तेच राहिले नाही तर एकत्र बांधून ठेवणारा धागाच शिल्लक उरत नाही. कारण मोदी-भाजपला हरवण्यासाठी एकत्र येणे व पर्यायी सरकार चालवणे, हे दोन स्वतंत्र विषय आहेत. त्याबाबतीत कॉग्रेस अधिक योग्य पक्ष आहे. त्याला मोदींना पराभूत करण्यापेक्षाही सत्ता आपल्या हाती घेण्यात रस आहे आणि सत्ताधारी पक्षामध्ये अशी सत्तालालसा आवश्यक वस्तु असते. म्हणून कुठल्याही बहुमताखेरीज सोनिया दहा वर्षे मनमोहन सरकार चालवून दाखवू शकल्या.

मोदी विरोधी आघाडी हे समिकरण काय आहे, तेही तपासून बघता येईल. वर म्हटल्याप्रमाणे चार राज्यातील जागा दोनशेच्या घरात आहेत आणि कॉग्रेस स्वबळावर दोनशे जागा लढवण्याच्या स्थितीत आजही आहे. त्यामुळे बाकीचे पक्ष सोडून दिले तरी केवळ या ममता, द्रमुक, लालू. मायावती व अखिलेश यांची मोट बांधूनही कॉग्रेस भाजपाला मोठे आव्हान देऊ शकते. कारण या आघाडीचे भाजपासाठी चारशे जागी मोठे आव्हान उभे करता येते. जिंकायच्या जागा लढायच्या जागांमध्येच समाविष्ट असतात. सहाजिकच ही निवडक पक्षांची आघाडी कॉग्रेसला उभी करता आली, तरी भाजपाला ४०० जागा सोप्या उरणार नाहीत. त्यातल्या अधिकाधिक जागा या आघाडीने जिंकायचा प्रयास केला, तरी भाजपाला सहजासहजी बहूमतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग अवघड होऊन जातो. बाकी देवेगौडा, चंद्राबाबू, डावी आघाडी, चंद्रशेखर राव इत्यादींच्या मागेमागे धावण्याची कॉग्रेसला अजिबात गरज नाही. कारण त्यात कालापव्यय होऊ शकतो. निकालानंतर अशा पक्षांना भाजपापेक्षा कॉग्रेस आघाडीकडेच येणे भाग पडणार असेल, तर त्यांच्या किरकोळ प्रभावासाठी आज त्यांच्या मागे धावून तारांबळ करून घेण्यात अर्थ नाही. कॉग्रेस किंवा भाजपाविरोधी आघाडीचे प्रथम लक्ष्य मोदींचे बहूमत हुकवण्याला असले पाहिजे आणि ते साध्य करण्यासाठी किमान पक्षांची आघाडी असल्यास अधिक सुसुत्रता पाळली जाऊ शकेल. फ़क्त उंचावणार्‍या हातांची संख्या उपयोगाची नसून, प्रत्यक्षात अधिकाधिक जागा जिंकू शकणार्‍या किमान नेते व पक्षांच्या लौकर एकत्र येण्याला प्राधान्य असायला हवे. जितक्या वेगाने त्यांच्या अहंकाराचे निर्दालन होऊन त्यांच्यात एकदिलाने वाटचाल करण्याची प्रवृत्ती वाढीस लागेल, त्याला महत्व आहे. डिसेंबरपुर्वी ही एकवाक्यता होऊ शकली, तर मतदारापुढे एक भक्कम पर्याय उभा राहिलेला दिसू शकतो. मग खोगीरभरतीसाठी कालापव्यय कशाला?

मात्र असा कुठलाही प्रयत्न व धडपड करताना वेळोवेळी आघाड्या कशामुळे फ़ुटल्या वा विस्कळीत होत गेल्या, त्याचा इतिहास समजून घेतला पाहिजे. भाजपाचा पराभव किंवा मोदींना हटवणे हा हेतू असला, तरी अजेंडा नवे सरकार चालवण्यासाठीचा असला पाहिजे. मोदींना हटवणे हा मतदाराला भावणारा अजेंडा असू शकत नाही. तर मोदींपेक्षा चांगले सरकार व कारभार देण्याचा अजेंडा मांडला गेला पाहिजे. दलित वा मुस्लिम व्होटबॅन्क अशा हटाव अजेंडाला प्रतिसाद देत असतात. पण सत्ताबदलाच्या लढतीमध्ये त्यापेक्षा मोठा व्यापक अजेंडा आवश्यक असतो. मोदींना हटवल्यावर पुढे काय, असे भलेथोरले प्रश्नचिन्ह मतदारासमोर असते आणि त्याचे उत्तर मोदीविरोधी आघाडीला देता आले पाहिजे. मागल्या प्रचारात मोदींनी कॉग्रेस व युपीए विरोधात जबरदस्त भडीमार केलेला होता. पण त्याचवेळी आपण काय करू शकतो व करणार आहोत, त्याच्याही कल्पना मतदाराला सांगितलेल्या होत्या. पंधरा लाख रुपये वा रोजगाराच्या अधिक संधी, असे जे प्रश्न आज मोदींना अगत्याने विचारले जातात, ते भाजपाच्या जाहिरनाम्यातली आश्वासने नसून, विविध प्रचारसभांमध्ये केलेल्या भाषणातील लोकांना भुरळ घालणारे मुद्दे आहेत. तसे कोणते मुद्दे मतदाराला कॉग्रेस वा पर्यायी आघाडीकडे ओढून आणू शकतील, ते शोधायला हवे आहेत. सहाजिकच नुसते मोदींना शिव्याशाप देऊन मते मिळणार नाहीत, की मोदी हटावसाठी मते मिळणार नाहीत. आम्ही काय करू, त्याचाही गोषवारा मांडावा लागेल. पुर्वीच्या आघाड्या वा जनता पक्ष होणार नसल्यची ग्वाही द्यावी लागेल आंणि त्याचे प्रदर्शन मांडताना माया व ममता यांचाही विश्वास जनतेला वाटायला हवा आहे. नुसती जुन्या मतदानातील आकड्यांची बेरीज करून भागणार नाही. ती कागदावर छान असते आणि व्यवहारात टिकत नसते. म्हणूनच सर्व पक्षांच्या बेरजेला सोडून मोजक्यांची बेरीज कधी होते बघायचे.

4 comments:

  1. भाऊ या लेखात maya mamta विरोधकंचे सरकार ! अशी सध्या तरी patishtiti दिसत नाही.त्यामुळे थोडासा हवेत phirlyasarkhe vatate. Pan yamage ek dhurth vichar disun येतो ki mamta किंवा mayavati nako pan rahul yana पुढे kara. Anyway changla lekh ahe

    ReplyDelete
  2. Another point is new voters who do not reflect in these statistics of the past. I think a substantial number of new voters will be voting this time. What they will do will make a very big impact on the final outcome and this is something that statistics of the past will not be able to capture...

    ReplyDelete
  3. Pl.write something different than congress,bjp,modi or rahul.

    ReplyDelete
    Replies
    1. You can always excercise the choice on not opening the page.

      Delete